शून्य असे मी ओढुनताणुन
नुसता पोकळ रिक्ताकार
पोकळीत कण भरण्यासाठी
कुरतडतो अंतरी विचार
रिक्त भासते परी तिथे मग
राजस तामस तगमग नूतन
कशास पुनरपि रेटा द्यावा
नव्या दमाने प्राणच ओतुन?
शून्य म्हणुनी का व्यर्थ जगावे
का शून्यातच विरूनि जावे
शून्यभावनें राख कुडीची
व्योमाकाशी विखरत जावे?
पण..
क्षुद्र तृणावर सावरलेला
दवबिंदू जणु प्रकाशयात्री
अस्तित्वाचे अगम्य उत्तर
नित्य वसतसे त्याच्या गात्री
शांत स्वरांची सात्विक वृत्ती
कधी ऐकतो अंधारातील
कधी झोंबतो पहाटवारा
शाल तोकडी घेता वत्सल
मनी कुणाच्या बीज रुजवितो
बीजातुन कधी स्वये उगवतो
खडकाची मुळी तमा न धरता
मातीतुनी पालवी घडवितो
वनवासी सोयरे नसो, पण
रत विश्वाचे भान असे मज
थेंब टपोरे सरसर येता
होऊन कोळी जाळे विणतो
नदी वाहता निर्मळ झुळझुळ
मान-पाठ करुनिया धनुकली
पलाशपानी द्रोण घेऊनी
प्रवाहातले कृमी तारतो
वृक्षांच्या अंतरिचे रूदन
बनुनी पिंगळा स्तब्धसाक्षीने
अपुल्या हृदयी अर्कवून मग
भोवताली कर्कशा घुमवितो
पूर्वीची मी साधा विनोद ऐकला तरी फिदीफिदी हसत असे
उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याप्रमाणे खळाळून वाहत असे ।
आता अख्खी विनोदी गोष्ट वाचली तरी हसू येत नाही
कुणी खिंकाळून हसलं तर आवडतही नाही ।।
पूर्वीची मी भुक्कड अशी खादाडी करत हिंडत असे
बिनधास्तपणे रस्त्यावर भैयाकडची पाणीपुरी हाणत असे ।
आताशा चटपटीत चाट हायजिनिक वाटत नाही
कुणी खात असेल तर आवडतही नाही ।।
पूर्वीची मी कुठलाही विषय घेऊन अखंड बडबड करत असे
अनंतकाळ वाहणाऱ्या वाऱ्याप्रमाणे वाचा यज्ञ करत असे ।
आता चुकूनही जास्त बोलायला आवडत नाही
कुणी बडबडत असेल तर आवडतही नाही ।।
अपूर्ण कविता
माझ्या कवितेच्या वहीत
काही पाने उगाच फडफडतात
अपूर्ण कवितेची
कथा सांगतात
भरल्या ताटावरुन उठलेल्या
माणसाची
शब्द सुरेख असतात
पानं भळाळतात
खंत
अर्धवट अनुभूतीची
उगाच म्हणायचं जगलो
परीपूर्ण
समज काढायची वेड्या
मनाची
© दत्तात्रय साळुंके
वास्तव
एखाद्या सुंंदर , हव्याहव्याशा
स्वप्नातून अचानक जाग येते ...
तेव्हा सामोऱ्या येणाऱ्या
वास्तवाचा हात हातात घ्यायला
आपण बिलकुल तयार नसतो
मग अंगावर येणारे हे सत्य नाकारुन
आपण ओढून घेतो पुन्हा
त्या हव्याहव्याशा स्वप्नांची
उबदार चादर ...
या अशाच
स्वप्नं आणि वास्तवाच्या मध्यसीमेवर
अडकून पडलेय आयुष्य ...
मी कवटाळू पहातेय स्वप्नांना
आणि वास्तव मला ...
कविता क्षीरसागर
भिती वाटते ..
जगण्याचीही भिती वाटते
मरण्याचीही भिती वाटते
पांढरपेशी मनास माझ्या
कसलीही पण भिती वाटते
आवडते जरि हवा मोकळी
लावुन घेते दारे खिडक्या
क्षुल्लकसे वाटती परंतू
डासांचीही भिती वाटते
मनि शब्दांच्या मोजत मात्रा
दुसऱ्यांचे मोजतेय पैसे
जीव रमेना नोकरीत पण
सोडायाची भिती वाटते
एकेकाचे दुःख पाहुनी
कातर कातर मनात होते
पोकळ पण ह्या वांझ भावना
त्यांचीही मग भिती वाटते
एकदा कधीतरी
भावनेच्या आवेगात
आसवेच
झाली होती शाई
कविता लिहिताना ...
आता जणू
तुला त्याची
चटकच लागलीय
कविते ..
कविता क्षीरसागर
शब्दा पलीकडची नि:शब्द निखळ मैत्री
दुधाच्या सायी सारखी घट्ट असते मैत्री
नदी पात्रातील प्रवाही पाण्यासारखी दोस्ती
अवगुणात चांगले गुण शोधणारी असते दोस्ती
अवखळ, अल्लड, दिलदाराची यारी
यार साठी मार खायची सुद्धा असते त-यारी
दु:खातील काटे बाजूला काढणारा सखा
स्वत:चा घासातील घास भरवणारा असतो सखा
आयुष्याचा खेळ सावरत असतो सवंगडी
बेरंग अस्तिवातही रंग भरवत असतो सवंगडी
नात्याच्या पलीकडे संगत करतो सोबती
आनंद बेफिकीरीने वाटत असतो सोबती
शब्दाविण नसते कविता
अन सुरांविण कसले गाणे
तसे तुजविण माझे असणे
अन तुजविण माझे जगणे...
श्वासांच्या मैफिलीत माझ्या
तुझेच सूर आळविते
जगण्याच्या तालामध्ये
तुझी चाल नित्य बांधते
तुझे हसणे माझी कविता
तुझे असणे माझे गाणे
तुजविण कसली कविता
तुजविन कसले गाणे
©राजश्री
२९/०६/२०१८