गेली अनेक शतके मनुष्याला अखंड साथ लाभत आली, ती स्वर आणि सूररूपी संगीताची! मात्र या प्रवासात अनेकदा अशी वळणे येतात, जेव्हा या कलेची मीमांसा करणे गरजेचे होऊन जाते. काही टोकदार प्रश्न विचारावे लागतात, प्रसंगी कलेच्या काही अंगांवर अभ्यासक-समीक्षकांना कठोर शब्दांत टीकादेखील करावी लागते. कारण, या संगीतकलेचा तिच्या उगमस्थानाशी असलेला संपर्क तुटलेला असतो.
कुठलीही व्यक्ती भोवती घडणाऱ्या क्रियेला दोन प्रकारे सामोरे जाते. पहिला प्रकार म्हणजे ती क्रिया समजणे तर दुसरा प्रकार म्हणजे ती क्रिया अनुभवणे. समजण्याच्या क्रियेत आपल्या साथीला असतात शब्द. आणि आपण एका विशिष्ट भाषेत व्यक्त होतो. परंतु अनुभवण्याच्या स्थितीत आपल्या साथीला असतात बऱ्याच अनामिक भावना. आणि त्याच्या जोडीला असतात बरेच अमूर्त विचार आणि अगणित पैलू! त्यामुळे अनुभवण्याची स्थिती ही अधिक व्यापक आणि गूढ असते. उदाहरण द्यायचे झाले तर अशी कल्पना करूया की आपण एक रम्य भूप्रदेश पाहत आहोत. किंवा सूर्योदय होताना त्या ठिकाणी उपस्थित आहोत.