विसरणेही तुझ्या लक्षात नाही
मना, सुटका तुझी इतक्यात नाही
तुझा मजकूर तर केव्हाच कळला
भलेही तो तुझ्या पत्रात नाही
जवळ येणे तुला जमलेच केव्हा?
विलगणे अन् तुझ्या हातात नाही
नको ती ओढ स्वप्नांची जराही
खरे आयुष्य हे स्वप्नात नाही
मना, तू चल, पुकारे चांदणे बघ!
तुझे कोणीच या गावात नाही
तुझीही वेगळी आहे कहाणी
हवे जे तुज, तुझ्या नशिबात नाही
तुम्ही जो पाहता तो मोकळा मी
खरा मी कैद! - पण माझ्यात नाही
- नचिकेत जोशी
सखी,
तुझा वाढदिवस जवळ आलाय. खरंतर वाढदिवस म्हणून काही विशेष सेलिब्रेशन केल्याचं नाहीच आठवत. माझ्या वाढदिवशी तू माझ्या घरी यायचं, तोवर मी नवीन ड्रेस घालून तयार रहायचं, मग आपण दोघी आजोबांकडे जाऊन त्यांना नमस्कार करून तसंच पुढे समुद्रावर जायचं. तिथे भेळ घ्यायची, आणि जरा वेगळं काही म्हणून एखादं आइस्क्रीम! झाला वाढदिवस!
आणि तुझा वाढदिवस तर बरेचदा पुण्यातच व्हायचा. म्हणजे तू पुण्यनगरीत, नि मी रत्नागिरीत. मी पेपर झाले म्हणून सुटीच्या उद्योगात, तर तू एक मोठी परीक्षा संपली तरी टि.म.वि. च्या संस्कृतच्या परीक्षेत गर्क!
आज टपाल बघत होते. दोन बँकेची पत्रं, एक वीज बिल, ५ जाहिरातींची पत्रं ! सगळी छापील ! माझे नाव पत्ता पण ! किती दिवस झाले बरं हस्ताक्षरातला स्वतःचा पत्ता वाचून ?
पत्र या माध्यमाने भारलेले दिवस आठवले. जेव्हा मी एका सामाजिक संघटनेचे काम करत असे. उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत शिबिरं असायची. आणि तिकडे जाऊन आल्यानंतर पत्रांचे पूर. साधारण १२ वर्षांपूर्वीच्या त्या पत्रांमधली वाक्य आजही काळवेळ न पाहाता डोक्यात घुमतात.
" मायाताई, तुझी खूप आठवण येते गं, शाळा छान चालू आहे, तुझ्या आईबाबाना नमस्कार "
" मायडे, भोसला मिलिटरी स्कूल ने बोलावलंय, जाऊया नं? "