दूर दूर सांगाती
निष्कारण फिरणारा
राने, वाटा, प्रवास..
रम्य धुंद करणारा
दुखर्या जागा जपून
आवाजी ओळखून
"चल भेटू नाक्यावर"
म्हणणारा दोस्त हवा!
चिडल्यावर हसणारा,
हसल्यावर चिडणारा
बेफ़िकरे काहीही
का ही ही बकणारा
मनी येते ते सारे
अघळपघळ सलणारे
शब्दा मौनांत शांत
जगणारा दोस्त हवा!
चुकते माझे बरेच
धडक्या वाटेत ठेच
गडबडूनी वाटे मग
आता चालू नयेच.
नेमक्या अशाच क्षणी
काढूनीया आय-भणी
"उठ साल्या, बाजिंद्या!"
डसणारा दोस्त हवा!
तुझं काहीच चुकत नाही...
मलाच झेलणं सोपं नाही!
मी भुरभुर पावसासारखी तुझ्या मातीत रुजले असते
रंगा-गंधा-स्पर्शातून मी तुला स्पष्ट दिसले असते...
तर... तूही थरथरला असतास...
ओंजळभर हुळहुळला असतास...
पण मी काही बरसत नाही
चामडीबाहेर पसरत नाही
तुझं काहीच चुकत नाही...
माझंच कोडं सोपं नाही!
हे वर्ष माझ्या जाणिवेला टाळूनी जावे
जे जसे होते तसे ते पुन: तसे व्हावे
एवढी नव्हते कधीही भंगलेली मी...
की अभंगाचे निळे मज ठायी उमटावे!
मी अशी नव्हते कधी का... अशीच मी होते?
गल्लतींच्या जंगलातील झाड मी होते?
हे कधी कोणासही मग ना कळेना का...
वर्ष जावो एक क्षणही ना सरेना का...
मी मला ओलांडूनी या पार पोचावे...
हे वर्ष माझ्या जाणिवेला टाळूनी जावे!
काळामधल्या भेगांतून ही रांगत जातील राजस बाळे
विरून जातील गळून जातील वाट पाहण्याचे डोहाळे...
पांघरून सार्या मौनाला निजून जाईल निरभ्र अंतर
दरवळेल दोन्ही टोकांना अपूर्णतेचे अत्तर काळे!
कुणी अपेक्षा ठेवाव्या अन् कुणी करावी त्यांची पूर्ती?
हळूहळू बघ तुटून जाईल अल्लद हेही अमोघ जाळे!
उपभोगांच्या रुमालात ही वेचून घेऊ प्राक्तन पुष्पे
काय उद्याच्या बहरालाही येतील ऐसे गंध उमाळे?
वाट पाहणार्या डोळ्यांचे तपशील छापूनी घे चित्ताशी
तुझ्या रिक्त घरट्यात अखेरी रांगतील बघ त्यांचीच बाळे....!
कसे कोठच्या दिशेला
चित्त माझे थरथरे
अवकाळी निरभ्राचे
भ्रम वागवती झरे...
झऱ्यातून वाहतात
वाट हरवले डोळे
ज्यात रंगले कितेक
पोहोचल्याचे सोहळे!
मला वाहता येईना...
सारी तुंबलेली स्वप्ने...
लिंपलेल्या भेगांतून
थोडा ओलावा जपणे!
एवढेच मी करणे...
बाकी काही हाती नाही!
स्वप्न भंगल्याचे भय
रात जागल्यास नाही!!!
रात जागते जागते
स्वप्न दारी खोळंबते
उशापाशी रोज कोण
चिंब भिजुनिया येते?
तुझ्यावाचून दिवाळी
आल्या आल्या परतली
यंदा सणालाही तुझ्या
नसण्याची चव ओली...
यंदा गालावर तुझे
उटण्याचे बोट नाही
तुझ्या हातच्या चवीची
यंदा लयलूट नाही!
यंदा माझे घर मला
झाले अनोळखी कसे
यंदा शहाण्यात माझे
गेले हरवून पिसे....
आज तुझी साडी ल्याले
तुझा दागिना घातला
आरशात खोल खोल
किती शोधते मी तुला!
आई ये की गं एकदा
एकदाच मार मिठी...
तुझ्यावाचून दिवाळी
जशी अंधारात दिठी!
कधी मी असते
कधी मी नसते
कुणाला कळते
कुणा नाही!
मीही हो.. सांगते!
हसतच होते
आताशा दिसते
कुणा नाही!
माझी मीच लुप्त
माझे मन सुप्त
विश्वातून गुप्त...
दिशा दाही!
माझ्या मनातही
उमलते काही
तुला दिसेलही
किंवा नाही!
तरिही इथेही
बहुदा तिथेही
सांडते कुठेही
कुणी नाही!
डोळ्यांतही नाही
काळजात नाही
धगीतही नाही
धूर नाही!
अशी मी बधीर
खरंच अधीर
माझ्यापाशी नाही
फार काही!
मला दाट संशय आहे,
की या पदरी भसाभस पडलेल्या आयुष्याचं मी काहीही करणार नाही!
जगण्याची सगळी माती सुपिक असेलही कदाचित...
पण मी इथं काहीही पेरणार नाही!
अन् मग अर्थातच... काहीही उगवणारही नाही!
मला दाट संशय आहे!
मला दाट संशय आहे की या हातांचा जन्म...
स्वत:चीच पत्रं आणि चित्रं टराटरा फाडण्यासाठी झाला असावा!
यांचे ठसे उमटलेलं एकही काव्य ह्यात राहू देत नाहीत हेच.
आणि कितीही करूणेनं पकडलं तरी निखळून, निखळून, निसटून जातं यांतून सारं
जे खरंतर मला कधीच जायला नको असतं!
हे हात मला फितूर असावेत...
मला दाट संशय आहे!
किती विस्तिर्ण प्रदेश आपण पार करून आलोय बघ!
थोडी नजर खाली घे. थोडं जरा मागे बघ.
ते जे सारं दिसतंय ना... तो स्वर्ग होता!
हे हे इथं ठसलंय ना... तो स्वर्ग आहे!
माझ्या तुझ्यात विरला ना... तो स्वर्ग होता!
तुझ्या माझ्यात हसतंय ना.... तो स्वर्ग आहे!
......................................