कृष्णविवारातला काळा बिंब मी..
अथांग अवकाशी अदृश्य टिंब मी..
माझ्या माझ्यातच मी गुंतलेलो
स्वप्रतिमेत हलका चिंब मी..
उदास काळ्या रात्री, निश्चल मी.
थांग ना मनाचा, असह्य मी..
पसारा हा मोठा,त्यात रिक्त मी.
भल्या विचारांत, आरक्त मी..
न सुचलेल्या कवितेचा शब्द मी...
न उमगलेल्या भावनांचा अर्थ मी...
लपलेल्या मनाचा स्वार्थ मी..
आभासी ह्या जगाचा व्यर्थ मी...
- अजय चव्हाण.
आज पुन्हा पावसाची रिपरिप चालू व्हायची चिन्ह दिसत होती. सिलाई मशीन चालवतांना माझी नजर राहून राहून खिडकीतून दिसणार्या चाळीच्या गेट कडे जात होती. चांगले सहा दिवस झाले मान्सून कासारगोडच्या किनार्याला धडकून, पण साधे तासभर सूर्यदर्शन होईल ईतपतही ऊसंत दिली नाही त्याने. सतत भरून असलेलं आभाळ, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा, प्रलयकाळ अजून काय वेगळा असावा? सिजू आजही भिजूनच येतोय की काय? आज पुन्हा भिजला तर ऊद्या पुन्हा शाळेसाठीचे कपडे ह्या दमट हवेत वाळणार कसे? सकाळी शाळेच्या ओलसर पँटवरून फिरवण्यासाठी तवा गरम करून दिला तर म्हणे, 'ह्या तव्याला अंड्याचा वास येतो'.
काल दुपारी चार वाजता अचानक मला कसल्याश्या आवाजाने जाग आली.
डोळे उघडून चोहीकडे नजर टाकली तर अंधारून आल्याचा भास झाला.
खिडकीचे दरवाजे सताड उघडले तरीही मोजकाच संधीप्रकाश आत शिरकाव करत होता.
काल याच वेळी जेव्हा रटरटीत उनं पडली होती तिथे आज ही कातरवेळ.. मन चुकचुकल्यावाचून राहिले नाही..
दूर क्षितिजाकडे पाहिले आणि विस्मयचकित नजर तिथेच खिळली.
कोण ढगांची भाऊगर्दी झाली होती तिथे.
डोळा लागण्यापूर्वी निरभ्र अन कोरडे आकाश बघवत नव्हते.
किती तासांची झोप घेऊन मला जाग आली होती कळेनासे झाले.
की काही दिवसांनीच जाग आली होती.
इतक्यात कसलासा आवाज झाला की काळजाचे पडदे फाटावेत.