'अस्तु' च्या निमित्ताने..
आयुष्यभर किती काय काय करून आपण आपलं अस्तित्व अधोरेखित करण्याची धडपड करत असतो. अगदी गर्भात प्रवेश केल्यापासून ही लढाई सुरू होत असावी. आपण 'आहोत' हे दाखवण्यासाठी हालचाली सुरू होतात त्या तेव्हापासून. रीतसर जन्म झाला, की या हालचालींना आणखी प्रतलं, आणखी अर्थ, आणखी साधनं आणि मार्ग मिळायला सुरूवात होते. बुद्धीचा विकास होत जातो आणि मग मेंदू एक भला मोठा सर्व्हर बनतो. चांगलं-बरं-बुरं-वाईट कळायला सुरूवात झाली, की अनेक आठवणींसाठी लाखो-करोडो कप्पे तयार होतात. या आठवणींतून आणि अनुभवांतून येणारं बरंवाईट शहाणपण वापरून पुढचं आयुष्य आपण जगत राहतो.

