धागा भरकटण्याचा धोका

Submitted by प्रकाश घाटपांडे on 27 June, 2023 - 10:01

मायबोली किंवा तत्सम संवादी संकेतस्थळांवर धागालेखकाने एखादा लेख टाकला तर त्या लेखावरील प्रतिक्रिया या चर्चा व गप्पा या स्वरुपात बनत असतात. त्यावर धागालेखकाचे नियंत्रण असतेच किंवा असावेच असे होत नाही. अन्यथा धागा वा! वा! छान छान! अशा त्रोटक प्रतिक्रियात वा केवळ वाचनमात्र स्वरुपात होतो. धागा भरकटण्याचे डेव्हिएशन किती व कसे असावे याचे साचेबद्ध उत्तर देता येत नाही. प्रत्यक्ष भेटीतही जेव्हा आपण अशा गप्पा मारतो त्यावेळी त्यात बराच विस्कळीत पणा येत असतो. ही काही विशिष्ट औपचारिकतेचे बंधन असणारी न्यायालयातील केस नसते. भरकटण्याचा धोका हा जिवंत धाग्यात असतोच. मूळपदावर गाडी आणावी लागते कधी कधी. कदाचित भविष्यात धागालेखकाला वाचनमात्र असे धाग्याचे स्वरुप ठेवण्याचा पर्याय देणे मायबोली प्रशासनाला गरजेचे होईल. तेव्हाच धाग्याचे भरकटणे थांबेल म्हणजे फक्त ब्रॉडकास्ट स्वरुप. वाचकांचा प्रतिसाद नाही.
प्रतिक्रियांमधे आलेल्या अनुषंगिक व समांतर गोष्टी या मुख्य प्रवाहाला पूरकच बनतात. विचारांची व्याप्ती वाढवतात. कधी कधीतर मूळ चर्चेपेक्षा उपचर्चा वा उपउपचर्चा याच अधिक उपयुक्त वा रंजक होतात. या मधे धागा निश्चित भरकटतो. पण त्या भरकटण्यातून काही वाचकांना आनंदही मिळतो व काही त्यांच्या दृष्टीने उपयुक्त असलेली माहितीही मिळते. आता लेखकाला आपल्या लेखावर वाचकांच्या कुठल्या प्रतिक्रिया याव्यात किंवा येवू नयेत यावर नियंत्रण नसते.पण कुठल्या प्रतिक्रियांना उत्तर द्यायचे व कुठल्या नाही याचे स्वातंत्र्य निश्चित असते. छापील नियतकालिकांमधे संपादकाला लेख व प्रतिक्रिया छापायच्या कि नाही याचे स्वातंत्र्य असते. संकेतस्थळावरही प्रशासकाला/संपादकाला संकेतस्थळाच्या धोरणात कुठले साहित्य वा प्रतिक्रिया बसत नसतील तर ते अप्रकाशित करण्याचा अधिकार राखून ठेवला असतो. फेसबुक सारख्या माध्यमात देखील काही अंशी फेसबुकचे नियंत्रण असते. पण माझी भिंत माझ्या गवर्‍या हा प्रकार तिथे दिसतो. मनोगत सारख्या काही संकेतस्थळावर धागाकर्त्याचे लेखन हे प्रशासका ने मंजूर केल्याशिवाय ते प्रकाशितच होत नाही. काही साहित्यिक पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्याचे आकलन चर्चा प्रतिक्रिया समीक्षा सौंदर्य हे वाचकांवर सोपवून मुकत होतात. आता धागा भरकटला आहे का? त्यातील उपचर्चा, उपउपचर्चा या समांतर आहेत की अवांतर हे धागा लेखकाने ठरवायचे, वाचकांनी ठरवायचे कि संपादक/प्रशासकानी ठरवायचे हा ही चर्चेचा विषय होउ शकतो. एखा्दा अकॅडमिक लेख बिंदुगामी ठेवण्याच्या प्रयत्नात रिसर्च पेपर चा रुक्ष फील येतो. त्याची सामाजिक बाजू वा परिणाम हा समांतर पैलू त्या ठिकाणी समांतर न ठरता अवांतर ठरतो. संसदेतील वा टीव्हीवरील चर्चेतही वेळेच्या मर्यादांमुळे तसेच विस्तारभयामुळे सभापती वा ॲंकरला नियंत्रित कराव्या लागतात.
मंडळी नुकतीच कुमार यांच्या धाग्यावर हा विषय आल्याने तो धागा भरकटण्याचा धोका निर्माण झाला म्हणुन मी स्वतंत्र धागा इथे चर्चेसाठी घेतला आहे. असे काही तांत्रिकदृष्ट्या करता येईल का की धागालेखकाला आपल्या लेखावरील प्रतिक्रिया ही प्रकाशित वा अप्रकाशित करण्याचा अधिकार असेल? आपल्याला काय वाटते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरकटला तर भरकटू द्यावा. सध्या जसे प्रशासक अपवादात्मक परिस्थितीत/ परिस्थिती अगदीच हाताबाहेर जाऊ लागली की हस्तक्षेप करतात ते मॉडेल सगळ्यात जास्त लोकशाहीवादी आणि सर्वांना समान न्याय, लेव्हल प्लेईंग फील्ड देणारे आहे.
लेखकाला/ लेखिकेला प्रतिक्रिया प्रकाशित/ अप्रकाशित करण्याचा अधिकार अजिबातच असू नये. तो एकदा आला की त्या साईट वरचा माझा (कदाचित अनेकांचा) विश्वास उडायला सुरुवात होते. अपवादात्मक परिस्थिती मॉडरेशन असू द्यावे पण ते करण्याचा अधिकार मात्र हुकुमशाहीवादी असावा. आणि हुकुमशहा हा सेन/ लोकशाही वादी असावा. त्याने मनमानी चालू केली की उतरती कळा आपोआप लागते.
सध्याचे प्रशासक हा समतोल उत्तम प्रकारे साधत आहेत. Happy आपल्या संसदीय लोकशाहीत अगदी तंतोतंत असेच असते. एकदा प्रतिनिधी निवडून दिला की त्याला तुम्ही पुढच्या पाच वर्षांत विविध प्रश्नांवर तुमच्या भूमिका सांगू शकता पण त्या विचारात घेणे अथवा न घेणे यावर नागरिकांचा शून्य अधिकार असतो. प्रत्येक निर्णयाला लोकमत घेणे जसे अभिप्रेत नाही तसेच काहीसे.

>>>>>>>>>असे काही तांत्रिकदृष्ट्या करता येईल का की धागालेखकाला आपल्या लेखावरील प्रतिक्रिया ही प्रकाशित वा अप्रकाशित करण्याचा अधिकार असेल? आपल्याला काय वाटते?
त्या सुविधेचा दुरुपयोग होइल हे १००%. दगडावरची रेघ. उदा - मला याची विरोधी मते आवडत नाहीत - कर अप्रकाशित Proud

अपवादात्मक परिस्थिती मॉडरेशन असू द्यावे पण ते करण्याचा अधिकार मात्र हुकुमशाहीवादी असावा. आणि हुकुमशहा हा सेन/ लोकशाही वादी असावा. त्याने मनमानी चालू केली की उतरती कळा आपोआप >>>>>>> हा मॉडरेशनचा अधिकार कुणाचा असावा?

वेस्ट इंडिज वि नेदरलँड सुपर ओवर - छान सामना झाला.

नेदरलँड ने एकहाती सुपर ओव्हर काढली. एका षटकात 30 धावा आणि विंडीज च्या दोन विकेट.

प्रत्येक निर्णयाला लोकमत घेणे जसे अभिप्रेत नाही तसेच काहीसे.>> पण निर्णय घेण्याअगोदर जनमत चाचपणे हे तर अभिप्रेत आहे ना?

भरकटला तर भरकटू द्यावा>>>> पण जेव्हा धागालेखकाची इच्छा असते की धागा भरकटू नये तर अशा वेळेला त्याने काय करावे?

>>>>>>पण जेव्हा धागालेखकाची इच्छा असते की धागा भरकटू नये तर अशा वेळेला त्याने काय करावे?
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन Proud - या मंत्राचे १०८ आवर्तन करावे.

धागा लेखकाने अगोदरच सूचना टाकावी की "अमुक विषयावरचीच मते मांडा."

मी एकदा इथेच एका धाग्यावर प्रतिसाद दिला आणि वाचक त्या मुद्यावर चर्चा करू लागले. मग धागा लेखकाने तो धागा प्रतिसादांसह बंद केला व पुन्हा छापून आणला. मी काय ते समजलो. तसेच एकदा फूसबुकवर झाले तेव्हा त्या अकाउंटवाल्याने ती पोस्टच उडवली. तिकडे ठीक आहे कारण फेसबुक मुळात 'instant messaging' आहे. दीर्घकालीन नाही.

तर इकडे एखादा विचार सर्व बाजूने मांडला जात असतो तो कुणाला काटेरी वाटू लागेल. प्रतिसाद नसलेले लेखन आणि वर्तमानपत्रातील छापील लेखन यांत फरक काय राहिला?

काही गणंग आहेत जे उगाचच काड्या करतात. पण इन जनरल पब्लिक धाग्यावर अवांतर न करण्याबाबत तेवढे संवेदनशील म्हणा आहे.

प्रतिसाद नसलेले लेखन आणि वर्तमानपत्रातील छापील लेखन यांत फरक काय राहिला?>>> संकेतस्थळावर प्रतिसाद नसलेले लेखन हे गुगल सर्च साठी खुले राहते. काही ठिकाणी किती वाचने झाली हे ही समजण्याची सोय आहे. किमान क्लिक ची संख्या तरी समजते.

चांगले लिहिले आहे.
----
सामो, आज सुटली आहेस. Lol
अमित+१
मला लाईक व व्यूज् बटणाची सोय हवी होती, म्हणजे कोणी कुठल्या पोस्टीला लाईक केलं हे बघायचं व आपल्याला कुणी कुणी लाईक केलं ते बघायला पुन्हा पुन्हा यायचं. लेखकाने वाचकांना, वाचकांनी लेखकांना पर्सनल स्पेस द्यायला हवी, चर्चा व्हायला हव्यात- अपेक्षा मात्र नकोत. कारण धागा जरी धागाकर्त्याचा असला तरी सोशल मीडिया एकाचवेळी सर्वांचाच असतो. भरकटला तर भरकटला. ॲडमिन ठरवतील कधी-कुठं कुलूप घालायचं. बाकी सगळं ज्याच्या त्याच्या सोशल एथिक्स वर. उलट साधारण कंटेंट वर चर्चा चांगली होती, चांगले लिहिले असले तर फक्त 'आभार,धन्यवाद, छान,छान व +१' इतकेच असते. खरंतर लेखन मुक्त असायला हवं पण काही लेखक आपल्या लेखाच्या अतोनात प्रेमात असतात, ईनमीनतीन दिवस पहिल्या पानावर राहणाऱ्या लेखाची एवढी आसक्ती बघून अघळपघळ चर्चेला वाव असणारी प्रतिक्रियाच द्यावी वाटत नाही.

>>>>>>>पण काही लेखक आपल्या लेखाच्या अतोनात प्रेमात असतात, ईनमीनतीन दिवस पहिल्या पानावर राहणाऱ्या लेखाची एवढी आसक्ती बघून अघळपघळ चर्चेला वाव असणारी प्रतिक्रियाच द्यावी वाटत नाही.
काय गं शालजोडीतले लगावतेयस Wink

धाग्यांचा विषय आवडला Happy

अमितव
+७८६

मला मायबोलीचे मॉडरेशन मॉडेल सर्व मराठी संकेतस्थळांमध्ये बेस्ट वाटते.
आणि हे मी मायबोलीवर आहे म्हणून म्हणत नाहीये, तर हे तसे आहे म्हणून मी मायबोलीवर आहे.

आणि म्हणून मी इथल्या प्रशासनाच्या प्रत्येक निर्णयाचा मग भले तो माझ्या विरोधात असेल, मला न पटणारा असेल, तरी त्याचा आदर करतो Happy

मला जिथे उदाहरण देताना शाहरुख चा उल्लेख करावासा वाटतो तिथे मी बिंदास करतो. जर कोणाला मुद्दा सोडून त्यातला शाहरूख पकडून त्यावरच चर्चा करावीशी वाटले तर तो त्यांचा प्रॉब्लेम, त्यांचा दोष.. प्रशासनाने हस्तक्षेप केला तर मी वर म्हटल्याप्रमाणे निर्णयाचा आदर करतो.

बाकी इथे कोणी असा आहे का ज्याने कधी भरकटलेल्या धाग्यात हात धुऊन नाही घेतले. जेव्हा त्यातून मनोरंजन होते तेव्हा अरे इथे तर धमाल चालू आहे म्हणत सगळेच तुटून पडतात. मग कशाला हवेत जास्तीचे कायदे कानून.. केस बाय केस ठरवावे ..

अमितला अनुमोदन.
धागा फारच भरकटला, त्याला असांसदीय वळण लागलं, किंवा त्याच त्या मुद्द्यांची पुनरावृत्ती होताना दिसली तर सहसा प्रशासक हस्तक्षेप करतातच.
संकेतस्थळ आणि ब्लॉग/भिंत यांत मुळातच हा फरक आहे.
जमेची बाजू म्हणजे इथे वाचकवर्ग तयार मिळतो, ब्लॉग किंवा वॉलवर तो निर्माण करावा लागतो. ब्लॉगवरचं लिखाण इथे आणून ओतण्यामागे हा वाचकवर्ग मिळवण्याचाच उद्देश असतो.
मग त्याच नाण्याची साधक आणि बाधकही प्रतिसाद ही दुसरी बाजू झाली, तेव्हा त्याबद्दल तक्रार असू नये असं मला वाटतं.

भरकटला तर भरकटू द्यावा. सध्या जसे प्रशासक अपवादात्मक परिस्थितीत/ परिस्थिती अगदीच हाताबाहेर जाऊ लागली की हस्तक्षेप करतात ते मॉडेल सगळ्यात जास्त लोकशाहीवादी आणि सर्वांना समान न्याय, लेव्हल प्लेईंग फील्ड देणारे आहे. > >
धागा फारच भरकटला, त्याला असांसदीय वळण लागलं, किंवा त्याच त्या मुद्द्यांची पुनरावृत्ती होताना दिसली तर सहसा प्रशासक हस्तक्षेप करतातच. >>> याच्याशी सहमत.

इथली फ्री फ्लोइंग स्टाइल फेबु व इतर ठिकाणच्या स्टाइलपेक्षा चांगली आहे. तुमच्या लेखाची "ट्रू वर्थ" इथे कळते. कारण कोण वाचेल व कोण प्रतिक्रिया देईल व ती कशी असेल यावर तुमचा काहीही कंट्रोल नसतो. फेबुवर लोक स्वतःची कोंडाळी जमवतात व त्याच बबल मधे "परखड", "रोखठोक" वगैरे लिहीतात व कौतुके करवून घेतात. विरोधी मत वाले अनफ्रेण्ड किंवा ब्लॉक केले जातात. मग उरलेले सगळे एकाच मताचे असले की मतभेदांचा प्रश्नच नसतो. त्यातून एक स्वतःबद्दल इन्फ्लेटेड इमेज तयार होते. अशांची विमाने माबोसारख्या साइटसवर जमिनीवर येतात.

असे लेख लगेच ओळखू येतात. टोटली एकतर्फी असलेली मते जणू जागतिक सत्य आहे अशा थाटात लेखात असल्या लेखांमधे सहजपणे येतात.

Srd
तसेच एकदा फूसबुकवर झाले तेव्हा त्या अकाउंटवाल्याने ती पोस्टच उडवली.>> +१ टंग-इन-चीक!

अमितव, स्वाती-आंबोळे आणि फारएण्ड +१

मी मध्यंतरी एका साहित्य आणि कलाविषयक व्हॉट्सॲप ग्रुपवर होते. भरपूर सभासद होते. बरेचसे एकमेकांच्या ऑनलाइन ओळखीचेच होते. सुरुवातीला चांगलं वाटलं. काही काही पोस्ट्स चांगल्या असायच्या, काही कंटाळवाण्या. पण ते असणारच. नंतर माझ्या असं लक्षात आलं की तिथे लोकांना सहमती दाखवणाऱ्या आणि 'छान, छान' म्हणणाऱ्या प्रतिसादांचीच सवय आणि अपेक्षा होती. आणि असं असलं की 'मी तुझं कौतुक करतो, तू माझं कर' असे अलिखित संकेतही तयार होतात. एका पोस्टवर मी सभ्य शब्दांत आणि नम्रपणे असहमती दाखवून विरोधी मुद्दे मांडल्यानंतर दोन तीन प्रतिसादांमध्येच आज आपल्या संस्कृतीची किंमतच कशी कुणाला राहिली नाही, इथपर्यंत गाडी गेली. ( आणि याला बाकीच्या अनेकांचे लाल बदाम आणि अंगठे Wink )
मग मी सोडून दिलं. ( आणि काही दिवस वाट बघून एकंदरीत असाच ट्रेंड दिसल्यावर तो ग्रुपही सोडून दिला. )
विरोधी मत व्यक्त करता आलंच पाहिजे आणि ते चांगल्या शब्दांत व्यक्त केलं गेलं पाहिजे.
मागे एकदा कुठल्या तरी धाग्यावर वेबमास्तरांनी 'धाग्यावर प्रतिसाद नसणे/कमी असणे हाही एक प्रतिसाद असतो' अशा अर्थाचं वाक्य लिहिलं होतं. ते मला १००% पटतं.

खूप दिवसांनी दिसल्याने काहीतरी विचारप्रवर्तक असावं म्हणून हा धागा उघडला. कहना क्या चाहते हो सारखी गत झाली.
ज्या धाग्याचा उल्लेख झालाय तिथे ते एक सर बिझी असल्याने अन्य धाग्यांवर दिसेनात कि काय म्हणून पटपट नावे पाहिली. पण ते ही नाही !
मग धागा भरकटला कशाने ? कारण माझेही प्रतिसाद नाहीत तिथे Lol

उडत उडत वाचला तरी भरकटणे वाटत नाही. जर माझ्या काळजीचा विषय असता तर मुख्य विषयासोबतच अन्य शंका विचारल्या गेल्याच असत्या. हल्ली वेळ मिळत नसल्याने दुर्लक्ष होते. त्यामुळे इतरांच्या काळजीचा विषय आस्थेचा नाही असे नाही. अगदी इतिहासाच्या विषयावर जोपर्यंत बर्नालिज थेरम येत नाही तोपर्यंत त्याला धागा भरकटला असे म्हणायचे का ? आरोग्य विषय, त्यातही कर्करोगाशी संबंधित किंचित अवांतर झाले तर साप साप म्हणून भुई धोपटण्यात अर्थ नाही आणि खरेच मुद्दाम काड्या केल्यात, तर दुर्लक्षही केले जाऊ नये. (मुद्दाम काड्या करणार्‍यांच्या बाजूनेही लोक लाटणे मोर्चा घेऊन येताना दिसतात. Lol )

कुणी आढावा घेतो म्हणून माझ्या आवडीच्याच कलाकारांबद्दल लिहीणार असे म्हटले तर त्या धाग्यावर माहिती देणारे प्रतिसाद हे भरकटणे या सदरात मोडतात का ?

कधी कधी धागा भरकटला असे वाटले धागा कर्त्याला तरी माझे असे मत आहे की विषयाशी अनभिज्ञ असे अनेक वाचक असतात ते प्रश्न विचारतात सांगोपांग चर्चा होते व एकाच विषयाला अनेकानेक पैलू असतात. ते डिस्कस होतात व एक माहिती जमून राहते. थोडे २०% अवांतर तरी अलाउड असावे. बायकांच्या आजाराबद्दल तर सोडा एकुण शरीर रचने बद्दल सुद्धा कमी माहिती उपलब्ध असते - खरी माहिती - बेकार व्हिडीओ, सांगोवांगी, हे ते सोडुन द्या. काही सभासद त्या अनुषंगाने प्रश्न विचारतात त्यामुळे इतर अनभिज्ञ शहाणे होतात. कधी कधी एखाद्या धाग्यावर अवांतरातून माबो स्पेशल विनोद होतात व ते दीर्घकाळ लक्षात राहतात. सरांचा धागा वाचून एकातरी बाप्याने आई बहीण बायको ह्यांना मॅमोग्राफीला नेले तरी ते धाग्याचे खरे यश आहे. इथे प्रकाश ह्यांची तर आई व बहीण ह्या आजाराने वारलेली आहे त्यांचे इमोश नल लोड समजावून घ्यायला पाहिजे व धीर द्यायला हवे. एक पुत्र व भाउ दुखावलेला आहे. ह्या अनुषंगाने मी त्यांच्या प्रतिसादावर एंगेज होत होते. इमोशनल लोड एखाद्याचे कमी करायचे तर एक घाव दोन तुकडे अ‍ॅप्रोज फार यशस्वी होत नाही. मी माहिती विचा रली तेव्हा नक्की कश्या टाइपचा कॅन्सर होता, त्यावर लाइन ऑफ ट्रीटमेंट काय दिली ही माहिती मिळेल असे वाटले होते. हळू हळू ते लिहिते झाले असते कदाचित.
आता मार्गच बंद झाला असे होउ नये. एव्हरी बडी डील्स विथ धिस डिसीज अँड इट्स प्रोग्रेस इन हिज हर ओन वे. तेव्ढी मोकळीक असायला हवी.

दुसरा मार्ग म्हणजे आपल्या अवेलेबल माहिती सकट वेगळाच धागा काढायचा.

एकदा फटाका लावला की तो कसा व कुठे फुटेल हे फार अ‍ॅक्युरेटली प्रेडिक्ट करता येत नाही. तसेच धाग्याचे आहे. हे ह्या धाग्यावर अवां तर नाही ना तो गुस्ताखी माफ कीजीए.

वावे, +१. असाच अनुभव आहे. त्यामुळे मी शक्यतो मा बो खेरीज इतर सोमीवर वाद घालायला जात नाही. पण माबोवर मी वाद न घालताही धागा भरकटवण्यास काहीवेळा हातभार लावला आहे या पातकाची कबुली देतो.

आता इथेच पहा ना, विषय आहे धागा भरकटण्याबद्दल आणि आपण बोलत आहोत सोमिवर वाद घालण्याबद्दल. तस्मात्, प्रस्तुत धागाही भरकटण्याचा धोका आहे. Happy

जमेची बाजू म्हणजे इथे वाचकवर्ग तयार मिळतो, ब्लॉग किंवा वॉलवर तो निर्माण करावा लागतो. ब्लॉगवरचं लिखाण इथे आणून ओतण्यामागे हा वाचकवर्ग मिळवण्याचाच उद्देश असतो.>>>>> अगदी करेक्ट! अनेक ब्लॉगर्स आपल्या ब्लॉगरुपी संस्थानात एकटे पडतात. उत्तमोत्तम साहित्यिक मूल्य असलेले ब्लॉग देखील संवादी प्रारुपाच्या अभावी प्रवाहाबाहेर फेकेले गेले असतात. पण मायबोलीवर एखाद्या धागालेखकाला जर असे वाटले की माझ्या धाग्याचा उद्देश फक्त लोकांना माहिती देणे हा आहे. मला फालतू प्रतिक्रिया नको आहेत तर त्याने काय करावे? मला मायबोलीचे वाचक तर हवे आहेत पण माझ्या दृष्टीने फालतू वा अवांतर प्रतिक्रिया नको आहेत तर त्याला रिड ओनली स्वरुपात धागा काढण्यास सुविधा ठेवणे शक्य आहे का? तांत्रिक दृष्ट्या शक्य असल्यास तशी मायबोली प्रशासकांनी सोय करुन द्यावी का?

धागा भरकटने आणि विरोधी प्रतिसाद न झेलता येणे हे दोन विषय मिक्स झालेत.
बहुधा हा धागा त्या चित्रपट संगीताच्या धाग्यावरुन असल्याने असावे. सुरुवातीला हे माझ्या लक्षात आले नाही.

आता इथेच पहा ना, विषय आहे धागा भरकटण्याबद्दल आणि आपण बोलत आहोत सोमिवर वाद घालण्याबद्दल. तस्मात्, प्रस्तुत धागाही भरकटण्याचा धोका आहे>>>> आता या विषयातच भरकटण्यातील भटकंतीच्या कारणमीमांसेचे मूल्य दडलेले आहे. आता या धाग्यावर काहो घाटपांडे पुण्यात सध्या अंजीराचे भाव काय आहेत? किंवा पावसामुळे अत्तराचे भाव खरोखरीच कोसळलेत का? अशी पृच्छात्मक प्रतिक्रिया दिली तर माझ्यासकट सर्वांना हसायला येईल व धाग्याचा रुक्ष वाटणारा प्रवास ही हलका होईल. पण सर्वांचा पिंड सारखा नसल्याने एखाद्याला ते धागा भरकवटण्याच्या उद्देशाने कमेंट केली आहे असे वाटू शकते. माहिती ने ओतप्रोत भरलेल्या धाग्यात अनेक मुद्द्यांपैकी एखाद्याच मुद्द्यावर चर्चा रेंगाळली तर धागालेखकाला तो धागा भरकटला असे वाटू शकते

बहुधा हा धागा त्या चित्रपट संगीताच्या धाग्यावरुन असल्याने असावे>>>>>> नाही ते कुमार१ यांच्या धाग्याच्य अनुषंगिक तथा अवांतर प्रतिक्रियेतून आलेल्या विषया मुळे आलेला आहे

Pages