धागा भरकटण्याचा धोका

Submitted by प्रकाश घाटपांडे on 27 June, 2023 - 10:01

मायबोली किंवा तत्सम संवादी संकेतस्थळांवर धागालेखकाने एखादा लेख टाकला तर त्या लेखावरील प्रतिक्रिया या चर्चा व गप्पा या स्वरुपात बनत असतात. त्यावर धागालेखकाचे नियंत्रण असतेच किंवा असावेच असे होत नाही. अन्यथा धागा वा! वा! छान छान! अशा त्रोटक प्रतिक्रियात वा केवळ वाचनमात्र स्वरुपात होतो. धागा भरकटण्याचे डेव्हिएशन किती व कसे असावे याचे साचेबद्ध उत्तर देता येत नाही. प्रत्यक्ष भेटीतही जेव्हा आपण अशा गप्पा मारतो त्यावेळी त्यात बराच विस्कळीत पणा येत असतो. ही काही विशिष्ट औपचारिकतेचे बंधन असणारी न्यायालयातील केस नसते. भरकटण्याचा धोका हा जिवंत धाग्यात असतोच. मूळपदावर गाडी आणावी लागते कधी कधी. कदाचित भविष्यात धागालेखकाला वाचनमात्र असे धाग्याचे स्वरुप ठेवण्याचा पर्याय देणे मायबोली प्रशासनाला गरजेचे होईल. तेव्हाच धाग्याचे भरकटणे थांबेल म्हणजे फक्त ब्रॉडकास्ट स्वरुप. वाचकांचा प्रतिसाद नाही.
प्रतिक्रियांमधे आलेल्या अनुषंगिक व समांतर गोष्टी या मुख्य प्रवाहाला पूरकच बनतात. विचारांची व्याप्ती वाढवतात. कधी कधीतर मूळ चर्चेपेक्षा उपचर्चा वा उपउपचर्चा याच अधिक उपयुक्त वा रंजक होतात. या मधे धागा निश्चित भरकटतो. पण त्या भरकटण्यातून काही वाचकांना आनंदही मिळतो व काही त्यांच्या दृष्टीने उपयुक्त असलेली माहितीही मिळते. आता लेखकाला आपल्या लेखावर वाचकांच्या कुठल्या प्रतिक्रिया याव्यात किंवा येवू नयेत यावर नियंत्रण नसते.पण कुठल्या प्रतिक्रियांना उत्तर द्यायचे व कुठल्या नाही याचे स्वातंत्र्य निश्चित असते. छापील नियतकालिकांमधे संपादकाला लेख व प्रतिक्रिया छापायच्या कि नाही याचे स्वातंत्र्य असते. संकेतस्थळावरही प्रशासकाला/संपादकाला संकेतस्थळाच्या धोरणात कुठले साहित्य वा प्रतिक्रिया बसत नसतील तर ते अप्रकाशित करण्याचा अधिकार राखून ठेवला असतो. फेसबुक सारख्या माध्यमात देखील काही अंशी फेसबुकचे नियंत्रण असते. पण माझी भिंत माझ्या गवर्‍या हा प्रकार तिथे दिसतो. मनोगत सारख्या काही संकेतस्थळावर धागाकर्त्याचे लेखन हे प्रशासका ने मंजूर केल्याशिवाय ते प्रकाशितच होत नाही. काही साहित्यिक पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्याचे आकलन चर्चा प्रतिक्रिया समीक्षा सौंदर्य हे वाचकांवर सोपवून मुकत होतात. आता धागा भरकटला आहे का? त्यातील उपचर्चा, उपउपचर्चा या समांतर आहेत की अवांतर हे धागा लेखकाने ठरवायचे, वाचकांनी ठरवायचे कि संपादक/प्रशासकानी ठरवायचे हा ही चर्चेचा विषय होउ शकतो. एखा्दा अकॅडमिक लेख बिंदुगामी ठेवण्याच्या प्रयत्नात रिसर्च पेपर चा रुक्ष फील येतो. त्याची सामाजिक बाजू वा परिणाम हा समांतर पैलू त्या ठिकाणी समांतर न ठरता अवांतर ठरतो. संसदेतील वा टीव्हीवरील चर्चेतही वेळेच्या मर्यादांमुळे तसेच विस्तारभयामुळे सभापती वा ॲंकरला नियंत्रित कराव्या लागतात.
मंडळी नुकतीच कुमार यांच्या धाग्यावर हा विषय आल्याने तो धागा भरकटण्याचा धोका निर्माण झाला म्हणुन मी स्वतंत्र धागा इथे चर्चेसाठी घेतला आहे. असे काही तांत्रिकदृष्ट्या करता येईल का की धागालेखकाला आपल्या लेखावरील प्रतिक्रिया ही प्रकाशित वा अप्रकाशित करण्याचा अधिकार असेल? आपल्याला काय वाटते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामना, पूर्ण प्रतिसाद आत्ता वाचला. तसेच प्रघा यांचा आधीचा प्रतिसाद.

अभ्यासोनि प्रकटावे असा बाणा असणारे दुर्मिळ असतात (माबोवर अनेक आहेत). अशांना तात्विक वाद घालून जेरीस आणले जाते. एखाद्या अभ्यासू व्यक्तीचा बाजार उठवण्याचे तंत्र आहे. झुंड बनवून झापडबंद प्रतिसाद देऊन, विपर्यास करून नामोहरम करता येते..

राजकीय पक्षांच्या आयटीसेल मधे असे प्रशिक्षण मिळते. संघटीतपणे अडचणीच्या अभ्यासू व्यक्तीचे ट्रोलिंग होते.

सूचक प्रश्न विचारून वेगळे वळण देणे, तुम्हाला असे म्हणायचेय का या सदराखाली अनर्थ करणे यामुळे अशा व्यक्तीला कुठून यात पडलो असे वाटू लागते.

हेच या मंडळींना हवे असते.
एखादी गोष्ट उबग येईल इतक्या वेळा सातत्याने सर्वत्र चिटकवत राहणे हे खरी ओळख देणारे प्रोफाइल करत नाही. कारण वीट आणण्यासाठी खऱ्या ओळखीने मूर्खासारखे प्रतिसाद देण्याकरता उच्च कोटीचा निर्लज्जपणा लागतो.

असे लोक मुद्दा अभ्यासाने न खोडता संबंधित व्यक्तीला त्रास देऊन मानसिक संतुलन ढासळून ती व्यक्ती कधी मर्यादा ओलांडत यासाठी प्रयत्नशील असतात. मळकट पेक्षा शुभ्र कपड्यावर चिखलाचे डाग उठून दिसतात त्याप्रमाणे ट्रोल्सच्या कारनाम्यांकडे दुर्लक्ष करून लोक अशा व्यक्तीच्या तडकण्यावर जास्त व्यक्त होत असतात. कायमच तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणे सर्वांना जमेल असे नाही.

अभ्यासोनि प्रकटावे असा बाणा असणारे

यांनी सोशल मिडियावर लिहू नये. सरळ पुस्तक छापून प्रसिद्ध करावे. घ्यायचे ते घेतील.

धागा भटकू नये हे assumption च चूक आहे असं वाटतं...पुस्तकांचीही चिरफाड होते. अशावेळी लेखकाला समीक्षक चुकीचा वाटू शकतो.
काही लोकांनी डोक्यावर घेतलेली पुस्तकं मला अजिबात आवडली नाहीत.
शंभर टक्के परिपूर्ण लिखाण असू शकत नाही....
काही वाचक ते genuinely सुधारण्यासाठी प्रतिसाद देतील तर काही सतावण्यासाठी प्रतिसाद देतील. कुठलं गंभीरपणे घ्यायचं आणि कुठलं दुर्लक्षित करायचं लेखकाच्या हातात आहे....
लेखकाला प्रतिसाद उडवायला देणं रोगापेक्षा इलाज भयंकर वाटतो.

अभ्यासोनि प्रकटावे असा बाणा असणारे

यांनी सोशल मिडियावर लिहू नये. सरळ पुस्तक छापून प्रसिद्ध करावे. घ्यायचे ते घेतील.>>>>> एसआर डी, तुम्हाला भरकटण्याच्या मुद्द्यामुळे अशा लोकांनी सोशल मिडियावर लिहू नये असे सुचवायचे आहे असे दिसते.पण पुस्तकाचा वाचक वर्ग तसा वेगळा असतो. अन पुस्तक छापून खर्च करण्यापेक्षा सरळ ब्लॉग वर लिहिलेल काय वाईट? अभ्यासोनि प्रकटावे असा दृष्टीकोन बाळगणारे जे लोक असतात त्यांना टीका, समीक्षा, प्रतिक्रिया यातूनच नव नवीन माहिती मिळत जाते. त्यातून त्यांचा अभ्यास वाढायला मदतच होते.

सधन नागरिकांना लुटतात म्हणून त्यांनी किंवा मुलींना छेडतात म्हणून मुलींनी घराबाहेर पडू नये या मताशी साधर्म्य असणारे मत आहे ते. Lol

पूरर्वी ब्लॉग्ज असायचे तेव्हां अशा अनेकांना फॉलो करायचो. उपक्रम वगैरे संस्थळांचा उल्लेख झालेलाच आहे. अशा माहितीपूर्ण प्रतिसादांमुळे आपल्या उणिवा समजतात. त्या दूर करता येतात. या सर्वांनी पुस्तके कशाला लिहायला हवीत ? आणि किती जण वाचणार ? चार ओळीचा का होईना पण माहितीपूर्ण असावा इतकी माफक अपेक्षा ठेवणे म्हणजे पुस्तक छापले पाहीजे का ?

युट्यूबला सुद्धा अनेक उत्तम कंटेट क्रिएटर्स आहेत. किमान त्यांना त्याचे पैसे मिळतात. पण संस्थळे, सोमिबर मोफत लिहीणार्‍यांची ती पण अपेक्षा नाही. त्यांना लिहीण्यासाठी चांगले वातावरण मिळावे ही अपेक्षा चुकीची आहे का ?

<<पूरर्वी ब्लॉग्ज असायचे तेव्हां अशा अनेकांना फॉलो करायचो. उपक्रम वगैरे संस्थळांचा उल्लेख झालेलाच आहे. अशा माहितीपूर्ण प्रतिसादांमुळे आपल्या उणिवा समजतात. त्या दूर करता येतात. या सर्वांनी पुस्तके कशाला लिहायला हवीत ? आणि किती जण वाचणार ? चार ओळीचा का होईना पण माहितीपूर्ण असावा इतकी माफक अपेक्षा ठेवणे म्हणजे पुस्तक छापले पाहीजे का ?>>

------- सहमत...

नंतर माझ्या असं लक्षात आलं की तिथे लोकांना सहमती दाखवणाऱ्या आणि 'छान, छान' म्हणणाऱ्या प्रतिसादांचीच सवय आणि अपेक्षा होती. आणि असं असलं की 'मी तुझं कौतुक करतो, तू माझं कर' असे अलिखित संकेतही तयार होतात. एका पोस्टवर मी सभ्य शब्दांत आणि नम्रपणे असहमती दाखवून विरोधी मुद्दे मांडल्यानंतर दोन तीन प्रतिसादांमध्येच आज आपल्या संस्कृतीची किंमतच कशी कुणाला राहिली नाही, इथपर्यंत गाडी गेली. >>

@वावे, मागे मला माझ्या मित्राने अशाच एका होतकरु 'नवकवींच्या' फेसबुक ग्रुप वर ऍड केलेले, सेम प्रकार तिथेही अगदी - मी एका ला जस्ट कंमेंट केले की नाही आवडली आणखी चांगली होऊ शकली असती, तर त्याचे 'चाहनेवाले' अक्षरशः तुटून पडले... मग मी ही त्यावर एक कविता पोस्ट केली....कविता ती कसली फक्त यमक जुळवत गेलो बस्स...पण मज्जा आली, वर एक disclaimer ही चिटकवून दिलं....वाचून पहा तुम्हाला ही गम्मत वाटेल :D (ग्रुप च्या नावाची आद्याक्षरे आम होती)

आम असो वा खास असो...
कळपातच येथे जित आहे...
उंदराला मांजर साक्षी...
जगण्याची रीत हीच आहे...

आपल्या बाब्याचे बोबडे बोल...
स्वागत-दिमतीला कमेंट्सचे ढोल...
बार्टर सिस्टीमची पोल खोल...
सर्वसाक्षी ते लाईक्सचे झोल...

दाही दिशा वणवण तरीही...
पळसाच्या पानांची गत तीच आहे..
उंदराला मांजर साक्षी...
जगण्याची रीत हीच आहे...

स्पष्ट लिहावयास मन कुठे धजत असते...
हार-जितीहून कळपाने नाकारण्याचेच काहूर जास्त भासते...
काहूरांची धूळ कुठेतरी खाली बसेल..
मांजराच्या साक्षीची मग मना पर्वा नसेल..

*खंडन - प्रस्तुत कवितेतील शब्दांचे वास्तविक जीवनातील गोष्टींशी साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.  

या भरकटण्याला हिंदीत एक सुंदर शब्द आहे बहकना. कश्मीर की कली मधले ओ पी नैय्यर चे गाणे
बलमा खुली हवा में ,मेहेकी हुई फ़िज़ा में,जी चाहता है मेरा,बहकना इधर उधर..

धागे को बहकना है तो ऐसे बहकनो दो जिस का आनंद बहकनेवाला और बहकाने वाला दोनो ले सके।

Pages