माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वावे, म्हणजे प्लासीबो करवंटी म्हणायला हरकत नाही. करवंटी नसेल तर पिस्त्याची टरफलं, टणक सुपारी चालेल असेही सांगता येईल.

( अधूनमधून त्या बाजूला एखादा ट्रेक करावा आणि राजमा आणावा हाही एक उपाय आहे!)
विशाखा, याला म्हणतात नालाच्या खिळ्यासाठी घोडा आणणे ... Happy

वावे मलाही तुझे म्हणणे पटतेय... खरेच प्लासिबो इफेक्ट असावा!
करवंटी नसेल तर पिस्त्याची टरफलं, टणक सुपारी चालेल असेही सांगता येईल. >>
Happy

सोडत्व! Biggrin

मुळात ही धान्ये - हरबरा, काबुली चणा आणि राजमा फार हट्टी बाळे आहेत. त्यामुळे आधी एकदा चोळून चोळून धूवून मग तिप्पट पाण्यात भिजत घालणे. किमान २४ तास भिजवणं झालं की ते पाणी काढून टाकून पुन्हा एकदा धूवून मग नव्या पाण्यात (हेही तिप्पट) कुकरात शिजवणे - ७-८-९ शिट्ट्या मोठ्या आचेवर आणि नंतर कमी आचेवर अजून १० मिनिटं असं केलं तर वर पर्णिकाच्या पोस्ट नुसार कृती घडून ही बालके मऊ शिजतात. करून पाहा बरे. सोडा तेल करवंटी चा तुकडा यूनिकॉर्न चे शिंग दगड धोंडे तांब पितळ काही घालायला लागत नाही...!

सोडा घालून शिजेल याची तरी काय गॅरंटी असे आता वाटतेय...
यूनिकॉर्न चे शिंग >>> योकु बालकृपेने घरात वेगवेगळ्या फॉर्ममधले युनिकॉर्न्स आहेत. एखाद शिंगं हळूच ढापता येईल म्हणते राजम्यासाठी.

ऑन अ सिरिअस नोट, बारा-तेरा तासापेक्षा जास्त भिजवले तर मुंबईतल्या हवेत खराब होईल अशी भीती वाटते. पाणी बदलून भिजवावे का? तिप्पट पाण्याचा प्रयोग करून पाहते. मी साधारण दुप्पट पाणी वापरत होते.

हो चालेल पाणी बदलून...
उद्या सकाळी उसळ-ग्रेव्ही करायचीय तर आज सकाळी चहा च्या वेळी राजमा भिजत घालणे
आज रात्री झोपण्या आधी पाणी बदलणे
उद्या सकाळी पाणी काढून टाकून नव्या पाण्यात शिजवणे...

आपण मूग मटकी यांना मोड आणण्यासाठी जसे एका फडक्यात गुंडाळून ठेवतो तसे राजमाचे करता येत नाही का ? म्हणजे १४ तास भिजवायचे आणि मग ८ तास फडक्यात गुंडाळून उबदार ओलसर जागी ठेवायचे .. ? जौदे बै ..नकोच ते..! कोल्ह्याला राजमा कडक Wink

फ्रेंच बीन्स , कात्रीने पाव चर्चा आठवल्या ..मस्त वाटलं
मला वाटतं काळे वाटाणे म्हणजे काळे पोलीस नाही अशी हि चर्चा आहे कुठेतरी मे बी माबो वर नाही दुसरीकडे वाचली आहे
काळे वाटणे असे google केल्यास जे दिसते काळे गोलगोल छोटे तेच काळे वाटाणे
काळे पोलीस वेगळे

पर्णिका मस्त माहिती !

म्हणजे १४ तास भिजवायचे आणि मग ८ तास फडक्यात गुंडाळून उबदार ओलसर जागी ठेवायचे>>>> sproutingमुळे फाइनल प्रोडक्टची चव बदलणार.

आम्ही अख्खे कुळीथ भिज्वताना १२ तास + १२ तास शेड्यूल ठेवतो. पाणी बदलावे लागते नाहीतर त्याच पाण्यात ठेवून मग कुजकट वास येतो

sproutingमुळे फाइनल प्रोडक्टची चव बदलणार.>> हो मोड आले तर बदलेल हे नक्की पण ८ तासात नाही येणार मोड जस्ट सुरवात असेल .. असं वाटतंय
जसे कडव्या वालांना कसे लगेच मोड येत नाहीत काही अर्धवट मुके मुके राहतात तसे होईल असे वाटतेय..
त्याच पाण्यात ठेवून मग कुजकट वास येतो>> होय कधीकधी मटकी ला असा वास येतो आणि मग काही केल्या जात नाही आणि मग उसळीलापण येतो !

अमेरीकेत संत्री मिळतात की मोसंबी ही मायबोलीवरच्या सर्व गहन चर्चांची आजी होती! आणि धमाल म्हणजे अमेरिकेत oranges म्हणून मोसंबी मिळतात असा निष्कर्ष निघाला होता Proud

अनु, मामे प्रयोगास शुभेच्छा! निष्कर्ष जरूर लिहा…
अंजली, काळे पोलिस तो सुमेधाव्हीचा धागा होता… ती पाकृ वाचून काळा घेवडा आणला होता. सोडा घालून पंचेचाळीस मि. धीमी आंचवर बोटचेपा शिजला….
संत्रीमोसंबी धाग्याची लिंक द्या बरं … अमेरिकेतली संत्री मोसंबी ह्यावर मी पण शिक्कामोर्तब करते…

काळे वाटाणे म्हणजे कुठले?हरभरे का?>>> अर्रे देवा Lol Lol

पर्णिका मस्त माहिती +१
जौदे बै ..नकोच ते..! कोल्ह्याला राजमा कडक Wink>>>>> अंजली कूल तुला अनू, अस्मिता च्या खालोखाल विनोद वीर हा खिताब द्यायला हरकत नसावी Happy Wink

सो, (नॉर्मल) पाण्यात राजमा भिजवून १२ तासांनी पाणी बदलायचे. मग २४ तासांनी पाणी फेकून उकळ त्या पाण्यात कुकर ला मोठ्या आंच वर ८ शिट्या काढून लहान आंच वर ४ शिट्या काढून गड सर करण्याची सूक्ष्म खात्री आहे Wink

माहिती आवडली असं आवर्जून कळवणार्या सगळ्यांना धन्यवाद!

वावे प्लासिबो करवंटी चा मुद्दा पटला. विज्ञान आणि विनोद ह्या दोन स्वतंत्र वाटचाल करणाऱ्या प्रवाहांना आपण इथे एकत्र केले आहे, जय मायबोली:).

पर्णिका मस्त माहिती >>> अगदी अगदी.

मी कुठलीही कडधान्यं गरम पाण्यात भिजवते. मुग मटकीसारखी कमी वेळात भिजतात.

त्यांना कडवे वाल न म्हणता रडवे वाल म्हणावे मग!>>> हाहाहा.

एवढा का प्रॉब्लेम येतोय लोकाना? आमचा राजमा, छोले निट शिजतात ३ शिट्ट्ञात ...फक्त सोडत्व असलेला सोडा मात्र घालतो आम्ही...बहुधा आमच्याकडे ड्युप्लिकेट राजमा मिळत असावा..

राजमा छोले वाटाणे शिजवताना करवंटी तुकडा घालण्या मागे काय कारण आहे ?>>>
यामागे खूप जुनी कथा आहे. पूर्वीच्या काळी ही सर्व धान्ये पटकन शिजत. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर राजमा खाऊ लागले. राजम्याच्या पिकाची पाण्याची गरज पुरवण्यासाठी राजा विक्रमाने गंगेवर धरण बांधलं. त्यामुळे शंकराच्या डोक्यावरची गंगा आटली. क्रुद्ध झालेल्या शंकराने राजा विक्रमाच्या स्वप्नात येऊन त्याला तुझ्या राज्यात राजमा शिजणार नाही, असा शाप दिला. त्यामुळे भरपूर पीक असूनसुद्धा लोक उपासमारीने मरू लागले. राजाने शंकराची बारा वर्षे तपश्चर्या केली. तेव्हा शंकराने त्याला उ:शाप कम सजा दिली. दरवर्षी नरमेध यज्ञ करून नरबळी दे आणि बळीच्या कवटीचा तुकडा घालून राजमा शिजव आणि तो प्रसाद ग्रहण कर. त्याप्रमाणे राजाने केल्यावर राजमा पूर्ववत शिजू लागला.
पुढे नरबळीची प्रथा बंद झाली पण प्रतीक म्हणून करवंटीचा तुकडा राजमा शिजवताना घालण्याची प्रथा सुरू झाली.
Proud

अगागा.अति भयंकर. Happy
पूर्वी कवटी ऐवजी हाडांचा चुराही वापरत असत.पण काळानुरूप ही प्रथा मागे पडून हाडाच्या चुऱ्या ऐवजी अर्धा चमचा श्वेतवर्णीय बेकिंग सोडा राजमा शिजताना घातला जाऊ लागला.

आवरा sssssssssssss
हे वाचून तो राजमा शरमेनेच मऊ पडून जाईल...

धाग्यावेताळ, मी अनु , भारी पोस्ट.
आमच्याकडे राजमा आणला जात नाही पण आज मुलाने नेमकच राजम्याच पॅटी घालून बर्गर केला होता. त्याचा राजमा मस्त शिजला होता पण मला ही चर्चा आठवून हसू येत होत, राजमा चांगला शिजण्यासाठी त्याला मी अनेक सूचना देत होते. त्यात सोडा घातलास तर सोडत्च असलेलाच घाल हो, नाहीतर काही खर नाही हे ही सांगून झाल माझं.

Pages