माला फेरत जुग भया

Submitted by स्वेन on 15 January, 2022 - 22:55

मध्ययुगीन काळात जन्मलेला कबीर आजही या ना त्या स्वरूपात अस्तित्वात आहे, तो त्याने रचलेल्या दोह्याच्या रूपाने. त्याचे दोहे हे कालातीत आहेत कारण त्यांचा अनेक अंगांनी आकलन करण्याचा प्रयत्न केला तरीही प्रत्येक वेळी त्यांच्यात नवीन अर्थ दडलेला दिसतो. हे जसे गीतेतला एखाद्या श्लोकाचा उकल करण्याचा प्रयत्न केला तर तो श्रीकृष्णाने गीता सांगितली तेंव्हापासून आताच्या काळापर्यंत त्या त्या काळाला साजेसे अर्थ देऊन जातो, तसेच कबिराचे दोहे, कालमानाप्रमाणे वेगवेगळे अर्थ सांगून जातात.

'कबीर’ या नावाचा अर्थ सर्वज्ञ असा आहे परंतु हे नाव भक्तीचे प्रतीक मानले गेले आहे. त्यांची महानता हिंदू आणि मुस्लीम दोघांनाही मान्य आहे. संत तुलसीदास यांच्याप्रमाणे त्यांचे लक्ष भारतीय ‘अद्वैतवाद’ आणि मुस्लीम ‘एकेश्वरवाद’ यांच्यातील सूक्ष्म भेदांकडे आकर्षित झाले नाही. हिंदू धर्मातल्या कर्मकांड आणि अवडंबर या दोन्ही गोष्टीला त्यांनी फटकारले आणि ‘रामा’ला सगुण आणि निर्गुण या दोन्ही रूपात स्वीकारले.

" निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा
मूल कमल दृढ आसन बाँधु जी
उलटी पवन चढ़ाऊंगा, मन ममता को थिर कर लाऊँ जी पाँचों तत्व मिलाऊँगा " असे म्हणत कबीरने रामाला निर्गुण रुपात स्विकारताच अनेक मुस्लीम संतांनी ‘रामा’ला जणू काही दत्तकच घेतले. कबीर यांच्या संगतीने, दादू, रजब, जयासी, रहीमदास, वाजिद जी, शेख, आलम, मुबारक असे अनेक संत रामनामाचा जप करू लागले आणि राम-रहीम तसेच केशव-करीम हे शब्द सर्वतोमुखी झाले. अशा तऱ्हेने हिंदू-मुस्लीम यांच्यातली दरी मिटवण्याचे अतिशय महान कार्य कबीरांनी केले.

कबीराने अशी काय जादू केली आहे की तो मानवी मनाच्या पटलावर जेंव्हा दोह्यांचा कुंचला घेऊन सफाईदार चित्र साकारतो तेंव्हा माणसात आमूलाग्र बदल घडला जाईल याची ग्वाही देतो, ते ही सडेतोड टीका करत आणि डोळ्यात अंजन घालत, फटकारे मारत करतो. पण हे करत असताना तो पर्यायही सुचवतो आणि मानवी विचारसरणीला, जर तुमच्यात स्वतःची मानसिक भूमिका बदलण्याची इच्छा असेल तर, एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो.

आज इंटरनेटच्या वेगवान जमान्यात स्वसंवाद किंवा आत्मचिंतन मनुष्य पूर्ण विसरून गेला आहे. माणूस चोवीस तास इतरांशी संवाद साधतोय परंतु स्वतःच्या मनात डोकवायला वेळ नाही. कारण इतरांना समजावताना स्वतःची समजूत घालण्याचा प्रसंग येतो तेव्हा मानसिक आंदोलनं लोलकाच्या रुपात पुढे मागे होत राहतात आणि त्याला निराशेची एक गडद छाया व्यापायला लागते. अशा परिस्थितीशी सामना करताना मग मनाशी संवाद सुरू होतो आणि मग तो एखादा आधार शोधू लागतो. असा आधार मिळाला की हा स्वसंवाद तत्त्वज्ञानाशी ओळख करून देतो. हे जग मिथ्या आहे असे वाटायला लागले, जे जन्माला येणार त्याचा नाश अटळ आहे हे कळाले की अध्यात्माची पहिली पायरी आपण गाठली याची जाणीव होते. आणि नेमके इथेच, पुढची मार्गक्रमणा करण्यासाठी, कबीर आपल्या मदतीला येतो. तो म्हणतो:

"माला फेरत जुग भया
फिरा न मन का फेर,
कर का मनका डारि दे
मन का मनका फेर।"

कबीराचा हा फक्त चार ओळींचा दोहा तत्वज्ञानाच्या अर्थाने काठोकाठ भरला आहे. एखाद्या देवाचा मंत्र हातात जपमाळ घेऊन वर्षानुवर्षे जपत असताना देखील ऐहिक गोष्टीकडे लक्ष देण्यापलीकडे मनाचा आवाका जात नाही. हातात जपमाळ असते पण सूनबाई मुलाशी काय खुसरपुसर करते याकडे कान टवकारलेले असतात. नातवंडे काय उद्योग करून ठेवत आहेत, कामवाल्या बाईने भांडी नीट घासली की नाही, दूध उतू गेले की काय असे विचार मनात येत राहतात. मंदिरात हात जोडताना बाहेर ठेवलेली नवी कोरी चप्पल कोणी चोरणार नाही ना, याची चिंता वाटत असेल तर त्या भक्तीला कसला आला आहे भाव! माळ फिरवताना देखील त्यांच्या मनोभूमिकेत काडीचा फरक आढळत नाही. म्हणून कबीर म्हणतो, "
"माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर." हातात जपमाळ आणि मनात कचरा ठासून भरलेला असेल, मेंदूत नको ते विचार थैमान घालत असतील तर असा जप केला काय आणि नाही केला काय, कसला फरक पडणार आहे? म्हणून कबीर पुढे सांगतो, " कर का मनका डारि दे," हातातली जपाची माळ टाकून दे, " मन का मनका फेर," मनाचा मणी फिरव.

आणि असा मनाचा मणी फिरवत असताना जेव्हा एखादी व्यक्ती अध्यात्मिकदृष्ट्या प्रगती करू लागते तेव्हा ती व्यक्ती प्रत्येक मुद्द्याकडे जागरूकतेन पाहते आणि या पाहण्यात सद्भावना आणि करुणा या दोन्ही गोष्टी सामावलेल्या असतात. विचारसरणी आपोआपच सकारात्मक बनते. जेव्हा आपण इतरांना स्वत:चाच विस्तारलेला भाग म्हणून पाहणे प्रारंभ करतो तेव्हा आपली ग्रहणक्षमता आणि खुलेपणा वाढतो आणि निश्चलता आणि मन:शांती याचा विस्तार होत जातो.

रोजच्याच जगण्यातलं वास्तव मांडताना कबीरला केवळ या चार ओळी पुरेश्या वाटतात. कबीरला इथे नास्तिक लोकांबद्दल टीका करायची नाही. आस्तिक आणि नास्तिक या नात्यापलीकडे जाऊन तो त्याची भूमिका परखडपणे मांडतो आणि म्हणूनच तो कालातीत आहे. त्याच्या शब्दांच्या निवडीला कुठलाही संवेदनशील माणूस दाद दिल्याशिवाय राहणार नाही.

मानवी मनाची खोली समुद्राच्या तळाइतपत जाऊनही संपत नाही. अगदी ॲरिस्टोटलच्या काळापासून आतापर्यंत मानवी मनाच्या अंत:पटलाचा आणि त्याला जोडलेल्या तत्वज्ञानाचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेक वैज्ञानिकानी केला. तो शोध अजूनही अव्याहत चालू आहे. हे असे लोक आणि आपण यात काय फरक आहे असं विचारलं तर त्यांनी मनाचा मणी फिरवला. "मन का मनका फेर" हे आचरणात आणलं. कुठल्याही कर्मकांडात अडकायचं नाही हे व्रत अंगीकारले तरच वैज्ञानिक प्रगती होते हे त्यांनी जाणले. पृथ्वी गोल आहे असे सांगणाऱ्या गॅलिलिओला चर्चच्या कर्मकांडात अडकलेल्या धर्मगुरूंनी तर कैदेत टाकले होते. कित्येक शतकांनंतर मानसिकता बदलली गेली आणि गॅलिलिओचे म्हणणे खरे होतें हे कळले. अशा पद्धतीने जग बदलून टाकेल असे तंत्रज्ञान, नवनवीन विषय घेऊन निर्माण होणारे साहित्य, जुन्या तत्वज्ञानाचे विस्तारित विवेचन, अशा सर्व नवीन गोष्टींची निर्मिती झाली. त्याच त्याच कर्मकांडात ही मंडळी अडकली असती तर मध्ययुगीन काळ अजूनही लांबला असता आणि तंत्रज्ञानाची फळे चाखायला बराच मोठा अवधी लागला असता. असे जे परिवर्तन नंतरच्याच काळात झाले त्यासाठी ज्यांनी हे परिवर्तन घडवून आणले त्यांनी स्वतःला बदलले. स्वतःच्याच व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणला. आपण इतरांना बदलायला जातो, आपली मते इतरांवर लादतो इथेच आपण चुकतो. आपण स्वतःत कितीसा बदल घडवतो ह्याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आपण आपला हट्ट सहजासहजी सोडत नाही. माझेच कसे खरे आहे हे पटवून देण्यासाठी आपण हट्टाला पेटतो, प्रसंगी भांडतो. आपल्याला " मन का मनका फेर" करायचं आहे हे कळत असून देखील वळत नाही. इथूनच आपल्या मनात नको त्या गोष्टींचा कचरा साठायला सुरुवात होते. माळेतला मणी फिरवण्या इतकी ही सोपी गोष्ट नाही हे खरे आहे तरीही तसा प्रयत्न करून आपण स्वतःला बदललं की समोरचं आपोआप बदललेलं दिसतं. आजूबाजूला असणारं रोजचं विश्व बदलत नाही पण आपली बघण्याची दृष्टी नव्याने मिळाल्याने त्याच विश्वातलं नवंपणआपल्याला कळायला लागतं.

जप करताना मंत्राऐवजी इतर अनावश्यक गोष्टीवर लक्ष जाते तसेच आपल्याला इतरांनी चांगले म्हणावे अशी इच्छा असताना इतरांच्यातले वैगुण्य आपण शोधत बसतो. आपले जे उद्दिष्ट असते त्यापासून आपण च्युत होतो. मग त्यावर उपाय काय? उपाय एकच, "मन का मनका फेर..."
.........................

Group content visibility: 
Use group defaults

मूल कमल हे मूलाधार चक्राला उद्देशून आहे. त्याचा आकार चार पाकळ्यांच्या कमलासारखा मानला आहे.
अनाहत नाद म्हणजे कोणत्याही आघाताविना निर्माण झालेला नाद.
हद म्हणजे हद्द/ सीमा नव्हे. अनहद हे अनाहत चे तद्भव रूप आहे.
पच्चीस ह्या आकड्याची फोड काही ठिकाणी अशी केली आहे :
पांच गुण (शब्द स्पर्श इत्यादि)., पाच महाभूते ( पृथ्वी आप इत्यादि), पाच ज्ञानेंद्रिये ( डोळे, कान इत्यादि), पाच कर्मेंद्रिये (हात पाय इत्यादि),पाच प्राण ( प्राण, अपान, व्यान, उदान, समान ). हे सर्व मिळून पंचवीस. काही ठिकाणी पंचकोश म्हणजे देहाची पाच आवरणे असेही मानतात. अन्नमय, प्राणमय,मनोमय,विज्ञानमय, आनंदमय असे पाच कोश.
"मन ममता को थिर कर लाऊँ जी
पाँचों तत्व मिलाऊँगा" इथे पंचीकरण अभिप्रेत आहे. पंचतत्त्वे म्हणजे शरीर ज्यांनी मिळून बनले आहे ती शरीरातली पंचमहाभूते. पंचीकरण ही एक आध्यात्मिक/ यौगिक प्रक्रिया आहे.

सामो, तुम्हांला आध्यात्मिक धाग्यांमध्ये रस असतो, म्हणून थोडे अधिक स्पष्टीकरण:
कबीर समजणे तसे कठीण आहे. त्यांच्या साध्यासुध्या कवनांत अनेक यौगिक, आध्यात्मिक अनुभव गुंफलेले असतात. पंचीकरण म्हणजे साधीसुधी क्रिया नव्हे. पाँचों तत्त्व मिलाऊँगा असे ते आत्मविश्वासाने लिहितात तेव्हा त्यांनी मन आणि ममतेवर किती ताबा मिळवला असेल! ममता म्हणजे माझे माझे करणे. हे माझे, ते माझे, बायकोमुले माझी, नातेवाईक माझे, घर संसार माझा ही ममता. हे सर्व मायेचे बंध तोडणे, सर्वोच्च आनंद मिळणार आहे ह्या खात्रीने हसत हसत ह्या मर्त्य आणि क्षणभंगुर आनंदभावनांतून मन अलगद बाजूला करणे ही अध्यात्मातील खूप मोठी पायरी आहे. निर्गुण रूप समजणे, त्याची उपासना करता येणे हे फार थोड्यांना जमते. सगुण रूपातल्या सद्गुरूंचे मार्गदर्शन लाभले तर ते खूपसे सोपे होते. सगुण भक्तीतून निर्गुणाकडे जाणे सोपे. मुळात गुरुतत्व हे सगुणात असते, सगुण रूपात असते हे पटेपर्यंत आयुष्य संपत येते. आपल्यातली ममता, सोस, अहंता, मीपणा बाजूला ठेवून दुसऱ्या कुणापुढे लीन होणे आणि हळू हळू विलीन होणे असा हा प्रवास असतो. हा योग्य असा 'दुसरा कुणी ' योग्य वेळी सापडणे हे ज्याचे त्याचे भाग्य.

"आणि असा मनाचा मणी फिरवत असताना जेव्हा एखादी व्यक्ती अध्यात्मिकदृष्ट्या प्रगती करू लागते तेव्हा....."
मूळ लेखातला हा संपूर्ण परिच्छेद सगळ्यात जास्त आवडला.

सुंदर लेख. अस्मिता, हीरा, सामो सगळ्यांच्या प्रतिक्रियाही वाचनीय, मननीय.
स्वेन यांच्या प्रतिक्रियेत अस्मिताच्या निरंजन लेखाविषयी उल्लेख वाचून तो लेखही वाचला, अजून एक रत्न गवसले.

@ हीरा, अतिशय सुंदर. या भजनाचे मला जे आकलन झाले, त्यापेक्षा तुम्हाला झालेले आकलन कैक पटीने सुंदर आणि श्रेष्ठ आहे. ज्या पद्धतीने तुम्ही सोप्या भाषेत विवेचन केलेले आहे ते खरेच कौतुकास्पद आहे. धन्यवाद.
@ वंदना, धन्यवाद.

लेखक स्वत:, अस्मिता, धनश्री आणि हीरा … काय सुंदर चर्चा झालीय तुमची इथे ! ❤

हीरा हल्ली नसतात हे माझे दु:ख आहे. फार सुंदर प्रतिसाद असत त्यांचे.

रच्याकने, समकालीन हिंदी विद्वानांनी आधी दुर्लक्ष केलेले कबीर आणि कबीर साहित्य नंतर खूप प्रसिद्ध, जनप्रिय झाले. हिंदी साहित्यकारांची एक पीढीच कबीर रंगात रंगली होती. किमान १०० अभ्यासकांनी कबीर - कबीर साहित्यसंपदेवर पीएचडी केली आहे भारतातच.

कबीर साहित्याचे हिंदीतून सर्वात आधी भाषांतर इंग्रजीत झाले आणि ते केले गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी. Almost entire कबीर साहित्य टागोरांनी इंग्रजीत अनुवादित केले आहे, त्यालाही आता शतक लोटले.

Pages