दिवाळीचा फराळ दिवाळीत नकोसा होतो. पण काही दिवसांनी काहींना त्याची आठवण येऊ लागते. मैने प्यार किया, हम आपके है कौन नंतर ऐन दिवाळीत आलेल्या हम साथ साथ है चं प्रेक्षकांना अजीर्ण झालं होतं. नंतर नवा पदार्थ बनवून पाहण्यासाठी मै प्रेम की दिवानी हूं आणि विवाह हे प्रेमपट बनवूनही तोंडाला बसलेली मिठी काही सुटेना.मग पुन्हा जुनाच आयटेम नव्या पद्धतीने पण त्याच परंपरेत बनवून पाहण्याची खेळी या वेळी बॉक्स ऑफीसवर तरी चालली आहे.
सूरज बडजात्याचा सिनेमा हा पोस्टरवरूनच ओळखता येतो. त्यासाठी श्रेयनामावालीची गरज नसते. ते सर्वांचं अरुण गोविल छाप हसू ओठात खेळवणारा सलमान त्याहूनही गोड हसू असणारा आलोकनाथ हे पाहून सूज्ञ प्रेक्षक ताबडतोब ओळखतो कि बडजात्यांचा फराळ आला.
घरांचे भाव गगनात गेल्याच्या जमान्यात आख्खी स्कीम एकाच घरात मावेल एव्हढी भव्य घरं, डोळे दिपवून टाकेल अशी श्रीमंती आणि टचकन डोळ्यांत पाणी आणणारे कौटुंबिक प्रसंग हे याही सिनेमात आहेत. फक्त यावेळी चढत्या भाजणीप्रमाणे यातलं कुटुंब चक्क राजघराणं असल्याने एक नाही दोन नाही तर पाच सहा महाल आहेत. श्रीमंती इतकी की अंगवस्त्रासाठी दिलेलं सामान्य घर हे अॅपलचं कार्पोरेट ऑफीस स्वतःच्या थोतरीत मारून घेईल !
तर अशा या सिनेमाची कथा काय वर्णावी ?
अयोध्येसारख्या पवित्र ठिकाणी दिलवाले प्रेम हा नवतरुण राजश्रीच्या ध्वनीप्रदूषणाच्या दहा डेसीबल्सच्या मर्यादेत राहून रामलीला सादर करीत असतो. याच मर्यादेत त्याचे पुटपुटते संवाद प्रेक्षकांना कळत असतात. एकीकडे रामलीला सादर करत असताना तो एका राजकुमारीच्या सोशल वर्कला हातभार देखील लावत असतो. राजकुमारीला एक डाव डोळे भरून पहावं एव्हढीच त्याची इच्छा असते. त्याला समजतं की अयोध्येपासून बसने एक दिवसाच्या अंतरावर असणा-या प्रीतमपूर गावी राजकुमारी येणार आहेत. प्रेम दिलवालेला आगापिछा नसल्याने मित्रासोबत तो गावी जायला निघतो.
आणि आपल्याला राजकुमारीचं गंतव्य ठिकाण पडद्यावर दिसू लागतं. रियासतचा फैसला होऊन संभाव्य युवराजांचा राजतिलक व्हायचा आहे. हेच युवराज आपल्या पाहुण्या राजकुमारीचे वाग्दत्त वर असून त्यांचा साखरपुडा व्हायचा आहे हे आपल्याला कळतं. हा प्रसंग ज्या घरात घडत असतो तिथे कॅमेरा अगदी उंचावर टांगूनही घर त्यात मावलेलं नसतं. ते सुरू कुठे होतं नि संपतं कुठे हे शेवटपर्यंत समजत नाही.
कॅमेरा जस जसा युवराजांच्या चेह-यावर येतो तसे आपण सावरून बसतो आणि पाहतो अरेच्चा !
नियतीचा चमत्कार !! आश्चर्य !!!!
पूर्वी कधीही न पाहीले असं अघटीत ! नवल !!
युवराजांचा चेहरा थेट, हुबेहूब प्रेम दिलवालेसारखा. आपण मनात म्हणतो कसं काय ना ? दोघांचे आवाजही सारखे, केस सारखे उंचीसारखी, रंग सारखा आणि वयदेखील सारखं. प्रेक्षक थक्क ! एकाच तिकीटात डबल मनोरंजन ? बोनस शेयर ! पिक्चर चालणार म्हणजे काय दौडणार.
तर युवराजांना एक भाऊ असतो तो दिसायला युवराजांच्या मनात कॉम्प्लेक्स निर्माण करत असतो. त्याचे नाव नील नितीन मुकेश. त्यामुळे तलवारबाजीत युवराज भावाला हरवतात. मग तो आपला देखणा चेहरा घेऊन नवतरूण नायकास अपशकुन करायला वारंवार पडद्यावर येत नाही.
युवराजांना दोन बहीणी असतात. युवराज परंपराप्रिय असल्याचे पहिल्याच सीन मधे आपल्याला कळालेले असते. तर राजकुमारीस ठेसनात रिसीव्ह करायला बहीणीने जावं हे परंपरेप्रमाणे योग्य राहील असा निर्वाळा खानदानी पडीक दिवाणजी कम मुनीमजी कम पागनीस कम पोतनीस कम वाकनीस कम फडणवीस असलेले अनुपम खेर देतात. नायकाचा डबल रोल असल्याने एव्हढी कामे अनुपम खेर यांना एकट्याने करावी लागणार असतात. त्यामुळे अजित वाच्छानी, सतीश शहा, आलोकनाथ यांना नारळ मिळालाय हे आपल्या ध्यानात येतं. गुजराती बनियाचं बजेटवर किती काटेकोर लक्ष असतं हे ही शिकायला मिळतं.
या दरम्यान गाणं बजावणं होत असतं त्यातले शब्द काही लक्षात राहणार नाहीत याची दक्षता रविंद्र जैन यांच्या जागी गुजराती म्हणून आलेल्या हिमेसभाईने घेतलेली असते. पण त्याला गाण्याची संधी न देऊन सूरज बडजात्या आपल्याला संगीताचा कान असल्याचे सुचवून जातो.
बहीणीने ठेसनात जावं ही परंपरा किती शतकं पुरानी आहे हे आपल्याला कळत नाही. अशी काही परंपरा असते हे आपण राजघराण्यात जन्माला आलेले नसल्याने आणि कपाळकरंटे असल्याने आपल्याला कसं ठावे ? या परंपरेसाठी युवराज बहीणींच्या घरी जातात मात्र दारात बग्गी थांबताच वरून एक बहीण एक वस्तू फेकून मारते. त्याला घरात घेतले जात नाही आणि राजघराण्याचा वकील तिथे दाखल होतो. जे काही बोलायचं ते माझ्याशी आधी बोला मी ते त्यांना कळवीन. तुमचा प्रस्ताव योग्य असेल तर त्या तुम्हाला भेटतील. हा अपमान रिचवून युवराज तिला भेटायला घरात घुसतात पण त्यांना धक्के मारून बाहेर काढलं जातं.
त्यानंतर दिवाणजींना तिथेच सोडून रागारागाने युवराज आपल्या घरी , माफ करा महाली निघतात. आपण पडद्यावर पाहतो तो काय बग्गीचालक मळलेली वाट सोडून भलत्याच दिशेने बग्गी हाकू लागतो. युवराजांना झोप लागलेली असते. बग्गी आता अरुंद घाटरस्त्याने धावू लागते. चालक बग्गीचे सर्व दरवाजे बंद करून टाकतो आणि स्वतः आडव्या फांदीला लटकतो. इकडे युवराजांना जाग येते तो बग्गी विनाचालकाची धावतेय. युवराज काच फोडून बाहेर येऊन जीव वाचवू पाहतात पण हाय रे देवा, बग्गी हजारो फुटांवरून खाली कोसळताना दिसते . सोबत युवराज स्काय डाईव्ह करताना दिसतात. पण खाली दरी, दगड धोंडे, एक तालाब इ. इ. असतं आणि युवराजांकडे पॅराशूट देखील नसतं.
प्रेम दिलवाले बस थांबल्यावर राजकुमारीसाठी मिठाई खरेदी करत असताना त्यांना संस्थानातली एक कार दिसते. तो सिक्युरिटी अधिकारी असतो. प्रेम दिलवालेला पाहून तो अत्यंत आश्चर्यचकीत झालेला दिसतो आणि आपल्या कारमधे येण्याची विनंती करतो. प्रेम देखील विश्वास बसत नसताना त्याच्या कारमधे बसतो आणि युवराजांच्या संस्थानात दाखल होतो...
बाप रे बाप ! सुरुवातीलाच क्लायमॅक्स !!
सूरज बडजात्यांनी या वेळच्या फराळात देशोदेशींचे मसाले मिक्स केले आहेत. इतका दारुगोळा ठासून भरल्यानंतर सिनेमात नाती उलगडून दाखवण्यात प्रेम यशस्वी होतो का ? त्याला कुठली कामगिरी मिळते ? युवराजांचं काय होतं ? त्यांना कोण मारण्याचा प्रयत्न करतं ?
मुख्य म्हणजे डबल.रोलचं प्रयोजन काय ? सिनेमात दुसरी हिरॉइन आहे का ? मग सोनम कपूरचं काय होतं ? तिला युवराज मिळतात का की त्यांच्या जागी ड्यआयडी मिळतो या प्रश्नांची उत्तरं पडद्यावरच पहावीत.
सिनेमात आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय याच अंदाज आलाच असेल बहुधा. बडजात्या पट म्हटल्यावर निरमाने दुतलेल्या स्क्रीनवर चित्रपट उलगडणार हे कळतंच. बडजात्यांच्या सिनेमातल्या नायिका स्वच्छ दिसतात पण त्या स्नान करतात की नाही हे इतर सिनेम्यांप्रमाणे आपणास कळत नाही. नायक बिना अंघोळीचा , पारोशी असला तरी चालेल पण नायिका कशी शुचिर्भूत असली पाहीजे हा सिनेसृष्टीचा दंडक आहे. त्याचा ढळढळीत पुरावा देण्याची पद्धत बडजात्यांकडे नाही. तरी देखील चित्रपटाने चाळीस कोटीचा डल्ला मारला आहे हे पाहून लिऑनपटांनी तोंडात बोटं घातली असतील.
फराळाचा अंदाज आल्यावर हा फराळ आवडत असेल तर एकदा चाखायला हरकत नाही. पण तोंडाची मिठी अद्याप सुटली नसल्यास वाकडी वाट देखील करू नये. रामायण मालिकेत ज्याप्रमाने हसले, रडले, उठले, बसले या सर्व क्रियांवर रविंद्र जैन यांच्या आवाजात एक अगम्य गाणं असायचं तशी गाणी हिमेसभाईंनी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या मर्यादा पाहता त्याने त्या उघड्या पडू नयेत म्हणून जो काही ढणढणाट केला आहे ते पाहता त्याला दिवाळी आणि दहीहंडीतला फरक ध्यानात आला नसावा असे वाटते. हॉलबाहेर आल्यावर डोकं जड का वाटतंय हे एक झोप काढून झाल्यावर ध्यानात येतं.
मायबोलीकरांनी डबल रोलचा रहस्यभेद सिनेमाहॉल मधे करू नये. सगळ्यांनाच ड्युआयडीचे फायदे तोटे माहीत असतील असे नाही. तुम्ही जर एव्हढे पथ्य पाळलेच तर येताना गुणगुणल्याशिवाय राहणार नाही कि
पायो जी मैने रामरहीम ड्युआय पायो !!
मी काल प्रेम रतन धन पायो
मी काल प्रेम रतन धन पायो पाहिला! मेजर डिझास्टर मूव्ही!! बडजात्याचा ऑल टाइम वर्स्ट असावा.
पार स्पीचलेस झाले !
मी आपलं फ्रेन्ड्स च्या घरी नावं ठेवायला म्हणूनच पहात होते पण तरीही सिनेमाने माझी एक्सपेक्टेशन बीट केली
सलमान जीभ जड, थकेला, शिवाय एक डोळा खोटा असावा असा दिसतो. टेक्निकल टीम ताराचंद बडजात्याच्या पिढीतली असावी. तो अपघात आणि तो धबधब्यावरचा शीश महल की काय तो हे सीन्स भयाण प्राथमिक चित्रित झालेत. धबधबा अन महाल दाखवायला चांदोबातले चित्र हाताने हलवलेय असे वाटते.आमच्या काजल सोसायटीतल्या गणेशोत्सवात यापेक्षा बरे स्पेशल इफेक्ट्स असायचे २० वर्षापूर्वी! स्मित
कथा भंकस.कुठल्या काळातली, स्थळातली की आल्टरनेट युनिव्हर्स मधली आहे तेच कळत नाही. घोडागाडीत बसून सेलफोन वर बोलणारी माणसे, जुने किल्ले, त्यात गुप्त तळघर, आत पेटलेल्या मशालीच्या प्रकाशात आधुनिक मेडिकल ट्रीटमेन्ट देणारे डॉक्टर, राजा, त्याच्या २-३ बायका, औरस अनौरस मुलं , जय हो जय हो वगैरे ओरडत गाडीमागे धावणारे नागरीक, तलवारबाजी करणारे , राजतिलक होऊ घातलेले राजपुत्र, आणि त्याच वेळी हेलि़कॉप्टर ने येणारी एक अन दुसरी फुटबॉल खेळणारी राजकुमारी!
हो आणि राजतिलक समारंभाला आलेले देशोदेशीचे पाहुणे आणि त्या समारंभात अचानक साड्या, घागरे, शाली, शेरवान्या सांभाळत उपस्थितंनी खेळलेली फुटबॉल (सॉकर) म्याच!! ??? हे असं खरंच सिनेमात आहे की मला ब्लडी मेरी जास्त झाली असेल याची आता खात्री वाटत नाही आहे!
आज उरकला अखेरीस सिनेमा
आज उरकला अखेरीस सिनेमा ..
परीक्षण आणि प्रतिसाद वाचून खूपच अपेक्षा डाऊन असल्यामुळे का असेना, पण चक्क मनोरंजन झाले..
गाणी मात्र पारच बोर.. ती न चुकता ढकलावी लागली.. पण इतर भागात उत्कंठा कायम राहिली..
सलमान आपल्या बहिणींना महाल आणि जायदादका हिस्सा देतो तेव्हा पटकन पाणी तर नाही ना येणार डोळ्यातून अशी भितीही वाटली.. \
जास्त लोड घ्यायचा सिनेमा नाहीये हा, त्यामुळे आतापर्यंत वाचलेल्या सर्व परीक्षणांशी देखील सहमत, लॉजिकच्या नावावर चित्रपटाची कितीही खेचू शकतो ..
सलमानच्या चित्रपटांना थिएटरात जाऊन पैसे तर घालवू शकत नाही, पण वेळ घालवला तो फुकट नाही गेला असे म्हणू शकतो..
तरी सिनेमा आणखी मनोरंजक करता आला असता, चित्रीकरण, स्टंटस आणि स्पेशल इफेक्टवर मेहनत घेता आली असती.. पण बहुधा सलमानचा चित्रपट आहे तर काही न करताही २०० कोटी कमावणारच आहोत, तर वरच्या पाचपन्नास कोटींसाठी जास्तीची मेहनत का घ्या, त्यात अजून एक सलमानपट बनेल असा विचार होत असावा.. धंद्याचे गणित.. निर्मात्यांनाच ठाऊक
(No subject)
>>घोडा सलमानला कडेवर घेउन
>>घोडा सलमानला कडेवर घेउन धावतानाचा सीन अफाट आवड>>>>
घोड्याने सलमानला कडेवर घेतले होते????
घोडा सलमानला घेऊन कड्यावरून
घोडा सलमानला घेऊन कड्यावरून कडेकडेने धावत होता असे वाचा.. सॉरी
सोफा ह्या विषयाला धरून ज्या
सोफा ह्या विषयाला धरून ज्या काही पोस्ट्स पडल्यात ... हसून हसून मुरकुंडी वळलीय.
आफ्फाट कठीण आहात राव तुम्ही ,
आफ्फाट कठीण आहात राव तुम्ही , मायबोलीवर आल्याचे सार्थक झाले आज . दंडवत मालक .
शनिवारी हा चित्रपट पहाण्याचं
शनिवारी हा चित्रपट पहाण्याचं भाग्य लाभलं आणि हा धागा आठवला , ती मॅच, तो शीश महल, धबधबा - कहर आहे.
परत एकदा सोफाचर्चा वाचली.
परत एकदा सोफाचर्चा वाचली.
दिवस हसून पावन झाला.
आता कामाला लागते.
(अश्या सोफ्यावर नॉर्मल उताणं लोळत पडून आवडता पिक्चर बघायला आवडेल.)
हे रत्न miss झालं होतं
हे रत्न miss झालं होतं माझ्याकडून

आज वाचला धागा
अशक्य आहे
. <<<<ते सर्वांचं अरुण गोविल
. <<<<ते सर्वांचं अरुण गोविल छाप हसू ओठात खेळवणारा सलमान त्याहूनही गोड हसू असणारा आलोकनाथ हे पाहून सूज्ञ प्रेक्षक ताबडतोब ओळखतो कि बडजात्यांचा फराळ आला>>
अफाट सगळं ! घायल तुसी ग्रेट हो!
धमाल आहे हे..!
(No subject)
धमाल!!!
धमाल!!!
एक नंबर
एक नंबर
Pages