मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वल नोआ हरारीचे सेपिअन्स आणि होमो ड्युअस (Homo Deus) ही पुस्तके मागवली आहेत. होमो ड्युअस (Homo Deus)चे मराठी भाषांतर पण नुकतेच उपलब्ध झाल्याचे फेबु वर कळाले.
>>
होय दोन्ही पुस्तकांची भाषांतरे कालच अक्षरधारा मध्ये पाहिली...

>>होय दोन्ही पुस्तकांची भाषांतरे कालच अक्षरधारा मध्ये पाहिली...<< अरे वा! धन्यवाद माहितीबद्दल. Happy

मुरलीधर खैरनार लिखीत बहुचर्चित 'शोध' अखेर वाचली.
मराठीत असे काही वाचायला मिळणे दुर्मिळच. वेगवान कथानक, भरपूर डिटेल्स, उत्तम रहस्य वगैरे वगैरे.
तरीही डीटेल्सचा अतिरेक आणि त्यांचे अनेकदा'फॉर द सेक ऑफ इट' असणे कंटाळवाणेही होते. शेवट फारच सोपा करून टाकला आहे.
डॅन ब्राऊनपेक्षा, सिडने शेल्ड्न-अलिस्टर मॅक्लिन शैलीशी जास्त जवळ आहे असे वाटले.

अ‍ॅडम (रत्नाकर मतकरी) वाचलं नुकतच, छान वाटल काही ठीकाणी अतिशयोक्त्ती वाटली तरी नायकाचा जिवन प्रवास आणि विचार छान उतरले आहेत.शॉशँक रिडम्प्शन मध्ये एक वाक्य आहे 'Remember, Hope is a good thing, maybe the best of things, and no good thing ever dies.'' ह्य्या कादंबरीत मात्र उलट आहे नायकाची होप त्याच वाटोळं करुन टाकते. त्याला कळलेलं असतं की त्याच लग्न कधिच यशस्वि होणार नाही तरी तो खोट्या आशेवर चिकटुन राहतो.

मेधा, छान ओळख Happy

अग्निपंख, अ‍ॅडम कादंबरीवरून तेव्हा बरंच वादळ उठलं होतं असं मध्यंतरी वाचनात आलं होतं. कादंबरीत लैंगिक वर्णनं खूप आहेत वगैरे...

कादंबरीत लैंगिक वर्णनं खूप आहेत वगैरे...>>
हो खुप आहेत, आणि लेखकाने त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे सुरुवातिला, कथेची गरज आहे म्हणुन सुरुवातिला दिले आहेत, आणि नंतर ते कमी होत गेले आहेत.
खरं तर ती वर्णन डीटेल नसती तरी कधेत काही फरक पडला नसता, प्ण कदाचित खप कमी झाला असता . Wink

अ‍ॅडम कादंबरी अक्षरच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली, तेव्हा वाचलेली. मला तेव्हाही लैंगिक वर्णनं गरजेपेक्षा अधिक वाटली नव्हती.

'शोध'मधल्या ठिकाणांचे नकाशे, फोटो असलेली एखादी वेबसाईट आहे का?
>>
शोध मधल्या जागा ह्या नाशिक शहरतल्या गल्ल्या, चान्दवड, बागलाण, तालुका धोडप किल्ला वगैरे परिसराशी निगडीत आहेत. कदाचित काही खेडी काल्पनिक असतील पण रस्ते वगैरे बरोबर आहेत. त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल नाही तर साजिरा , तिथलेच राहनारे असल्याने प्रकाश टाकू शकले असते.. असल्या छचोर विषयावर लेखन करणे त्याना शोभत नाही असे त्याना वाटते.

टण्या पूर्वी मीडियम मधले लेख फोकट मे वाचता येत असत बहुधा. आता मेम्बरशिप मागत आहेत.

(बाय द वे सध्या सेपिअन्स वाचत आहे. अतिशय इण्टरेस्टिंग)

हो सुरुवातीचे काही लेख मोफत आणि मग मेम्बरशीप आहे बहुतेक. पण मुळात मिडियमवाले इतर पेपर, मॅगझीनच्या लिंकच देतात, स्वतःचे असे काय करतात

टवणे सर तसं नाहीये मिडियमचे. इतर पेपरच्या लिंका वगैरे अजिबातच नाहीये. मी मेंबरशिप घेतली आहे. लोकं स्वतःचे लेख लिहितात. मला आवडते मिडियम खूप.

करण जोहरच्या An unsuitable boy चं मराठी रूपांतर खरं सांगायचं तर (अनुवादक - नीता कुलकर्णी ) वाचलं.
खरं सांगण्यापूर्वीच्या स्वगतातून ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट करणने स्वतःच्या प्रेमप्रकरणांवर बेतला असल्याचं कळलं. त्यातल्या बॉलीवुडवरच्या कमेंट्रीच्या ओव्हरडोसचं कारण कळलं.
शाळेतलं एकलेपण, जाड असल्याचा कॉम्प्लेक्स, पॉन्सी म्हणून चिडवलं जाणं यांतून शिक्षकांच्या सांगण्यावरून मैत्री करणारा मुलगा, पोएट्री रिसायटल आणि डिबेटिंगमधलं बक्षीस , व्हॉस क्लासे अशा काही गोष्टींमुळे सहज बाहेर पडणं. लहानपणापासून फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांच्या मुलांशी असलेली ओळख हा आणखी एक पैलू.
डीडीएलजे आणि कुछ कुछ होता है च्या निर्मितीच्या काळाचं आणि प्रवासाचं वर्णन इंटरेस्टिंग आहे. स्वतः लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या सगळ्याच चित्रपटांमागची भूमिका मांडली आहे. ती प्रत्यक्ष वाचण्यासारखी आहे (किंवा नाहीही). का ते पुढल्या उतार्‍यावरून ठरवा.
"यश चोप्रांवर त्यांच्या 'सोसायटी' सिनेमांमुळे मी खुष होतो. तसंच त्यांच्या सिनेमांमध्ये ज्या थाटात चहा 'सर्व्ह' केला जातो, त्यावरही मी बेहद फिदा होतो. या सिनेमात सुंदर फ्लॉवरपॉट्समध्ये सजवून ठेवलेली फुलं असायची. प्रत्येक जणाच्या अंगावर सुरेख कपडे असायचे. त्यांच्या सिनेमातल्या बायका शिफॉनच्या अप्रतिम साड्या नेसायच्या..."
धर्माच्या वाटचालीतला प्रॉडक्शन हाउस्/स्टुडियो हा टप्पा ही एक नवी माहिती होती. बाहुबलीच्या यशाचं श्रेय घेतलेलं पाहून नवल वाटलं.
शाहरुखसोबतची मैत्री, काजोल इ.बरोबर निर्माण झालेला दुरावा वाचून "आम्हांला काय त्याचं?" असंच मनात आलं.
लव्ह, रिलेशनशिप अ‍ॅण्ड सेक्स नावाच्या प्रकरणात स्वतःच्या सेक्शुअ‍ॅलिटीबद्दल सांगितलंय किंवा सांगायचं नाकारलंय.
म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, मी सांगायची गरज नाही, तरीही मी सांगणार नाही. का? तर ऑनलाउइन येणारे हेट मेसेजेस आणि तुरुंगात टाकलं जाऊ शकण्याची भीती!
मुलं जन्माला घालण्यामागचं कारण एकटेपणा नकोय (लग्न न करण्याचा ठाम निश्चय) आणि वारस हवा.
एआयबी रोस्ट आणि कॉफी वरून झालेल्या मेकओव्हर बद्दल वाचेपर्यंत पुरेसा कंटाळा आला होता.
एकंदरित खूप साधे सोपे फंडे असलेलं जगणं आहे. फक्त आपण जे आहोत, ते तसं सांगण्याचा प्रामाणिकपणा आवडला. भावुक आणि भावनिक हे शब्द किती वेळा आलेत, हे मोजण्यासारखं आहे.

अनुवाद करताना पुस्तकाचं नाव सोडलं तर शब्दाला शब्द ठेवलेत. "मऊ कोपरा" हे डोक्यात फिट बसलंय माझ्या. एवढं असूनही कथनाची सुरुवात माझा जन्म बॉम्बेतला अशी झालीय. मूळ इंग्रजीही काही फार साहित्यिक मूल्याचं असेल असं वाटत नाही.
पुस्तकाला एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वीकेंड एडिटर सहलेखिका आहेत. अनुवाद करणार्‍यांना अन्य एका पुस्तकासाठी सर्वोत्केउष्ट अनुवादाचा पुरस्कार मिळालेला आहे.

भरत, मलाही An unsuitable boy घ्यायचय. ओव्हरऑल पुस्तक कस आहे? म्हणजे चान्गल की वाईट? हे सान्गू शकाल का?

सेपिअन्स वाचताना एक गोष्ट सतत जाणवत राहिली ती म्हणजे मराठीत नंदा खरेंनी 'कहाणी मानवप्राण्याची' या नावाने याच विषयावर अत्यंत सुंदर पुस्तक लिहिले आहे. आपल्यापैकी किती जणांनी ते वाचले? भाषा युवल हरारी इतकी रंजक नसली तरी खास खरे शैलीतली आहे. नंदा खरेंनी इंग्रजीत लिहिले असते तर नक्कीच जगप्रसिद्ध झाले असते ते पुस्तक.

तुलना स्तुत्य आहे पण ''कहाणी'' आणि "सेपिअन्समध्ये" रिसर्चच्या बाबतीत अनेक योजने फरक आहे. कहाणी मागचा रिसर्च माईल वाईड आणि मीटर डीप असेल तर सेपिअन्सचा माईल वाईड आणि माईल डीप म्हणावा लागेल.
पुन्हा कहाणी अगदीच 'माहितीपट' असल्यासारखे वाटते (पण रंजक माहिती) तर सेपिअन्सचा रिसर्च, क्लेम,अर्ग्यूमेंट्सम, डेरिवेशन असा घाट त्याला स्कॉलरली आर्टिकल सारखे आणि म्हणून प्रचंड अपीलिंग बनवतो. पण आपापल्या (रिजनल आणि ईंटरनॅशनल )वर्तुळात दोन्ही पुस्तकं मैलांचे दगड नक्कीच म्हणता येईल.

हा.ब., तुलना आवडली.
अशा विविध पुस्तकांच्या जोड्या शोधून त्याची अशी तुलना वाचायला मला खूप आवडेल.

सेपिअन्स आता वाचलंच पाहिजे. (सध्या माझा मुलगा वाचतोय आणि तो पुस्तकाच्या प्रेमात आहे. मला अधूनमधून त्यातलं काहीबाही सांगत असतो.)

मीही सेपिअन्स सुरु केलय वाचायला. पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. मानवाच्या उत्क्रांती बद्दल अनेक विडिओ/पुस्तकातून माहिती मिळतेच पण अशा पद्धतीने समोर आली की रंजक तर वाटतेच पण विचार करायला लावते. याती "प्यूजे" (?) कंपनीचे उदाहरण तर मला फार आवडलं.

बाकी काही हवे असलेले दिवाळी अंक आत्ता ई-बुक स्वरुपातच वाचावे लागतील असं दिसतय.

> मुलं जन्माला घालण्यामागचं कारण एकटेपणा नकोय (लग्न न करण्याचा ठाम निश्चय) आणि वारस हवा. > करण, तुषार कपूर आणि बहुतेक अक्षय खन्नादेखील. या तिघांनी निवडलेला हा 'लग्न न करणे पण सरोगसी वापरून मुल/लं जन्माला घालणे ' मार्ग आवडला होता मला. करणखेरीज बाकीचे दोघे स्ट्रेट आहेत(बहुतेक) तरीही त्यांनी हा मार्ग निवडला.

आमच्या लाडक्या पॉल थेरॉने थोरोबद्दल मन कलुषित करून ठेवल्याने आता वाल्डेन आणि थोरोची फिलॉसॉफी आली की एक फसवल्याची भावना उगाचच मनात येते. <<< टवणे सर, उत्सुकता चाळवली. याबद्दल आणखी जरा लिहिलंत तर वाचायला आवडेल.

मीही सध्या वाचतोय. प्रचंड एंगेजिंग आहे. >>>>>> कुठल पुस्तक, फारण्ड? करन जोहर की सेपिअन्स?

करण, तुषार कपूर आणि बहुतेक अक्षय खन्नादेखील. अक्षय खन्नादेखील. >>>>>> अक्षय खन्नाने कधी सरोगसी केली? Uhoh

स्वतःच्या सेक्शुअ‍ॅलिटीबद्दल सांगितलंय किंवा सांगायचं नाकारलंय.
म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, मी सांगायची गरज नाही, तरीही मी सांगणार नाही. का? तर ऑनलाउइन येणारे हेट मेसेजेस आणि तुरुंगात टाकलं जाऊ शकण्याची भीती! >>>>>> आता कायदा बदललाय. सो, करणने नवीन आवृतीत सत्य सान्गायला हरकत नाही. हेट मेसेजसची पर्वा नको. कुछ तो लोग कहेन्गे, लोगो का काम है कहना.

The case that shook India - लेखक प्रशांत भुषण

12 जून 1975रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश जगमोहन लाल सिन्हा यांनी खालील operative order वाचली आणि देशात एकच हलकल्लोळ माजला.
“In view of my findings on Issue No. 3 and Issue No. 1 read with additional issue No. 1, additional issue No. 2 and additional issue No. 3, the petition is allowed and the election of Smt. Indira Nehru Gandhi, respondent No. 1, to the Loksabha is declared void.”

राज नारायण या फिर्यादीचे वकील होते श्री. शांति भुषण. त्यांचा मुलगा श्री. प्रशांत भुषण यांनी या पुस्तकात उच्च न्यायालयात चाललेल्या व नंतर सर्वोच्च न्यायालयात अपिलात गेलेल्या या प्रसिद्ध खटल्याचे अप्रतिम लेखांकन केले आहे. पुस्तक 77/78मध्येच लिहिले आहे त्यामुळे घटना ताज्या असतानाच मांडल्या आहेत आणि म्हणून त्यात सिंहावलोकन/दूरगामी परिणाम वगैरे मते मांडण्याचा अट्टाहास मुळीच नाहीये.

पुस्तकाचा पहिला अर्धा भागात अलाहाबाद न्यायालयातल्या कामकाजाचे चित्रण आहे तर दुसऱ्या भागात सर्वोच्च न्यायालायतल्या कामकाजाचे. पुस्तक न्यायालयातील कामकाजाचे चित्रण या गाभ्याशी इतके प्रामाणिक आहे की खटला इंदिरा गांधी या माजी (पुस्तक लिहिले तेव्हा) पंतप्रधानांविरुद्ध असला तरी पुस्तक वाचताना तुम्ही इंदिरा गांधींना जवळजवळ विसरून जाता. प्रतिवादी क्र 1 असेच आपल्या डोक्यात राहते.
शांति भुषण यांचे न्यायालयातील प्लिडिंग जबरदस्त आहे. त्यांच्या विरोधात प्रतिवादी तर्फे अशोक सेन यांसारखे सर्वोत्तम वकील होते तसेच सरकारतर्फे attorney general, solicitor general असे मातब्बर वकील होते. खटला अनेक बाबींना स्पर्श करतो. मूलभूत हक्क, घटनेचा पाया, निवडणुकामागाचे तत्त्व, निवडणूक व लोकशाही यांचा परस्पर संबंध, निवडणुकीतील भ्रष्टाचाराची व्याख्या, उमेदवार म्हणजे नेमके काय व एखादा मनुष्य उमेदवार नेमका कधी होतो हे सर्व साक्ष व जबानी आणि उलट तपासणीतून तपशीलवार मांडले आहे. त्याचबरोबर खटल्यात गाय-वासरू हे धार्मिक चिन्ह आहे का, समानता लोकशाहीचे व्यवच्छेदक लक्षण आहे का अश्या इतर अनेक गोष्टींवर उहापोह आहे. केसवानंद भारती वि भारत सरकार या अत्यंत महत्वाच्या खटल्याचे संदर्भ सर्वोच्च न्यायालायतल्या कामकाजात अनेकदा येता. न्यायालयीन कामकाजाबद्दल वाचण्याची आवड असलेल्यांनी या दोन खटल्यांबद्दल वाचणे 'मस्ट' आहे.

भारताच्या लोकशाहीच्या प्रवासात या खटल्याचे फार मोठे स्थान आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दबाव, त्यांच्या कारकूनावर (जो ऑर्डर लिहून घेतो व टंकतो) सीआयडी पाठवून जवळजवळ torture असे अश्लाघ्य प्रकार खटला उच्च न्यायालयात असताना घडले. उच्च न्यायालयात निकाल विरोधात लागल्यावर आणीबाणी जाहीर केली गेली. विरोधकांना तुरुंगात डांबून लुटूपुतूच्या संसदेत घटना दुरुस्त्या व निवडणूक कायद्यात दुरुस्त्या पास करून न्यायालयाचा निर्णय retrospectively बदलण्यात आला. सर्वोचच न्यायालयात केवळ या रेयरोस्पेकटीव्ही दुरुस्तीमुळे निकाल प्रतिवादीच्या बाजूने लागला. खटला अपिलात असताना एकाही मुलाखतीत पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालायत निकाल विरोधात लागला तर मान्य करू असे वक्तव्य थेट प्रश्नाचे उत्तर देताना देखील केले नाही.
केसवानंद भारती खटल्यात बहुमताच्या बाजूने निर्णय दिलेल्या न्यायाधीशाना डावलून ए एन रे यांना नंतर इंदिरा गांधींच्या सरकारने प्रमुख न्यायाधीश केले. हे डावलणे आजही सरकारी हस्तक्षेपाचे सर्वात वाईट व पेटी (क्षुल्लक) निर्णय म्हणून ओळखले जाते. A.N. Ray, K.K. Mathew, M.H. Beg या तीन न्यायाधीशांनी केसवानंद भारती खटल्यात अल्पमतातला निर्णय दिला होता, हे तिघे राज नारायन वि इंदिरा गांधी खटल्याच्या 5 न्यायाधीशांच्या पीठातील तीन न्यायाधीश होते. उच्च न्यायालयाचा निर्णय अपिलात रद्द केला पण त्याचे प्रमुख कारण निवडणूक कायद्यातील दुरुस्ती होते. वर नमूद केल्याप्रमाणे ही दुरुस्ती retrospectively व आणीबाणीच्या काळात केली होती. पाचही न्यायाधीशांनी ही कायद्यातील दुरुस्ती रद्द करण्यास नकार दिला. त्यांनी घटना दुरुस्ती मात्र रद्द केली.

आज मागे वळून पाहताना या खटल्याचे महत्त्व आजच्या भारताच्या परिस्थितीत अनन्यसाधारण आहे. आज भारतात अघोषित आणीबाणी आहे असे अरुण शौरींसारखे आणीबाणी विरोधातील प्रमुख actor म्हणत आहेत. तरीही इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांची तुलना मी इथे करणार नाही कारण विषय भरकटेल. जे निष्कर्ष काढायचे आहेत ते वाचकांनी आपली सद्सद्विवेक बुद्धी वापरुन काढावेत. हे पुस्तक ही तुलना करण्यासाठी व मुख्य म्हणजे पुढला प्रवास काय असू शकतो/नसू शकतो याबद्दल कयास आखण्यासाठी नक्की उपयोगी पडेल.

The case that shook India- interesting read.
चांगलं लिहिलंय.

Pages