मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वावे, वृ आवडला.
का कोण जाणे, मला अजून आतून तिथे जावंसं वाटतंच नाहीये. (हा माझ्या पॅकेजचा दो.स. Proud )

वावे , पुढच्या वेळी महाबळेश्वरला जाईन तेव्हा नक्की जाईन. प्रकल्प नक्की पाहीन. इकडे तिकडे तेच तेच व्ह्यू पॉइंट पाहण्यापेक्षा बरंय.
२०१९ जुलैला महाबळेश्वरला गेलो होतो मुद्दामहून पाऊस अनुभवायला. खेडला रेल्वेने गेलो. मग खेड डेपोला पहिली सहाची पोलादपूर बस पकडली. तिथे लगेच महाबळेश्वर बस मिळाली. पण पावसाने आमचे आगावूच स्वागत केले. एवढा प्रचंड होता की रूमवरच दिवस काढून बसनेच परत आलो. परतीचं रेल्वेचा तिकीट तीन दिवसानंतरचं होतं ते सोडलं.
आता खेड ते पोलादपूर घाटाने जावं लागतं नाही असं कळलं. नवीन बोगदा झाला आहे त्याचं उद्घाटन निवडणुक निकालानंतर होणार आहे. महाबळेश्वरपेक्षा पाचगणीला पाऊस आणि धुकं फार कमी असतं.
नक्की जातो भिलारला. पुस्तक वाचनाची आवड असताना भिलारला न जाणे बरोबर नाही असं वाटू लागलं आहे.

डॉ कुमारांनी यावर लेखात लिहिलं आहेच अगोदर. ( येथे पुस्तके राहतात.)

राखीव सावल्यांचा खेळ- किरण गुरव.
या कथासंग्रहातल्या बऱ्याच कथा या 'बायकां'बद्दल आहेत. पुरुषप्रधान समाजात जागा मिळेल तिथे अपराधी भावनेने आणि सदैव घाबरून उभ्या राहिलेल्या बायका! कुणाला गोरी मुलगी होते म्हणून स्वतः बाहेरख्याली असणारा काळा नवरा तिच्यावर संशय घेऊन माहेरी पाठवून देतो, कुणाचा राजकारणात उचापती करणारा नवरा 'ओबीसी महिला' आरक्षण असलेल्या जागेवर, राजकारणात काडीचंही गम्य नसणाऱ्या बायकोला उभं रहायला लावतो, कुणाचा नवरा 'बलबीर पाशा' झाल्यामुळे (एड्स) घरातले सगळे बायकोसकट त्याला वाळीतच टाकतात.
या सगळ्या कथांमध्ये कुठेही प्रचारकी, बटबटीत भाषा अर्थातच नाही. सहज सांगितल्यासारखी, पण मध्येच चमकून जाणारी वाक्यं पेरलेली भाषा आहे.
सगळ्याच कथांमधल्या बायका 'बिचाऱ्या' नाहीत मात्र. सरूच्या कथेतली सासू चांगली कर्तबगार आणि खमकी आहे. नानी, यमी या वयात येऊ घातलेल्या मुली निरागस आहेत.
शेवटच्या 'भूमी' या कथेची सुरुवात होते ती कोल्हापुरात नोकरी करणाऱ्या, पण मूळच्या खेडेगावातल्या नायकापासून. शहरात, सरकारी ऑफिसमध्ये मुरलेला, बेरकी बनलेला हा नायक गावाकडे आई आजारी पडल्याची बातमी येताच मात्र पार विरघळून जातो. गावी जातो. बाळूच्या अवस्थांतराच्या डायरीतला प्रवास जणू उलट्या दिशेने करतो. पण खुद्द बाळूच्याच शब्दात सांगायचं तर 'चार पायांच्या प्राणीसृष्टीतून उठून दोन पायांच्या मानवसृष्टीत अवस्थांतरित होताना माणसाचं जे कायमचं मागं काही तरी हरवून गेलं तसंं भरपूर काय तरी कायमचं आपण मागे टाकलेलं आहे' Happy ते काही परत मिळत नाही कधीच. नायकाची आई जबरदस्त रंगवली आहे.
'काळी कपिला गाय' मध्ये घरातला कर्ता पुरुष अनपेक्षितपणे मृत्युमुखी पडल्यावरचा घरादाराचा आक्रोश आणि त्या अनुषंगाने अनेकांचे स्वभाव दाखवले आहेत. अशा प्रकारचे काही प्रसंग लांबून का होईना, पण गावाकडे दुर्दैवाने बघितलेले असल्यामुळे मनाला हे वर्णन जास्त भिडलं.
एकंदरीत पुस्तक आवडलं, हे वेगळं सांगायची गरजच नाही. कथांचे शेवट अपेक्षित आहेत, पण ते तसेच असण्यातली हतबलताच लेखकाला दाखवायची असावी.

किरण गुरवचं पुस्तक वाचेन.
---------
सुट्या संपून गर्दी संपली की भिलार.
-------------
Ruskin bond २१मे तारखेला नव्वदीत पोहोचले. मसुरी येथेच राहतात.

वावे, छान परिचय.
हे पुस्तक माझ्या वाचायच्या यादीत आहे.

शोध (मुरलीधर खैरनार)
सगळ्या जगाचं वाचून झाल्यावर मी हे पुस्तक वाचलं. Proud
पुस्तकाची कल्पना आवडलीच. अशा प्रकारचं मराठीत विशेष लिहिलं जात नाही.
ठिकठिकाणच्या व्यक्तिरेखांचं इंटरकनेक्शन खूप छान झालेलं आहे. नाशिक भागाचा भूगोल बारकाईने अभ्यासून पुस्तक लिहिलं आहे, हे समजतं. मला तर वाटतं, लेखकाने त्या त्या प्रसंगांसाठी स्वत:पुरते नकाशे सुद्धा काढले असणार.
तरी कुठे कुठे पुस्तक मला पाल्हाळिक वाटलं, निवेदनाची पद्धत कुठे कुठे फारच साचेबद्ध वाटली. इंग्लिश थ्रिलर्सची स्टाइल उचलण्याचा प्रयत्न केल्यासारखा वाटला. काही प्रसंग अतिरंजित वाटले.
एकूणात पुस्तक आणखी जरा आटोपशीर हवं होतं असं वाटलं. खूपच आवडलं असंही नाही, पण अजिबात आवडलं नाही असंही नाही.

ललिता-प्रीति, धन्यवाद!
Srd, रस्किन बॉन्डची पुस्तकं माझा मुलगा वाचतो. मीही फार पूर्वी एक पुस्तक वाचलं होतं ते आवडलं होतं. Happy
शोध मलाही पाल्हाळिक वाटतं, पण आवडतं. पहिल्यांदा वाचताना मन लावून सगळी वर्णनं वाचली. नंतर परत अधलंमधलं वाचताना मोठी वर्णनं गाळते.

वावे - भिलार ट्रिपची माहिती आवडली. जनरल लोकांच्या घरातच पुस्तके ठेवलेली आहेत का? हा कोणाचा उपक्रम आहे? तेथे चहा वगैरे सुद्धा मिळतो का? Happy

तेवढ्यात पाऊस पडायला लागला. आता पाऊस थांबेपर्यंत काही बाहेर पडायला लागणार नाही याचा आनंद झाला. >>> कधीकधी "इथे लेखक दिसतो" म्हणतात तसे "इथे खरा वाचनप्रेमी दिसतो" Happy

तेथे चहा वगैरे सुद्धा मिळतो का? इथे खरा चहाप्रेमी दिसतो Wink
नाही, एकीकडे चहा प्यायची सोय नाही दिसली. असती तर आवडलं असतं आम्हालापण Proud पण बरोबर आहे. चुकून चहा सांडला कुणाकडून तर पुस्तकं खराब होतील. सगळेच काही तितकी काळजी घेणारे असतील असं नाही.
जनरल लोकांच्या घरातच पुस्तके ठेवलेली आहेत का ? हा कोणाचा उपक्रम आहे?
हा राज्य मराठी विकास संस्थेचा म्हणजे तसा महाराष्ट्र सरकारचाच उपक्रम आहे. लोकांच्या घरात एखाद्या खोलीत पुस्तकं असतात. त्यांनी नोंदणी केली असणार सुरुवातीला.

इथे खरा चहाप्रेमी दिसतो >> Happy Happy चहा सांडलात तर पुस्तक विकत घ्यावे लागेल असा नियम करायला हवा. अमेरिकेत पूर्वी बार्न्स अ‍ॅण्ड नोबल आणि बॉर्डर या पुस्तकांच्या दुकानात कॅफेही असतो. बार्न्स अ‍ॅण्ड नोबल अजूनही जेथे आहे तेथे हे असते. आपल्याकडे क्रॉसवर्ड मधे असते का सोय? लक्षात नाही.

हा राज्य मराठी विकास संस्थेचा म्हणजे तसा महाराष्ट्र सरकारचाच उपक्रम आहे >> ओह ओके.

"शोध" कादंबरी फार आवडलेली. पण पाल्हाळ नक्कीच कमी करता आला असता. पहिल्यांदा उत्सुकतेपोटी वाचली पटापट पण दुसऱ्यांदा वाचायला घेतली तेव्हा पाल्हाळ फारच जाणवला.
पण तरीही कथानक, त्याकरीता केलेला अभ्यास, वातावरण निर्मिती - सगळं आवडलंय त्यातलं.

आता क्रॉसवर्ड पूर्वीइतकी दिसत नाहीत आणि जाणंही होत नाही. पण यावरून आठवलं, पुण्यात बहुतेक फर्ग्युसन रोडवर बुक कॅफे किंवा अशा काही तरी नावाचा कॅफे बघितला होता. तिथे कदाचित एकीकडे चहा कॉफी मिळत असावी पुस्तक वाचता वाचता. (किंवा चहा कॉफी पिताना पुस्तकं चाळायला मिळत असावीत. Happy )

अमलताश- सुप्रिया दीक्षित.

प्रकाश नारायण संतांच्या पत्नीचं हे आत्मचरित्र आहे. खूप दिवसांपासून हे वाचायचं मनात होतं, पण वाचून झाल्यावर असं वाटलं की आपल्या मनात काही व्यक्तींभोवती, गोष्टींभोवती अस्पष्टतेचं वलय असतं, ते तसंच राहणं कधीकधी चांगलं.
'लंपन' मी तसा खूप उशिरा वाचला. त्यातही फक्त 'वनवास'च वाचलंय, बाकीची पुस्तकं तेव्हा मिळाली नाहीत लायब्ररीत आणि नंतर ते राहूनच गेलं. पण लंपनचं भावविश्व अर्थात खूपच आवडलं होतं. प्रकाश नारायण संत हे इंदिरा संतांचे चिरंजीव. त्यांची मावशी ही ना. सी. फडक्यांची पत्नी. ते लहानपणी त्यांच्या आजीआजोबांना दत्तक गेले, लंपनच्या गोष्टी या त्यांच्या स्वतःच्या बालपणाच्या आठवणींवर आधारित आहेत, वगैरे गोष्टी ऐकून असल्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कुतूहल होतं. साहित्यिक आईवडील आणि स्वतः सुंदर लेखन करणाऱ्या या लेखकाचं वास्तव आयुष्यही असंच तरलपणे, अलगद गेलं असणार असं उगाचच भाबडेपणाने वाटत होतं! असं काही नसतं हे माहिती असूनही. श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे प्रकाश नारायण संतांचे अतिशय जवळचे मित्र होते हे कळल्यावर तर अजूनच छान वाटलं होतं. कारण त्यांचंही लिखाण असंच तरल, सुरेख. सुंदर चित्राचा काही भाग दाखवून बाकीच्या चित्राची वाचकांना कल्पना करायला लावणारं.
'अमलताश' हे बहाव्याचं नावही किती सुंदर आहे! हे त्यांच्या कराडच्या घराचं नाव.
डॉ. सुप्रिया दीक्षित म्हणजे पूर्वाश्रमीच्या सुधा ओळकर. त्या बेळगावला आपल्या आईबरोबर, आईच्या आईवडिलांच्या घरी वाढल्या. त्यांची आई ही आपल्या भावंडांमध्ये सगळ्यात थोरली होती आणि त्या काळी अनेक घरांमध्ये सर्रास असायचं, तशी आईची सर्वात धाकटी भावंडं ही सुधापेक्षा थोडीच मोठी. त्यामुळे आजीआजोबांनी सुधाला जवळजवळ आपली मुलगीच मानलं होतं आणि तशाच जबाबदारीने त्यांनी तिला वाढवलं. आजोबा प्रथितयश वकील होते आणि स्वकष्टाने त्यांनी बेळगावला प्रशस्त घर विकत घेतलं होतं. या 'रत्नाकर प्रासाद'चं खूप सुंदर वर्णन सुप्रिया दीक्षितांनी सुरुवातीला केलं आहे. बेळगाव हे शहर असलं, तरी तसं निवांतच, तिथलं हवामान सुखकर म्हणून सुप्रसिद्ध. अशा ठिकाणी असलेल्या या घराचं, आजूबाजूच्या बागेचं, झाडांचं वर्णन वाचून तिथे जावंसं वाटतं.
इंदिरा संतांच्या कुटुंबाशी त्यांचा चांगला घरोबा होता. सुधा यांची आई आणि इंदिराबाई या एकाच कॉलेजमध्ये शिकवत असत.
लहानपणापासून अभ्यासात हुशार, वाचनाची भरपूर आवड असलेली ही मुलगी बेळगावहून मुंबईला डॉक्टर होण्यासाठी गेली. याच दिवसांमध्ये बालमित्र असलेला 'चंदू' म्हणजे प्रकाश संत, यांच्याशी पत्रांमधून मैत्री झाली आणि हळूहळू दोघांच्याही मनात प्रेम फुललं. प्रकाश संत हे रसिक आणि व्यासंगी वाचक, उत्तम लेखक, चित्रकार, संगीताचे जाणकार, व्हायोलिनवादक होते. त्यामुळे त्यांच्या पत्रांमधून विविध गोष्टींवर गप्पा व्हायच्या.
कॉलेजच्या वयात आपल्याला आवडणाऱ्या मुलाने पत्रातून 'I am in love with you' म्हणण्यासारखं दुसरं रोमँटिक काही नसावं. पण अर्थात तो काळ जुना, घरचं वातावरण जुन्या वळणाचं. त्यामुळे तेव्हा त्यांनी मनावर दगड ठेवून 'चंदू'ला नकार दिला. शिक्षण पूर्ण झाल्यावर मात्र जेव्हा घरून लग्नाचा विषय निघाला तेव्हा 'लग्न केलं तर चंदूशीच, नाही तर कुणाशीच नाही' असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला. दोन्ही घरून काही विरोध झाला नाही आणि सहज लग्न पार पडलं.
पण या दोघांचे स्वभाव तसे खूप भिन्न होते. प्रेमात पडलेलं असताना स्वभावातली साम्यं, समान आवडीनिवडी जास्त जाणवतात आणि जे वेगवेगळं असतं, त्याकडे कळत-नकळत दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे असेल किंवा एकूण नातेवाईकांचा गोतावळा मोठा, त्यातली समीकरणं गुंतागुंतीची असल्याने असेल, 'तणावमुक्त' असा काळ त्यांच्या आयुष्यात फार कमी गेला असावा असंच हे पुस्तक वाचताना वाटतं. वारंवार येणारी आजारपणं, इतर अडचणी यांमुळे सतत त्या दोघांच्याही मनावर ताण होता असं वाटतं.
डॉक्टर म्हणून तशी बरीच वर्षं व्यवसाय करूनही सुप्रिया दीक्षितांनी पेशंट्सचे अनुभव फारसे लिहिलेले नाहीत. दवाखान्याचा, इतर कामांचा उल्लेख अर्थातच आहे, पण त्या आठवणींच्याही सोबतीला ताणतणाव, कटकटी आहेतच.
तसे आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात कमीअधिक प्रमाणात ताणतणाव असतात, आजारपणं असतात, कटकटी असतात, दुःखं, रुसवेफुगवे असतात. साहित्यिक झाले म्हणून त्यांना ते टळत नाहीत हेही खरंच.
पण तरी पुस्तक वाचताना वाईट वाटत राहतं आणि त्यांचं आयुष्य याहून खूप चांगलं, आनंदी जायला हवं होतं असं वाटत राहतं.

सुप्रिया दिक्षित म्हणजे मग 'सुमी' का? <<
हो..

क्राॅसवर्ड मधे कॅफे असतो.. मुलांना पुस्तकं आणि कॅफे दोघांचही आकर्षण असल्यामुळे तीन साडेतीन तास सहज जायचे भांडुपच्या माॅलमधे.

सुधा ही त्यांची लहानपणापासूनची मैत्रीण होती हे खरं आहे, पण ती सुमीच, असं नाही सांगता येणार. मला तरी नाही वाटत की सुधा म्हणजे सुमी. तसा बराच फरकही आहे लंपन आणि प्रकाश संतांच्या लहानपणामधे.
अनिरुद्ध Happy आत्ता वाचला तुमचा प्रतिसाद.

@ वावे
IMG-20240529-WA0029.jpg

ही अन्य कोणीही असू शकते पण संदर्भांवरुन सुमीच बहुतेक..

वावे +१.
इंदिरा संतांबद्दल पण एक तरल हळुवार कवयित्री आणि हाडामासाचा माणूस यात उगाच गल्लत करू नये असं काही प्रसंग वाचुन वाटलेलं.

थँक्स देवकी Happy
अजून एक विचार माझ्या मनात या पुस्तकाच्या निमित्ताने आला. मी जेव्हा सुनीताबाईंचं 'प्रिय जी. ए.' ऐकलं होतं, तेव्हा हा विचार पहिल्यांदा मनात आला होता. या विचाराचा यातल्या कुठल्याही व्यक्तींशी थेट संबंध नाही. त्या काळाबद्दलचा जनरल विचार आहे.
आता फोन, मेसेजेस वगैरेच्या जमान्यात जगणाऱ्या आपल्याला पूर्वीच्या, फक्त पत्रं लिहिण्याच्या काळाबद्दल साहजिकच एक नॉस्टॅल्जिया असतो. पण पत्रव्यवहार हा नेहमीच आनंददायक नसायचा, नसणार. म्हणजे 'कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की' ची पत्रं जाऊ द्या पण बाकीचीही मोठमोठी पत्रं ही काही नेहमीच छान, प्रेमळ नसायची अर्थात. कागाळ्या, कांगावे, आरोप-प्रत्यारोप, कंटाळवाणे उपदेश/रडगाणी वगैरे वगैरे सगळं तेव्हाही असणारच. सुनेला तोंडी एक सांगायचं आणि मुलीला पत्रातून विरुद्ध सांगायचं हेही प्रकार होत असणार. एकंदरीत काय, माणसं म्हटल्यावर हे सगळं आलंच. माध्यमं बदलली.
(हे आता लिहून झाल्यावर खूपच obvious वाटतंय. पण मनात विचार आला तेव्हा वेगळं वाटलं होतं.)

>>मनात काही व्यक्तींभोवती, गोष्टींभोवती अस्पष्टतेचं वलय असतं, ते तसंच राहणं कधीकधी चांगलं.>>>
ना.सी.फडक्यांनी ते खोटं ठरवलं होतं. ( भाषा प्रभूंची प्रेमप्रकरणं).

वावे, छान पोस्ट.
मागे मायबोलीवर अमलताश पुस्तकावर बरीच चर्चा झाल्याची आठवतेय. शैलजाने त्याबद्दल लिहिलं होतं बहुतेक. वेगळा धागाही नव्हता बहुतेक.
(चर्चा नक्की झाली होती, बाकी सगळं बहुतेक आहे Lol )

घनगर्द
२०१७ दिवाळी अंकांत आलेल्या पाच कथांचा संग्रह
मनोहर प्रकाशन,२०१८-१९-२२
ह्रुषीकेश गुप्ते
एक भयकथा. अतीसमकालीन पण विस्कळीत वाटली. इतर कथांमध्ये कथानायक स्वतः लेखक. पण मी कसा चांगला लिहितो हे बिंबवण्याच्या प्रयत्नांत. विशेष काही नाही
_________________________.

तेवढ्यात पाऊस पडायला लागला. आता पाऊस थांबेपर्यंत काही बाहेर पडायला लागणार नाही याचा आनंद झाला. >>> कधीकधी "इथे लेखक दिसतो" म्हणतात तसे "इथे खरा वाचनप्रेमी दिसतो" <<< Happy

द हंग्री टाईड
अमिताभ घोष यांच्या पुस्तकाचा अनुवाद सुनील करमरकर.
मेहता पब्लिशिंग हाऊस, ऑगस्ट २०२३
(मूळ इंग्रजी पुस्तक प्रकाशन २००४)
बंगालमधील सुंदरबन येथे डॉल्फिन माशांवर संशोधन करायला आलेली अमेरिकन मुलगी प्रियाली रॉय आणि तिला छोट्या बोटीतून फिरविणारा मच्छीमार फोकीर यांची कथा. सोबत एक जोड कथानक आहे दुभाष्या कनाई दत्त आणि त्याची सामाजिक सेवा करणारी मावशी निलिमा यांचे. सुंदरबनच्या कांदळवनावरचे जीवन या कादंबरीत लेखक अमिताभ घोष याने चांगले मांडले आहे.

Pages