मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पराग, परिचय आवडला.
मलाही हे पुस्तक वाचायचंय. पण ओळखीपाळखीत, चांगले वाचक असणार्‍यांकडून टोकाच्या उलटपालट प्रतिक्रिया ऐकल्या आहेत. त्यामुळे अजून ठरत नाहीये.

To kill a mocking bird (1960)- Harper lee
या पुस्तकाबद्दल फार ऐकले होते. मराठी भाषांतर (२०२१)विद्यागौरी खरे यांचे मिळाले. -
अगदी कंटाळवाणे पुस्तक आणि कथानक. शिवाय लहान मुले किती अशक्य प्रौढ बोलतात. अशी पुस्तके मराठीत आणण्याचा हेतू काय?

नुकतेच Freida McFadden चे ब्रेन डॅमेज हे पुस्तक वाचले. छान आहे. नायिकेला डोक्यात गोळी लागते. त्यातून ती वाचते, मग तिची रिकव्हरी, स्ट्रगल, इत्यादी. तिची इतर पुस्तके सुद्धा वाचली आहेत. त्यांच्या तुलनेत ब्रेन डॅमेज ठीक ठाक आहे. "The Ex" हे माझे सर्वात आवडते. ती थ्रिलर पुस्तके लिहिते. भाषा सरळ व शब्द सोपे असतात. वाक्येसुद्धा छोटी असतात. पात्रे छान रंगवते. पात्रांच्या भावना व मनातले विचार छान मांडते, त्यामुळे वाचायला मजा येते. भरीस भर शेवटी ट्विस्ट असतो. नवीन इंग्रजी वाचायला सुरुवात करणाऱ्यांसाठी ही चांगली लेखिका आहे.

पराग यांनी दिलेला परिचय वाचून ' सातपाटील कुलवृंतांत ' पुस्तक आणले . साडेसातशे पानाचा ठोकळा असूनही पुस्तक वाचायला रंजक वाटले . तुंबाडच्या खोत प्रमाणेच ४/५ पिढ्यांचा लेखाजोखा आहे . बाकी बराचसा परिचय पराग यांनी दिलेला आहेच .त्याच्याशी सहमत . बऱ्याच प्रसंगात पुरुषांपेक्षा स्त्रिया धाडसी निर्णय घेताना दाखवल्या आहेत.
thanks for reco...

अगदी कंटाळवाणे पुस्तक आणि कथानक >>>
अरेरे! एका सुंदर पुस्तकाचा भाषांतराने घात केला असं म्हणायला हवं. Sad
मूळ पुस्तकात मुलं प्रौढ बोलत नाहीत... किंबहुना भाषेचा लहेजा म्हणून मुलांचे संवाद आणि मनातले विचार वाचायला फार मजा येते.

Kill a mocking bird पुस्तक पक्कड घेऊ शकले नाही.
_____________________________
Ibis triology - Amitav ghosh मालिकेतलं तिसरं पुस्तक flood of fire वाचलं. अफू चीनमध्ये येऊच नये म्हणून सम्राटाचा एक अधिकारी परदेशी बोटींनी आणलेला अफू जप्त करून समुद्रात टाकतो. याबद्दल ब्रिटिश सरकार युद्ध करते आणि त्याची भरपाई म्हणून हॉन्गकॉन्ग आणि मकाव बंदरे आणि मोठी रक्कम मिळवते. त्याचा इतिहास. शिवाय ब्रिटिश लोक त्यांच्या बायका यांची प्रकरणं आहेत. आपले भारतीय लोक सैन्यात भरती केलेले त्या मोहिमेसाठी त्यांची अवस्था आहे. पहिल्या पुस्तकात Ibis बोटीवरचे सुटलेले पाच जण असे आता एकत्र येतात ते समजते. लेखकाने या सर्व कथानकासाठी उपयोगी पडलेल्या ,विविध लेखांची,टिपणांची, पुस्तकांची मोठी यादीच दिली आहे शेवटी. रंजक पुस्तक. पाच सहा कथानकं समांतर पुढे सरकवत ठेवण्याची लेखकांची हातोटी विलक्षण आहे.

Picasso - success and failure - readers and writers. या पुस्तकात पिकासो आणि त्यांच्या समकालीन चित्रकारांच्या चित्रांची तुलना आणि समीक्षा केली आहे. क्युबिझम, मॉडर्न आर्ट, पद्धतीची बरीच चित्रं आहेत. चित्रकला जाणकारांनी वाचावे.

To kill a mocking bird (1960)- Harper lee
या पुस्तकाबद्दल फार ऐकले होते. मराठी भाषांतर (२०२१)विद्यागौरी खरे यांचे मिळाले. -
अगदी कंटाळवाणे पुस्तक आणि कथानक. शिवाय लहान मुले किती अशक्य प्रौढ बोलतात. अशी पुस्तके मराठीत आणण्याचा हेतू काय>>

मूळ इन्ग्रजी पुस्तक वाचा. मनाची पकड घेणारे आहे. भाषांतरित पुस्तकांपासून थोडे सावधच असावे.

भाषांतराने घात केला. प्रौढ बोलत नाहीत, उलट इतके सिरियस विषय विनोदी अंगाने वेगळ्या दृष्टीने समोर येतात.
मला 'एका कोळियाने' पण असंच कृत्रिम वाटलेलं.

>>> अरेरे! एका सुंदर पुस्तकाचा भाषांतराने घात केला असं म्हणायला हवं
हो, अगदी! मूळ पुस्तकातले संवाद आणि एकूण नॅरेशन फार सहज आणि अकृत्रिम आहे.

मला 'एका कोळियाने' पण असंच कृत्रिम वाटलेलं. >> +१

मूळ पुस्तकातले संवाद आणि एकूण नॅरेशन फार सहज आणि अकृत्रिम आहे. >> +१

कायमचे प्रश्न : रत्नाकर मतकरी
(संपादन : मुकुंद कुळे), दुसरी आवृत्ती 2017

मतकरी यांच्या पूर्वप्रकाशित लेख आणि भाषणांचा हा संग्रह. पुस्तकाचे दोन भाग :
१. राजकीय-सामाजिक
२. साहित्यिक-सांस्कृतिक

पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेवरूनच त्याच्या गांभीर्याचा अंदाज येतो. “अप्रामाणिकपणाची चीड रक्तात रुजवणाऱ्या” आपल्या वडिलांना मतकरींनी हे पुस्तक अर्पण केलेले आहे.

त्यानंतरचे मुकुंद कुळे यांचे ‘समकालीन आणि सार्वकालिक’ हे प्रास्ताविक मार्मिक असून पुस्तकाची रूपरेषा स्पष्ट करते. मतकरी यांचे हे लेखन 1990 च्या दशकापासून सन 2015 पर्यंत झालेले दिसते. राजकारण आणि साहित्य क्षेत्रातील अनिष्ट प्रवृत्तीच्या विरोधात त्यांनी निर्भीडपणे परखड विचार मांडलेत. तसेच त्यांनी प्रत्यक्ष आयुष्यातही उघडपणे विशिष्ट सामाजिक-राजकीय भूमिका घेऊन विविध आंदोलनांमध्ये भाग घेतलेला होता. या कृतीशीलतेमुळे त्यांच्या शब्दांनाही एक प्रकारचे वजन आहे.

पहिल्या विभागातील पहिल्याच लेखाचे “महाराष्ट्र राज्य प्रायव्हेट लिमिटेड” हे शीर्षक पुरेसे बोलके आहे. साहित्यिक विभागातील “मुलांचा पुस्तकांशी अधिक निकट संबंध येईल?” हा लेख सर्वाधिक आवडला. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या झंझावातानंतर, ‘मुलांनी पुस्तके वाचली पाहिजेत का?’ असा एक प्रश्न उपस्थित केला जातो. त्यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. पडद्यावरती पाहणे आणि संथ विचार करीत वाचणे हे दोन अनुभव संपूर्णपणे भिन्न असल्याचे ते विशद करतात.

साधारणपणे पुस्तकातील एक तृतीयांश लेखन पुनरावृत्त झालेले आहे. तरीसुद्धा सुमारे 30 वर्षांपासून त्यांनी मांडलेले विविध ज्वलंत प्रश्न आजही तितकेच लागू आहेत. पुस्तक वाचल्यानंतर, खरंच हे सामाजिक प्रश्न कायमचेच राहतील का, असा उदास विचार वाचकाच्या मनात आल्यावाचून राहत नाही.

'एका कोळियाने' म्हणजे old man and the sea हे साधेसुधे वर्णन नसून रूपक आहे. आयुष्यातील लाभ मिळण्याची वेळ आणि त्याचा उतारा समजून घेण्यासाठी तशा काही प्रसंगातून जावे लागते. अन्यथा पुस्तकातील गोष्ट फक्त पाच ओळींतही सांगता येते.. भाषांतराला काहीच महत्त्व नाही. टु किल अ हॉकिंग बर्ड हे ज्या सामाजिक अस्मितेवर आधारले आहे ती आपल्याला अज्ञात आहे. त्यामुळेही ते समजत नाही. मराठीतले गारंबिचा बापू, शामची आई, कल्याणी वगैरे पुस्तकं त्या वेळचा कोकणपट्टीतला समाज कसा होता याची नोंद घेतात. थोडीफार हीच परिस्थिती इतर भाषिक राज्यांतही होती. शालेय जीवनात शामची आई वाचले तर भावनिक होते. आता तसे होत नाही.

टु किल अ हॉकिंग बर्ड हे ज्या सामाजिक अस्मितेवर आधारले आहे ती आपल्याला अज्ञात आहे. त्यामुळेही ते समजत नाही>>>> बरोबर. इंग्लिशमध्ये वाचतानाही संदर्भ माहित नसतील तर ‘टू किल’ हे किचकट वाटू शकते.

माधुरी शानभाग यांची ब्रेनवेव्हज ही छोटी कादंबरी वाचली . एक शास्त्रज्ञ लोकांचे विचार आपल्याला हवे तसे वळवण्याचं तंत्रज्ञान डेव्हलप करतो , त्याला त्याचा वापर करून जगातील सत्ता , ताकद ज्यांच्या हातात आहे त्यांचे विचार आपल्याला हवे तसे बदलून जगत्कल्याण साधायचं असतं . पण त्याचा सहकारी - ज्युनिअर बुद्धिमान असला तरी सामान्य विचारांचा माणूस असतो , तो त्या तंत्रज्ञानाचा वापर बायकांना आपल्या नादी लावण्यासाठी करतो ... आणि क्षुद्र आर्थिक लाभांसाठी ..

मूळ कल्पना कुठूनतरी उचलली असेल पण पोटेन्शल होतं , सामाजिक राजकिय खूप काही दाखवता आलं असतं , तर कौटुंबिक अँगलने गेली आहे . एक वरच्या दर्जाची कलाकृती होता होता राहिली .. त्यामुळे जरा निराशा झाली .. पण वन टाइम रीड / मनोरंजन म्हणून ठीक आहे ...

त्यांचा इंद्रधनुष्य हा कथासंग्रह सुरेख आहे .

भिलार हे पुस्तकांचं गाव काल बघितलं. खूप दिवसांपासून हे डोक्यात होतं.
पाचगणीपासून सात आठ किलोमीटरवर असल्याने पाचगणीला किंवा महाबळेश्वरलासुद्धा राहून भिलारला जायला सोयीस्कर आहेच, शिवाय भिलारमध्येही राहण्याची चांगली हॉटेल्स दिसली. आम्ही पाचगणीला उतरलो होतो. पुण्याहून सकाळी निघालो आणि अकरा-साडेअकराला भिलारला गेलो. सुरुवातीच्या घरात कादंबऱ्यांचं दालन दिसलं. घराचीच बाहेरची एक खोली पुस्तकांसाठी ठेवलेली असते. कपाटांमध्ये आणि रॅकमध्ये वगैरे पुस्तकं ठेवलेली असतात. बसायला खुर्च्या, बाकं, सोफा वगैरे आरामदायी सोय आहे. मी थोडा वेळ पुस्तकं नुसतीच बघितली. पुस्तकांमधे चांगली विविधता आहे. बरेचजण येऊन पुस्तकं हाताळत असतात, त्यामुळे लायब्ररीत किंवा पुस्तकांच्या दुकानात जसं व्यवस्थित वर्गीकरण केलेलं असतं तसं इथे तेवढं दिसलं नाही, पण ते ठीक आहे. तिथे मला 'पाडस' ही अनुवादित कादंबरी मिळाली. या पुस्तकाबद्दल खूप ऐकून असल्यामुळे मी ती घेऊन वाचायला बसले आणि गुंगून गेले. आमच्याशिवाय तिथे अजून कुणीच नव्हतं. घरातल्या माणसांचेही रोजचे व्यवहार सुरू होते. तास-दीड तासानंतर जेवणाची वेळ झाली. आमचा धाकटा मुलगा एव्हाना फारच कंटाळला होता. त्यामुळे पुस्तकातला फॉरेस्टर कुटुंबाच्या घरी रहायला गेलेला ज्योडी आपल्या घरी परत यायला निघाला आणि मीही नाईलाजाने पुस्तक ठेवून उठले. आता लायब्ररीतून हे पुस्तक मिळवावं लागणार. Happy
जेवण झाल्यावर असं ठरवलं की गावाच्या शेवटपर्यंत चक्कर मारू आणि मग परत येताना एकेक विभागात शिरू. इतिहास, स्त्री-साहित्य, लोकसाहित्य असे एकंदरीत आठ-दहा तरी विभाग दिसले. आम्ही मग कथा विभागात शिरलो. इथेही पुस्तकांमधली विविधता जाणवली. वि.वा. शिरवाडकरांचा 'सतारीचे बोल' हा एक कथासंग्रह वाचायला घेतला. तेवढ्यात पाऊस पडायला लागला. आता पाऊस थांबेपर्यंत काही बाहेर पडायला लागणार नाही याचा आनंद झाला.
कुसुमाग्रजांच्या कवितांच्या अनेक ओळी जशा दिपवून टाकणाऱ्या असतात तशीच त्यांच्या गद्य लेखनातही अशी वाक्यं सापडतात. या पुस्तकात मला सापडलेलं असंच एक वाक्य म्हणजे "युद्धात पहिली जखम सत्याला आणि प्रेमात पहिली जखम विवेकशक्तीला होते." Proud
दोन कथा वाचून झाल्या. मग मी मधुकर धर्मापुरीकरांचा एक कथासंग्रह वाचायला घेतला. एक कथा वाचून झाली आणि पाऊस थांबला. Happy आता संध्याकाळही झाली होती, त्यामुळे आम्ही भिलारचा निरोप घेऊन निघालो. पण परत एकदा, जास्त वेळ काढून इथे नक्की यायला पाहिजे असं वाटतंय.

लंपन

सोनी लिव्ह संतांच्या पुस्तकांवर सिरीज घेऊन येणार आहे असे कळले.
डायलॉगसाठी एका बेळगावकर मित्राला विचारले गेले होते.

त्याने ओरिजिनल फ्लेवर तसाच ठेवायचा आग्रह धरला, परंतु सोनी लिव्हवाल्यांना डायलॉग्स पुलंच्या "रावसाहेब" छाप बुलशीट पुणेकरांच्या मनातले बेळगावी पाहिजे आहेत असं कळलं. त्यामुळे मित्राने नकार दिला व सिरीजचा गाभाच काढला जाईल असा इशारा दिलाय.

आता ही सिरीज आलीच तर काय वाट लावतील ते पाहावं लागेल.

Submitted by रॉय on 26 May, 2022 - 20:59
<<<≤<<<<<<<<<

असंच केलय का निपुणच्या लंपन सीरीज मध्ये

वावे, मस्त अनुभव. मी पाहिलंय भिलार. खूप उत्सुकता होती म्हणून अगदी धावती भेट दिली होती. कन्सेप्ट छान आहे पण कितीजणांपर्यंत पोहचते कळत नाही.

रच्याकने, पाचगणीजवळच 'देवराई' नावाची ओतीव धातुकाम आदिवासी मुलांना शिकवणारी संस्था आहे. ती ही आवर्जून बघण्यासारखी आहे. छोटीच आहे पण कलाकृती सुंदर आहेत. त्याची कार्यशाळा आणि त्यात ती मुलं बनवत असलेल्या गोष्टी बघता येतात.

मुंबईहून ऑटोरिक्षाने जाताही येणार नाही आणि Wink Light 1
मुंबई महाबळेश्वर एसटी असते. भिलारला जाणारीही एसटी पाचगणी किंवा महाबळेश्वरहून असणारच. भरपूर रहदारी होती भिलारला.
अमित - जादुई दुनिया खरंच! कितीही वेळ बसा, कितीही पुस्तकं वाचा.
मामी, 'देवराई' नावाच्या जाहिरातीच्या पाट्या दिसल्या खऱ्या.

पुस्तकांच्या गावाला किती प्रतिसाद मिळतो माहिती नाही. मिळतही असेल चांगला, कारण पुस्तकांची व्यवस्था वगैरे चांगली ठेवलेली दिसली.
तिथे जर तीन-चार दिवसांची एखादी व्याख्यानमाला किंवा मुलाखतमाला ( डीएसके गप्पा असायच्या तशी) किंवा लेखन कार्यशाळा असे काही कार्यक्रम ठेवले, तर लोक तीन चार दिवस काढून किंवा त्यातल्या एखाद्या दिवसासाठी येतील, दिवसभर पुस्तकं वाचायची आणि संध्याकाळी कार्यक्रम.
(हे ऑलरेडी होत असेल तर माहिती नाही, पण कधी कानावर नाही आलेलं. ) संकल्पना अतिशय छान आहे, ती जास्तीत जास्त यशस्वी झाली पाहिजे. मला वाटतं कोकणात अजून एक असं पुस्तकांचं गाव होणार/ झालं आहे..

पुस्तकांच्या गावाला किती प्रतिसाद मिळतो माहिती नाही. मिळतही असेल चांगला, कारण पुस्तकांची व्यवस्था वगैरे चांगली ठेवलेली दिसली.
तिथे जर तीन-चार दिवसांची एखादी व्याख्यानमाला किंवा मुलाखतमाला ( डीएसके गप्पा असायच्या तशी) किंवा लेखन कार्यशाळा असे काही कार्यक्रम ठेवले, तर लोक तीन चार दिवस काढून किंवा त्यातल्या एखाद्या दिवसासाठी येतील, दिवसभर पुस्तकं वाचायची आणि संध्याकाळी कार्यक्रम. >>>> उत्तम कल्पना.

(हे ऑलरेडी होत असेल तर माहिती नाही, पण कधी कानावर नाही आलेलं. ) संकल्पना अतिशय छान आहे, ती जास्तीत जास्त यशस्वी झाली पाहिजे. >>> खरंय

मुंबईत मॅजेस्टिक आणि शब्द यांच्या गप्पा असतात आणि जोडीला पुस्तक प्रदर्शन आणि विक्री. मॅजेस्टिक गप्पा पार्ल्याला टिळक सभागृह . हे मी किमान कॉलेजात असल्यापासून आहे. शब्द गेल्या दहा बारा वर्षांतलं असावं.
या प्रदर्शनांमुळे त्यांच्या न खपणार्‍या पुस्तकांना हवा मिळत असेल. मला काही कवितासंग्रहांच्या पहिल्या / जुन्या आवृत्त्या मिळाल्या.
मॅजेस्टिक गप्पांना एकदाच गेलो होतो. शब्द फक्त पुस्तक प्रदर्शनाला.

भिलारला घरात पुस्तके ठेवणार्‍यांना त्याचा काही आर्थिक लाभ होतो का? म्हणजे जोडीला खानपानाची व्यवस्था करून त्यातून अर्थार्जन? की सरकारकडून काही अनुदान?

हल्ली गावाकडे पंचवीस ते पन्नास रु किमी दराने ओटो रिक्षा असतात. आठ किमी जाऊन येऊन परवडणारे नाही. जर का पाचगणी ते महाबळेश्वर (१९ किमी)मुख्य रस्ता सोडून भिलार कुठे असेल तर ओटोशिवाय पर्याय नाही.
आमच्या स्थानिक नगरपालिका वाचनालयातून सर्वच पुस्तके मिळवून घरी नेता येतात. रु २०/ महिना. त्यात कमीतकमी पंधरा वाचतो. इंग्रजी पुस्तके इतर साईटवरून डाउनलोड करतो.
पण एकूण प्रकल्पाला शंभर गुण. शिवाय थंड हवेचाही फायदाच.

भिलारला घरात पुस्तके ठेवणार्‍यांना त्याचा काही आर्थिक लाभ होतो का? म्हणजे जोडीला खानपानाची व्यवस्था करून त्यातून अर्थार्जन? की सरकारकडून काही अनुदान? हे दोन्ही आहे माझ्या माहितीनुसार. सरकारकडून दरमहा काही रक्कम मिळतेच आणि गावात पर्यटक आल्यामुळे इतरही मार्ग (चहा-नाश्ता-जेवण-राहणे-वाहतूक) निर्माण झाले आहेत.
Srd, इथे त्या अनुभवाची गंमत आहे. पुस्तकं इतरत्रही मिळतातच.

हं. चांगलं आहे. माझा मामेभाऊ सपत्नीक तिथे जाऊन आला आहे. त्यांनाही तो अनुभव आवडला.

Pages