भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माया कॅलेंडरचा २१ जून अजून उजाडला नाही. >> माया कॅलेंडरमध्ये यंदा दोन-चार अधिक मास आहेत म्हणतात.

ग्रहणाच्या वेळी परातीत पाणी घालून त्यात मुसळ उभं केलं तर ते उभं राहतं आणि ग्रहण संपलं की आपोआप खाली पडतं अशा अर्थाच्या भोंदू मेसेजेस आणि व्हिडिओंंचा सुळसुळाट झाला होता रविवारी.
पण अंनिसने सांगलीत सोमवारी परातीत पाणी घेऊन त्यात मुसळ उभं करून दाखवून दिलं की हे एरवीही घडू शकतं. याचा ग्रहणाशी काहीही संबंध नाही.

अर्थात थोडा विचार करणाऱ्या कुणालाही हे कळेल. पण लोक काय काय थिअरीज लढवत होते. मुसळाला असलेली लोखंडी रिंग, त्या एवढ्याशा रिंगवर होणारा पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीचा परिणाम, मुसळाच्या लाकडी भागावर होणारा चंद्र आणि सूर्याच्या एकत्रित गुरुत्वाकर्षणाचा परिणाम (!!) आणि त्यामुळे म्हणे balance साधला जातो आणि ग्रहण सुटलं की हा balance बिघडतो आणि मुसळ पडतं Happy

1E0B36B.jpg

ऑ,
मुसळ ला मोठा पसरट बेस असेल तर उभे राहिल, खाली निमुळता बेस असेल तर पडेल
मी तर ही ग्रहण आणि मुसळ थिअरी पहिल्यांदा वाचतेय.

मुसळाचा बेस निमूळता नसतो. तो सपाट असतो आणि लोखंडाच्या अगदी जाड पत्र्याने आच्छादलेला असतो. त्यामुळे तळाचा भाग जड होऊन गुरुत्वामध्य खाली सरकण्यास मदत होते, मुसळाची उंची त्याच्या रुंदीपेक्षा बरीच जास्त असली तरी.

त्या व्हॉट्सअ‍ॅप पोस्ट्स मधे "स्पर्श आणि मोक्ष यातील चुंबकीय शक्ती" चा उल्लेख आहे. अंनिस ने त्याला हात लावायचे डेरिंग न केल्याने त्यांचा खोटेपणा (व हिंदूविरोध ई) उघड होत आहे.

काही स्पर्शांमधे force of attraction तर काहींमधे force of repulsion असते(*) . कारण चुंबकीय ध्रुव कोणता आहे त्यावर ते अवलंबून असते. त्यामुळे असे काही होते काय हे विचारायला गेलो व फॉरवर्ड करणार्‍याला विचारत गेलो तर किमान दहा जणांपर्यंत "forwarded as received" असल्याने ते कळू शकले नाही.

(*) मराठी प्रतिशब्द माहीत नाही. सायन्स इंग्रजीतून होते. पाखंडी काँग्रेस सरकारने....

Happy ही अंधश्रद्धा पसरवण्यामागे "दुसर्‍याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण आपल्या परातीतील मुसळ दिसत नाही" अशी मंडळी असणार...
(बाकी मानवजातीत पहिल्यांदा ज्यांनी उखळीतून मुसळ काढून ते परातीत उभ राहतं का असं बघायचा उपद्व्याप केला त्यांना दंडवत. का केलं असेल असं ग्रहणात?)

मला अशी एक शक्यता वाटते, की ग्रहण हा अनिष्ट काळ मानत असल्यामुळे त्यापासून घराचं रक्षण करण्यासाठी वगैरे घरासमोर मुसळ ठेवण्याची पद्धत पडली असेल.
आता मुसळच का, ते माहिती नाही.
तांब्याच्या परातीत हळदीचं पाणी असं एक व्हेरिएशन आहे यात.

ही मूळ पोस्ट
पुर्वी ग्रहण काळात परातीत पाणी भरुन त्यात असा मुसळ उभा करत असत. पण आता वैदिक धर्माचा -हास होत चालल्यामुळे हे आता पाहण्यास मिळत नाही. पण वीस वर्षापुर्वी ग्रहणात हा प्रकार ब-यास घरात पाहण्यास मिळत असे. पण यांचे मुख्य कारण जादुटोणा किंवा शक्ती हे नाही ह्याला कारण आहे गुरुत्वाकर्षण चुंबकीय शक्तीने होते. यांचे कारण पण कळवतो. पृथ्वी, चंद्र, व सुर्य हे एका रेषेत येतात त्या घटनेला आपण ग्रहण म्हणतो पण खंरे कारण पृथ्वी व सुर्याच्या मधे चंद्र येतो व त्याची सावली सुर्यावर पडते म्हणुन त्याला ग्रहण म्हणतात व हे फिरते असल्याने सावली वाढत वाढत जावु कमी होते व ते कारण आहे स्पर्श व मोक्ष पण यात जी चुंबकीय शक्ती आहे त्याने जे गुरुत्वाकर्षण आहे पृथ्वीच्या मध्यामाकडे ओढली जाते तर मुसळाचा लाकडी दांडा सुर्य व चंद्र यांच्या कडे आकर्षित होतो त्यामुळे जो पर्यत पृथ्वी, चंद्र व सुर्य एकाच रेषेत येतात तोच पर्यत तो मुसळ उभा राहतो. जेव्हा ते आपले स्थान बदलतात तेव्हा तो मुसळ कोसळतो.

ही अजून एक

आजच्या सूर्यग्रहाणाविषयी. जुनी संस्कृती अधिक आधुनिक होती. #आदिवासी परंपरेनुसार ताटात मुसळ उभे करून सूर्य ग्रहण पहाताना. #आदिवासींना गुरुत्वाकर्षणाची संकल्पना अनुभवाने माहिती होती. पृथ्वी, चंद्र व सुर्य एका रेषेत येतात त्यामुळे मुसळाची #लोखंडी #सांब पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने व चुंबकीय शक्तीने पृथ्वीच्या मध्याकडे ओढली जाते तर मुसळाचा #लाकडी दांडा सुर्य व चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षणाने त्यांच्याकडे आकर्षित होतो. त्यामुळे जोपर्यंत पृथ्वी, सूर्य, चंद्र एका रेषेत म्हणजे ग्रहस्थितीत असतात तोपर्यंत मुसळ उभा राहतो परंतु पृथ्वी स्वतःभोवती व सुर्या भोवती फिरत असल्याने लवकरच हे तीनही खगोल आपापले स्थान बदलून रेषेबाहेर जातात त्यावेळी गुरुत्वाकर्षण व चुंबकीय शक्ती ची रेष बदलल्याने मुसळाचे संतुलन बिघडून तो खाली पडतो. समुद्रात भरती ओहोटी सुद्धा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे होत असते.

फोटोही होते.

<पृथ्वी व सुर्याच्या मधे चंद्र येतो व त्याची सावली सुर्यावर पडते >

यांच्या आकशगंगेत पृथ्वी प्रकाश देते का?

Lol नो नो, यशोदेने कृष्णाला उखळाशी बांधल्याची गोष्ट ऐकली असेल की. टॉडलर इतकं उंच म्हणजे उखळ जर एक-दोन फूट आहे हे माहिती असेल तर मुसळ तीन-चार फूट उंच हे माहिती असणार की... Lol उखळ-मुसळ टुगेदर इज खलबत्ता ऑन स्टेरॉईडस....
उखळ मुसळ नेहमी घरासमोर अंगणात/ओसरी/पडवी इ येथे असते, सहसा घरात घेत नाहीत कारण जड असतं.

थेट डोळ्यांनी ना पाहाता परातीतल्या हळदीच्या पाण्यात ग्रहणाचे प्रतिबिंब पाहण्याची पद्धत होती.
ग्रहणकाळात मुसळाला बडवण्याचीसुद्धा पद्धत होती.
एखादे फळझाड फळे धरत नसेल तर ग्रहणकाळात निर्वस्त्र माणसाने त्या झाडाला काठीने फटकावण्याची पद्धत होती. अर्थात हे काम लहान मुलांकरवी करून घेतले जाई.
गरोदर बायकांच्या तर सूर्याचा एकही किरण अंगावर पडता नये होता. म्हणून त्या खिडक्या तावदाने काळ्या कपड्याने झाकून कडेकोट बंदोबस्तात एका खोलीत स्वत:ला कोंडून घेत असत. जर ग्रहण काळातला एकही प्रकाशकवडसा अंगावर पडला तर गर्भातल्या मुलात पुढे व्यंग निर्माण होते अशी समजूत होती आणि आजही ती तितकीच दृढमूल आहे, कसोशीने पाळली जाते.
चंद्राने सूर्याला झाकून टाकण्याच्या सुरुवातीचा क्षण, म्हणजे सूर्यप्रकाश अडवण्यास सुरुवात करण्याची वेळ हा ग्रहणस्पर्शकाल असतो आणि सूर्य- चंद्र-पृथ्वी सरळ रेषेतून पूर्ण बाहेर सरकून पूर्ण सूर्यबिंब दिसू लागण्याचा क्षण हा ग्रहणमोक्षकाल असतो. ग्रहण स्पर्श आणि ग्रहणमोक्ष ह्या दोन्ही वेळा पंचांगात ठळकपणे दिलेल्या असतात कारण या कालावधीत काही नियम पाळायचे असतात. मला आठवते वीस पंचवीस किंवा त्याहून अधिक वर्षांपूर्वी खग्रास सूर्यग्रहण झाले होते. भारतातून दिसणारे खग्रास ग्रहण बऱ्याच कालावधीनंतर आले होते तेव्हा मोक्ष झाल्यानंतरच्या स्नान, गृहशुद्धी, भांडीकपडे धुणे, ग्रहणकाळातले पाणी ओतून टाकून पुन्हा 'नवे' पाणी भरणे इत्यादीसाठी मुंबई महापालिकेने ग्रहण संपल्यावर अतिरिक्त पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली गेली होती आणि महापालिकेने अधिकचे पाणी दिलेही होते!

साधारण २५ वर्षांपूर्वी सूर्यग्रहणाच्या वेळी लोक ते सुटल्यावर अंघोळी करून लंचटाइमनंतर हापिसात आले होते असं आठवतं.
आणि ते अधिकृतपणे चाललं होतं.
WTC च्या २९ व्या मजल्यावरून ग्रहण पाहायची उत्तम संधी होती.
पण जवळ कोणतंही साधन नव्हतं म्हणून राहून गेलं.

तेच मी शाळेत असताना झालेल्या सूर्यग्रहणाच्या वेळी बऱ्यापैकी सायंटिफिक वातावरण होतं.
ग्रहण बघण्यात लोकांना इंटरेस्ट होता.
वर्गातला एक मुलगा खग्रास ग्रहण बघायला बंगलोरला की कुठे गेला होता.

२५ वर्षांपुर्वी मी शाळेत होतो, सो माझ्या आजुबाजूला तेव्हा एकदम सायंटिफिक वातावरण होतं. पिन होल कॅमेरे केलेले. टीव्हीवर लाईव्ह दाखवत ही होते. शेजारी कुणाकडे काळी काच (आता नक्की काय ते आठवत नाही) होती. त्यातुनही पाहिलेलं आठवतं. कुणीही बघू नका चा सूर लावलेला काही आठवत नाही. का अंघोळी करण्याचा ही.

हीरा, म्हणजे हे परात-मुसळ कॉम्बो यासाठी ठेवलं जायचं का घरासमोर? परातीतल्या पाण्यात सूर्य पहायचा आणि ग्रहण लागलं की मुसळाला बडवायचं Happy

हो, ९५ की ९६ सालचं ग्रहण ना? मीही तेव्हा शाळेत होते आणि आमच्या नात्यातल्या एकांनी ग्रहण पहायचे चष्मे दिले होते. ते स्वतः मला वाटतं भरतपूरला की कुठे तरी गेले होते खास ग्रहण पहायला.

खरा इंटरेस्टिंग पार्ट मुसळ नेमकं ग्रहण संपल्यावर पडतं (ग्रहणकाळात उभं रहातं) असा आहे. अनिस ने तोहि मुद्दा सप्रमाण खोडला का?..

बाकी मानवजातीत पहिल्यांदा ज्यांनी उखळीतून मुसळ काढून ते परातीत उभ राहतं का असं बघायचा उपद्व्याप केला त्यांना दंडवत. >>>>>
Rofl Rofl सीमंतिनी

>>मुसळ नेमकं ग्रहण संपल्यावर पडतं हे मुळात कुणी सप्रमाण सिद्ध केलंय?<<
हे सप्रमाण सिद्ध केलं कि नाहि याची कल्पना नाहि, पण मूळ दाव्यात ते लिहिलंय म्हणुन - "ग्रहणाच्या वेळी परातीत पाणी घालून त्यात मुसळ उभं केलं तर ते उभं राहतं आणि ग्रहण संपलं की आपोआप खाली पडतं"

वरच्या अनिसच्या बातमीत मुसळ कधी पडलं (आधी, नंतर, केरात गेल्यावर) याचा उल्लेख मीच मिस केला काय?.. Lol

आजही 70- 75 % जनतेमध्ये ह्या अपसमजुती आहेत. गुजराती, जैन, उत्तरप्रदेशी, राजस्थानी, दक्षिण भारतीय यांच्यामध्ये प्रकर्षाने आहेत. आजही ग्रहणकाळात मुंबईतील चौपाटयांवर शुकशुकाट असतो. तिथे टाचण्या, लिंबे, काळ्या बाहुल्या वगैरे प्रकार अनेक जागी दिसतात. पाणी ओतून टाकण्याचे आणि त्या वेळापुरते पाणी न पिण्याचे नियमही पाळले जातात. आपल्याकडेही कष्टकरी वर्गात ग्रहणाविषयी भीती आणि पापक्षालनाची लगबग दिसते. विज्ञानाचा प्रसार वाढत असला तरी अगदी संथगतीने वाढत आहे.

तेच तर, कष्टकरी वर्ग वगैरे काही नाही. इथे बंगलोरला गच्चीवर ग्रहण बघायला फक्त आम्ही आणि अजून एक मराठी कुटुंब होतं. बाकी सगळे चिडीचूप घरात. मराठी कुटुंबही सकाळीच स्वैपाक आटपून आलं होतं.
आणि हे मुसळाचे व्हिडिओ फॉरवर्ड करणारे चांगले सुशिक्षित मध्यमवर्गीय वगैरे वगैरे असतात.

Pages