अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा आईला आलेला अनुभव.

गोष्ट आहे डांग जिल्ह्यातली. गळकुंड नावाच्या गावची. आईच्या वडिलांचे वडिल फॉरेस्ट खात्यात. हत्त्तिणीने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याने मेडिकलचं शिक्षण घेत असलेल्या आजोबांना घर चालवायला शिक्षण सोडून फॉरेस्ट खात्यात नोकरी धरावी लागली. सुरुवात झाली रेंजर म्हणून. पुढे लग्न झाल्यावरही बदल्यांचं सत्र चालूच होतं. अशीच एक बदली झाली गळकुंडला. आजी, तिसरीतली माझी आई, माझी मधली मावशी असं सगळं कुटूंब सोबत आलं. दोन वर्षं झाली असतील नसतील. सगळ्यात धाकट्या मावशीचा जन्म झाला. तिला घेऊन हॉस्पिटलमधून माझी आजी घरी आली. आणि एक-दीड महिन्यात तो प्रसंग घडला.

आधी बंगल्याची रचना, निदान तो प्रसंग घडला त्या भागापुरती तरी सांगावी लागेल. हे सगळे लोक झोपायची ती बेडरूम. त्या बेडरूमचा एक दरवाजा दुसर्‍या खोलीत उघडायचा. ह्या दुसर्‍या खोलीला एक खिडकी, तिला गज होते आणि ती रात्री दोरी लावून बंद करत असत कारण त्यातून मागे एकदा एक फुरसं आत आलं होतं, आजीने बेडरूमचा दरवाजा बंद करताना ते मध्ये सापडलं. पण त्याची शेपटीकडची बाजू आजीच्या पायाजवळ आणि तोंड दरवाज्यापलिकडे असल्याने ती बचावली होती. असो. ह्या खोलीच्या डाव्या बाजूस देवघरात उघडणारा दरवाजा तोही रात्री बंद करत. उजव्या बाजूस किचन. त्या किचनची खिडकी आणि किचनमधे उघडणारा दरवाजा रात्री बंद केला जात असे. थोडक्यात काय तर त्या खोलीतून उघडणारे तिन्ही दरवाजे रात्री बंद असत आणि गज असलेली खिडकी दोरी लावून बंद असे. छपरावर मंगलोरी कौलं.

तर एका रात्री हे सगळे गाढ झोपले असताना खडबडून जागे झाले. बघतात तो काय! बेडरूम आणि ती खोली ह्यांना जोडणारा तो दरवाजा - जुन्या काळी साखळीच्या कड्या असत तशी कडी लावून बंद केलेला - जोरजोराने वाजायला लागला होता. नुसता वाजत नव्हता तर कोणाला खोलीत कोंडलं असेल आणि ती व्यक्ति बाहेर यायचा प्रयत्न करताना तो ढकलेल तसा तो ढकलला जात होता. आजीची पाचावर धारण बसली. आजोबांचा भूतखेतं ह्या गोष्टीवर विश्वास नसल्याने त्यांनी 'कोण आहे?' असं विचारायला सुरुवात केली. पण काही उत्तर आलं नाही. ते दरवाजा उघडून जायला निघाले होते पण आजीने त्यांना जाऊ दिलं नाही. मध्येच कधीतरी उठून तिने साखळीच्या कडीमध्ये एक पहार उभी रोवून साखळी तुटणार नाही अशी व्यवस्था केली. सुमारे पंधरा मिनिटं हा प्रकार चालू होता. मग सगळी सामसूम झाली. त्या रात्री हे लोक झोपले नाहीत.

दुसर्‍या दिवशी सकाळी दरवाजा उघड्ला तर आतले सगळे दरवाजे बंद, खिडकी बंद. कामावर आलेल्या गड्याने हा प्रकार ऐकून कौलं तपासली. पण ती काढल्याचं काहीही चिन्ह नव्हतं. तिथे आधीच्या साहेबांकडे काम करणार्या गड्याकडे चौकशी केली पण त्याने आधी असं काही घडल्याचं ऐकलं नव्हतं असं सांगितलं. पुन्हा हा प्रकार कधीही घडला नाही. हे लोक तिथे सहा महिने राहिले होते. मग पुन्हा बदली झाली. आई तेव्हा तिसरीत असल्याने तो दिवस अमावास्येचा होता की काय एव्हढं तिला आठवत नाही.

हे सगळं झाल्यावर आठ दिवस आजीने काहीच केलं नाही. पण पुढे शेजार्‍यांना हा प्रकार कळल्यावर त्यांनी दरवाज्यावर देवाचे फोटो लावायला सांगितले. तिथे असलेल्या डांगी आदिवासी लोकांनी, शाळेतल्या शिक्षकांनी काय काय उपाय सुचवले. आजीने ते सगळे केले. आजोबांच्या नकळत भगताला बोलावून धाकट्या मावशीत काही दोष नाही ना ह्याची चाचपणी झाली. त्याने परातीत तांदूळ ठेवून सर्व नीट असल्याचं सांगितलं. ते तांदूळ पण कुठेतरी पुरले म्हणे.

माझा प्रश्न असा की ह्यामागचं सायंटिफिक स्पष्टीकरण काय असावं? एखादा प्राणी आला असता तर तो सकाळी दिसला असता. तो आधी येऊच शकला नसता कारण खिडक्या बंद होत्या. त्याच कारणाने वार्‍याने दरवाजा ढकलला गेला हेही स्पष्टीकरण देता येत नाही. कौलं जागच्या जागी होती त्यामुळे हे काम माणसाचं असू शकत नाही. धाकट्या मावशीचा जन्म नुकताच झाला असल्याने poltergeist असावं अशी माझी थिअरी आहे. ह्या शक्ती जन्म किंवा मृत्यूनंतर अ‍ॅक्टिव्ह होतात असं ऐकून आहे. पण असं असेल तर नंतर काही का घडलं नाही? मुळात शेजारच्या खोलीत देवघर असताना हे कसं घडलं?

माझ्या मावस बहिणी बाबत घडलेला किस्सा ..

तिचे सासरे जाऊन जवळपास २ महिने झाले होते ... आणि एकदा ते तिच्या स्वप्नात आले आणि म्हणाले कि मी परत येतोय तेव्हा सगळ्यांनी तयारी करा. ती स्वप्नातून खाडकन जागी झाली आणि तिने आपल्या नवऱ्याला सांगितले. तो एकदम नास्तिक आहे आणि त्याने तिचे खिल्ली उडवली आणि हे सगळे मनाचे खेळ आहेत असे म्हणून दुर्लक्ष केले. माझी बहीण गर्भवती असल्याचे तिला साधारण १५ दिवसांनी समजले व डॉक्टरांनी पण कन्फर्म केले. सगळे सोपस्कार पार पडून ती सुखरूप बाळंत पण झाली आणि तिला मुलगा झाला. त्याची चेहरा पट्टी बरीचशी तिच्या सासर्यांशी जुळते ...

आता याला काय म्हणावे ...

हे अमानवीय नाही पण सध्या पक्षमास वगैरे आहे त्यामुळे सतत मनात येत होते की माझ्या बाबांसाठी काही दक्षिणा, दान काहीतरी करावे. साबा पण मागे लागल्या होत्या तु एकटी मुलगी काहीतरी करत जा वडिलांच्या श्राद्धाचं.. पण कळत नाही इकडे काय करू? खीर, वडे असल्या गोष्टींवर माझा विश्वास नाही. देवळात अन्नदानासाठी मदत करावी असं मनात येत होतं पण समहाऊ जमले नाही आता नवरात्र बसायची वेळ आली तर काल परवा बाबाच स्वप्नात आले. खूप तोल जातायत झोप येतेय असं काहीतरी म्हणत होते आणी मी त्यांच्यासाठी झोपायला जागा शोधतेय असं काहीसं दिसलं. एक मेडिटेशन / प्रेयर रूम दिसली बहुधा आम्ही कोणत्या तरी स्टेशनवर होतो तिकडे मी म्हटले इथे प्रार्थना करतात तुम्हाला झोपू देणार नाहीत.
पुढे जाग आली. काय संबंध आहे सगळ्याचा माहित नाही.

अंजली_१२
तुला योग्य वाटेल अश्या ठिकाणी देणगी दे.
शक्यतो अन्नदान कर.

तुला मेडीटेशन रूम दिसली म्हणून सांगतो. आपण जे मेडीटेशन करतो त्याची आपल्या पितरांना सद्गती मिळायला मदत होते.
तेव्हा मेडीटेशन शिकून घे.

अंजली, अनेकदा आपल्या अंत्र्मनात जे चालू असतं ते आपल्याला स्वप्नात दिसतं. बाबांचा विचार तुझ्या डोक्यात नसेल तरी मेंदूने कुठे तरी रजिस्टर करुन ठेवलेला असतो.

माझी आजी गेली तेंव्ह अमी एका मुलासोबत कमिटेड होते , घरी माहित होतं सगळं , लग्न करणार होतोत वगैरे.

आजीच्या आजारपणात मी तिथे नव्हते आणि त्याने आई - बाबांना कुठलीही मदत केली नव्हती. समहाऊ त्याकाळात मी पुढे कसं होणार, हा सांभाळणार का माझ्या फॅमेलीला असे विचार येत होते.

आजीच्या दहाव्याला आजी माझ्या स्वप्नात आली आणि मला सांगितलं की या मुलाशी लग्न करु नको, तुला फार चांगला मुलगा मिलेल जो तुझी आणि तुझ्या आई-बाबांची काळजी घेईल....
मी त्या स्वप्नाकडे स्वप्न म्हणुन्च पाहिलं आणि सोडुन दिलं पण माझ्या मनाने जे रजिस्टर केलेलं ते चांगलंच लक्षात ठेवलं..

मला वाटत आपण सारासार विचार करावा या गोष्टींचा.

अर्थात बाबांच्या नावाने अन्नदान करण्यात वाईट काहीच नाही तेंव्हा गो फॉर इट!

@अंजली१२, श्रद्धापूर्वक बाबांच्या नावानं मनातल्या मनात त्यांना सांगून कुठेही अन्नदान करून टाका.

धन्यवाद मंडळी! आजच मंदिरात जाऊन आले जिथे अन्नदान चालते. यथाशक्ती देणगी दिली. खूप हुरुप आला तुमच्या मेसेज मुळे.

अन्नदान श्रेस्थ दान आहे. पितरांसाठी नक्कीच करावे. पण त्यबरोबरच आपण पुण्य संचय करण्यासाठी ही करावे

अंबरनाथ बदलापूरच्या मध्ये DMART आहे. अगदी एकाकी ठिकाणी आहे.
पुर्वी तिथे स्मशान होतं अस म्हणतात. तिथे चित्रविचित्र अनुभव येतात.
कोणाला माहीत आहे का?

"काय भुतं येतात का शॉपिंगला?"
माहीत नाही येतही असतिल
मित्र परवा सांगत होता पण लोकांना अनुभव आलेत. कसले अनुभव ते नाही सांगितल.
खुप एकाकी जागा आहे या मॉलची

Praj_n>>> ट्रेनने कर्जतला जाताना आपल्या ऊजव्या बाजुला (ईस्ट) अंबरनाथ अन बदलापुरच्यामध्ये डी मार्टची एकाकी ऊभी वास्तु दिसते.

मला वाटते तीथे एक नविन रेल्वे स्टेशन पण करणार आहेत चिखलोली नावाचे

आताच माझ्या मित्राने सांगीतलेली २९ तारखेची घटना.

मंथेंड असल्याने रात्री उशिरा ची कल्याणला जाणारी ट्रेन पकडली होती, जवळपास बारा वाजत होते अन दुसर्या दिवशी दसरा असल्यमुळे ट्रेन मध्ये बिल्कुल गर्दी नव्हती.
ट्रेन जेव्हा पारसिक बोगद्यातुन बाहेर आली तेव्हा दरवज्याजवळ दोन जण गप्पा मारत ऊभे होते त्यातील एकाने हसता हसता. अचानक काहिही कळायच्या आधी धावत्या लोकलच्या बाहेर उडी मारली.
सगळे नजरेसमोर घडले तरी कोणीही काही करू शकले नाही.
त्या माणसाच्या मित्रालाही कळले नाही की हे असे का घडले.

मुंबईहून कोकणात जाताना पेणच्या पुढे वडखळनाका लागतो. वडखळ नाक्याची ही गोष्ट मी ऐकलेली आहे. सारस्वत बँकेतील काही अधिकारी एकदा गाडीने चालले होते. रस्त्यात त्यांना एक बाई गाडी थांबवा (लिफ्ट मागणे) असे सांगू लागली पण ड्रायव्हरला माहित होते त्याने लक्ष दिले नाही.
तेव्हा एकजण त्या ड्रायव्हरशी हुज्जत घालू लागला की 'अरे इतक्या रात्री, निदान विचारायचं तरी तिला काय हवं ते? तिला मदत हवी असेल.'
ड्रायव्हर म्हणाला, "साहेब हे प्रकरण तुम्हाला वाटतं तसं नाहीये. तिला नाही, आपल्यालाच मदतीची गरज आहे. बाहेर बघा."
खिडकीबाहेर बाई गाडीच्या वेगात बाजूने चालत होती

टीप : मी स्वतः काही तिथे गेलेलो नाही परंतु २-३ लोकांकडून हा किस्सा ऐकलं म्हणून share करतोय Happy

"मंदा पाटणकर" विषयी थोडे गुगल केले आणि काही वेबसाईट्सवर त्रोटक माहिती उपलब्ध आहे त्यावरून जे मला कळले ते इथे एकत्र करून मांडत आहे. खरेखोटे माहित नाही:

साधारणपणे पन्नासएक वर्षांपूर्वी घडलेली घटना आहे. मंदा पाटणकर हि तत्कालीन एका कस्टम अधिकाऱ्याची पत्नी होती. ती एकदा मुंबईत उपनगरीय रेल्वेत फर्स्टक्लासने प्रवास करत होती (वेळेचा उल्लेख सापडत नाही पण नक्कीच अवेळ असावी). ट्रेनला अत्यंत तुरळक प्रवासी होते व त्या डब्यात तर ती एकटीच होती. उपनगरीय भागातून ट्रेन जात असताना एका स्थानकावर, जिथे शक्यतो कोणीही चढत किंवा उतरत नाही, एक प्रवासी ट्रेनमध्ये चढला. ट्रेनने गती जशी पकडली तसा हा प्रवासी तिच्या डब्यात आला आणि हळूहळू तिच्याकडे येऊ लागला. काही मिनिटातच झटापटीला सुरवात झाली आणि त्याने असंख्यवेळा सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली. त्या डब्यातून एक मनुष्य पुढच्या स्टेशनवर उतरून निघून गेल्याचे काहींनी पाहिले. पण त्याने काय केलेय याचा अर्थातच कुणालाही पत्ता नव्हता. पुढच्या एका मुख्य स्थानकावर ट्रेन आली तेंव्हा लोकांना डब्यातून रक्ताचे ओघळ वाहत आलेले दिसले आणि हा प्रकार उघडकीस आला. मंदा पाटणकर हत्या प्रकरण त्या काळात माध्यमांतून खूप गाजले होते.

त्यानंतर अनेकांना, विशेषतः स्त्रियांना, या मंदा पाटणकरचे भूत दिसल्याचे अनुभव येत होते असे म्हणतात. म्हणजे एखादी स्त्री इतर अनेकजणींबरोबर डब्यात यायची. हास्य विनोद करायची आणि पारसिक बोगदा ते मुंब्रा खाडीच्या दरम्यान ट्रेन आली कि अचानकच जोरजोरात किंचाळून ट्रेनबाहेर उडी मारायची. त्यानंतर कित्येक वर्षे (अजूनही?) महिला तिच्या भीतीमुळे एकटीने डब्यातून प्रवास करत नसत. विशेष करून त्या विशिष्ट भागात.

@ atuldpatil >>> बरीच माहिती संकलित केलीत को हो आपण

वेळेचा उल्लेख सापडत नाही पण नक्कीच अवेळ असावी Happy Happy Happy

वाईट झाल तिच्यासोबत.बिचारी.
मंदा पाटणकर हत्या प्रकरण त्या काळात माध्यमांतून खूप गाजले होते.>>>> पुढे काय ???आरोपी सापडला की नाही.ओह.गुगल करावे लागेल.

रत्नाकर मतकरींची कथाही आहे. एक होती मंदा. दर काही वर्षांनी हे प्रकरण पुन्हा पुन्हा येत.
कोणीतरी सांगत मला एक बाई दिसली आणि पारसिक जवळ गायब झाली.
आताशा तर तिला फुल स्कोप आहे कारण गेली काही वर्ष पारसिक मधुन गाडी बाहेर पडली की लाईट जातात. गाडी स्लो होते. AC DC चा प्रॉब्लेम.
सलग पारसिक मधुन धडधडत दिव्याकडे जाणारी फास्ट ट्रेन आता फक्त "जिंदगी के सफर मे ..." मधेच पहायची.

त्यानंतर अनेकांना, विशेषतः स्त्रियांना, या मंदा पाटणकरचे भूत दिसल्याचे अनुभव येत होते असे म्हणतात. म्हणजे एखादी स्त्री इतर अनेकजणींबरोबर डब्यात यायची. हास्य विनोद करायची आणि पारसिक बोगदा ते मुंब्रा खाडीच्या दरम्यान ट्रेन आली कि अचानकच जोरजोरात किंचाळून ट्रेनबाहेर उडी मारायची. त्यानंतर कित्येक वर्षे (अजूनही?) महिला तिच्या भीतीमुळे एकटीने डब्यातून प्रवास करत नसत. विशेष करून त्या विशिष्ट भागात. >>> बापरे

मी तर बरेचदा रात्री ऊशीरा प्रवास केलाय या मार्गावरुन.
एकदा तर रात्री ११ च्या आसपास कर्जत ट्रेन पकडली ठाण्यावरुन .
एकटीच होते म्हणुन लेडीज मध्येच चढली.
८-१० जणीच होतो पुर्ण डब्यात अन हवालदार ही नव्हता.

Pages