काळजावर वार केले मारले नाहीं कुणी
मी जरा करपून गेलो जाळले नाही कुणी
आज माझे शेत सारे चांदण्यांनी बहरले
मागचे आकाश काळे न्हयाळले नाही कुणी
मार्ग होता मोकळा अन; पायवाटा मोकळ्या
पण सुखाची वाट धरुनी चालले नाही कुणी
माणसाने माणसाला का कळेना वंचिले?
गूढ मोठे आज येथे जाणले नाही कुणी?
मानवाचे जहर आहे;का विषाणू कहर तो?
आपुले ना कोण परके वाचले नाही कुणी
निसटले ते सर्व कोणी बुद्ध ज्यांनी वाचले
मोह माया क्रोध यांना गावले नाही कुणी
खरबाड रान सारे वाहून काल गेले!
ओटीत वेदनेला देऊन काल गेले!!
वेचून झुंजरूटे मी रान स्वछ केले!
जाळून टाकण्याचे राहून कालगेले!!
जवळून पाहिले मी सारेच लोक येथे!
गोडीत बोलणारे भावून काल गेले!!
कित्तेक पावसाळे आले तसेच मेले!
तोंडात माणसांच्या लावून काल गेले!!
सौख्यात नांदताना संसार स्वर्ग होतो!
हर एक खोड येथे सांगून काल गेले!!
अजूनही सोसायचे किती हाल आम्ही!
रणशिंग फुंकणार आता खुशाल आम्ही!!
संकटाना धडक आता सांगून देतो!
हिमालयाहूनही शतदा विशाल आम्ही!!
सांगून ठेवतो बघ अन्याया तुज पुन्हा!
प्रश्नांना करणार सुटता सवाल आम्ही!!
भीती नाही अंधाऱ्या रात्रीची इथे!
हातात घेतली पेटती मशाल आम्ही!!
बाजार मांडला आहे का शिक्षणाचा?
दमडीत विकणारे नाही दलाल आम्ही!!
जरी नित्य वाहतो माणुसकीचे ओझे!
भले म्हणती आम्हास..हमाल आम्ही!!