पहिला ट्रेन प्रवास !_...

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 April, 2025 - 06:08

काल ट्रेनमधून उतरलो. सोबत मुलगा होता. जो नुकताच दुसरीत गेला आहे. त्याला ट्रेनमधून प्रवास करायला फार मजा येते. बाय रोड जायचे म्हटले की रडायलाच लागतो, ट्रेनचा हट्ट धरतो. पहिल्या विमान प्रवासात सुद्धा झोपून गेला, ट्रेन सारखी मजा आली नाही म्हणाला. कारण ट्रेनच्या खिडकीची त्याला वेगळीच क्रेझ आहे. ट्रेनमध्ये चढलो आणि खिडकीची जागा रिकामी दिसली नाही तर तो चिडतो, रडतो, माझ्या हाताला खेचून मला ट्रेनमधून उतरायला भाग पाडतो. कारण ट्रेनच्या गर्दीचा अनुभव अजून त्याने घेतला नाहीये. ट्रेनमध्ये साधे बसायला मिळणे सुद्धा कित्येकांसाठी त्या दिवसाचे सर्वात मोठे सुख असते याची त्याला कल्पना नाहीये. ट्रेनला लोकं लटकून प्रवास करतात हे त्याच्या गावीही नाहीये. कारण आम्ही नेहमी उलट्या दिशेने प्रवास करतो आणि गर्दीची वेळ नसताना घराबाहेर पडतो. ट्रेन ईतकी रिकामी असते की त्या मोकळ्या वातावरणाचा फायदा घेऊन मुलांना हॅंडलला धरून लटकायचे खेळ करता येतात. चप्पल काढा आणि मांडी घालून बसा, एकमेकांच्या अंगावर तंगड्या पसरून पत्ते कुटा किंवा एकत्र मोबाईल गेम्स खेळा, खा प्या गप्पा मारा, असे खाजगी वाहन असल्यासारखे प्रवास करता येतो.

पण दुसरी बाजू दाखवणे देखील गरजेचे म्हणून एकदा संध्याकाळच्या वेळी तिकीट काढून त्याला स्टेशनवर केवळ फिरायला म्हणून नेले. लोकं कसे जीवावर ऊदार होत लोकल ट्रेनचा प्रवास करतात हे दाखवायला म्हणून नेले. तर ती दारावर लटकलेली माणसे बघून त्याने भोकाडच पसरले. पण तेव्हापासून त्याला सांगता येते की खिडकी नाही मिळाली तरी बसायला मिळणे हा देखील चांगल्या नशीबाचा भाग आहे.

असो, तर मी काय सांगत होतो. काल ट्रेनमधून उतरलो, सोबत मुलगा होता. ट्रेन थांबायच्या किंचित आधी उडी मारायची त्याला सवय आहे. पण ती उडी नेहमी ट्रेनच्या दिशेने मारावी म्हणजे आपण धडपडत नाही हे भौतिकशास्त्र त्याला सांगूनही समजत नाही. तो स्विमिंगपूलमध्ये ऊडी मारावी तशी उडी मारून मोकळा होतो. त्यामुळे ट्रेन पुरेशी थांबत नाही तोपर्यंत त्याचा हात घट्ट धरून ठेवायची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. तर कालही तो असाच ऊडी मारून उतरला आणि डावीकडे जायचे की उजवीकडे याचा विचार न करता विरुद्ध दिशेने चालू पडला. ईतके वेळा प्रवास करून सुद्धा त्याला हे लक्षात राहिले नाही किंवा तसेच लक्षात ठेवायची गरज भासली नाही. कारण त्याला सुखरूप पोहोचवणारा बाप सोबत होता.

काल मनात विचार आला, मुलगी मोठी आहे पण तिला देखील एकटीला हा प्रवास करायला सांगितले तर जमेल की नाही याची आपल्याला खात्री नाही. कारण तशी वेळ कधी तिच्यावर आली नाही किंवा आपण येऊ दिली नाही. कारण जमाना खराब आहे असाच विचार एक पालक म्हणून आपण करतो. त्यांना बिनधास्त डोळे मिटून पाण्यात टाकायला घाबरतो. अन्यथा ही जनरेशन आपल्यापेक्षा स्मार्ट आहे.

ट्रेनचा प्रवास हा मुलांच्या आयुष्यात केवळ एक मनोरंजनाचा भाग म्हणून येतो त्यामुळे याबाबतचे त्यांचे ज्ञान तितकेच सिमीत आहे. प्लॅटफॉर्म बदलणे, ट्रेन बदलणे, ईंडीकेटरवर ट्रेन कधीची आहे हे चेक करणे, तिथे लिहिलेले शॉर्टफॉर्म वाचून आणि त्यातून आपली ट्रेन कुठली हे ओळखणे, स्टेशनची नावे पाठ करणे ईतकेच त्यांना सवयीने जमू लागले आहे. चुकामूक झाली तर काय करावे याच्या सूचना दिल्या आहेत, पण त्या वापरायची वेळ कधी येऊ नये अशीच प्रार्थना नेहमी करतो. याउलट ट्रेनमधील फेरीवाल्यांच्या मुलांना मात्र माश्याला पोहायला शिकवावे लागत नाही तसे ट्रेनचा प्रवास शिकवावा लागत नाही. दैनंदिन आयुष्याचा भाग म्हणून त्यांना तो जमतोच.

अशीच वेळ नव्वदीच्या दशकात माझ्यावर आली होती. राहायला मी माझगाव, मुंबई ईथे. चाळीतील लहान वयाची सारी मुले जवळपासच्या शाळांमध्ये. पण माझ्या वडिलांच्या डोक्यात मुलाला एखाद्या मोठ्या नावाजलेल्या शाळेत घालायचे खूळ. अन्यथा बालवाडीच्या मुलाला तेव्हा कोण तासभर स्कूलबसचा प्रवास करून दूरच्या शाळेत पाठवायचे. पण माझे नर्सरी, छोटा शिशू, मोठा शिशू, सारे काही दादरच्या आय.ई.एस. (ईंडियन एज्युकेशन सोसायटीच्या) शाळेत झाले. या ईयत्तेत ईतक्या लांबचा प्रवास करणारे दुसरे कोणी नसल्याने माझ्या वयाच्या मुलांची वेगळी स्कूलबस सुद्धा आमच्या रूटला नव्हती. पण त्याने भीड चेपली. आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या मुलांसोबत प्रवास केल्याने ते काही आपल्याला खात नाहीत हे फार लवकर समजले.

ईयत्ता तिसरी पर्यंत हे स्कूलबस प्रकरण व्यवस्थित चालू होते. माझे बघून ईतर मोठ्या मुलांच्या पालकांनी देखील आमच्या शाळेचा आणि स्कूलबसचा पर्याय निवडला होता. चाळीतील छोट्यामोठ्यांचा भलामोठा ग्रूप तयार झाल्याने स्कूलबस प्रवासाची धमाल सुरू झाली होती. तिथल्या गमतीजमती पुन्हा कधीतरी वेगळ्या लेखात घेतो.

तिसरी नंतर मात्र ईयत्ता चौथी प्राथमिक स्कॉलरशिपचे वर्ष आले. जी तेव्हा मानाची परीक्षा समजली जायची. ज्याचे शाळेत एक्स्ट्रा क्लासेस घेतले जायचे. जे तिसरीची वार्षिक परीक्षा संपल्यानंतर मे महिन्याच्या सुट्टीतच सुरू होणार होते. ज्यासाठी स्कूल बस हा पर्याय नव्हता. झाली का पंचाईत. आता रोजच्या रोज मला शाळेत सोडायला कोण येणार होते? कारण आई वडील दोन्ही जॉबला. बरे हा प्रश्न फक्त मे महिन्याच्या सुट्टीचा नव्हता. तर त्यानंतर देखील शाळा भरायच्याआधी आणि शाळा सुटल्यानंतर स्कॉलरशिपचे क्लास सुरू राहणार होते. त्यामुळे हे काही जमणार नाही म्हणत स्कॉलरशिपची परीक्षा न देणे हाच पर्याय शिल्लक राहिला होता.

पण पुन्हा एकदा वडिलांच्या डोक्यात काहीतरी वेगळेच चालू होते. परीक्षेला माझे नाव नोंदवले. क्लासचे पहिले दोन दिवस माझ्या सोबत आले. ४६ नंबरची भाऊची धक्क्यावरून सुटणारी बस आमच्या दारातून जायची. जिचा दादर टी.टी ला बसस्टॉप होता. तिथून पुढे तूफान ट्राफिक आणि सिग्नलचे नियम पाळून, तर काही बिनासिग्नलचे रस्ते ओलांडून हिंदू कॉलनीतील शाळेत चालत जायचे होते. मला त्यांनी ते दाखवले, शिकवले, आणि विचारले एकटे जायला जमेल?

आठ वर्षे नऊ महिने वय होते माझे तेव्हा.. झाडून सार्‍याच नातेवाईकांनी ओरडा सुरू केला. पण वडिलांनी मात्र आपला निर्णय बदलला नाही. आई आज सांगते की रोज संध्याकाळी मी घरी पोहोचेपर्यंत तिचा जीव मुठीत असायचा. पण तेव्हा तिनेही याला पाठिंबा दिला होता. तेव्हा जमाना तसा खराब नव्हता. पण मुलगा एकुलता एक होता.

मी स्वतः मात्र सातव्या आसमानात होतो. शाळेत ईतक्या लांबून एकटा येणारा मी एकटाच होतो, त्यामुळे थोडे कौतुक वाट्याला यायचे. बाईच नाही तर शाळेतल्या ईतर मित्रांचे पालक सुद्धा हे समजल्यावर कौतुक करायचे. चाळीत आधीच हुशार मुलगा म्हणून ओळखला जायचो ते यामुळे निव्वळ अभ्यासात हुशार नाही तर व्यवहारात सुद्धा हुशार असा लौकिक पसरला. नातेवाईक भले आधी विरोध करत होते, पण भेटणे व्हायचे तेव्हा माझीच कॉलर टाईट व्हायची. कौतुकाने ते आणखी शेजारच्यापाजारच्या चार लोकांना सुद्धा हे सांगायचे. मध्यमवर्गीय लोकांना अप्रूप सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींचेच फार असते.

महिनाभर बसचा प्रवास केल्यावर मला दोन शोध लागले.

एक म्हणजे आपली नेहमीची ४६ नंबरची बस फार फिरून जाते आणि तिची फ्रिक्वेन्सी फार कमी आहे. एक चुकली की अर्धापाऊण तास थांबावे लागते. त्याऐवजी आपल्या ईथून भायखळ्याला तीन बस जातात, ज्यातली एखादी दर पाच दहा मिनिटात येते. आणि तिथून पुढे दादरला जाणार्‍या बसेस चिक्कार आहेत. पहिल्या बसमधून उतरायचा अवकाश की पुढची बस आपली वाट बघत उभीच असते. आणि ती कुठेही गल्लीबोळात न वळता थेट दादर गाठते.

दुसरा शोध म्हणजे अक्षरशा युरेका युरेका होता. भायखळ्यावरून जी ट्रेन सुटते ती केवळ दहा मिनिटात दादर गाठते. फास्ट लोकल असेल तर तिला सहा मिनिटे पुरतात. दादर टीटी बसस्टॉपपासून आपली शाळा जेवढ्या अंतरावर आहे तेवढीच ती दादर रेल्वे स्टेशनपासून आहे. त्यामुळे वेळ तर कमी लागतोच पण महिन्याभराचा पास काढला तर बसपेक्षा पैसे देखील कमी लागतील. त्यामुळे घरचे सुद्धा आपल्याला आनंदाने परवानगी देतील जी मला कुठल्याही परिस्थितीत हवीच होती. आणि याचे कारण म्हणजे - ट्रेन..! आणि ट्रेनवरचे माझे प्रेम Happy

भायखळ्याला माझे आजोळ होते. बैठ्या घरांची वाडी होती. त्यांच्या घराला बंगला म्हणायचे. जिथे आणखी चार बिर्‍हाडे राहायची. त्या बंगल्याच्या मागच्या कंपाऊंड वॉलवर बसले की या अश्या नजरेसमोर ट्रेन दिसायच्या. तिथे कारशेड / रेल्वे वर्कशॉप असेच काहीसे असल्याने दूरदूरपर्यंत वेडेवाकडे पसरलेले, एकमेकात मिसळलेले रेल्वे ट्रॅक आणि बॅकग्राऊंडला मुंबईत दुर्मिळ अशी हिरवीगार झाडी असे एक छानसे द्रुश्य तयार व्हायचे. तिथे थांबलेले एखादे ईंजिन, एखादी मालगाडी अचानक शांततेचा भंग करत सुरू व्हायची आणि हळूहळू झाडींमागे लुप्त व्हायची. तर लोकलचे चार रेल्वे ट्रॅक मिळून दर दुसर्‍या मिनिटाला एखादी तरी ट्रेन धडधडत समोरून जायची. तो ट्रेनचा वेग आणि त्या वेगाचा खडखडाट मला फार आवडायचा. जेव्हा समोरासमोरून विरुद्ध दिशेने दोन ट्रेन एकत्र यायच्या तेव्हा तो आवाज डबल व्हायचा, म्हणून तसे घडण्याची वाट बघत, त्या ट्रेन बघत मी तासनतास तिथेच बसून राहायचो. रस्त्यावरून धावणार्‍या कुठल्याही वाहनाला त्याची सर नव्हती.

मुंबईकरांना समुद्राचे फार कौतुक असते, आणि ट्रेनच्या गर्दीबद्दल त्यांना चिडवले जाते. पण लहानपणी असे कट्ट्यावर बसून लोकल ट्रेन बघणे हे एक वेगळेच आणि अनुभवल्याशिवाय न समजणारे सुख आहे. तर अश्या या लोकल ट्रेनने मी एकटा प्रवास करणार होतो जे माझ्या वयाच्या ईतर कुठल्या मित्रांच्या नशिबी नव्हते या विचारानेच मला हुरूप चढला होता.

पण घरच्यांना मात्र हे रुचले नाही. कारण ट्रेनच्या अजस्त्र धूडाची भिती त्यांना बसपेक्षा जास्त होती. ती का होती हे आज मला समजते जेव्हा मला स्वत:ला मुले झाली आहेत आणि "कृपया गाडीचे पायदान आणि फलाट यांच्यातील अंतरावर लक्ष द्या" अश्या बेसिक गोष्टींबाबत लोकांना वारंवार का जागरूक करावे लागते हे कळू लागले आहे. पण तेव्हा मात्र मला माझ्या आवडीचा ट्रेन प्रवास का करू दिला जात नाहीये हे अनाकलनीय होते. त्यामुळे बरेच झगडून, भांडून, रडून, हट्ट करून, मी हे सुरक्षितपणे करू शकतो असा विश्वास घरच्यांना देऊन अखेर मी परवानगी मिळवली.

यातले सारे काही तर आठवत नाहीये, पण आईने घाबरून हे माहेरच्यांपासून लपवून ठेवले होते. राहायला ते भायखळ्यालाच, त्यामुळे एकदा त्यांनी मला स्टेशनवर पाहिले तेव्हा भांडे फुटले होते. आईला त्यांनी झाप झाप झापले होते. कारण काल परवापर्यंत त्यांच्या अंगणात बसून ट्रेन आल्यावर टाळ्या पिटणारा मुलगा ट्रेनने एकटा कसा जाऊ शकतो हेच त्यांच्या पचनी पडत नव्हते.

माझा ट्रेनचा प्रवास मात्र छान चालू होता. अजून काही नवीन शोध लागत होते.

जसे की शाळेतल्या मुलांना सेकंड क्लासचा पास काढून सुद्धा फर्स्ट क्लासने प्रवास करायला परवानगी होती. (हल्ली असे असते का याची कल्पना नाही).

दुसरे म्हणजे आपण व्हीटीच्या (आताच्या सीएसटीच्या) विरुद्ध दिशेने ते देखील फर्स्ट क्लासने प्रवास करणारे असल्याने आपल्याला पुर्ण रिकामी ट्रेन मिळते. पण तरी खरी मजा दारावर उभे राहण्यातच येते. त्यातही फास्ट लोकल कुठे न थांबता वेगात जात असल्याने तिच्या दारावर उभे राहायला जास्त मजा येते. त्यामुळे शक्य असल्यास फास्ट लोकलनेच जायचे आणि जोपर्यंत कोणी मोठी व्यक्ती हटकत नाही तोपर्यत दारातच उभे राहायचे. फास्ट लोकल जिथे थांबते अश्या महत्वाच्या स्टेशनपैकी एक आपले आहे याचेही तेव्हा एक वेगळेच कौतुक होते Happy

तेव्हापर्यंतच्या आयुष्यात खादाडीसाठी केवळ शाळेचेच कँटीन काय ते होते. तिथला वडा किंवा शाळेबाहेरचा वडापाव हे माझ्यासाठी राष्ट्रीय अन्न होते. नाही म्हणायला चिंच बोरे, आणि गोळेवाला होतेच. पण त्यापलीकडे कुठे हॉटेलात एकट्याने खायला जावे ईतके ना वय होते ना खिश्यात पैसे होते. पण आता रेल्वे कँटीन सुद्धा आपलेच झाले होते. तिथला पंजाबी समोसा फेवरेट झाला होता. एका प्लेटमध्ये समोसा, त्यावर गरमागरम ऊसळ आणि सोबत पाव हे आवडीचे कॉम्बिनेशन होते. जे बजेटमध्ये सुद्धा यायचे, कारण भायख़ळा स्टेशन ते घरापर्यंत नेहमीची बस न पकडता अकरा नंबरची बस पकडली (चालत गेले) की पैसे वाचतात हा सुद्धा एक शोध लागला होता Happy

आयुष्यातील पहिली नीरा मी त्याच वयात भायखळा स्टेशनवरील सरकारी नीरा केंद्रात प्यायलो. ही आठवण विशेष आहे कारण नीरा आजही फार आवडते हे कारण आहेच, पण तेव्हा मला त्या पेयाबद्दल फार उत्सुकता होती. मोठ्या लोकांना घटाघट ग्लास रिकामा करताना बघायचो, पण हे काहीतरी ताडीमाडी टाईप्स अंमली पेय आहे आणि कोणी आपल्या वयाच्या मुलांना ते पाजत नाहीये या विचाराने हिंमत होत नव्हती. एकदा धीर एकवटून प्यायलो आणि चटकच लागली. घरच्यांपासून मात्र हे लपवले होते. पण एकदा वडिलांसोबत भायखळा स्टेशनहून ट्रेनने कुठेतरी जात होतो. तेव्हा त्यांनीच मला "चल तुला आज नीरा काय चीज असते हे दाखवतो" या आवेशात त्याच स्टॉलवर नीरा पाजली आणि माझा भ्रमाचा ताडगोळा फुटला Happy

साधारण आठवीत असताना मात्र एक अप्रिय आणि दुर्दैवी घटना घडली..

एव्हाना आमचा ट्रेनने प्रवास करणार्‍यांचा चार पाच जणांचा ग्रूप झाला होता. दोघे आम्ही एकाच चाळीतले होतो तर बाकीचे जवळपास राहणारे. स्टेशनवर सारे भेटायचो, सर्व जमेपर्यंत तर एक दोन ट्रेन सोडायचो. फार उशीर झाला तर निघायचो. एकत्र फार धमाल करत जायचो. दारावरच ऊभे राहायचो. पण जीवाला जपूनच आनंद लुटायचो. तारतम्य बाळगायचो. दांड्याला धरून दरवाज्याबाहेर झुकायचा मुर्खपणा किंवा स्टेशन आले की चालत्या गाडीत चढाऊतरायचे स्टंट कधी केले नव्हते. फक्त एकच गोष्ट आम्हाला बेभान करायची ती म्हणजे पाऊस..! तो कोसळताना ट्रेनच्या दारावर ऊभे राहणे हे वेगळेच सुख होते. गार झोंबणारा वारा आणि त्या सोबत येणारे, चेहर्‍यावर सुयांसारखे तडतड टोचणारे पावसाचे टोकेरी थेंब.. चेहरा आणि मेंदू सुन्न पडायला तितके पुरेसे होते. "ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते" या मालिकेच्या पहिल्या भागात देखील त्याबद्दल लिहायचा मोह आवरला नव्हता.

तर त्या दिवशी स्टेशनला एक मित्र वेळेत आला नव्हता. शाळेला फार ऊशीर व्हायला नको म्हणून बाकीचे आम्ही निघालो. पण तेव्हा आम्हाला याची कल्पना नव्हती की तो आता पुन्हा कधीच आमच्यासोबत नसणार. दुपारी शाळेत त्याची थेट न्यूजच आली. ट्रेनच्या दारावर उभे राहिले असताना खांबाला डोके आपटून तो फटक्यात देवाघरी गेला होता. शाळेतून स्टाफचे काही जण त्याच्या अंत्यसंस्काराला जाणार होते आणि तो कुठे राहतो हे दाखवायला म्हणून मला सोबत नेले होते. त्या दिवशी फार अपराधी वाटत होते.

त्याने काय म्हणून डोके बाहेर काढले असेल याची कल्पना नाही. कदाचित स्टेशन येतेय का हे बघायला.. की आणखी काही.. नेमके काय झाले हे तो सोबतच घेऊन गेला. पण त्या घटनेनंतर देखील माझ्या ट्रेन प्रवासावर बंधने आली नाहीत हे विशेष.

हे खरेच थोडे विशेष आणि आश्चर्यजनक होते. कारण माझा जन्म झाला त्याच वर्षी आमच्याच सोबत राहणारे माझे काका स्कूटर अ‍ॅक्सिडंटमध्ये गेले. ज्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला कधीच दुचाकी चालवायला प्रोत्साहन दिले नाही, आणि त्यामुळे ती मला आजही चालवता येत नाही. बाईक, स्कूटर तर दूरची गोष्ट, पण साधी सायकल चालवता येत नाही. लहानपणी मी क्रिकेट खेळायला कुठेही गेलो तरी कधी मला अडवले नाही, पण कधी पतंग उडवायला ईतर मित्रांसोबत गच्चीवर पाठवले नाही, कारण ती थोडीशी धोकादायक होती. माझ्यावर विश्वास ठेवून मला मित्रांसोबत हवे तिथे जाऊ दिले, पण कधी खाजगी वाहन करून रात्रीचा प्रवास करू दिला नाही. ही अशी तेव्हा फारशी जाचक न वाटणारी,पण माझ्या जीवाला जपणारी काही बंधने जवळपास दहावीपर्यंत माझ्यावर होती. पण त्याचवेळी जेमतेम तिसरी पास झालेल्या मुलाला त्यांनी माझगाव ते दादर बस-ट्रेनचा प्रवास एकटे करायला पिटाळले होते Happy

तसे म्हटले तर ईतक्या वर्षात कधी असे वाटले नव्हते की आपण आपल्या ईतर मित्रांच्या, भावंडांच्या तुलनेत लहान वयात एकट्याने बस-ट्रेनचा प्रवास करून फार काही मोठा तीर मारला आहे. पण आज मात्र माझ्या तेव्हाच्या वयापेक्षा दोनेक वर्ष जास्त आणि माझ्यापेक्षा काही पटींनी स्मार्ट असलेल्या लेकीला जेव्हा जवळपासच्या ठिकाणी एकटे जायला परवानगी देतो, तेव्हा तिच्या चेहर्‍यावर जो आनंद बघतो, आणि नंतर ती घरी सुखरूप परत येईपर्यंत जी धाकधूक स्वतः अनुभवतो, ते पाहता आता मागे वळून पाहताना आईवडीलांचेच जास्त कौतुक वाटते!

जाता जाता, ता.क. - या सगळ्यात एक चांगले झाले. ज्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी हे केले होते त्यात मी मुंबईत चौथा वगैरे आल्याने पेपरात फोटो वगैरे आला होता, जो नातेवाईकांना दाखवून बघा याचसाठी केला होता अट्टाहास असे आईवडिलांना म्हणता आले Happy

- ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण ती उडी नेहमी ट्रेनच्या दिशेने मारावी म्हणजे आपण धडपडत नाही >> हे खरं असेल तर असे न करण्यासाठी (कुठूनही कुठेही उडी मारणे) शिकवायला पाहीजे हे माझे मत. बाकी ज्याचा त्याचा चॉईस हे कबूल आहे.

खूप जवळचं, ओळखीचं व भावणारं वाटलं हे सारं लिखाण ! छानच !!!
*पण ती उडी नेहमी ट्रेनच्या दिशेने मारावी म्हणजे आपण धडपडत नाही* - गिरगांवात ट्राममुळे ह्याचं बाळकडू फार पूर्वी ( म्हणजे, माझ्या लहानपणी ) मुलांना अगदी लहानपणीच मिळत असे ! Wink

आमची एक मावशी अर्नाळा ( विरार जवळ ) येथे राहत होती. त्यावेळी विरार ट्रेन गर्दीची असली तरी एवढी भयानक नव्हती. अंधेरी नंतर तर आरामात बसायलाही मिळे व बोरीवलीनतर खिडकी सीटही . शाळेत असताना एका सुट्टीच्या दिवशी मला ट्रेनने एकट्याने.मावशीकडे जाण्याची परवानगी मिळाली होती व तो दिवस माझ्याही आयुष्यातील महत्त्वाचा मैलाचा दगड होता ! त्या दिवशी मी शिकलेला मोठ्ठा धडा - आपण गाडीत चाढण्यापूर्वी प्रथम प्रवाशांना उतरू देणं आपल्याच शारीरिक हिताचं असतं !! Wink

छानच लिहिलंय ऋन्मेष.
मित्राबद्दल वाईट वाटलं. त्याच्या घरच्या लोकांची किती वाईट अवस्था झाली असेल....

मी मुंबई बाहेरची असल्यामुळे मुंबईतल्या लोकल्स... इस्ट वेस्ट... कधी कळले नाही.
पण एकदा मला एकटीला अंधेरी ते दादर लोकल प्रवास करायला लागला. दादरला उतरल्यावर माझ्या अंदाजाने मी वेस्ट ला जायला निघाले. पण पोहोचले इस्टला. (तेव्हा इस्ट वेस्ट अश्या पाट्या नसायच्या आणि मोबाईल ऐकलेलही नव्हते.) मग पार चालत चालत लोकांना विचारत विचारत शिवाजी पार्क वरच्या मुक्कामावर पोहोचले. तेव्हा माझ्या दिशा ज्ञाना वर सगळ्यांना हसायची पुरेपूर संधी मिळाली.

छान लिहिलंय .
आईवडील काळजीपोटी प्रोटेक्ट करतात, जसं की तुमचे करत होते बंधन घालून हे जरी मान्य असलं ,तरी ते योग्य की अयोग्य ,हे मलाही समजत नाही. कारण ओव्हर प्रोटेक्ट केल्यामुळे मुलांची वाढ खुंटते आणि बर्याच आनंदाला मुलं मुकतात ,असं मला वाटतं. पण त्याचबरोबर ते तुम्हाला इतर गोष्टी आणि एकटं शाळेला प्रवास करू देऊन, स्वावलंबी देखील बनवत होते, जे की चांगली गोष्ट आहे .

ट्रेन ने सुरुवातीला केलेले प्रवास लक्षात आहेत मी दहावीनंतर कॉलेज ला खरा ट्रेन चा प्रवास सुरू केला जो आतापर्यंत .पण एक प्रवास चांगलाच लक्षात आहे .दहावीच्या सुट्टीत एकदा आईला नाटकाला घेऊन जायचे होते. आईही कधी ट्रेन ने प्रवास न करणारी, मी आपण दोघी जाऊ म्हणून, तयार झाली.सगळं माहीत केलं होतं, ट्रेन कशी कुठे कोणती आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पकडायची,किती स्टेशन नि उतरायचं . पण फास्ट की स्लो हे लक्षात आलं नाही चुकून फास्ट ट्रेन मध्ये चढलो जी पार्ल्याला थांबत नाही . आणि मग बांद्रा ला उतरून परत रिटर्न ट्रेन मध्ये चढलो .परत येताना अजून गोंधळ म्हणजे रिकामा डबा म्हणून फर्स्ट क्लास मध्ये चढलो, जे मी बघितलेच नाही .आणि नेमकी टीसी आली मी आधीच गोंधळून बावरलेले,त्यात नाटकाला उशिर होत होता. त्यामुळे चेहऱ्यावर टेंशन घाई.तिने नेमका चेहरा बघूनही ओळखले असते. तिने पकडले.
तिला सांगितले काय झाले, पण तिने काहीही ऐकून घेतले नाही एकतर बांद्रा ते पार्ला चं तिकीट ना काढण्याची चूक आणि त्यात फर्स्ट क्लास असा दुहेरी फाईन मारून सोडलं. नशीब आईने पार्ल्यात शॉपिंग करायची म्हणून जास्त पैसे घेतले होते, नाहीतर फाईन भरायचेही वांदे झाले असते ,कारण या टीसीनी सहजासहजी सोडत नाहीत, असं ऐकलेलं. त्यानंतर कधीही विनातिकीट किंवा चुकीच्या ट्रेन ने प्रवास केला नाही. पण हा प्रसंग, अनुभव कायम लक्षात राहिला.

छान लिहिलाय लेख, आवडला. तुमचे लेखन दर्जेदार असते. वर्तमानपत्रामध्ये देता येईल.
मी फार कमी वेळेस रेल्वेने प्रवास केला आहे . कॉलेजला असताना एकदा केला तेंव्हा मित्राबरोबर भीतभीत दारात बसलो होतो. खूप मजा आली होती तेव्हा, पण आता जाणवते कि सुरक्षेच्या दृष्टीने ते चूक होते.

धन्यवाद सर्वांचे Happy
आतापर्यंत आलेले प्रतिसाद सुद्धा छानच..

@ रानभुली,

तुमचे विचार आदर्श आहेत पण मुंबईतील परिस्थिती आदर्श नसल्याने प्रॅक्टीकल नाहीत.

कारण इथे चालत्या ट्रेनमधून कधीच उतरू नये हे फॉलो करणे प्रॅक्टिकली अशक्य आहे. ट्रेन जे काही थोडावेळ स्टेशनला थांबते त्यात जितक्या लोकांना उतरायचे आणि चढायचे असते त्यांच्याकडे ट्रेन पूर्ण थांबल्यावरच आम्ही उतरणार असा पर्याय नसतो, कारण पुरेसा वेळ नसतो.

त्यामुळे ट्रेन पुरेशी स्लो झाली की एकेकाला उतरायला सुरुवात करावी लागते. एखाद्याचा नंबर आला आणि तो नाही उतरला तर मागचे ढकलून त्याला उतरवतील आणि अश्यात जर त्याला ट्रेनच्या दिशेने कसे उतरावे हे माहीत नसेल तर ती व्यक्ती कोलमडून पडेल.

थोडक्यात सांगायचे तर पाण्यात बुडू नये म्हणून जसे आपण मुलाना पोहायला शिकवतो तसेच चालत्या ट्रेनमधून उतरायची वेळ आली तर कसे उतरावे हे एक लाईफ स्किल म्हणून मुलांना शिकवणे इथे गरजेचे आहे. अन्यथा मोठ्या वयाच्या लोकांना देखील अचानक ती वेळ आल्यावर धडपडताना पाहिले आहे.

त्यामुळे चालत्या ट्रेनमधून उतरू नये हे मुलांना जरूर सांगा. पण तशीच वेळ आल्यावर उतरावे कसे हे देखील आवर्जून शिकवा असेच म्हणेन.

@ भाऊ
आपण गाडीत चाढण्यापूर्वी प्रथम प्रवाशांना उतरू देणं आपल्याच शारीरिक हिताचं असतं !! Wink
>>>>
बरोबर,
आणि उतरताना देखील चढणारे घुसायच्या आत उतरून मोकळे व्हावे. अन्यथा मागे रेंगाळला तर ते तुम्हाला पुन्हा आत घेऊन जातील Happy

लोकांना आत घुसायची फार घाई असते. साधे लिफ्ट मध्ये सुद्धा गरज नसताना आतले पूर्ण बाहेर येण्याआधीच आत शिरायची लगबग सुरू होते. मग ट्रेनचे विचारायलाच नको.

@ शर्मिला
मित्राबद्दल वाईट वाटलं. त्याच्या घरच्या लोकांची किती वाईट अवस्था झाली असेल....
>>>

हो अवस्था वाईटच झाली असेलच...
तो मित्र एरियातील असल्याने घर लांबून माहीत होते. घरी जाणे येणे नव्हते. त्याच्या आईवडिलांशी वैयक्तिक ओळख नव्हती. अन्यथा त्यांनी ट्रेनने सोबत जाणारे मित्र म्हणून आमच्याकडे चौकशी केली असती तर काय बोलावे हे सुचले नसते.

@ शर्मिला
इस्ट वेस्ट... कधी कळले नाही.
>>>>

हो, बरेच लोकं गोंधळतात.
अश्यावेळी व्हीटीच्या दिशेने तोंड करून उभे राहिल्यावर ती दक्षिण मुंबई म्हणत उजव्या हाताला वेस्ट असे लक्षात ठेवायचे हे घरून सांगण्यात आले होते.

तसेच प्लॅटफॉर्म नंबर सुद्धा साधारणपणे वेस्ट टू ईस्ट असे दिले जायचे.

मुंबईत दोन्ही बाजूला प्लॅटफॉर्म येत नाहीत. जसे आता नवी मुंबईत दोन्ही बाजूला असतात. त्यामुळे आपण उतरणाऱ्या स्टेशनचा प्लॅटफॉर्म कुठे येणार हे आधीच चेक करावे. तसेच पुढच्याला भाईसाहब उतरना है क्या हे विचारायला बिलकुल संकोच करू नये.

बाकी शिवाजी पार्क म्हणजे तुम्ही पूर्वेकडून पश्चिमेला पार टिळक ब्रीज ओलांडून गेले असावात Happy

@ सिमरन,
फास्ट की स्लो आणि नवख्याना फर्स्ट क्लास न समजणे या कॉमन मिस्टेक आहेत. टीसी लोकं असेच गिऱ्हाईक शोधत असल्याने हातचे जाऊ देत नाहीत.

फर्स्ट क्लासचे तिकीट बरेच महाग असल्याने आणि पास नसल्यास सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना ते परवडत नसल्याने कोणी असे चढले ज्याच्याकडे बघून खात्रीपूर्वक वाटावे की हा चुकून चढला आहे तर सांगणारे सांगतात सुद्धा.

खुप छान लिहिलय .. मित्राचा प्रसंग हृदय होता..
मला तर फलाटावरची गर्दि बघितली कि जिव दडपुनच जातो.. लहानपणी मिहि एकदा गाडी स्लो असतान फलाटावर उडी मारली होती अन फलाटाला साष्टांग दंडवत घातला होता.. सगळी लोक आली तशी उठवायला Happy

धन्यवाद आशू आणि भावना Happy

मला तर फलाटावरची गर्दि बघितली कि जिव दडपुनच जातो
>>>>

माझाही. सवय नसल्याने म्हणा, किंवा तसाच नाईलाज नसल्याने म्हणा मी कधीच गर्दीच्या ट्रेनमध्ये शिरत नाही. दारावर रिस्क घेऊन लटकने तर प्रश्नच नाही.

एकदा घाईघाईत चढलो होतो गर्दीच्या ट्रेनमध्ये आणि दारावरच अडकलो होतो. माझ्या आधी चढलेले लोकं आत जायला तयारच नाहीत. मी ओरडतोय तरी कोणी दाद द्यायला मागत नव्हते. एवढ्या विचित्र पोजिशनमध्ये होतो की दांडा पकडले ला हात जरा ट्विस्ट झालेला. थोड्यावेळाने त्या एका ट्विस्ट झालेल्या हातावर सगळ्या शरीराचे वजन आल्याने तो दुखायला लागला आणि अलगद सोडून द्यावासा वाटला. पण मग भानावर आलो, कळ न काढता हात सोडला तर फटक्यात मरून जाऊ किंवा त्याहून बेकार आयुष्य जगायला लागेल असा विचार करून पुढील स्टेशन कधी येतेय याची वाट बघू लागलो. ते आले तसे उतरलो आणि ती ट्रेन सोडली ते आयुष्यात पुन्हा कधी तशी ट्रेन पकडली नाही.

बाकी ते दरवाज्याच्या वर एका खाचेत बोटे टाकून तेवढ्या आधारावर प्रवास करणाऱ्यांचे कौतुक वाटते.
ज्यांच्या नशीबी नाईलाजाने असा प्रवास लिहिला आहे त्यांचे वाईट सुद्धा वाटते.

लहानपणी मिहि एकदा गाडी स्लो असतान फलाटावर उडी मारली होती अन फलाटाला साष्टांग दंडवत घातला होता.. सगळी लोक आली तशी उठवायला Happy
>>>>>

हे एक चांगले असते. अनुभवी लोकं तत्परतेने मदतीला येतात. महत्त्वाचे म्हणजे ट्रेन खाली जाऊ नये म्हणून बाहेरच्या बाजूला खेचतात सुद्धा.. मी देखील एकदा एका बाईला असे खेचले होते. नसते खेचले तरी ट्रेन खाली गेली नसती. पण तितका विचार करायला वेळ नसतो आणि करतही बसू नये.

छान लिहिलंय , ऋन्मेष. लेखन आवडले.

चालत्या गाडीतून उतरणे, चढणे हे एक वेडे आकर्षण असते. शक्यतो टाळावे. प्रत्येक मोठ्या रेल्वे स्टेशनवर उतरायचे आणि चहा/ खायला घ्यायचे, गाडी सुरु झाल्यावरही अगदी आरामांत शांतपणे ' चालत्या ' गाडीमधे चढायचे हा आवडीचा खेळ. गाडीमधे असलेले माझे सामान, बॅग, वाचत असलेले वर्तमानपत्रही कधी चोरीला गेले नाही.

प्रवास करतांना खिडकी उघडी ठेवणे ( अर्थात non ac ) मला आवडते. पण शेजारची व्यक्ती " ठंड लग रही है , खिडकी बंद रखो " असा आदेश देतो तेव्हा राग येतो. गाडीला कोळाशाचे इंजिन असण्याच्या काळांत, खिडकीत बसल्यावर बारिक कोळशाच्या कणांचा डोळ्यांना त्रास व्हायचा. वळणावर असलेल्या आपली गाडी / गाडीचे इंजिन आणि डबे खिडकीतून बघतांना मला जाम आवडायचे.

काही लांबचे प्रवास (दिल्ली - मुंबई, खरगपूर - पुणे ) जनरल बोगीने केले आहेत. त्रास होतो, पण अशा गाडी प्रवासांत खर्‍या भारताचे दर्शन होते. Happy

काही लांबचे प्रवास (दिल्ली - मुंबई, खरगपूर - पुणे ) जनरल बोगीने केले आहेत. त्रास होतो, पण अशा गाडी प्रवासांत खर्‍या भारताचे दर्शन होते. Happy>> माझ्या पण आठवणी आहेत. न बोलता नुसते बघत राहायचे, ऐकत राहायचे.
संपूर्ण लेख, आणि उदय तुमचा हा प्रतिसाद १०० टक्के रिलेट झाला .

गाडी सुरु झाल्यावरही अगदी आरामांत शांतपणे ' चालत्या ' गाडीमधे चढायचे हा आवडीचा खेळ.
>>>>>>
अगदी, फारच रिलेट होणारे..
दर स्टेशनला प्लॅटफॉर्मवर उतरून पाय मोकळे करायची मजाच वेगळी. आणि मग दांडा पकडून ट्रेन सोबत धावायचे, वेग पकडताच उडी मारून चढायचे..

गाडीमधे असलेले माझे सामान, बॅग, वाचत असलेले वर्तमानपत्रही कधी चोरीला गेले नाही.
>>>>>>>
लोकलमध्ये एके काळी वर्तमानपत्र कोणीही कोणाकडे हक्काने वाचायला मागायचे जसे सीट वर बसायला मागत आहेत. वाचणारा सुद्धा आपल्यातली पुरवणी काढून द्यायचा.

पीकपॉकेटींग मात्र फार चालायची. रेल्वे पोलिसच सामील असल्याने त्याचे रॅकेट फोफावले होते.
माझे एकदा गर्दीत हातातले घड्याळ मारले गेले होते.

पूर्वी गाड्यांच्या खिडक्याना गज नसायचे. आम्हा लहान मुलांना फलाटा वरून खिडक्यातून आत गाडीत टाकायचे (जागा पकडायला) ते आठवते.

ट्रेनच्या खिडक्यांना गज नव्हते हा कधीचा काळ असावा? आणि लांब पल्याच्या की मुंबई लोकल?
मला जुनी डिझाईन आठवत आहे पण खिडक्यांना गज नसलेली ट्रेन आठवत नाहीये.

मस्त लिहिलंयस ऋन्मेष!
मी मुंबईत काही वेळा एकटीने लोकलचा प्रवास केलाय. पण त्या त्या वेळी जेवढा प्रवास करायचा होता, तेवढ्यापुरतेच डिटेल्स लक्षात ठेवून. त्यापलीकडे आणि अलीकडे काहीही विचार केला नाही Happy
मागे एक विनोद वाचला होता. एक माणूस चुकून फास्ट ट्रेनमधे चढतो. त्याला ज्या स्टेशनवर जायचं असतं, तिथे ती ट्रेन थांबणार नसते, पण गाडीतले अनुभवी लोक त्याला सांगतात की तिथे ट्रेन थोडी स्लो होते तेव्हा तू पटकन उडी मार आणि ट्रेनच्या गतीच्या दिशेने थोडा धाव म्हणजे पडणार नाहीस. त्याप्रमाणे तो उतरतो आणि धावतो, पण तो जरा जास्त जोरात धावतो आणि त्यामुळे पुढच्या डब्याजवळ पोचतो आणि त्या डब्यातल्या लोकांना वाटतं की ह्याला ही गाडी पकडायची आहे, म्हणून ते त्याला ओढून परत वर गाडीत घेतात!

साधारण ७४ / ७५ चा काळ असावा.
बहुदा त्या पॅसेंजर गाड्या असाव्यात. आमचा प्रवास तेव्हा जेमतेमच म्हणजे मामाच्या गावाला type चा होता.

शर्मिला ओके, हा काळ माझ्या जन्मा आधीच्या, पण पसेंजर ट्रेन मध्ये नंतरही अशा खिडक्या पाहिल्या आहेत वाटते.

@ वावे, हा जोक ऐकला होता Proud

<<< त्यापलीकडे आणि अलीकडे >>> मला ट्रेन बाबत तरी होती अशी हौस.. फार चौकस बुद्धीचा वगैरे नव्हतो, पण माझ्या वयाच्या इतरांना यातले फारसे माहीत नव्हते आणि मला अनुभवायला मिळते तर चारचौघात भाव खायला जाणून घ्यायचो.

सातवीत गेलो तेव्हा आजोबा गेले आणि आमचा गणपती मोठ्या काकांकडे अंधेरीला गेला.
त्यामुळे गणपतीला तिथे जाणे होऊ लागले. मी तिथेही एकटा जाऊ लागलो. दादर ते अंधेरी असा प्रवास करू लागलो.

सातवीत होतो पण माझ्या एक वर्ष लहान भावाला घेऊन अंधेरी ते दादर फिरून आलो. त्याला दादर चौपाटी, शिवाजी पार्क, फाइव गार्डन वगैरे फिरवून आणले होते. हॉटेल मध्ये नेऊन खाऊ घातले होते. गंमत म्हणजे एक किस्सा झाल्याने मला तेव्हाचे आमचे चायनीजचे बिल आजही आठवत आहे. ९९ रुपये झाले होते. चायनीज हा प्रकार अगदी नवखा होता तेव्हा मुंबईत. कसला ढगात होता तो. जिवाची मुंबई झाली आणि ती सुद्धा आईबाबांच्या शिस्तीच्या नियमात नाही तर आपल्यापेक्षा फक्त एक वर्ष मोठे असलेल्या भावासोबत. पुढे बरेच वर्षे हे अप्रूपाने आठवण काढायचा तो याची..

सांगायचा मुद्दा हा की एकदा ट्रेन प्रवासाचा कॉन्फिडन्स आला की त्यानंतर तुम्ही मुंबईत कुठेही फिरू शकता.

Pages