शिवाजी महाराज आणि मावळ्यांना बाहुबली बनवू नका

Submitted by आशुचँप on 4 November, 2022 - 05:05

गेल्या काही वर्षात जी 'सो कॉल्ड' ऐतिहासिक चित्रपटांची जी लाट आली आहे त्या सर्वात एक कॉमन गोष्ट आढळते ती म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली इतिहासाची मोडतोड आणि अचाट साहस दृश्ये.
मग ते सांदण दरीत sling लावून अक्षरशः उडत येणारे मावळे, अंगावर आलेले बाण, भाले असे सहजपणे हातात पकडणे, पाण्यात भाला फेकून आग लावणे, शत्रूला जमिनीवर आपटून वरती उडवणे आणि मग फुटबॉल सारखी लाथ मारून 15 20 फुटांवर गिरक्या घेत फेकणे असले रम्य प्रकार.
आणि या सगळ्याला गोंडस नाव दिले जाते प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे म्हणून. या सगळ्यात आपण महाराजांचा आणि त्यांच्या मावळ्यांचा अपमान करतोय हे कुणाच्या गावीच नसतं. महाराजांनी आणि मावळ्यांनी रक्त सांडून निर्माण केलेले स्वराज्य ही आपल्यासाठी एक अभिमानाची गाथा असली पाहिजे, पिटात शिट्ट्या मारणाऱ्या लोकांचे मनोरंजन करणारी तद्दन सुमार फिल्मी कहाणी नाही हे भान कधी येणार?
आणि तुम्हाला अचाटपणाच दाखवायचा आहे ना मग तो शिवचरित्रात ठायी ठायी आढळेल. मोजके सैन्य आणि तुटपुंज्या साधनांच्या साहाय्याने सामान्य जनतेच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग पेटवून चार बलाढ्य सुलतानशाह्यांना, नमवून हिंदवी स्वराज्य निर्माण करणे, गनिमी काव्याचा पुरेपूर वापर करत लाटेप्रमाणे येणाऱ्या लाखोंच्या सैन्याला नामोहरम करणे आणि घरदारावर तुळशीपत्र ठेऊन रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहणाऱ्या पराक्रमी वीरांची फौज तयार करणे हे जर अचाट नसेल तर काय आहे?
अक्षरशः मूठभर सैन्य घेऊन महिनोन्महिने चाकणचा किल्ला लढवणारे फिरंगोजी नरसाळा, प्राणांची पर्वा न करता दिलेरखानाच्या तळावर हल्ला करणारे मुरारबाजी, रात्रभर धावत राहूनही हजारो सैनिकांना खिंडीत रोखून धरणारे बाजी प्रभू, केवळ 60 सैनिकांना घेऊन पन्हाळा काबीज करणारे कोंडाजी, कड्यावर चढून जाऊन आक्रमण करणारे आणि ढाल तुटली तरी लढत राहणारे तान्हाजी, अक्षरशः उघडा बोडक्याने पठाणांची फौज कापून काढणारे रामजी पांगारा, ज्यांना महाभारती जैसा कर्ण असे म्हणले जायचे ते सूर्यराव जेधे हे सर्व मावळे सामान्य असूनही असामान्य होते आणि त्यासाठी त्यांना उडत वगैरे जायची गरज नव्हती.
आपल्या पाठीवर महाराजांचा शाबासकी देणारा हात आहे आणि आई भवानीचा आशिर्वाद आहे.. बस इतक्या बळावर या मावळ्यांनी कितीही बलाढ्य सैन्य आले तरी त्यांना धोबीपछाड घातलाय. फक्त मराठाच नव्हे तर कातकरी, भंडारी, हेटकरी, रामोशी, कोळी अशा अठरापगड जातीचे मावळे एकत्रीतपणे शत्रुवर जीवाच्या कराराने तुटून पडत आणि त्यांना सळो की पळो करून सोडत.
हे आपण आपल्या नव्या पिढीला कधी दाखवणार आहोत का नाहीत? का त्यांना शिवाजी आणि मावळे हे बाहुबली सारखे अचाट शक्तिप्रदर्शन करणारे काल्पनिक अतिमानव होते आणि त्यामुळेच ते जिंकले असा कमालीचा चुकीचा समज त्यांच्या मनात पेरणार आहोत?

नुसता पराक्रम नव्हे तर महाराजांनी अतिशय हुशारीने, कल्पकतेने आणि सखोल नियोजन करून ही युद्धे जिंकली आहेत. लाखोंच्या संख्येने आलेल्या अफझलखानाला जावळीच्या अरण्यात खेचून आणत त्याच्यासह सैन्याचा नायनाट करणे असो वा भौगोलिक रचनेचा फायदा घेत कारतालब खानाला उंबरखिंडीत सापळा रचून त्याला मुठीत नाक धरुन शरण यायला लावणे असो वा प्रचंड मोगली फौजेच्या गराड्यात सुरक्षित बसलेल्या शाईस्तेखानवर अचूक झेप टाकून त्याची बोटे तोडणे असो वा कडेकोट पहारा भेदून अंधाराचा आणि पावसाचा फायदा घेत पन्हाळ्यावरून केलेली सुटका असो वा खुद्द आग्र्यातून औरंगजेबाला फसवून सुखरूप परत येणे असो हे किती रोमहर्षक आहे. हे अविचारी धाडस नव्हते, यामागे अभ्यास होता, अतिशय कुशल हेर यंत्रणा होती आणि कितीही धाडसी बेत असला तरी तो अंमलात आणणारे विश्वासू सहकारी होते.
हे जसेच्या तसे दाखवले तरी नव्या पिढीला कमालीचे स्फूर्तिदायक वाटेल. पण यांना हे असलं दाखवण्यात रस नाहीये, त्यांना फक्त बाहुबलीच दाखवून पैसे मिळवायचे आहेत आणि त्यासाठी स्वतंत्र कथा लिहायची नाही तर आयते जे मिळेल ते ओढून आपल्या साच्यात बसवायचे आहे आणि त्यासाठी त्यांनी आता महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना वेठीस धरले आहे.
आता तर प्रतापराव गुजर यांचा नंबर लागला आणि शिवाजी म्हणून अक्षय कुमार....
आधीच तो भंसाळ्या दिसेल त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेला डोंबाऱ्यासारखे ग्रुप डान्स करायला लावतो त्यात आता यांची भर

हे असेच चालत राहीले तर आग्र्याहून सुटका होताना महाराज धाडकन दरवाजाला लाथ मारतील, मग फौलादखान आणि बाकीचे सैनिक दहा दिशांना फेकले जातील. हे सगळे सौध्यात बसून बघणाऱ्या औरंगजेबाला महाराज सुनावतील ... अस्सल मराठा आहे मी, मराठ्याला आणि त्याच्या छाव्याला अडकून ठेवण्याची कुणा मुघलाची माय नाही व्यायली. लक्षात ठेव पातशहा, एक दिवस हीच मराठी भिमथडी तुझ्या दिल्लीवर चाल करून येतील आणि बादशहा त्यांचा अंकीत राहील.....
लग्गेच फुल्ल टाळ्या, शिट्ट्या आणि घोड्यावर बसून रुबाबात महाराज निघून जातील आणि औरंगजेब मान खाली घालेल वगैरे हे बघावं लागेल....

तेव्हाही लहान मुलांना हेच आवडतं बघायला म्हणून आपण समर्थन करत राहणार का?

एक शिवप्रेमी म्हणून या सगळ्या बाजारूपणाचा आता खरोखर उबग आला आहे आणि कुठंतरी हे थांबायला हवं असं मनापासून वाटतं

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बघवलाच नाही सुभाचा पिक्चर.. महाराज kahi खास नव्हते असा दाखवण्याचा एक प्रयत्न आणि इतिहासाची मोडतोड ...
ते अफ़झल चा नरसिंह करणं.. रजनीकांत सारखे फायटिंग स्किल्स .. काय ते ठिणगीने दिवा पेटवणं.. ते काय साईबाबा आहेत का.. सुभा महाराज कणभर वाटलं नाही..
माझी मुलगी बघताना म्हणाली.. मला टाइम मशीन मिळाली तर जाऊन बघेन नक्की काय कस झाला होता.. खरंच आणि एकदा सगळे बघूनच येऊ मग हे सतराशे साथ पिक्चर भलत्या सीरिअली बंद तर होतील..
मांडलेकर चे ते पावनखिंड इत्यादी फार परवडले या पिक्चर पेक्षा

फारेंड खूप हसले Rofl
खरंच पावन खिंड बरा असावा. अफझल खान वधा चा प्रसंग बरा वठवलाय..खटकत नाही.

नरसिंह स्टाईल अफ्जुल्ल्या वध Lol

भावेनी यापुढे उकडीच्या मोदकाचं बायोपिक करावं. त्यात(च) ते शोभून दिसतील>> फुटलेच.. सुभा ला मी साजुक तुपातला शिरा म्हणायचे तसंच हे काहितरी Wink

शरद के. माझा रोल ह्याला दिला म्हणुन वैतागलेला दिसतोय >> Proud

फा, Rofl
पिक्चर पहाण्याची शक्यता नाहीच तेव्हा वाचूनच मजा घ्यावी झालं.
मी इतक्यातच युट्युबवर ‘स्वराज्यजननी जिजामाता‘ सिरियलचे ५७३ भाग बघून संपवले. मला सिरियल आवडली. जिजाबाईंचे रोल केलेल्या चारही जणी चांगल्या शोभल्या आहेत. शेवटचा रोल नीना कुळकर्णीने केला आहे. शिवाजी महाराजांचा शेवटचा रोल अमोल कोल्हेने केला आहे जो शोभतोच त्या रोलमध्ये. नक्की बघा असं सजेस्ट करेन.

फा Biggrin

आता मी वर लिहिलेल्या सिरियलबद्दल. मला खूप आवडली हे लिहिलं आहेच. काही त्रुटी असणारच तर त्याबद्दल. सिरियल म्हटल्यावर त्यांना पाणी घालून घालूण सगळ्यांना पुरेल हे बघावं लागतंच. ह्यातही शिवाजी महाराज आग्र्याला जाणार हे कळल्यानंतर निदान दहा एपिसोड तरी खर्ची पडतात पण महाराज आपले गडावरच. एकदा जिजाबाई की कोणतरी महाराज दोन दिवसांत निघणार म्हणतात पण दोन दिवस काही संपत नाहीत. शेवटी आपण ‘महाराज, आता जाताय की नाही‘ अशा घायकुतीला येतो. तसंच त्या पुतळाबाई, सोयराबाई, सकवारबाई ह्या अगदी रड्या दाखवल्या आहेत. पुतळाबाई त्यातल्यात्यात जास्तच. सतत देवांना वेठीला धरतात. पण युट्युब असल्यामुळे आपण फॉर्वर्ड करत बघू शकतो हा एक फायदा. तसंच शिवाजी महाराज मुघलांबरोबर/मिर्झा राजेंबरोबर तह करतात त्यानंतर नेताजी पालकर आदिलशाहीला जाऊन मिळतात असं श्रीमान योगीत वाचलं आहे पण ह्या सिरियलमध्ये नेताजी पालकर आणि महराज तसं मिळून ठरवतात असं दाखवलं आहे.
ही सिरियल जगदंब क्रिएशनची असल्यामुळे की काय महाराज आणि जिजाबाई सतत छातीवर हात ठेवून ‘जगदंब’ असं म्हणताना दाखवले आहेत.

तसंच शिवाजी महाराज मुघलांबरोबर/मिर्झा राजेंबरोबर तह करतात त्यानंतर नेताजी पालकर आदिलशाहीला जाऊन मिळतात असं श्रीमान योगीत वाचलं आहे पण ह्या सिरियलमध्ये नेताजी पालकर आणि महराज तसं मिळून ठरवतात असं दाखवलं आहे.>>>>
असा संशय इंग्रजांना होता असे त्याकाळच्या पत्रात उल्लेख आहेत. नेताजी, महाराजांचा इतका विश्वासू साथीदार असा अचानक विजापूरला निघून जातो हे त्यांना पटलं नव्हतं म्हणे. त्यामुळे हा शिवाजीचाच बनाव असावा असे त्यांनी लिहून ठेवले आहे
अर्थात या प्रकारामुळे मिर्झा राजेही धास्तावले होते, आज नेताजी, उद्या शिवाजी पण जाऊन अदिलशहाला मिळाला तर काय, यामुळे त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी पालकरांना मोगलांकडे वळवले.

असा आहे का चित्रपट?
नाही मी जात.
(हल्ली प्रभाकर मोरे महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमात पुढे आहे. - अवांतर)

धन्यवाद लोकहो Happy पाहिला पुढे उरलेला १/३. एकूण टोन तसाच आहे. पन्हाळगड ते खेळणा (विशाळगड) हा प्रवास आरामशीर चालतो. "पाठलाग" असे मुद्दामच म्हंटलो नाही कारण तो पाठलाग आहे असे कोठेच वाटत नाही. लोक आरामात डॉयलॉगबाजी करत असतात. पॉजेस घेउन बोलत असतात. मागे फौज येत आहे आणि ती पोहोचायच्या आत गड गाठायचा आहे हे फक्त एक दोन संवादांमधे ऐकू आले. बाकी वातावरणात अर्जंन्सी कोठेच दिसत नाही.

प्रत्यक्ष खिंडीतील लढाई ती तशीच तेलुगु चित्रपट पद्धतीने. तलवारीच्या वाराने लोक हवेत गिरक्या घेत आहेत, कोणीतरी लूपिंग डिलीव्हरी टाकल्यासारखे. त्यांच्या गिरकीची दिशा व तलवारीचा फटका फिरला ती दिशा यांचे नाते चित्रपटातील लॉजिकइतकेच रानोमाळ हरवले आहे. कधीतरी फायटिंगची दिशा पाहून, "अरे ती फौज तिकडून येत होती ना?" असेही प्रश्न पडतात. मधेच सिद्दी साइडचा एक जण आरामात जवळ एका दगडावर बसून बंदुकीत दारू भरून ती तयार करत असतो. आविर्भाव असा की तोंडात चुना ऑलरेडी लावला आहे व तंबाखू मळत ही फायटिंग पाहात आहे. त्यालाही कसली घाई नाही.

मधे एक बाजींच्या घरचा पूर्ण अनावश्यक सीन येउन जातो. तो तर चीड आणणारा आहे.

बाजी पडल्यावर सिद्दी साइडचे सगळे खिलाडूवृत्तीने त्याला मानवंदना देतात. तसे ते खिलाडूच दाखवलेत. कारण प्रतिस्पर्धी लोक भर लढाईत मधे डॉयलॉग मारत असताना कोणीही त्यांच्यावर हल्ला करत नाही.

काहीतरी चर्चा किंव हालचाल होत असताना मधेच नायकाने एकदातरी हात वर करून पंजा विस्तारून उपस्थितांना गप्प/स्तब्ध करणे हा सीन असल्याशिवाय असे सिनेमे सेन्सॉर संमत करत नसावेत. तेव्हा तो ही एक मॅण्डेटरी सीन आहे.

फा Rofl
काहीतरी चर्चा किंव हालचाल होत असताना मधेच नायकाने एकदातरी हात वर करून पंजा विस्तारून उपस्थितांना गप्प/स्तब्ध करणे हा सीन >>> मला वाटलं असा सीन फक्त सिरीअल्समधेच मॅण्डेटरी असतो. चित्रपटांनाही त्याची लागण झाली वाटतं.

फा Lol
स्वतंत्र लेख हवा ऐति-हासिक चित्रपटांवर. ही लापि समजणेचे करावे. Happy

फाच्या दोन्ही पोस्टी Rofl
माझी इच्छा हीच श्रींची इच्छा"
एका ठिकाणी बाजी खुद्द महाराजांना त्यांचे वाक्य तोडून "तुम्हाला एकदा सांगितलेले कळत नाही काय?" >> हे कमाल आहे!! Uhoh
कोणीतरी लिहिलेलेल सुभा - उकडीच्या मोदकाचा बायोपिक हे वाचून पण हसू आले:)

स्वतंत्र लेख हवा ऐति-हासिक चित्रपटांवर. ही लापि समजणेचे करावे. >>> Lol होय होय. प्रयत्न करतो.

पुन्हा थँक्स लोकहो.

कसला धमाल धागा झालाय हा Lol

भाऊ विचारत होता हर हर महादेव बघायचा आहे का, तो आणि भाची जाणार होते, मी नाही म्हणाले. नंतर बघून आल्यावर म्हणाला, त्याला नाही आवडला. त्यापेक्षा पावनखिंड बरा आहे.

"त्यापेक्षा पावनखिंड बरा आहे." - प्रत्येक वेळी हे सिनेमे बार इतका खाली सेट करतात की ह्यापेक्षा आधीचा बरा वाटायला लागतो. Happy

Lol
स्वतंत्र लेख हवाच
ऐति-हासिक सिनेमात लॉजिक रानो-मावळ हरवत असणं स्वाभाविकच आहे.

बाजी पडल्यावर सिद्दी साइडचे सगळे खिलाडूवृत्तीने त्याला मानवंदना देतात. तसे ते खिलाडूच दाखवलेत. कारण प्रतिस्पर्धी लोक भर लढाईत मधे डॉयलॉग मारत असताना कोणीही त्यांच्यावर हल्ला करत नाही. >>>>हा हा हा हा हा हा मज्जाच !!!!

फार एंड... आज वाचलं हे . Biggrin

निशिगंधा वाडने मृणाल देवचा रोल केला आहे" - हा आणि सगळेच - फारच मस्त!! Lol

Pages