मला गवसलेले गीत-रामायण

Submitted by अमितव on 26 February, 2019 - 20:31

मला गवसलेले रामायण!

रामनवमीला ‘राम जन्माला ग सखी राम जन्माला’ हे दरवर्षी रेडिओवर ऐकलेलं गाणं ही बहुदा गीत रामायण या प्रकाराशी माझी झालेली पहिली ओळख. ते गाणं ऐकलं की चैत्रमासातले गंधयुक्त तरीही उष्ण वारे, आणि दोन प्रहरी क्षणभर थांबलेल्या सूर्याची लाही माझ्या अंतर्मनाला आजही जाणवते. खराखुरा राम त्रेता युगात जेव्हा जन्माला असेल तेव्हा नक्की काय झालं असेल याचं काय बहारदार वर्णन गदिमांनी केलंय! उष्णतेने कोमेजलेल्या... नाही नाही, ‘पेंगुळलेल्या’ कळ्यांना ही बातमी वाऱ्याने सांगितली आणि त्या ‘काय काय’ करत लाजत लगोलग पुन्हा उमलल्या, नगरजनांचे जथे गात नाचत चालू लागले, हर्षोल्हासात कोणी फुले, आभूषणे उधळली आणि सारा आसमंत वीणा(रव), कर्णे इतर वाद्यांच्या आवाजत आणि हास्य कल्लोळात बुडून गेला. आणि ही चराचर सृष्टी आनंदात बघून चैत्रात हक्काचं आनंदगान करणारी एक बिचारी कोकीळ मात्र आपला स्वर हरवून गोंधळलीच. हे चित्र आपल्या मनावरच इतकं कोरलं गेलंय की खऱ्याखुर्‍या दाशरथी रामालाही जरी यातलं काही कमी जास्त घडलं असेलच, तरी त्यावर विश्वास बसणार नाही.

वय वाढू लागलं तसं नंतर शाळेत किंवा गुरुपौर्णिमेला ग्रुप मध्ये बसवलेलं 'सेतू बांधा रे सागरी' आणि नंतर जोशात 'सियावर राम चंद्र की जय!' अशी केलेली वानर गर्जना किंवा 'नकोस नौके परत फिरू ग' मधलं 'जय गंगे जय भागिरथी जयजय राम दाशरथी' हा दिलेला कोरस, आणि मग त्यातल्या 'सेतू बंधने जोडून ओढा समीप लंका पुरी' अशा कळू लागलेल्या बारिक बारिक गमती!

सुरुवातीला कुशलव रामायण गाती, घे हे पायसदान, राम जन्माला ग सखी, स्वयंवर झाले सीतेचे, सूड घे त्याचा लंकापती आणि गा बाळांनो श्री रामायण यात रामायणाची सीमित असलेली गोष्ट, नंतर दरवर्षी रामनवमीला लागून असलेल्या वीकांताला धननदादा (धनंजय भोसेकर) संपूर्ण गीत रामायण डोंबिवलीत सादर करू लागला तेव्हा गदिमांनी लिहिलेली आणि सुधीर फडक्यांनी संगीत दिलेली ५६ च्या ५६ गाणी माहीतच नाही तर शेजारीच अहोरात्र चालणाऱ्या प्रॅक्टिसमुळे सगळ्या कडव्यांसकट हळूहळू तोंडपाठ झाली.

एका राजाच्या, त्यात त्रेतायुगात जन्मल्यामुळे सगळं अतीव गोडगोड असलेल्या रामाच्या अख्ख्या गोष्टीत राम सीतेचा त्याग करतो, फेक न्यूज मुळे ट्रोल झालेल्या सीतेचा त्याग करतो, हीच काय ती एकमेव क्लायमॅक्स घटना. बाकी वनवासात जा म्हटल्यावर वनवासात गेलेला, बायकोचे अपहरण झाल्यावरही कूल राहून शांतपणे सैन्य जमवून युद्ध केलेला, त्यातही चाक चिखलात गेलं की मार, नाम साधर्म्याचा फिशिंग अ‍ॅटॅक करुन मार (याचं पेटंट घ्यायला माशेलकरांना सांगा. महाभारतात पहिला फिशिंग अ‍ॅटॅक झाला म्हणावं Wink ), लाईट स्विच ऑफ करुन दोन चार जीव घे असलं काही म्हटल्या काही न करता युद्ध केलेल्या रामाच्या गोष्टीत काही नविन शोधायला, नवं इंटरप्रिटेशन करायला फारसा वाव नसावाच. पण गदिमांनी त्यातही प्रेमाच्या, त्यागाच्या, विरहाच्या आणि क्रोधाच्याही विविध छटा किती सहज दाखवल्या आहेत हे आज प्रकर्षाने जाणवतं.

दशरथ आणि कौसल्या यांच्यात कसं नातं असेल? त्यांना मुल होतं नाहीये म्हणून कौसल्या दु:ख्खी-कष्टी आहे तिच्या मनात 'मूर्त जन्मते पाषाणातुन, कौसल्या का हीन शिळेहुन' आणि 'गगन आम्हाहुन वृद्ध नाही का? त्यात जन्मती किती तारका' असे विचार येत आहेत आणि या पार्श्वभूमीवर दशरथ 'उदास का तू? आवर वेडे, नयनातील पाणी. लाडके कौसल्ये राणी' असं म्हटल्यावर तो दशरथ हाडामासाचा होउनच येतो.

राम लक्ष्मणादी भावंडे जन्मल्यावर ती कशी वाढताहेत याचं आईच्या परीप्रेक्ष्यातून केलेलं वर्णन ही अपार सुंदर आहे. सावळा गं रामचंद्र, माझ्या हातांनी जेवतो' यात 'माझ्या' ला केलेला खालच्या स्वराचा स्पर्श आणि त्यातुन निर्माण होणारी आपले पणाची, नव्हे काहीश्या स्वामित्त्वाची भावना तर निव्वळ अप्रतीम.

हेच गदिमा क्रोधाने भरलेलीही गाणी लिहिताना मात्र अजिबात हात आखडता घेत नाहीत. 'वर ही नव्हे वचन नव्हे, कैकयीला राज्य हवे, विषयधुंद राजा तर तिजसी मानतो, असे जहरी बोल लक्ष्मण आपल्या आई वडिलांना लावतो. तर आपल्या आईने आपल्याला राज्य मिळावे म्हणून रामाला वनवासाला पाठवले समजल्यावर 'माता न तू वैरिणी' म्हणत 'शाखेसह तू वृक्ष तोडिला, फळा इच्छिसी वाढ' म्हणत 'निपुत्रिके तू मिरव लेवूनी वैधव्याचा साज' म्हणायला भरत कमी करत नाही. पण लगेचच या तृषार्थ खड्गाचा मला तुझ्यावर वार करायचा आहे पण 'श्रीरामाची माय परि तू कसा करू मी वार' ही वेदना ही बोलून दाखवतो. हाच क्रोध शूर्पणखेच्या तोंडी मात्र एकदम तिरकस बाणातून सुटतो. बंधू रावणाला त्याच्या सामर्थ्याची जाणिव करुन देताना रामाने काय काय केलंय आणि तू रामाशी का लढलं पाहिजेस, का सूड घेतला पाहिजेस सांगताना 'तुझ्याच राज्यी तुझ्याहुनीही पूज्य जाहला नर. सचिवासंगे बैस येथ तू स्वस्थ जोडूनी कर' ..'सहस्र चौदा राक्षस मेले हे का तुज भूषण? ' अशा अगदी सोप्या ओळीतुन गदिमा कथा पुढे नेतात. यात सगळ्यात भावतं ते अर्थगर्भ आणि सहज समजणारं काव्य.

वरचं 'माता न तू वैरिणी' नंतर लगेचच येणार्‍या 'पराधीन आहे जगती' गाण्यातील ओळी एकदम शाळेत निबंधात घालण्याजोग्या. 'सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत', 'वियोगार्थ मीलन होते नेम हा जगाचा', 'दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ', 'काय शोक करिसी वेड्या स्वप्निच्या फळांचा' , 'मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा', 'अतर्क्यना झाले काही जरी अकस्मात'. असलं काहीबाही निबंधात लिहिलं की त्या काळी दोन मार्क जास्त मिळायचे म्हणे!

राम-सीतेतील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी ते चिरकालिन विरह वर्णन करताना तर गदिमांची लेखणी थांबत नाही.
ज्या चरणांच्या लाभासाठी,
दडले होते धरणी पोटी
त्या चरणांचा विरह शेवटी
काय दिव्य हे मला सांगता!

म्हणणारी, आणि 'जाया-पती का दोन मानिता' म्हणणारी सीता, लगेच सत्य परिस्थितीच्या आकलनाने भरताचे 'दास्य का करु कारण नसता' हे ही सांगते. सुवर्णमृगाची शिकार करायला रामाला उद्युक्त करताना त्या मृगाच्या कातड्याची मी चोळी शिवेन आणि मग 'करितील कैकयी भरत आपुला हेवा' आणि साक्षात रामाला 'त्या मृगासनी प्रभू इंद्र जसे शोभाल' असं गाजर दाखवायला ही सीता कमी करत नाही. त्याच सीतेचे अपहरण झाल्यावर राम सैरभैर होऊन कदंबाला जरा पाय उंचावून ती नदी किनारी दिसत्येय का? अशोकाच्या पल्लव- शाखा कंपित झाल्यावर त्याला काही अशुभ स्वप्न तर पडले न्हवते ना? असं विचारतो. आणि शेवटी अगदीच हताश होऊन
'घातावर आघात आपदा
निष्प्रभ अवघी शौर्य संपदा'
म्हणतो.
पण सीतेचा शोध अखंड चालू ठेवत फुलांच्या सुगंधाने 'ही तिच्या वेणी तिल फुले, लक्ष्मणा तिचीच ही पाऊले' लगेच ओळखतो.

तिकडे अपहरण झालेल्या सीतेची अवस्था तर आणखी बिकट झालेली. कधी एकदा राम रावणाचा वध करतील ही मनोमन इच्छा, पण अंतर्मनात वेगळेच द्वंद्व.
का विपत्काली ये मोह तयांच्या चित्ती
पुसटली नाही ना सितेवरची प्रीती!

या सगळ्यावर पतीपत्नीतील नात्यांचा कहर म्हणजे 'लीनते चारुते सीते' हे गाणं. हे प्रत्येकवेळी ऐकलं की आजीच्या डोळ्याच्या ओलावलेल्या कडा, हीच माझी या गाण्याची पहिली आठवण. त्याची शांत, एकेक शब्द आळवीत लावलेली अर्थगर्भी चाल आणि तितकेच आर्जवी शब्द.
हे तुझ्या मुळे गे झाले
तुजसाठी नाही केले
मी कलंक माझे धुतले
आणि
जी रूग्णाइत नेत्रांचा
दीपोत्सव त्याते कैसा
मनि संशय अपघाताचा ... मज वदवेना स्पष्ट याहुनी भलते
!!! काय सामर्थ्य आहे शब्दांचे.

आणखी एक आवडतं गाणं सांगतो आणि मग थांबतो. रामायणातील विविध प्रसंगात एक घटना घडलेली असते आणि त्यावर गदिमा आपल्या शब्द सामर्थ्याने गीत रचतात. पण युद्धभूमी वर चालू असलेल्या संहाराचे गाणे आणि त्याला बाबूजीनी दिलेली चाल आणि दोन कडवी जोडणारे मधले संगीत संयोजकाचे पीसेस.
नाचत थय थय खिंकाळती हय
गजगर्जित करी नाद समन्वय
भीषणता ती जणू नादमय...
युद्ध काल पण गदिमांनी पोएट फ्रेंडली करुन टाकलाय.
किंवा
हाणा मारा ठोका तोडा
संहारार्थी अर्थ धावती सर्व भाषिकांचे
म्हणतानाच 'मरणाहुन ही शौर्य भयंकर' हे सांगायला गदिमा विसरत नाहीत.

कुश- लव रामायण गाती म्हणून सुरु केलेल्या गीत रामायणाचा शेवट 'गा बाळांनो श्री रामायणाने' करुन गदिमा एक वर्तुळ पूर्ण करतात. ह्या भैरवीतुन वाल्मिकींचा तोंडून गाणं कसं गा, काय करु नका, काय तत्व पाळा हे फार रसाळ पणे सांगतात.

गीत रामायण कसं घडलं, त्याचे शब्द, लावलेल्या चाली, मूळ आकाशवाणीवर खुद्द लता मंगेशकर, माणिक वर्मां आदींनी लगोलग त्याला दिलेले स्वर हे मी फक्त पुस्तकात वाचलं आहे. नाही म्हणायला मूळ गाणी आजोबांनी त्याकाळी रेकोर्ड करून ठवलेली ऐकली आहेत. पण ह्या सगळ्या सांगोवांगीच्या गोष्टीहुनही गीत रामायण मला जवळचं वाटायचं नक्की कारण त्या गाण्यांतून लहानपणीचे आठवणारे दिवस, घरी पेटीवर बडवलेल्या काही ओळी असं काही असावं?का...
सात स्वरांच्या स्वर्गा मधुनी
नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी
यज्ञमंडपी आल्या उतरुनी

.. असं काही काव्यात्म असावं कोण जाणे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गदिमांची शब्दसंपदा किती विपुल होती हे जाणवतं >> अगदी. आणि एकही उणा शब्द नाही, लहान लहान वृत्तातून आशय आणि कथा झरझर पुढे जाते. ती कथा, त्याची चाल, शब्दलालित्य आधी पोचतं. मग प्रत्येकवेळी एकेक पदर उलगडत काही तरी नवं सापडतं. हे लेअर्ड सौन्दर्य फार मोहित करतं.

छान लिहिले आहे
गीत रामायण कधीच ऐकले वाचले नाही.
लिंक आहेत लेखात, चेक करायला हवे निवांत..

सुरेख लेख
अवीट गोडीची अजरामर गाणी
प्रत्येक गीताचे प्रसंगानुरूप शब्द, स्वर, लय यामुळे ते अधिक भावतात

माय प्लेजर हपा
आणि अमित तू कशाला धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद देतोयस.

मध्यंतरी राम मंदीर स्थापनेच्या वेळी माझ्या ऐकण्यात हिंदी गाणी जास्त येऊन पकलो होतो तेव्हा उतारा म्हणून आपले गीत रामायण ऐकले गेले होते त्यावेळीच आठवण झाली होती ह्या लेखाची. पण आठवत नव्हते कोणी लिहिलंय ते. मभागौदि च्या निमित्ताने जुने धागे चाळत असताना हा नजरेस पडला आणि परत वाचताना मलाही परत आवडला. तू लिहिलंयसच इतकं छान ते नवीन वाचकांनीही वाचावे वाटले म्हणून धागा वर काढला झाले!

छानच लिहील आहेत.
यानिमीत्ताने माझी एक आठवण.
हल्लीच राममंदीराच्या सुमारास मला श्रीधर फडकेंचा गीत रामायण चा कार्यक्रम याची डोळा याची देहा पहाण्याचा योग आला.
लहानपणापासून माझ्या बाबांकडून गीत रामायणाच्या अनेक कथा ऐकल्या होत्या , आमच्या कडे छापील प्रत ही आहे. त्यामुळे ही संधी दवडणे अशक्य होते. वेळे अभावी त्यांनी जास्त गाणी गायली नाहीत पण दोन गाण्यांमधलं निरुपण तितकच रोचक होतं . शब्दाशब्दातला फरक , गाण्यामागच्या कथा . सगळं फारच सुंदर होतं.
रामजन्म आणि स्वयंवर या दोन्ही गाण्यांसाठी श्रोत्यांनी कोरस दिला.
भारावून टाकणारा अनुभव.

Pages