"तुम्ही दोघांनी जर पटपट खाल्लं तरच पार्कमधे जायचंय, नाहीतर नाही" तिने नेहेमीप्रमाणे मुलांनी लवकर खावं म्हणून सांगितलं. आर्यन आणि विहान वय वर्ष पाच आणि तीन, दोघांनी आईची धमकी कितपत गंभीर आहे याचा अंदाज घेतला. आर्यनने पहिला घास तोंडात टाकला आणि "आय डोन्ट लाईक डोसा" म्हणून तोंड वाकडं केलं. विहानने तर भरवलेला घास तोंडातून फू फू करून बाहेर काढला. "त्यांना नकोय तर जाऊदे ना कॉर्नफ्लेक्स खाऊ दे त्यांना" नवर्याचा एक्स्पर्ट ओपिनियन! तोही मुलांसमोरच! तिला सुचेना की आता आधी मुलांना ओरडावं की नवर्यावर चिडावं ! "आपल्या पोटातल्या गुड बॅक्टरीयासाठी आंबवलेले पदार्थ चांगले असतात. आठवड्यात एक दिवस तरी शिजवलेला ब्रेकफास्ट खायला नको का त्यांनी! रोज कॉर्नफ्लेक्सचं खातात ना! आणि तू त्यांना खायला सांगायचं सोडून..." आता तिने आधी मोठ्या मुलाकडे, आर्यनकडे मोर्चा वळवला. तिने दामटून त्याला बसवलं आणि एक एक घास करत अक्खा डोसा भरवला .
"बॉल वगैरे काय घ्यायचं ते घे तोपर्यंत मी विहानला भरवते." विहानला भरवायला तिने घास घेतला खरा पण विहानने तोंड घट्ट मिटून घेतलं. शेवटी कंटाळून तिने तो नाद सोडून दिला. नाश्या ऐवजी विहानला एक ग्लास दूधच देण्यात आलं.
"तू त्यांना नेतेयेस खरी पण आपल्याला दुपारी राजीवकडे जायचंय ना? उशीर नाही का होणार?"
"हो रे, आम्ही येतो एक दीड तासात. तोपर्यंत तू आंघोळ वगैरे आटपून घे." तिने पटापट मुलांचे कपडे बदलले. बॉल, पाण्याच्या बाटल्या, सायकली गोळा केल्या आणि ती दोन्ही मुलांसोबत जवळच्या पार्ककडे निघाली.
स्प्रिंग (वसंत) नुकताच सुरु होत होता. रस्त्याच्या कडांना पिवळी डॅफोडिल्स उमलली होती. इंग्लंडमधल्या त्या लहानश्या शहरातला उबदार उन्हाचा छानसा दिवस होता.
छोटा विहान झूम.... झूम ..... करून त्याची तीन चाकी सायकल चालवत होता. आर्यन थोडा शांत वाटत होता. त्याने सायकल बाजूला टाकली होती. बॉल पायांनी ढकलत तो गवतावर फिरत होता. कोवळ्या उन्हात त्या दोघांना तसं खेळताना बघून तिला बरं वाटलं. लग्नानंतर तीन वर्ष थांबून त्यांनी चान्स घेतला होता. आर्यन झाला आणि राजाराणीचे एकदम मम्मी डॅडी झाले. मुलं वाढवताना काय काय करावं लागतं याचा शोध दोघांना नव्यानेच लागत होता. "म्हणजे आपल्या आईवडलांनीसुद्धा इतक्या खास्ता खाल्ल्या असणार" हेसुद्धा आत्ता जाणवू लागलं होतं. आर्यनला भावंडं असावं म्हणून पुन्हा मुलाचा विचार सुरू झाला आणि आर्यननंतर बरोबर दोन वर्षांनी विहान आला.
विहान होण्यापूर्वी त्यांना दोघांनाही आर्यांची इतकी काळजी वाटत होती! नवीन बाळामुळे आर्यनकडे दुर्लक्ष होता कामा नये हे त्या दोघांनी एकमेकांना आणि स्वतःला हजारेक वेळा बजावलं होतं. त्यात आर्यनचा स्वभावही शांत. मनातलं सगळं सांगतो की नाही असा तिला कधी कधी प्रश्न पडायचा. त्या मानाने विहान मात्र लहान असूनही बिनधास्त. पहिल्या मुलाला वाढवताना आईवडलांच्या मनात जी अतिरिक्त काळजी, भीती असते, ती मुलांच्या स्वभावातही दिसून येते असं तिने इंटरनेटवर एका लेखात वाचलं होतं. झालंच म्हणजे.... आपण फार काळजी करतो हीसुद्धा एक काळजी करण्याची गोष्ट आहे तर! असं तिला वाटलं होतं. पण पुढे त्यात असंही म्हटलं होतं की हेच आईवडील पुढची मुलं होईपर्यंत पालकत्वाला बर्यापैकी सरावलेले असतात त्यामुळे तेवढी काळजी केली जात नाही. परिणामी मुलंसुद्धा तशी रिलॅक्सड असतात...... असं बरंच काही सांगितलं होतं . बालसंगोपनाबद्दल ती बरंच वाचत असे. दोन आयुष्य आपल्याला घडवायची आहेत, केवढी मोठी जबाबदारी! आयटी मधली स्वतःची नोकरी, त्यात परदेशामधलं डू इट युअरसेल्फ (स्वतःची कामे स्वतः करा) कल्चर आणि मुलं ..... तारेवरची कसरतच होती खरी!
तिच्या डोक्यात असे वेगवेगळे विचार चालू होते. परत तिची नजर मुलांकडे गेली. विहान मजेत सायकल चालवत होता. आर्यन मात्र नुसताच उभा होता. "सायकल नाही का चालवायची आज?" तिने त्याच्या जवळ जाऊन विचारलं.
"नाही"
"बरं मग बॉलने खेळूया का आपण?"
"ओके" म्हणून मग ते दोघे बॉलने खेळू लागले. पण आर्यनचा काही खेळण्याचा मूड दिसत नव्हता. "काय झालंय? थकलायस का तू?"
"आय अॅम बोअर्ड" 'बोअर्ड' ऐकल्यावर तिला इतका संताप आला. काय अर्थ आहे या वागण्याला. एवढा छान दिवस आहे. या थंड देशांमध्ये हिवाळ्यात महिनोन्महिने मुलांना थंडी पावसामुळे बाहेर खेळायला नेता येत नाही याचं तिला किती वाईट वाटायचं. मग काय आयपॅडस, कॉम्प्युटर्स आहेतच. जरा चांगला दिवस असेल तर मुलांना बाहेर खेळायला नेण्याचा त्यांचा आटापिटा असे. आतासुद्धा घरची आवराआवर, इस्त्री अशी कितीतरी कामं टाकून ती मुलांना पार्कमध्ये घेऊन आली होती आणि हे महाराज म्हणतायत "बोअर होतंय" त्याला ओरडायला ती तोंड उघडणार इतक्यात आर्यनचा एक मित्र आणि त्याची आई त्यांच्याच दिशेने येताना दिसले. मित्राची आई - तिची मैत्रीण, तिच्याशी बोलू लागली. आर्यनचा मित्र त्याला सोबत खेळायला बोलवू लागला. पण आर्यन अजिबातच खेळायच्या मूडमध्ये नव्हता. "काय झालं ग? आज हा खेळत का नाही?" तिच्या मैत्रिणीने सहजच विचारलं. "काय माहीत! आत्ता घरी बरा होता. पार्कमध्ये जाऊया, जाऊया चाललं होतं. म्हणून सगळी कामं ठेऊन मी यांना खेळायला घेऊन आले तर बघ ना...... निघूच आम्ही आता. हा खेळतच नसेल तर काय उपयोग...." मैत्रिणीचा निरोप घेऊन ती निघाली.
मुलांचे हात पकडून ती घरच्या दिशेने निघाली. आर्यनचा हात जरा घट्टच पकडून तिने विचारलं , "काय झालंय तुला? का नुसतं तोंड पाडून ठेवलंय ? घाईघाईने तयारी केली, सगळी कामं सोडून मी तुम्हाला खेळायला घेऊन आले, तो विहान बघ कसा खेळतो. तुझाच काय प्रॉब्लेम आहे! नंतर बाहेर जायचंय, तुम्हाला खेळायला वेळ मिळावा म्हणून मी ब्रेकफास्ट सुद्धा केला नाही, तशीच आले. मला थँक यू नकोय कोणाकडून पण तुम्ही तरी नीट खेळा. सगळं करून तुझं तोंड असं पडलेलंच रहाणार असेल तर कशाला करायचं मग! आता परत कशाला आणेन मी तुला पार्कमध्ये!" आर्यनचे डोळे डबडबायला लागले होते. ती गुश्यात , तो रडवेला आणि मम्मी दादाला नेमकी का रागावतेय ते कळत नसल्याने गोंधळलेला, दादाकडे काळजीने बघणारा विहान, तिघे घरी पोहचले.
त्यांचे चेहरे बघून काहीतरी बिनसलंय याची नवर्याला कल्पना आली. "तू डोसा खाल्लास का?" त्याने तिला विचारलं. "नाही. घेते आता" "मला वाटतं की ते...." त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच बाहेरच्या खोलीतून आर्यनचा आवाज आला. त्याने खाल्लेलं सगळं उलटलं होतं. डोसा पचला नव्हता.
"मी तुला तेच सांगणार होतो. डोश्याचं पीठ जास्तच आंबलंय बहुतेक. तू चव नव्हती पाहिलीस का?"
"नाही रे!" तिने धावत जाऊन आर्यनला उराशी कवटाळलं. त्याचं तोंड धुतलं. कपडे बदलले. त्याला साखर दिली. तिच्या डोळ्यांतून पाणी येत होतं. "सॉरी रे पिल्ला. मीच जबरदस्ती तुला डोसा खायला लावला. त्यामुळे तुला अन्ईझी वाटत होतं म्हणून तू शांत होतास आणि मी तुलाच ओरडले..... आय अॅम सो सॉरी"
"इट्स ओके मम्मी" आर्यनने चिमुकल्या हातांनी तिचे डोळे पुसले आणि तिला मिठी मारली. उरलेला दिवस छान गेला.
संध्याकाळी तिने आईला फोन केला. आईला तिने काय झालं ते सांगितलं. आपण किती वेड्यासारख्या वागलो या विचाराने तिची तिलाच लाज वाटली. एवढ्याश्या मुलाला अनाठायी एवढं ओरडलो म्हणून वाईट तर इतकं वाटलं ..... आईला सांगताना पुन्हा तिचे डोळे भरून आले, "माझ्याकडून इतक्या चुका होतात गं आई! मी खूप प्रयत्न करते सगळं नीट करायला, त्यांना सगळं बेस्ट द्यायला, जसं तू माझ्यासाठी केलंस, पण माझं सारखं सारखं चुकतं .... काय माहीत उद्या आर्यन आणि विहानला माझ्या काय आठवणी रहाणार आहेत, सारखी सारखी चुकणारी आई असं त्यांना माझ्याबद्दल वाटेल का गं!"
"अगं वेडे किती विचार करतेस! आर्यनच्या जन्माआधी तू, तू होतीस, इंजिनिअर होतीस पण आई होतीस का? नाही ना? फक्त मूल जन्माला येत नाही. मुलाच्या जन्माबरोबर आईसुद्धा जन्मत असते. मूल शिकत असतं आणि आईसुद्धा शिकत असते, कधी मूल चुकतं आणि कधी आईसुद्धा चुकत असते. पण नंतर पुढे जाऊन काय लक्षात रहातं माहितीये , फक्त प्रेम! आणि मी चुका केल्या नाहीत म्हणून कोणी सांगितलं. पण चुकांहून अधिक तुझ्या लक्ष्यात काय राहिलं की मी 'कित्ती ' केलं . कारण बाळा, कोणत्याही केलेल्या गोष्टीपेक्षा त्या मागचा हेतू हा जास्त महत्वाचा असतो. हेतू चांगला असेल तर कृतीमधली लहान सहान चूक चालून जाते. आणि तू जे काही करत्येस ते प्रेमापोटीच ना. त्यांना प्रत्येक गोष्ट बेस्टच मिळावी म्हणून स्वतःची दमछाक होईल एवढा आटापिटा नको करत जाऊ. तुझ्या बाळांची काळजी घेतेसच, माझ्या बाळाचीसुद्धा काळजी घेत जा." आईशी बोलून तिच्या मनावरचं मळभ गेलं. आर्यन आणि विहानच्या पावलांचा दडा दडा धावल्याचा आवाज तिच्या खोलीच्या दिशेने यायला लागला. "मम्मी कॅच " म्हणून तिला कळायच्या आत, आर्यनने तिच्या दिशेने बॉल फेकला. एका हातात मोबाईल धरलेल्या तिने झपकन दुसर्या हाताने कॅच पकडला. "ये ऽऽऽऽ...." आर्यन आणि विहान खूष होऊन ओरडले आणि तिला येऊन बिलगले. चुकणार्या आईचे सगळेच कॅच काही सुटत नव्हते
आनन्दिनी
खुप छान लेख खरच वाचता वाचता
खुप छान लेख खरच वाचता वाचता डोळ्यात पाणीच आले.
फार सुंदर लिहिलंय. खूप आवडलं.
फार सुंदर लिहिलंय. खूप आवडलं.
छान लिहिलंय !
छान लिहिलंय !
तुमच्या कथा खूप सुरेख असतात,
तुमच्या कथा खूप सुरेख असतात, छान वाटते वाचायला.
ही तितकीशी नाही आवडली. इथे बऱ्याच जणींना रिलेट झाली म्हणजे बऱ्याच घरात असे प्रसंग घडत असावेत असे म्हणावे का? असो. मला आपले विचार घरातल्या बाकीच्यांवर लादून सगळ्यांचाच आनंद संपवायचा आणि तेही आपला मुळात तसा काहीही हेतू नसताना हे आवडत नाही. म्हणून गोष्ट तितकीशी आवडली नाही, अशा वागण्याचं थोडं समर्थन केल्यासारखं वाटलं.
ईतक छान लीहीले आहे ना!
ईतक छान लीहीले आहे ना!
हा लेख मला what's app वर आलाय
हा लेख मला what's app वर आलाय
खुप छान ..
खुप छान ..
हा लेख मला what's app वर आलाय
हा लेख मला what's app वर आलाय>>> मला पण, आजच. पण याच नावासहीत ते बरे झाले.
Khoop chhaan.
Khoop chhaan.
{{{ फक्त मूल जन्माला येत
{{{ फक्त मूल जन्माला येत नाही. मुलाच्या जन्माबरोबर आईसुद्धा जन्मत असते. }}}
हे वाचून एक जुना जोक आठवला.
बाळ्याला एकदा शाळेत त्याचे शिक्षक विचारतात, "तुझ्या बाबांचं वय काय?" तो उत्तरतो, "६ वर्षं". शिक्षक आश्चर्याने उत्तरतात, "काय? आणि मग तुझं वय काय?" बाळ्या पुन्हा एकदा - "सहा वर्षे" शिक्षक - "हे कसं काय शक्य आहे?" बाळ्या - "मंग.. माझा जन्म झाल्यावरचे ते बाबा झाले ना? त्या आधी ते बाबा कुठे होते?"
खूप छान
खूप छान
मला का कोण जाणे, ही गोष्ट
मला का कोण जाणे, ही गोष्ट वाचुन बाबाचाच राग येतोय. किती ती आईची मरमर बाळांना खाउ घालायची, डोश्याचे वाटण बिटण बनवायची. आयता डोसा खाणार्या बाबाने अॅटलिस्ट तो वेळेत चाखुन पहायला हवा होता. कोर्न्फ्लेक्स दे. स्वतः काय मेहंदी लावुन बसलेला का? आणि बायको मुलांची वरात घरी परत आल्यावर मग सांगतो पीठ आंबले ते. घरोघरी असेच बाबा लोकं जास्त झालेत.
आज मी हा लेख whats app वर
आज मी हा लेख whats app वर पाहिला. खाली माधुरी ताईचं नाव होत..
सर्व प्रतिक्रियांबद्दल
सर्व प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार. It feels so nice to be appreciated.
अस्मिता, आनंदिनी हे माझं म्हणजे माधुरीचंच पेन नेम आहे
एक शंका आहे. हे असं
एक शंका आहे. हे असं टोपणनावाने लिखाण का केले जाते? त्याचे फायदे आणि तोटे काय असतात?
सचिन, मला वाटतं की टोपणनावाने
सचिन, मला वाटतं की टोपणनावाने लिहिण्याचे फायदे म्हणजे
तुमच्या पसंतीचं, तुमच्या पर्सनॅलिटीला आणि लिखाणाला साजेसं नाव तुम्ही स्वतः निवडू शकता.
लेखकाची अनॉनिमिटी (जसं साजन पिक्चरमध्ये दाखवलंय ) ठेवता येते.
आणि मला वाटतं की जुन्या काळात किंवा काही ठिकाणी अजूनही आडनावावरून लगेच जातीचे आडाखे बांधले जातात आणि त्यामुळे लिखाणाबद्दल पूर्वग्रह होण्याची शक्यता असते. ते काही अंशी टाळलं जाऊ शकतं.
तोटे म्हणायचे झाले तर तुमचं खरं नाव प्रसिद्ध होत नाही. कवी ग्रेस यांच्या कविता छान असत. मला आवडायच्या पण आजही मी त्यांना ग्रेस म्हणूनच ओळखते. खरं नाव ठाऊक नाही. असं होतं!
@ आनन्दिनी, माझ्या प्रश्नाचे
@ आनन्दिनी, माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल आपले आभार.
छानच.
छानच.
"तुझ्या बाळांची काळजी घेतेसच,
"तुझ्या बाळांची काळजी घेतेसच, माझ्या बाळाचीसुद्धा काळजी घेत जा." >> सुंदर अगदी आतून आल्यासारही फिलींग आली
खुपच छान...
खुपच छान...
सुट्सुटीत मान्ड्ल आहे.
माझही अस झाल एकदा :\
निरागस असतात लहान मुल, बिचर्याना काही बोलता येत नाहि... सगळ नव्याने कळत असत, आणि नसत पण...
त्यात आपली जबर्दस्ती केलच पहीजे, खाल्लच पहीजे...
माझा छोटासा अनुभव,
भाताची खिचडी केली होती मी, मीठ जरा जास्त झालेल, माझी लेक खाईना... माझ्या अन्गात आईपणा सन्चारला... भरवली बळ बळ, वर कथेत लिहील्याप्रमाणे परीणाम झाला... नन्तर खाउन बघीतल्यावरची अवस्था आन्दिनी ने लिहील्याप्रमाणेच की मग... ;(
छान लिहिलंय
छान लिहिलंय
वाह किती सुंदर कथा आहे.
वाह किती सुंदर कथा आहे.
खुप छान!!!
खुप छान!!!
Pages