वन्ही

Submitted by रैना on 21 January, 2010 - 06:09

कजरारी अखियाँ रह गयी रोती
नथली से टुटा मोती रे.. (पारंपारिक)

"राधिका आप असाईनमेंट कर लिये हो का?" असं त्यांनी घाम पुसत पुसत खुर्चीत टेकता टेकता त्यांच्या नेहमीच्या खास बिहारी शैलीत विचारलं.
लायब्ररीत खिडकीबाहेर शुन्यात पाहत असलेली ती दचकली एकदम. बाहेर तोच तो अंतर्बाह्य पेटुन उठलेला वेडाबागडा लालभडक गुलमोहोर, झाडाखाली पाकळ्यांचे पिवळशेंदरी गालीचे,डांबर वितळेलसा सणसणीत तापलेला उन्हाळा, असह्य कोरडे फक्क वा-याचे झोत, वा-याच्या फुंकरीबरोबर हलणा-या लगडलेल्या गुलमोहोराच्या फांद्या लपलपत्या पण दोलायमान विझेल न विझेलश्या ज्वाळेसारख्या भासणा-या. आत सावलीत बसल्याबसल्यासुद्धा गुलमोहोराकडे पाहणा-याला क्षणभर दीप्तीची ग्लानी यावी ! आतली जुल्माची भयाण शांतता, करकरणारे लांब दांड्यांचे फॅन, वसकन अंगावर येणारे तुसडे ग्रंथपाल. भवती अभ्यासाच्या नावाखाली खिदळत असलेली मुलं मुली, चिठ्ठ्या आदानप्रदान करत असलेली प्रेमी युगुलं, पुस्तकांच्या चळतीवर डोकं ठेवून दुपारच्याला गाढ झोपलेले काही श्रमिक विद्यार्थी, पेनानी कुरुकुरु लिहीणारे काही तुरळक चष्मिष्ट घासू स्कॉलर्स आणि एखाद दुसरे नवीनच टेंपरवारी लागलेले उत्साही प्राध्यापक. सगळ्यांनी रिडींग हॉल जवळपास भरला होता.

"का हुआ? बरं वाटत नाहीये का तुला ? सोये नही हो का ? आणि ती तुझी आगाऊ मैत्रीण तिच्या त्या मित्रासोबत बाहेर भेटली मला. चप्पडगंजू है साला. " श्रीवास्तवजींचा हा खास शब्द.
त्यांच्या वयाकडे आणि ब-यापैकी हुद्द्याकडे पाहून त्यांना फारसं कुणी दटावत नसत, तरी ग्रंथपालांनी एवढा आवाज केल्याबद्दल त्यांच्याकडे पाहून खुनशी चेहरा केलाच होता.
एवढं झालं तरी हू नाही का चु नाही. एरवी या पोरीने आतापावेतो त्यांना नवीन पुस्तकाचा गोषवारा सांगीतला असता आणि त्यांच्या अनुपस्थितीत अजून कोणीतरी कोणाशी सूत जमवल्याचे गॉसीप सांगीतले असते. नावाला हसून असाईनमेंट तिने काही न बोलता त्यांच्या हवाली केली. नोकरी सांभाळुन इतक्या वर्षानंतर पुन्हा वेळ काढून शिकायला येणा-या श्रीवास्तवजींबद्दल राधिकाला माया होती. तिच्या आणि इतर एकदोघांच्या वह्या उतरवून ते कसेतरी सबमिशन पुरे करत. जितक्यांदा येत, त्याहून अधिक वेळा कामानिमीत्ताने तास बुडवावे लागत त्यांना. आता या वयात मला काही डिग्री मिळवायची नाही, मी आपला शिकायला येतो असे ते म्हणत, आणि वर्षानुवर्षे तासाच्या घंटेबरोबर लाळ गळु लागणा-या पावलोवच्या कुत्र्यासारखा विषय आपोआप ओकणा-या प्राध्यापकांना त्यांच्यामुळे पूर्ण सज्ज होऊन यावं लागत असे. दामटायला आणि थातुरमातुर कारणं देऊन गप्प बसवायला ते काही नेहमीचे विद्यार्थी नव्हते ! पोरांच्या वतीने प्राध्यापकांशी ते बोलत, पोरांना मधुन मधुन खायला घालत, क्वचित स्वतःची गाडी वापरायला देत, आपले अनुभव मोकळेपणानी सांगत, सतत उपदेश करत नसत आणि त्यांची टर उडवली तरी रागवत नसत, त्यामुळे पोरंपोरी त्यांच्यावर तशी खुश असत.

काहीतरी पाणी मुरत असल्याचा संशय श्रीवास्तवजींना तसा ब-याच दिवसा पासुन होताच.
हळुहळू विझत चालली आहे ही मुलगी. काहीतरी बिनसलय खास. धारदार प्रश्न विचारणारी अतिशय मेहनती बुद्धिमान मुलगी. प्रशासकीय अधिकारी व्हायचं म्हणते आहे. होणार यात त्यांना कसलीही शंका नव्हती. अशी मुलं लाखात एक. त्यांची संवेदनशीलताही. वयही अडनिडं.
आपल्याला वयाच्या या टप्प्यावर न भेटता आधी भेटली असती तर.. असं त्यांनाही (क्वचितापेक्षा किंचीत जास्त वेळा) कधीतरी वाटल्याशिवाय रहात नसे. आणि भेटली असती तरी आपण तिची बुद्धिमत्ता झेलु शकलो असतो का हा प्रामाणिक प्रश्नही त्यांना पडे.
आपण शिंग मोडुन वासरात शिरलोय याची जाणीव त्यांना पुन्हा एकदा झाली. पोरंपोरी काका म्हणत नव्हते एवढंच. त्यांची स्वतःची मुलगी हिच्यापेक्षा ८-९ वर्षांनीच तर लहान. प्राथमिक शाळेत शिक्षीका असणा-या बायकोला नव-याचं हे शिक्षणाचं नवीन खूळ अजिबात पसंत नव्हतं. करायचय काय या वयात शिकुन? तरूण पोरी पहायला जाता ते सांगा आधी, हाही आरोप वाढत्या भांडणाबरोबर होऊन गेला होता. नेहमीचीच भांडणं आणि नेहमीचेच आरोप, नेहमीचाच शरीरधर्म, वय आणि जाडी वाढलेली चारचौघांसारखी सामान्य बायको, सासुसुनांची खडाजंगी, अश्रुपात, वाढलेलं बी.पी/ साखर, आजारपणं आणि थकबाक्या, चुकवलेले हप्ते, केलेली नोक-या आणि तडजोडी.
संसारात राहुनी काय झालो
पोराबाळांचा फक्त बाप झालो (आरती प्रभू, नक्षत्रांचे देणे)
एकमेकांच्या दृष्टीस शक्यतोवर कमी पडावे या रेषेवर संसार कधी येऊन ठेपला हे समजलंच नव्हतं त्यांना. नवीन लग्न झाल्यावर वर्ष दोन वर्षातच त्यांच्यातील सर्व धग संपून गेली. उरला फक्त संसार. इतक्या वर्षानंतर त्यांना नवीन लग्न झाल्यावरचे गुलाबी दिवसही फारसे आठवत नसत. त्या सगळ्या नवलाईच्या महिन्यादिवसांची मिळून एकच पुसटशी स्मृती त्यांच्या कर्णेंद्रियात होती - काचेच्या बिल्लोराची नाजुक किणकिण. आताशा बायको बांगड्या घालते की नाही हेही त्यांना सांगता आलं नसतं. संसाराचा गाडा ओढताना त्याचा खटारा कधी झाल्याचं कळलंच नाही. सगळं यथासांग चाललं होतं. चारचौघांच्या संसाराची गत तीच त्यांच्या. दु:खी वगैरे नव्हते ते, किंबहूना इतकं काही आसुसुन वाटण्याइतकी संवेदनशीलता त्यांनी जोपासली नव्हती. तरी आपण जगतो त्याला आयुष्य म्हणावे का असं त्यांना कधीतरी वाटुन जाई, तेही तेवढ्यापुरतच. एका नेहमीच्या पराकोटीच्या भांडणाच्या तिरमीरीत, बायकोवर चांगला सूड म्हणून त्यांनी ही प्रौढशिक्षणाची टुम काढली होती. बायकोलाही आदळआपट करायला नवीन कारण अनायसे चालुन आलंच होतं. आणि दिवसाचे अजून काही तास एकमेकांच तोंड पहायला लागणार नव्हतं, हे तसं तिच्याही पथ्यावरच पडलं होतं, पण तिने कबुल केलं नसतं. हे श्रीवास्तवजींनाही चांगलंच ठाउक होतं.
कधी या वयात शिकण्याच्या तळमळीबद्द्ल प्राध्यापक दोन कौतुकाचे शब्द बोलत तेव्हा त्यांना हे सर्व आठवे. पोरं कधी खुशीत येऊन " श्रीवास्तवजी यु आर कुल" म्हणत, आणि कधीतरी त्यांची लेक बालसुलभ प्रेमाने त्यांच्या गळ्यात पडे हीच त्यांच्या आयुष्यातली एकमेव दाद होऊन राहिली होती.

तिनी लिहीलेलं वाचून काढता काढता या मुलीच्या प्रखर बुद्धिमत्तेविषयी त्यांना पुन्हा एकदा विस्मय वाटला. सरळ विचारावे का हिला कुठे प्रेमाबिमात पडलीस का म्हणुन? नाहीतरी अलिकडे तो दामल्या हिच्या जरा जास्तच अवतीभवती दिसायचा. पडली तर बरंच आहे, जरा बाहेरच्या जगाची हवा लागेल या मुलीला. तरीपण तो दामल्या काही त्यांच्या खास मर्जीतला नव्हता.
बाहेर आता सापांनी टाकलेल्या फुत्कारांसारखे वा-याचे गरम झोत वाढले होते.
राधिका एकाच पानावर रेघोट्या ओढत बसली होती. समोर पुस्तक उपडं पडलं होतं. आजारपणातून उठल्यासारखा ओढलेला चेहरा, गालावर दिसतील न दिसतीलश्या पुसटश्या वाळलेल्या मळकट अश्रुंच्या रेषा.

"चलिये राधिकाजी, चाय पीने चलते है, अरे चSSलो भी....."
"श्रीवास्तवजी आज नही प्लीज, पढाई करनी है, एक्झॅम सरपे है "
"जिस तरह से आप पढ रही हो, उससे अच्छा बाहर बैठो अम्माजी. एक घंटेमे एक पन्ना तो आपने पलटा है नही. बात करती है. "

त्या गोडढुस्स साखरेच्या पाकाला शिव्या घालत श्रीवास्तवजींनी दोघांसाठी चहा घेऊन जवळच्या पाय-यांवर बसलेल्या राधिकेला गाठलं. एरवी ती सहजासहजी अशी कोणाही बरोबर चहा वगैरे पिताना दिसली नसती, पण ते ज्येष्ठ असल्याकारणाने तिच्या कॅम्पसवरच्या प्रतिमेला तसा धोका नव्हता (असा तिचा समज होता !).
"कहिये पढाई का क्या हाल है ?"
"...ठिक ही है... "
या नी त्या गप्पा मारत, दामल्याचा विषय सफाईने काढत श्रीवास्तवजींनी अंदाज घेतला. हाती काही लागलं नाही. आता मात्र त्यांना जरा काळजी वाटु लागली. पुन्हा अभ्यासासाठी ते दोघं परतले, इतर मुलं मुलीही आले आणि जोरात अभ्यास चालु झाला. एकदा दणक्यात अभ्यास चालु झाला की श्रीवास्तवजींनाही इतर सगळ्याचा विसर पडे. शिवाय त्यांना बुडालेले विषय भरुन काढायचे असत.

रात्र झाली या गोंधळात. राक्षसाच्या नाकपुडीतल्या नि:श्वासासारखे अजूनही गरम वा-याचे झोत फिसकारत येतच होते. रातीच्या अपु-या उजेडातही गुलमोहोर तसाच भासत होता चेतवलेला, दिस निवल्याचं त्याला तसं घेणंदेणं नव्हत.
प्रत्येकजण आपापल्या घरी जायची वेळ पुढे पुढे ढकलु लागला. घरी पोरांना आईबापांच्या आणि श्रीवास्तवजींना बायकोच्या उलटतपासणीला सामोरं जायचं होतं. गाड्यागाड्यांपाशी गप्पांचे फड जमु लागले. पोरांचे पाय निघेनात.
मुलींना घरी सोडायची वगैरे व्यवस्था मुलांमध्ये मोठ्या हाताने वाटुन देऊन श्रीवास्तवजी निघाले.
ही मुलगी दिसेना तेवढ्यात. तिला सोडतो म्हणुन सांगीतलं होतं ना? दामल्याही नव्हता आज, त्यामुळे तिला घेऊन गेल्याची शक्यताही नव्हती. गेली कुठे ही मुलगी ?
तिच्या नेहमीच्या रस्त्यावर त्यांनी गाडी दामटली, तर ही जवळजवळ धावताना दिसली.
"राधिका, अंदर बैठिये बेटा. ऐकायला आलं नाही का घरी सोडतो सांगीतलं ते. ?"
"देर हो रही थी इसलिये.... " पोरीचा चेहरा ओशाळा ओशाळा झाला. धडपणे सफाईदार खोटं बोलायला अजून शिकायचं होतं हिला.
"का बात है राधिकाजी ? " आपल्या बाजूची खिडकी उघडता उघडता श्रीवास्तवनी विचारलं. आता तिच्या बाजूची खिडकी उघडतील, रिअर व्ह्यु मिरर ठिक करतील. या माणसाच्या हाताचा ओझरता जरी स्पर्श आपल्याला झाला तर पळुन कसं जाता येईल असा विचार राधिकाच्या डोक्यात आला. श्वास रोखुन ती वाट पाहू लागली.
"कुछ हुआ है राधिकाजी, परचे आ रहे है. बहूत उम्मीदे है आपसे. प्रोफेसर मणी भी कह रहे थे कुछ दिन पहले..."
"काय म्हणत होता तो हरामखोर माणुस ?" असं फाडकन तिच्या तोंडुन निघालंच त्याबरोबर श्रीवास्तवांचे प्रवचन थांबले.
"काहे ? तमीझसे बात किजीये, थोडे सनकी जरुर है लेकीन है तो आपसे बडे. प्रोफेसर आदमी है. ये बात ठिक नही है राधिकाजी. आप स्टुडंट लोग को लगत है, दुनिया जीत ली है का आप लोगो ने. अरे अभी देखा ही क्या है आपने, ४ किताबें क्या पढली...." श्रीवास्तव फुटले की हिंदीत फुटत. सात्विक संतापाने ते अजून काही ऐकवणार होते तो शब्दागणिक धुमसणा-या त्या पोरीच्या चेह-याकडे पाहून त्यांनी वाक्य गिळली. मध्यान्हीच्या गुलमोहोराप्रमाणे पिवळाधम्मक सुर्य अंगात वस्तीला आल्यासारखा दिसत होता तिचा चेहरा.
या पोरांनी काय भानगडी करुन ठेवल्यात कोण जाणे हे त्यांच्या मनात येतय तो त्यांना जाणवलं, ही मणींच्या तासाला अलिकडे बसल्याचं आठवत नव्हतं. हिला सरळ विचारुन काही फायदा नाही.
चार पावसाळे जास्त पाहिलेल्या श्रीवास्तवांनी एकदम दामल्याचा विषय काढला. "आज तुझा तो दामल्या दिसला नाही, एवढी परीक्षा जवळ आली आहे, गेलाय कुठे उंडारायला ? " एवढे म्हणताच तिच्या मनातला गढुळ ओहोळ डुचमळ डुचमळ करीत वाहू लागला, गुलमोहोराच्या रंगीत पाकळ्यांना घेऊन.
आपल्या गाडीत तरुण मुलगी हमसून रडताना कोणी पाहिली तर आपलं शिक्षण संपलच. कशाला या पोरांच्या भानगडीत पडलो आपण? मरेनात का!
त्यांना तसं वाटलं नाही असं नाही, पण तिला शांतवायला हात वगैरे लावणे त्यांच्याच्याने झाले नसते. पोटात तुटलं त्यांच्या. त्याबरोबरच त्यांनी आसपास कोणी ओळखीचं दिसत नाहिये हे नीट पाहून खात्री करुन घेतली आणि एकएक पळ मोजू लागले.

हळुहळु बाहीने नाकीडोळी पुसत हमसत शब्द उमटु लागले.
"तुम्ही आला नव्हता मध्ये आठवडाभर. मणी म्हणाले अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडतो. बस मिळेपर्यंत थांबले माझ्यासोबत... एवढ्या डॉक्टरेट माणसानी माझ्यासाठी थांबावं, छान वाटलं पण नजर वेगळीच.... खात्री होईना. काहीतरी भास झाल्यासारखं वाटलं. दुस-या दिवशी तसाच माझ्यासोबत वाट पहात थांबला कुत्रा आणि अंगावर हात..... " (इतकी किळस आली स्वतःची. ओरडायलाही सुचलं नाही. एक बस आली. काय कुठली न पाहता चढले सुन्न होउन. कशीतरी घरी पोचले. रात्रभर अंगावर झुरळं फिरत असल्याचा भास होत होता. अजूनही होतो. एवढी भाषणं देणारी मी पण त्याला चपलेनी बडवायला जमलं नाही. अजूनही तक्रार करायची हिम्मत होत नाही.)
"घरमे किसीसे कहा ? " (साला कमीना XXXX. और अब ये लडकीके पेपरका क्या होगा. इसका गोल्डमेडल तो गया. गनिमत है इज्जत बच गयी. हे भगवान.!! श्रीवास्तवांच्या हृदयाची धडधड वाढू लागली, हातापायाला कंप फुटला. एक किंचीत पाव क्षण अगदी जवळून पण बाजूला सरपटत जाण्या-या सापासारखा, मणीबद्दलचा हेवाही त्यांना जवळजवळ चाटुनसा गेला. त्याची जीभ गुल्लेरानी मारलेल्या खड्यासारखी त्यांना नेमकी लागणार एवढ्यात क्षीणश्या विवेकानी आणि लाजेने त्यांचा ताबा घेतला. मग त्या हेव्याला भिऊन त्यांना आपल्याच अस्तित्वाची धास्ती वाटली.)
"कोणाला सांगणार. ? " (आईवडिल त्यांच्या व्यापात. आणि त्यांना सांगीतलं तरी मला कोर्स सोडायला लावण्याशिवाय ते काही करणार नाही. शिवाय अजून याहून काही जास्त झालं नाही याचचं त्यांना जास्त समाधान वाटेल. खोटं कशाला बोला? अश्रुंच्या उत्पातात, मनाला अगणित धुमारे फुटले असतानाही, हे सुक्ष्म समाधान तिलाही वाटलंच होतं की ! शरीराच्या कुठल्या अवयवाचे रेटकार्ड आपल्याकडे जास्तं असतं हे माहित होतं तरी यावेळेस तिला चांगलंच उमजलं होतं. शी: ! काय हा गलिच्छ विचार. जग जिंकु पाहणारं पोरपण असं विजेच्या झटक्यानी संपायला नको होतं असं तिला गेल्याकाही दिवसात वाटे.)
"कोई है जिसे तुम खुलकर बात कर सको.." (नक्की काय केलं हे विचारायला श्रीवास्तवांची जीभ रेटत नव्हती. झाल्या गोष्टीचा बभ्रा व्हायला नको पण पोरीची घालमेल बघवत नव्हती.)
".....दामले.. त्याला कसंतरी सांगायचा प्रयत्न केला..... तो म्हणाला..... मीच......." ( मीच .....लोकांना आकृष्ट करते म्हणे....नेहमी कमीझवर ओढणी घ्यायला हवी होती, तर हा प्रसंगच आला नसता म्हणाला......प्रेम होतं म्हणे त्याचं माझ्यावर आणि चांदण्या रात्री टेकडीवर नेणार होता चंद्र पहायला. तेव्हा स्वतःचा नक्की काय इरादा होता त्याचा ? शी! ही माझी अक्कलहुशारी. असल्या माणसावर चालले होत्ये प्रेम करायला. पुरुषांची जातच हलकट ! पण...... पण त्याचं म्हणणं बरोबर असेल का? कोणीतरी वळुन पाहीलं की तेवढ्यापुरतं बरं वाटायचं पण ते सगळ्यांनाच वाटतं ना ? पण आधी दामल्यानी हात हातात घेतला की छान वाटायच हे खरं, हुळहुळ कापरं भरायच,अजूनही हवहवंस वाटायचं हेही, पण म्हणुन....
आता कोणी वळुन पाहिलं की भडभडून ओकारी होईलसे वाटते. डोक्यापासुन पायापर्यंत बुरखा घालुन गप झाकुन पडावसं वाटतं. ओंगळ...ओंगळ...नजरांची गांडुळं कायेत वळवळत रहातात)

आता हिला काय म्हणावं दिवंगत पोरपणाच्या सांत्वनार्थ? श्रीवास्तवजी लटपटले. (बाई रामायणापासून युगानुयुगे चालत आलेली ही अग्निपरिक्षाच आहे. कितीही बुद्धीमान झालीस तरी आहेस मादी, हे विसरुन कसं चालेल ? आयुष्यात तुला शृंगाराचा अर्थ समजण्याइतपतजरी सहचर लाभला तरी ते सफल होईल. सहचराच्या सान्निध्यात स्पर्शाची जादू दाखवणारी एखादी जरी पहाट लाभली तरी त्या भरवशावर पुढचं सर्व नीरस रामायण ढकलून नेशील. गणितं सोडवताना स्त्रीयांची उत्तर वेगळी येत नाहीत म्हणुन आयुष्य तर्काधिष्ठित असतं असं कोणत्या गाढवानी सांगीतलं तुला ?)
अर्थ चिमणे चिमणे ; शब्द मादी
बोले... मिनीटें मिनीटां विसंवादी (आरती प्रभू, नक्षत्रांचे देणे)

श्रीवास्तवजींकडून एवढंही म्हणवल्या गेलं असतं तर काय हवं होतं !! पण एवढा तरी विचारांचा विस्तृत पट अतिसारासारखा अचानक उद्बवला म्हणुन त्यांच्यातलंही शेवाळं क्षणभर थक्क झालं.
(छ्या. असह्य उन्हाळ्यात डोकं चढतं हेच खरं ! उष्ण कोरड्या फक्क वा-यानी मनातला माध्यान्हीचा गुलमोहर भडकून उठतो.
वन्ही विझेलच आपोआप, स्वतःचेच थोडीच सरपण घालणार आहोत या वयात! मग आहेच मळकट हिरवे नेहमीचेच सगळे !)

गुलमोहर: 

सुंदर लिहिलं आहेस रैना! पुरुषांच्या अशा नको असणार्‍या स्पर्शांच्या वणव्यात खरंच अशा किती स्त्रियांच्या मनातील बुद्धिमत्तेच्या, अभावातही काही वेगळं करुन दाखवण्याच्या इच्छा पालापाचोळ्यासारख्या जळून खाक होत असतील! त्यांना वन्ही सोडाच साध्या ठिणगीइतकेही आयुष्य लाभत नसणार. शिवाय सीतेसारखी अब्रूभंगाची जखमही तिच्याच भाळावर उमटते हे अजून एक!
नको असणारे स्पर्श काय नुसत्या नजरा निवडण्याचा चॉईसही नाही अशा परिस्थितींमधून ज्या स्त्रिया स्वतःचे काही वेगळे मार्ग निवडू शकतात त्या खर्‍या अग्निशिखा, नाही कां?

खूप छान मांडलं आहेस.

>>>>>>> गणितं सोडवताना स्त्रीयांची उत्तर वेगळी येत नाहीत म्हणुन आयुष्य तर्काधिष्ठित असतं असं कोणत्या गाढवानी सांगीतलं तुला ?)
अर्थ चिमणे चिमणे ; शब्द मादी
बोले... मिनीटें मिनीटां विसंवादी (आरती प्रभू, नक्षत्रांचे देणे)

श्रीवास्तवजींकडून एवढंही म्हणवल्या गेलं असतं तर काय हवं होतं !! पण एवढा तरी विचारांचा विस्तृत पट अतिसारासारखा अचानक उद्बवला म्हणुन त्यांच्यातलंही शेवाळं क्षणभर थक्क झालं.
(छ्या. असह्य उन्हाळ्यात डोकं चढतं हेच खरं ! उष्ण कोरड्या फक्क वा-यानी मनातला माध्यान्हीचा गुलमोहर भडकून उठतो.
वन्ही विझेलच आपोआप, स्वतःचेच थोडीच सरपण घालणार आहोत या वयात! मग आहेच मळकट हिरवे नेहमीचेच सगळे !) <<<<<<<<

हे सगळं खंग्रीच. वन्ही हे शीर्षकही चपखल आहे.

रैना, निव्वळ डेंजरसली सुंदर...
तुझ्या त्या "अंतर्बाह्य पेटून उठलेल्या वेड्याबागड्या गुलमोहरा"सारखी... रसरसलेली...
<<आता हिला काय म्हणावं दिवंगत पोरपणाच्या सांत्वनार्थ?>>...
खरच सटपटून टाकणारं आहे हे...
खूप दिवसांनी मायबोलीवर आल्याचं चीज...
आज आता अजून काहीही वाचायचं नाही!!! गरम उन्हाच्या झळीसारखी अंगावर आलेली ही कथा पुरे आहे आजच्याला!

भाषाशैली आणि उपमा सुंदरच आहेत. पण एक कथा म्हणुन मला आवडली नाही. मुळात ह्या विषयासाठी श्रीवास्तव हे एक पात्र फक्त थोडे पोक्त वय दाखविण्यासाठी आले आहे असे वाटले. कथेचा फोकस श्रीवास्तववर नाहिये पण मग त्याचे सविस्तर वर्णन (डिटेल्स) बळेच आले आहे असे वाटले (ते आहे सुरेख व स्पॉट ऑन). दुसरे म्हणजे मनातल्या मनात झालेल्या विचारांना तू ज्या पद्धतीने कंसात मांडले आहेस त्याने कथेचा प्रवाह खंडतोय. आणि मनातल्या मनात झालेल्या विचारांचा धागा पकडून तू दुसर्‍या व्यक्तिच्या संवादाची सुरुवात केलेली आहेस. वाचक दोन्ही (म्हणजे संवाद आणि मनातले विचार) वाचू शकतोय पण कथेतली पात्रे केवळ बोललेल्या संवांदांवरच अवलंबून आहेत ना?

पुन्हा एकदा उपमा आणि काही काही वाक्ये तर खलासच आहेत..
>>> "गणितं सोडवताना स्त्रीयांची उत्तर वेगळी येत नाहीत म्हणुन आयुष्य तर्काधिष्ठित असतं असं कोणत्या गाढवानी सांगीतलं तुला ?" >> हे तर खासच..
शेवाळं >> पथेर पांचाली??

कथेची शैली, मांडणी, भाषा वगैरे आवडलच सगळं. खूप सुंदर. एकेक वाक्य वेचून वेगळं काढावं असं. फक्त मलाही ते कंसात लिहिलं आहेस ती स्टाईल नाही आवडली. ठुमरी आणि कवितेंच्या ओळींचे संदर्भ तिथेच लगेच टाकले आहेस त्याचीही गरज नव्हती. अगदीच वाटलं तर कथा संपल्यावर खाली लिहायचस नां. खटकतं असं वाचताना. आणि मुलगी तीव्र संवेदनशील आहे तितकीच बुद्धिमानही आहे, तिला घटना आणि दामलेबाबतही खूप टिपिकल विचार करत कोसळून जाताना दाखवल्यासारखं वाटलं. अर्थात ही टीका नाही. कथेतल्या पात्रांमधे जास्त गुंतल्यावर आपल्या मनातले विचार नकळत त्यांचावर इम्पोज करायच्या नादातून लिहिलय असं समज. श्रीनिवासांचे विचार जास्त प्रामाणिकपणे आलेत.

प्रशासकीय परीक्षा देणाऱ्या मुली संवेदनशील असतात हे जनरलायजेशन आहे.

.. (पारंपारीक) (आरती प्रभू, नक्षत्रांचे देणे)
हे कंसातले प्रकार कशासाठी? पावलोवच्या कंडिशन्ड कुत्र्याबद्दलही कंसात लिहायला हवे होते मग. तसाही पावलोवचा कुत्रा तिथे चपखल वाटत नाही. प्रटॅगनिस्ट कोण कथेचा? तिथे अगदी जरासा गोंधळ उडतो. बाकी शुद्धलेखनाचेही बघा थोडे. पारंपरिक हवे. छान लिहिता. कथा आवडली.

पुन्हा एकदा उपमा आणि काही काही वाक्ये तर खलासच आहेत..>> एव्हढी कहर आहेत कि तू लिहिलेल्या त्रुटी तू लिहिल्यानंतर जाणवल्या. पण खरच त्यांनी काही(च) फरक पडत नाहीये एव्हढा मूळ माल उच्च आहे. Happy

सुंदर लिहिलं आहेस रैना! पुरुषांच्या अशा नको असणार्‍या स्पर्शांच्या वणव्यात खरंच अशा किती स्त्रियांच्या मनातील बुद्धिमत्तेच्या, अभावातही काही वेगळं करुन दाखवण्याच्या इच्छा पालापाचोळ्यासारख्या जळून खाक होत असतील! त्यांना वन्ही सोडाच साध्या ठिणगीइतकेही आयुष्य लाभत नसणार. शिवाय सीतेसारखी अब्रूभंगाची जखमही तिच्याच भाळावर उमटते हे अजून एक!
>> अनुमोदन!

हे कस मिस झालेल माझ??? असो
रैना, अतिशय सुरेख लिहिलयस. हे वाचतानाही मन अस्वस्थ झाल, तु लिहिलस कस ग?

वाचणा-या, प्रामाणिक प्रतिक्रिया देणा-या सर्वांचीच मी खूप आभारी आहे. या कथेनिमीत्ताने इतक्या इमेल्स, विपु, कथेला आणि मला उद्देशुन बरीवाईट मतं, फोन आले की आश्चर्य वाटलं अगदी. Happy

मयुरेशने लिंक दिली आणि इथवर आलो...

" गणितं सोडवताना स्त्रीयांची उत्तर वेगळी येत नाहीत म्हणुन आयुष्य तर्काधिष्ठित असतं असं कोणत्या गाढवानी सांगीतलं तुला ?"

भावलं.

शेवटाचं जरा बघा काय ते!

ग्रामिण

विचार करायला भाग पाडणारी गोष्ट - का कोणाच्याही बाबतीत घडू शकणारे इतके जळजळीत वास्तव ?
मांडणी अप्रतिम. हॅट्स ऑफ !!!!

मलाही लिंक भेटली म्हणून वाचली. नाहीतर इतकं छान लिखाण मिसलंच असतं.
रैना, अप्रतिम कथा लिहलीये. अगदी अस्वस्थ होतं वाचून हे खरंच.

छान लिहिले आहेस!
कंसातील गोष्टी etc पारंपारीक दृष्टीने खटकतात, पण सगळे पारंपारीकच हवे असे थोडीच आहे ...

मोठ्या कथा किंवा कादंबर्‍या(च) लिहायला हव्या असे नाही, पण याच शैलीत याच्या तिप्पट-चौपट लिहिणे जमेल?

बाई रामायणापासून युगानुयुगे चालत आलेली ही अग्निपरिक्षाच आहे. कितीही बुद्धीमान झालीस तरी आहेस मादी, हे विसरुन कसं चालेल ? आयुष्यात तुला शृंगाराचा अर्थ समजण्याइतपतजरी सहचर लाभला तरी ते सफल होईल. सहचराच्या सान्निध्यात स्पर्शाची जादू दाखवणारी एखादी जरी पहाट लाभली तरी त्या भरवशावर पुढचं सर्व नीरस रामायण ढकलून नेशील. गणितं सोडवताना स्त्रीयांची उत्तर वेगळी येत नाहीत म्हणुन आयुष्य तर्काधिष्ठित असतं असं कोणत्या गाढवानी सांगीतलं तुला ?
>>>> अति उच्च. अतिशय भिडलं.

रैना, आज वाचली ही कथा...
केवळ जबरदस्त.. _____/\_____
>>शरीराच्या कुठल्या अवयवाचे रेटकार्ड आपल्याकडे जास्तं असतं हे माहित होतं तरी यावेळेस तिला चांगलंच उमजलं होतं.>> किती खरं....
आयुष्यातली त्या अडनिड्या वयात जाणवलेली असुरक्षितता, आलेले, ऐकलेले बरेवाईट अनुभव या सगळ्यांवरची खपली तेवढ्यापुरती निघालीच हे वाचता वाचता...

Pages