थोडंस मनातलं!

Submitted by छन्दिफन्दि on 16 October, 2023 - 02:17

#StraightFromHeart

नवरात्रीच्या नऊ रंगाचे कपडे नऊ दिवस घालायचे आणि फोटो काढून पाठवायचे. एक मजेचा भाग म्हणून छान वाटतं.
पण ही काही परंपरा / धार्मिक रीत आहे का? अजिबात नाही.
फेसबुक आणि सोशल मीडियाच्या काळाआधी
म. टा. / लोकसत्तेच्या पुरवणी मधून नवरात्रीचे नऊ रंग छापून येऊ लागले. त्याबरोबर वेगवेगळ्या ऑफिसेस मधले ग्रुपफोटो छापायला लागले. प्रसिद्धी मिळाल्याने अजूनच हे प्रस्थ पसरत गेले.
मन सहाजिकच भूतकाळात गेले. आई आजी कडे होत्या का एवढ्या साड्या आणि त्या ठेवायला मोठे वॉर्डरोब. घरात एक दोन कपाटं, त्यातले १-२ कप्पे मिळायचे. त्यात ५-६ नेहेमीचे कपडे,२-४ ठेवणीतले. त्यात नऊ रंगाचे कपडे मिळणं केवळ अशक्य.
नवरात्रीतला भोंडला, सोसायटी/गल्लीतला रोजच्या कपड्यातला गरबा, अष्टमीला देवीचे दर्शन ह्या कशालाच पैसे लागत नसतं पण आनंद, भक्तीभाव, उत्साह हमखास असे.
कदाचित वर्तमानपत्रवाल्यांना नवरात्रीच्या स्पेशल पुरवणीसाठी मोठ्या मोठ्या जाहिराती मिळत असतील. जाहिरातदारांना नवरात्रीच्या आगे मागे सेल लावून भरमसाठ नफेखोरी होत असेल. बरंच मोठं अर्थकारण असल्याशिवाय गोष्टी येवढ्या पसरत नाहीत. बरं ह्यात समाजाचे सगळे स्तरही सामावले जात नाहीत.
गमती गमतीत सुरू झालेल्या ह्या गोष्टी कधी गरज बनुन त्याच्या चालीरीती बनतील आणि पुढे धार्मिक रुढी /परंपरा होतील आणि सगळ्यात स्तरातील लोकांना वेठीस धरतील हा विचार टोकत रहातो.

—-----------------------

हा लघुलेख मी दोन वर्षांपूर्वी लिहिलेला. यावर खूप मतमतांतर त्यावेळी वाचायला मिळाली. राग लोभ सगळंच प्रकट झालेलं.
या दोन वर्षात बहुदा जग अजूनच बदललं म्हणजे मला ते जाणवलं ( कदाचित बऱ्याच उशिराने असावं).
एकेका रंगांचे कपडे हे प्रकरण माझ्या समजुतीप्रमाणे फक्त नवरात्रीपुरतं मर्यादित होतं. पण आता आता समजतंय की कोणत्याही विशिष्ट समारंभांना, फोटो काढायच्या वेळेलाही एकाच रंगाचे, थाटाचे किंवा धाटणीचे वस्त्र किंवा पेहराव असावा ह्याचा आग्रह. म्हणजे पूर्वी चुकून जरी एकाच रंगाचे कपडे घातले तर बॅंडवाले म्हणून चिडवतील अशी भीती वाटण्याचा काळ जाऊन आता तेच “In” झालय.

अशा सुंदर एकसारख्या सजलेल्या (बहुतांशी ) जणींचा उत्साह, उरक आणि आनंद (अगदी फोटो पुरता किंवा त्या समारंभापुरता का असेना) मोहून टाकतो. कदाचित त्या क्षणापुरत तुमचेही मन प्रफुल्लित करतो.
मग एक-दोन दिवस त्यावर चर्चा, फोटोंची देवाण घेवाण यात जातात. मुख्य (?)म्हणजे सोशल मीडियावर झळकतात. नकळत, फारशा उत्सुक नसलेल्याचंही त्यात खेचलं जाणं हे सगळं ओघाने आलच.

काही लोकं या साऱ्याला न भुलता त्यांच्या विचारांशी ठाम राहून, गुंतुनी गुंत्यात न पडता तटस्थ राहू शकतात.

तर माझ्यासारखे काठावरचे, ज्यांच्या बुद्धीला तर हे एक सारखे रंग, पेहेराव, (जे बहुदा घरात नसल्यामुळे) ते जमविताना होणारी दमछाक, यातायात, त्यासाठी लागणारा अनाठायी वेळ, व्यय आणि शक्ती काहीच पटत नसणारे, पण त्यांचे मन मात्र वरच्या उत्साही लोकांचा उत्साह बघून, आनंद बघून नकळत बुद्धीशी फारकत घेऊ बघते.
आणि मग त्यांच्या उत्सवात सामील होऊन घरी आल्यावर परत बुद्धी वरचढ होऊन मनाला मात करते.

एकरंगी, एकरूपी पेहराव हे आजकाल मूळतः ज्या सोशल मीडिया साठी घेतले जातात त्या FB, Insta आणि Whatsapp चा कर्ताकरविता, जो ह्या सगळ्या लोकांच्या एंगेजमेंट वर अब्जावधी पैसे कमावतो तो मात्र रोज एकाच रंगाचे कपडे घालतो कारण त्याच म्हणणं रोज कोणते कपडे घालायचे हे ठरविण्यात वेळ आणि क्रयशक्ती वाया जाते. किती विरोधाभास आहे, नाही?

अगदी नैसर्गिकपणे सुटसुटीतपणे साजरे केलेले सण, साध्या कपड्यातले फोटो कमी आनंद देणारे असतात का? आधुनिक काळाकडे सरकत असताना आचार, विचार, आणि आहार स्वातंत्र्याचे पंख लेवून भरारी घ्यायचे अशावेळी आपणच आपल्यासाठी नवनवीन चौकटी बांधून त्यातच रमणार आहोत का?

दरवर्षी सण आले की त्यावर विरजण पाडणारं कोणी लिहितच असाही एक आरोप होतो. पण कदाचित ह्या लाटेवर स्वार करणारे असतात तेव्हा कधी कोणाला त्याची मागची एखादी बाजू व्यक्त करावीशी वाटूच शकते की...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महाराष्ट्र टाइम्स ने खरी सुरूवात केली त्याची प्रसिद्धी बघून इतर वृत्त पत्रांनी ही प्रथा सुरू केली.
शेवटी ज्याच्या त्याच्या आनंदाचा भाग आहे हा ,गरीबालाही कपड्यातले 9 पैकी 4 रंग जरी घरात असले तरी उत्साहाने भाग घेताना पाहिलय . यानिमित्ताने काही महिला सक्षमीकरण किंवा समाजोपयोगी कामं महिलांसाठी व्हायला हवीत, तर खरा फायदा या सगळ्याचा किंवा त्यादृष्टीने कमीतकमी पावलं उचलावीत. बाकी फोटो बिटो तुन कोणाला आनंद मिळत असेल तर का हिरावून घ्या.

बाकी फोटो बिटो तुन कोणाला आनंद मिळत असेल तर का हिरावून घ्या.>>+१
प्रत्येक धर्माचा प्रत्येक सण हा धार्मिक परंपरा जपण्यासोबत निखळ आनंद देणे हाच एकमेव उद्द्येश्य ठेवून साजरा केला जात असतो. राजकीय आणि पंथिय वळण लागले की मुळ संकल्पना मोडीत निघते आणि मग अनेकदा फक्त आर्थिक प्रदर्शनाची चढ़ाओढ़ उरते.
________________@धागा
टाइटल नवरात्री आणि ९ रंग असे स्पेसिफिक देता आले तर बरे होईल असे वाटते

गणपतीवर धागा आला.

नवरात्रीत नटण्यावर आला

आता दिवाळीत फटाके वर येणार. शतकी र्पतिसाद धागे.

आजचा रंग व्हाइट आहे. उद्याचा रेड.

माझ्याकडे पांढरे (धुतलेले) कपडे नसल्याने आज घरूनच काम करतोय.
सगळ्यांनी घातले तर आपणही घालावे असे नकळत एक प्रेशर येते...

कपडे पांढरे नहीं हुए तो भी चलता है, मन पांढरा होना चाहिए Wink
>>>>
हो पण माझे मन करडे आहे ना Sad

यावर आता मन करडे असले तरी चालेल, कोरडे असू नये असे म्हणू नका प्लीज..

>> काही लोकं या साऱ्याला न भुलता त्यांच्या विचारांशी ठाम राहून, गुंतुनी गुंत्यात न पडता तटस्थ राहू शकतात.>> मी ह्याचा प्रयत्न नेहमीच करत असते. मी नवरात्रीचे रंग वगैरे फॉलो करत नाही आणि कोणत्याही गोष्टीच्म माजवलेलं स्तोम मला झेपत नाही. काल मैत्रिणीकडे सगळ्या लाल रंग घालून आल्या होत्या. मी पांढरी/बेज साडी नेसायची ठरवली.
अवांतर- मागे कोणत्यातरी वेबसाईटवर कोणाचीतरी ‘आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या उत्साहावर विरजण घालून मिळेल‘ अशी काहीशी टॅगलाईन पाहिली होती. ती आत्ता इथे वापराविशी वाटतेय. Wink

काल मैत्रिणीकडे सगळ्या लाल रंग घालून आल्या होत्या. मी पांढरी/बेज साडी नेसायची ठरवली
>>>>
हे मी सुद्धा काही वेळा मुद्दाम करायचो. स्पेशली पांढरा असताना काळा, निळा असताना पिवळा असा विरुद्ध किंवा उठून दिसणारा रंग जेणेकरून मी वासरात लंगडी गाय शहाणी वाटावे.
पण हे त्याच ऑफिसला दरवर्षी करण्यात मजा नाही...

प्रश्न मजेचा नाही. मार्केटिंग गिमिकला किंवा ह्या दिवशी हेच रंग वगैरे प्रकरण आवडत नसल्यास त्याला बळी का पडावं हा आहे.

ते ही आहेच, पण शेवटी आपण या सगळ्याकडे कसे बघतो त्यावर ते अवलंबून आहे.
म्हणजे जरी आपण म्हटले की की याचा देवधर्माशी काही संबंध नाही.
पण ज्या गोष्टींचा देवधर्माशी संबंध असतो त्या देखील कुठे खरोखरच्या देवाने सांगितल्या असतात. त्या देखील आपल्या पुर्वजांनीच आपल्या मनाने, आपल्या श्रद्धेने ठरवल्या असतात. आपण तेच पुर्वापार पाळतो, करतोच ना.

एखाद्या समारंभाला (धार्मिक / सामाजिक, लग्न, पार्टी, karaoke काहीही) जाताना एखाद्या फॅमिलीने / कपलने शक्य असल्यास एकमेकांना पूरक / मॅचिंग रंगाचे कपडे घालणं ह्यात सगळाच भाग 'भुलण्याचा' किंवा 'सोशल मिडीयाला बळी पडण्याचा' नसतो. त्यात त्यांना आनंद मिळत असेल तर त्यात काहीच गैर नाही. नाही केलं तरी काही बिघडत नाही. Either way, it does not matter.

या विषयावर मायबोलीवर आधी भरपूर चर्चा झालेली आहे. हा गणपतीतले डीजे, दिवाळीतले फटाके यांच्याइतका स्फोट विषय नाही.

<अगदी नैसर्गिकपणे सुटसुटीतपणे साजरे केलेले सण, साध्या कपड्यातले फोटो कमी आनंद देणारे असतात का? > फोटो काढले नाहीत, तर आनंद होत नाही का?

नवरात्रात जे असे रंग असणारे पोषाख करावेच असे प्रेशर येत असेल (येत असल्यास) ते इतर सामाजीक/कौटुंबिक/पिअर/धार्मिक प्रेशरच्या तुलनेत नगण्य असावे, वैयक्तिक फोमो जास्त असावा असे माझे मत.

हे फक्त उंटावरून केलेले निरीक्षण आहे, परिस्थिती कदाचित वेगळी असु शकते.

मागे कोणत्यातरी वेबसाईटवर कोणाचीतरी आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या उत्साहावर विरजण घालून मिळेल>>>. लोल.. मी त्याची ब्रँड अँबेसिडर बनू शकते.
कंटाळवाणं आहे हे सगळं. गुजराथी लोकं गरब्याला ९ दिवस वेगवेगळे रंगीबरेंगी कपडे घालून जातात. तेच फॅड उचललं असेल.

नैसर्गिकपणे सुटसुटीतपणे साजरे केलेले सण, साध्या कपड्यातले फोटो कमी आनंद देणारे असतात का? > फोटो काढले नाहीत, तर आनंद होत नाही का?

नवीन Submitted by भरत. on 16 October, 2023 - 11>>> अगदी तेही आहेच. बऱ्याच वेळेला गप्पांमध्ये फोटो काढले जात नाहीत.

पण फोटोंची मला जाणवलेला एक फायदा म्हणजे कालांतराने ते बघता येतात.... मुलांना दाखवता येतात.

पूर्वीचे फोटो नसल्यामुळे काही गोष्टी फक्त मनात आणि फार तर शब्दात मांडता येतात.

पण फोटोंची मला जाणवलेला एक फायदा म्हणजे कालांतराने ते बघता येतात.... मुलांना दाखवता येतात
>>>

हा खूप मोठा फायदा आहे. योगायोग म्हणजे आताच गेले पंधरा मिनिटे मी माझ्या पोरीसोबत जुने फोटो बघत होतो. त्यामुळे हे वाक्य वाचताच अगदी अगदी झाले..

फक्त फोटोबाबत एक तत्व पाळावे. मजा करतानाचे फोटो काढावेत, फोटोसाठी मजा करू नये.

९ दिवसांचे ९ कलर हे काही सांस्कृतिक वगैरे नाही. मजेचाच १ भाग आहे हे नक्कीच.
आता व्हॉट्सॅप फॉरवर्ड वर उगा १-१ करून ९ देवी त्या त्या दिवसांच्या रंगांच्या साड्या नेसून दिसतात तर तेच धार्मिक आहे असे इल्युजन तयार झालेय.

च्या बुद्धीला तर हे एक सारखे रंग, पेहेराव, (जे बहुदा घरात नसल्यामुळे) ते जमविताना होणारी दमछाक, यातायात, त्यासाठी लागणारा अनाठायी वेळ, व्यय आणि शक्ती काहीच पटत नसणारे,>>> ज्यांना हे सर्व पटत नाही त्यांनी उगा दुसरी करतेय म्हणुन हे करू नये ह्या मताची मी आहे..
माझ्या कडे जर त्या त्या अमुक रंगा चा पेहराव असेल तर मी आवर्जून तो घालेन Happy
पण समजा नसेल तर वाट वाकडी करून पैसे खर्चून अगदी काही विकत घ्यायला जाणार नाही त्या रंगाचा टी शर्ट किंवा इतर रंग ही घातला ऑफिसात तर काय बिघडले? आज मी ब्लॅक घालून आलेय पण घरात तो रंग असून ही मी कसं विरजण घातलं वेगळ्या रंगाचं कापड घालून असा विचार करणं आवडत नाही.. खरं तर लोकांना काहिही फरक पडत नसतोय.. सगळे आपल्यात मग्न असतात ..

पण १ मैत्रिण बरीच आधिपासून तयारी ला लागते, ९ दिवसांत नेसण्याच्या ९ साड्या तयार असतात, मॅचिंग ब्लाऊज सकट. तितकी चिकाटी, वेळ, पैसे & हौस तिच्या कडे आहे. आणि पुढच्या वर्षी ह्या सेम साड्या रीपीट होत नाहित बरंका!!!! Happy
अशांना ही हौस दांडगी आहे आणि काहिंना हौस ही असायलाच हवी ना? नाहितर आयुष्य किती बोरींग होईल..असेच म्हणेन!

आजचा दिवस लाल रंगाचा आहे. माझ्याकडे मी लाल साडी घेउन ठेवलेली पण म्याचिन्ग बांगड्या आणा यल वेळ झाला नाही. मग ड्रेसच घालून आले. मुंबई मध्ये वर्किन्ग कल्चर मजबूत आहे. त्यामुळे सर्व एच आर हे कलर कोड उचलून धरतात. आमच्याकडे प्रत्येक दिवशी डिपार्ट्मेंटी जाउन जाउन फोटो काढतात व नेक्स्ट डे पीडीएफ सर्वांना मेल करतात. कंपनीत बाग आहे तिथे तरुणाई व मध्यम वईन पब्लिक गृप फोटो घेत असलेले दिसते नेहमी. मी मागील वर्शी परेन्त फोटो पाठवत असे. आता सोडले.

लोकल मध्ये लेडिज डब्यात व मेट्रो मध्ये पण हे कलर्स चे कोड बरेच जण उत्साहाने पाळतात. इट इज जस्ट सो मच फन. इतका विचार का करायचा.

उद्याचा रंग ब्लू आहे.

डाऊन द लाईन ५० वर्षात, पुस्तके निघतील की चक्रांचे रंग आणि या नऊ दिवसात नेसल्या जाणार्‍या रंगांचा कसा अर्थपूर्ण संबंध आहे आणि आपली संस्कॄती कशी श्रेष्ट। आहे ते निव्वळ मूर्खपणा आहे.

५० वर्षे कसली...
आजच ऑफिसमध्ये तावातावाने चर्चा चालू होती.. नवरस.. नवग्रह.. नवरंग.. देवीचे नऊ अवतार.. स्त्री ची नऊ रूपे.. वगैरे वगैरे.. पेपर वाल्यांनी सुरू केले हे मान्य करूनही त्यांनी काही आपल्या मनाने नाही ठरवले तर त्याला शास्त्राचाच आधार आहे असे फायनली ठरले.

आशु२९, तोच तर पॉईंट आहे. ज्यांना हे मनापासून करायला आवडतं ते करतातच. ज्यांना नाही आवडत्/पटत ते नाही करत.
सामो म्हणतेय ते ही होणारच. कुठनतरी संस्कृतीशी बादरायण संबंध जोडला जोईलच किंवा गेलाही असेल.

कोणीही जबरदस्ती करत नाही नऊ दिवसात नऊ रंगाच्या साड्या नेसल्या नाहीत तर ट्रेन्/बस्/ऑफिसात घेणार नाहीत म्हणुन. आणि यातुन रुढी निर्माण होते असे मला वाटत नाही कारण रस्त्यावर निम्मे पब्लिक वेगळ्या रंगाने रंगीबेरंगी झालेले असते ज्यात मीही असते.

पण या निमित्ताने साड्या बाहेर पडतात म्हणुन मला हा रंगोत्सव आवडतो. मी जमेल तितकाच भाग या सगळ्यात आजवर घेतलाय. गेले दोन दिवस भलत्याच रंगाचा टॉप व जिन्स घालुन गेलेय ऑफिसला, शुक्रवारी साडी डे जाहिर केलाय त्या दिवशी त्या रंगाची असली तर, नाहीतर जी हाती लागेल ती साडी नेसुन जाईन. सध्या चांगल्या साड्या आंबोलीत आणि मी नेमकी मोजकेच कपडे घेऊन मुंबैत असे झालेय.

फोटो काढले नाहीत, तर आनंद होत नाही का>>>>

मलाही आधी असे वाटायचे. पण हल्ली फावल्या वेळात जुने फोटो पाहताना त्यावेळच्या सगळ्या आठवणी मनात जाग्या व्ह्यायला लागल्या आणि फोटो नसते तर त्या आठवणी मनातल्या अज्ञात कोपर्‍यातुन बाहेर पडल्या नसत्या असे वाटायला लागले. ज्या व्यक्ती आता परत कधीही भेटणार नाहीत त्यांच्यासोबतचे विडेओ पाहताना त्या व्यक्ती आजही आहेत हा खोटा का होईना पण दिलासा मिळाला.

लिहुन तरी का ठेवावे असेही मध्ये वाटत होते. पण माबोवर मी लिहिलेले जुने काहीतरी काढुन वाचताना मला तेव्हा तसे वाटत होते पण आज असे वाटतेय हे लक्षात येऊन गंमत वाटते., विस्मरणात गेलेले प्रसंग परत समोर येतात.

त्यामुळे जे करता येण्यासारखे आहे ते करा… नंतर कधीतरी
त्या आठवणी पुनःप्रत्ययाचा आनम्द नक्कीच देतील.

मला कल्की यांचा प्रतिसाद पटला.

आपल्याला हवं तर करावं, प्रेशर का घ्यायचं. मी बाहेर रोज जात नाही पण या दिवसांत पडले आणि माझ्याकडे असेल तर तो रंग घालते, साडी नेसत नाही. नसेल तर नवीन आणत नाही. फोटो वगैरे काढत नाही. पुर्वी सोसायटीत नवरात्र असायचं, तेव्हा फोटो काढले जायचे.

सुरुवात पहील्यांदा मटानेच केली. तेव्हा मला खूप उत्साह होता, फोटो बघायचा, स्वतः कधी पाठवला नाही. मी आवर्जुन रोज बघायचे. आता न्युजपेपर येत नाही घरी, मीच बंद केला कारण वाचला जात नाही सध्या. नाहीतर लहानपणापासून मी म टा प्रेमी होते.

गमती गमतीत सुरू झालेल्या ह्या गोष्टी कधी गरज बनुन त्याच्या चालीरीती बनतील आणि पुढे धार्मिक रुढी /परंपरा होतील आणि सगळ्यात स्तरातील लोकांना वेठीस धरतील हा विचार टोकत रहातो. >>> ह्याचीच भीती वाटते

<< एक तत्व पाळावे. मजा करतानाचे फोटो काढावेत, फोटोसाठी मजा करू नये.>> +1
पूर्वी जसं 36 फोटो मध्ये चार सण दोन बड्डे मावायचे तेही अगदी ना ठरवता , नॅचरल त्याची सर या 128 gb मेमरी मध्ये नाही .सोय झाली जास्त फोटोजची ,पण तेव्हडे हजारो फोटो पाहिलेही जात नाहीत जितके जुने दहा पाहिले जातात.

आजचा रंग निळा. आज ऑफिसा त येतानाच एक स्त्री कलीग दिसली सुरेख सिल्कची निळी प्लेन साडी वर चंदेरी बुट्टे हिर्वा/ पोपटी / मोरपंखी ब्लाउज व केसांचा आंबाडा बांधून त्यात एक सिल्व्हर ची पिन खोवली होती. तिला काँप्लिमेंट दिल्या.

बे एरिआत काय परिस्थिती आहे तिथे नेसतात का रोज विविध रंगी साड्या? गरबा असतो का? मला काल फारच उशीर झाला घरी जायला मग ग्राउंड लेव्हलला कुत्रा फिरवत होते तर स्कूटर वर मागे बसून एक गरबा पोर गेले. एकदम भारी ड्रेसिन्ग. केसात ओढणीच्या आत तो ६० मधल्या आशापारेख सारखा टोकदार टोप घातला होता. व वरुन ओढणी झटाक चमचम घेतली होती. एकदम बाजूने गणपतीची मूर्तीच गेल्याचे फीलिन्ग आले . क्युट .

गरबा व हे सर्व ड्रेसिन्ग मुळे एकदम तेजीत असते लोकल मार्केट, कच्छी ज्वेलरी, घागरे अगदी स्वस्तात मस्त मिळतात. बोरिवली मार्केट मध्ये ४०० पासून आहेत. आय मीन टु से काही लोक्स डिपें डंट असतात ह्या सण वारांवर. चांगली कमाई होते. पार्लर्स मध्ये मुली वेगवेगळ्या ट्रीट मेंट करून घेतात. " बेक ब्लीच!!" व इतर. प्लस ते खास ड्रेसेस मजा धमाल अगदी.

>>>>>>>सुरेख सिल्कची निळी प्लेन साडी वर चंदेरी बुट्टे
हा चक्क योगायोग आहे. काल रात्री विष्णुदासांच्या सर्व पद्यरचना, वाचल्यानंतर, झोपताना देवीच्या मानसपूजेत मी तिला गडद निळी शाल दिली पण फरक इतकाच की चंदेरी आणि सोनेरी बुट्ट्यांमध्ये विचार करुन, मी तिला सोनेरी बुट्ट्यांची शाल निवडला. मला वाटले नव्हते ती पोचपावती अश्या कमेन्टमधून म्हणजे योगायोगातून मिळेल.
याला मी अनुभूती म्हणते म्हणजे जे की सायन्सने सिद्ध करता येत नाही पण आपल्याला तसे पटते.

Pages