रसायनांचा पूर आणि हॉर्मोन्सचा बिघडलेला सूर

Submitted by कुमार१ on 5 May, 2019 - 21:56

सध्याच्या युगात विविध रसायने ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेली आहेत. त्यातील काही नैसर्गिक आहेत तर काही मानवनिर्मित. आज माणसाने विविध कारणांसाठी बनवलेल्या रसायनांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे! ती बनवण्यामागे विविध उद्देश होते खरे पण, त्यांच्या बेलगाम वापरामुळे तीच आता आपल्यावर बूमरॅंग झाली आहेत. त्याचे अनेक दुष्परिणाम आपण सध्या भोगत आहोत. त्यामध्ये श्वसनविकार, कर्करोग आणि हॉर्मोन्सची बिघडलेली यंत्रणा अशा अनेक आजारांचा समावेश होतो.

रसायने आणि कर्करोग या विषयावरील विवेचन माझ्या माबोवरील पूर्वीच्या एका लेखात (https://www.maayboli.com/node/64645) केलेले आहे. या लेखात आपण रसायनांचा हॉर्मोन यंत्रणांवर होणारा परिणाम बघणार आहोत.

सुमारे ८०० रसायने ही आपल्या हॉर्मोन्सच्या कार्यात व्यत्यय आणतात आणि त्यामुळे शरीरात व्याधी निर्माण होतात. हे वाचून क्षणभर विश्वास बसणार नाही, पण ते वास्तव आहे. अशा काही रसायनांचा विचार या लेखात केला आहे.

रसायनांच्या संपर्काचे मार्ग :

ही रसायने आपल्या शरीरात खालील मार्गांनी शिरतात:
१. नैसर्गिक पिके व पाणी
२. कीटकनाशके व औद्योगिक वापर
३. प्लास्टिकच्या संपर्कातील खाद्य-पेय पदार्थ व पाणी
४. धूम्रपान व मद्यपान

५. वैद्यकातील औषधे
६. सौंदर्यप्रसाधने व घरगुती स्वच्छतेची रसायने
७. इलेक्ट्रोनिक उपकरणे

या रसायनांशी आपला संपर्क आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांत येत असतो. तो जर माणसाच्या गर्भावस्थेत किंवा वयाच्या तीन वर्षांपर्यंत आला तर त्याचे परिणाम हे अधिक वाईट असतात. मुले वयात येण्याचा काळ तर खूप संवेदनशील असतो. तेव्हा जननेंद्रियांची वाढ आणि पुरुषत्व वा स्त्रीत्व प्रस्थापित होणे या महत्वाच्या घटना घडतात. घातक रसायनांनी या गोष्टी बऱ्यापैकी बिघडवल्या आहेत.

तसेच स्तन, प्रोस्टेट आणि थायरॉईड या ग्रंथीमध्ये रसायनांमुळे होणारे बिघाड गुंतागुंतीचे असतात. रसायने सुरवातीस संबंधित अवयवात हॉर्मोन-बिघाड करतात आणि मग त्याचे पर्यवसान कर्करोगात होऊ शकते.
बरीच रसायने ही ‘इस्ट्रोजेन’ या स्त्री-हॉर्मोन सारख्या गुणधर्माची असतात. त्यांचा पुरुषांच्या शरीरातील शिरकावामुळे पुरुष-जननेंद्रियांच्या अनेक समस्या आणि वंध्यत्व उद्भवते. या गोष्टी विसाव्या शतकात वाढीस लागल्याचे दिसून येते. काही रसायनांचे परिणाम तर पुढच्या पिढीपर्यंत गेलेले दिसतात. हॉरमोन्सच्या यंत्रणा बिघडवणाऱ्या असंख्य रसायनांपैकी (Endocrine Disrupting Chemicals) बारा रसायने ही आपल्या नित्य संपर्कात येतात आणि त्यांना ‘डर्टी डझन’ असे म्हटले जाते. त्यातील काही महत्वाच्या रसायनांची माहिती खालील तक्त्यात दिली आहे.

rasayane H.jpg

वरील तक्त्यात दिलेली रसायने म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे. प्रत्यक्षात त्यांची व्याप्ती खूप मोठी आहे. यापैकी काहींचा विचार आता विस्ताराने करू.

१. Bisphenol A : हे रसायन प्लास्टिकच्या वेष्टनातले खाद्य-पेय पदार्थ व पाणी यांच्यातर्फे शरीरात शिरते. सध्याच्या आपल्या आहारशैलीमुळे ते रोज कुठल्यातरी प्रकारे शरीरात जातेच. एका वेळेस त्याचे शरीरात जाणारे प्रमाण तसे कमी असते. पुढे त्याचा चयापचय होऊन ते काही तासातच लघवीतून उत्सर्जित होते. पण दिवसभरात आपण जर सतत प्लास्टिक-संपर्कातील अन्नपाण्याचे सेवन करत राहिलो तर मात्र त्याचा ‘डोस’ सतत मिळत राहतो आणि ते रक्तात काही प्रमाणात साठत राहते. तेव्हा प्रवास वगळता इतर सर्व वेळी आपण उठसूठ प्लास्टिक बाटलीतले पाणी पिणे टाळले पाहिजे. अन्नपाणी साठवण्यासाठी भविष्यात प्लास्टिकला योग्य आरोग्यपूरक पर्याय निघण्याची नितांत गरज आहे.

२. Phthalates : अनेक सुगंधी प्रसाधनांमधून शरीरात जाणारी ही रसायने. त्यांचे पुरुषाच्या अंडाशयाशी चांगलेच वैर आहे. तेथील जननपेशींचा ती बऱ्यापैकी नाश करतात. त्यामुळे वीर्यातील शुक्राणूंची संख्या कमी होते तसेच त्यांची हालचालही मंद होते. यातून पुरुष-वंध्यत्व येऊ शकते. या व्यतिरिक्त त्यांचा स्वादुपिंड आणि थायरोइड ग्रंथींवरही विपरीत परिणाम होतो. त्यातून मधुमेह, स्थूलता आणि थायरोइडचे विकार होऊ शकतात.
अलीकडे केसांची ‘निगा’ राखणाऱ्या प्रसाधानांमध्ये ही रसायने मोठ्या प्रमाणात आढळली आहेत. तेव्हा अशी प्रसाधने वापरणाऱ्या मंडळीनो, सावधान !

३. शिसे: या जड धातूचे मेंदू व मूत्रपिंडावरील दुष्परिणाम परिचित आहेत. अलीकडे त्याचे हॉर्मोन यंत्रणेवरील दुष्परिणामही दिसून आले आहेत. शरीरातील बहुसंख्य हॉर्मोन्स ही स्वयंभू नसून ती मेंदूतील एका प्रमुख ग्रंथीच्या नियंत्रणाखाली असतात. तर ही ‘सर्वोच्च नियंत्रण ग्रंथी’ म्हणजे hypothalamus होय. हिच्यातून विविध ‘प्रवाही’ हॉर्मोन्स स्त्रवतात.

पुढे ही हॉरमोन्स pituitary या मेंदूतल्या दुसऱ्या ग्रंथीत पोचतात आणि तिला उत्तेजित करतात. मग ही ग्रंथी त्यांना प्रतिसाद म्हणून स्वतःची ‘उत्तेजक’ हॉर्मोन्स तयार करते आणि रक्तात सोडते. पुढे ही हॉर्मोन्स (त्यांच्या प्रकारानुसार) थायरॉइड, adrenal ग्रंथी किंवा जननेंद्रिये यांच्यात पोचतात आणि त्या ग्रंथींना उत्तेजित करतात. सरतेशेवटी या ग्रंथी त्यांची स्वतःची हॉर्मोन्स तयार करतात. या उतरंडीतील सर्वोच्च स्थानावर शिसे दुष्परिणाम करते. त्यातून आपली अख्खी हॉर्मोन यंत्रणाच खिळखिळी होते.

४. धूम्रपान व मद्यपानातील रसायने: तंबाकूच्या धुरातून benzopyrene, aromatic polycyclic hydrocarbons आणि cadmium ही रसायने शरीरात जातात. तर काही प्रकारच्या वाईन्समध्ये Resveratrol हे रसायन असते. ही सर्व रसायने आपली हॉर्मोन यंत्रणा बिघडवतात. महत्वाचे म्हणजे सर्व गर्भवतीनी या व्यसनांपासून लांब राहावे.

५. वैद्यकातील औषधे : यापैकी काहींचा दुष्परिणाम हा हॉर्मोन-बिघाड करतो. दोन ठळक उदाहरणे म्हणजे diethylstilbestrol (एक कृत्रिम इस्ट्रोजेन) आणि spironolactone ( एक मूत्रप्रमाण वाढवणारे औषध). अशा औषधांचा वापर नेहमी काळजीपूर्वक केला पाहिजे.

आधुनिक जीवनशैलीत आपण अनेक अनावश्यक रसायनांना आपल्या शरीरात धुडगूस घालू दिला आहे आणि त्यांचे परिणाम चिंताजनक आहेत. आपल्या हॉर्मोन-ग्रंथींमध्ये जननेंद्रिये व थायरॉइड या खूप संवेदनक्षम आहेत म्हणून त्यांचे बिघाड जास्त दिसतात. काही वैज्ञानिकांनी तर अशी भीती व्यक्त केली आहे की अशा बिघाडामधून समलैंगिकता किंवा लिंगबदल करण्याची इच्छा या गोष्टी वाढू शकतील.

सध्याच्या सामाजिक आरोग्यावर एकंदरीत नजर टाकता काही आजारांचे खूप वाढलेले प्रमाण लक्षात येईल. यामध्ये तरुणींमधील थायरॉइड विकार, स्त्री-पुरुष वंध्यत्व आणि तारुण्यात जडणारा मधुमेह यांचा समावेश आहे. याचा प्रतिबंध करण्यासाठी आपल्या बहुमूल्य हॉर्मोन यंत्रणांना आपण आटोकाट जपले पाहिजे. त्यासाठी घातक व अनावश्यक रसायनांचा वापर टाळणे किंवा अगदी कमीतकमी करणे, हे गांभीर्याने घ्यायची गरज आहे.
*******************************************************************************************
* पूर्वप्रसिद्धी : दै. सकाळ व मिपा संस्थळ.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मित, धन्यवाद.
बातमी वाचली. त्यातला पुनर्वापर भाग चांगला आहे.

किती ही काळजी घ्या कोणत्या तरी मार्गे
म्हणजे अन्न किंवा श्वसन
हानिकारक रसायने शरीरात जाणारच फक्त कमीत कमी जावीत ह्या साठी आपण काळजी घेऊ शकतो

त्यातला पुनर्वापर भाग चांगला आहे.>>>
किंबहुना या संपूर्ण योजनेचे यश पुनर्वापर कश्या पद्धतीने करणार यावर अवलंबून आहे! Happy

vt220, अनेक धन्यवाद !

Gujji, वरती या मुद्द्यावर चर्चा झाली आहे, धन्यवाद.

'दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर महिन्याभरात बंदी लागू करण्यात येणार आहे. मात्र दुधाच्या पिशव्या पूर्णपणे बंद करण्यात येणार नाहीत, असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत जाहीर केलं…..'

( बातमी इथे: https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/plastic-ban).

माहितीपुर्ण लेख आणि प्रतिसाद!

@कुमारजी,आपण दररोज च्या जेवणात जे मीठ वापरतो,त्या मिठाचेही आजकाल वेगवेगळे प्रकार जाहिरांतीमधे दाखविले जातात. मग कोणते मीठ वापरण्यायोग्य आहे ते कसे ठरवावे?
आपण दररोज जे वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरतो,त्याच्या वापरानेही रासायनिक घटक शरीरात प्रवेश करत असतील तर त्याचे काही सदृश्य परिणाम जाणवतात का?

@ मन्या, धन्यवाद.

कोणते मीठ वापरण्यायोग्य आहे ते कसे ठरवावे?
>>>

बाजारातील मिठाचे प्रकार:
१. अतिशुद्ध = NaCl फक्त. इतर ‘मिसळ’ नाही. दिसायला शुभ्र.
२. काळं मीठ ( rock salt.) त्यात इतर खनिजांची मिसळ.

३. आयोडिनयुक्त मीठ : यात K- iodate घालतात.
४. आयोडिन व लोहयुक्त मीठ.
५. पोटॅशियम व मॅग्नेशियामयुक्त मीठ

आपण शहरवासीयांनी पूर्णपणे आयोडिनयुक्त मीठ वापरावे की नाही? यावर मतभेद आहेत.
आमच्या जवळच्या दुकानात साधे जाडेभरडे मिळते, अगदी स्वस्तात. मी असे करतो की पावसाळ्याचे ४ महिने नवे चकाचक मीठ आणि उन्हाळ्यात साधे जाडेभरडे. त्यांच्या खारटपणात थोडा फरक जाणवतो. पण रासायनिक प्रमाणाबद्दल माहित नाही.

लोहयुक्त मीठ हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना लोहयुक्त समतोल आहार काही कारणाने मिळत नाही.

*** भारतातील बऱ्याच branded मिठांत सूक्ष्म प्लॅस्टिकचे कण आढळून आले आहेत. अलीकडेच आय आय टी, मुंबई च्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
याचे मूळ कारण म्हणजे समुद्रात होणारे प्लॅस्टिक-प्रदूषण हे होय.

मन्या,
आपण दररोज वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरतो,त्याच्या वापरानेही रासायनिक घटक शरीरात प्रवेश करत असतील तर त्याचे काही सदृश्य परिणाम जाणवतात का? >>>

होय, जाणवतात तर ! काहींचे परिणाम या लेखात दिले आहेतच. या जोडीला माझा हाही लेख वाचता येईल:
https://www.maayboli.com/node/64645

PFAS प्रकारची रसायने आणि आरोग्य यावर अधिक संशोधन होत आहे. ही रसायने खालील गोष्टींच्या वापरातून शरीरात जातात:

१. नॉनस्टिक भांडी
२. डाग न पडणारे गालिचे
३. मायक्रोवेव्हसाठीच्या पॉपकोर्न पिशव्या

४. अग्निशमन साहित्य
५. काही पिण्याच्या पाण्याचे साठे

या रसायनांचा शरीरात चयापचय होत नसल्याने ती कायमची ठाण मांडतात. त्यांचा स्त्रीच्या अंडाशयावर दुष्परिणाम होतो. यामुळे अनेक स्त्रियांना वेळेपूर्वी रजोनिवृत्ती ( सुमारे २ वर्षे ) येत असल्याचे एका अभ्यासात आढळले.

प्लास्टिक प्रदूषण पोचले एव्हरेस्टवर ! +===>

सर्वत्र पोह्चले आहे, अन त्याला कमी करन्याचे उपाय केले पाहिजे सर्वानी...

गड , धार्मिक स्थळे इथे जाणारे अनेकदा plastic bottles तेथेच सोडून येतात..... हे सहज टाळता येण्यासारखे आहे,

विकत मिळनारे पानी पिण्याजोगे (?) असते का ?....घरून्च पानी नेता येत की ....

अन्न संशोधनासाठी काम करणाऱ्यांपैकी एक म्हणजे केंद्रीय सागरी मच्छीमारी संशोधन संस्थेतील मुख्य वैज्ञानिक डॉ. काजल चक्रबर्ती! त्यांना भारतीय अन्न संशोधन परिषदेचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार नुकताच जाहीर झाला.

अभिनंदन !

जलशुद्धीकरणचे नवे स्वदेशी तंत्रज्ञान पुण्यातील एनसीएलने विकसित केले आहे.
स्वस्तिक असे त्याचे नाव असून या प्रक्रियेत सर्व नैसर्गिक वनस्पती आणि तेलांचा वापर केलेला आहे.
याने रसायनवापर टळेल .

https://www.livemint.com/news/india/csirncl-lab-leverages-ayurveda-for-s...

आपल्या थायरॉइड ग्रंथींना घातक असणाऱ्या chlorpyrifos या कीटकनाशकावर नुकतीच अमेरिकेच्या EPA या पर्यावरण संरक्षण संघटनेने बंदी घातली आहे.
https://earthjustice.org/brief/2021/chlorpyrifos-ban-pesticide-industry-...

तसेच PFAS हे घातक रसायन अन्न-पॅकेजिंगसाठी बऱ्याच मॉल्समध्ये वापरले जात होते. त्याचा वापरही जाणीवपूर्वक कमी करण्यात आलेला आहे.

वापरून झालेल्या सॅनिटरी पॅडसचा कचरा ही एक मोठी पर्यावरणीय समस्या आहे. त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी पॅड labs या कंपनीने एक चांगला उद्योग उभारला आहे.

यामध्ये घराच्या स्वच्छतागृहालाच एक विशिष्ट कचरा पेटी बसवण्यात येते. त्यामध्ये टाकलेली पॅडस एका मध्यवर्ती यंत्रणेला पोचतात. तिथल्या यंत्रात खालील घटना घडतात :
१. पॅडचे निर्जंतुकीकरण
२. त्यांचे बारीक तुकडे करणे
३. त्यातील पॉलिमरचे विघटन करून सेल्युलोज मिळतो.
४. या सेल्युलोजचा पुनर्वापर पॅकेजिंग उद्योगांसाठी करता येतो.

धारिया नावाच्या तरुणाने चालू केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे.
https://www.forbesindia.com/article/innovation-nation-2021/sanitary-wast...

पुण्यात बटाटवडा, भजी यासारखे गरम खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून दिल्याचे आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे
https://marathi.abplive.com/news/pune/maharashtra-pune-ban-news-paper-pa...

वर्तमानपत्र छपाईत वापरण्यात येणाऱ्या शाईत शिसे व अन्य रसायने असल्याने गरम खाद्यपदार्थांच्या संपर्कात आल्यावर ती विरघळतात आणि ते आरोग्यास घातक असते.

अंमलबजावणी कडक व्हावी ही इच्छा !

३ जुलै
आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन

प्लास्टिकच्या संपर्कातील खाद्य-पेय पदार्थ व पाणी शक्य तितके टाळण्याचे आवाहन .

प्लास्टिकला पर्याय रेशीम : नवे संशोधन

सध्या शेती उद्योगातील रसायने, अनेक प्रकारचे रंग, सौंदर्यप्रसाधने आणि डिटर्जंट यामध्ये सूक्ष्म प्लास्टिकचा वापर केलेला असतो. प्लॅस्टिकच्या या सूक्ष्मकणांनी मोठी पर्यावरणीय समस्या निर्माण केलेली आहे. म्हणून त्याला पर्याय शोधण्याचे प्रयत्न सतत चालू आहेत.

अलीकडे एका संशोधनातून रेशीम हा पर्याय पुढे आलेला आहे. हलक्या दर्जाच्या रेशमापासून कपडे बनवत नाहीत आणि असे हे रेशीम खूप मोठ्या प्रमाणावर सध्या फेकून दिले जाते. त्यातील प्रथिन वेगळे काढून त्यावर विशिष्ट प्रक्रिया करून ते सूक्ष्म-प्लास्टिकला पर्याय म्हणून वापरता येईल असा प्रस्ताव आहे. याचे नैसर्गिक विघटन होते.

https://news.mit.edu/2022/silk-alternative-microplastics-0720

TG = Triglyceride.
हा शरीरातील साठवलेला मेद आहे.
पण या धाग्याचा त्याच्याशी संबंध नाही.

Pages