“जसराज काय गाणी बोलले?”

Submitted by मधु-रजनी on 12 December, 2017 - 20:06

बदल हाच जगाचा नियम आहे. तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे तर बदलाचा वेग अजूनच प्रचंड वाढतो आहे. हा बदल सतत कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या समोर येतो आहे. उपयोगी आणि निरुपयोगी नवनवीन माहिती दर मिनिटाला WhatsApp किंवा फेसबुकमार्गे फोनवर दिसते आहे. फोनमधून डोकं वर काढावं तर चोवीस तास भडक बातम्या ओकणारी खाजगी टीव्ही चॅनेल्स आहेत. वृत्तपत्रांची पण तीच परिस्थिती. या मधली मराठी भाषा ऐकल्यावर किंवा वाचल्यावर लक्षात येतं की गेल्या वीस वर्षात मराठी खूपच बदलली आहे. मराठी भाषेतल्या योग्य आणि चपखल शब्दांचा वापर कमी होताना दिसतो आहे. असं का होतंय ते कळत नाही. कदाचित सगळ्या लोकांना समजावं म्हणून भाषा बिघडवायची असं काही टीव्हीवाल्यांनी परस्पर ठरवलं असावं का? किंवा त्यांनाच अजून मराठी भाषेची ताकद समजलेली नाही?

मराठीत अनेक शब्द असे आहेत की त्यांना सांस्कृतिक किंवा गर्भित अर्थ आहे. ‘नारळ’ आणि ‘श्रीफळ’ या शब्दांचा अर्थ जरी एकच असला तरी दोन्हीची छटा वेगळी आहे. ‘पाणी’ आणि ‘तीर्थ’. ‘तांदूळ’ आणि ‘अक्षता’. अजून कितीतरी उदाहरणं आहेत. शब्दाचे अर्थ एकच, पण भाव वेगळे, छटा वेगळी. भाषेची शुद्धता ही प्रत्येकाच्या दृष्टीनी वेगळी असू शकते. पुण्याची मराठी भाषा शुद्ध मानायची की कोल्हापूरची? की नागपूरची? की अमुक एक लोकांचा समूह बोलतो ती मराठी शुद्ध मानायची? त्यामुळे भाषेची शुद्धता जरी सापेक्ष असली तरी मराठी भाषेतले योग्य ते शब्द योग्यवेळी वापरायलाच हवेत. तसं केलं नाही तर नुकसान आपलं आणि मराठी भाषेचं आहे.

काही वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला. कसल्या तरी कारणानी लोक जमले होते. वेगवेगळ्या क्षेत्रातले. खाता खाता मंडळी काहीतरी गप्पाटप्पा करत होती. एकंदरीत थोडासा कंटाळवाणा प्रसंग होता. राजकारण, शेअर मार्केट, हिंदी सिनेमा असे ठराविक विषय झाले. पंडित जसराज यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम तेव्हा नुकताच झाला होता. त्या कार्यक्रमाचा गप्पांमध्ये विषय निघाला. कोणीतरी एक जण त्याच्या मित्राला म्हणाला,

“जसराज काय गाणी बोलले रे त्या कार्यक्रमात?”

स्टीलच्या ताटाखाली चुकून बारीक खडा आला तर ओरखड्याच्या आवाजानी जसा अंगावर सर्रकन काटा येतो तसं माझं झालं. कर्णकर्कश्य! मी आवंढा गिळला आणि दीर्घ श्वास घेतला.

“काय गाणी बोलले” हे काय वाक्य झालं?

गाणी ‘बोलायची’ नसतात. गाणी ‘गायची’ असतात. किंवा गाणी ‘म्हणायची’ असतात. ‘बोललेला’, ‘गेलेला’, ‘केलेला’ ही कुठल्या मराठी भाषेची निशाणी? त्याकडे दुर्लक्ष केलं, पण जसराज ‘गाणी’ म्हणतात हे ऐकणं म्हणजे अतिच झालं. पंडित जसराज ‘चीज’ म्हणतात, ‘ख्याल’ म्हणतात, ‘तराणा’ म्हणतात, ‘भजन’ म्हणतात, अगदी ‘ठुमरी’ देखील म्हणतात. पण ते ‘गाणी’ नाही म्हणत. शब्दांची छटा नीट कळायला हवी.

नुसतं “हिरव्या रंगाची पानं होती” असं म्हणून कसं चालेल? पानाच्या रंगांमध्ये कितीतरी वेगवेगळ्या छटा आहेतच की. कोवळ्या पानांचा ताजा हिरवा रंग वेगळा आणि जून झालेल्या पानांचा काळसर गडद हिरवा रंग वेगळा. श्रावणातल्या पावसानी सह्याद्रीवर आलेल्या गवताच्या गालिच्याचा हिरवा रंग. केळीच्या पानाचा हिरवा रंग. मेहेंदी भिजवल्यावर होणारा हिरवा रंग. असे कितीतरी प्रकार. सगळी पानंच, पण हिरवा रंग मात्र वेगवेगळा. तश्याच गाण्यातही खूप वेगवेगळ्या छटा आहेत. आणि मराठी भाषा त्या सगळ्या छटा दाखवायला समर्थ आहे.

आता हेच बघा ना. ‘गाणं’, ‘गीत’, ‘पद’ आणि ‘चीज’ हे चार जवळचे शब्द. प्रथम दर्शनी वाटेल, या शब्दांमध्ये काय एवढा फरक आहे? सगळ्या शब्दांचा अर्थ ‘गाणं’ हाच आहे. हे बरोबर असलं तरी हे चारही शब्द वेगळ्या छटा आणि वेगळे भाव दाखवतात. कसे?

गाणं
‘गाणं’ हा शब्द ‘गाणं’, ‘गीत’, ‘पद’ आणि ‘चीज या चार शब्दांचा लघुत्तम साधारण विभाजक म्हणा हवं तर. गाणं म्हणजे थोडक्या वेळात संपणारं. या शब्दाच्या व्याख्येला फार मोठा वाव आहे. गाण्याला विषय, भाव, रस, ताल, सूर, आणि काव्य या कशाचंच कडक असं बंधन नाही.

“अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम” असं नितांतसुंदर भावपूर्ण हे गाणं, आणि “चार बोतल व्होडका” असं पूर्णपणे भावहीन देखील गाणंच.

“मेघा छायें आधी रात, बैरन बन गयी निंदिया” असं काव्यमय गाणं, आणि “झ झ झ झोपडी में, च च च चारपाई” याला काव्य म्हणावं का असंही गाणंच.

“हर घडी बदल रही है रुप जिंदगी, छाव है कभी, कभी है धूप जिंदगी” हे छंदबद्ध गाणं आणि, “मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है” सारखं मुक्तछंद ही गाणंच.

“रघुवर तुमको मेरी लाज” असं भक्तीरस पूर्ण गाणं, आणि “मेरा रंग दे बसंती चोला” असं वीररस पूर्णही गाणंच.

“चुरा लिया हैं तुमने जो दिलको” असं तालानी सुरु होणारं गाणं, आणि ताल कुठे असं शोधावं लागणारं “आती क्या खंडाला?” हे पण गाणंच.

लतादीदी अतिशय सुरात म्हणतात ते गाणं, आणि हिमेश रेशमिया म्हणतो ते ही (दुर्दैवानी) गाणंच!

“आने वाला पल, जाने वाला है” असं जीवनावरचं तत्वज्ञान हा विषय असलेलं गाणं, तसंच “मधुबन में राधिका नाचे रे” असं गोकुळाचं वर्णन हा वेगळा विषय असलेलं गाणं.

इतका प्रचंड ‘गाणं’ या शब्दाचा विस्तार. सगळी सरमिसळ. परीक्षेत देतात तसे गुण द्यायचे झाले तर काही गाण्यांना शंभरपैकी शंभर गुण सहज देता यावेत, आणि काही गाण्यांना शून्य गुण देखील जास्त वाटावेत. इतकी गाण्यांमध्ये तफावत.

म्हणजे ‘गाणं’, ‘गीत’, ‘पद’ आणि ‘चीज’ या चार शब्दांना खाण्याची उपमा दिली तर?

‘गाणं’ हे ‘स्नॅक्स’ या खाद्यप्रकारासारखं. आटोपशीर आणि पटकन खाता येणारं. प्रत्येक स्नॅकची चव, स्वाद, सुगंध, पोत, मूड, प्रेझेंटेशन, खायची वेळ हे सगळं वेगळं. प्रचंड व्हरायटी! स्नॅक्स म्हणून कितीतरी गोष्टी आपण खातो. हातगाडीवर कागदाच्या पुडीत बांधून मिळणारे खारे दाणे, फुटाणे. मीठ लावलेली सुकी बोरं. उग्र वासाचे पण तरीही चविष्ट फणसाचे गरे. गरमागरम पोहे, उपमा. आधल्या दिवशी उरलं-सुरलं वापरून केलेली फोडणीची पोळी नाहीतर फोडणीचा भात. उडप्याच्या हॉटेलातली इडली, डोसा, उत्तप्पा. मिसळ, वेफर्स, सँडविच, असे कितीतरी स्नॅक्सचे प्रकार. बाकरवडी, फरसाण, पाणीपुरी, दाबेली. गोडामध्ये पेढे, बर्फी, गोळ्या, बिस्किटे, नानकटाई, चॉकलेट, लस्सी. अक्षरशः शेकडो प्रकारचे स्नॅक्स आहेत आणि आपण ते आवडीनी खातो. तसेच गाण्याचे शेकडो प्रकार. प्रत्येकानी आपल्या मूड प्रमाणे आणि आवडीप्रमाणे स्नॅक्स खायचे.

सात्विक आहार शरीर शुद्ध करणारा आणि मनाला शांती देणारा म्हणतात. कोणाला सात्विक गुणाची ताजी साबुदाणा खिचडी, ताजी फळे, दूध, मध, काजू, बदाम, खारीक असे पदार्थ आवडतील. त्याचप्रमाणे कोणाला सात्विक गुणांची आरती, भजन, प्रार्थना, धावा ऐकायला आवडेल.

राजस पदार्थ हे शरीर आणि मनाला प्रेरित करणारे मानले जातात. चहा, कॉफी, फोडणी-कांदा-लसूण घातलेले आणि तळलेले स्नॅक्स. बरीचशी हिंदी-मराठी चित्रपटातली गाणी या प्रकारात मोडणारी. उत्तेजित करणारी आणि तजेला देणारी.

तामसी पदार्थ शरीर आणि मनाला जडत्व देणारे. मन भरकटायला लावणारे. खूप तिखट, तेलकट, अति गोड, मांसाहारी स्नॅक्स सारखे. त्याचा अतिरेक झाला की सेवन करणाऱ्याचा स्वभाव चिडचिडा, रागीट, बेचैन होतो म्हणतात. तशीच रॅप, रॉक, फ्युजन ही ‘गाणी’.

थोडक्यात म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती, तितक्याच प्रकारची गाणी. कोणाला आवडणारी आणि न आवडणारी. समाधान देणारी आणि न देणारी. पण प्रत्येकासाठी ‘गाणी’ आहेतच, अगदी स्नॅक्स सारखी.

गीत
गीत, पद, चीज हे सगळे गायनाचे प्रकार, त्यातलं ‘गीत’ हे ‘गाण्याच्या’ सगळ्यात जवळचं भावंडं. गीत हे गाण्यासारखंच चार-पाच मिनिटात संपणारं. गीतालाही गाण्यासारखे बरेच विषय चालतात, आणि गाण्यासारखे गीताचे बरेच प्रकार आहेत - भावगीत, प्रेमगीत, विरहगीत, अंगाई गीत, समरगीत, राष्ट्रसन्मान गीत. सुर आणि ताल हे तर सगळ्या संगीताचे प्राण, पण गीत या प्रकाराला काव्य आणि त्या काव्यामधल्या भावना फार महत्वाच्या.

काव्य लिहिणारी, त्या काव्याला संगीत देणारी आणि ते संगीतबद्ध केलेलं गीत गाणारी अश्या तीनही व्यक्तींची जबरदस्त तयारी हवी. त्या गोष्टींचा अभ्यास झालेला असावा. गाण्यासारखं प्रेझेंटेशन भपकेदार नसलं तरी गीताचा दर्जा उत्तम हवा. कस चांगला हवा.

‘गाणं’ हे स्नॅक्स सारखं आहे असं म्हणलं तर ‘गीत’ हे घरी बनवलेल्या जेवणासारखं म्हणा हवं तर. वरण, भात, भाजी, पोळी आणि एखाद्या चटणीसारखं. मोजके आणि सुटसुटीत पदार्थ. पण ते रुचकर, सकस, गरमागरम आणि मनापासून तयार केलेले.

म्हणजे स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीला कधी-कधी रोजच्या जेवणाचा कंटाळा येत असेलही, पण तिच्या हातून नीरस आणि बेचव अन्न कधी बनत नाही. कंटाळा आला असला तरी तिचा रोजच्या सवयीनी हात बसलेला असतो. त्यामुळे ती पटकन घरी असलेली भाजी चिरून तिला फोडणी घालून साधीच पण रुचकर ओली किंवा सुकी भाजी तयार करते. भाजी तयार होतानाच कुकरमध्ये डाळ-तांदूळ शिजवून झाले की डाळ सारखी करून त्यात हिंग, हळद, मीठ घालून वरण तयार करते. ते झालं की झरझर लाटून गरमागरम पोळ्या ताटात वाढते देखील. त्याबरोबर काकडी, गाजर अशी काहीतरी कोशिंबीर, नाहीतर बाटलीतलं लोणचं ताटात वाढते. म्हणजे सुरुवात केल्यापासून एका तासाच्या आत तिचा गरम आणि रुचकर स्वैपाक तयार होऊन घरातली मंडळी जेवायला देखील बसलेली असतात. असाच आटोपशीरपणा आणि सुटसुटीतपणा गीतामध्ये.

चांगली अर्थ असलेली आशयसंपन्न कविता घ्यायची. तिला चांगल्या तालासुरात बांधायची. मोजकेच साथीदार वादक बरोबर घ्यायचे. रोजच्या जेवणात जसा वरण-भात हवा, तसं पेटी-तबला असायलाच हवे. भाजी-पोळी या ताटातल्या जोडगोळीसारखी, उत्तम चाल आणि गायिकेचा सुरेल आवाज ही जोडगोळी तितकीच महत्वाची. या चार मुख्य पदार्थांचा भक्कम पाया केल्यावर कवितेतला जो भाव असेल त्याप्रमाणे साथीला एखाद-दुसरं वाद्य घ्यायचं. कधी टाळ, तर कधी घुंगरू. कधी संतूर, तर कधी सतार. अगदी रोजच्या जेवणात मूडप्रमाणे चवीला आपण लोणचं, चटणी, कांदा, पापड, तूप-साखर नाहीतर गुळंबा घेतो तसं.

गीतामध्ये सिनेमाच्या गाण्यासारखा ऑर्केस्ट्रा नाही. वाद्यांचा भलामोठा ताफा नाही. काव्य आणि त्या काव्यातली भावना थोड्या वाद्यांमध्येही श्रोत्यांपर्यंत पोचवून त्यांना तृप्त करायची ज्याची ताकद असते, ते म्हणजे ‘गीत’. “स्वये श्री रामप्रभू ऐकती” पासून “पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा” ते अगदी “गा बाळांनो श्रीरामायण” अशी रामायण कथा सांगणारी छप्पन गीते, म्हणजे गीतांचा अत्युच्च बिंदू.

‘गीत’ या प्रकारची वेगवेगळ्या भाषांमध्ये कितीतरी उत्तम उदाहरणं आहेत. “धीरे से आ जा रे अखियन में, निंदिया आ जा रे आ जा” असं अंगाई गीत. “चांदोबा चांदोबा भागलास का?” असं बालगीत. “घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा” असं शालीन भावगीत. “वेदमंत्रांहून आम्हा वंद्य वंदे मातरम” असं प्रखर देशभक्तिगीत. पंडित किशोर कुमारांच्या आवाजातलं “कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहेना” हे जननिंदेला तोंड कसं द्यायचं सांगणारं गीत. किंवा मनावर आवर घालणारं उस्ताद रफींनी गायलेलं गीत “मन रे तू काहे ना धीर धरे”. आनंद बक्षींचे गीत “जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम”.

अशी एकापेक्षा एक उत्तम अर्थपूर्ण आणि विचारपूर्ण गीतं. मनाला शांति देणारी. स्वतःच्या आत पाहायला लावणारी.

पद
‘पद’ हा नाटकात आढळणारा गायनप्रकार. त्याची मजा फारच वेगळी. ‘पद’ हे लग्नमुंजीतल्या जेवणावळीच्या स्वैपाकासारखं. ते करायला कसलेल्या तयारीचा अनुभवी बल्लवाचार्य हवा. पदाला वेळेचं बंधन नाही. एकेक पद गायक त्याच्या कल्पकतेप्रमाणे कितीतरी वेळ रंगवू शकतो. पदात काव्याचं महत्व गीतापेक्षा थोडं कमी होतं, कारण पदात महत्व असतं ते म्हणजे गायकाच्या तयारीला, त्याच्या आवाजाला, त्याच्या सुरेलपणाला, आणि मुख्य म्हणजे गायक ते पद कसं फुलवतो या कलेला.

पद फुलवायचं म्हणजे पदाची एक ओळ घ्यायची आणि वेगवेगळ्या गायन अलंकारांनी ती नटवायची. तीच ओळ दहा-पंधरा वेळा गाताना प्रत्येकवेळी त्यात काहीतरी नवीन हवं. खटका हवा, मुरकी हवी, गमक हवं, तान हवी, लयकारी हवी, तालाशी खेळ हवा. प्रत्येकवेळी ती ओळ नवीन वाटली पाहिजे. त्याक्षणी सुचेल असं काहीतरी त्या ओळीत हवं, पण ते मात्र तालात, सुरात आणि प्रेक्षकांना रंजक वाटेल असं हवं. तासनतास एका जागी उभं राहून नाटकातली वेशभूषा सांभाळत पदाचे सूर सांभाळायचे. बरीचशी पदं रागांवर आधारित असल्यामुळे पद गाताना रागाचं शास्त्र सांभाळायचं. असं सूर, ताल आणि भरघोस अलंकारांनी नटलेलं भव्यदिव्य गीत म्हणजे ‘पद’!

रुखवताच्या जेवणासारखं पदात खूप काही हवं. वेगवेगळ्या पदार्थानी ताट भरलेलं असावं तसं पदात विविधता आणि रेलचेल हवी. ताटाभोवती महिरप किंवा रांगोळी काढतात तसं पदाचं प्रेझेंटेशन महत्वाचं. पदाभोवती वाद्ये हवी आणि वाद्यांची चोख साथ हवी. नटेश्वराच्या मूर्तीसमोर उदबत्त्यांचा सुवास दरवळला पाहिजे. गरमागरम सुग्रास मसालेभात, अळूची भाजी, मठ्ठा आणि चटण्या खाताना सगळ्या पंक्तीची भूक वाढली पाहिजे. त्याबरोबर जिलबी किंवा श्रीखंडाच्या घासाप्रमाणे ताना, सुरांची फेक आणि काव्यप्रसंगाचा भाव असं जमलं की श्रोत्यांची अतृप्ती अजून वाढायला लागली पाहिजे. मग अश्यावेळी यजमान आग्रह करून खाणाऱ्याच्या ताटात जसं दोन जिलब्या वाढतो आणि खाणारादेखील त्या केशरयुक्त जिलब्या अधीरतेनी उचलून त्याचा आस्वाद घ्यायला सुरुवात करतो, तसं तयारीच्या गायकाचं पद सुरु झालं की श्रोत्याला किती ऐकू आणि साठवू असं होतं.

पदांना अतिशय लोकप्रियता मिळाली ती बालगंधर्वांमुळे. तेच पदांचे खरे सम्राट. त्यांनी गायलेली “कशी या त्यजू पदाला”, “खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी”, “जोहार मायबाप जोहार”, “मला मदन भासे हा”, “नाथ हा माझा मोही”, “वद जाऊ कुणाला शरण” अशी अनेक पदं आज शंभर वर्षांनंतरही लोकप्रिय आहेत. कुमारजींनी गायलेलं “उठी उठी गोपाला”, दीनानाथांचं “कठीण कठीण कठीण किती, पुरुष हृदय बाई”, वसंतरावांचं “कर हा करी धरिला शुभांगी”, अभिषेकीबुवांचं “घेई छंद मकरंद”, “नच सुंदरी करू कोपा”, “सर्वात्मका सर्वेश्वरा”. उत्तमोत्तम पदांची शेकडो उदाहरणं आहेत. एकच पद अनेक गायकांनी गायल्याची खूप उदाहरणं आहेत. प्रत्येक गायकाचं त्याचं स्वतःचं त्यात काहीतरी ओतत असल्यामुळे ती मजा अजून वेगळी.

पद ऐकणारा श्रोताही तसा असावा लागतो. नवरा-नवरीवर अक्षत टाकून लगेच पंधरा-वीस मिनिटात जेवण उरकून ऑफिसला पळणारा चाकरमाना लग्नाच्या साग्रसंगीत जेवणाचा आनंद घेऊ शकत नाही. तसंच घाईत असलेला श्रोता पद ऐकायला कुचकामी. गाण्यातला आनंद घेता येण्यासाठी श्रोत्याला उसंत हवी. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे जशी खवैय्याला उत्तम खाण्याची चटक असते तशी श्रोत्याला सुरांची चटक हवी! पटकन पोट भरता कामा नये. मग लग्नाचं साग्रसंगीत आणि अत्यंत चविष्ट जेवण झाल्यावर जेवणाऱ्याची जशी ब्रम्हानंदी टाळी लागते, तसंच उत्तम पद ऐकल्यावर श्रोता दोन-चार तास तरी त्याच आनंदात तृप्त असतो.

लग्नसमारंभ हा शुभप्रसंग असल्यामुळे त्यावेळी अशुभ खाद्यपदार्थ टाळायचे असतात. लग्नात जसे श्राद्ध-पक्षाचे पदार्थ वर्ज्य, तसे पदात सुद्धा काही गोष्टी वर्ज्य आहेत. पदात सवंगपणा नको. थिल्लरपणा नको. संगीताच्या शुचितेला आणि खरेपणाला धक्का लागायला नको. वाद्यांचा दणदणाट नको. वादकांनी एकमेकांवर किंवा गायकावर कुरघोडी करायला नको. गळ्याची तयारी आहे म्हणून उगीच पद लांबवत कसरती करणंही नको. ‘असा मी, असामी’ मधला प्रसंग आठवा. ‘लग्नाला जातो मी’ हे पद खूप लांबवणाऱ्या गायकाचा.

हे सगळं तंत्र जर जमलं नाही तर लग्नाच्या जेवणात क्वचित कधी पदार्थ फसलेला असतो तसं व्हायचं. मऊ पडलेली जिलबी, आंबट झालेलं श्रीखंड, वास यायला लागलेल्या खोबऱ्याची चटणी, किंवा किंचित उतरलेली आहे काय अशी शंका येणारी रसमलई. एखादा पदार्थ थोडा जरी खराब असला तरी पंक्तीतल्या माणसाला समाधान मिळणार नाही. एखादा खवैय्या तर संपूर्ण जेवणाचा विचका झाला असा निराश होईल. तसा जाणकार श्रोता पद भरकटलं किंवा चांगल्या पदाचं वाटोळं झालं असं म्हणून दुःखी होईल.

‘पद’ या शब्दामध्ये एवढा अर्थ भरलेला असताना त्याला नुसतं ‘गाणं’ असा शब्द वापरायचा म्हणजे मराठी भाषेवर केवढा मोठा अन्याय होईल.

चीज
‘चीज’ ही एक वेगळीच चीज आहे! ‘चीज’ या शब्दाचा एक अर्थ म्हणजे शास्त्रीय गायन करताना गायलेल्या चार ओळी. प्रत्यक्षात ‘चीज’ म्हणजे कठोर व्रत करून गायन साध्य करायच्या कलेचा मिळणारा प्रसाद. जणूकाही सोळा सोमवार किंवा एकवीस चतुर्थी या सारखं कडक व्रत-वैकल्य करून पूर्ण झालं की त्याच्या उद्यापनाच्या दिवशी नेवैद्याचा स्वयंपाक म्हणजे ‘चीज’.

एका तासात शब्द चालीत बसवले, त्यानंतर अजून एक तासभर सराव करून ती चाल घट्ट केली की ‘गाणं’ तयार होतं. चीजेचं तसं नाही. मुळात चीज गायची पात्रता येण्यासाठी कित्येक वर्षं कठोर संगीत साधना करायला पाहिजे. आवाज स्थिर व्हायला पाहिजे. नुसता नीट षड्ज लागेपर्यंत कित्येक महिने लागून जातात. मग एकेक सूर शिकत, पहात आणि अनुभवत पुढे जायचं.

सुरांची ओळख झाली की त्यापुढे शास्त्रीय संगीताचा अथांग सागर, अगदी प्रशांत महासागरासारखा. त्याच्या काठावर उभे राहून नुसता सागराच्या भव्यतेचा अंदाज यायला परत अनेक वर्षं जाणार. एवढ्या मोठ्या समुद्राच्या काठावरून थेट पाण्यात पोहायला जायचं धाडस कोणाचं नसतं. त्यासाठी अनुभवी गुरूच पाहिजे. गुरुनी शिष्याला समुद्राची ओळख करून देता देता समुद्र ओळखायची ‘नजर’ दिली पाहिजे. हे सगळं जमून समुद्रात पोहायला जमणारे अगदी थोडे. आणि जमलं तरी किनाऱ्यापासून फार आतपर्यंत न जाणारे. पण एखादा भीमसेन, कुमार किंवा एखादी किशोरी जन्मतःच दैवी नजर घेऊन येतात आणि त्या अथांग समुद्रावर सत्ता गाजवतात.

आपल्यासारख्या समुद्रापासून लांबवर कोरड्या जमिनीवर राहणाऱ्या रहिवाश्याना त्या अथांग समुद्राची निळाई, त्याची खोली आणि त्यातलं वैभव ज्या सुरांनी गायक सांगतो ते गायन म्हणजे ‘चीज’. एवढ्या मोठ्या समुद्राची गाथा पाच-दहा मिनिटात कशी वर्णन करावी? शक्यंच नाही! त्यामुळे चीजेला वेळेचं बंधन नाही. फक्त चार ओळींची चीज गाणारा तासभरदेखील गाऊ शकतो. तिथे घाई गडबड चालायची नाही.

चीजेला खूप बंधनं आहेतही आणि नाहीतही. चीज गाताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक सूर शंभर टक्के शुद्ध सोन्यासारखा हवा. कारण सुरांशी एकरूपता हेच मुळी गायकाचं साध्य असतं, अगदी कठोर व्रत करणाऱ्या उपासकासारखं. ईश्वरप्राप्ती हेच ध्येय. त्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी कमीच पडायचे.

सोळा सोमवार किंवा एकवीस चतुर्थी अश्या कठोर व्रताच्या उद्यापनासाठी पहाटे उठून स्नान करून शुचिर्भूत झाल्यावर आधी पूजा करायची. सोवळ्यानी स्वैपाक करायचा, तो ही पूर्णपणे निर्जल उपास करून. स्वैपाकातला प्रत्येक घटक शुद्ध, सात्विक आणि स्वतः बनवलेला. स्वैपाक चालू असताना सतत ईश्वराचं स्मरण करत राहायचं. सुरांची शुद्धता मनातल्या शुद्धतेसारखी कायम ठेवायची. नैवेद्यासाठी मोजकेच पदार्थ करायचे. भगर नाहीतर साबुदाण्याची खिचडी, खीर, पंचामृत, मोदक असे थोडेच आणि सात्विक पदार्थ, अगदी चीजेतल्या ओळींसारखे. दोन ओळींची अस्ताई आणि दोन ओळींचा अंतरा. बस. मोजून चार ओळी.

ताटात उगीच आंबट, मसालेदार, तिखट, चमचमीत भारंभार पदार्थ नाहीत; तसंच चीजेतले शब्द शांत आणि मर्यादापूर्ण. उगीच उठपटांग शब्द नाही आणि भावरसांची सरमिसळ नाही. चीजेत भावही दोन प्रकारचे. सगळ्यात जास्त करून चीजेतून प्रकट होणारा भाव ईश्वरभक्ती. दुसरा भाव म्हणजे विरह, कधी ईश्वराचा आणि कधी प्रियकराचा. चीजेत शब्दांची गर्दी नाही आणि शब्दांचं महत्वही तसं कमीच. शब्दाला भाव असलेच पाहिजेत असंही नाही. पण ते शब्द अश्या सुरांमधून दाखवून द्यायचे की शब्द असला नसला तरी चालून जावं, तराण्यात होतं तसं. ते सूरच असे भरून चीज तयार करायची की पदार्थातून ईश्वरदर्शन झाल्याशिवाय राहणार नाही.

चांदीच्या ताटात त्या मोजक्याच पण सात्विक पदार्थांचा नेवैद्य देवाला दाखवायचा. तो नेवैद्य म्हणजे शास्त्रीय संगीत साधकाने गायलेली ‘चीज’. तो प्रसाद सगळ्या उपस्थित भक्तांना वाटायचा आणि त्यांनी तो भक्तिभावाने ग्रहण करायचा. उद्यापन सोहळ्याला येणारे लोकसुद्धा सात्विक आणि विचार करून बोलावलेले असतात. प्रसादाला आलेली व्यक्ती वेगळी आणि हातगाडीवर चायनीज खाणारी व्यक्ती वेगळी. तसंच फिल्मी ‘गाणं’ ऐकणारा वर्ग वेगळा आणि ‘चीज’ ऐकणारा वर्ग वेगळा. त्यात कोणी कमी-जास्त नाही, फक्त प्रकृतीमध्ये फरक एवढंच.

सत्यनारायणाच्या प्रसादाला किंवा उद्यापनाला लोक जसे भक्तिभावाने येतात तसेच चीज ऐकणारे सुरांच्या भक्तिभावात बुडालेले. त्यांची श्रद्धा फक्त शुद्ध सुरांच्या तरंगांवर आणि आज स्वररूपी ईश्वरदर्शन होईल यावर. चीज जर जमली असेल तर त्याचा अंमल ऐकणाऱ्यावर फार काळ राहणारच. कित्येक वर्षांनंतरही ती चीज श्रोत्याला नीट आठवते, अगदी साक्षात देवाचं दर्शन झाल्यासारखी.

चीजेच्या शब्दाला महत्व कमी असल्यामुळे चीज ऐकायची म्हणजे खरंतर राग ऐकायचा. पण तरी काही चीजा कानावर पडून बऱ्याच प्रचलित झाल्या आहेत. उदाहरणार्थ किशोरीताईंची भूप मधली “सहेला रे” ही चीज. यमनमध्ये बऱ्याच गायकांनी गायलेली “ए री आली पियाबीन”. सिनेमामुळे जास्त परिचित असलेली अहिर-भैरव मधली चीज “अलबेला सजन आयो रे”. आपल्या सुदैवानी हिंदुस्थानात अनेक दिग्गज होऊन गेले आहेत आणि होत आहेत. त्यांची कुठलीही चीज ऎका. ईश्वराच्या जवळ घेऊन जाणारच! ही ‘चीज’ या शब्दाची करामत.

तात्पर्य काय, तर वरकरणी सारखे दिसणारे असले तरी इतके प्रचंड गर्भितार्थ ‘गाणं’, ‘गीत’, ‘पद’ आणि ‘चीज’ या शब्दांमध्ये भरले आहेत. अशी समर्थ आणि समृद्ध मराठी भाषा असताना योग्य शब्द योग्य तसा वापरण्याची जबाबदारी आपली आहे. संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, स्वातंत्र्यवीर सावरकर, शब्दप्रभू गदिमा, कुसुमाग्रज, शांताबाई या सारख्या तेजस्वी सरस्वतीपुत्र आणि सरस्वतीकन्या यांनी घातली तशी भाषेत भर घालणं हे काही प्रत्येकाचं काम नाही. पण निदान पूर्वजांनी दिलेली भाषाही आपल्याला नीट सांभाळता आली नाही तर करंटेपणा आपला!

--------------

ता. क.: विचार करून मराठी भाषा वापरतात त्यांना हे लिखाण कळणारच आहे. पण त्या वाचकांच्या पलीकडे पोचावं म्हणून जाणूनबुजून या लेखात थोडे इंग्रजी शब्द वापरले आहेत. टार्गेट ऑडियन्स डोळ्यासमोर ठेऊन त्यांना समजेल अश्या भाषेत मेसेज द्यावा हा मार्केटिंगचा सिद्धांत आहे म्हणे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाषेचा मूळ उद्देश दुसर्याला काहीतरी सांगणे हा असला तरी तो अधिक परिणामकारक आणि अचूक पणे व्यक्त करणे हे आवश्यक असल्यामुळेच शब्दभांडार वाढ्त गेले. भाषा संम्रुद्ध होत गेली.
त्याचा वापर करणे अनवश्यक मानणे हे प्रगतीकडे पाठ फिरवणे ठरेल. >>> छान मुद्दा.

माझी एक खुप जवळची मैत्रीण मुंबईची, आमच्या ग्रुप मध्ये तिच मराठी सगळयात उत्तम असे... >>> आहे हो बऱ्याच जणांचे. ऋ आपलं स्वतः वरून सांगतो बहुतेक Wink .

>>त्यामुळे मुंबईकरांकडून पुस्तकी भाषेच्या अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. आणि कोणी तश्या अपेक्षा ठेवल्या तरी मुंबईकरांना त्याने फरक पडत नसावा. त्यांच्याकडे भाषाशुद्धीसाठी वेळही नसावा आणि गरजही वाटत नसावी.<<
+१
अमेरिकन इंग्लिशने जसा बोली/लिखित भाषेत राणीच्या इंग्रजीला सोडुन सवतासुभा उभा केला, तसंच आहे हे काहिसं... Proud

मी माझ्या जनरेशनच्या मुंबईकरांबद्दल बोलत आहे. आधीच्या जनरेशनमध्ये मराठमोळ्या मुंबईत लहानाचे मोठे झालेल्यांचे मराठी आणि आमचे मराठी यात फरक सापडणारच.
हवे असल्यास वर्गीकरण करूया. सचिन तेण्डुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर मुंबईत जन्म घेतलेले आणि लहानाचे मोठे झालेले मुंबईकर आणि सचिनपदार्पणपूर्व मुंबईकर Happy

एक गंमतीची गोष्ट - मी हॉस्टेलला असताना कोल्हापूर सोलापूर सांगली कराड नागपूर यवतमाळ लातूर वगैरे बरीच ठिकाणची मुले होती. ते माझ्या मराठीचे फार कौतुक करायचे. फाडफाड कोकाटे ईण्ग्रजी असते ना तसे ते त्यांना माझे फाडफाड मराठी वाटायचे.

अमेरिकन इंग्लिशने जसा बोली/लिखित भाषेत राणीच्या इंग्रजीला सोडुन सवतासुभा उभा केला, तसंच आहे हे काहिसं... Proud

>>>>>

+786
वुई हॅव आवर ओन स्टाईल !
एन वुई जस्ट डोन्ट केअर रेस्ट ऑफ महाराष्ट्रा .. टाईप्स एटीट्यूड मुंबईकरांच्या मराठीमध्ये जाणवतो Happy

हे योग्य की अयोग्य हा वादाचा मुद्दा झाला. तो घालायचा असल्यास जाओ पहले जॉर्ज बुश, बिल क्लिंटन, ओबामा और ट्रंप की साईन लेके आओ ... Happy

नाही हं. उगाच आपलं भाषासमृद्धी भाषासमृद्धी म्हणुन ‘गाणे बोलले‘ हे घुसवु नका मराठीत. उद्या ‘ती जोरात रागावली‘ च्या जागी ‘ती जोरात गायली‘ हे पण १०० लोक म्हणायला लागले तेही येऊ द्यायचे काय मराठीत?

इथे असणारे मुंबैकर आणि इथे असणार्यांचे मुबैतील नातेवाईक आणि मित्र-मैत्रीणी एकदम प्रमाण मराठीच बोलतात.
मग मुबैंत मिक्स मराठी काय फक्त मी आणि ऋन्मेषच बोलतो की काय??? Lol

त्यामुळे मुंबईकरांकडून पुस्तकी भाषेच्या अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. आणि कोणी तश्या अपेक्षा ठेवल्या तरी मुंबईकरांना त्याने फरक पडत नसावा. त्यांच्याकडे भाषाशुद्धीसाठी वेळही नसावा आणि गरजही वाटत नसावी.<<<<< +१

खरं तर कुठल्याही भागातील माणसाकडुन पुस्तकी मराठी भाषेची अपेक्षा ठेवणे योग्य नाही.

पण खरंच कोण बोलतं पुस्तकी, प्रमाण मराठी?? पुणेकर का? सिरीयसली विचारतेय.

‘ती जोरात गायली‘ हे पण १०० लोक म्हणायला लागले तेही येऊ द्यायचे काय मराठीत?>> नका येउ देउ तुम्ही बोलत असलेल्या मराठीत. Happy

ऋ तू सरसकटीकरण केलं म्हणून लिहिलं, तू स्पेसिफिक अमुक पिढी वगैरे म्हणाला नाहीस. मी हे तर आधीपासून लिहितेय की गेल्या दहा वर्षात इथे डोंबिवलीत आणि मुंबईत फरक पडलेला जाणवतोय भाषेत. प्रमाण मराठीचा आणि पुस्तकी मराठीचा आग्रह मी पण धरत नाही. माझ्या जवळच्या नातेवाईकात लहान मुलांना सांगण्याचा प्रयत्न करते. त्यांनी नाही ऐकलं तर त्यांची मर्जी.

नविन जनरेशनमध्ये पण मिक्स आहे असं मी म्हणेन. माझ्या ओळखीचे अनेक जण जे मुंबईत राहतात आणि ऋ म्हणतो त्या पिढीतले आहेत ते पण आमच्यासारखं मराठी बोलतात. उलट मला जास्त फरक ह्या दहा वर्षात जाणवतोय.

मी माझ्या जनरेशनच्या मुंबईकरांबद्दल बोलत आहे. आधीच्या जनरेशनमध्ये मराठमोळ्या मुंबईत लहानाचे मोठे झालेल्यांचे मराठी आणि आमचे मराठी यात फरक सापडणारच.
>>>>

तुम्ही १९९५ च्या अगोदर वा आसपास जन्मला असाल तर आमच्या जनरेशन मध्येच मोडता ... Happy

त्यामुळे मुंबईकरांकडून पुस्तकी भाषेच्या अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. आणि कोणी तश्या अपेक्षा ठेवल्या तरी मुंबईकरांना त्याने फरक पडत नसावा. त्यांच्याकडे भाषाशुद्धीसाठी वेळही नसावा आणि गरजही वाटत नसावी.
>>>>>>

हे थोडस ओढुन ताणुन के लेला प्रतिवाद आहे.. अहो कोण अपेक्षा ठेवत... ?
आणि पुस्तकी म्हणजे कोणत पुस्तक - बहिणाबाईच्या कवितांच, कि झोंबी ... कि आजुन दुसरी कोणती पुस्तक .. ?

त.टी. - झोंबी हा मराठी शब्द आहे त्याचा अर्थ.. “fight against all odds” .. नाहीतर ते विंगलीश वाल वाटेल.. Happy

नका येउ देउ तुम्ही बोलत असलेल्या मराठीत. >>>> बापरे! असल्या वक्तव्यावर माझे शब्दच खुंटले.

लोकहो, तुम्ही जी भाषा बोलता ती तुम्ही आईच्या पोटातून शिकून येता का?
नक्कीच नाही. अभिमन्यू देखील पोटात असताना चक्रव्यूहच काय ते शिकला, मात्र अ आ इ ई, हे बाहेर आल्यावरच बोलायला शिकला.
तर तुम्ही बोलता ती भाषा तुम्ही कशी शिकता?
तर तुमच्या आजूबाजूला बोलल्या जाणार्‍या भाषेवर शिकता.
जसे की एखादा सातार्‍याच्या माणसाची सो कॉल्ड अशुद्ध भाषा सातार्‍याच्याच माणसांसारखी असणार, तो मालवणी अशुद्ध नाही बोलणार. कारण लहानाचे मोठे होत असताना आपण आजूबाजूला जी भाषा ऐकत मोठे होतो तीच आपण शिकतो.
आता मुंबईचा एखादा भाग मराठमोळा असेल तर त्या भागातील मराठी मुले मराठी ऐकून ऐकून मराठीच शिकणार.
पण मुंबईच्या ज्या भागात गुज्जू, मारवाडी, राजस्थानी, युपीबिहार, मुस्लिम .. आणि मग उरल्यास थोडेफार मराठी असा टक्का असेल तिथली मराठी मुले विविध भाषा ऐकतच आपल्या आवडीचे शब्द उचलत ती भाषा बोलू लागणार.
मी गेल्या काही काळातील मुंबईचे उदाहरण दिलेय कारण गेल्या काही वर्षात मुंबईतील मराठी माणसांचा टक्का वेगाने घसरतोय. त्यामुळे मुंबईत जन्माला येणार्‍या मराठी मुलांना शिकण्यासाठी गरजेची आजूबाजूची मराठी बोलणारी माणसे कमी होऊ लागली आहेत. त्यामुळे त्यांच्या मराठी बोलीतीलही मराठी शब्दांचा टक्का घसरला आहे.
एक सिंपल उदाहरण देतो, दोन अनोळखी मराठी माणसे ट्रेनमध्ये एकमेकांना भेटतात आणि त्यांना माहीत नसते की समोरचा मराठीच आहे तेव्हा ते हिंदीतच बोलतात. महाराष्ट्रातल्या किती गावशहरात असे होते?
जर कोणी लहानपणापासून शुद्ध मराठी वार्तालाप करणार्‍यांच्यात वाढला असेल तर त्याच्या मराठी बोलण्याचे कौतुक ते काय...
पण कदाचित, त्याच्यापेक्षा फ्ल्यूएंट हिंदी मी बोलू शकत असेन. त्याचा अभिमान मी का बाळगू नये?
गुजराती, मारवाडी अन राजस्थानी मित्रांमुळे मला त्यांच्या भाषेतीलही छोटी छोटी वाक्ये बोलता येतात. उर्दूचे शब्द वाक्याच्या अध्येमध्ये सहज पेरता येतात. बेकरीवाल्या पारश्याशी मी त्याच्याच भाषेत बोलू शकतो, एखाद्या गुजराती मुलीला तू मन्ने गमे छे म्हणून प्रपोज करू शकतो.. तर माझ्या या विविधभाषाभारतीचा अभिमान मी का बाळगू नये?

बाकी एकदा लहानपणीपासून जे बोलायला शिकलात ते सहजी पुसले जाणे अवघडच. वयाच्या एका टप्प्यानंतर तुम्ही मायबोलीवर आलात, मराठी माणसांत काही वर्षे बागडलात म्हणून लगेच संस्कृतप्रचुर मराठी बोलायला लागाल असे कधीच होणार नाही.
येस्स, पण लिखाणात मात्र बदल घडू शकतो. त्यासाठी मी नेहमी तयार असतो.
कारण आपण जी भाषा अवतालीभवताली ऐकतो तीच बोलतो आणि आपण जे वाचतो तसेच लिहितो, ईट ईज अ‍ॅज दॅट अ‍ॅज सिंपल !
आयुष्य खूप सिंपल आहे गाईज, आपण जास्त विचार करून कॉम्प्लिकेटेड करून ठेवतो ईतकेच Happy

मराठी किती संपन्न भाषा आहे पहा
एका स्पर्धा परीक्षेतील प्रश्न :

"दिलके टुकडे टुकडे करके मुस्कराके चल दिए" या वाक्याचं मराठीत भाषांतर करा.

वेगवेगळ्या सेंटरवरील विद्यार्थ्यांची नमुनेदार उत्तरे

विद्यार्थी-१ (पुणे)
ह्रदयाचे तुकडे तुकडे करुन गालावर खळीसह चालती झाली..

विद्यार्थी-२ (नाशिक)
ह्रदयाची खांडोळी खांडोळी करून स्मितहास्य करत निघून गेली टवळी..

विद्यार्थी-३ (मुंबई)
दिल ब्रेक करुन वर नुस्ती एक स्माईली सेंड करुन परतीची लोकल पकडलीस..

विद्यार्थी-४ (अकोला)
मनाचा बुकना बुकना करून दात ईचकुन निंगुन गेली..

विद्यार्थी-५ (अमरावती)
कलिजाचे मार कुटके कुटके केले माह्या, अन दातकाड काहाडत कुठं चाल्ली वं..

विद्यार्थी-६ (यवतमाळ)
निरे तुकळे केलेना हिर्दयाचे, न वरुन जाता जाता बत्तिशी दाखुन राह्यली..आं..

विद्यार्थी-७ (वाशिम)
कायजाच्या पार चिंध्या करून टाकल्या माहया, अन हेंबाडथुत्री दातकड विचकत जाऊन राहाली भैताड़ लेकाची..

विद्यार्थी-८ (बुलढाना)
लांग चिथडे करुन माया कायजाचे वरुन लय दातं इचकून रहाली तु तं.. आन चाल्लि लगे..

विद्यार्थी-९ (वर्धा)
बाप्पा !! पार चिटोरे चिटोरे केले पोट्टिन कायजाचे अन बगा कशी जाऊन रायली फिदिफिदी हासंत..

विद्यार्थी-१० (नागपूर)
दिलची बोटी बोटी करुन गालात हासत हासत च्याल्ली न बे..

विद्यार्थी-११ (धुळे)
काळीज ना तुकडा तुकडा करी सन गाल गाल मा हसी सन तरफडली बेरड..

विद्यार्थी-१२ (कोल्हापुर)
हृदयाला घोडा लावून हासत गेली उंडगी.....!

आणि मालवणी नमुनो: शीरा पडल्या वरान हे चेडू च्या तोंडात .. माझो दिल तोडान आता खय चलली..हा दात काढान फ़िदी फ़िदी खिदळत !!

विद्यार्थी-३ (मुंबई)
दिल ब्रेक करुन वर नुस्ती एक स्माईली सेंड करुन परतीची लोकल पकडलीस..
>>>>>>>

बोलके उदाहरण आहे.
मुंबईची एक अशी भाषा नसल्याने उगाचच काहीतरी बनवायचे म्हणून ब्रेक, स्माईली, सेंड, लोकल वगैरे ईंग्लिश शब्द टाकून वाक्य बनवलेय. प्रत्यक्षात कोणीही मुंबईकर असे बोलणारच नाही. आणि कोण काय बोलेल हे गेस कोणी करूही शकणार नाही. ईथे प्रत्येकाची आपापली स्टाईल आहे Happy
एक मात्र सांगतो, छोट्या खेड्यातून तेथील ग्रामीण बोलीभाषा बोलणारे जसे शुद्ध भाषा बोलणार्‍यांसमोर थोडे दबकून जातात. तसे मुंबईकरांचे होत नाही. उलट (फाजील?) आत्मविश्वासाने आपले मराठीचे घोडे दामटवतात Happy

वरती काही जणांनी म्हण्टलय की हा फरक किंवा भाषतली ही भेसळ अलीकडची किंवा गेल्या काही वर्षातली आहे तर त्या अनुषंगाने माझे एक निरीक्षण नोंदवतो (जे इतरत्रही काही ठिकाणी आधीच नोंदवलेले आहे).... आपल्या बोलीभाषेवर आपल्या कुटुंबाचा किंवा परीसराचा जेव्हढा प्रभाव असतो तितकाच प्रभाव आपण ज्या माध्यमात शिक्षण घेतो त्याचा, ज्या दर्जाचे शिक्षक आपल्याला भाषाविषय शिकवतात त्याचा आणि एकूणच आपल्या शालेय जीवनाचा असतो
शिक्षकच जर धेडगुजरी किंवा भाषानियम धाब्यावर बसवून बोलत असतील तर पुढच्या पिढीकडून फार शुद्ध भाषेची अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही!

'नेमकं' काय म्हणायचं आहे ते जरा खुल्लमखुल्ला बोलले तर समजेल, नै का स्वरुप?

आरक्षणामुळे खालच्या जातींचे कमी दर्जाचे शिक्षक शिक्षणक्षेत्रात आले व शुद्ध ब्राह्मणी उच्चार असलेले उत्कृष्ट दर्जाचे शिक्षक कमी झाले त्यामुळे शिक्षणाचा भाषेचा दर्जा घसरला वगैरे कुजबूज नेहमीची आहे. तेच सर्व तुमच्या प्रतिसादातून दिसते आहे. स्पष्टपणे आरोप करायचा नाही पण प्रच्छन्नपणे मांडायचं हीच मोडस ऑपरेंडी.

नानाकळा,
सवंग राजकारण करु नका... प्लीजच!
आक्षेप दर्जाला आहे आणि त्यामुळे (आणि त्यामुळेच) आरक्षणाला आहे!

स्वरुप, सहमत आहे दर्जा पोस्टबद्दल.
वर नानाकळांनी उदाहरण दिलंय ते घ्यायचं झाल्यास शिक्षकांनीच >>विद्यार्थी-३ (मुंबई)
दिल ब्रेक करुन वर नुस्ती एक स्माईली सेंड करुन परतीची लोकल पकडलीस..>> अशी मराठी भाषा शाळेत शिकवली तर मुलांना तीच बरोबर असं वाटेल.

आता आलात ना लाईनवर सरळ.
दर्जाचा ठेका विशिष्ट जातींनीच घेतलाय ना? नाही का?
आणि मला म्हणताय सवंग राजकारण करु नका.
या धाग्यावर ही घाण तुम्ही घेऊन आला आहात. आता विरोध होतोय तर त्रास होतोय का?
अजून वेळ गेली नाही. प्रतिसाद मिटवू शकता आपण.

छोट्या खेड्यातून तेथील ग्रामीण बोलीभाषा बोलणारे जसे शुद्ध भाषा बोलणार्‍यांसमोर थोडे दबकून जातात.
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष

>>>>>

हा शोध कुणी लावला... ?

सायो. काय चाललंय?

ती मुलं आपआपल्या बोलीभाषेत कसा अनुवाद करतील त्याबद्दल आहे ती पोस्ट. आता म्हणा त्यांच्य बोलीभाषा ह्या जातीआधारित आहेत. एवढं सुद्धा समजत नाही आणि दर्जाच्या बाता मारताय.. कळला हो इथेच कळला 'दर्जा' ... धन्यवाद Happy

छोट्या खेड्यातून तेथील ग्रामीण बोलीभाषा बोलणारे जसे शुद्ध भाषा बोलणार्‍यांसमोर थोडे दबकून जातात.
>>>

होतं असे सहसा...
मी स्वत: फाडफाड ईंग्रजी बोलणार्‍यांसमोर दबकून जातो. मग मी एखाद्या हॉटेलात कस्टमर म्हणून गेलो आणि समोरच्या वेटरने ईंग्रजी फाडले तरी साधे पाणी मागताना आता हिंदी मराठीत मागावे की ईंग्रजीमध्ये मागावे, आणि मागितलेच ईंग्रजीमध्ये तर चुकणार तर नाही ना वाक्यरचना अश्या सतरा शंकांनी दडपून जाते मन..

नानकळा, सरळ शब्दात बोलता येतं? दमात घेऊन कुणाकरता पोस्ट लिहिताय? मला जे योग्य वाटेल आणि पटेल ते लिहायला मला मुभा आहे की नाही?
पोस्ट ते जातपात आणि आरक्षण बाजूला ठेवून नीट वाचलीत तर काय म्हणायचं आहे हे कळेल.

मराठी किती संपन्न भाषा आहे पहा
एका स्पर्धा परीक्षेतील प्रश्न :

"दिलके टुकडे टुकडे करके मुस्कराके चल दिए" या वाक्याचं मराठीत भाषांतर करा.
..........................
Submitted by नानाकळा

>>>>>

मस्तच ... खानदेश आणि विदर्भ माधे सुध्दा एवढ वेग वेगळ आहे हे समजल...
नाहीतर विदर्भ म्हणुन एकच प्रकार सांगीतला जातो...

ह्रदयाची खांडोळी खांडोळी करून स्मितहास्य करत निघून गेली टवळी..
>>>>>
आवडल.... Lol

आणि 'नेमक' वगैरे जे काही आहे ते जिथे म्हणायचे तिथे अगोदरच म्हणालेलो आहे.... अगदी स्पष्टपणे (कुजबुज वगैरे नव्हे बर का!)..... आणि त्यामुळेच बहुतेक तुमच्या लक्षात राहिलेले आहे!
"गुणात्मक पात्रता" नसताना इतर निकषांवर जेंव्हा एखाद्याला एखादा मुद्दा मिळतो तेंव्हा कामाच्या दर्जामध्ये तफावत (सन्माननिय अपवाद वगळता) असतेच असते" आणि हे माझे स्पष्ट मत आहे!

वरील सर्व चर्चा वाचून 'एक डाव धोबीपछाड' मधला 'मास्तर माझं म्हराटी सुधरंल का?' यानंतरचा सुबोध भावे चा डायलॉग आठवला... Wink
माणूस लहान पणापासून घरात वा आजूबाजूला जशी भाषा ऐकत आलाय तशीच बोलतो.. ती ऐकायची सवय नसलेल्यांना ती खटकते... तसंही लिहायची व बोलायची मराठी वेगळीच असणार.. बाकी, मधु-रजनी ताईंचा यातला अभ्यास छान आहे..लेख आवडला.

Pages