नागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)

Submitted by रसप on 30 April, 2016 - 04:08

'फॅण्ड्री' च्या शेवटी जब्या आणि त्याचं पूर्ण कुटुंब डुक्कराच्या मागे लागलेले दाखवले आहेत. त्यांची आणि डुक्कराची ती धडपड, पळापळ बराच वेळ चालते. पळून पळून जब्याचा बाप इतका दमतो की त्याच्या अक्षरश: छातीचा भाता होतो. ही सगळी पळापळ हळूहळू करत जब्याच्या शाळेभोवतीच्या परिसरात येते. मग जब्या त्याचे सवंगडी आणि 'ती'च्यापासून स्वत:चं तोंड लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतो. त्या प्रयत्नात १-२ वेळा पकडता येऊ शकणारं डुक्कर निसटतं. बाप खूप शिव्या घालतो. अखेरीस जब्या परिस्थितीला शरण जातो आणि आपलं हे अस्तित्व स्वीकारतो. त्याची लव्ह स्टोरी त्याच्या कधीही न वाचल्या जाऊ शकणाऱ्या एका कागदोपत्री फुटकळ इतिहासात जमा होते आणि त्या लव्ह स्टोरीचा पूर्णविराम म्हणून तो एक दगड थेट आपल्याकडे - कॅमेऱ्याच्या दिशेने - फेकतो. कहाणी संपते. बराच वेळ चाललेला डुक्कर पकडण्याचा प्रसंग ठळकपणे लक्षात राहतो. लक्षात राहते जब्याची केविलवाणी धडपड आणि त्याच्याहीपेक्षा केविलवाणा त्याचा बाप. 'फॅण्ड्री' मधला हा शेवटचा प्रसंग चालतो बराच वेळ, पण तरी तो लांबलेला वाटत नाही. किंबहुना 'फॅण्ड्री' एकूणच ची लांबी हे त्याचं एक बलस्थानच होतं. जेमतेम शंभर मिनिटं - साधारण पावणे दोन तास फक्त - चालते ती कहाणी.
'फॅण्ड्री' चं अजून एक बलस्थान होतं 'नाविन्य'. ती एक अशी कहाणी होती, जी कुणी कधी ह्यापूर्वी सांगितली नव्हती. कुणाला ते कदाचित पेलणारंच नव्हतं. 'हे दाखवून काय मिळणार आहे', असाच विचार त्यामागे असावा, कारण ती कहाणी कुणाला माहित नव्हती किंवा कुणी पाहिलेली नव्हती, असं तर नक्कीच नव्हतं. नागराज मंजुळेंनी ते आव्हान पेललं. मी असं म्हणणार नाही की, 'त्यांनी तो धोका पत्करला.' त्यांना त्यात धोका वगैरे वाटायचा प्रश्नच नव्हता. कारण काही कमवण्यासाठी ती कलाकृती नव्हतीच, त्यामुळे काही गमवण्याचा किंवा न कमवण्याचा धोकाच उद्भवत नाही.
'फॅण्ड्री'मध्ये मला काय आवडलं असं मला कुणी विचारलं, तर उत्तर सोपं आहे. 'उत्कटता.' आणि ही जी उत्कटता 'फॅण्ड्री'त आहे, ती माझ्या मते तरी वरील दोन कारणांमुळे आहे.

Sairat.jpg

'सैराट' ह्याच दोन बाबतींत 'फॅण्ड्री'समोर खूपच कमी पडतो.
तब्बल तीन तासांची लांबी, 'सैराट'ला खऱ्या अर्थाने पसरट करते. सुरुवातीच्या कमीत कमी एक तासाच्या चित्रपटाला जर पूर्णपणे कापून टाकलं असतं, तर काय झालं असतं, असा एक विचार मनात येतो. हा एक तास - सव्वा तासाचा सिनेमा चक्क रवी जाधवांनी केलेला वाटतो. ह्या तास - सव्वा तासात मिसरूड फुटलेली पोरं टवाळक्या करतात. समवयस्क मुलींवर लाईन मारतात. ह्या तास - सव्वा तासात किती तरी वेळा नायक-नायिका एकमेकांशी फुल्ल फिल्मी नजरानजर करतात. म्हणजे बाजूनी जाता जाता नजरा भिडवणे वगैरे..! लव्ह लेटर्स दिली जातात आणि टाका भिडतो.
मग अजय-अतुलच्या ट्रेडमार्क स्टाईलच्या बुंगाट गाण्यावर पब्लिक झिंगाट नाचतं आणि त्यानंतर खरा सिनेमा सुरु होतो.

इथून पुढचा सिनेमा क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' आहे. QSQT मध्ये खानदानी दुष्मनी असते, इथे जातीय भेद. QSQT मध्ये नायिकेकडच्या एका कौटुंबिक सोहळ्याच्या वेळी प्रेम प्रकरण उघडकीला येतं, इथेही तसंच. QSQT मध्ये दोघे जण पळून जातात आणि एका तात्पुरत्या घरात आश्रय घेतात, तेव्हा समजतं, नायिकेला तर चहासुद्धा करता येत नाही, इथेही तसंच. मग जसं 'साथिया'मध्ये नायक-नायिकेत अहंकार आड येऊन दुरावा निर्माण होतो, तसा इथेही काही मिनिटांसाठी होतं. कहाणी अपेक्षित वळणांनी अपेक्षित शेवटापर्यंत जाते. ह्या सगळ्या प्रवासात छोटे-छोटे फिल्मी योगायोगही बरेच जुळून आलेले आहेत. पळून जाण्यासाठी किनाऱ्यावर एक unattended मोटारबोट तयारच असणं, (पहिल्या वेळेस) भरपूर चोप मिळालेला असतानाही कुठे जखमा नसणं, (दुसऱ्या वेळेस) गुरासारखा मार खाऊनही किरकोळ जखमांसह पळ काढू शकणं, ज्या रस्त्याने गाडी जाणार आहे, त्याच्या बाजूलाच पोरांना बदडणं की अगदी लगेच दिसून यावं, वगैरे.

'सैराट'च्या संगीताचीही एक हवा आहे. 'अजय-अतुल' ने धूम मचवली असली, तरी सगळ्याच गाण्यांवर त्यांच्याच कुठल्या न कुठल्या गाण्याची (नेहमीप्रमाणे) छाप दिसतेच. 'झिंगाट' गाण्यावर बेभान होऊन नाचणारं अख्खं सिनेमागृह मी पाहून आलो आहे. अनेक दिवसांनंतर अशी जादू कुणी केली आहे. ह्या 'X-factor' बद्दल तर वादच नाही. गाण्यांचं संयोजनही केवळ अफलातून झालं आहे. 'हॉलीवूड'मध्ये संगीत संयोजन केलं गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. भरमसाट वाद्यांचा मेळ कसा असतो, हे समजून घेण्यासाठी भन्साळीने इकडे शिकवणी लावावी म्हणतो ! कुठेही कर्णकर्कश्य न होताही सांगीतिक भव्यता कशी असते, हे 'सैराट'ची गाणी दाखवतात. खास करून 'सैराट झालं' आणि 'याड लागलं' मधला वाद्यमेळ तर ऐकावाच.

'ऑनर किलिंग' ही उत्तर भारताच्या बऱ्याच भागांतली एक भीषण समस्या आहे. गुन्हेगारी जगतातल्या सत्यघटनांवर आधारित एका कार्यक्रमात अशीच एक कहाणी मागे पाहिली होती. 'सैराट'चं कथानक त्या सत्यघटनेवर बेतलेलं आहे. कहाणीतली सगळी वळणं आधीच कळून येतात. शेवटही माहितच असतो, पण अचूक नेम साधून शेवटाचा दगड थेट भिरकावण्याचं नागराज मंजुळेंचं कौशल्य व्यावसायिकतेचा कीडा चावल्यावरही अबाधित आहे. हा शेवट पायाखालची जमीन, डोक्यावरचं छप्पर, बुडाखालची खुर्ची सगळं बाजूला करतो. पोटातली आतडी पिळवटतो आणि डोक्यातला मेंदू बधीर करतो. डोळे थिजतात, हात-पाय गारठतात आणि ओठांना कंप सुटतो. केवळ ह्या शेवटासाठी दिग्दर्शक मंजुळे हवे होते, बाकीच्या पसाऱ्यासाठी कुणीही, अगदी कुणीही चाललं असतं.
समजा, हा चित्रपट 'फॅण्ड्री' वाल्याचा नसता, दुसऱ्या कुणाचा असता तर ?
तर हा एक महान चित्रपट असता. कितीही काहीही म्हणा, कुणी केलंय ह्यावर त्याचं मूल्यमापन ठरतंच ठरतं. जो मुलगा अभ्यासूच आहे, तो जर पहिल्या ऐवजी दुसऱ्या क्रमांकावर आला तर ते जास्त धक्कादायक असतं आणि काठावर पास होणारं एखादं दिवटं टपकलं, तरी विशेष काही घडलेलं नसतंच ! मंजुळेंचा दुसरा क्रमांक आला आहे, हे धक्कादायक आहे.
तीन तासांपैकी फक्त पाच मिनिटं मंजुळे दिसतात, एरव्ही दिसत नाहीत ही चित्रपटाची दुसरी शोकांतिका आहे. 'नागराज कमर्शियल मंजुळे' मला तरी पाहायचा नव्हता, इथून पुढेही पाहायचा नाहीय. त्यासाठी त्यांना किशोरवयीन प्रेम ह्या आजच्या मराठी चित्रपटाच्या जिव्हाळ्याच्या विषयापासून जरा वेगळं व्हावं लागेल. कारण आत्तापर्यंतच्या त्यांच्या दोन्ही चित्रपटांत हा समान धागा आहे.

नवीन चेहरे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू आश्वासक आहेत. नायिकेच्या भूमिकेसाठी एखादा चिकना चेहरा न निवडता रफ अ‍ॅण्ड टफ रिंकू निवडणं हा मास्टरस्ट्रोक होता. आकाश ठोसरसुद्धा एकदम मातीतला वाटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची निरागसता आहे. दोघेही फ्रेश असल्यामुळे कुठेही ते व्यक्तिरेखेच्या पुढ्यात येत नाहीत. नायकाच्या मित्रांच्या भूमिकेतल्या दोघांची नावं नीट कळू शकली नाहीत. (क्षमस्व) सुरेश विश्वकर्मा, सुरज पवार आणि तानाजी गालगुंडे ह्यांपैकी दोघे असावेत आणि उरलेला नायिकेचा भाऊ ! दोघा मित्रांची कामंही जबरदस्त झाली आहेत. खासकरून लंगड्या प्रदीपचं काम खूपच मस्त !

'सैराट' एकदा पाहण्यासारखा आहे. पण नागराज मंजुळेंचा चित्रपट म्हणून पाहिल्यास अपेक्षाभंग हमखास आहे. काही वेळेस संवेदनशील मनाला व्यावसायिकतेचीही एक दुसरी बाजू असते, हे एक नव्याने शिकता येऊ शकेल.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/04/movie-review-sairat.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाहिला. ओके वाटला. अजून त्यांच्या सिरीज मधे finesse नाहीए. मी बघते सिरीज पण त्यातल्या त्यात पहीलाच भाग बरा होता.

पहिला भाग बरा होता. आता थोडा सपकपणा आलाय. सैराट टीमसोबतचा छानेय. प्रिंसदादाला उगीच व्हिलन बनवलाय. पण एकंदर आवडला भाग. अमेय वाघ बघून बघून आवडायला लागलाय, तो स्वतःला प्रत्येक वेळी कसे प्रमोट करत असतो ते जाम मजेशीर वाटते.

अमेय वाघ बघून बघून आवडायला लागलाय, तो स्वतःला प्रत्येक वेळी कसे प्रमोट करत असतो ते जाम मजेशीर वाटते. >>> हा आहे पिक्चर मध्ये, मला नाही आठवत, काय नाव आहे हो त्याचे यात आणि सिन केव्हा आहे सांगु शकाल का

..

कास्टींग काउच प्रोग्रॅम पहिल्यांदाच पाहिला, भारी आहे Happy
इंटरव्हु मधे प्रिन्स दादा चहा पिताना वगैरे धमाल सिच्युएशन्स केल्या होत्या आणि रिंकु काय जबरी बोलली, ए कॅमेर्यावाल्या, चल व्हो भायेर' Proud

ह्या कास्टींग काउच मुळे तो अमेय जरा बरा वाटायला लागला.

राधिकाचे मस्त होतं.

श्रिया बोरींगच होती. बिचारे दोघ खूप खपले ते विनोदी करायला. पण.... सचिनची मुलगी बोरींग वाटली.

कास्टिंग काउच मध्ये बिटविन टु फर्न्स चं ॲडाॅप्शन वाटण्या एव्हढं साधर्म्य आहे. पण वाघ/धर्माधिकारी, गॅलफिनॅकसच्या जवळपासहि पोचत नाहि...

कास्टींग काउच मध्ये रिंकु अमेय वाघला ' नरसाळ्या' म्हणते , अमेय वाघ , निपुण धर्माधिकारीला नरसाळ्याच्या अर्थ 'क्युट' म्ह्णुन सांगतो Proud , मस्त झालाय तो एपिसोड.

बघितला , फार काही आवडला नाही .
उगाचच ओढुन ताणून वागल्यासारखं वाटले .

राधिका आपटेचा मस्त आहे . एक्दम सहज !

कालच सैराट बघितला. दोन-तीन ओढुन ताणुन बनवलेली द्रुश्ये सोडता चित्रपट एकदम मस्त वाटला. त्यात लव्ह स्टोरी किंवा दिल मध्ये दाखवल्यासारख पळुन गेल्यावर सुंदर घर न दाखवता कष्ट करुन घर घेताना दाखवले आहे ते पण आवडले.

मला चित्रपट बघायला आवडत नाही ३ तास बसायचे म्हणजे जाम बोर होत. माहेरची साडी नंतर हा दुसराच मराठी चित्रपट चित्रपट्गृहात जाउन बघितला. माहेरची साडी ला मध्येच घरी गेलो होतो पण सैराट बद्दल तसे झाले नाही,

शेवट आजुनही डोक्यातुन जात नाही कारण ही गोष्ट माझ्या कॉलेज मधल्या एका मुली बाबत ३० वर्षापुर्वी घडली होती. नवी मुम्बई मध्ये राहाणारी पंजाबी मुलगी , मुलगा सरदार न्हवता. दोघानी पळुन जाउन लग्न केले म्हणुन तिच्या भावानी दोघाना गोळ्या घालुन ठार केले आणि पोलिसाना शरण गेला होता.

साहिल हि घटना 30 वर्षांपूर्वीची? मी साधारण 10-15 वर्षांपूर्वी नवी मुंबईत सरदार फॅमिलीत झाल्याचे तेव्हाच्या पेपरात वाचलेले. मुलीचे काका, मामा, बाबा आई सगळे सामील होते. अतिशय वाईट रीतीने मारलेले दोघांना

मी जे सांगतोय ते प्रेम प्रकरण ३० वर्षापुर्वी चे , मुलगी engineering मध्ये आमच्याच क्लास मध्ये होती.

१९८६-८७ मध्ये प्रकरण चालु झाले होते त्यानंतर काही वर्षानी लग्न आणि काही दिवसानी हत्या (किंवा काही वर्षानी झाली असेल त्याकाळी कॉलेजच्या मित्रामध्ये फारसे कमुनिकेशन होत नसल्यने कॉलेज सोडल्यावरचे टाईम लाईन नक्की नाही माहित). एवढे मात्र नक्की की हत्या १९९५ किंवा त्याचा आधी झालेली .

माहित नाही हे तेच प्रकरण आहे की आजुन एक प्रकरण घडले. हत्येला २० वर्ष तरी नक्कीच झाली आहेत. नशिब चांगले की दोघाना मुल न्हवते.

मुळात सिनेमा पाहणं हे रक्तात असावं लागतं. चांगला वाईट, साधा, भरजरी कसाही असो मी पाहणारच ही उर्मी अंतरंगात असावी लागते. हैद्राबाद हे शहर साधारण पुणे व पिंची मिळून एवढे असावे. पुणे व पिंचित एकूण सिनेमागृहे किती आहेत ? चाळीसच्या वर नसावीत . कमीच असतील.हैद्राबादेत किती आहेत? साडे तीनशे.!
आणि त्यात केवळ तेलुगु सिनेमेच लागतात आणि ती गर्दीने बहुतांश ओसंडून वाहतात. इथे मुळात परीक्षणे वाचून सिनेमाला जायचे की नाही ते ठरवले जाते. अर्धवट शहाण्या पाळीव 'समीक्षका"नी निगेटीव सूर काढला की टीव्ही वर लागल्यावर फुकटात पाहू असा निर्णय परबुद्धीने घेतला जातो. टीव्हीवर पाहिल्यावर 'मी का हा चित्रपट पाहिला? का? का? का? असे विव्हळायला सुरुवात केली जाते . ही इथली रसिकता. बेभान, बेधुंद, सैराट क्षण उपभोगण्याची मानसिकताच नाही.

मी युट्यूब वर पाहिला(ही फार चांगली गोष्ट नाही, पण थेटर ला पाहणे शक्य नव्हते म्हणून..)
पण यातली गाणी, दृष्य पाहून वर्किंग डे ला अर्धी सुट्टी घेऊन थेटर ला मॅटिनी पाहणार आहे. नातेवाईकांनी ऑफिशियल सीडी विकत आणून घरी पाहिला पण थेटर ला परत पाहणार आहेत.थिएटर ला चित्रपट बघण्यासारखी मजा आणि सुख नाही.

व्यावसायिकता,संदेश वगैरे वगैरे जाऊदे, गाणी ऐकून अंगावर काटा येईल आणि परत परत ऐकून नव्यानव्या जागा सापडतील अशी गाणी, फार अनुभव नसताना फ्रेश अभिनय आणि सुंदर दृष्यं असलेले असे किती पिक्चर बनतात?
प्रत्यक्ष माझ्या नात्यातलं कोणी किंवा धाकट्या बहिणी भाऊ भाचे भाच्या असा वेडेपणा शिक्षण चालू असताना करत असतील तर परावृत्त करेन(तलवारीने मारणार नाही).पण असे वेडेपणे लग्न या टोकाला न जाता बरेचजण कॉलेजात करतातच.त्या चक्रम पणाची आठवण म्हणून बघायला सुंदर चित्रपट आहे.

चित्रपट अजून थेटरात आहे. ऑफ्हिशियल सीडी वगैरे अजून बाजारात नाही. जे काही आहे ते सगळं पायरेटेडच आहे.

हो काय? एकटी सीडी होती आणि त्याला कव्हर होते आणि महाग होती Happy त्यावरुन ऑफिशियल म्हटले.
नीट बघते घरी गेल्यावर..

Pages