लोकमान्य - एक युगपुरुष

Submitted by कोकणस्थ on 4 January, 2015 - 07:31

लोकमान्य बाळगंगाधर टिळक. काही भारतीयांची नावे घेतली की माझे मस्तक आपोआप आदराने झुकते, त्यातलं हे महत्त्वाचं नाव. लोकमान्य. दुसरं काहीही नाही. संत नाही, महंत नाही, महात्मा नाही, देवमाणूस नाही, किंवा तत्सम काहीही नाही. लोकमान्य. लोकांना मान्य असलेला तो लोकमान्य. बास्स.

Lokmanya Profile.jpg

सत्तावन्नचे स्वातंत्र्ययुद्ध इंग्रजांनी चिरडून फारा वर्षे लोटली नव्हती. या पराभवाने लोक मनाने इतके खचले होते की भारतीय जनता संपूर्णपणे हतवीर्य होऊन 'इंग्रज हेच आपले मायबाप, ते म्हणतील तेच आणि त्यांचेच सगळे बरोबर, आणि भारतीय जे जे ते ते टाकाऊ' अशा निष्कर्षाप्रत आली होती. अशा काळी थंड लोळागोळा होऊन पडलेल्या हिंदुस्थानला ऊब आणली ती न्यायमूर्ती रानडे यांनी. मात्र या उबेचे रूपांतर धगधगत्या वणव्यात केले ते लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी. "लोकमान्य टिळकांचा विजय असो" या मराठीभूमीतल्या घोषणे पासून उत्तरेतल्या "तिलक महाराज की जय" या जयजयकारात काय दडलेलं नाही? जनसामान्यांनी दिलेल्या या पदवीपासून ते थेट ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या तोंडून म्हणजेच 'फ्रॉम द हॉर्सेस माऊथ' आलेल्या "भारतीय असंतोषाचे जनक" (Father of Indian Unrest) या संबोधनाचे धनी असलेल्या लोकमान्य बाळगंगाधर टिळकांवर आजवर अनेक लेख व पुस्तके लिहिली गेली असतील. चरित्र लिहायचं म्हटलं की किती लिहावं याला बंधन नसतं. मात्र एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचं चित्रण चित्रपटाच्या माध्यमातून करायचं म्हटलं तर ते मात्र अतिशय आव्हानात्मक काम ठरतं. चित्रपटाला असलेलं वेळेचं बंधन आणि त्या माध्यमाला असलेल्या मर्यादा हे मोठे अडथळे ठरू शकतात. त्यात ती व्यक्ती राजकीय पुढारी किंवा स्वातंत्र्यसैनिक असली, तर बघायलाच नको. त्यातही लोकमान्यांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व असेल तर हे काम आणखी कठीण होऊन बसतं.

मग चित्रपट काढणार तरी कुठल्या पैलूवर? एका निष्णात गणितज्ञावर की पंचांगकर्त्यावर? गीतारहस्य ह्या ग्रंथाच्या रचनाकारावर की "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" ही सिंहगर्जना करणारर्‍या या नरसिंहावर? गोपाळराव आगरकरांसारख्या वैचारिक शत्रूची त्याच्या आजारपणात रात्र-रात्र बसून शुश्रुषा करणार्‍या हळव्या मित्रावर की 'शिक्षणमहर्षी' ही ज्या काळी शिवी झाली नव्हती त्या काळात सरकारी शाळांहून सरस आणि देशाभिमान जागृत होईल असे शिक्षण देणार्‍या शिक्षणसंस्था काढणार्‍या ध्येयवेड्यावर? भल्याभल्यांची भंबेरी उडवून देणार्‍या धडाडीच्या पत्रकार आणि संपादकावर की १९४७ नंतरही ज्याचा पुतळा कराचीत उभा होता अशा एकमेव भारतीय पुढार्‍यावर? दुष्काळ पडल्यावर ब्रिटीश सरकारने केलेल्या दुष्काळावरच्या कायद्यांचा उपयोग शेतकर्‍यांना व्हावा म्हणून त्यावर पुस्तिका लिहून वाटणार्‍या आणि शेतकर्‍यांच्या हितासाठी झटणार्‍या समाजसेवकावर की तुरुंगात असतानाही केवळ पुस्तकांच्या आधारावर नवी भाषा शिकणार्‍या तल्लख बुद्धीच्या या विद्यार्थ्यावर? वासुदेव बळवंत फडक्यांना सबूरीचा सल्ला देणार्‍या बळवंतरावांवर की चापेकरांसारख्या अनेक क्रांतीकारकांना प्रेरणास्थान ठरणार्‍या लोकमान्यांवर? व्यक्तिमत्वाला असंख्य कंगोरे असलेल्या या नरसिंहावर कुणाला चित्रपट काढता येईल? घटना नेमक्या कुठल्या निवडायच्या? एखाद्या डबक्यावर लघुपट काढता येतो. तलावावर मालिका लिहीता येते. आणि नदीवर नाटक-चित्रपट. पण ज्याच्या अमर्याद खोलीचा अंदाजच येत नाही अशा या अथांग रत्नाकरावर कुणाला चित्रपटासारखी कलाकृती निर्माण करणे झेपेल काय?

याचे उत्तर मात्र ओम राऊत यांच्या "लोकमान्यः एक युगपुरुष" या चित्रपटातून बर्‍याच अंशी होकारार्थी मिळते. मी बर्‍याच अंशी का म्हणालो याचा खुलासा पुढे करतो. बालगंधर्व चित्रपटापासूनच सुबोध भावे कुठल्याही भूमिकेचं सोनं करु शकतो याबद्दल शंका नव्हतीच. मात्र हा चित्रपट बघायला जाताना तो लोकमान्यांच्या भूमिकेचं शिवधनुष्य कसे पेलतो याची उत्सुकताही होती. हा चित्रपट बघितल्यानंतर मात्र सुबोध भावे कुठलीही भूमिका अक्षरशः जगू शकतो याची ठामपणे खात्री पटली. लोकमान्यांची करारी भावमुद्रा, ताठ बाणा, प्रसंगी दिसणरा हळवेपणा आणि आग ओकणारे डोळे अंगार हे सुबोधने उत्तमरित्या स्वतःत उतरवले आहेत. इतके की आज टिळक हयात असते तर त्यांनीही सुबोधचं मनापासून कौतुक केलं असतं इतकी ही भूमिका तंतोतंत वठवण्यात सुबोध यशस्वी झाला आहे. गांधींची भूमिका म्हटलं की लगेच कृष्ण भानजी अर्थात बेन किंगस्ले आणि सरदार पटेल म्हटलं की परेश रावल हे ताकदीचे कलाकार जसे आठवतात, तसे आता यापुढे टिळक म्हटलं की सुबोध आणि सुबोध म्हटलं की टिळक हेच समीकरण आठवत राहणार नि:संशय.

"डॉग्स अ‍ॅन्ड इंडिअन्स आर नॉट अलाउड" हे ऐकण्याची सवय असलेल्या जनतेच्या समोरच त्या काळी एका इंग्रजाला "बाहेर पाटीच लाऊन घेणार आहे. डॉग्स अ‍ॅन्ड ब्रिटीश आर नॉट अलाउड" असं सुनावताना त्याचे डोळे अक्षरशः आग ओकतात. गोपाळराव आगरकरांशी वाद घालताना "हिंदू धर्मात काय सुधारणा करायची ते हिंदूच ठरवतील, (ब्रिटीश) कायद्याने लादलेली बळजबरीची सुधारणा चालणार नाही" असे जेव्हा लोकमान्य ठणकावतात, तेव्हा हे देशाभिमानी वाक्य ऐकताना आपल्याच हृदयाचे ठोके चुकतात. सुधारकांची सभा उधळल्यावर तिथून निघून जाताना त्याच्या चेहर्‍यावर उमटलेले ते छद्मी हास्य अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच !!" ही डरकाळी आणि "बहुजनांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही आता सार्वजनिक गणेशोत्सवात घेता येईल" ही आणि अशी वाक्ये ऐकावी तर सुबोध भावेच्या तोंडूनच. केसरीत छापावयाच्या अग्रलेखाचा मजकूर लेखनिकाला सांगत असताना मधेच "विश्वनाथ गेला" हे ऐकल्यावर कापर्‍या आवाजात तो लेख सांगून पूर्ण करणार्‍या टिळकांना फक्त आणि फक्त सुबोधच साकारू जाणे.

Lokmanya Cover.jpg

हा चित्रपट जसा सुबोधचा आहे तसाच तो दिग्दर्शक ओम राऊत यांचाही आहे. ओम राऊत यांनी सुबोध भावे नामक हिर्‍याला पैलू पाडून चमकवलं आहे, त्याच्याकडून अगदी हवा तसा अभिनय करवून घेतला आहे. या बाबतीत दिग्दर्शक ओम राऊत यांचं कौतुक करायलाच हवं. वर म्हटल्याप्रमाणे घटना कोणत्या निवडायच्या या पेचातून त्यांनी इतक्या व्यवस्थितपणे मार्ग काढला आहे, की त्यातून हा चित्रपट टिळकांची कारकीर्द संपूर्णपणे दाखवत नसला तरी त्यांच्या कर्तृत्वाची पुरेशी झलक नक्की दाखवतो. चित्रपटात लोकमान्यांची हिंदुत्ववादी धर्माभिमानी बाजू त्यांनी कुठलाही प्रचारकी आव न आणता व्यवस्थित मांडली आहे. देशाच्या हिताचा असेल तर केलेला खूनही समर्थनीय ठरतो ही लोकमान्यांची भूमिका मांडताना चित्रपट कुठेही भीड ठेवत नाही. त्याचबरोबर "स्वराज्यासाठी रक्त वहायलाच हवं, नाहीतर मिळालेल्या स्वराज्याची किंमत राहणार नाही" असं सुनावून राजकारणात नाहक घुसू पाहणार्‍या अहिंसा नामक थोतांडाची संभावना करतानाही चित्रपट कमी पडत नाही. लोकमान्यांचा स्वदेशीचा पुरस्कार ही बाजूही चित्रपट यशस्वीपणे मांडतो. तसेच टिळक-आगरकर वाद आणि गांधी-टिळक भेट या प्रसंगांना प्रभावीपणे सादर करण्यात आलेले आहे. चित्रपटात टिळकांच्या कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या घटना अशा प्रकारे दाखवण्यात आलेल्या आहेत की प्रेक्षकांना चित्रपटातून तर टिळकांविषयी माहिती मिळेलच पण चित्रपट संपवून घरी गेल्यावरही त्यांच्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची प्रेरणा मिळेल. थोडक्यात, हा चित्रपट म्हणजे टिळक नामक महासागराची खोली दाखवण्याचा एक प्रयत्न आहे.

सुबोध म्हणजे टिळक आणि टिळक म्हणजे सुबोध असं वाटायला लावण्यात रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचाही मोठा वाटा आहे. आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले यांनी संपादनाची बाजू उत्तमरित्या सांभाळली आहे. वेषभूषाकार महेश शेरला व कलादिग्दर्शक संतोष फुटाणे यांनी तो काळ हुबेहूब उभा करुन आपापल्या विभागात कमाल केली आहे. अजीत-समीर यांचे संगीत एरवी वेगळी गाणी म्हणून ऐकायला फार रोचक नसले तरी त्या त्या प्रसंगांत कुठेही उपरे भासत नाही, उलट चपखलच वाटते. चित्रपटाच्या सुरवातीला नाना पाटेकरांच्या आवाजातले निवेदन सुरू असताना निवेदनानुरूप ज्या बातम्या आणि छायाचित्रे दाखवली आहेत त्याबद्दल दिग्दर्शकाला वाकून कुनिर्सात.

LokmanyaEkYugpurush 03 Kesari.jpg

लोकमान्यांना कारावासाची शिक्षा होऊन मंडालेला रवाना करण्याचे ठरते तो प्रसंग म्हणजे या चित्रपटाची सुरवात आहे. मग आजच्या काळातल्या मकरंद (चिन्मय मांडलेकर) आणि त्याची पत्नी समीरा (प्रिया बापट) याच्या माध्यमातून तो फुलत जातो. हा भाग मात्र जरा खटकला. एक कारण म्हणजे मुळात अशा व्यक्तिमत्वावर चित्रपट काढताना वेळेचं बंधन असताना हा भाग दाखवण्याऐवजी त्याला पूर्ण फाटा देऊन लोकमान्यांच्या कारकिर्दीतलेच अधिक प्रसंग दाखवले असते तर चित्रपट आणखी प्रभावशाली झाला असता. मकरंद आणि समीराच्या आयुष्यात लोकमान्यांच्या प्रभावाने जे बदल होतात ते सगळं फारच ओढून ताणून दाखवलं आहे, त्यामुळे चित्रपटातला हा भाग अधिकच अनावश्यक वाटतो. मात्र असं असलं तरी या दोन्ही भूमिकात्काम चिन्मय आणि प्रिया यांनी चांगलं काम केलं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या या वैगुण्याकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही. म्हणूनच मी सुरवातीला 'बर्‍याच अंशी' हे शब्द वापरले होते.

दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटात काही ठिकाणी घडणारे प्रसंग हे गोंधळात टाकतात. म्हणजे घटना किंवा दाखवलेले प्रसंग अमुक साली घडलेले असताना वेगळ्याच साली घडले आहेत असे दाखवले आहे. मात्र या गोष्टींकडे लक्षही जाणार नाही अशा प्रकारे ते प्रसंग रंगवण्यात चित्रपटकर्ते यशस्वी झाले आहेत.

चुकाच काढायच्या तर आणखीही काढता येतील. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे. कुठल्याही चरित्रपटाचं एक महत्त्वाचं साध्य (key takeaway) असावं ते म्हणजे एखादे जबरदस्त पुस्तक वाचल्यावर वाचकाची जशी भारावल्यासारखी अवस्था होते तशीच परिणामकारकता साधणं. निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय, वेषभूषा आणि रंगभूषा, कलादिग्दर्शन इत्यादी प्रत्येक बाबीत घेतलेली प्रचंड मेहनत व अभ्यास आणि एकूणच चित्रपटाचे अप्रतीम सादरीकरण यांच्यामुळे तशी परिणामकारकता नक्कीच साधली जाते. चित्रपट आपल्याला एवढा गुंगवून ठेवतो की मध्यंतर नामक लहानशा व्यत्ययामुळेही आपण प्रचंड अस्वस्थ होतो. चित्रपटाच्या सुरवातीला सुबोधने उभ्या केलेल्या लोकमान्यांच्या प्रवेशापासून ते शेवटच्या श्रेयनामावलीपर्यंत आपण एक वेगळेच भारावलेपण अनुभवतो.

भारतीय राजकारणावर ज्यांचा तीव्र प्रभाव पडतो आहे आणि आपल्याला प्रचंड अडचणीचे ठरू शकतात अशा नेत्यांना पाताळयंत्री ब्रिटीशांनी भारतीय जनतेपासून लांब ठेवण्याचं धोरण अवलंबलं. या रास्त भीतीतूनच लोकमान्यांना आयुष्याची तब्बल सहा वर्ष ब्रिटीशांनी भारताबाहेर मंडालेत, लोकांपासून लांब ठेवलं. लोकमान्यांना आणखी फक्त दहा वर्षांचे आयुष्य मिळते, तर भारतीय स्वातंत्र्यलढा आणि एकूण राजकारण यांचा चेहरामोहरा आज काही वेगळाच दिसला असता हे निश्चित.

असे जास्तीतजास्त चित्रपट बनायला हवेत. कारण आपल्याला आझादी ही फक्त आणि फक्त बिना खडग बिना ढाल मिळालेली आहे अशी खोडसाळ आणि तितकीच खुळचट समजूत करुन देणारी पाठ्यपुस्तके असल्यावर पुढच्या पिढीला सत्य समजणार तरी कसे? अशा कलाकृती बनल्याशिवाय स्वातंत्र्यलढ्यातल्या अशा हिर्‍यांचे प्रभावशाली दर्शन होणार तरी कसे?

चित्रपटाचा तिकीट काढलेला खेळ केव्हाच संपतो, पण त्यानंतर बराच काळ डोक्यात ठाण मांडून बसतात ते सुबोध भावेने सादर केलेले तुमचे, आमचे, सर्वांचेच - लोकमान्य. दुसरं काहीही नाही. संत नाही, महंत नाही, महात्मा नाही, देवमाणूस नाही, किंवा तत्सम काहीही नाही. लोकमान्य. लोकांना मान्य असलेला तो लोकमान्य. बास्स.

अजून बघितला नसेल तर चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा. लोकमान्य - एक युगपुरुष.

------------------------------------------------------------------------------------

ट्रेलर
http://www.youtube.com/watch?v=aLvVD0lyOqw

http://www.youtube.com/watch?v=nu7_JEUm6mc

http://www.youtube.com/watch?v=BpS2bF3KwmU

पत्रकार परिषद १
http://www.youtube.com/watch?v=S32mOWXJIi8

पत्रकार परिषद १
http://www.youtube.com/watch?v=VlU3RW_MTQc

गाणे: हे जीवन आपुले सार्थ करा
http://www.youtube.com/watch?v=0DeqgxST6Fg

गाणे: गजानना, गजानना
http://www.youtube.com/watch?annotation_id=annotation_3593398775&feature...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रार +११११
तू पूर्ण पाहिलास तरी. मी थोड्याच वेळात बंद केला. अत्यंत उथळ प्रेझेन्टेशन वाटलं. उगीच आपलं सुबोध हाताशी होता, त्याला तो गेटप चांगला दिसला म्हणून बाकी काही अभ्यास न करता सिनेमा काढला असं वाटलं अक्षर्शः
मी अ‍ॅक्चुअली मुलांना धरून बसवून दाखवणार होते हा सिनेमा पण मलाच ते जस्टिफाय करता येईना .

रार ++
सुबोध भावेची टिळकांच्या भूमीकेसाठी चांगली निवड पण बाकी सिनेमात काहीच दम नव्हता..
माझा पण सिनेमा बघून प्रचंड अपेक्षाभंग झाला ..

श्रावण शु. १, शके १९३७ अर्थात येत्या १५ ऑगस्ट २०१५ रोजी दुपारी १२ वाजता हा चित्रपट झी मराठी वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे.

अजून हा चित्रपट पाहिला नसल्यास अवश्य पहावा.

रार, डीजे, मीपु आणि मै +१

तो काळ उभा करण आणि टिळक, आगरकर, रानडे, चिपळुणकर इ. मोठी व्यक्तिमत्व उभी करण ह्या दोन्हि आघाड्या.न्वर साफच फसलाय चित्रपट.
स.न्मती वयाच्या कायद्यास.न्दर्भात टिळक आणि आगरकर ह्या.न्च्या भुमिका मा.न्डण्याचा प्रस.न्ग आहे तो ह्या ठिकाणि अगदी चपखल बसावा उदाहरण म्हणुन. एक विकेशा स्त्री खुशाल अ.न्गणात येउन वृत्तपत्र वाचत तेथे बसलेल्या (कुट.न्बातील सदस्य नसलेल्या) आगरकरा.न्शी ह्या विषयावर चर्चा करते हे इतक कमाल विपर्यस्त चित्रण आहे त्या काळाच.

स.न्मती वयाच्या कायद्यास.न्दर्भात टिळक आणि आगरकर ह्या.न्च्या भुमिका मा.न्डण्याचा प्रस.न्ग आहे तो ह्या ठिकाणि अगदी चपखल बसावा उदाहरण म्हणुन. एक विकेशा स्त्री खुशाल अ.न्गणात येउन वृत्तपत्र वाचत तेथे बसलेल्या (कुट.न्बातील सदस्य नसलेल्या) आगरकरा.न्शी ह्या विषयावर चर्चा करते हे इतक कमाल विपर्यस्त चित्रण आहे त्या काळाच.>>>>

हा प्रसंग बहुतेक 'टिळक आणि आगरकर' या विश्राम बेडेकरांच्या नाटकातून जसाच्या तसा उचललेला आहे. पण त्या नाटकात तो चपखल बसतो. जमल्यास हे नाटक जरूर वाचा, टिळक आणि आगरकर यांच्यातील मैत्री, दुरावा, संघर्ष..तरीही त्यांना एकमेकांविषयी वाटणारी ओढ अतिशय सुंदर चित्रीत केली आहे नाटकात.

रमा तुम्ही जरूर वाचा ते नाटक. अतिशय सुंदर आहे. विशेषतः शेवट तर मला highlight म्हणता येईल. मर्मबंध या टीव्ही मालिकेवरही या नाटकाचा खूप प्रभाव होता. या नाटकाची चित्रफीत बघायची होती पण VCD/DVD कुठेच उपलब्ध नाही बहुतेक. पुन्हा कोणीतरी हे रंगमंचावर घेऊन यावं अशी खूप इच्छा आहे.

हा बाफ वर आलाच आहे तर उरलेली भडास पण काढून घेते.
गणपती उत्सवाच्या सीन मधे, जे गाणं घातलं आहे 'देवांचा तू देव मोरया, गातो तुझे गुणगान' ह्या गाण्याचे शब्द, चाल, आवाज , बीट्स ऐकून मी जीव मुठीत धरून अर्थर्वशीर्षाची पारायणं करत होते - की देवा गजानना, कोणत्याही क्षणी टिळक गाण्यावर नाचायला लागले आहेत, 'देवा श्रीगणेशा' च्या स्टेप्स करत असं बघायला लावू नकोस म्हणून ! Lol
आणि 'यदा यदा ही धर्मस्य' हा गीतेचा अर्थ सांगणारा, मंडालेच्या तुरूंगाच्या भींती पडून, अवकाश गंगेचं अथांग दर्शन घडवणारा सीन पाहताना चुकून टिळक सिनेमाला 'रा वन' ची रीळं जोडली गेली आहेत का असा प्रश्न पडला... Lol
२०१५ साली फॅन्सी ड्रेस स्पर्धेत कोणी 'टिळक' कॅरॅक्टर करायचं ठरवलं तर ते मह्णजे हा सिनेमा !
प्रचंड चिडचिड आणी वाईट वाटलंय, असा भारी विषय इतका उथळ हँडल केलाय म्हणून !!

रार +१: टिळकांसारखी गुंतागुंतीची माणसे त्यां त्या समयाचे भान ठेऊन विस्तरत मांडायला प्रचंड कसब लागत.. इथे नुस्ता मेकप आहे... आणि टिळकांमुळे प्रभावीत होणार पत्रकार ( काय त्याचे नाव, त्यानेच पटकथा लिहिलि आहे ना?) हे उपकथानक इतक गरीब आहे... हा चित्रपट मुळ सिंघम चित्रपटावर अधारीत असावा असे वाटले...

तेंच्या त्या कमला वर सिरिअल (किलर) कमला होऊ शकते मग सिंघम वर आधारीत टिळक का नाही? ह्यालाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात हे मला पुरेपुर कळाले आहे ....

श्रावण शु. १, शके १९३७ अर्थात उद्या १५ ऑगस्ट २०१५ रोजी दुपारी १२ वाजता हा चित्रपट झी मराठी वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे.

अजून हा चित्रपट पाहिला नसल्यास अवश्य पहावा.

अर्र,

मीही योगायोगाने याच आठवड्यात पाहिला. वा ई ट होता चित्रपट. ते येक असो.
वर रार ने चिडचिड केलीच आहे, त्याला सहमती.

टिळक धावत पुलावर येतात काय, एकहाती दंगे थांबवतात काय. अवाक झाले मी. शिवाय त्या टिळकांच्या बायडीला येक डायलॉग देता येऊ नये ? कारागृहातील भिंतींवर गीतेतील ओळींचे नियॉन फ्लॅश पाहून धन्य जाहले. फुडे एलियन येणार असेबी वाटले.

आणि तो मांडलेकर, काय त्याची ती एकुलतीएक संचितमुद्रा ? आणिक त्या बापटबाईंचे शब्दोच्चार किती सदोष आहेत..

वैताग आला मला एकुणात.

बाकी मी पोरीबरोबर पाहिला. 'व्हू वॉज ही', 'व्हाय डीड ही फाईट विथ हीज फ्रेंड' , 'ooh that's mean', 'व्हाय कुडन्ट वुमेन स्टडी' ? अशी मजेमजेची प्रश्नोत्तरे.

पु.लं ना आली तीच शंका चाटून गेली मलाही.
लोकमान्यांचा रंग भाजणीच्या थालिपीठासारखा होता ना म्हणे? मग हे गोरेपान टिळक ?

टिळक थालीपीठासारखेच होते गं. पण एडिट करता करता चुकून फिल्मच्या रिळाला फेयर अँड लव्हली फासली कुणीतरी Wink

हा सिनेमा पाहिला नाही कारण ट्रेलर पाहिले होते. किती दचकले टिळक "स्वराज्य" करून ओरडले तेव्हा. इंग्रज घालवायचा का बहिरा करायचा, नक्की ध्येय काय होते टिळकांचे असा प्रश्न पडला आणि पास दिला.

बाकी मी पोरीबरोबर पाहिला. 'व्हू वॉज ही', 'व्हाय डीड ही फाईट विथ हीज फ्रेंड' , 'ooh that's mean', 'व्हाय कुडन्ट वुमेन स्टडी' ? अशी मजेमजेची प्रश्नोत्तरे.
<<
रैना,
अजिबात नवल नाही तिला असं वाटलं तर :).

अर्र, आमच्याकडे लेकानेच मला आठवण करुन दिली की आज 'लोकमान्य' लागणारे आणि उत्साहाने रेकॉर्ड करत बघायला बसलाय Uhoh

पहिल्या पाच-दहा मिनिटांतच पुढे काय कोलाज ( चिवडा ! असे वाचावे ) वाढून ठेवलाय ह्याचा अंदाज आला.

इतका काही वाईट नाहीये. असे चित्रपट निर्माण होण्याच्या प्रक्रियेतला प्रयत्न म्हणून पहा........

तद्दन टुकार चित्रपट,टिळकांचे करारी डोळे दाखवण्याच्या नादात सुबोध भावे चक्क चकणा बघतोय,टिळक हे शाळीग्रामी वर्णाचे होते ,हे टिळक संगमरवरी दिसतायत,अत्यंत मिळमिळीत.अजिबात हा चित्रपट पाहू नये.

माझ्या भावाने हा चित्रपट अगदी चित्रपटगृहात जाऊन पहिला. त्याला अजिबात आवडला नव्हता. सुबोध भावेचे काम आवडलं. अजून जवळच्या काही जणांना चित्रपट आवडला नाही त्यामुळे मी आज टीव्हीवर पहायचा नाही हेच ठरवलं आणि त्याबद्दल मला अजिबात वाईट वाटत नाहीये.

अन्जू, बरं केलंत.
एकतर ते वर्तमानकाळाचे ठिगळ इतक्या बाळबोध पद्धतीने जोडलेय ! ते काहीच न दाखवता फक्त त्यावेळचा काळ दाखवला असता तरी चित्रपट आहे त्यापेक्षा सुसह्य झाला असता. दुसरे गाणी त्या काळाशी इतकी विसंगत आहेत. खरोखर रार म्हणते तसं ते गणपतीउत्सवातलं गाणं प्रचंड खटकतं कानांना. बाकीही सगळ्या टीकात्मक पोस्ट्सशी सहमत.

खरं सांगायचं तर जब्बार पटेलांचा डॉ. आंबेडकरांवरचा आणि अटेनबरॉचा गांधी हा सिनेमा सुद्धा नव्हता आवडला. पण जब्बार पटेल हे नाव इतकं बडं की आवडला नाही म्हणायची सोय नाही. तुम्हाला काही कळत नाही असे तुक टाकले जातात. ऑस्कर विजेत्या सिनेमाला नाव ठेवणे म्हणजे तर संपलंच.

इतिहासातील व्यक्तीमत्त्व पहायला जाताना आपण "सिनेमा" पहायला जात नसतो. तीन किंवा दोन तासात चरित्र कोंबणे किंवा ग्लोरीफिकेशन हे त्रासबिंदू असतातच. त्या त्या व्यक्तीमत्वाच्या आयुष्याची कहाणी असा सिनेमा काढायचा म्हटला तरी अपरिहार्यपणे त्यांचे सार्वजनिक जीवन दाखवण्याचा, महत्वाच्या ऐतिहासिक घडामोडी दाखवण्याचा मोह टाळता येत नाही. आणि चरित्रपट म्हटलं तर निराशाच... मिथुनने काम केलेला रामकृष्ण परमहंस यांच्यावरचा सिनेमा अधूनमधून पाहीला आणि मिथुनच्या त्यातल्या अनपेक्षित अशा अविश्वसनीय अभिनयाला दाद द्याविशी वाटली. तेव्हढ्यासाठी तरी सिनेमा संपूर्ण पहायला हवा होता ही रुखरुख लागून राहिली.

जब्बार पटेलांच्या सिनेमात वातावरणनिर्मिती आणि मामुट्टी हे दोन घटक चांगले होते. यशवंतराव चव्हाणांवरच्या सिनेमात तर नेमकं काय करायचं होतं हे समजलंच नाही. यअशवंतराव मात्र हुबेहूब उभे केलेत.

इथून पुढे चरित्रपट पहावे कि नाहीत ?

(तंत्रदृष्ट्या डावा असूनही भावेंचा संत तुकाराम, अत्रेंनी महात्मा फुलेंवर बनवलेला सिनेमा, डॉ. श्रीराम लागूंची भूमिका असलेला गाडगेबाबांवरचा सिनेमा हे सिनेमे त्यामानाने चांगले म्हणायचे. मनोजकुमारचा शिर्डी के साईबाबा हा आपल्या उद्दीष्टाशी प्रामाणिक म्हणायला हवा सिनेमा. Proud )

Pages