चहा हा 'चहा' समजूनच प्यायला पाहिजे. जर कुणी म्हटलं की, 'साखरेचा पाक समजुन पी' किंवा 'काढा समजुन पी' तर कसं चालेल ? 'सूप' म्हणून 'बाउल'मध्ये काही तरी आणून द्यायचं आणि म्हणायचं की, 'कोशिंबीर समजुन खा' तर कसं चालेल ? तसंच, एक शौकीन माणूस चित्रपट हा 'चित्रपट' म्हणूनच पाहतो. 'हा चरित्रपट आहे, ह्याला वेगळ्या नजरेने पहा.. ह्याचं बजेट कमी आहे, ह्याला सहानुभूतीने पहा..' वगैरे गोष्टी मनावर दगड ठेवायला लावतात, दुसरं काही नाही. कुठे तरी आत काही तरी अतृप्त राहतंच, अपूर्ण राहतंच. वेगळ्या नजरेने, सहानुभूतीने पाहूनही मग प्रतिक्रिया सावधच असते. 'कसा होता?' विचारलं की 'बरा होता... ठीकच होता... वाईट नाही.. अगदीच न पाहण्यासारखा नाही' वगैरे अधांतरी विधानं केली जातात.
'लोकमान्य' पाहिल्यावर माझी तरी प्रतिक्रिया अशीच अधांतरी होती.
लोकमान्य टिळक अर्थात बाळ गंगाधर टिळक अर्थात केशव गंगाधर टिळक हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व. दस्तुरखुद्द महात्मा गांधी ज्यांना गुरुस्थानी मानायचे असे एक तडफदार नेतृत्व. शंभर वर्षांपूर्वी आजच्या सुधारणा सुचवणारा अद्वितीय द्रष्टा माणूस. टिळकांचे आयुष्य किंबहुना कुणाही स्वातंत्र्यसेनानीचे आयुष्य हे एका २-३ तासाच्या कलाकृतीत बांधणं म्हणजे निव्वळ अशक्यच. काही धागे अपरिहार्यपणे सुटे राहणं स्वाभाविकच. पण, जे धागे विणले जातील त्यांची वीण घट्ट असावी, अशी माफक अपेक्षा 'लोकमान्य' पूर्ण करण्यात कमी पडतो.
आजच्या जगातील एक तरुण पत्रकार. असा एक पत्रकार जो आजच्या विकल्या गेलेल्या, धंदेवाईक पत्रकारितेला अंगीकारून 'अपना काम बनता, तो भाड मे जाये जनता' हे सूत्र अवलंबून चाकोरीबद्ध मध्यमवर्गीय जीवन जगतो आहे. ज्याला आसपास होणाऱ्या बऱ्या-वाईट घटनांचं फारसं सोयर अथवा सुतक नाही. जो उघड्या डोळ्यांनी सारं काही पाहुन, खुल्या कानांनी ऐकून रोज रात्री निर्ढावलेल्या शांतपणे झोपी जाऊ शकतो, असा कुणीही एक सामान्य माणूस निवडा, तो आहे ह्या चित्रपटातला तरुण पत्रकार 'मकरंद' (चिन्मय मांडलेकर).
लो. टिळकांच्या आवाजातील एका ध्वनिफितीचे जाहीर श्रवण असलेल्या एका कार्यक्रमाचे 'कव्हरेज' करण्यासाठी त्याला पाठवण्यात येतं आणि ती ध्वनिफीत त्याच्या निद्रिस्त मनाला जागं करते. उत्सुकता वाढीस लागून तो टिळकांविषयीची अजून माहिती मिळविण्यासाठी त्यांच्यावरील लेखन वाचतो आणि त्यांच्या विचारांचा त्याच्यावर प्रभाव पडत जातो. 'त्या' काळातील विदारक परिस्थितीशी तो आजच्या परिस्थितीची सांगड घालायला लागतो. तो अधिकाधिक माहिती मिळवत असताना दुसरीकडे टिळकांचा जीवनपट उलगडत जातो.
ह्या अंगाने ही कहाणी उलगडत जाते. थोडासा 'लगे रहो मुन्नाभाई' आणि बराचसा 'रंग दे बसंती' अधूनमधून डोकावतो.
चरित्रपट हे नेहमीच दोन व्यक्तींसाठी पाहिली जातात. एक म्हणजे ती व्यक्ती जिच्यावर तो चित्रपट आधारलेला असतो आणि दुसरी व्यक्ती ती जी ती भूमिका साकारत असते. 'लोकमान्य' लोकमान्यांसाठी पाहाणाऱ्या लोकांना निराश करतो कारण दोन अडीच तासांच्या चित्रपटात टिळकांच्या आयुष्याचा जास्तीत जास्त भाग दाखवण्याच्या कसरतीत अनेक ठिगळं एकत्र जोडल्यासारखं वाटतं. कुठलाच एकसंध परिणाम साधला जात नाही. अधूनमधून वाटत राहतं की आता पकड घेईल, आता पकड घेईल. पण दुर्दैवाने तसं होतच नाही. दुसरीकडे लोकमान्यांच्या भूमिकेतील सुबोध भावे मात्र छाप सोडून जातो. टिळकांच्या नजरेतील करारी भाव त्याने असा काही दाखवला आहे की त्याला तोडच नाही. एकूणच त्याने चित्रपटभर अंतर्बाह्य टिळक वागवले आहेत. टिळकांची बहुचर्चित वाक्यं त्याने दमदारपणे उद्गत केली आहेत. त्यांचा त्या ठिकाणी, जसा परिणाम साधायला जायला हवा, तसा तो साधला जातो.
खरं तर इतर सर्वच बाजूंत उणा पडलेला हा चित्रपट सर्व्ह कलाकारांच्या सशक्त अभिनयानेच तोलून धरला आहे, असं म्हणता येऊ शकतं. चिन्मय मांडलेकरनेही आपली भूमिका - ती जरी बऱ्याच अंशी अविश्वसनीय वाटली तरी - चोख वठवली आहे. द्विधा, नैराश्य, बंड असा त्याच्या व्यक्तिरेखेचा प्रवास पटकथेत खूप बांधीवपणे मांडला नसला, तरीही तो त्याने मात्र चांगला सादर केला आहे.
प्रिया बापटला विशेष काम नसलं, तरी तिचा वावर नेहमीच खूप आल्हाददायक असतोच आणि इथेही आहे.
गोपाल गणेश आगरकर रंगवाणारा समीर विद्वांससुद्धा लक्षात राहतो, तसेच दाजी खरेंच्या भूमिकेतील अंगद म्हसकरनेही संयत अभिनय केला आहे.
सर्व पात्रांची वेशभूषा अभिनयातील अर्धे काम करत असावी, इतकी अचूक जमून आली आहे, त्यासाठी विक्रम गायकवाड (मेक अप) आणि महेश शेरला (वेशभूषा) ह्यांना विशेष दाद द्यायलाच हवी. तरी सावरकर म्हणून जे पात्र निवडलं आहे (१ किंवा २ च ओळी आहेत त्याच्या तोंडी) ते 'पात्र'च वाटलं मला तर. पण ह्याचं छोटंसं डेबिट 'कास्टिंग'ला पडायला हवं.
संगीत लक्षात ठेवण्यायोग्य नाहीच. मुख्य गीत (बहुतेक 'जीवन आपले सार्थ करा') तर 'लगान'च्या 'बार बार हां..' ची सही सही नक्कलच वाटतं.
वैयक्तिक पातळीवर मला ह्या चित्रपटात प्रकर्षाने एक गोष्ट खटकली. युगपुरुष हे 'युगपुरुष' ह्यासाठी नसतात की त्यांच्याव्यतिरिक्त इतर बहुतेक लोक चांगले नसतात. आगरकर, रानडे व (एकाच दृश्यात आलेले) महात्मा गांधी हीसुद्धा महान व्यक्तिमत्वंच होती. लोकमान्यांचं मोठेपण दाखवताना ह्या लोकांना छोटे दाखवण्याची आवश्यकता नव्हती. आगरकर-टिळकांत तात्विक मतभेद होते, ह्याचा अर्थ हा नाही की आगरकरांचे हेतू संशयास्पद होते. चित्रपटात ज्याप्रकारे 'सुधारक' व्यक्तींना ब्रिटीशांचे हुजरे म्हणून रंगवले आहे, ते पटलं नाही.
एकाच दृश्यासाठी गांधींना आणून त्यांना झिडकारून जाणारे टिळक दाखवून टिळकांचं मोठेपण सिद्ध होत नाही. त्यापेक्षा त्यांना दाखावलंच नसतं, तरी चाललं असतं. असंही टिळकांचा कॉंग्रेसमधील सहभाग, मोहम्मद अली जीनांशी असलेले चांगले संबंध, एनी बेझंट, होम रूल चळवळ वगैरे अनेक गोष्टींचा तर साधा उल्लेखसुद्धा चित्रपटात नाही.
कदाचित फार जास्त अपेक्षा ठेवून गेलो असीन, पण कुठे तरी आत काही तरी अतृप्त राहिलं आहे, अपूर्ण राहिलं आहे. म्हणूनच परदेशात असलेल्या एका मित्राने जेव्हा मला विचारलं -
'कसा आहे रे लोकमान्य? मी मिस केला !'
तेव्हा मी म्हटलं, 'नेव्हर माइंड, तू विशेष असं काही 'मिस' केलेलं नाहीस.'
रेटिंग - * *
http://www.ranjeetparadkar.com/2015/01/movie-review-lokmanya-ek-yugpurus...
अतिशय चांगले परीक्षण तटस्थ
अतिशय चांगले परीक्षण
तटस्थ राहुन चित्रपट बघितल्याबद्दल आपले अभिनंदन.
वैयक्तिक पातळीवर मला ह्या
वैयक्तिक पातळीवर मला ह्या चित्रपटात प्रकर्षाने एक गोष्ट खटकली. >>> मलाही थोडी प्रोमोची द्रुष्ये आणि चित्रपटावरची चर्चा टिव्हीवर पाहून आपल्याला जे खटकले तसे चित्रपटात असण्याची शंका होती. पण चित्रपट पाहिल्याविना शंका व्यक्त करण्यात अर्थ नव्हता, अन्यथा ते वादाला निमित्त झाले असते.
बाकी या कलाकृतीला चित्रपट म्हणूनच बघत परीक्षण दिलेत याबद्दल धन्यवाद.
तरी सुबोधच्या अभिनयासाठी आणि चित्रपट मराठी असल्याने एक स्टार आणखी जोडत बघायला हरकत नाही.
छान लिहिले आहे.. पटकथेवर आणखी
छान लिहिले आहे.. पटकथेवर आणखी विचार व्हायला हवा होता.
तटस्थ परिक्षणाबद्दल धन्यवाद !
तटस्थ परिक्षणाबद्दल धन्यवाद !
खरच टिळक काय, गांधी काय, सावरकर काय, या लोकांना २/३ तासाच्या चित्रपटात दाखविणे म्हणजे हिमालयाला घरच्या शितकपाटात कोंडून ठेवण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.
खरच टिळक काय, गांधी काय,
खरच टिळक काय, गांधी काय, सावरकर काय, या लोकांना २/३ तासाच्या चित्रपटात दाखविणे म्हणजे हिमालयाला घरच्या शितकपाटात कोंडून ठेवण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. > अनुमोदन
परिक्षण आवडले. मलाही मध्यतरा नंतर सिनेमा थोडा डोक्युमेंट्री सारखा वाटला, पण तरीही आवडलाच. नक्कीच पहाण्यासारखा आहे.
सुभा साठी बघणार. तो जसा
सुभा साठी बघणार.
तो जसा 'स्वराज्य' म्हणतोय ना. व्वा!
महेश +१
महेश +१
खुपसं पटलं रणजीत. चित्रपट
खुपसं पटलं रणजीत. चित्रपट संपवून बाहेर पडताना गोंधळल्यासारखं वाटलं.
ऐतिहासिक आणि वर्तमानकाळात खुप ओढाताण झाली आहे. मला तर दोन कालावधींसाठी दोन वेगवेगळे दिग्दर्शक होते की काय असं वाटण्याइतपत फरक जाणवला.
सुबोधने कमाल केली आहे. शोभलाय तो भुमिकेत आणि बाज राखलाय त्या व्यक्तिमत्वाचा. रंगभुषेसाठी, वेशभुषेसाठी सगळे मार्क्स. अजीत परबांचे विवेकानंद तंतोतंत. आगरकर आवडले पण संवादफेक चांगली नव्हती.
लोकमान्यांचं मोठेपण दाखवताना
लोकमान्यांचं मोठेपण दाखवताना ह्या लोकांना छोटे दाखवण्याची आवश्यकता नव्हती. >>> याचीच भीती वाटत होती. सावरकर चित्रपटात हेच झाले होते.
चांगले परीक्षण. आवडले.
@चित्रपटात ज्याप्रकारे
@चित्रपटात ज्याप्रकारे 'सुधारक' व्यक्तींना ब्रिटीशांचे हुजरे म्हणून रंगवले आहे, ते पटलं नाही.>>> +++ १११
शिवाय "इंग्रजांच्या हातून कायदे करून सुधारकांनि आणलेली कोणतिहि सुधारणा नको! " अश्या आशयाचे डायलोग टिळकांच्या तोंडि घालून त्यांचा सनातनी पणा झाकण्याचा प्रयत्न केलाय ! हे ही चुक आहे.
तटस्थ परिक्षण आवडल . <<<<
तटस्थ परिक्षण आवडल .
<<<< लोकमान्यांचं मोठेपण दाखवताना ह्या लोकांना छोटे दाखवण्याची आवश्यकता नव्हती. आगरकर-टिळकांत
तात्विक मतभेद होते, ह्याचा अर्थ हा नाही की आगरकरांचे हेतू संशयास्पद होते. चित्रपटात ज्याप्रकारे 'सुधारक' व्यक्तींना ब्रिटीशांचे हुजरे म्हणून रंगवले आहे, ते पटलं नाही. एकाच दृश्यासाठी गांधींना आणून त्यांना झिडकारून जाणारेटिळक दाखवून टिळकांचं मोठेपण सिद्ध होत नाही.>>>>> अगदी माझ्या मनातल लिहिलेत रसप ! प्रोमोज, ट्रेलर पाहताना याची कल्पना आली होतीच . तेच पाहायला मिळाल . दिग्दर्शकाचा किती अभ्यास तोकडा पडलाय हे जाणवल .
सुबोध भावेने अभिनय छान केलाय . वेशभुषेसाठी विक्रम गायकवाड यांना पैकिच्या पैकी मार्क्स !
परीक्षण आवडलं. वर फा, जाई
परीक्षण आवडलं. वर फा, जाई म्हणतेय तेच वाटलेलं. ट्रेलर, काही कार्यक्रमात चित्रपटाचे प्रोमो बघितलेले आणि सुबोध भावे सकट बऱ्याच जणांनी दाखवलेला अभिनिवेश पटला न्हवता आणि एकाच रंगात चित्रपट रंगलाय का? ही भीती वाटली होती. ती खरी ठरत असेल तर दुर्दैव.
एकदम पर्फेक्ट परीक्षण..
एकदम पर्फेक्ट परीक्षण.. सहमत!
बाकी इतकं मस्त कास्टींग असुनही सावरकर पात्र नि सत्यभामांचा मेकअप दोन्ही खटकलं..
धन्यवाद मित्रहो ! विषय नाजुक
धन्यवाद मित्रहो !
विषय नाजुक होता आणि अनेकांच्या मनाचा हळवा कोपरा असण्याची शक्यताही आहे, तरीही माझ्या टिकात्मक लेखनाला स्वीकार केलात.... ग्रेट स्पिरीट !
अरे हा शेवटी सिनेमावर असलेला
अरे हा शेवटी सिनेमावर असलेला लेख आहे. स्तुती आणि टी़का चालायचीच.
<<<वैयक्तिक पातळीवर मला ह्या
<<<वैयक्तिक पातळीवर मला ह्या चित्रपटात प्रकर्षाने एक गोष्ट खटकली. युगपुरुष हे 'युगपुरुष' ह्यासाठी नसतात की त्यांच्याव्यतिरिक्त इतर बहुतेक लोक चांगले नसतात. आगरकर, रानडे व (एकाच दृश्यात आलेले) महात्मा गांधी हीसुद्धा महान व्यक्तिमत्वंच होती. लोकमान्यांचं मोठेपण दाखवताना ह्या लोकांना छोटे दाखवण्याची आवश्यकता नव्हती. आगरकर-टिळकांत तात्विक मतभेद होते, ह्याचा अर्थ हा नाही की आगरकरांचे हेतू संशयास्पद होते. चित्रपटात ज्याप्रकारे 'सुधारक' व्यक्तींना ब्रिटीशांचे हुजरे म्हणून रंगवले आहे, ते पटलं नाही.
एकाच दृश्यासाठी गांधींना आणून त्यांना झिडकारून जाणारे टिळक दाखवून टिळकांचं मोठेपण सिद्ध होत नाही.>>>>
प्रचंड सहमत !
रसप साहेब. सत्य हे टिकात्मक
रसप साहेब. सत्य हे टिकात्मक नसते
उत्तम, संतुलित
उत्तम, संतुलित लेख!
टिळकांवरच्या सिनेमाने कोणाची 'कशी जिरवली' या उन्मादात लिहिलेल्या तथाकथित परिक्षणांपेक्षा निश्चितच सुसह्य!
@आगाऊ - आगाव कुठचा
@आगाऊ - आगाव कुठचा
लोकमान्यांच्या भूमिकेतील
लोकमान्यांच्या भूमिकेतील सुबोध भावे मात्र छाप सोडून जातो. टिळकांच्या नजरेतील करारी भाव त्याने असा काही दाखवला आहे की त्याला तोडच नाही>>>
नजरेतील ह्या करारी भावाचा किस्सा सुबोधने स्वतः सांगितला होता . जेव्ह्या त्याला टिळकांची भूमिका द्यायचं ठरलं तेव्हा तिथे बसलेले ४-५ जन हसले . सुबोध चे डोळे रोमांटिक आहेत . ते टिळकांना कसे सूट होणार ? हीच गोष्ट मनावर घेवून सुबोधने टिळकांची अनेक चित्रे अभ्यासली . प्रत्येक वेळेला त्याने त्यांचे डोळे बारकाईने निरखले . आणि असाच अंगार टिळक साकारताना डोळ्यात फुलला पाहिजे म्हणून प्रयत्न केले .
एकाच दृश्यासाठी गांधींना आणून त्यांना झिडकारून जाणारे टिळक दाखवून टिळकांचं मोठेपण सिद्ध होत नाही>>
पहिल्या आणि दुसर्या महायुद्धामध्ये ब्रिटीशांची अवस्था खिळखिळी झाली होती . जहाल पक्ष प्रबळ झाला होता . अनेक ब्रिटीश अधिकार्यांना मारण्यात आलं सुभाषचंद्र बोस यांनी स्वताची सेना स्थापन करून त्यात भर टाकली . ब्रिटिशांना भारताला स्वातंत्र्य देण्याशिवाय पर्याय उरला नवता . गांधीजींचाही वाट होताच . पण नंतर स्वातंत्र्य हे फक्त आणि फक्त गांधीजीं , नेहरून मुळेच मिळालं असं भासवण्यात आलं . गांधींना झिडकारून जाण्यात टिळकांना स्वताचा मोठेपणा सिद्ध करायचा नवता .
पण नंतर स्वातंत्र्य हे फक्त
पण नंतर स्वातंत्र्य हे फक्त आणि फक्त गांधीजीं , नेहरून मुळेच मिळालं असं भासवण्यात आलं . गांधींना झिडकारून जाण्यात टिळकांना स्वताचा मोठेपणा सिद्ध करायचा नवता .>> +१००००००००००००००
पण नंतर स्वातंत्र्य हे फक्त
पण नंतर स्वातंत्र्य हे फक्त आणि फक्त गांधीजीं , नेहरून मुळेच मिळालं असं भासवण्यात आलं . गांधींना झिडकारून जाण्यात टिळकांना स्वताचा मोठेपणा सिद्ध करायचा नवता .>>>>>>+१११११११११११
असे भासवायचे होते तर इतिहासात
असे भासवायचे होते तर इतिहासात तुम्हाला फक्त गांधी आणि नेहरुच वाचायला मिळाले पाहिजे आणि इतर नेत्यांवर नाममात्रच ऐकायला मिळाले पाहिजे होते. त्याउलट आपल्याला सगळ्याच नेत्यांबद्दल वाचायला अभ्यासाला मिळत आहे. मत व्यक्त करायला मिळत आहे.
उगाच कैच्याकै बोलायचे आहे म्हणुन बोलु नये.
असे भासवायचे होते तर इतिहासात
असे भासवायचे होते तर इतिहासात तुम्हाला फक्त गांधी आणि नेहरुच वाचायला मिळाले पाहिजे आणि इतर नेत्यांवर नाममात्रच ऐकायला मिळाले पाहिजे होते. >>>
तसेच होते आहे. गांधी किंवा नेहरु देशभर शिकवले जातात. सर्व प्रादेशिक भाषांत त्यांच्यावर पुस्तके निघालेली/लिहीली गेलेली आहेत. तेवढे देशपातळीवरचे लेखन इतर कुठल्याच जहाल नेत्यावर किंवा क्रांतिकारकावर झालेले आढळून येत नाही. आझाद, बिस्मिल, अशाफाकुल्ला यांच्याबद्दल किती जणांना माहिती असते आज? भगतसिंग, राजगुरू म्हटले की फक्त साँडर्सचा वध आणि बॉम्बहल्ला एवढेच माहीत असते लोकांना. सुखदेवावर तर त्याशिवाय कुठलीच माहिती उपलब्ध नाहीये. सेनापती बापटांबद्दल किती जणांना माहिती असेल महाराष्ट्राच्या बाहेर?
विशाल कुलकर्णी >> लाख मोलाचं
विशाल कुलकर्णी >> लाख मोलाचं बोललात.
चित्रपट परीक्षण आणि इतिहासाशी
चित्रपट परीक्षण आणि इतिहासाशी संबंधीत राजकारण वेगळं ठेवण्यात काही प्रॉब्लेम असतो का?
वेगळा धागा काढा म्हणाव!
रणजीत - मस्त लिहिले आहेत. चित्रपट कसा पाहावा ह्याचे सुंदर उदाहरण दाखवले आहेत तुम्ही!
ह्या चित्रपटावरील दोन लेख एकमेकांपासून भिन्न असूनही दोन्ही पटत आहेत असे प्रथमच होत आहे.
भगतसिंग, राजगुरू म्हटले की
भगतसिंग, राजगुरू म्हटले की फक्त साँडर्सचा वध आणि बॉम्बहल्ला एवढेच माहीत असते लोकांना.> अख्खा चित्रपट निघाला की राव?
विशाल, माझा प्रतिसाद तुमच्या
विशाल, माझा प्रतिसाद तुमच्या प्रतिसादाला उद्देशून नव्हे. तुमच्या प्रतिसादातील भावनेला व माहितीला माझेही अनुमोदन!
परीक्षण आवडले. तरी हां सिनेमा
परीक्षण आवडले.
तरी हां सिनेमा बघणारच...
अतिशय उत्कृष्ट
अतिशय उत्कृष्ट चित्रपट
परीक्षण उत्तम आहे.
Pages