मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< भाऊ, कुर्ल्याच्या बैलबाजाराबद्दल नका आता लिहू >> ओ.के., दिनेशदा ! लेट सम अदर 'गाय' राईट अबाऊट इट !! Wink

Biggrin सह्हीच भाऊ. बायकोच्या चेहर्‍यावरचे भाव एकदम मस्त आहेत. Happy

<< भाऊ, कुर्ल्याच्या बैलबाजाराबद्दल नका आता लिहू >> ओ.के., दिनेशदा ! लेट सम अदर 'गाय' राईट अबाऊट इट !! >>> क्या बात है! Lol

भाउ मस्त Happy

इन्द्रा मस्त फोटु.
शेवटच्या फोटोतल्या मल्टिअ‍ॅक्सल ट्रेलरची चाकं मोजत बसलो. Happy

स्वातीजी, गिरगांववरच्या तुमच्या या चार चपखल ओळीना जरा वर्तमानाची फोडणी देऊं का ?

<< जिथे मारते कांदेवाडी
टांग जराशी ठाकूरद्वारा,
खडखडते अन् ट्राम वाकडी
कंबर मोडुनी, चाटित तारा >>
...
खचली चाळ, कुंथतेय वाडी
टेंकूना झोंबतोय अनास्थेचा वारा
हुडहूडी आणत्येय अशीही वावडी
'टॉवर्ससार्ठी याना आत्तांच मारा'

भाऊकाका, मस्त माहिती.

भाऊच्या धक्क्याचं प्रवेशद्वार बघून बरं वाटलं. Happy

भाऊच्या धक्क्याबद्दल माझी एक भन्नाट आठवण आहे. मी तिथे एकदाच गेले होते वडलांसोबत. तो रविवारचा वार असल्याने कुठलेही स्टॉल्स वगैरे उघडे नव्हते. त्यानंतर सुमारे दोन की तीन वर्षांनी मी डॉकयार्ड हॉस्टेलला रहायला आले. आमच्या पप्पांनी त्यांच्या जहाजावर जो माणूस डबे पोचवायचा त्यालाच मला रोजचा डबा द्यायला सांगितलं. तो बिचारा साहेबांची मुलगी म्हणून मला भलामोठा डबा द्यायचा, मला एकटीला तेवढा कुठे संपतोय? मग हॉस्टेलमधल्या माझ्या मैत्रीणी मिळून डबा फस्त करायचा, तो दादापण रोज मासे, चिकन असं सर्व चमचमीत द्यायचा डब्यातून.

तर हॉस्टेलवर आल्यावर एकदा डबा देताना तो म्हणाला की भारतीचं एक जहाज आलंय धक्क्यावर. कुठलं ते मला माहित नव्हतं. पण मैत्रीणी म्हणाल्या चल जहाज बघायला जाऊ. म्हटलं चला. लगेच टॅक्सी केली आणि धक्क्यावर गेलो. संध्याकाळी सहाचा वगैरे सुमार असेल. जहाज अँकरेजला असल्याने खूप आत होतं. तरी ओळखीच्या एका माणसाला विचारून जहाजावर जाता येइल का याची चौकशी करत होतो. दरम्यान तिथेच स्टॉलवर चहा वगैरे घेत होतो. तर तो स्टॉलवाला म्हातारा (असेल साठीपासष्टीचा) माझ्याकडे सारखा एकटक बघत उभा. नंतर इकडे तिकडे धक्क्यावर फिरताना पण हा म्हातारा माझ्याचकडे बघत. सुरूवातीला जरा दुर्लक्ष केलं नंतर राग यायला लागला, मैत्रीणींच्या पण ते लक्षात आलं होतं. त्या म्हणाल्या चल हॉस्टेलवर जाऊ. उगाच त्रास नको. म्हणून निघत होतो, तेवढ्यात पाठीमागून त्या म्हातार्‍याने हाक मारली. म्हटलं काय? तर म्हणाला तुम्ही आरेम देसाईंच्या कोण लागता? म्हटलं मी मुलगी आहे त्यांची.

लगेच तो हसला. "तरीच मी केव्हापासून बघतोय. सेम त्यांच्यासारखा चेहरा, सेम त्यांच्यासारखं चालणं बोलणं. डोळे पण तसेच. केव्हापासून विचारेन म्हणतोय पण धीर होत नव्हता. आरेम देसाई धक्क्यावर आले की कायम माझ्याचकडे चहा घेतात. दादा (डबेवाला) म्हणाला होता की साहेबांची मुलगी इथेच आहे हॉस्टेलला वगैरे माझी आणी साहेबांची गेल्या पंधरा वर्षाची ओळख आहे" वगैरे. मी एकदम भंजाळलेच. मग ओके धन्यवाद वगैरे करून तिथून निघालो.

नंतर कधीही आम्ही धक्क्यावर गेलो (आम्हाला रविवारचा नादच होता, धक्क्यावर तरी जायचो नाहीतर गावदेवीच्या डोंगरावर) की म्हातारा हाक मारायचाच. मग स्टॉलवर चहा किंवा खाऊ घ्यायचो. म्हातारा आमच्याकडून अजिबात पैसे घ्यायचा नाही, मला कसेसेच वाटायचे. पण एकदा पप्पांना मी सांगितलं तर पप्पा म्हणाले मी तिकडे गेलो की त्याला एक्स्ट्रा पैसे देत जाईन. तू काळजी करू नकोस.

हा म्हातारा अजून तिथे आहे की नाही कुणास ठाऊक? गेल्या पाच वर्षात मुंबईला येणंच झालेलं नाही.

नंदिनी.. सहीच Happy तिथे तीन चार स्टॉल आहेत. एक चहाचा स्टॉल समुद्राकडे पाठ करुन आहे. पण त्या स्टॉलवर बिहारी मुलं कामाला होती. btw रविवार असुनही सगळे स्टॉल सुरु होते.

मी उरणच्या फेरी मधुन भाऊच्या धक्क्यावर आलेलो आहे.. पण फार लहानपणी त्यामुळे फारसे काही आठवत नाही.

दिनेशदा,

>> भाऊ, कुर्ल्याच्या बैलबाजाराबद्दल नका आता लिहू::स्मित:

मग चुनाभट्टीच्या गाढवबाजाराबद्दल लिहायचं का? Wink मला फारशी माहिती नाही हो. मी कधी गाढवं खरीदली वा विकली नाहीत. तसेच मी गाढवही नाही. Lol (आधीच सांगून ठेवलेलं बरं!)

आ.न.,
-गा.पै.

मुंबईच्या एकेकाळी लँड्मार्क असलेल्या "खडा पारसी" "भाऊचा धक्का" सारख्या आणखी काही जागा कुणाला आठवतायता का? खडा पारसी पुतळ्याचे आणी फाऊंटनचे रिस्टोरेशन होणार होते आणि त्यासाठी BMC ने १ कोटी रुपये मंजुर केले होते अशी बातमी गेल्या प्रसिद्ध झाली होती, कुठवर हे काम आलेय याची काही कल्पना?

खडा पारसी पुतळ्याचे आणी फाऊंटनचे रिस्टोरेशन होणार होते आणि त्यासाठी BMC ने १ कोटी रुपये मंजुर केले होते अशी बातमी गेल्या प्रसिद्ध झाली होती, कुठवर हे काम आलेय याची काही कल्पना? >>> मागच्याच आठवड्यातलं अपडेट : खडा पारशी सध्या बुरख्यात आहे. रिस्टोरेशनचं काम सुरू आहे अशी शंका घ्यायला पूर्ण वाव आहे. बुरख्यावर नंतर तो कसा दिसेल याचं चित्रंही लावलंय. आधीचा खपा आणि नंतरचा खपा यात नक्की काय फरक असेल ते माझ्या लक्षात आलं नाही.

गा. पै.
बैलबाजार निदान नावाने का होईना, अजून आहे. गाढव बाजार मात्र दिसला नाही. चुनाभट्टीत एक गावठाण आहे, तो भाग मुंबईच्या बाहेरचा वाटतो अगदी. रस्त्याला खेटून चाळी पण आहेत. अ‍ॅड. लिलाधर डाके यांचे घर पण आताआतापर्यंत होते. ( अजून असेल. ) स्टेशनच्या आजूबाजूला मात्र नवीन इमारती झाल्यात.

त्या मोकळ्या मैदानात प्रदर्शन भरायला लागल्यापासून आडव्या रस्त्यावरची वाहतूक वाढलीय. सायन नंतर ट्राफिक लागले तर आम्हीपण त्याच रस्त्याने येतो. पुर्वी ते कनेक्शन नव्हते.

चुनाभट्टीचे फाटक मात्र सुधारेल असे वाटत नाही. तिथला खोळंबा काही टळत नाही. तिथे फ्लायओव्हर व्हायची
योजना पण दिसत नाही.

पाटीलजी, अभ्यासपूर्वक बनवलेल्या छान लिंक्स !
मुंबईतील कार्यालयीन गजबजाटाचीं मुख्य केंद्रं बदलत गेलीं [ प्रथम फोर्ट- फाऊंटन, मग नरिमन पाँईंट, नतर वांद्रे-कुर्ला काँप्लेक्स व आतां तर परेल- लालबाग ] तरी घाऊक बाजारपेठा मात्र दक्षिण मुंबईतच दाटीवाटीच्या गर्दींतच ठाण मांडून बसल्या आहेत [ व्हीटी ते भायखळा व मरीन लाईन्स ते सँडहर्स्ट रोड भाग ]. असं कां असावं, यावरची चर्चा [किंवा एखादी लिंक असेल तर ] वाचायला आवडेल.

घाऊक बाजारपेठासुद्धा कधीच्याच हलल्या आहेत. भाजीपाला, धान्य, फळे यांचे बाजार नव्या मुंबईत गेले आहेत. कापड बाजार मूळजी जेठा किंवा मंगळदास मार्केट येथे आहेत खरे पण रेडीमेड चा बाजार उपनगरात सरकला आहे कारण शिलाईकारखाने मालाड,गोरेगाव, जोगेश्वरी या उपनगरात आहेत. आता कापड आणि यार्न व्यवसाय मुंबईत राहिलेला नाही. तो सुरतेच्या टेक्स्टाइल मार्केटात स्थिरावला आहे. मुंबईतले कितीतरी लोक,विशेषतः बायका सुरत अमदावादहून मुंबईत कापडांचे गट्ठे, साड्या, तयार सलवार-कमी़ज संच आणण्याचा व्यवसाय करतात. रात्रीच्या वडोदरा एक्स्प्रेस ने जाऊन दुसर्‍या दिवशी संध्याकाळी परत येतात. मुंबई-पुण्यासारखे अप-डाउन करणारेही आहेत.
पाच-सहा वर्षांपूर्वी भातबाजार,खडक या भागात स्टेशनरीची घाऊक विक्री करणारी अनेक दुकाने होती. आता त्यांची संख्या लक्षात येण्याजोगी कमी झाली आहे. त्यातल्या बहुतेकांनी कम्प्यूटर स्टेशनरी ठेवायला सुरुवात केली आहे. पूर्वी फूल्स कॅप कागद किलो किंवा शेकड्यांवर हमखास मिळायचे. आता काही थोड्या दुकानांतच तसे मिळतात. कॉरुगेटेड बॉक्सेस, प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल ग्लासेस, डिशेस, पेपर डिशेस यांची दुकाने मात्र तेजीत आहेत. तांबाकाट्याचीही रया गेली आहे. पूर्वी तांबेपितळेचे टोप, ठोक्याची पातेली हारीने रचून ठेवलेली असायची. आता जास्त करून हिंडालिअम दिसते. पूर्वीसारख्या आकाराचे किंवा जाडीचे टोप/पातेले घ्यायचे असेल तर शोधाशोध करावी लागते. कॉटन-एक्स्चेंज बंद झाल्यामुळे गोल बिल्डिंगचीही रया गेली आहे. मस्जिद स्टेशनातून वरती पुलावर बाहेर पडले की लगेच डाव्या हाताला किराण्याची मोठमोठी दुकाने होती. आता त्यांच्या मालकांनी दुकानाची निम्मी जागा प्लास्टिक खेळणी, वस्तू यांसाठी दिली आहे.
बदलत्या सामाजिक स्थितीचा आणि मॉल संस्कृतीचा सगळ्यात अधिक परिणाम धान्यव्यापारावर झालेला दिसतो. आता कोणी वर्षाचे धान्य साठवून ठेवीत नाहीत. धान्याची गरजही कमी झाली आहे. पोहे, शिरा, पराठा, टॉर्टिया, मॅगी, फालुदा, रबडी, गुलाबजाम, इडली,दोसा यांची इन्स्टन्ट मिक्स पाकिटे मिळतात. ती तिघांच्या संसाराला पुरेशी असतात. पंधरा-वीस हजार रुपये स्क्वेअर फुटाने घेतलेली जागा धान्याच्या साठवणामध्ये आणि वाळवणाच्या डब्यांसाठी अडवून ठेवण्याचा मूर्खपणा आता कोणी करत नाही. धान्य दुकानदारही धान्याचे कमी वाण विक्रीस ठेवतात. आंबेमोहोर सर्वत्र दिसत नाही. कोलम मध्ये सुरती कोलम हा एकच प्रकार सार्वत्रिक असतो. पूर्वी भिवंडी, वाडा, जिरेसाळ असे अनेक प्रकार असायचे. उकडा तांदूळ अधून मधून दिसायचा तो आता अदृश्य झाला आहे. त्या उलट चायनीझ भातासाठी म्हणून एक पिवळसर जाडसर तांदूळ कुठेकुठे दिसतो. नाचणी गोणीत नसते.अर्ध्या-एक किलोच्या पाकिटात असते. ज्वारी-बाजरीचेही तसेच. गावठी मसूर्, गावठी चवळी, कुळीथ दिसत नाहीत. लसूणही जाडजाड, रेडेलसूण असते. गडद हिरवी,तांबडसर गुलाबी देठांची गावठी कोथिंबीरही कमी असते. सगळीकडे ती पांढरीफट्ट लांब लांब वाढलेली हायब्रिड कोथिंबीर. त्याला वास नाही नि चव नाही. असो.
पण मुंबईतले हे बदल विषण्ण मात्र करीत नाहीत. कारण जुन्याची जागा नव्याने घेतली आहे. नवनवीन धान्ये. फळे, भाज्या, पाककृती यामुळे वैविध्य आणि प्रसन्नता आली आहे. ओट, बार्ली, सोया, किवी, ब्रोकोली, लेट्यूस, झुकिनी,सॅलडपाने,स्वीट कॉर्न, बेबी कॉर्न्,सेलरी,लाल कोबी,चेरी-स्ट्रॉबेरी(हे पूर्वी होते, पण तुरळकच) या सर्वांमुळे रंग, रूप गंधाची रेलचेल असते. या शिवाय वेगवेगळी सरबते, रस,आइस्क्रीम, जॅम, जेली, लोणची, यांमुळे आपले, खास करून मुंबईचे जीवन समृद्ध झाले आहे. मुंबईकरांनी ही नवी जीवनपद्धती जितक्या सहजतेने आपलीशी केली आहे, तशी ती इतर शहरांतून केली गेलेली दिसत नाही. सलाम मुंबई, सलाम मुंबई स्पिरिट!

हिरा.. तुमच्या नजरेने टिपलेला बदल मस्त उतरला आहे.
खादाडीचे वैविध्य आणि मुंबईकरांची रुचीपालट हा एक अभ्यासाचा विषय आहे.

उद्या बहुचर्चित इस्टर्न फ्री वे चे उद्धाघटन आहे. त्या निमित्त इंडियाटाईम्सने बनवलेले PPP बघा.
http://economictimes.indiatimes.com/slideshows/infrastructure/mumbais-ea...

इन्द्रधनुष्य, लिंक छानच आहे. फोटो स्वप्नवत आहेत. पण लिंकमधल्याच एका पोस्टमधे म्हटल्याप्रमाणे वर्कमनशिप अगदी सुमार दिसतेय. साइड-बॅरिअर्स एका रेषेत नसणे, सडकेचा उंचसखलपणा, तीव्र वळणे ही थोडी उणी बाजू वाटतेय.तकलादू प्लास्टिक दुभाजकाची कल्पना भयंकर धोकादायक आहे. अर्थात पुढेमागे बदलतील म्हणा.

हिरा, तुमचं निरीक्षण बरोबरच असावं कारण मीं बर्‍याच दिवसांत त्या बाजूला फिरकलो नाहीं. पण नागदेवी स्ट्रीट्ला माझ्या मित्राच्या 'पेढी'वर जात असे तेंव्हां स्टेशनरीची दुकानं, सुक्या मेव्याचीं घाऊक विक्रीचीं दुकानं अगदीं आतां आतांपर्यंत तिथं ठाण मारूनच होतीं. अत्तरांच्या बाजाराची मक्तेदारीही त्या भागातच अजूनही टिकून असावी. कंप्युटर संबधित पुस्तकं व उपकरणं/ सुटे भाग यासाठीं अर्थात लॅमिंग्टन रोड व तिथल्या गल्ल्या हें मोठंच मार्केट आतां तयार झालंय.
<< उकडा तांदूळ अधून मधून दिसायचा तो आता अदृश्य झाला आहे.>> 'नोस्टॅल्जिया' म्हणून अजूनही उकडा तांदूळ किंवा त्याचे पोहे खावेसे वाटलेच तर 'सेना भवना'खालील 'कोकण बाजारा'तच जावं लागतं.
<< मुंबईकरांनी ही नवी जीवनपद्धती जितक्या सहजतेने आपलीशी केली आहे, >> व त्यामुळेच बिहारची लीची, केरळचे पिके फणस, हिमाचलचीं सफरचंद इ.इ. इतका वाहतूक खर्च असूनही मुंबईत त्या त्या हंगामात भरपूर उपलब्ध असतात.

डॉ. सुधाकर प्रभू लिखित 'मुंबैच्या संगे आम्ही (बि)घडलो ' या पुस्तकाचा इथे उल्लेख झाला आहे का माहीत नाही. मायबोली शोधमध्ये तरी दिसले नाही.
हे पुस्तक सहज हाती लागले म्हणून वाचायला घेतले. पहिलेच प्रकरण 'गिरण्यांच्या गावा जावे'. मुंबईत गिरण्या कश्या सुरू झाल्या, त्यांची वैविध्यपूर्ण नावे, लालबाग, राजाबाई टॉवर ही नावे कशी पडली ही माहिती अत्यंत रंजक स्वरूपात आणि रसाळ भाषेत आहे.

मध्यंतरी लोकसत्ताच्या एका पुरवणीत ज्यांत मुंबई दर्शन घडते अशा पुस्तकांबद्दल एक लेख होता.

चाकरमान्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी १६० वर्षाची तार सेवा १५ जुलै पासुन बंद होणार..
http://www.saamana.com/2013/June/13/Link/Main3.htm

भाऊ, हिरा.. GPO बद्दलही लिहा ना..

छान

आज फ्री वे सुरु झाला का ? कुणीतरी फोटो टाका ना प्लीज. आमची चांगली सोय होणार या रस्त्याने.

हीरा,
सगळ्या आठवणी माझ्याही.
मालाडला माझे बालपण गेले. तिथे कारखाने तर होतेच पण बायका दुपारच्या फावल्या वेळेत भरपूर काम करायच्या. त्यात भरतकाम, बांगड्या रंगवणे ( या बांगड्या वाया गेलेल्या फिल्मच्या असत. ) गळ्यातल्या चेन्स करणे, काकडीच्या बिया सोलणे अशी कामे असत. माझी बहीणही हौस म्हणून हे करत असे, आणि मी भरतकामाचे बहुतेक सर्व टाके, तिच्या कामात लुडबूड करूनच शिकलो.

भातबाजारातल्या बँक ऑफ बडौदा चे ऑडीट मी केले होते. तो सगळा भाग बाजार एरीया होता. स्टेशनरीची दुकाने अग्यारी लेन मधे आणि तिच्या आडव्या लेन मधेही होती. किलोवर कागद तर मीदेखील खरेदी केले आहेत. स्वस्त आणि छान क्वालिटीचा माल मिळत असे तिथे.

नव्यापैकी एक चांगले म्हणजे कोकणातली उत्पादने आता मुंबईत ठिकठिकाणी मिळतात. पुर्वी हे प्रकार ( सुपं, रोवळ्या, केससुण्या, कोकमे, सुके बांगडे, मालवणी खाजा, कुळथाची पिठी वगैरे ) मालवणहून कुणी आले तरच मिळत असे. लालबाग परळलाही असे दुकान असल्याचे आठवत नाही.

इंद्रधनुष्य,

जी पी ओ बद्दल भाऊ / हिरा लिहितीलच. पण माझी एक खास आठवण. बलार्ड पियर्ची कामे संपवून मला चर्नी रोडच्या ऑफिसात जायचे असे. सव्वा पाचला व्होल्टास वगैरे बंद होत आणि आमचे ऑफीस सहाला. तो वेळ भरुन काढण्यासाठी आम्ही मेट्रो वरून चालतच जात असू.
दादा कोंडक्यांच्या चित्रपटातली, "केळेवाली" त्यावेळी तिथे असायचीच. त्या काही वेगळाच उद्योग करतात, सूचक बोलून जाळ्यात ओढतात.. असा समज ( गैर नसावा ) त्यावेळी होता. आम्ही सगळे त्यांच्याकडे न बघताच, भराभर जात असू.

साडेपाच नंतर तर बलार्ड इस्टेट मधले रस्ते ओस पडत असत आणि तिथे भडक कपड्यातल्या बायकांचा वावर असे. आमच्या ऑफिसमधल्या मुली तर अजिबात तिथे जायला तयार नसत. त्या बायका मग सेंट्रल कॅमेराच्या गल्लीतून मेन रोड वर येत. त्यावेळी रात्री मेन रोडवरही सामसूम असे.

Pages