काल मी माझी एक कविता जगलो

Submitted by pradyumnasantu on 10 February, 2012 - 16:57

काल रविवारी
कोणीच नव्हते घरी
सगळेच बाहेर गेलेले
मी निवांत बसलेला कोचवरी
कवितांची वही चाळत
वाचता वाचता रंगलो
आणि माझी एक जुनी
कविता जगलो
...
कवितेच्या एका ओळीत
जीवलग मित्र अचानक आला
आल्या आल्या त्याने
एक नर्मविनोद केला
कोचवर बसूनच मी खळखळून हसलो
काल मी माझी एक कविता जगलो
...
कवितेत मुले, मुली
सर्वजण खेळले अंताक्षरी..आणि
पत्नी गाताना ठसका लागून व्याकुळली तेव्हा...
....इकडे मीच उठून द्यायला गेलो पाणी
इतका गुंगलो....
काल मी माझी एक कविता जगलो
...
कवितेत भावूक होऊन पत्नी म्हणाली
"अशाच एखाद्या तृप्त क्षणी
दोघेही आपण जाउया निघुनी"
कविता जगताना वाटले
जर कवितेच्या शेवटी वर्णिले असेल मरणे
तर जगुया तोही क्षण आनंदाने
...
आवंढा गिळून वाचू लागलो भाग पुढचा
पण मॄत्यू शेवट नव्हताच त्या कवितेचा
होता दुसराच काही
पण मरणाहूनही सुंदर
म्हणायला हरकत नाही
शेवट असा होता की
त्या सुंदर मैफिलीतून मी उठतो
व शाळेच्या मैदानावर जाऊन
आनंदातिशयाने मोठ्याने
आरोळ्या ठोकतो
...
मीही उठलो कोचावरून
ती जुनी कविता जगता जगता
आणि मग
चढवल्या चपला
मैदानावर जायला
पण अरेरे, घरी कोणीच नव्हते
कुलुप कुठे आहे
तेही नव्हते ठाउके
...
अखेर कोचवरूनच किंचाळलो
भाऊक होऊन
इतका की
शेजारीपाजारी आले धाऊन
...
हे सर्व झाल्यावरच माझी तंद्री भंगली
काल मी माझी एक जुनी कविता जगली
...
किंचाळून घसा शुष्क झाला
शोधू लागलो काही पेय-जलाला
अकस्मात साक्षात इंद्रदेव आला
आणि हाती माझ्या त्याने
अमृताचा प्याला दिला

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खुप छान कविता.अंती इंद्रदेवाच्या नगरीत प्रवेश मिळालाय हेही नसे थोडके.

अशी कविता जगायला आवडेल मला. मात्र एका अटीवर - इंद्राने नाही, रंभेने किंवा उर्वशीने 'ग्लास' द्यावा हातात.

... हिक्.... अर्च्च्या, दुसर्‍यांदा प्रतिसाद पोस्ट केला वाटतं ....हिक्.. पण कविता लई भारी बर्का.... रंभाबाई, और एक पेग अमृत लाव.