हा एक अगदी वेगळा प्रसंग आहे. तो घडल्यानंतर त्याचा अर्थ लावायला वेळ लागला. पण नंतर त्याचा अर्थ आणि अन्वयार्थ उलगडत गेला. ह्या प्रसंगाचा किस्सा आपल्यासोबत शेअर करत आहे. आजवर इतके रन आणि वॉक केले होते, पण ह्या प्रसंगाइतकं विचित्र आणि भयाण कधी धावलो व सैरावैरा चाललो नव्हतो! तर झालं असं होतं...
मला अनेक दिवसांपासून जाणवत आहे की, माझा मित्र मला काही सांगू इच्छित आहे. आणि तो जे सांगू इच्छित आहे ते रहस्यमय आणि गोपनीय आहे. त्याबरोबरच त्या गोष्टीवर कशाचं तरी सावटसुद्धा आहे. नक्कीच काही तरी वेगळी गोष्ट असली पाहिजे. मी काही निमित्ताने औरंगाबादला आलो आहे. बाहेरून मुक्काम केलेल्या घरी आलो तेव्हा कळालं की, माझा मित्र नुकताच येऊन गेला. मला भेट, इतकाच निरोप त्याने दिला आहे. आम्ही औरंगाबादमध्ये काही नेहमी भेटत नाही. पण तरी जवळच्या एखाद्या हॉटेलच्या परिसरात तो भेटेल असं वाटलं आणि मी नातेवाईकांना ते सांगून निघालो. शक्यतो मी कुठे जातोय हे सांगायला मला आवडत नाही. पण नकळत "सेफ्टीच्या" दृष्टीने मला हे सांगावसं वाटलं! जितेश- माझा शाळेपासूनचा अगदी जीवलग मित्र. त्याला मला काय सांगायचं असेल? आणि तेही काहीसं लपून छपून?
मी चौकात गेलो. शोधाशोध करत फिरत राहीलो. त्याबरोबर मनामध्ये विचारही सुरू राहिले की काय असेल नक्की प्रकरण? आणि मग आठवलं की, काही दिवसांपूर्वीही दिसला होता तेव्हा तो मला असा इशारा तर करत नव्हता? नक्कीच. काही तरी वेगळं असलं पाहिजे. पण काय असेल? नकळत एक अप्रिय- अशुभाचं सावट ह्यावर जाणवतंय. फिरता फिरता मला जितेश दिसला! पण त्याने फक्त हाताने खूण केली आणि आम्ही रस्त्यावर चालत राहिलो. त्याच्या चेह-यावरूनच जाणवतंय की त्याला जे सांगायचं आहे ते गोपनीय तर आहेच पण कदाचित धोकादायकसुद्धा आहे. म्हणूनच तो खूप काळजी घेतोय. आम्ही काही गल्ली बोळ ओलांडून आतल्या बाजूच्या एका छोट्या हॉटेलजवळ आलो. अगदी साधं असं हे हॉटेल आहे. शाळेत असतात तसे बेंच बसायला आहेत. तुरळक गि-हाईक आहेत. आमचं बोलणं सुरू झालं. तो मला विचारतोय की, मला काही गोष्टी गेल्या काही दिवसांमध्ये जाणवल्या का? काही खटकलं का? मी विचारात पडलो. काही तरी जाणवतंय खरं. काही तरी वाईट घडलं आहे असं वाटतंय. पण काय ते कळत नाहीय.
मग त्यानेच सांगितलं की, गावामध्ये एक अपराधी लोकांना त्रास देत सुटला आहे. लोकांना पळवणं आणि गायब करणं सुरू झालं आहे. आणि अपराधी इतका तयारीचा आहे की, लोकांना जाणीवही नाही अजून की असं काही घडलंय. त्याने मग आमच्या दूरच्या मित्रांच्या संदर्भात माहिती दिली की त्यांच्यासोबत काय घडलंय. ते ऐकून धक्का बसला. मग मीच त्याला बोललो की, हे तू पोलिसांना का सांगितलं नाहीस, इथे का सांगतोय. त्यावर तो म्हणाला की, शत्रू खूपच खतरनाक आहे. इतका की, त्याच्याही जीवाला धोका आहे. त्यामुळे अगदी जपून आणि सगळी काळजी घेऊन आपल्याला काम केलं पाहिजे. मग मी त्याला विचारलं की, हे तुला कसं कळालं? तो म्हणाला की, एका बेकरीमध्ये जाताना त्याला एका व्हॅनमधलं ओरडणं ऐकून शंका आली. आणि ज्याला गायब केलं होतं, त्याचा मित्र जितेशला त्या दिवशी भेटला. त्यामुळे त्याला कळालं की, असं काही होतं आहे. आणि मग त्याने अजून पुढचे तपशील सांगितले. ते ऐकताना भितीही वाटत होती आणि काळजीही वाटत होती.
हॉटेलात चहा- वडा पाव आम्ही घेत होतो, पण तरीही आपल्यावर कोणाची नजर तर नाहीय, आपल्याला काही धोका तर नाहीय हा प्रश्न सतत मनात येतोय. टेबलवर बिलाचे पैसे दिले तरी आम्ही बोलत बसलो. आजूबाजूचे तुरळक लोक त्यांच्या तंद्रीत आहेत. आमच्याकडे कोणाचंही लक्ष नाहीय. आम्ही बराच वेळ बोलत राहिलो. हळु हळु ह्यामध्ये असलेली रिस्क आणि गांभीर्य कळत गेलं. अखेर ठरवलं की, जितेशच्या घरच्यांना हे सांगायचं आणि त्यांची मदत घ्यायची. तसं थोडं हलकं वाटलं आणि निघालो. काउंटरवर गूगल पे ने पैसे देणार तितक्यात आठवलं की, पैसे तर टेबलवरच दिले आहेत. आपल्या मागावर कोणी नाहीय ना ह्याची परत परत खात्री करत निघालो. बाहेर तर सगळं नॉर्मल वाटतंय. पण नकळत एका सावटाची जाणीवही होतेय.
जितेशच्या घरी आम्ही पोहचलो. काका- काकूंना खूप वर्षांनी भेटलो. लहानपणीच्या आठवणी निघाल्या. मग सध्या काय सुरू आहे ह्यावर बोलणं झालं. ह्या गप्पांमध्ये मुख्य बोलायचा विषय मागे पडत होता. रात्र होत आल्यामुळे काका- काकूंनी त्यांच्याकडेच जेवायचा आग्रह केला. जेवण झाल्यावरच आपण बोलू असं ते म्हणाले. शेवटी जेवणानंतर शांततेत सविस्तर बोलू असं ठरवून आम्ही तिथेच थांबलो. वरवर हसत असलो व नॉर्मल दिसत असलो तरी आतून आम्ही दोघंही प्रचंड अस्वस्थ आहोत. आणि का कोण जाणे, पण मला "सेफ" वाटत नाहीय. जणू तो अपराधी आमच्याच मागावर आहे असं वाटतंय.
आम्ही जेवायला बसलो. गप्पाही सुरू आहेत. आमचं जेवण संपता संपता जितेशच्या बाबांचे एक मित्र घरी आले. तेही थोडं जेवले आणि मग आमच्यासोबत बसले. जितेशचे बाबा म्हणाले की, हे खूप अनुभवी आहेत, तुम्हांला जे सांगायचंय ते त्यांनाही सांगा. त्यांचीही मदतच होईल. मग अखेर आम्ही विषय काढला. जितेशनेे सगळे तपशील सांगितले. गायब झालेले ते लोक, त्याचा मित्र आणि कसं झालं ते सांगितलं. त्याबरोबर ह्याची कुठेच नोंद नाहीय, बातमीसुद्धा नाहीय हेही तो बोलला. त्याचे बाबा आणि ते काका शांतपणे ऐकून घेत होते. आम्ही आम्हांला वाटणारी काळजीही बोलून दाखवली. त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. त्यावर ते इतकंच बोलले की, तुम्ही काळजी करू नका. पोलिस त्यांचं काम करत असतात. आपल्याला दिसत नसलं तरी पोलिसांना सगळं कळत असतं. जितेशनेे त्यांना सांगायचा प्रयत्न केला. पण ते ठाम होते. मग ते काका म्हणाले, मुलांनो तुम्ही इतका विचार का करताय. चला माझ्यासोबत, आपण मस्त फिरून येऊ. कसं काय पण जितेश तयार झाला आणि त्याचे बाबाही तयार झाले. मला विरोध करता आला नाही.
थोड्याच वेळात त्या काकांसोबत आम्ही त्यांच्या गाडीने निघालो. वाटेत कुठे तरी थांबून त्यांनी आमच्यासाठी सरबतासारखं पेय घेतलं. मी ते बाजूला ठेवून दिलं. जितेश खूप दमलेला वाटत होता. त्याने ते गटागटा पिऊन टाकलं. ते पिऊन झाल्यावर त्याला एकदम शांत वाटलं. रिलॅक्स होऊन तो बसला आणि बघता बघता त्याला डुलकी आली. माझं मन मात्र अस्वस्थ आहे. कुठे तरी मेजर घापा आहे असं वाटतंय. पण कुठे??? तेवढ्यात गाडी थांबली. कोणती तरी बेकरी दिसते आहे. इथे ते काका उतरले. दोन मिनिटांत येतो, तुम्ही थांबा म्हणाले. माझ्या मनात शंका कुशंका येत आहेत. आणि अचानक- अगदी अचानक मला जाणीव झाली! बेकरी!! आम्हांला घेऊन जाणारे ते काका! जितेशला आलेली गुंगी! आणि अचानक मला जाणीव झाली की, अपराध्यांनी मला पकडल्यात जमा आहे. आपण आत्ताच निसटलं पाहिजे! आणि मी गाडीचं दार उघडून पळत सुटलो! ते काका बेकरीमध्ये गेले असावेत, त्यांना कळालं नाही आणि मी धावत सुटलो!
जिथे पाय नेतील तिकडे धावत गेलो. थोडं दूर आल्यावर मी नक्की कुठे आहे, इथून माझं नातेवाईकांचं घर किती लांब असेल हे विचार मनात यायला लागले. पण इतकी जबरदस्त भिती वाटतेय की, कोणाला बोलायची हिंमत होत नाहीय. न जाणो माझ्यासमोर असलेली व्यक्ती नेमकी अपराध्यांची हस्तक असली तर? कसा विश्वास ठेवायचा? माझ्या नातेवाईकांचा फोन लावला. पण तोही लागत नाहीय. लोकांना रस्ता विचारावासा तर वाटतोय पण हिंमत होत नाहीय. इतकं हतबल कधीच वाटलं नव्हतं. माझी चाल अगदी वेड्यासारखी आहे. लोकांना थांबून रस्ता विचारायचा आहे पण पाय थांबत नाही आहेत. अक्षरश: सैरावैरा जातोय. आजवर इतके रन आणि वॉक केले होते, पण इतकं विचित्र आणि भयाण कधी चाललो नव्हतो! लोकही माझ्याकडे चमत्कारिक नजरेने बघत आहेत... एक भयाण हतबलतेने मला घेरलं. प्रचंड हेल्पलेस वाटलं. जणू ते अपराधी कधीही मला पकडणार अशी घनदाट भिती वाटते आहे. अतिशय भितीदायक जागी मी अडकलो आहे असं जाणवतंय...
भितीची आणि असुरक्षेची भावना खूप वाढत गेली. सगळे मार्ग बंद झाले आहेत आणि सगळीकडून डेड एंड आहे ही असुरक्षितता वाढत गेली. इतकी वाढत गेली की अखेर माझ्यातला "बघणारा" जागा झाला आणि खाडकन माझे डोळे उघडले! दृश्य इतकं विपरित होतं की, स्वप्नावरून सजगता स्वप्न बघणा-याकडे आली. रात्रीचे दोन वाजलेले आहेत! आणि हे स्वप्न होतं! पण स्वप्न तरी कसं म्हणायचं? मला वाटलेली भिती, ते सगळे प्रसंग, तेव्हा वाटलेली चिंता, काळजी, भय हे सगळं अगदी जीवंत तर वाटत होतं. मित्राचे ते काका असं काही करतात ह्यामुळे बसलेला धक्का तर किती जीवंत होता! सगळं तर समोर घडलं होतं. जणू मी अनुभवलं होतं. हे स्वप्न होतं, पण त्याच्याही पलीकडे काही होतं. जाग येऊनही शांत व्हायला काही मिनिटं लागली. थोड्या वेळाने हायसं वाटत गेलं! आणि मग हळु हळु मनात विचार सुरू झाले. एक एक गोष्ट उलगडत गेली आणि मग मन शांत होत गेलं... पण उरलेली रात्र अजिबात झोप लागली नाही!
मग आठवले मला पडलेले असे किती तरी स्वप्न ज्यांना एक सूचक अर्थ होता- representative meaning होतं. किती तरी स्वप्न. ज्या ज्या ठिकाणी मी सायकलिंग, रनिंग केलं आहे त्या भागांचे सूचक स्वप्न मला पडले होते. स्वप्नामध्ये एक प्रकारे त्या जागा दिसल्या होत्या. मग ते वाईचं मंदीर असेल, मुंबई मॅरेथॉनमधला सीलिंक असेल किंवा हिमालय असेल. लदाख़च्या पहिल्या सायकलिंगच्या वेळी तर स्वप्नाने मला इतका तरल अनुभव दिला की त्यामुळेच माझा आत्मविश्वास वाढला, एक प्रकारे खात्रीच पटली. स्वप्न! स्वप्नावस्था हीसुद्धा चेतनेची एक स्थिती असते. किती तरी वैज्ञानिक शोध, कूट प्रश्न, अनेकांच्या आयुष्यातले प्रश्न ह्यावर स्वप्नावस्थेमध्ये उत्तरं मिळालेली आहेत. अतिशय दुर्गम ठिकाणी आणीबाणीत अडकलेल्या ट्रेकर्सना स्वप्नामध्ये मदतसुद्धा मिळालेली आहे. त्यामुळे स्वप्न हे असत्य असलं तरी सूचक असतं. त्याला एक अर्थ असतो, एक indicative meaning असतं. स्वप्न जरी रूढ अर्थाने खरं नसलं तरी त्यावेळी वाढलेलं बीपी, हार्ट रेट हे तर खरे असतात.
कधी कधी काही घटना ह्या प्रचंड मोठी सजगता निर्माण करणा-या असतात- एखादा अतिशय दु:खाचा किंवा आपत्तीचा प्रसंग. किंवा एखादा अगदी वेगळा- अतिशय नवीन प्रसंग. जेव्हा मी माझी पहिली हाफ मॅरेथॉन ईव्हेंट पळालो होतो, तेव्हा आदल्या रात्री झोप लागतच नव्हती. कारण पुढच्या दिवशी इतकी नवीन गोष्ट होती की, त्या गोष्टीची जाणीव- सजगता इतकी प्रखर होती की, ती झोपेचा अडसर ओलांडून जाणवत राहिली. सायकलिंग- रनिंगमधले ठिकाणं आधी स्वप्नात दिसण्याचं कारण कदाचित हे असू शकेल की, त्यावेळी तिथे राईड करताना/ ते अनुभवताना सजगता इतकी प्रखर होती की, ती खोलवर अशा स्वप्नावस्थेमध्येही डिटेक्ट झाली असेल.
आणि ज्याला आपण सत्य म्हणतो तेसुद्धा अनेकांसाठी असत्यच तर असतं. आपल्याला जे दिसतं ते आपल्या जवळच्याच व्यक्तीला कधी कधी दिसत नाही. किंवा दुस-या व्यक्तीला जे ढळढळीत दिसत असतं ते आपल्याला दिसत नाही! मग सत्य व स्वप्न हा फरक कसा करता येईल! अजून एक स्वप्न आठवतं. स्वप्न असं होतं की, औरंगाबादचेच माझे नातेवाईक व मी एका छोट्या गावात फिरतोय. काही निमित्ताने त्या गावात जमलो आहोत. स्वप्नानंतर काही महिन्यांनी माझ्या आजी गेल्या. तेव्हा आम्ही अंत्यविधीसाठी पैठणजवळच्या गावासारख्या वस्तीत गेलो. तेव्हा कळालं की, अरे "ते स्वप्न" “ह्या अनुभवाचं विजन" होतं! एक स्वप्न एका रस्त्याचं पडलं होतं. मोकळा रस्ता व पलीकडे भिंत, एक विशिष्ट लँडस्केप. एका वेळी श्रीनगरमधून सायकलसोबत जाताना जाणवलं की, अरे ते स्वप्न ह्या दृश्याचं होतं! इतकं ते ओळखीचं वाटलं. Deja vu वाटलं!
मला ओशोंचीही अनेक स्वप्न पडली आहेत. त्यांना मी भेटतो आहे. आत त्यांचं व्याख्यान सुरू आहे आणि मी बाहेर बसलो आहे, जाताना ते दोन क्षण माझ्याशी बोलून जातात. किंवा पाठीवर हात फिरवतात. एका मोठ्या आलीशान इमारतीत त्यांचा एक कार्यक्रम आहे- ठिकाणसुद्धा मी स्वप्नात ओळखलं होतं की हे स्वारगेटजवळचं आहे (कदाचित गणेश कला क्रीडा मंच). त्यांना समोरून बघितल्याच्या खूप आठवणी स्वप्नात दिसतात. पूर्व जन्मातल्या असल्या तरी आठवणीच म्हणेन. त्यांचं प्रवचन ऐकून मी बसने परत जातोय असं एक स्वप्न पडलं होतं. आणि स्वप्नातला रस्ता बंडगार्डन रोड मला ओळखू आला, कारण मी वाडिया कॉलेजला असताना तिथे अनेकदा जायचो. म्हणजे भूतकाळातच नाही तर पूर्व जन्मात घडलेल्या घटनांच्याही सूक्ष्म मेमरीज/ इंप्रेशन्स असतात आणि स्वप्नावस्था खोल असली तर कधी कधी त्या मेमरीजसुद्धा वर येऊ शकतात. मी समुद्र किना-यावर आहे आणि तीन बाजूंनी समुद्र आहे. अचानक माझ्या अंगावर त्सुनामीसारखी महाकाय लाट येते आहे आणि मला पळायला जागा नाही. आणि ती लाट माझ्या अंगावर आता कोसळणारच असं अगदी स्पष्ट स्वप्न तीन वेळेस पडलं. आणि ओशोंच्या पुस्तकात त्याचा अर्थही उलगडला.
आणि स्वप्नाबरोबर इतरही अनेक प्रकारे आपल्याला irrational संवेदना होतातच ना. अचानकच एखाद्या व्यक्तीची काळजी वाटते. तीव्र आठवण येते. किंवा आपण जी गोष्ट करत नाही ती केली जाते. स्वप्नामध्ये सुप्त इच्छा- आकांक्षा जशा प्रोजेक्ट केल्या जातात, तशाच सूक्ष्म जाणीवाही पॉप अप होतात. जे सामान्यपणे आपली बुद्धी सरफेसवर येऊ देत नाही, बुद्धी जे लगेच नाकारते, ते स्वप्नाच्या खोलवरच्या शांततेत सरफेसवर येतं. असो.
बोकोजू ह्या फकिराने एक दिवस त्याच्या शिष्यांना सांगितलं की, मला रात्री स्वप्न पडलं होतं की, मी फुलपाखरू झालो आहे आणि इकडे तिकडे फिरतोय. त्याचे शिष्य हसले. तो पुढे म्हणाला, ते स्वप्न तर संपलं. पण आता मला प्रश्न पडलाय की, कशावरून मी आत्ता जे करतोय ते त्या फुलपाखराला पडलेलं स्वप्न नसेल? ज्ञानी माणसं म्हणतातच की, आपलं जीवन हे जरा जास्त वेळ चालणारं पण स्वप्नच आहे. अर्थात् आपल्या दृष्टीने. तारे- आकाशगंगांच्या संदर्भात तर आपलं जीवन क्षणार्धाचंही नसेल. असो.
तर ह्या स्वप्नाचा काय अर्थ असू शकेल मग? मला जाणवणारा अर्थ हा आहे की, माझ्या मित्राच्या संदर्भातील व्यक्तींसोबत कदाचित असं काही घडू शकेल. किंवा अशा स्वरूपाचा एखादा प्रश्न/ स्थिती/ समस्या त्याच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीसोबत होऊ शकेल. मला स्वप्नात जे जाणवलं ते इतकं डायरेक्ट आणि प्रखर होतं, ती भितीसुद्धा इतकी प्रखर होती की, हे लिहून काढताना त्यात मला बदल करावे लागले. नाव व संदर्भ बदलून थोडं ते सौम्य करावं लागलं. इतकं ते स्वप्नात स्पेसिफिक जाणवलं होतं. ह्यावर उपाय काय मग? तर उपाय हाच की, आपण ज्या गोष्टी करतो त्या अधिक सजगपणे करायच्या. आपल्याला ज्यांची काळजी वाटते, ज्यांच्या काळजीच्या वेव्हज येतात त्यांच्याशी बोलायचं. आपल्याला न दिसणा-याही अनेक गोष्टी असतात ही जाणीव ठेवायची. असो.
हे वाचल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! हे लेखन आपल्याला रिलेट झालं का, हे नक्की कळवाल. धन्यवाद.
निरंजन वेलणकर 09422108376
17 ऑक्टोबर 2023
अगदी गुरुवर्य नारायण धारप
अगदी गुरुवर्य नारायण धारप स्टाईल लिहिली आहे. मला वाटत अजून पुढे लिहिता आली असती. दुसरा भाग आहे का?
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
मला बरीच स्वप्ने पडत अशीच
मला बरीच स्वप्ने पडत अशीच काहीतरी. कधी लैंगिक, कधी भीतीदायक, कधी आशादायक. चक्क एखादा पूर्ण चित्रपट पहावा तशी. पण फार आठवत नाहीत. फ्रॉईड मात्र आठवतो अशा स्वप्नांमुळे. दुपारच्या अर्धवट ग्लानीतही धूसर स्वप्ने पडतात.
माफ करा मार्गी. मला आधी वाटलं
माफ करा मार्गी. मला आधी वाटलं होत कि ही कथा आहे. पण हे तुम्हाला पडलेले स्वप्न होते ना?
काहीही असो लिहील आहे छान. अगदी भीती दायक.
द मॅट्रिक्स सिनेमाची आठवण
द मॅट्रिक्स सिनेमाची आठवण पदोपदी होते आहे हे वाचताना, विशेषतः स्वप्न आणि शारीरिक प्रतिक्रिया यांबद्दल.
थ्रीलींग स्वप्नाभुव आहे.
थ्रीलींग स्वप्नाभुव आहे.
मला पण पडतात अशी स्वप्नं..
इंग्रजी हॉरर सिनेमे पाहिल्यावर पडतात मला भयंकर स्वप्नं..
इतरवेळची लक्षात राहत नाहीत..
मार्गी, तुम्ही शास्त्राचे
मार्गी, तुम्ही शास्त्राचे अभ्यासक आहात. तुम्ही कधी ह्या मागची कारण परंपरा शोधण्याचा प्रयत्न केला आहे का?
मला पण क्वचित कधी अस स्वप्न
मला पण क्वचित कधी अस स्वप्न पडते. कि काही गुंड नंग्या तलवारी घेऊन पाठलाग करत आहेत. मार्गी, तुम्हाला निदान पळता तरी आलंं, माझंं म्हणजे पायाला मणामणाचे ओझंं बांधलंं आहे असे वाटतंं. माझे पळणे स्लो मोशन मध्ये जाते. मग जाग येते .आणि आपण आपल्या घरी आहोत हे बघून जीव भांड्यात पडतो.
लोक अस म्हणतात कि उशी खाली सुरी ठेवून झोपले कि अशी स्वप्ने पडत नाहीत. कुणाचा काही अनुभव?
भयानक स्वप्न आहे.
भयानक स्वप्न आहे.
जाग आल्यावर हायसं वाटावं अशी स्वप्नं पडली आहेत कधीकधी मलाही.
झोपताना/ झोपण्यापुर्वी हनुमान
झोपताना/ झोपण्यापुर्वी हनुमान चलिसा पठण एकदा केले तर उशिखाली सूरी पेक्षा जास्त प्रभावी उपाय योजना ठरते
छान लिहिले आहे. कथेसारखे
छान लिहिले आहे. कथेसारखे गुंतलो.
स्वप्न आपल्याला नेहमी सत्य दाखवते.
म्हणजे ज्या गोष्टींची भीती किंवा लालसा तुमच्या मनात असते ते स्वप्नात दिसते. जर तुम्ही एखाद्या पालीला किंवा कुत्र्याला घाबरत असाल तर स्वप्नात देखील घाबरतातच. तुमचा मूळ स्वभाव दर्यादिल असेल तर तुम्ही स्वप्नात तसेच दिलदार वागता. लबाडीचा असेल तर लबाड वागता. स्वप्नात तुम्ही कधी खोटा आव आणू शकत नाही.
अँग्झायटी/ अँक्शिअस मूड -
अँग्झायटी/ अँक्शिअस मूड - पालीचे स्वप्न
डिप्रेसड मूड - नाईटमेअर्स
स्वच्छ पाण्याचे स्वप्नं मात्र दुसर्या दिवशी फार शांत मूड असतो. पहील्यांदा गुरुद्वारास गेले होते त्या आदल्या रात्री लार्ज आणि स्फटिकमय वॉटरबॉडी स्वप्नी पाहीलेली.
जलधी (वॉटर बॉडी) चे माझे स्वप्न हमखास स्पिरिच्युअल ठरते. हा सुद्धा खूप वेळा आलेला अनुभव आहे.
हा अनंत वेळा आलेला अनुभव आहे.
——————
अनुभव छान रंगवला आहे.
ओहह! इतके प्रतिसाद!
ओहह! इतके प्रतिसाद!
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद. @ केशवकूल जी, विशेष धन्यवाद!
कथेच्या शैलीसारखं वर्णन केलंय, कारण पूर्ण विषय सांगण्यासाठी मांडणी आवश्यक होती. आणि हो, मी शास्त्राचा अभ्यासक नाहीय.
स्वप्न हे कल्पनेसारखं वाटलं तरी कल्पना नसतं. कारण आपण हवी ती स्वप्नं पाडू शकत नाही. स्वप्न ही चेतनेची एक गहिरी अवस्था आहे. आणि ह्या अवस्थेमध्ये अनेक गोष्टी सजगतेच्या कक्षेत येऊ शकतात. काही जणांना संवेदनशीलता असेल तर जागेपणीही अशा गोष्टी जाणवू शकतात. आणि मुळात विचारांचं, वाईब्जचं आणि ऊर्जेचं आदान- प्रदान तर आपण व जगामध्ये सुरूच असतं. काही गोष्टी आपण "कॅच" करतो इतकंच. असो.
सर्वांना पुनश्च धन्यवाद!
तुम्हाला निदान पळता तरी आलंं,
तुम्हाला निदान पळता तरी आलंं, माझंं म्हणजे पायाला मणामणाचे ओझंं बांधलंं आहे असे वाटतंं. माझे पळणे स्लो मोशन मध्ये जाते
>>>>> मलाही झोपेत पळता येत नाही, माझ्या एका मित्राचा असाच अनुभव आहे.
त्यावर त्याच स्पष्टीकरण अस होत की झोपेत आपण स्थिर असतो आणि कुठेतरी हो जाणीव मेंदूला असते.
मला ५ मिनिटाची डुलकी लागली तरी स्वप्न पडते.
काही आठवतात काही नाही.
कित्येक दिवसांपूर्वी/ वर्षापूर्वी ची काही स्वप्ने अजूनही स्पष्ट आठवतात.
तुमच्या लेखाचं टायटल लेख
तुमच्या लेखाचं टायटल लेख वाचण्यास भाग पाडतय... काय असेल तो भितीदायक प्रसंग अस वाटुन वाचन होतं..
खरंआहे भितीदायक स्वप्न पडली तर खुप अस्थिर होतो आपण.. मी तर बर्याच वेळा स्वप्नात हुंदके देत असताना जाग आलीय..
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
स्वप्नात पाहिलेल्या घटना काही
स्वप्नात पाहिलेल्या घटना काही वेळेस त्या नंतर प्रत्यक्षात घडताना पण मी बघितल्या आहेत.
तेव्हा जाणीव होते अरे हे आपण स्वप्नात बघितले होते.
हेमंत, उदाहरणार्थ?
हेमंत, उदाहरणार्थ?
लोकांना उगाच वाटत कि हुश्श्य
लोकांना उगाच वाटत कि हुश्श्य. ते स्वप्न होते आता मी जागा झालो.
हे देखील एक स्वप्नच आहे.
#On a serious note. मला एक
#On a serious note. मला एक विशिष्ट स्वप्न नेहमी पडायचे. त्याबद्दल मी बऱ्याच वर्षांपूर्वी सोशल मीडिया वर लिहिले होते. (बहुधा ऑर्कुट वर). त्यावर बऱ्याच चर्चा वितंड वाद वगैरे झाले होते. अगदी मनघडण कथा आहे पासून ते सायको ट्रीटमेंट घेण्याच्या सल्ला देखील मिळाला होता.
हा धागा बघून ते सगळं आठवलं. इतकंच.
मला प्रश्न पडतो कधी कधी, जस
मला प्रश्न पडतो कधी कधी, जस आता इस्राएल - पॅलेस्टाईन युद्ध सुरु आहे, तिथे ज्यांनी सर्व गमावलेलं असेल, म्हणजे ज्यांचं वास्तवंच कुठल्याही दु:स्वप्नापेक्षा कमी नाही आहे, अशांना जर झोप येत असेल तर त्यांना कोणत्या प्रकारची नाईटमेअर्स पडत असतील?? की माणसाच्या मनातील भीतीच्या, काहीतरी गमावण्याच्या भावनेचा कोणताही अंतच नाही आहे? आणि ज्या परिस्थितीत तुम्ही आहात त्यापेक्षा दुष्कर स्थिती आपले मन आपल्याला दु:स्वप्नांच्या माध्यमाने दाखवून आपल्याला घाबरवायचं काम करतचं रहाणार??
स्वप्न - स्वप्न दृष्टान्त -
स्वप्न - स्वप्न दृष्टान्त - स्वप्न अनुभूती ह्या सर्वात फरक आहे. शिवाय कुठल्या प्रहरी पडले त्यावर सुद्धा काही गणिते भाकिते अवलंबून असतात. कधीही भीतिप्रद स्वप्न पडली आणि दचकुन उठायची वेळ आली तर घड्याळ बघण्याची महत्वाची सवय फार आधी पासून ( नोस्ट्रेडमस आणि भृगु संहिता शाळेत वाचल्या पासूनच ) लावून घेतली होती. त्यामुळे नंतर जे काय आठवेल त्यानुसार उहापोह करण्याचा छंद पण अनाहूत पणे कॉलेज जीवनात लागला होता आणि मग त्यानुसार अर्थातच विविध सन्दर्भ शोधणे आणि त्या वयातील अक्कले नुसार भावार्थ शोधणे सुरु असायचे. खुपदा बऱ्यापैकी विश्लेषण जुळून यायचे. पण अनेकदा आदल्या रात्री पाहिलेल्या मुव्हि किंवा वाचलेल्या कादंबरी सुद्धा महत्वाचा रोल बजावायच्या हे प्रकर्षाने जाणवायला लागले त्यामुळे नंतर नंतर मग जास्त खोलात शिरणे सोडून दिले.
आणि त्याची झळ काही महिन्यात वाईट रित्या बसली. मी गुड़घा भर पाणी असलेल्या ओढ्यातून चालत असताना माझ्या समोर एका कासवाने लाल रंगाचा मासा गिळला असे एवढं छोटुसे स्वप्न पण पहाटे मला दचकुन जाग आणायला कारण ठरले. दुसरा अख्खा दिवस अनेक पुस्तकांत अर्थ शोधण्यात गेला पण काहीच समजले नाही. नंतर २ दिवसात इतर कामात विसरूनही गेलो आणि बरोबर १ आठवड्या नंतर त्या स्वप्नाचे प्रत्यक्ष (अ)घटित घडले.
आजही इतक्या वर्षा नंतर मला त्या स्वप्नाचा नक्की उलगडा होत नाही पण उत्सुकता आहे जाणून घ्यायची की कसा अर्थ लावला जातो ते. काय घडले ते सुद्धा मी सांगेनच पण त्या आधी कोणी इकडे सांगु शकले तर जाणून घायला आवडेल.
बरोबर १ आठवड्या नंतर त्या
बरोबर १ आठवड्या नंतर त्या स्वप्नाचे प्रत्यक्ष (अ)घटित घडले.>>> म्हणजे काय घडले?? खरोखरच कासवाने मासा गिळला की आणखी काही घडले?
बाय द वे काल सुद्धा पाण्याचे
बाय द वे काल सुद्धा पाण्याचे स्वप्न पडले पण तेव्हा थंडी वाजत होती - हे जागे झाल्यावरती लक्षात आले.
पण जेव्हा थंडी बिंडी काही नसताना पाण्याचे स्वप्न प्डते तेव्हा दुसरा दिवस मस्त जातो.
आजही काही वाईट जात नाहीये बट ब्लेम इट ऑन फ्रायडे.
@लुटुपुटुचा खेळीया
@लुटुपुटुचा खेळीया
स्वप्नात स्वताला पाहण्या सोबत ते मासा आणि कासव वाला सिन झाला. त्याच्या ७व्या दिवशी मेजर रोड एक्सिडेंट घडला. विशेष म्हणजे त्या दिवशी त्या एकूण परिसरात ५ अपघात घडले त्यापैकी बाकीचे फेटल्स होते. पण मला ते वाहते पाणी आणि बाकी गोष्टीचा संदर्भ आधी लावण्यात अपयश आल्याने सावधगिरी कमी पडली. नशीब प्रारब्ध वगैरे इतर वेळी लिहिण्याच्या गोष्टी प्रत्यक्षात अनुभवणे फ़ार पीड़ा देणारे असते
कासवाने मासा गिळला यात विशेष
कासवाने मासा गिळला यात विशेष काय?
उलट माशाने कासवाला गिळले तर अघटीत म्हणता येईल.
माहिती नाही उबो
माहिती नाही उबो
पण ते साधंसे स्वप्न त्या रात्री घामाने भिजुन दचकुन उठवणारे ठरले म्हणून इतक्या वर्षा नंतरसुद्धा लक्षात आहे.
आणि एक्सिडेंट होताना त्या सर्व गोष्टींची उपस्थिती रूपकात्मक होती हे नंतर बरे झाल्यावर थोडं थोडं लक्षात आले. जे घडले ते थोडक्यात असे होते -
खायचे फिश वाहून नेणाऱ्या ट्रक्सची वाहतूक तेव्हा रात्री व्हायची आणि पहाटेला रस्त्यावर बुळबुळीत पाण्याचा एक थर साचुन राहायचा त्यामुळे अनेकदा बाइक्स स्किड होऊन अपघात व्हायचे. (नंतर बरेच उपाय केले गेले ही समस्या सोडवायला. त्यांना अनेक ठिकाणी रस्तावर बर्फाचे पाणी येऊ नये म्हणून ड्रेनेजकरिता हौद्याला बैरल सक्तीचा करण्यात आला. )
इकडे फिश + पाणी + मी हे स्वप्नापैकी झाले पण कासवाचा माश्याला गिळण्याचा प्रकार काय अर्थ सुचवत होता ते तेव्हा नव्हते समजले.
हॉस्पिटल नंतर सर्व काही ठीक होऊन बरे झाल्यावर जो काही विचार केला त्यात कासव = कमी स्पीड / खुरडत चालणे, हे क्रचेस मुळे नॉर्मल एक्टिविटी बाधित होण्याशी मी जोडले. पण नक्की काय अर्थ आहे ते इकडे कोणी जाणकार सांगु शकतील तर अधिक बरे होईल.
ओढा + मी + गुड़घा भर पानी = पाण्यात आपल्या नजरे समोर आहे तरीही मासा सूळकन पोहत असतो ह्याचा अर्थ पुन्हा बाइक + मी ह्या वेगाशी जोडला आणि जे समोर आहे पण नक्की अंदाज येणार नाही अशी स्थिती ह्या अर्थाने लावला होता. स्वप्नाचा अर्थ सांगणारे नक्की कशी सांगड घालून मार्गदर्शन करतात ते जाणून घ्यायला आवडेल.
स्वप्नात तुम्ही कधी खोटा आव
स्वप्नात तुम्ही कधी खोटा आव आणू शकत नाही.>>> नाही रे ऋन्मेष असं युनिव्हर्सल नसतय. मी स्वप्नात चक्कं ट्रक चालवलाय, प्रत्यक्षात मला फक्त सायकल येते
आशू ती सुप्त ईच्च्छा असते.
आशू ती सुप्त ईच्च्छा असते. गाडी न चालवता येणार्यांना हवेशी स्पर्धा करत सुपरफास्ट गाडी चालवण्यची स्वप्ने कॉमन आहेत. त्यासाठी आपण विडिओ गेम खेळताना गाडी चालवतो ईतके मनाला माहीत असणे पुरेसे असते.
मी म्हणतोय ते आपल्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल.
उदाहरणार्थ चार दिवसांपुर्वी माझी मुलगी फेकत होती की तिला स्वप्नात पाल दिसली आणि तिने तिला मारले. लगेच पकडली गेली कारण ती पालीला बेक्कार घाबरते. त्यामुळे स्वप्नात देखील घाबरणारच. अचानक शूरवीर होत मारणार नाही.
जर तुम्ही एखाद्या गोष्टीला भीत असाल तर स्वप्नातही घाबरणारच. तुमचा स्वभाव लोभी असेल तर स्वप्नातही तुम्हाला लोभच सुटणार. मनात चोर असेल तर संधी मिळताच चोरी करणार. जर पापभिरू असाल तर मन खात राहणार..
जर तुम्ही एखाद्या गोष्टीला
जर तुम्ही एखाद्या गोष्टीला भीत असाल तर स्वप्नातही घाबरणारच >>> नाही पटत...मी जागेपणी फारच कमी गोष्टींना घाबरतो... उदाहरणार्थ पाल , कोळी, सरडे, साप, उंदीर, वटवाघूळ, घार, कावळे, कुत्रे, कोल्हे, तरस, रानडुक्कर, बैल, अमावीय भास, अपघात, रक्त या सर्वांना मी जागृत अवस्थेत क्वचितच कधी घाबरलो असेन, आणि जर घाबरलो असेन तरी वेळीच रिॲक्ट करुन परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे, पण स्वप्नात मात्र याच गोष्टी कधीकधी दचकवून उठवतात...वर उल्लेखिलेले सर्व प्राणी आणि स्थिती मी जागृत अवस्थेत सहजपणे हाताळल्या आहेत, अथवा ज्यावेळी त्यांच्या पासून जोखीम उत्पन्न झाली तेव्हा त्या जोखमीला यशस्वीरित्या संपवलं आहे. पण स्वप्नात कदाचीत मला पुरेसा वेळ मिळत नाही अथवा जागृत अवस्थेत मेंदू आणि शरीर ज्या वेगाने प्रतिक्रिया देते त्यावर स्वप्न अवस्थेत मर्यादा येतात म्हणून या गोष्टी स्वप्नात मला दचकवायला यशस्वी होतात असा माझा कयास आहे.
Pages