मूर्ख कावळा आणि त्याला ‘मामा’ बनविणारी कोकिळा

Submitted by Dr Raju Kasambe on 18 March, 2020 - 11:16

मूर्ख कावळा आणि त्याला ‘मामा’ बनविणारी कोकिळा

कावळ्याचा परिचय कुण्या भारतीयाला करून द्यायची आवश्यकता नाही. आपल्या बालपणी ‘एक होता काऊ, एक होती चिऊ’ असं आपल्याला शिकविलं जातं. कावळ्याचा धूर्तपणा आणि चिमणीची निरागसता आपल्या मनावर ठसवली जाते. पंचतंत्रातल्या गोष्टी आणि लोककथांचा आपल्या मनावर ठसा उमटतो. मग आपल्याला जग तसंच वाटतं.

खरे तर, कावळा तहानलेला असताना माठात खडे टाकून पाण्याची पातळी वर आणायचा प्रयत्न करील काय? त्याला एवढी बुद्धी आहे का? महिनो गणती पक्षी दररोज त्याच घरी त्यात आरशातल्या वा खिडकीच्या काचेतील स्वतःच्या प्रतिबिंबाला टोचण्या का मारतात? खरे तर, माकडापर्यंतच्या उत्क्रांती पावलेल्या कुठल्याही प्राण्याला आरशाचा अर्थच समजत नाही. तो फक्त चिंपांजी आणि त्यापेक्षा जास्त बुद्धिमान असलेल्या प्राण्यांनाच समजतो.

भारतात सर्वत्र आढळणारा कावळा वाळवंटापासून बर्फाळ प्रदेशापर्यंत स्वतःला कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेणारा पक्षी आहे. त्याला खायला काहीही चालते अगदी खरकट्या पासून तर मेलेल्या प्राण्याच्या मांसापर्यंत. तसेच पक्ष्यांची छोटी पिल्लं पळविण्यात ही तो तरबेज आहे. अगदी हॉटेल मालकाची नजर चुकवून भजी, इतर खाद्य पदार्थ सुद्धा तो पळवितो. गिधाडांची संख्या कमी झाल्यामुळे मृत जनावरांची कलेवरं संपवायची जबाबदारी काही अंशी घारींसोबतच कावळ्यांवर येऊन पडली आहे.

दुसऱ्या पक्ष्यांची पिल्ले पळविणारा कावळा स्वतःच्या घरट्याचे, पिल्लांचे संरक्षण मात्र खूप आक्रमक पद्धतीने करतो. घरटे बांधणीसाठी चिवट काड्या काटक्या सोबतच बारीक तारांचा उपयोग सुद्धा तो करतो. त्यामुळे त्याचे घरटे खूपच मजबूत असते. एप्रिल ते जून मध्ये कावळ्याची वीण होते. घरटी असलेल्या झाडावर चुकुनही चढणाऱ्या माणसाला ते टोचण्या मारून हैराण करून सोडतात. पण धूर्त कावळ्याची वीण होते त्या वेळेसच त्याला मूर्ख बनविण्यासाठी दुसरा पक्षी तयार असतो. तो म्हणजे कोकीळ!

कोकीळ नर चमकदार काळा रंगाचा असून त्याचे डोळे गूंजी सारखे लाल असतात. मादी मात्र तपकिरी रंगाची असून त्यावर पांढरे ठिपके आणि पट्टे असतात. आपल्याकडे कोकिळा सुंदर गाते गैरसमज आहे. खरेतर ‘कुहुss कुहुss’ गातो तो नर कोकीळ, मादी नव्हे!

मादी केवळ ठीक ‘पीक ‘पीक क्यू’ असा कर्कश आणि तुटक आवाज काढू शकते. सांगायचे असे की कोकिळेची विण सुद्धा एप्रिल ते जून ह्या काळातच असते. पण, कोकीळ कधीच स्वतःचे घरटे बांधीत नाही. तर कोकिळा स्वतःची अंडी कावळ्याला मूर्ख बनवून त्याच्या घरट्यात घालते आणि कावळ्याची स्वतःची अंडी घरट्याच्या बाहेर फेकून देते.

पण आपल्याला वाटते तितके हे सोपे नसते. कारण कोकीळ काही गडबड करेल असा संशय कावळ्याला असतोच. कावळीणीने अंडी घातल्यानंतर नर कोकीळ आपल्या एकसारख्या ‘कुहुss कुहुss’ कुंजनाने त्या अंडी उबविणार्‍या कावळीणीला आणि घरट्याचे संरक्षण करणाऱ्या कावळ्याला त्रासवून सोडतो. नर कावळा नर कोकिळेचा पाठलाग करून त्याला दूरपर्यंत हुसकावून परत येतो. पण नर कोकीळ पुन्हा पुन्हा ‘कुहुss कुहुss’ चा राग आळवत राहतो. सुरुवातीला मंजूळ वाटणाऱ्या ह्या ‘कुहुss कुहुss’ची पट्टी चढत जाऊन शेवटी कर्कश होत जाते. पुन्हा-पुन्हा कोकिळेचे घरट्याजवळ धडक मारणे त्या कावळ्याच्या जोडप्याला असह्य होते. त्यामुळे चिडून जाऊन कावळा-नर-मादी दोघेही मिळून नर कोकिळेचा पाठलाग करतात. ह्याच संधीची वाट बघत मादी कोकिळा जवळपास पानोर्‍यात दडून बसलेली असते. तिची अंडी घालायची वेळही येऊन ठेपलेली असते. ती लगेच कावळ्याच्या घरट्यात स्वतःचे अंडे घालून कावळ्याचे अंडे चोचीत धरून फेकून देते. तिकडे नर कोकीळ कावळ्यांना दूरपर्यंत घेऊन जातो. कावळे परत येईपर्यंत मादी कोकिळा आपला कार्यभाग साधून उडून गेलेली असते.

बरेचदा ती गडबडीत कावळ्याचे अंडे फेकायचे सोडून देते. कावळ्याची आणि कोकिळेची अंडी रंग आणि आकाराला हुबेहूब एकसारखीच दिसतात. निसर्ग कोकिळेचीच साथ देतो. परत आलेल्या कावळ्यांना घरट्याकडे बघून काहीतरी गडबड झाल्याचा संशय येतो. पण नेमके काय झाले असावे ते त्यांना कळत नाही. समजा घरट्यात एखादे अंडे जास्त असले तरीही कावळ्यांना मोजता थोडीच येते? (समजा एक अंडे जास्त असल्याचे त्यांना कळाले असते तरीही आपले ते कोणते आणि परके ते कुठले हे ओळखणे निश्चितच अशक्य ठरले असते). कधीकधी काही कावळ्याच्या घरट्यात पाच ते दहा अंडी सुद्धा आढळून आली आहेत. त्यात कोकिळेचे योगदान किती ते शोधणे मजेशीर असेल!

मूर्ख (की मामा?) बनलेले कावळे घरट्यातील सर्वच अंडी उबवतात. सर्व पिल्लांना स्वतःची समजून प्रेमाने भरवितातही. हळूहळू पिल्लं बाळसं धरतात. त्यांना पंख फुटायला लागतात. ते आवाज करायला लागतात. अनेकदा तर कोकिळेची पिल्लं कावळ्याच्या पिल्लांना घरट्यातून खाली ढकलून देतात.

तिकडे आपल्या घरट्यात मोठी होत असलेली पिल्लं आपल्यासारखी दिसतही नाहीत आणि आवाजही विचित्र करतात हे बघून कावळ्यांचे जोडपे साशंक होते. आपल्या सोबत धोका झाला आहे त्यांना हळूहळू उमजते.

आता ह्या पिल्लांना असं जिवंत सोडायचं नाही असं त्यांना वाटत असेल. पण तोपर्यंत कोकिळेची पिल्लं आपल्या बीनभाड्याच्या सावत्र आई वडिलांचे घरटे सोडून उडून गेलेली असतात. अर्थात कधी कधी अशी पिल्लं कावळ्याकडून मारली सुद्धा जातात.

अशाप्रकारे आळशी कोकीळेचा वंश अजूनही टिकून आहे आणि मूर्ख कावळे कोकिळेच्या पिलांना वाढवतच आहेत. आम्ही बालपणी ऐकलेल्या गोष्टीतील ‘चतुर कावळ्याला’ मामा बनविणारा पक्षी सुद्धा आहे तर!!

कावळे कोकिळेच्या पिल्लांना भरविताना : विडिओ
https://www.youtube.com/watch?v=GtCQAOStdFM
https://www.youtube.com/watch?v=J4WV7s16pSY

एक छायाचित्र: https://www.facebook.com/wildlifephotographyindia/photos/a.9203393947024...

डॉ. राजू कसंबे, मुंबई
(पूर्व प्रकाशित: दैनिक मातृभूमी 18 जुलै 2002)
.

ता.क.:
कोकिळेची परभुत विण (Brood Parasitism) यशस्वी होण्यासाठी अनेक गोष्टी उत्क्रांत पावल्या आहेत. त्यापैकी काही म्हणजे:
१. नर कोकीळ रंग – आकाराला कावळ्यासारखा दिसतो. त्यामुळे संधीप्रकाशात त्याच्याकडे दुर्लक्ष होते.
२. मादी कोकीळ चुट्ट्या बुट्ट्यांची असल्यामुळे संधीप्रकाशात सहजी दिसून पडत नाही.
३. कोकिळेच्या अंड्यांचा ऊबवणीचा कालावधी कावळ्यांच्या उबवणीच्या कालावधी पेक्षा कमी असतो. जेणेकरून कोकिळेची पिल्लं आधी जन्माला येतात. ह्या पिल्लांना जन्मताच घरट्यातील इतर पिल्लांना किंवा अंड्यांना घरट्याबाहेर ढकलून द्यायची उपजत प्रवृत्ती असते.
४. कोकिळेची पिल्लं आधी जन्माला आल्यामुळे सुरुवातीच्या दोन दिवसात भरपूर खाऊन बऱ्यापैकी सुदृढ बनतात व त्यांच्या जगण्याची संभावना वाढते.

Group content visibility: 
Use group defaults

मस्त लेख! Happy
कावळा त्याच्या घरट्याबाबतीत खुपच प्रोटेक्टीव असतो.. घरट असणाऱ्या झाडाजवळुन ये-जा करताना/ खिडकी-गॅलरीतुन बाहेर बघताना थोड जपुन च राहाव लागत..

लेखाचे शीर्षक मुद्दाम 'मूर्ख कावळा ....' असे ठेवले आहे. कारण लेखात त्याच्या मूर्खपणाचे वर्णन केलेले आहे. चतुराईचे वर्णन करील तेव्हा 'चतुर कावळा' लीहेन.
ह्या विषयावरच्या एवढ्या महितीपूर्ण प्रतिक्रिया वाचून खूप बरे वाटले. तसेच नवीन माहिती मिळाली. पुन्हा सर्वांचे आभार!

आम्ही पक्ष्यांसाठी एक प्लास्टिकचा वाडगा पाण्याने भरून तो बाल्कनीत ठेवतो. तो कलंडू नये म्हणून त्याच्या वरच्या कडेला एक छिद्र करून त्यातून प्लास्टिकची गवताच्या पात्यासारखी दोरी ओवून ती ग्रिलला बांधली आहे. गेल्या आठवड्यात एक कावळा दुपारी सतत वेगळे आवाज काढीत आरडाओरडा करीत असे. पाहायला गेले तर वाडगा साफ कलंडून रिकामा झालेला असे. पुन्हा पाणी ओतले तरी आरडाओरडा सुरूच. मग दुरून लक्ष ठेवल्यावर कळले की ती प्लास्टिकची दोरी सोडवण्यासाठी त्याचा आटापिटा होता. आणि ट्यूब पेटली की हे दिवस त्याचे घरटे बांधण्याचे आहेत आणि त्यासाठी सामग्री गोळा करण्याचे काम चालले आहे!

मी गेल्या वर्षी पाणी ठेवत होते पक्ष्यांसाठी. कावळे या पाण्यात अन्न, हाडे इत्यादी टाकून द्यायचे. का ते कळले नाही. मी कमळ लावले होते व त्या पाण्यात गप्पी सोडले होते. कावळ्यांनी कमळ उपटून फेकून दिले व 15 दिवसात गप्पी उडवले. 1 जोडी शिल्लक राहिली ती मी प्राणपणे जपली. त्यांचीपोरे लवकरच मोठी झाली. सध्या त्यांना झाकून ठेवते

आता परत पाणी ,धान्य ठेवायचे दिवस आलेत.

कावळे कडक पोळीचे तुकडे, वाळलेले बेडूक, मांसाचे तुकडे पाण्यात भिजायला टाकतात. नरम झाले की मग खातात. मी कावळ्यांच्या या उद्योगाला कंटाळून पक्षांसाठी पाणी ठेवू नये या विचाराला आले. इतकी घाण करतात.

त्यांना 1 वेगळे भांडे व इतरांना 1 वेगळे भांडे ठेवावे असा विचार आता करतेय. सध्या एकच भांडे ठेवलेय. पण 2 ठेवेन आता.

Only for crow cha board / sticker asel.
Mag ek gachchi ek panvatha aandolan hoil.

Only for crow cha board / sticker asel.
Mag ek gachchi ek panvatha aandolan hoil>>>

हो न...

भांडे भाव केलेला अजीबात चालणार नाही असे बोर्ड बनव ठेवते आता... कोणा पक्ष्याला हवा असेल तर उचला व ठिय्या आंदोलन करा...

5 पक्षी एकत्र दिसले तर मी तेल लावलेली लाठी काढणार बाहेर.

काल महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी फुल्ल परमिशन दिलीय. Happy Happy

एक सोप्पा उपाय आहे ―
कावळ्यासाठी पाणी ठेवायला घागर वापरायची आणि तिच्या फक्त तळाशी पाणी ठेवायचं आणि सोबत थोड़े दगड बाजूला ठेवून द्यायचे. तो दिवसभर ते दगड टाकून पाणी वरपर्यन्त आणण्यात बिझी राहील आणि बाकी पक्षी त्यांच्या सेपरेट भांड्यात विनासायास पाणी पिवून बिझी कावळ्यासोबत #मायबोली बकरा चॅनेलतर्फे सेल्फ़ी काढून निघुन जातील.
_________________

हायड्रीला नावाची एक पाणवनस्पती (विड्स) असते तिला जर त्या कावळ्याच्या पाणपोईच्या भांड्यात ठेवले तर २ फायदे होतील – १) पृष्ठभाग झाकला गेल्याने चपाती वगैरे तुकडे थेट पाण्यात न बुड़ता वरचेवर राहतील आणि पाणी खराब होणार नाही. २) पाण्याचे बाष्पिभवन मंदावेल आणि पाणी जास्त काळ भरलेले राहील

(बोनस पॉइंट - भांड्याचा व्यास साधारण फुटभर असेल तर ह्यात काही छोटे पक्षी छान आंघोळही उरकुन घेतात.)

अज्ञानी, तुमची नवी आयडिया पण चांगली आहे. माझ्या आजूबाजूला तळी आहेत, hydrila मिळेलही पण सध्या बाहेर पडता येणार नाही.

DSCN0693 resize.jpg

DSCN0698.JPG

मी माझ्या बॅंकेत ज्या ज्या वेळी जाते तेव्हा तेथील तुतीच्या झाडापाशी अवश्य जाते. तिथे नेहमी कोकिळ नर असतो. मला भिऊन दूर पळत नाही. मस्त दर्शन देतो. झाड फक्त बारा तेरा फूट उंच आहे.

मामा भाचीचा लेख झकास आणि प्रतिक्रिया माहितीपूर्ण !

अवांतर - माझ्या मित्राची पत्नी एक व्रत करायची त्यात दिवसभर - कोकिलध्वनी ऐकू येई पर्यंत उभेच राहण्याचा नियम होता Happy

आज ठेवले पाणी परत..

खायला पण ठेवते. काल वाडी ठेवली होती पाडव्याची, तेही फस्त करून मोकळे Happy

Pages