नमस्कार सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि कर्जमुक्ती वरून बरीच चर्चा चालू आहे. प्रत्येक जण आपण शेतकऱ्यांचे कसे कैवारी आहोत हे दाखवत आहेत. शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत हे कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला माहित नाहीत किंवा माहित करून घ्यायचे नाहीत किंवा माहित असून ते माहित नाही असे भासवायचे आहे. शेतकऱ्याचे बरेच प्रश्न आहेत त्यात मुख्य म्हणजे पाणी, वीज, शेतमालाला भाव हे आहेत. त्याच बरोबर वाढत्या महागाईमुळे त्याला घर कसे चालवायचे हेच कळत नाही आहे. मागील तीन वर्षातील अवस्था अशी आहे कि शेतकरी दुष्काळातून सावरला नाही तोवर उत्पन्न इतका झाला कि सर्व मालाचे भाव खाली आले, यातून एक गोष्ट झाली ती म्हणजे यावर्षी जो खर्च केला तो निघत आहे पण बाकीचे काय?
शेतीविषयक धोरण काय असावे याचा विचार केला आणि योग्य नियोजन केले तर याची गरज भासणार नाही. त्यातील काही मुद्दे असे,
१. कर्जमाफी करू नये, त्या ऐवजी शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा करावी आणि कर्जाची मुद्दल तशीच ठेवून ठराविक कर्जावरील व्याज माफ करावे आणि कर्जाची मुदत वाढवावी. यामुळे सर्वाना समान न्याय मिळण्यास मदत होईल. यावर कुणाला किती रुपये द्यावे याचे नियोजन सरकार ने करावे, आणि योग्य व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा होतील हे पाहावे. आपला शेतकरी स्वाभिमानी आहे तो कधीच फुकटचे मागत नाही त्याला फक्त त्याचा योग्य मोबदला हवा.
२. आता पर्यंत इतका पैसे सिंचनावर खर्च झाला पण त्याचा म्हणावातसा फायदा नाही झाला. बरेच प्रकल्प अपूर्ण आहेत आणि नवीन प्रकल्प सुरु केले आहेत. जे प्रकल्प पूर्ण होत आहेत ते लवकर पूर्ण करावे आणि बाकीचे वेळेत पूर्ण होतील याची काळजी घावी. हे सर्व पूर्ण झाल्यावर नवीन प्रकल्प सुरु करावेत.
३. पिकांचे नियोजन व्यवस्थित करणे आवश्यक आहे. प्रत्येक सातबाऱ्यावर पीकपाणी असते त्याचा पूर्ण अभ्यास करून नियोजन करावे म्हणजे कोणत्या गोष्टी आयात आणि निर्यात कराव्या लागतील याचा अभ्यास आधीच झाला पाहिजे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा व्यवस्थित असायला हवी. यातून पिकाला हमीभाव मिळायला मदत होईल.
४. प्रत्येक ठराविक अंतरावर शेतकऱ्याला आपला माल विकण्यासाठी जागा करून द्यावी जेणेकरून जे छोटे शेतकरी आहेत ते आपला माल कोणत्याही व्यापार्याची मदत न घेता विकेल म्हणजे त्याला जास्त पैसे मिळतील.
५. शेतीमाल खरेदी विक्रीसाठी व्यापारी व शेतकऱ्याला मदत करायला हवी, त्यासाठी जी यंत्रणा आहे ती सक्षम करून लागणाऱ्या सर्व गोष्टी वेळेत पुरवल्या गेल्या पाहिजेत.
६. कोणत्याची नैसर्गिक आपत्तीचे मूल्यमापन करून तात्काळ शेतकऱ्याला त्याचा मोबदला दिला पाहिजे. ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले त्यालाच ही मिळायला मदत होईल. २४-४८ तासात ते मूल्यमापन करून त्याचा अहवाल ४ दिवसात तयार झाला पाहिजे.
इतके केले तरी दिलासादायक होईल, अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे शेतकऱ्याला त्रास होतो पण वरील गोष्टी जर का सरकार ने केल्या तर याचा नक्की चांगला परिणाम शेतकऱ्यावर दिसेल आणि त्याला जगण्याची नवीन उमेद निर्माण होईल आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी होण्यासाठी मदत होईल.
--
प्रजोत कुलकर्णी
मो. +९१ ९७६४२३११६०
शेतकऱ्याची सध्याची परिस्थिती आणि यावरील तात्काळ उपाय
Submitted by प्रजोत कुलकर्णी on 12 April, 2017 - 11:20
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा