दुष्काळातुन सावरलेल्या शेतकर्याच्या आपल्या मृत गायीप्रती असलेल्या भावना सदरील कवितेतुन मांडल्या आहेत
"आज तु असती तर,..."
कवी :- विशाल मस्के, सौताडा.
मो. :- 9730573783
तुझ्या आठवणीचा हिंदोळा,सतत येतोय वर
मनात एकच विचार आहे,आज तु असती तर,...||धृ||
तुझे माझे सुत्र
अजुनही जुळले असते
तुला पाहून पाहून,
मन माझे खुलले असते
पण तुझ्या-माझ्या साथीचा,काळ झाला चोर
मनात एकच विचार आहे, आज तु असती तर,...||१||
तुला दावला असता मळा
हिरवागार फूललेला
आपल्या शेतामधला माळ
तु माझ्यासवे खेळलेला
त्या हिरव्यागार शिवारात,तु टाकली असती भर
मनात एकच विचार आहे, आज तु असती तर,...||२||
माझ्या फाटक्या संसाराच्या
परिस्थितीला तु झेललं होतं
माझ्या जीवनात येऊन
माझं जीवनही बदललं होतं
जीवनात तु आल्यापासुन,जीवाला नव्हता घोर
मनात एकच विचार आहे, आज तु असती तर,...||३||
पहिल्यावाणी जगलो असतो
दारिद्र्यावर मात करून
सुख ही दारात रमलं असतं
चैतन्याची वात धरून
सुख,संपत्ती,समृध्दीनं,ऊजळलं असतं घर
मनात एकच विचार आहे, आज तु असती तर,...||४||
पण नियतीनं केला घात
वार झाला काळजावर
नैसर्गिक त्या दुष्काळाने
भर कर्जाच्या बेरजावर
तुझ्याकडून आशा होती,तुझाही हरपला स्वर
मनात एकच विचार आहे, आज तु असती तर,...||५||
आता पाऊस मस्त आहे
पिकही डौलतंय डौलाने
परिस्थिति चालली आहे
आज विकासाच्या कौलाने
पण तुझ्या दावणीचा,तो मोकळाच आहे दोर
मनात एकच विचार आहे,आज तु असती तर,...||६||
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.9730573783
* सदरील कविता नावासह शेअर करण्यास परवानगी
* व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783