जाताना :)

Submitted by भारती.. on 7 April, 2015 - 04:00

जाताना..

प्रखरतेचे पांघरत झाकोळ जाताना
गुणगुणावी गहनतेची ओळ जाताना

साजरा होता ऋतू रेशीमकिरणांचा
धाडला त्याने विजेचा लोळ जाताना

कारणास्तव कोणत्या आलो इथे होतो
आठवांचा निस्तरेना घोळ जाताना

हे कथानक एकदिश जर टाळणे जमले
आडवाटा आणि गल्लीबोळ जाताना

शांततेतच ‘भारती’ आयुष्य सरलेले
हा कशाला शेवटी कल्लोळ जाताना ..

-भारती बिर्जे डिग्गीकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.......

आठवांचा निस्तरेना घोळ जाताना >>>>> अग्दीच आवडले Happy

प्रखरतेचे पांघरत झाकोळ जाताना >> कदाचित मला नीटसा समजला नसावा.

कारणास्तव कोणत्या आलो इथे होतो
आठवांचा निस्तरेना घोळ जाताना >>> आवडली ही द्विपदी

आडवाटा आणि गल्लीबोळ जाताना >> हे पण नाही कळालेले.

शांततेतच ‘भारती’ आयुष्य सरलेले
हा कशाला शेवटी कल्लोळ जाताना .. >>> ही द्विपदी मात्र अतिशय सुंदर. एक संपूर्ण कविता वाचल्याचा आनंद मिळाला .

सर्वप्रथम ...गझल लिइल्याबद्दल अभिनंदन !! Happy
फार छान भारतीताई
सर्व शेर आवड्ले
मतला जरा कमी समजला
गल्लीबोळ हा शेर माझ्यासाठी सर्वोत्तम

आभार सर्व सुहृदांचे !
बाळू , 'कुणीतरी ',
''प्रखरतेचे पांघरत झाकोळ जाताना
गुणगुणावी गहनतेची ओळ जाताना ''
- प्रखर जाणिवेने जगताना येणारी काळोखी, नैराश्य .. Happy
या ओळीनेच सुरु झाली ही गझल डोक्यात .

''आडवाटा आणि गल्लीबोळ टाळले तर आयुष्याचं कथानक एका दिशेने सरळसोट प्रवास करू शकतं ''असं सूचित केलं आहे.
Happy जे अशक्यप्राय आहे म्हणून तर आयुष्य आयुष्य आहे !

मला गझलचे तन्त्र व मंत्र काहीच कळत नाही पण ही अर्थ उमजल्याने ,भावल्याने आवडली
तुम्ही स्पष्टीकरण केल्यावर तर आस्वाद घेणॅ जरा जास्त सोपे झाले.गझल मस्तच!!!

शांततेतच ‘भारती’ आयुष्य सरलेले
हा कशाला शेवटी कल्लोळ जाताना .<<< उत्तम व सहज मक्ता!

मतल्यात व गल्लीबोळ ह्या शेरात रदीफ निभावल्यासारखे वाटले नाही.

साजरा होता ऋतू रेशीमकिरणांचा
धाडला त्याने विजेचा लोळ जाताना <<< सुंदर शेर!

कवयित्री गझलकारावर हावी झाल्याचे मात्र जाणवले. कविता शब्दांच्या शृंगारावर आकृष्ट होते तर गझल वर्तनावर!

दुसरा शेर आणि मक्ता गायनानुकुल झाले आहेत.

आभार भुईकमळ, बेफिकीर,दिनेश Happy
बेफिकीर , हा तुमचाच विषय तेव्हा तुमचे निकष बरोबरच आहेत,
>>कवयित्री गझलकारावर हावी झाल्याचे मात्र जाणवले.>>हे नेहमीसाठीच खरं असावं ,
त्यामुळे जिथे रदीफ निभावला गेला नाही असं तुम्हाला वाटतं ( मतला/ गल्लीबोळ )त्या ओळींची धुंदी माझ्यावरून उतरत नाहीय !मात्र, हे शब्द केवळ शृंगारवस्तू नाहीत. खूप आनंद / दु:खविरेचनाचा प्रत्यक्ष अनुभव आहेत ते.