'रसिक, विचक्षण, सज्जन, संयमी, आश्वासक, मायाळू, असीम, आनंदकंद, प्रतिभावान, सुगम'....म्हंटले तर शब्दकोशातले शब्द...नाही म्हंटले तर काही नाही! हल्ली जगण्याच्या संज्ञा वेगाने बदलत आहेत आणि शब्दार्थही. किंबहुना जिथे प्रत्येक हृदयातच काहीना काही बोच आहे तिथे नित्य पाझरत असणार्या कडवट, विषादी भावनांमुळे सरळ साध्या शब्दांनाही एक विषारी छटा मिळाली आहे. समूहात राहूनही माणसाचे 'बेट'च नव्हे तर त्या 'बेटावर राहणारा एकटा माणूस' अशी अवस्था झाली आहे. रक्ताच्या नात्यांमध्ये संवाद दुष्कर होऊ लागलेत. सुखाची व्याख्या करणारी वर्तुळे आकसत आकसत जखडणार्या पाशांसारखी संकुचित होत चालली आहेत. "नाहीच कुणी अपुले रे..." हा ग्रेसांचा पीळ पाडणारा उद्गार आपल्याच काळजाचा प्रतिध्वनि आहे की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती असताना कोल्हापूरच्या अशोक पाटील म्हणजेच 'अशोकमामांचा' सहवास ही मात्र माझ्यासाठी एका मरुस्थलासारखी अनपेक्षित आणि जीवनातील चांगुलपणावर पुन्हा भरभरून विश्वास टाकण्याला उद्युक्त व्हावे असे वाटण्यासारखी उबदार, प्रवाही घटना ठरली आहे.
विशेष म्हणजे आभासी, मायाजाल, तद्दन खोटे अशा शेलक्या विशेषणांनी संभावना होणार्या माध्यमातून ही ओळख फुलली, दृढ झाली आणि प्रत्यक्ष भेटीतल्या संवादांमुळेही संवेदनेवर कुठे ओरखडा उमटला नाही याचे मला प्रचंड समाधान वाटते. सूर जुळतील असे वाटत असताना इतर बर्याच जणांना प्रत्यक्ष भेटून पदरी निराशाच आली आहे (इतरांना माझ्याबाबतीतही असे होत असेलच!). यात त्यांच्या व्यक्तित्वात असणार्या तरलता आणि पारदर्शितेचे मोठे योगदान आहे. जिथे संपूर्ण सृष्टी जगवणारा प्रकाशही 'तरंग' आणि 'कण' या द्वैतामध्ये वावरतो तिथे माणसांचे काय सांगावे? पण या द्वैताचा लवलेशही मामांच्यात सापडत नाही, ते अंतर्बाह्य तसेच आरपार आहेत. अर्थात दोन व्यक्तींच्या तारा जुळण्यासाठी, सहवास सुकर होण्यासाठी केवळ आवडी-निवडी जुळून भागत नाही. मैत्री या शब्दाला त्यापल्याड जाणारा अर्थ आहे आणि अशोकमामांशी जुळलेला बंध त्या व्यापक अर्थाशी संयोग साधतो असे मला नेहेमी वाटते.
आयुष्याचे टक्के टोणपे खाऊनही, पावसापेक्षा उन्हाच्या जास्त झळा सोसूनही न सुकलेले, न वठलेले असे हे सदाहरित झाड आहे. नोकरी-व्यवसायातून निवृत्ती आली, की स्वतःशीच निवृत्त होत जाणारी अनेक माणसे दिसतात. खास करून ज्यांना फारसे छंद नाहीत किंवा दैनंदिन जीवनात आन्हिकांखेरीज महत्त्वाचे काही नाही अशांबाबत ही गोष्ट जास्त ठळकपणे जाणवते. आमच्या मामांनी मात्र निवृत्तीनंतर जणू काही कात टाकली आहे. इजिप्शियन तत्त्वप्रणालीत असलेला 'आफ्टरलाईफ' हा शब्द सध्याची मामांची दैनंदिनी पाहिली की मला हटकून आठवतो. कामाच्या धकाधकीत, अनेक कर्तव्यांचा हिशेब नेकीने चुकवण्याच्या नादात जे काही करायचे राहून-विसरून गेले होते ते आता मुक्तपणाने करणारे मामा पाहिले की शाळा सुटल्यावर घरी येऊन, कपडे-दप्तर भिरकावून खेळायला धावणार्या मुलाचीच आठवण व्हावी. त्यांचा आनंदही तितकाच निखळ आणि निरागस आहे. त्या अर्थाने मामा पुनर्जन्माचे रहस्य एकाच जन्मात समजून घेत आहेत.
मामांविषयी लिहिताना साहित्यापासून सुरूवात केल्याशिवाय पर्याय नाही. तसे ते अनेक प्रांतांत मस्त मुशाफिरी करतात आणि चर्चा-आस्वादासाठी कोणताही विषय त्यांना वर्ज्य नाहीच ! हां आता 'वैदिक गणित' किंवा पूर्वीच्या 'आमची माती आमची माणसे'वाल्यांचा आवडता विषय 'गव्हावरील तांबेरा' अशा विषयांवर त्यांच्याशी माझी अजून चर्चा झालेली नाही म्हणा, पण या विषयांवरही चार-दोन वाक्ये तरी ठासून बोलण्याएवढी माहिती त्यांच्याकडे नक्कीच असेल असा विश्वास आहे (गरजूंनी प्रयोग जरूर करून पहावा). एखादा गायक आवडता राग गाताना जरा अधिकच खुलतो तसे साहित्यविषयक चर्चा सुरू झाली की मामा जरा जास्त सरसावून बोलतात. खरेतर नोकरी म्हणून त्यांनी एक अत्यंत रखरखीत म्हणावा असा ऑडिटर पेशा निवडला होता. विविध शैक्षणिक संस्थांच्या आर्थिक कारभारांचे मूल्यमापन आणि परीक्षण करणार्या अत्यंत गद्य पेशात राहूनही त्यांच्यातील हळवेपण वाहते ठेवण्याच्या योजनेबद्दल जगःनियंत्याचे दोन्ही हात जोडून आभार मानायला हवेत. या तगलेल्या संवेदनशीलतेमुळेच साहित्यातील रुची सजग राहिली आणि ते अफाट वाचन करू शकले. विविध लेखकांच्या रचना, जीवनपट, लेखनाची मूलतत्त्वे यांबद्दल माहिती पडताळून पाहण्याचा मामा म्हणजे चालताबोलता ज्ञानकोश आहेत. लेखनाविषयी कुठलीही शंका असो मामांना बिनदिक्कत फोन करावा, बोलते करावे (त्यासाठी फार मिनत्याही कराव्या लागत नाहीत) आणि पुढची काही मिनिटे खळाळत्या झर्याच्या पाण्याचे तुषार अंगावर उडाल्याचा सुखद अनुभव यावा असे बरेचदा घडते. कुठलीही माहिती थातुरमातुर नसणार आणि शंकेचे पूर्ण समाधान होईपर्यंत संवाद साधला जाणार याची अगदी खात्रीच बाळगावी. अर्वाचीन मराठी साहित्यावर पोसला गेलेला त्यांचा पिंड अशावेळी झगझगीत होतो.
जी.एंचे लेखन आणि व्यक्तिमत्त्व हा मामांचा हळवा कोपरा. गूढ-गंभीर अंधारयात्रा वाटावे अशी लेखनकळा लाभलेल्या जी. एंच्या लेखनाबद्दल आदर असला तरी आपुलकी निर्माण होत नव्हती. त्यांच्या साहित्याचा शोध अर्ध्यातच संपवावा असे वाटू लागले होते. त्यांनी निर्माण केलेले जग हे एका हिरव्या-धुरकट काचेपलीकडे आहे आणि कितीही प्रयत्न केला तरी अखेर काचेला नाक लागून थांबावेच लागते की काय असा विचार येऊ लागला होता. अशा स्थितीत मला मामांची साथ लाभली. जी.एंच्या लेखनाशी आणि त्याच्या निर्मितीमागील अनेक स्रोतांशी परिचित असलेले मामा माझ्यासाठी ती काच भेदून पुढे जाण्यासाठी, अंधारवाटांवर न भुलण्यासाठी एका तेजस्वी दीपज्योतीप्रमाणे प्रकाशदायी ठरले. त्यांच्यामुळे जी.ए. पुन्हा, वेगळ्या मनोभूमिकेतून वाचले गेले. ते प्रभावीपणे करत असलेले अभिवाचन - खास करून 'तुती' आणि 'कैरी' सारख्या अस्वस्थ करणार्या कथा अजून ऐकण्याचा योग आलेला नाही पण त्यांच्याशी जी.ए. या लेखनप्रकृतीबद्दल झालेल्या अनौपचारिक चर्चा एका आनंदाच्या ठेव्याप्रमाणे मी जपून ठेवल्या आहेत.
मागे आंतरराष्ट्रीय संबंध आणि राष्ट्रसुरक्षेच्या व्यूहरचनेबाबत वाचन करताना 'फोर्स मल्टीप्लायर' हा शब्द मिळाला. 'तितक्याच उपलब्ध साधनसामग्रीने ईप्सिताहून अधिक साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी' असा याचा अर्थ समजून घेता येईल (उदा. दळणवळणाची साधने, नागरी व सैनिक मनोबल इत्यादी). मामा हे असेच माझ्यासहित अनेकांच्या आनंदाचा 'फोर्स मल्टीप्लायर' आहेत. करायचं ते दणक्यात या वृत्तीने त्यांचा कार्यक्रम सुरू असतो. साधी यू ट्यूबवरील पाच मिनिटांची ध्वनिचित्रफीत असो वा एखादा अभिजात चित्रपट, त्याच ओढीने, संपूर्ण समरसतेने पाहणारे मामा सर्वांना हातचे राखून न ठेवता आनंद वितरीत करतात, अनेकपटींनी वाढवतात. यावेळी त्यांच्या चेहर्यावर आगळे समाधान दिसते, जे पाहणे मला खूप आवडते.
संवाद ही त्यांची अविच्छिन्न गरज आहे. लेखन असो की संभाषण दोन्हीतून अनेकांशी संवाद साधण्यात रममाण होत राहण्यात त्यांना आनंद मिळतो. "काही बोलायाचे आहे...आणि बोलणार आहे" हे त्यांच्या असण्याचे लक्षण आहे. आंतरजालावरील त्यांचा वावर पाहिला की थक्क व्हायला होते. एकाचवेळी चॅटींग, एखाद्या लेखावर उत्कट प्रतिसाद, फोनवर तावातावाने चर्चा, शेजारघरातील लहानग्याला खेळवणे असे नाना उद्योग एकहाती करताना त्यांना पाहिले की त्यांच्यात अतिमानवीय गुण आहेत का काय असे वाटू लागते. (बी एस एन एल मामांच्या नेटवापरामुळे अमर्यादित डेटाप्लॅन अधिक महाग करणार असल्याची अफवा आहे!) 'हे सर्व कोठून येते?' हा प्रश्न पडावा इतक्या उर्जेने सगळे कार्यक्रम अष्टौप्रहर चाललेले असतात आणि एखादा उदासीन आत्मादेखील नकळत त्या उर्जेच्या भोवर्यात खेचला जातो. मामांची भेट व्हायच्या आधी आणि भेटीनंतर दोन्हीवेळा धाप लागते. पहिल्यांदा त्यांच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या सदनिकेच्या पायर्या चढून जावे लागते म्हणून आणि भेटीनंतर त्या दोन-चार तासात झालेल्या देवाणघेवाणीतून येणार्या सकारात्मक थकव्यामुळे! खुद्द मामा मात्र रात्री अपरात्रीही तितक्याच उत्साहाने वावरत असतात. एखाद्या लेखावर किंवा कवितेवर रात्री दोन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी त्यांनी लिहिलेला दीर्घ प्रतिसाद पाहून झोपेचे इंद्रिय या माणसाला बसवलेलेच नाही की काय अशी शंका बळावत जाते. जागण्याचे - आणि अखंड कार्यरत राहून जागण्याचे - एखादे मॅरॅथॉन झाले तर मामा आरामात ढाल जिंकून परततील आणि पुन्हा कॉम्प्युटर सुरू करून कामाला लागतील.
अभिजात इंग्रजी तसेच जागतिक भाषातील चित्रपट आणि संगीत ह्या त्यांच्या आणखीन दोन आंतरसाली. जुन्या हॉलीवूड चित्रपटांबद्दल बोलताना तर त्यांचा पार 'हरितात्या' होतो. म्हणजे, " अरे इथे ही विव्हीयन ली अशी त्वेषाने बोलतेय आणि तिथे तो तगडा क्लार्क गेबल मिशीतल्या मिशीत हसत कोपर्यात उभा", अशी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग वर्णिल्यासारखी सिनेमाची कथा सांगितली जाते. कथा सांगून संपल्यावर त्या कलाकारांचे इतर सिनेमे, आपसातील संबंध, शूटींगवेळच्या गमतीजमती, पहिल्यांदा तो सिनेमा पाहिला त्याची कथा इत्यादी अनेक 'उपकथानके' जोडली जातात. चित्रपटांवर बोलणे हे एक संपूर्ण पॅकेज डील असते मामांसाठी आणि या सर्व गोष्टी आत्ता आपल्या डोळ्यांदेखत घडतायत अशी अनुभूती समोरच्याला मिळत राहते. तीच गोष्ट हिंदी चित्रपटांविषयी. दिलीपकुमार आणि मधुबाला हे त्यांच्या आवडीचे दोन स्तंभ आहेत आणि बाकी इमारत या पायाभोवती वाढलेली आहे. मधुबाला या नावाविषयी काही वावगे बोलणे हा मामांचे शत्रुत्व स्वीकारण्याचा एक जवळचा मार्ग आहे. अशा माणसाला उकळत्या तेलाप्रमाणे भाजणार्या चिरदाही शब्दांचा सामना करायची मानसिक तयारी असावी हे एक जाताजाता सुचवल्याशिवाय राहवत नाही.
मामांच्या संगीत या आवडीसाठी तर एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल. चार सहा हजार गाण्यांचा गीत,संगीतकार, गायक यासहित परिपूर्ण डेटाबेस मेंदूत बाळगून असणारे मामा एक चालतीबोलती म्युझिकल लायब्ररी आहेत. अलीकडेच फेसबुकवरील एका स्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले त्यावेळी त्यांचा निरामय आनंद पाहणे ही एक अपार आनंददायक घटना होती.
ही निरामयता हेच मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी वाटणार्या आकर्षणाचे प्रमुख कारण आहे. अभियांत्रिकीत "नॉन डिस्ट्रक्टीव टेस्टींग" असते. उत्पादित वस्तूंत काही दोष राहून गेले आहेत का ते पाहण्यासाठी एक्स-रे आणि इतर माध्यमांतून चाचण्या करतात. मामांचे याच्या उलट आहे. भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीत गुण कुठले आहेत हे शोधण्याचा त्यांचा प्रयास असतो आणि त्या गुणांचे भरपूर कौतुक करणे हा त्यांचा आवडता छंद आहे. अनेकविध विषयांवर ज्ञान बाळगून असलेले अनेक आहेत. उत्कृष्ट वक्ते, प्रतिभावान लेखक, व्यासंगी वाचकही भरपूर मिळतील पण हे सर्व असूनही एक माणूस म्हणून काहीसे वरचढच असणारे मात्र शोधून सापडणार नाहीत. याबाबतीत मामा 'लाखों में एक' आहेत. आयुष्यात कधीही न भेटलेल्याला एका भेटीतच आपलेसे करण्याचा परीस मामांना सापडलाय आणि त्यांच्या सहवासात येणार्या प्रत्येकाला त्याच्या स्पर्शाचा फायदा मिळतो. कुठलाही पूर्वग्रह न बाळगता संवादासाठी सदैव तत्पर असलेले मामा आमच्या भाव विश्वाचे 'किमयागार' आहेत. त्यांची अनेक रुपे आपल्यापरीने लोभस आहेतच पण या सर्वांचा परिपाक म्हणून एकसंधपणे जाणवणारे व्यक्तिदर्शन अधिक आनंददायी आहे, चकित करणारे आहे. 'द सम इज डेफिनिटली मोअर दॅन द पार्ट्स!'
त्यांच्या थोड्या अधिक निकट असणार्या आम्हा मित्रांच्या त्यांच्याविषयी दोन जबरदस्त तक्रारी आहेत. एक म्हणजे अर्थातच प्रकृतीची जाणता-अजाणता होणारी हेळसांड आणि दुसरी म्हणजे त्यांचा स्वतंत्र लेखन करण्याचा सूक्ष्म कंटाळा. दोन्हीबाबत बोलून थकलो आहोत पण अजून ते बधलेले नाहीत. वर्षभरापूर्वी एका गंभीर आजारातून उठलेल्या मामांनी प्रकृतीची अधिक काळजी घ्यावी आणि आवडीच्या विषयांवर विपुल लेखन करावे या भावना सर्वांतर्फे मी पुन्हा एकदा त्यांच्यापर्यंत पोचवू इच्छितो. सरस्वती प्रसन्न आहे, आशयाची वानवा नाही आणि वाचनास उत्सुक वाचकवर्ग असूनही त्यांचे सकस स्वतंत्र लिखाण उंबराच्या फुलाप्रमाणे दुर्मिळ असते ही बाब मला कधी कधी हताश करते. प्रकृतीबद्दल एक अत्यंत स्वार्थी कारण असेही आहे की मी सध्या योजल्याप्रमाणे साताठ वर्षांनी कायमचे म्हणून घरी परतेन तेव्हा आणखीन एका मित्राच्या साथीने आम्हा तिघांना अनिर्बंध हिंडण्यासाठी- गप्पागोष्टींसाठी त्यांनी तंदुरुस्त असावे ही सदिच्छा आहे.
मामांनी असेच सदैव हसते खेळते असावे आणि आपल्या सहवासातील शीतलता प्रत्येकाला भरभरून द्यावी हे मागणे फारसे आवजवी नाहीच....त्यामुळे परमेश्वर, दैवी शक्ती जे काही असेल ते ती सहज मान्य करेल यात शंका नाही, नाही का? आणि मामांसाठी तर मी परमेश्वरावर विश्वास ठेवायलाही तयार आहे. कुसुमाग्रजांनी त्यांच्या एका कवितेत पाठीवर निर्मळ आशीर्वाद देतील असे समर्थ हात न उरल्याची खंत व्यक्त केलीय पण माझ्यासाठी मामांच्या रुपात मैत्रीचे, समुपदेशकाचे, ज्येष्ठाचे, नात्यातील ओलाव्याचे आणि एका आधारवडाचे हात नेहेमी पुढे असतील या भावनेची सोबत सदैव असणार आहे. त्यामुळेच त्यांच्याशी असलेले नाते चिरकाळ टिकणारे आहे, टिकणार आहे.
'स्कार्लेट ओ हाराची' जिगीषा
'अल्थीयाची' असण्याची गरज
झिवॅगोच्या मनातील कापरे द्वंद्व
बालपणीच्या 'कैर्या' आणि 'तुतींचा' आंबटगोड स्वाद
संगीताच्या शुद्ध स्वरातील आरोहाप्रमाणे
आयुष्यभर भिनत राहील अंगात
आणि मी
घराच्या दिशेकडून येणार्या झुळूकेप्रमाणे
तुझी आठवण जागवत बसेन
मनःपटलावर 'शाश्वताच्या रंगांचा'
अमीट खेळ पाहताना....
-- अमेय
(No subject)
वाह, फारच छान, अशा
वाह, फारच छान, अशा व्यक्तिमत्वांचा निकटचा सहवास लाभणे म्हणजे भाग्यच
छान लेख
छान लेख
छान लिहिलय! इतिहासाचे लेखन या
छान लिहिलय! इतिहासाचे लेखन या समान दुव्यावरुन झालेली ओळख आमची.
भेटही आत्तापर्यंत एकदाच पण ॠणानूबंध जुने असल्यासारखे वाटतात.
मामा, तुमची भाची वापरतेय बरं का तूमची भेटवस्तू.
अशोकमामा आपले मायबोलीकर
अशोकमामा आपले मायबोलीकर अशोकमामा. छान व्यक्तीमत्व चित्रण. अशी सदाहरीत व्यक्तीमत्व फार कमी आढळतात.:स्मित:
पण सध्या मामा कुठ दिसना झाले.:अरेरे:
अमेय तुमच्यात आणि आमच्यात एक
अमेय तुमच्यात आणि आमच्यात एक जबरदस्त काहितरी कॉमन पॉईंत आहे फक्त कमी जास्त प्रमाणात (म्हणजे आम्च्यात कमी). जेंव्हा हे लेख यायला सुरवात झाली तेंव्हा मला वाटायचे कि मामांवर लिहल गेल पाहिजे, लिहणारा थकुन जाइल तरी पण थोडेफार उरेलच.
बाकि भारीच. अमेयने ज्या ज्या गोष्टींना फक्त स्पर्श केलाय त्या त्या विषयावर एक एक निबंध होउ शकेल.
अरे क्या बात है अमेया - एकदम
अरे क्या बात है अमेया - एकदम जमलंय लिखाण ....
"मामा" म्हणजे एकमेवाद्वितीयम ...
एवढे बहुआयामी व्यक्तिमत्व असूनही कोणालाही एका भेटीतच आपलंस करुन टाकतात ....
खुप छान लेख...
खुप छान लेख...
अजून वाचला नाही लेख पण भारी
अजून वाचला नाही लेख पण भारी असणार नक्की
वाह सुंदरच लेख ! अशोकमामा
वाह सुंदरच लेख !
अशोकमामा म्हणजे आंतरजालावरचे चौफेर ज्ञान असलेले आणि ते तितक्याच ताकदीने मांडणारे आदरणीय व्यक्तीमत्व... त्याला साजेसाच लेख झालाय.
"व्यक्तिचित्रणाशी" सहमत आहे
"व्यक्तिचित्रणाशी" सहमत आहे
लिहणारा थकुन जाइल तरी पण
लिहणारा थकुन जाइल तरी पण थोडेफार उरेलच.
बाकि भारीच. अमेयने ज्या ज्या गोष्टींना फक्त स्पर्श केलाय त्या त्या विषयावर एक एक निबंध होउ शकेल.>>+100
मामा आहेतच एखाद्या चुंबकासारखे, प्रत्येकाला जवळचे वाटावे असे. अगदी न भेटता सुद्धा ते आपल्याला अगदी जवळच्या नात्यात बांधून टाकतात.
मस्तच लेख! अशोकमामा म्हणजे
मस्तच लेख!
अशोकमामा म्हणजे आंतरजालावरचे चौफेर ज्ञान असलेले आणि ते तितक्याच ताकदीने मांडणारे आदरणीय व्यक्तीमत्व... त्याला साजेसाच लेख झालाय.>> +१
खूप छान लेख!
खूप छान लेख!
मा. संयोजक, शुद्धलेखनाच्या
मा. संयोजक,
शुद्धलेखनाच्या दोन चुका दुरुस्त केल्या आहेत.
अमेयराव सुरेख लिहिलेत
अमेयराव सुरेख लिहिलेत
तुम्हाला अशोकरावांना भेटण्याचे भाग्य अनेकदा लाभले आहे. माझे तसे नाही. त्यामुळे जे काही क्षण पदरात पडलेत त्यावर यानिमित्ताने लिहावेसे वाटते.
अशोकरावांची आणि माझी भेट एकदाच झालिय. फोनवर अनेकदा बोललो आहोत. मेलने संवाद झालाय. कुठल्याही विषयावर चालाता बोलता विश्वकोश वाटाला अशी प्रचंड माहिती अशोकरावांकडे आहे. आणि ती रंगवुन सांगण्याची कला देखिल. चित्रपट, संगीत, जीए. हे आमच्या संवादाचे समान विषय. अशोकराव सर्वांना व्यापुन पुन्हा दशांगुळे उरतातच. त्यामुळे आपली बडबड थांबवुन अशोकराव आता कुठला खजिना उघडुन दाखवणार आहेत याकडे लक्ष द्यावेसे वाटते. जीए आणि त्यांच्या तर अनेकदा प्रत्यक्ष भेटी झालेल्या आहेत. त्यासाठी माझे अशोकरावांना एक साष्टांग लोटांगण असतेच. नाहीतरी आपल्याकडे तीर्थक्षेत्री जाऊन आलेल्याला पाया पडण्याची पद्धत आहेच. पण अशोकरावांची जीएं वरील भक्ती डोळस आहे. त्यांच्याबद्दल लिहिताना अशोकरावांची लेखणी खुलते याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जीएंच्या आयुष्यातील काही खाजगी तपशील त्यांनी अशोकरावांना सांगीतले होते इतके हे संबंध जवळचे झाले होते. ही पार्श्वभुमी अशोकराव जेव्हा जीएं बद्दल बोलतात त्यामागे असते. मात्र तुम्ही त्यांना कितीही उद्युक्त केलंत तरी ते तपशील सांगणार नाहीत. जीएं चं खासगीपण ते गेल्यावरही अशा तर्हेने अशोकरावांनी सांभाळलं आहे.
उत्कट आणि भव्य जे जे आहे ते अशोकराव घेतातच. मात्र मिळमिळीत अवघे तत्काळ टाकुन देण्याची कला मात्र त्यांच्याकडुन आवर्जुन शिकुन घेण्यासारखी आहे. आपले म्हटले गेलेल्या कडुन विश्वासघात होतो. पण अशोकराव ते सारं मागे टाकुन पुन्हा त्याच सुहास्य वदनाने बोलायला, लिहायला तयार. त्यामुळेच बहुधा ते अजातशत्रु आहेत. छोट्याशा अपमानाने आमच्यासारख्यांच्या मनात विस्तव पेटत राहतो. पण ते विसरुन पुन्हा प्रफुल्लित होण्याचा गुण अशोकरावांकडून मला तरी घेण्यासारखाच आहे. जालावर एकमेकांना पाण्यात पाहणारी अनेक माणसे आहेत. पण अशोकराव सर्वांचे समान मित्र असतात. त्यांचे नाव निघाले कि शस्त्रे म्यानात जातात.
त्यांना सर्वप्रथम फोन केला होता तो प्रसंग कधी विसरता येणार नाही. एखादा अतिशय धीरगंभीर आवाज पलिकडुन येणार या अपेक्षेने मी बसलो होतो, आणि पलिकडुन अत्यंत आनंदाने हसुन केलेल्या स्वागताचा ध्वनी आला आणि जणु आमच्या वयातील अंतरच मिटुन गेले. अशोकराव त्यांच्या प्रचंड व्यासंगाचा दुसर्यांवर जरादेखिल दबाव येऊ देत नाही हेच खरे. त्यानंतर अनेकदा बोलणे झाले. माझ्या लिखाणाचे त्यांनी वारेमाप कौतुक केले. कधीही हात आखडता घेतला नाही. अशावेळी अशोकराव ज्यांना आपले म्हटले त्यांच्या दोषांकडे दुर्लक्ष करुन त्यांना खुप झुकते माप देतात हे जाणवते. अशोकरावांनी माझ्या लिखाणातील दोषांकडे दुर्लक्ष करण्याचा तर मला अनेकदा अनुभव आला आहे.
त्यांना आणखि एक खोड आहे. त्यांना एखादा माणुस आवडला कि त्यांना त्याची गाठ आपल्या मित्रांशी घालुन दिल्याशिवाय चैनच पडत नाही. शोभनाताईंशी माझी भेट त्यांच्यामुळेच झाली. आणि त्याचा मला प्रचंड फायदा झाला. अशी अनेकांची आयुष्ये त्यांनी श्रीमंत केली असणार.
अशोकराव जालावर वाद घालत नाहीत. प्रत्यक्षातदेखिल ते आपले म्हणणे पटवण्याचा थोडासा प्रयत्न करतात. त्यानंतर ते पुढे सरकतात. नसते वाद त्यांना मानवत नाहीत. त्यातुन त्यांची बोलताना आणि लिहिताना भाषा अत्यंत सुसंस्कृत असते. त्याला दुसर्यांच्या मनाला वेदना होतील अशी ओरबाडणारी धार कधीही नसते. त्यामुळे ते धकाधकीत पडत नाहीत. अर्थात जर त्यांनी पडायचं ठरवलं असतं तर तोही फड जिंकला असता याची खात्री आहे. कारण त्याबाबतीत ते कुठल्याही विषयात तयार असतात. ते संदर्भ तपासुन माहिती देतात त्यामुळे त्यांच्यासमोर गलथानपणा चालणार नसतो. आमच्यासारखे केव्हातरी त्यांना खिजवुन चिडवण्याचा चावटपणा करुन पाहतात पण उपयोग होत नाही.
अशोकराव काही बाबतीत मात्र अतिशय हळवे आहेत. दिलिपकुमार, मधुबालाचा उल्लेख अमेयरावांनी केलाच आहे. इन्ग्रिड बर्गमन, ऑड्री हेपबर्न ही त्यातच. पण हे तर कलाकार झाले. अशोकराव अतिशय हळवे आहेत ते त्यांच्या भाचे भाच्यांबद्दल. फोनवर त्यांच्याबद्दल जर अशोकरावांनी बोलायला सुरुवात केली कि यांना थांबवुन आपल्याला हवा तो विषय सुरु करावा लागतो. कोपुकर्सचा धागा आणि त्यातल्या त्यांच्या भाच्या आणि भाचे हा अशोकरावांच्या आयुष्यातला आनंदाचा ठेवा आहे. अशोकरावांच्या ही मंडळी रक्ताच्या नातलगांइतकीच जवळची आहेत. त्यातल्या कुणीही अशोकरावांची प्रेमाने थट्टा करावी. अशोकराव खुलतात. कोपुकर्स धागा कायम वाहात असतो. मात्र त्या वाहत्या धाग्यात अशोकरावांचा स्नेह प्रामुख्याने काम करत असतो असं मला आवर्जुन म्हणावसं वाटतं.
मध्यंतरी ते गंभीर दुखण्यातुन बाहेर आले. काळजी वाटत होती. पण मधुबालाबद्दल पुर्वीच्याच जोषाने बोलताना पाहुन काळजी मिटली. अशोकराव पुन्हा कार्यरत झाले. अशोकरावांचा स्नेह आमच्यासारख्यांची आयुष्ये सतत टवटवीत ठेवत असतो. त्यांना बरे वाटल्यामुळे आम्हालाच उभारी आल्यासारखे वाटु लागले. अशा चैतन्याच्या झर्याबद्दल अमेयराव तुम्ही सुरेख शब्दात लिहिलेत याबद्दल तुमचे अनेकानेक आभार.
अमेयदा... तुझ्या प्रतिभेला
अमेयदा... तुझ्या प्रतिभेला सलाम! अफाट लिहिलं आहेस मामांबद्द्ल.
अर्थात हे व्यक्तिमत्वही आहेच तसं चतुरस्त्र! मामांना प्रथम गटगला भेटले तेव्हाच हे जाणवलं. नंतर दक्षीच्या घरी जमलो तेव्हा ही, कुठलाही विषय असु दे...मामांचं बोलणं समरसुन ऐकत बसलो होतो आम्ही.
अतुलदाची पोस्ट अतिशय सुंदर!
अमेय माझ्यासाठि प्रथम
अमेय माझ्यासाठि प्रथम क्रमांकाचा लेख.तुम्ही आणि अतुलनि माझ्याच भावना लिहिल्या असे वाटले.अनेकाना असेच वाटले असेल. मला इतक्या छान शब्दात लिहिता आले नसते.
अमेय, मामांना शब्दबद्ध करणं
अमेय, मामांना शब्दबद्ध करणं खरं म्हणजे खूप कठीण काम पण तू हे 'शिवधनुष्य' बऱ्याच प्रमाणात पेललंस.
मामा काय बोलू, तुम्ही मला आपली मानता, भाचीचा मान देता, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ग्रेट, ग्रेट, ग्रेट आहात तुम्ही. माझे भाग्य असे मामा मला मिळाले.
न वठलेले सदाहरित झाड, अगदी योग्य वर्णन.
अमेय शेवटची कविता पण खूप सुंदर. धन्यवाद अमेय तुला.
सर्व लिहून अजूनही उरतात ते मामा. अमेयने ज्या ज्या गोष्टींना फक्त स्पर्श केलाय त्या त्या विषयावर एक एक निबंध होउ शकेल. अनुमोदन निपा.
मामा _____/\_____.
अतुलजी तुमचा प्रतिसाद सुरेख.
अतुलजी तुमचा प्रतिसाद सुरेख. मामांबद्दल खूप छान लिहिलंत.
माझी आणि अशोकमामांची ओळख
माझी आणि अशोकमामांची ओळख प्रथम होणार सून मी या घरची या मालिकेच्या धाग्यावर झाली. प्रतिसादातुन मामा भेटत गेले आणि मल्टीस्पाईस कोल्हापुरी गटगचा वृत्तांत वाचण्याकरता मी कोल्हापुरच्या धाग्याची सदस्य झाले. तेव्हा भेटला सगळ्या भाच्यांचा लाडका अशोकमामा
सुरुवातीला एक दोन वाक्यांचे प्रतिसाद देणारी मी मामांच्या प्रोत्साहनाने अगदी भरभरुन किंबहुना भडभडुन बोलायला लागले.
मागे एकदा कोपुच्या धाग्यावरही लिहील होत आणि जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा हेच लिहीन की मामांमध्ये एक पॉझिटीव्हीटी ठासुन भरलेली आहे... एखाद्याच्या छोट्याश्या म्हणजे अगदी किरकोळ गोष्टीच कौतुक सुद्धा मामा अगदी भरभरुन करतात. He always makes everyone feel that "Yes I am someone special" माझ्या स्वानुभवावरुन सांगते की कॉन्फीडंस पूर्णपणे घालवुन बसलेल्या माणसाला आयुष्यात परत उभ रहायच असेल तर त्याने एकदाच मामांना नक्की भेटाव. नाही त्या माणसाचा कॉन्फीडंस परत मिळाला तर सांगाव... अमेयदाने मामांना किमयागार म्हटलय ते अगदी १००% खर आहे.... नाहीतुन आहेची किंमया करणारा आहे हा कीमयागार
अशा या करवीरनिवासी अशोकमामा पाटील नावाच्या किमयागाराला माझा नमस्कार
वा वा अमेय , तू लिहिणार आणि
वा वा अमेय , तू लिहिणार आणि वर्ण्यविषय अशोक म्हणजे आमच्यासारख्या तुम्हा दोघांच्याही चाहत्यांसाठी पर्वणीच. अगदी रंगून गेलेल्या मैफिलीसारखा लेख, शोभनाताई म्हणतात तसं माझ्याही दृष्टीने नंबर एक ( अशोक यांची आवडती फ्रेज
)
लेखाच्या शेवटची सुंदर कविता ..एखादी मैत्री अशा कवितेची प्रेरणा ठरणे कवीसाठी हे त्या मैत्रीची खोली किती अथांग आहे याचा निर्देशांकच असते..
अशोक यांच्या निर्मळ , चतुरस्त्र , सुसंस्कृत व्यक्तिमत्वामुळे त्यांचा मित्रपरिवार त्यांच्या किती लोभात आहे हे मायबोलीवर आपण नेहमीच पहातो.त्या मित्रपरिवारात माझाही समावेश असावा हा माझा भाग्ययोग !
उत्तम साहित्य, सिनेमा ,संगीत आणि अगदी सुंदर आठवणी हा जगण्याचा एक मोठा ठेवा आहे,यांचा आस्वाद एकट्याने घ्यायचा नसतो तर सर्वांसोबत घेऊन तो आनंद शतगुणित करायचा असतो हे त्यांचं तत्त्व ते सहजपणे , अनाग्रहीपणे अंमलात आणत असतात. स्वत:बरोबरच इतर कुणाकुणाचं दु:ख हलकं करायचीही ती एक प्रभावी रेसिपी आहे ! त्यांच्या प्रकृतीत जोरदार सुधारणा होऊन त्यांची आनंदयात्रा अशीच निरामयतेने चालू राहो..
या अप्रतिम लेखासाठी अमेय , पुन: एकदा तुझे आभार आणि खूप शुभेच्छा .
ओहो, हे माबोवरच्या "अशोक"
ओहो, हे माबोवरच्या "अशोक" यांच्याबद्दल आहे हे नव्याने आलेल्या प्रतिसादांवरून कळाले. भारीच, त्यांच्या लिखाणाचा जोरदार पंखा हूँ !
मस्तच लिहलायं लेख
मस्तच लिहलायं लेख
"कामाच्या धकाधकीत, अनेक
"कामाच्या धकाधकीत, अनेक कर्तव्यांचा हिशेब नेकीने चुकवण्याच्या नादात जे काही करायचे राहून-विसरून गेले होते ते आता मुक्तपणाने करणारे मामा पाहिले की शाळा सुटल्यावर घरी येऊन, कपडे-दप्तर भिरकावून खेळायला धावणार्या मुलाचीच आठवण व्हावी".>>>> हे फार आवडले!!
सुंदर लेख!
वा ! एका प्रतिभावंत, आदरणीय
वा ! एका प्रतिभावंत, आदरणीय व्यक्तिमत्वाची यथार्थ ओळख !!
तुमच्या लेखणीतुन, उचित शब्दांची योग्य जागी मांडणी केल्याममुळे लेखाची उंची खूप वाढली आहे.
वा ! एका प्रतिभावंत, आदरणीय
वा ! एका प्रतिभावंत, आदरणीय व्यक्तिमत्वाची यथार्थ ओळख !!
तुमच्या लेखणीतुन, उचित शब्दांची योग्य जागी मांडणी केल्याममुळे लेखाची उंची खूप वाढली आहे.
प्रथम मामानां
प्रथम मामानां -----------------^--------------
या अप्रतिम लेखासाठी अमेय तुझे आभार आणि खूप शुभेच्छा...
आम्हि काय जास्त लिहु शकत नाहि...तुझ्यासारखे..
मुक्तपणाने करणारे मामा पाहिले की शाळा सुटल्यावर घरी येऊन, कपडे-दप्तर भिरकावून खेळायला धावणार्या मुलाचीच आठवण व्हावी">> हे खरच आहे....
मुक्तपणाने करणारे मामा पाहिले
मुक्तपणाने करणारे मामा पाहिले की शाळा सुटल्यावर घरी येऊन, कपडे-दप्तर भिरकावून खेळायला धावणार्या मुलाचीच आठवण व्हावी">>>> कालच्या प्रतिसादात लिहायला विसरले होते. हे वाक्य वाचल्यावर आम्ही कोल्हापुरी धाग्यावर मला "मुग्धटलेलेलेलेलेलेलेले" अशी हाक मारणारे मामा आठवले
लेख आवडल्याचे वर लिहीलेच आहे
लेख आवडल्याचे वर लिहीलेच आहे सगल्यांचे प्रतिसाद अप्रतिम! माबोलीच्या वावरातून त्यांच्याबद्दल आदर होताच तो आता द्विगुणित झाला.
Pages