२०१०चे दिवाळी अंक

Submitted by चिनूक्स on 27 October, 2010 - 07:59

या वर्षीच्या, म्हणजे २०१०च्या, दिवाळी अंकांविषयी...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मटाचा दिवाळी अंक आवडला नाही फारसा! तेजस्विनीची मुलाखत बरी आहे!
प्रिमिअरच्या दिवाळी अंकातला मेकिंग ऑफ सांगत्ये ऐका मस्त आहे!

अनुभव - युनिक फ़ीचर्स प्रकाशनाचा यंदाचा दहावा दिवाळी अंक. निळू दामले यांचा ’थोडक्यात काय तर दु:खलोलुपता जिंदाबाद!’ हा लेख संपादकांच्याच शब्दात सांगायचे तर विचारांना व प्रतिक्रियांनाही प्रवृत्त करणारा. ’माझा शिवबादादा’ हे अनिल अवचट यांचे ललितलेखन वाचतानाच शीर्षकापासूनच ,मायबोली आणि इतरत्र वाचलेली तलवार उपसल्याच्या थाटात फ़ेकलेली वाक्य कानात घुमु लागली. "आम्ही वारसा सांगतो शिवाजीचा आणि त्याच्याकडून काहीच शिकत नाही, याला कय म्हणावे?" कात्रीतलं बेळगाव हा मनोहर सोनवणे यांचा रिपोर्ताज पसरट वाटला. त्यातही शेवटी निष्कर्ष हाच की सामान्य माणसाला रोजच्या जगण्याचे प्रश्नच महत्त्वाचे वाटतात. "कोकण विकासाचे गाडे चालले कुणीकडे" हा शैलेश माळोदे यांचा रिपोर्ताज वाचनीय आणि मननीय. नागझिर्‍याच्या जंगलात घुबडांच्या शोधात आणि अर्जुन लिंगाची गोष्ट, इंटलेक्ट कास्तकार संपन्न फ़ार्मर हे वेगळ्या वाटेवरचे लेख वाचनीय. एकंदर अंक संग्राह्य.

'अनुभव'चं संपादकिय अतिशय वाचनीय आहे. यंदा या अंकाचं दहावं वर्षं. त्यानिमित्तानं वेगळी वाट चोखाळताना जास्तीत जास्त वाचकांपर्यंत हा अंक कसा पोहोचला, हे वाचण्यासारखं आहे. 'वेगळा अंक काढायच्या नादात आपलीच पाठ थोपटून घेत फक्त शेपाचशे वाचकांपर्यंत आमचा अंक मर्यादित ठेवायचा नव्हता', हे अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. आपली अभिरुची तेवढी उच्च, व इतर अंक कस्पटासमान असं धरून निघणार्‍या अंकांनी 'अनुभव'कडून जरूर बोध घ्यावा.
या अंकातल्या तिन्ही कथा मस्त आहेत. शिवाय बेळगाव, प्रयोगशील शेतकरी यांच्यावरचे लेख, सुभाष अवचट यांचा लेखही वाचनीय आहे. मुखपृष्ठ अतिशय देखणं आहे.

माहेर चा अंक मस्त आहे. कादंबरी चक्क सिंगल पेरेंट्स वर आहे पण छान आहे. अजूनही नायिका हलक्या रंगाच्या सिल्कच्या साड्या नेसतात पण ते चालते.

धनुर्धारी व शतायुषी वाचले छान आहे. शतायुषी परिवारा तरफे इमेल द्वारा संपर्क करून सल्ला विचारण्याची सोय आहे ती आपल्या माबोकरांना फार उपयोगी पडेल.

धन्यवाद. मी हे पान वाचत आहे. दरवेळी मीच हे पान उघडतो. यावेळी ते काम चिन्मयनी केले. छान झाले.च्झाले. छान माहिती मिळते आहे. अजून लिहा. ललिल, अक्षर बद्दल लिहा.

अक्षर मधला अजय अतुलवरचा लेख भारी आहे. त्यांच्या सर्व बाजूंना, अपेक्षांना, क्षमतांना न्याय देणारा.

ॠतुरन्ग छान आहे. पुरुष स्पन्दन ची जाहिरात फार पण प्रत्यक्षात सो सो. अक्षर, मौज, दीपावली नेहमीप्रमाणे बरेचसे वाचनीय.

मामी, माहेर मधली कादंबरी वाचली. सुरुवात छान होती खरतर.. पण नंतर फारच फिल्मी होत गेली असं वाटलं.
मध्यातून पुढे खूप प्रेडीक्टेबल पण होत जाते.
अंक हातात पडल्यावर उज्वल निकमांची मुलाखत सगळ्यात आधी वाचली पण जरा निराशाच झाली. म्हणजे वाचून समाधान झाल्यासारखं वाटलं नाही. अजून हवं होतं असं वाटत राहिलं. शिवाय ह्या लेखाचं शब्दांकन जरा गंडलेलं वाटलं.
"त्या आमच्या गप्पांमध्ये जॉईन झाल्या." अशी वाक्य तर फार खटकली.
बांदेकर भावजींवरचा लेख सुधीर गाडगीळांनी लिहिलेला आहे आणि तरीही फारच बोर आहे. तेच तेच परत परत सांगत रहातात. गाडगीळांचा फॉर्म हरवत चालला आहे एकूणात..
बाकीचा अंक वाचायचाय अजून..

भरत, चिनूक्स,
"नागझिर्‍याच्या जंगलात घुबडांच्या शोधात" या लेखाबद्दल जास्त माहीती सांगणार का प्लिज? कोणाचा आहे?

नागझिर्‍याच्या जंगलात घुबडांच्या शोधात हा लेख किरण पुरंदरे यांनी लिहिला आहे. ''एरवी अपशकुनी मानल्या जाणार्‍या पण शेतशिवारांचा राखणदार या नात्याने माणसासाठी आणि एकूणच परिसंस्थेसाठी उपयुक्त असणार्‍या घुबडांचा अभ्यास एका पक्षीवेड्याने नागझिर्‍याच्या जंगलात तळ ठोकून केला. कसा : तो त्यांच्याच शब्दांत"

'अक्षर' चा दिवाळी अंक वाचते आहे. (मॅजेस्टिकच्या संचातला एक)
इंग्रजीतून लिखाण करणारे भारतीय लेखक आणि देशी भाषांमधून लेखन करणारे लेखक यांच्याबद्दल तुलनात्मक विचार मांडणारा महेश एलकुंचवार यांचा लेख चुकवू नये असा आहे.
नक्षलवादावर एक विशेष विभाग आहे. तो चांगला आहे.
अजय-अतुलवरचा लेखही चांगला आहे.
'तीव्र कोमल' ही (काहीशी विडंबनात्मक) कथा छान आहे.
पंकज कुरुलकरांची दीर्घकथा बरी आहे. (विषय चांगला आहे पण दीर्घ करण्याच्या नादात जरा कंटाळवाणी वाटते काही ठिकाणी.)

मामी, माहेर मधली कादंबरी वाचली. सुरुवात छान होती खरतर.. पण नंतर फारच फिल्मी होत गेली असं वाटलं. मध्यातून पुढे खूप प्रेडीक्टेबल पण होत जाते.>> अगदी तेच तर. तसा एक इंग्रजी सिनेमा आला होता मुले आई बाबांना एकत्र आणतात. एक नोटीस केले का बरेच वर्णन अन्नपदार्थांचेच होते. मुलांच्या मानसिकते वर कमी भाष्य. एक तर तो सिंगल ती सिंगल मग शेवट तुम्ही म्हणता तसा प्रेडिक्टेबल असाच. काही ट्विस्ट नाही. व त्या बाईला ते हीरो चे फोन येतात तर डिलीट करावे का लागतात? फालतू काँप्लेक्स असेच वाट्ले.

अक्षर मधला अजय अतुलवरचा लेख मायबोलीकर प्रदीप वैद्य (झाडांच्या कविता लिहिणारे) यांनी लिहिला आहे.
कालनिर्णय मधे शिरीष कणेकर यांच्या 'गाए चला जा' या आगामी कार्यक्रमाची संहिता छापली आहे. त्यातला एक परिच्छेद सेम टु सेम लोकप्रभा मधल्या लता की आशा (त्यांचेच) मधला. यात मी यापूर्वी न वाचलेले काही मिळाले. पण जशी हिंदी चित्रपटगीते जितके वेळा ऐकावीत तितकी कमीच , तसेच कणेकरांचे चित्रपट व चित्रपटगीतांवरचे लेखन वाचावेच.

वीक एंडला अंक मिळाले. यंदा सगळ्या दिवाळी अंकांवर रुपयाचं चिन्ह आहे. भारी वाटलं बघून. आतापर्यंत सगळे फक्त चाळले आहेत. वाचले की लिहीनच Happy

अक्षरमधले बहुतांश लेख वाचनीय. अमेरिकन निवडणूक एक काल्पनिक वास्तव हा वंदना भागवत यांचा अगदी क्रिस्प. साहित्यिकांबद्दलचे सतीश काळसेकर (सुर्वे) एल्कुंचवार, विश्राम गुप्ते (नेमाडे-हिंदू)वासंती फडके (यदि) हे लेख आहेत. सागर परिक्रमा करणार्‍या कमांडर दिलीप दोंदे यांची कहाणी त्यांच्याच शब्दात आहे. या अंकातल्या चारही कथा छान आहेत.

मौजेच्या अंकातील एलकुंचवारांचे 'लुकलुकती दूर दिवे गांवामधले' हे ललित अहाहा आहे. अजिबात कढ नाही आणि तरीही स्मृतीरंजनात्मक.
मोनिका गजेंद्रगडकरांची 'धर्म' ही कथा अगदीच सोसो वाटली. Sad
मधु मंगेश कर्णिकांची कथा 'अर्घ्य' ठिक.
अचला जोशींचे 'माझी सखी -'लिव्हिंग थिंग'- मस्तय
वंदना भागवतांचे 'अमेरिकन सफारी' ही भारी. ''''कित्ती कित्ती बै अमेरिकेतले रस्ते गुळगुळीत, गाड्या बरं का इतक्या सुसाट धावतात.... तर काय मजा झाली''' - असले काही नसलेले अमेरिकेविषयीचे ललित पाहून गहिवरून आले.
अनिल अवचटांचे 'फॉल सीझन आणि सेडोनाचे डोंगर' :-(:-(
शंकर वैद्यांचे लेख आवडले.

मौज आणि दीपावलीत मिळुन शंभरएक कविता असतील. पण छंदबद्ध हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच.

अंकात रोमन मध्ये इंग्रजीतला मजकूर आहे हे पाहून छान वाटले, पण ती इंग्रजी भाषाही Sad . मुद्रितशोधन मराठी आणि इंग्रजी Sad

<अंकात रोमन मध्ये इंग्रजीतला मजकूर आहे हे पाहून छान वाटले>

अंक मराठी आहे ना? मग रोमन लिपी अंकात कशाला? सरळ रोमन लिपीतला इंग्रजी अंक काढावा.

सागर- धन्यवाद आणि अनुमोदन. मिळून सार्‍याजणीचा अंक छान आहे.
एकतर आम्ही मराठी साहित्याची धूरा वाहतो वगैरे नाटकं नसल्यामुळे स्वच्छ प्रामाणिक अंक आहे.
तरूणाईची धडकन हे फीचर उत्तम आहे. सागरने लिहील्याप्रमाणे समिक्षाचे 'मोठ्ठं होताना' फार आवडले.
Confessions of a Practising Patriarchial mind- Labeeb Elbiem - ऑस्सम.

नीरजा यांची 'सूर्य प्यालेली फुलं' ही कथा आवडली. अकलुजकरांची 'प्रिय असीम' कथा नाही आवडली. बाकीच्या वाचते आहे अजून.

फाटकबाईंचे 'माणसाला किती मजा लागते' वाचून अक्षरश : डोळ्यात पाणी आले. तरीही 'ह्सरी किडनी'/'बाप लेकी' न वाचलेल्यांना कितपत संदर्भ लागतील कोण जाणे. फाटकबाईंनेही लेखनातील पुनरावृत्ती थोडीशी टाळायला हवीये. हे म्हणतानाही वाईट वाटते आहे. पण नाईलाज आहे.

सगळ्या लेख लिहीणार्‍यांचे फोटो आहेत तेही छान वाटले एक फॉर्मॅट म्हणुन. (अजून या पद्धतीचा सुळसुळाट इतर अंकात न झाल्यामुळे असेल).
आणि संपादकीयात नारायण सुर्वे निवर्तल्याचा उल्लेख आठवणीने केल्याचे पाहून बरे वाटले. काही मासिकांनी तेवढे सुद्धा नमुद करायचे कष्ट घेतलेले नाहीत.
(जास्त जाहिराती आहेत या अंकात त्या रसभंग करतात. पण ते तरी काय करतील बिचारे. )

या अंकातही रोमन इंग्रजी आहे. ढ्यांट्ढ्यां..

ओजसचा इरोल शर्मिला यांच्या संघर्षावर आधारीत नाट्यानुभवाचा
लेखही वाचनीय.(तरूण मनं तरूण मतं हा तिचा विश्लेषणात्मक
लेखही चांगला) >>>> अनुमोदन.

'दीपावली' अंकातला डॉ. आनंद नाडकर्णींचा लेख चांगला आहे.
निलीमा बोरवणकरांची कादंबरी ठीकठाक आहे... डॉक्युमेंटरी पाहतोय असंच वाटतं वाचताना...
मोनिका गजेंद्रगडकरांची कथाही फारशी आवडली नाही. Sad

अंतर्नाद (संपादक -भानु काळे) हा सख्खे शेजारी (महाराष्ट्र राज्याचे) विशेष.पण शेजारच्या राज्याबद्दल लेखन करताना महाराष्ट्राला फ़टके जास्त असा प्रकार बर्‍याच लेखांत आहे, विशेषत: गुजरातबद्दलच्या लेखांत मोदींच्या आरत्या, पोथ्या, स्तोत्रे आहेत. त्यामुळे हा अंक मराठीचा कैवार घेणार्‍या महाराष्ट्रवादी राजकारणार्‍यांना वाचायची गरज आहे(हे कसं व्हायचं?). दिनकर जोषी यांच्या लेखाचा अनुवाद करणा‍र्‍या अंजनी नरवणे यांनी लेखाचा अनुवाद केला याचा अर्थ लेखातील मतांशी सहमत आहे असे नाही, हे स्पष्ट केले आहे. मराठी साहित्य - पुलंपासून ,गुजराथीत नेणार्‍या अरुणा जाडेजा यांचा लेख आवडला. बकुळ त्रिपाठी यांची तीन स्फ़ुटे छान. एका प्रेताच्या मस्तकाची कथा ही साजिद राशिद यांची (मुंबई लोकल ट्रेन मध्य बॊंब ठेवणार्‍या अतिरेक्याच्या मस्तकाची) हिंदी (उर्दू?) कथा प्रेडिक्टेबल असली तरी ती मूळ उर्दूत लिहिली गेली होती म्हणून विशेष वाटली. ज्ञानपीठ विजेते शिवराम कारंथ हा उमा कुलकर्णी यांचा , बेंगळुरू : एका आभासी राष्ट्राची राजधानी : भूषण निगळे (मुंबई महाराष्ट्राची असे बोंबलणार्‍यांनी नक्की वाचावा असा) आणि मध्यप्रदेशातील खाद्यसंस्कृती - श्रीकांत तारे(मी तिथे ५ १/२ वर्षे राहिलो असल्याने), राजभाषा आणि लोकभाषा (गोव्यावर) सुभाष भेंडे हे लेख आवडले.
अंतर्नाद मासिकाचा हा अंक असल्याने २०-२५ पाने वाचकांच्या विस्तृत प्रतिसासाठी आहेत.

माझ्याकडे घरी विश्रांतीचा 'काष्ठायन' हा दिवाळी अंक येऊन पडला आहे.. ह्या अंकाचे एक वैशिष्ट्य आहे.. दरवर्षी कुठल्यातरी एकाच विषयावर आधारित अंक असतो... दोन वर्षा पूर्वी भांड्यावर आधारित अंक होता... अजून वाचायला घेतला नाहीये.. वाचून झाल्यावर अजून लिहिनच...

'मिसा.'च्या अंकातली अकलूजकरांची 'प्रिय असीम' वाचताना आशा बगेंची एक तशीच्या तशीच गोष्ट आठवली. 'पाऊस' का असंच कायसंसं नाव असलेली. त्या कथा अक्षरशः आयडेंटिकल आहेत. अगदी पावसाच्या संदर्भासकट. नावं बदललेली फक्त.

कदंबचा यंदाचा दहावा दिवाळी अंक. यात कमलेश्वर, महाश्वेता देवी आनि सागर सरहदी यांच्या कथा अनुवदित रूपात आहेत. पोर्ट्रेट गॅलरीत यशवंत जोशी यांचा 'नेहरू आणि सुभाष : द्वंद्व? छे, द्वैत! हा आणि न्यायवैद्यक(फोरेन्सिक) तज्ञ डॉ वसुधा आपटे यांच्यावरचे लेख विशेष वाचनीय. यंदाचा अंक इंटरनेटला वाहिलेला असल्याने या विषयावरचे अनेक लेख आहेत. त्यात डॉ प्रदीप कर्णिक यांचा तंत्रज्ञानाचा वेग, विनायक पंडित यांचा ब्लॉगबद्दलचा(यात नीधप यांच्या ब्लॉगचा उल्लेख मराठीतले फॉलो करावे अशा ब्लॉग्जसंदर्भात आहे), शर्मिला फडके यांचा प्रिंट मिडियाच्या अस्तित्वाच्या लढाईबद्दलचा (यात वाचनाची भूक भागवणारी साइट असा मायबोलीचा उल्लेख आहे),किरण येले यांचा पुस्तकाचे इ-रूप व दिपक घारे यांचा संगणकपूर्व आणि संगणकोत्तर कला हे सगळे माहितीपूर्ण आहेत.
अभिनेता हृषिकेश जोशी यांची कविता या अंकात आहे (मला नाही आवडली).
अंकात जाहिराती खूप कमी आहेत . संपादक स्वतःचा पैसा खर्चून हा अंक काढतात.
(आता कदाचित काढीत होते असे म्हणावे लागेल).
कदंबचा २००८ चा मानसशास्त्राला वाहिलेला आणि २००९ चा संगीताला वाहिलेला हे दोन्ही अंक संग्राह्य आहेत.

मी साधना अंक आणला होता लायब्ररीतुन, पण खास नाही वाटला. गेल्या वेळच्या अंकात महाराष्ट्राच्या अंतर्भागातुन फिरवुन आणलेले असा उल्लेख करत यावेळी बिहारच्या अंतर्भागातुन फिरवुन आणले. बिहारबद्दल काही मराठी पक्षांनी करुन दिलेल्या समजुतींपेक्षा बिहार खुपच वेगळा, फॉरवर्ड आहे हेच पानोपानी ठसवुन सांगितले जातेय असे वाटले. अर्धा अंक यानेच भरलेला. इतर लेखही ठिकठाक.

Pages