चित्रपटांची सौंदर्य-कला समिक्षा (फायनर पॉइन्ट्स)

Submitted by शर्मिला फडके on 10 February, 2010 - 22:23

इश्कियांचं शूटिंग वाई पाचगणी भागात झालय हे वाचलेलं असल्याने मला खेड्याचा महाराष्ट्रीय लूक आहे हे लक्षात आलं होतं. पण फिल्म इन टोटॅलिटी आवडल्याने, किंवा तशा कोनातून विचारच न केल्याने ते खटकलं नाही. पण त्या क्षेत्रांशी संबंधीत असल्यांना खरोखरच खटकलं आणि तो महत्वाचा मुद्दा आहे हे माझ्याही लक्षात आलं. खूपदा काही फायनर पॉइन्ट्स त्या क्षेत्राशी संबंधित नसल्याने सामान्य प्रेक्षकांच्या नजरेत खरंच येत नाहीत.
'चित्रपट का आवडला' हे लिहिताना जरी ते तितकसं महत्वाचं नसलं तरी चित्रपट रसग्रहण हे एक शास्त्र आहे आणि त्यात या सर्व गोष्टींचा खरोखरच बारकाईने विचार व्हायला हवा. हे रसग्रहण कसं केलं जावं हेही शिकावं लागतं.
बरेचदा असं होतं की छोट्या छोट्या प्रसंगांमधे विसंगती असते पण चित्रपट आवडल्याने ती नजरेआड केली जाते नाहीतर फिल्ममधे हे चालणारच असं गृहित धरलं जातं. काहीवेळा उलट होतं. चित्रपट आवडलेलाच नसला किंवा पडला की त्यात खरोखरच काही अप्रतिम दिग्दर्शकाची, कलादिग्दर्शकाची, कॉश्च्युम डिझायनरची मेहनत असते ती लक्षात न घेतली गेल्याने वाया जाते. कला-सौंदर्य आणि इतर बाबतीत बारकाईने विचार केलेल्या दिग्दर्शकांना त्यांचे ड्यूज मिळायलाच हवेत. सामान्य प्रेक्षकांना ते पटकन उमगत नसतील तर चित्रपटाच्या शास्त्रोत्क रसग्रहणातून ते त्यांच्यापर्यंत पोचवायला हवेत. पण समिक्षा लिहिताना कोणीच ह्याची काळजी घेत नाही. नव्हे समिक्षकांनाही ते उमगलेले असतेच असे नाही.

मंथनमधे स्मिता पाटीलच्या पायांच्या टाचा भेगाळलेल्या दाखविण्यासाठी बेनेगल आणि स्वतः स्मितानेही खूप मेहनत घेतली होती. लोकेशनवर अक्षरशः तापलेल्या मातीच्या जमिनीवर स्मिता कित्येक दिवस अनवाणी चालत होती तसा लूक येण्यासाठी.

उत्सव मधला पिवळ्या रंगाचा वापर, नैसर्गिक रंगांचा वापर, किंवा त्याकाळातले गणिकांचे दागिने आणि गृहिणींचे दागिने यातला बारकाईचा फरक (जो भन्सालींच्या देवदासमधे अजिबात केलेला नव्हता) वगैरे टिपलं गेलं की चित्रपटाच्या रसग्रहणात मोलाची भर पडते.
लगानच्या वेशभुषेबद्दल बोलताना भानू अथैयाजींनी किती बारकाईने विचार केला होता! लगान चित्रपटाचा जो काळ सुरुवातीला आमिर खान आणि आशुतोष गोवारीकरांनी निवडला होता त्या काळाला अनुसरुन भानू अथैयाजींनी वेशभुषेचा टोन मळकट आणि गडद निवडला होता. आमिर खानला तो खटकला आणि त्याने रंग जास्त ब्राईट वापरायला सुचवले. भानूजींनी नकार दिला. त्या म्हणाल्या तुम्ही चित्रपटाचा काळ दहा वर्षांनी पुढे केलात तर तुम्हाला हवी ती शेड मला देता येईल. आमिर-आशुतोषला त्यांचे म्हणणे मान्य करावेच लागले. थोड्या वर्षांच्या फरकानेही फॅब्रिकच्या पोतामधे, रंगामधे कधी कधी फरक पडू शकतो. अर्थातच हे सामान्य प्रेक्षकांना कळण्यातले नसेलही पण तरी अत्यंत महत्वाचे आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलाखतीचं ध्वनिमुद्रण आणि ध्वनिचित्रमुद्रण केलं आहे. एकतर व्हिडिओ मायबोलीवर येईल, किंवा मुलाखतीचं भाषांतर करून प्रसिद्ध करेन. उमेशशी आणि सुनीलसरांशी तसं बोलणं झालं आहे. काल दोन तास मुलाखत झाली, तरी योजलेल्या प्रश्नांपैकी जेमतेम एक-चतुर्थांश प्रश्न विचारता आले. कासारवल्लींची 'अवशेष' ही डिप्लोना फिल्मही दाखवली.

मला वाटे की मलाच गोष्टी खटकतात आणि मी विचित्र आहे की काय.

अगदी अलिकडची उदाहरणं द्यायचीच झाली तर 'बालगंधर्व' आणि 'अजिंठा'.

चकचकीत करण्याच्या नादात बालगंधर्वमधल्या साड्या आणि दागिने मराठीपण हरवून बसल्या आहेत. तो काळ समोर उभा राहात तर नाहीच, उलट तेव्हा किती भव्य दिव्य होतं असं वाटत राहातं. आतादेखील पारंपारिक साड्यांना जरदोसी, कुंदनवर्क केलेलं बर्‍याचजणींना आवडत नाही. अवजड दागिने घालण्यापेक्षा टुकीनं सगळं चालवणं ही तेव्हाची (आणि आता परवडत नाहीत म्हणून) आजचीही मानसिकता आहे. त्या गाडगीळ की पेठेंची जाहिरात करण्यापेक्षा बेगड लावलेले दागिने घातले असते तरी एक वेळ पटलं असतं.

तेच पुन्हा अजिंठा मध्ये. रानात राहणार्‍या आदिवासींचे चकाचक सिल्क्/ उत्तम प्रतीच्या कॉटनचे पॅचवर्क केलेल्या आणि शॉर्ट्सएवढ्या लांबीचा कासोटा घातलेल्या बायका(तो कासोटाही नीट शिवून काठांची सिमिट्री व्गैरे साधलेला असा), जवळजवळ अर्ध्या साडीचा पदर वार्‍यावर सोडलेला असा कपडेपट. आदिवासी न वाटणारे दागिने आणि त्या काळात गोर्‍या साहेबाला भेट म्हणून दिलेला कॉलीफ्लॉवर या सगळ्या गोष्टी निश्चितच पटत नाहीत.

लक्षात नाही कुठे, पण नीधपचा श्वासच्या कॉश्चुमडिझाईनसंबंधित लेख वाचला होता. लोक इतका विचार करून कपडेपट बनवतात आणि वापरतात हे वाचूनच आश्चर्य वाटलं होतं. मला प्र चं ड आवडला होता तो लेख.

<<
'चित्रपटात दिग्दर्शक "दिसायला' नको. समोर काहीतरी एक घटना घडते आहे, आणि ती फक्त आपल्याला दिसते आहे, असं जेव्हा वाटतं, तेव्हा तो खरा चित्रपटाचा अनुभव'.
>>
याच्यातच दिग्दर्शक दिसतो Happy

वरची चर्चा वाचून लक्षांत आलं कीं मीं जे अनेक इंग्लीश, हिंदी, मराठी, बंगाली व तुरळक इतर भाषिक सिनेमे पाहिले, त्याचा आनंद कांहीं बारकाव्यांकडे जरा अधिक लक्ष दिलं असतं तर नक्कीच द्विगुणित झाला असता. [मी मुख्यतः ज्या वयांत व ज्या काळात हे सिनेमा पाहिले , त्यावेळी परिक्षण, समीक्षा ह्या संकल्पनाही मझ्यासारख्याच बाल्यावस्थेतच असाव्यात]. प्रथम मला सिनेमाच्या या विविध अंगांची जाणीव करुन दिली तो होता आत्यंतिक गरिबीत वाढलेला माझा एक मुसलमान कलंदर मित्र . कुठे शिकला होता तो हें सगळं सिनेमा इतक्या जाणकारासारखं पहाणं, हें मला कुतूहलच होतं. " अच्छे सिनेमा बनानेवाले हरेक बातमे दिमाग चलाते है, ये बात सिनेमा देखते वख्त अपने दिमागमें रखो; सब आस्ते आस्ते समझमे आ जाता है !", हें होतं त्याचं समर्पक उत्तर. त्यामुळे सिनेमा पहाताना 'फायनर पॉईंटस'कडे लक्ष देणं हें त्या सिनेमाचा खरा आनंद घेण्यासाठी व ती कलाकृति निर्माण करणार्‍याना खरी दाद देण्यासाठी अत्यावश्यक आहे, हें निर्विवाद.

पण या सगळ्याला एक पुस्ती जोडल्याशिवाय मात्र मला रहावत नाही व ती आहे <<चित्रपटात दिग्दर्शक 'दिसायला' नको >> या सदर्भातच . मला वाटतं हें केवळ दिग्दर्शनालाच नाही तर अभिनय, कॅमेरा, कॉस्च्युम या सर्वांनाच लागू होत असावं. उदा., अभिनेता जी भूमिका साकारतोय त्यांत जर तो स्वतःच अधिक डोकावत राहिला तर तें त्याचं अपयशच म्हणायला हवं. [ अर्थात, आपल्याकडचे पूर्वीचे कांही अभिनेते बबर्जीपासून कोट्याधीशाच्या भूमिकेपर्यंत फक्त स्वतःचीच छबी त्या त्या भूमिकेवर लादून सुपर हिरोसुद्धां झालेच ! ]. तसंच , कॅमेरामधून घेतलेले अँगल्स, क्लोस-अप्स, लाँग शॉटस इ.इ. हे देखील त्या त्या कथानकाला, प्रसंगाला नुसते औचित्यपूर्ण नाही तर स्वाभाविक व सहजसुलभही वाटले पाहिजेत. जेंव्हा तसं न होतां कॅमेरामन सिनेमाच्या मूळ गाभ्यावर व लयीवर मात करतो आहे [ कितीही उच्च दर्जाचं कसब असलं तरीही ] याची जाणीव होते, तेंव्हां मला वाटतं 'फायनर पॉईंटस' आपली मर्यादा ओलांडताहेत असंच म्हणावं लागेल. कॉस्च्युमच्या बाबतीतही, पात्रांचा पेहराव कथानकाच्या कालखंडाशीं/ प्रसंगाशीं सुसंगत असला पाहीजे याबद्दल दुमत नसावंच व त्यासाठीं अभ्यासपूर्वक प्रयत्न होणं कौतुकास्पदच. पण त्याबाबतीत कांही अगदींच विसंगत दिसून मूळ कथानकाचा रसभंग होणार नाही, हा मुख्य निकष असणं महत्वाचं. पण बर्‍याच वेळां सिनेमाच्या परिक्षणात व समीक्षेत कॉस्च्युमचे अगदीं बारकावेही कसे साधले आहेत यावरच भर दिला जातो तेंव्हा , मला वाटतं, कोस्च्युम सिनेमाला पोषक न ठरतां बाधकच ठरतो. थोडक्यांत, 'फायनर पॉईंटस' हे 'फायनर'च रहाणं व उठावदार न होणं हें 'दिग्दर्शक न दिसण्या 'इतकंच महत्वाचं असावं.

पर्वा बिमल रॉय एक्झिबिट पाह्यले त्यावरून या धाग्याची आठवण आली.

दिग्दर्शकाला व्हिज्युअलची जाण असणे हे किती महत्वाचे होते आणि सध्या ती बहुतेक ठिकाणी 'ना के बराबर' जाणवते हे परत अधोरेखित केले त्या एक्झिबिटने.

Pages