एका श्रद्धांजलीची चिरफाड

Submitted by प्रकाश घाटपांडे on 16 August, 2024 - 03:53

डॉ शंतनू अभ्यंकरांचे निधन झाले ही बातमी सांगण्यासाठी एकाने नास्तिक विचारांच्या कायप्पा गटात तिथे एक मजकूर फार्वर्ड केला होता. मजकूर असा होता.
कळवण्यास अत्यंत दुःख होते की सुप्रसिद्ध स्त्री आरोग्य तज्ञ डाॅ. शंतनु अभ्यंकर यांना आज देवाज्ञा झाली. त्यांच्या कुटूंबीयांना हे दुःख सहन करायची ताकद मिळो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली
झाले उजळ नास्तिक गटावर चर्चा चालू झाली
एकाने म्हटले की कोण येडझवा असले मेसेज बनवतो? आपण किमान ते फॉरवर्ड तरी करू नयेत ना! ‌अभ्यंकर नास्तिक होते.
दुसरा म्हणाला कि अरे मतितार्थ लक्षात घे.
नाही. हा खोडसाळपणा आहे. शोक व्यक्त केला नाही तरी चालेल. त्या गहिऱ्या संवेदनां‌अभावी आजवर कोणी नातेवाईक मेलेले नाहीत. पण जर शोकसंदेश द्यायचाच असेल तर तो आमच्या टर्म्सवरच द्या. असे एक मत व्यक्त झाले

परमेश्वर चरणी प्रार्थना करणाऱ्याने एवढे लक्षात ठेवायला हवं की, शंतनू अभ्यंकर आणि त्यांचे पूर्ण कुटुंब हे पूर्णपणे नास्तिक होते. तेव्हा अशा प्रकारच्या प्रार्थना करणारे आणि असे मेसेज फॉरवर्ड करणारे त्या विवेकी कुटुंबाचा अपमान करत असतात.हा मेसेज फॉरवर्ड करणाऱ्याने विचार करायला नको? की तो पण डोळे मिटून अंधभक्तांसारखाच वागणार? असे देखिल एक मत व्यक्त झाले

फॉरवर्ड करणारे गृहस्थ उजळ नास्तिक समूहाचे सदस्य आहेत, त्यांनी किमान तारतम्य बाळगून एडिट करायला हवा होता किंवा दोन ओळीचा त्यांच्या निधनाचा वेगळा मेसेज टाकायला हवा होता असे वाटते. अशी एकाने टिप्पणी दिली

आता मी त्या गटात होतो . अधूनमधून मी ही तिथे लिहित असे मी म्हणालो कि देव न मानणार देव माणूस अशी प्रतिक्रिया देणारे अनेक सश्रद्ध अस्तिक लोक असतात कि ज्यांना संबंधित व्यक्ती नास्तिक आहे हे माहित असते. त्यांची आदरांजली वहाण्याची ती पद्धत आहे. सश्रद्ध लोकांना त्यांच्या पद्धतीने आदरांजली वहाण्याचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहेच. समजा ते फॉर्वड केले तरी त्यामागचा आशय समजून घेणे महत्वाचे.

त्यावर त्या सदस्याने असे सांगितल की आशय जाउ द्या वैश्विक पोकळीत. त्यांच्या संवेदना त्यांनी स्वतःपाशी ठेवाव्यात. इथे कोणाला शोकसंदेशांची भीक लागलेली नाही

त्यावर मी असे म्हणालो कि शंतनू चिकित्सक व नास्तिक असला तरी हेकट नव्हता. इतरांच्या भावना त्यांच्या भाषेत समजावून घ्यायचा.

मग त्याने सांगितले की शंतनू हेकट नव्हते तर तसले आचरट मेसेज केवळ शंतनूंना पाठवा

त्यावर मी असे म्हणालो की देवाने खुद्द त्याची जागा स्वर्गात राखून ठेवली आहे. देव स्वत: न्यायला आला होता नास्तिकाचे रुप घेउन. शंतनूने ओळखले पण देवाशी पण गप्पा मारल्या. कारण तो देव मानत नसला तरी देव मानणार्‍यांना शत्रू पण मानत नव्हता. आता ही संवादाच्या ओघातील टिप्पणी आहे, यात भाषिक सौंदर्य आहे. परमेश्वराने सुद्धा शंतनूविषयी आदर दाखवला कारण शंतनू परमेश्वराला शत्रू मानत नव्हता. असे मला सूचित करायचे होते. शंतनूच्या लिखाणातील भाषाशैली ही हलकी फुलकी विनोदी उपमा अलंकार वाकप्रचार बोली भाषा यांनी समृद्ध असायची.
त्यावर त्यांनी असे सांगितले की हा मेसेजही आम्हाला नको
त्यावर मी म्हणालो पण वाचून झालाच ना!
त्यावर त्यानी ते पाठवणाऱ्याचा अपमान करता आला अशी आशा करतो असे वक्तव्य केले
मी त्या वक्त्यव्यावर असे म्हणालो कि दाभोलकर म्हणायचे ती भावना आपण स्वीकारली नाही कि त्याला ती परत घेउन जावी लागते.
तेही वारले आता. जे जिवंत आहेत ते नियम ठरवतात. सध्याचे नियम मी ठरवतो. अशी त्या सदस्याने टिप्पणी दिली

आता या चर्चेनंतर मी "हा डॉ शंतनू अभ्यंकरांचा ब्लॉग. जरुर वाचा" हा संदेश द्यायला आलो होतो तर मला ग्रुपवरुन काढून टाकल्याचे दिसले.त्यामुळे पुढील संवादच खुंटला आता या ग्रुपवरील मंडळी काही माझी शत्रू नाहीत. शंतनू पण या कायप्प गटात होता. क्वचित कधीतरी लिहित असे. त्याचे लिखाण अत्यंत संयत असे. मी सुद्धा या गटात अधून मधून लिहित असतो. या गटाचे नास्तिक मेळावे होत असतात. मागच्य वर्षी पुणे व सांगली इथे मेळावे झाले होते. त्यापैकी पुण्यातील मेळाव्याला मी गेलो होतो. गटातील काही धुरीण लोक कठोर नास्तिक व तर्ककर्कश आहेत. शुभ, श्रद्धा, देव असे शब्द चर्चेत जरी आले की त्यांची सटकते. सर्वच तसे नाहीत. फार कमी लोक कडवे आहेत. अशाच एका वैचारिक चर्चेत मी दाभोलकरांच्या श्रद्धांजली बाबत ही इथे खालील प्रमाणे लिहिले होते कि जे मी अन्य चर्चापीठांवरही वेळोवेळी लिहिले होते. 2007 पासून मी अशा विषयांवर उपक्रम, मिसळपाव,मनोगत, ऐसी अक्षरे व मायबोलीवर लिहित आलो आहे. यात नवीन असे काही नाही. श्रद्धांजलीच्या चिकित्सेची पार्श्वमूमी समजावी व त्यावर चर्चा व्हावी म्हणुन मी हे सगळे नमुद करत आहे.
----------------
दाभोलकरांच्या स्मृतीस विनम्र "श्रद्धांजली" अशा प्रकारची आपली भावना व्यक्त करणारे अनेक माणसे आहेत. वेगवेगळ्या विचारसरणीची आहेत. दाभोलकरांविषयी आदर व प्रेम व्यक्त करण्याची त्यांची पद्धत आहे.
अंनिस मधे काही कडवे कार्यकर्ते श्रद्धा शब्द वापरत नाहीत.बाकी शब्द योजना करताना अंनिस वार्तापत्रात शुभेच्छा ऐवजी जाणीवपुर्वक सदिच्छा हा शब्द वापरला जातो. दिवाळी अंका ला दिवाळी अंक न म्हणता वार्षिक विशेषांक म्हटले जाते. व्यासपीठा ऐवजी विचारपीठ म्हटले जाते. असे नाही केले तर आपणच अंधश्रद्ध ठरु कि काय अशी भीती वाटते की काय कोण जाणे? शुभ शब्दाचे वावडे असल्याने मी शुभांगी नावाच्या एका मैत्रिणीला गमंतीने सदांगी म्हणतो.
दाभोलकर शब्दच्छला विषयी अनौपचारिक गप्पा मारताना सांगायचे कि जेव्हा पुरुष असे म्हणतो कि मी भीती ने अगदी गर्भगळीत झालो. तेव्हा तू पुरुष आहे तुला कसला आलाय गर्भ? असे आपण म्हणतो का? भाषेतले अनेक शब्दप्रयोगांचे शब्दशः अर्थ घ्यायचे नसतात. हा किस्सा जेव्हा मी जेव्हा सदानंद मोरेंना सांगितला तेव्हा ते म्हणाले की बुद्धीवादी कार्यकर्ते लोकभाषा बोलत नाहीत. पण लोकभाषेमुळे एक भावनिक जवळीक साधली जाते. हे अगदी खर आहे. पण या मुद्द्याची दुसरी बाजू पण आहे. लोकभाषेची परंपरा गतानुगतिकतेनसार राखली तर समयोचित सुयोग्य पर्यायी शब्द रुढ होणार नाहीत. त्यामुळे डॉ दाभोलकरांच्या स्मृतीस "आदरांजली" हे ही तितकेच उत्कट व भावपूर्ण आहे.
-----------------
मी स्वत: अंनिस मधे 1988-89 पासून कार्य करतो. माझे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातून सुसंवाद असे पुस्तक अंनिस ने देखील प्रकाशित केले आहे. शिवाय अंनिस वार्तापत्राचा लेखक पुरस्कार ही मला मिळाला होता. 2008 मधे झालेल्या फलज्योतिष चाचणीचा मी समन्वयक होतो. नारळीकर, दाभोलकर, संख्याशास्त्रज्ञ कुंटे व समन्वयक मी अशी चाचणी टीम होती. सर्व पत्रिका मी स्वत: तयार केल्या होत्या. दाभोलकर गेल्यानंतर माझा अंनिसतील सक्रिय सहभाग कमी झाला. पण मी आजही संपर्कात व हितचिंतक आहे. शंतनू अभ्यंकरांशी ही माझा व्यक्तिगत परिचय, संवाद व संपर्क होता. लिव्हिंग विल, अवयवदान, इच्छामरण अशा विषयांवर आमची देवाण घेवाण होत असे. आमच्या दोघांचेही लिव्हिंग विल माझ्या बायकोने नोटराईजड केल होते. मुख मुद्दा हा कि अशा पद्धतीचे अनेक लिखाण मी समाज माध्यमात करत असतो. त्यावर प्रतिक्रिया येतात. त्यातून समाज मनाची स्पंदने कळतात. अशा वैचारिक चर्चा संवाद या सामाजिक नोंदी असतात. मायबोलीवर अशा अनेक विषयाची नोंदी आहेत. सामाजिक दस्तैवज म्हणून त्याचे एक महत्व आहे त्यामुळे मला हे इथे मुद्दाम नमूद करावेसे वाटले. यावरील प्रतिक्रिया या मानसशास्त्रीय अभ्यासासाठी देखील उपयुक्त ठरतील याबाबत माझ्या मनात शंका नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रबोधन करायचे तर ते समाजात मिसळुन करावे लागते हा धडा नास्तिक घेतील तेव्हाच त्यांचे विचार लोक निदान ऐकतील तरी.. नाहीतर हेकट हा शिक्का ठरलेला.

बाकी शब्द योजना करताना अंनिस वार्तापत्रात शुभेच्छा ऐवजी जाणीवपुर्वक सदिच्छा हा शब्द वापरला जातो. दिवाळी अंका ला दिवाळी अंक न म्हणता वार्षिक विशेषांक म्हटले जाते. व्यासपीठा ऐवजी विचारपीठ म्हटले जाते. असे नाही केले तर आपणच अंधश्रद्ध ठरु कि काय अशी भीती वाटते की काय कोण जाणे

पुलंची आठवण झाली. त्यांनी मस्त शालजोडीतले हाणले असते.

हे म्हणजे आम्ही नास्तिक धर्मीय आम्हाला आस्तिक धर्मातले काही चालणार नाही अन्यथा आमचा धर्म बुडतो सारखे झाले की.

अभ्यंकर नास्तिक आहेत हे माहीत असून कुणी मुद्दाम खिल्ली उडवायला तशा शुभेच्छा दिल्या असतील तर गोष्ट वेगळी, पण त्यावरही संयत टिका करता येईल. आणि कोणी मुद्दाम केले नसेल तर उगाच बाऊ करू नये.

<<<लोकभाषेची परंपरा गतानुगतिकतेनसार राखली तर समयोचित सुयोग्य पर्यायी शब्द रुढ होणार नाहीत.>>> हा मुद्दा योग्य वाटतो.

उजळ ऐवजी उथळ हवे ना?

बापरे, कोण अतिसायको लोक आहेत हे? अभ्यंकरांना श्रद्धांजली वाहण्यापेक्षा, एक इतकं चांगलं लिहिणारा लाख माणूस आपल्या पासून कॅन्सर ने हिरावला गेला यापेक्षा त्यांना श्रद्धांजली स्टाइल आस्तिक की नास्तिक यावर चर्चा करण्यात रस आहे?अश्या लोकांनी ग्रुप मधून काढलं याबद्दल त्यांचे आभार मानायला हवेत.

?अश्या लोकांनी ग्रुप मधून काढलं याबद्दल त्यांचे आभार मानायला हवेत.>>>

मी ‘लोकांनी’ मधल्या नी वरची वेलांटी पाहिली नाही..आणि अनुचा भलताच गै स झालाय असे वाटले Happy

अंनिसच्या संदर्भाचे लिखाण मी अनेक ठिकाणी केले आहे. तसे त्या ग्रुपवरही अनेकदा केले आहे. अंनिस च्या वर्तुळात तर अनेकदा केलेले आहे. आत्ताचा लिखाणात श्रद्धांजली वरुन विषय असल्याने आत्ता ते या लिखाणात समाविष्ट केले आहे इतकेच
मानव, ज्याने ते फार्वर्ड केले त्याने ते केवळ बातमी म्हणून जसेच्या तसे फॉर्वड केले होते ते काही खिल्ली उडवण्याच्या नादात केले नाही.फार्वर्ड केल्यानंतर ती व्यक्ती चर्चेत सहभागी पण नव्हती.

डॉ. शंतनु अभ्यंकरांनी सांगितलेच होते, " मी गेल्यावर अशा प्रकारच्या भावना व्यक्त करणाऱ्याने मला ओळखलेच नाही असे समजा " . निदान त्या गृपवरील सदस्यांना हे माहीत असायला हवे. निरर्थक वाद घालू नये.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खून्यांचा शोध घेण्यासाठी उच्च पोलिस अधिकाऱ्याने पोलिस स्टेशनमध्ये ' प्लँचेट ' केले होते. त्यांची नंतर बदली केली गेली.
माझ्या मित्राचे आजोबा कट्टर कम्युनिस्ट. त्यांच्या घरात आजोबांच्या फोटोत कै. कॉ. आणि पुढे आजोबांचे नाव लिहिले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खून्यांचा शोध घेण्यासाठी उच्च पोलिस अधिकाऱ्याने पोलिस स्टेशनमध्ये ' प्लँचेट ' केले होते. त्यांची नंतर बदली केली गेली.>>>>>>> त्यावर इथेच मी एक धागा काढला होता. डॉ दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी प्लँचेट चा वापर केला म्हणुन अंनिसने गुन्हा दाखल करणे योग्य कि अयोग्य?

पण नास्तिक झाले म्हणजे तारतम्यभाव, यायलाच हवा असं काही नसतं. हट्टीपणा, हटवादीपणा, समोरच्याचे ऐकून न घेणे आदि मानवी स्वभाव नसेल बदलता येत. आणि बरेचदा कळतं की आपण चुकलो आहोत आणि तरीही इगोपायी, तीच भूमिका घट्ट धरुन ठेवावी लागते.

डॉ. शंतनु अभ्यंकरांनी सांगितलेच होते, " मी गेल्यावर अशा प्रकारच्या भावना व्यक्त करणाऱ्याने मला ओळखलेच नाही असे समजा " . निदान त्या गृपवरील सदस्यांना हे माहीत असायला हवे. निरर्थक वाद घालू नये.>>>>>> हे जरा सुस्पष्ट व विस्तारा करुन सांगता का?

प्रघा उठल्या उठल्या तुमचा लेख बघून आनंद झाला. काहीतरी अभिनिवेशरहीत वैचारिक खाद्य असेल, मते असतील असा कयास होता. तो साध्य झाला Happy
अभिनिवेशरहीत होय - कारण संतुलीत मते फार थोडे लोक मांडताना 'मला' दिसतात. मी तर अश्शीच/अस्साच असे ओरडून सांगणारे जास्त दिसतात. मी-मी-मी!! त्यामुळे मग कमेन्टच टाकाविशी वाटत नाही.

उजळ = ओपनली नास्तिक.>>>
अच्छा, उजळ शब्द स्वतंत्रपणे या अर्थाने वापरतात हे माहीत नव्हते.

कुठलाही कट्टरवाद हा टोकाचाच. नास्तिकवाद हा विवेकवाद आहे याचे भान सुटले कि कट्टरवादाचे प्रदर्शन सुरू होते.
विवेकवाद सांगतो काळ, वेळ ओळखा. या विषयावर पुन्हा चर्चा करू असा पवित्रा घेता आला असता. दोन्हीकडच्यांना.

प्रघांच्या अन्यत्र असलेल्या काही मतांवरून ते पुरेसे रॅशनॅलिस्ट नसावेत. त्यांची सर्कस जाणवते. नास्तिक मतं रोखटोख असतात यात नवल नाही.
पण मानवी व्यवहार भावभावनांवर चालत असतात. व्यक्ती गेल्याची जाणिव ठेवून सौम्य शब्दात सहमती / असहमती नोंदवणे, नंतर बोलू म्हणणे याने नास्तिकता पराभूत होत नाही. तसेच त्यांच्याशी वाद घालण्यानेही काही साध्य होत नाही. दोन्हीकडच्यांना व्यक्ती गेल्याचे काही सोयर सुतक नसावे इतकेच लक्षात येते.

माझे वडील बर्‍याच अंशी नास्तिक होते. बर्‍याच अंशी यासाठी कि तशा प्रमाणपत्राची गरज आम्हा कुणालाही पडलेली नाही.
कुणी प्रमाणपत्र वाटपाचा धंदा काढलेला असेल, त्याच्या प्रमाणपत्राने आपण लहान होत नाही कि मोठे होत नाही. आपण आपली मतं आपल्या सोयीनुसार बाळगतो. त्यात जेव्हां सुधारणा करत जातो, तपासून घ्यायला सुरूवात करतो तेव्हां आपण रॅशनॅलिझम कडे वाटचाल सुरू करतो. यात अनेकदा चुका होतात. त्याची लाज का बाळगायची.

अनेक नव्या विचारांचे आकर्षण असते. भुरळ पडते. अनेकदा भरकटणे होते. पण अनुभवातूनच शिकणे होते. या अवस्था माहिती असतील तर समोरच्याला संधी देता येते. एकदम सोटा काढून बसण्याने विचारांची देवाणघेवाण खुंटते. मास्तरांनी पहिलीच्या वर्गाला एकसामायिक समीकरणे का येत नाहीत म्हणून बदडून काढले तर ?

वडलांनी त्यांच्या अनुभवातून आत्मा बित्मा काही नसतं. पुनर्जन्म होत नाही असे तत्त्वज्ञान बनवले होते. त्यांच्या भावंडात ते मोठे होते. कर्तृत्वानेही. त्यामुळे सगळे (आदराने) भिऊन असायचे. आजोबा गेले तेव्हां कसलेही क्रियाकर्म करायचे नाही हे वडलांनी निक्षून सांगितले होते. पण धाकट्या भावंडांनी गावकीच्या भयाने भिऊन लपूनछपून काही आवश्यक कामे केलीच.

त्यांनी स्वतःच्या मृत्यूनंतर काय काय करायचे नाही हे सांगितले होते. आम्ही ते पाळले कारण आम्हाला पटलेले होते.
आम्ही विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार केले. मंत्रोच्चार वगैरेला फाटा दिला. जिवंतपणी तुम्ही माणसाला जे द्यायचे ते द्या, मरणानंतर प्रदर्शन नको.
जर तुम्ही आई वडलांची कर्तव्ये प्रेमाने पार पाडलेली असतील तर नंतरच्या देखाव्याची गरज राहत नाही. यातल्या कित्येक प्रथा या टोचणी लागू नये, गाव काय म्हणेल म्हणून आलेल्या असतात असे वडलांनी सांगितले होते.

अशा गोष्टींची चर्चा समविचारी, समवेदक समूहात करणे वेगळे आणि जिथे कुणी एकमेकांना ओळखत नाही अशा सोशल मीडीयात करणे वेगळे. कित्य्येकदा समोरच्याला काय म्हणायचे आहे हे समजून न घेता हल्ला चढवणे आणि मी म्हणतो तेच अंतिम सत्य या थाटात वाद होताना दिसतात.

प्रघांच्या अन्यत्र असलेल्या काही मतांवरून ते पुरेसे रॅशनॅलिस्ट नसावेत. त्यांची सर्कस जाणवते. नास्तिक मतं रोखटोख असतात यात नवल नाही.>>>>धन्यवाद! 1987-88 च्या काळात परमेश्वर या संकल्पनेला तुम्ही थेट पणे नाकारत नाही तो पर्यंत तुमच्या अंधश्रद्धा निर्मूलनाला अर्थ नाही अशा आशयाचे पत्र दाभोलकरांना लिहिले होते. त्यांनंतर अंनिस शी भेट झाली व प्रदीर्घ काळ होतो. या गोष्टीची आठवण झाली. या प्रवासातच मी निवळत गेलो. माझ्या इथल्या अनेक धाग्यांवर ते दिसेल. मी एसेम या एस एम जोशींच्या आत्मचरित्रात त्यांचे शेवटच्या टप्प्यातील विचार शेवटच्या प्रकरणात आहेत

परमेश्वर या संकल्पनेला तुम्ही थेट पणे नाकारत नाही तो पर्यंत तुमच्या अंधश्रद्धा निर्मूलनाला अर्थ नाही अशा आशयाचे पत्र दाभोलकरांना लिहिले होते >> अच्छा. तुम्ही अंनिसच्या कमजोर दुव्याला हायलाईट केलेत. त्या काळात शाम मानव आणि दाभोळकर यांच्यात यावरून function at() { [native code] }अभेद होते. तसेच ही चळवळ फक्त बुवाबाजी आणि चमत्कार, अंधश्रद्धा यापुरतीच ठेवली गेली. एव्हढे काम केले कि पुरोगामी प्रमाणपत्र मिळत होते.

>>> नवीन Submitted by रघू आचार्य on 16 August, 2024 - 19:22

मला सर्वात आवडलेला प्रतिसाद

(प्रकाश सर, लेख पुन्हा वाचणार आहे. पहिल्यांदा वाचून नेमके मत बनवणे जमले नाही. तरीही वर कोट केलेल्या प्रतिसादाला गौरवले कारण तो स्वतंत्ररीत्याही चांगला प्रतिसाद आहे असे वाटले)

नास्तिक म्हणवून घेणारे मला एकांगी विचार करणारे आणि हेकट वाटतात. त्यापेक्षा agnostic असणे ही जास्त योग्य भुमिका वाटते. परमेश्वर /सृष्टिनियंती अशी एखादी कोणती शक्ती आहे की नाही याची कल्पना नाही आणि असली काय किंवा नसली काय त्यामुळे काही फरक पडत नाही.

सामो,

कुठलाही कट्टरवाद हा टोकाचाच. नास्तिकवाद हा विवेकवाद आहे याचे भान सुटले कि कट्टरवादाचे प्रदर्शन सुरू होते.
विवेकवाद सांगतो काळ, वेळ ओळखा. या विषयावर पुन्हा चर्चा करू असा पवित्रा घेता आला असता. दोन्हीकडच्यांना.........

हा.

घातपांडे, कमालच करता! शंनतुचे अनेक जिवलग मित्र असलेल्या उजळ समुहावर त्याच्या मृत्युला २४ तास व्हायच्या आत तुम्ही उघडपणे हे म्हणालात?
‘देवाने खुद्द त्याची जागा स्वर्गात राखून ठेवली आहे. देव स्वत: न्यायला आला होता नास्तिकाचे रुप घेउन. शंतनूने ओळखले पण देवाशी पण गप्पा मारल्या.’

मृत्युनंतर आत्मा असता तर शंतनुचा कळवळला असता.

आपण एकमेकांना अनेक वर्ष ओळखतो. सुरूवात ज्योतिष चिकित्सक म्हणून करणे उत्तमच. पण ज्योतिषाच्या चिकित्सेत ओकॅमचा वस्तरा निघाला की लगेच ज्योतिषाचा नायनाट होतो. तुम्ही जर अनेक वर्ष चिकित्सा करूनही (किंवा ती न करताच) चिकित्सकच म्हणवत असाल तर कदाचित त्या उजळ समुहात असायला हवं का याचा तुम्ही पुनर्विचार करायला हवा. तुमच्या मायबोलीच्या प्रोफाईलमध्ये अजूनही ‘ज्योतिष चिकित्सा करणे’ असे आहे. कुचाळक्या करणे देखील. वरचे देवाबद्दलचे वाक्य तेव्हाची परिस्थीती पाहता तसेच काही नव्हते?

मामी, ‘नास्तिक म्हणवून घेणारे मला एकांगी विचार करणारे आणि हेकट वाटतात.’
आणि ईश्वर आहे असा हट्ट करणारे हेकट नाही वाटत? असे दुटप्पी विचार का?

आणि एका किंवा काही लोकांवरून संपूर्ण समुहाला नावं ठेवायची?

मामी, ‘नास्तिक म्हणवून घेणारे मला एकांगी विचार करणारे आणि हेकट वाटतात.’
आणि ईश्वर आहे असा हट्ट करणारे हेकट नाही वाटत? असे दुटप्पी विचार का? >>>>

असं नाही आस्चिग. नास्तिक म्हणवणारे बुद्धीवादी असतात असा त्यांचा दावा असतो, हो की नाही? म्हणून म्हटलं की ते जेव्हा एक घट्ट भुमिका घेतात तेव्हा ते इतर शक्यता नाकारतात. मग आस्तिक आणि नास्तिकमध्ये फरक काय? एक म्हणणार आहेच्च, दुसरे म्हणणार अज्जिबात नाहीच्च.

म्हणून यापेक्षा थोड्या वरच्या पातळीवर जाणारा अ‍ॅग्नॉस्टिक अ‍ॅप्रोच मला आवडतो. श्रॉडींजरच्या खोक्यात सर्व शक्यता आहेत आणि आम्ही खोका उघडणार नाही कारण त्यात आम्हाला स्वारस्य नाही. देव असो वा नसो त्यानं काहीच फरक पडत नाही.

हे सध्याचं मत आहे. यात बदल होऊ शकतो.

रच्याकने, मी अ‍ॅग्नॉस्टिक आहे असा माझा दावा नाही. मला गरज भासेल तेव्हा देवाची आळवणी करते मी.

हेडर मधे जी चर्चा आहे ती कुठल्याही सोसायटीच्या, शाळामित्रांच्या किंवा अशाच कायप्पा ग्रुपवर चालते तशीच आहे.
धागा वाचताना हा ग्रुप शंतनू अभ्यंकरांशी संबंधित नास्तिक चळवळीचा आहे असे वाटत नाही. त्यात सर्व प्रकारचे लोक आहेत असे वाटते. खरे तर एखाद्या संकेतस्थळाप्रमाणे एखाद्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपची चर्चा प्रत्येकाला कशी पाहता येईल ?

वर उल्लेख केलेल्या ग्रुपमधे जे घट्ट विचारांचे आहेत आणि ज्यांनी पवित्रे घेतलेले आहेत त्यांच्याशी वादविवाद करण्यात अर्थ नसतो या निष्कर्षाला आलेलो आहे. याहू पासून ते ऑर्कुट पर्यंत एखाद्या घमासान चर्चेत ज्यांनी माघार घेतलेली असेल, मान्य केले असेल ते पुन्हा नव्या ठिकाणी आपली जुनी धुणी धुताना दिसतात. याचे कारण म्हणजे त्यांची विचारसरणी त्यांना प्रिय असते. अचानक रॅशनॅलिस्ट विचारांचा सामना करायला लागल्यावर तात्पुरती माघार घेऊन नवीन एक्स्क्युजेस घेऊन ते पुन्हा सुरू होत असतात. अशा ठिकाणी वेळ वाया घालवू नये. उनको उनके हाल पर छोड दो यही समाजस्वास्थ के लिये ठीक है असा अदृश्य वैधानिक इशारा नेहमी वाचता यायला पहिजे. ते एखाद्या कॉमन ठिकाणी कुणाला भ्रमित करत असतील तर मग ( किंवा तरच) त्यांचे म्हणणे चुकीचे कसे हे सांगण्यासाठी हस्तक्षेप करावा.

ज्यांना मार्गदर्शनाची गरज आहे त्यांच्याशी इतक्या हार्श भाषेत संवाद साधू नये असे वाटते. वाणी सत्य पण मधुर असावी. नाहीतर सगळेच मुसळ केरात.

नास्तिक जर स्वतःचा सेपरेट चर्चा ग्रूप बनवत आहेत तर पूर्ण नास्तिक नसलेल्यांनी तिथे सामील होऊन त्यांना पसंत पडणार नाही असं कुठलंही मत मांडणे हा खोडसाळपणाच वाटतो . चिथावून ट्रोल करण्यासाठी केलेला . तो अशा दुर्दैवी प्रसंगी करून त्यांच्यातला हेकटपणा / कट्टरपणा उसळून वर आणला यात मेसेज फॉरवर्ड करणाऱ्याला काहीतरी समाधान मिळालं असू शकतं .. ते हेकट , कट्टर असतील , तो त्यांचा प्रश्न आहे , अशा दुःखद वेळीही आपली ट्रोलिंगची उर्मी आवरू न शकणारी व्यक्तीचा खोडसाळपणा हा काही चांगला गुण नाही . नास्तिक वेळोवेळी अस्तिकांना मूर्ख म्हणतात त्याचं उट्टं काढण्यासाठी त्यांना उचकवून मजा बघायची हा हेतू वाटतो पण ही वेळ योग्य नव्हती ..

देवाधर्माच्या गोष्टी अशा फेसबुक / व्हाट्सअप ग्रूप मध्ये , जिथे लोक रंगून जाऊन , मनापासून विशिष्ट गोष्टी डिस्कस करत असतात तिथे देव कसा नाही असा लेख लिहिणं जेवढा पोरकटपणा आहे तेवढाच नास्तिकांना डिवचून आपण फार काहीतरी साध्य केलं असं मानणं हा आहे . स्वतःला शहाणे समजणाऱ्या लोकांना हेकट पणे , उद्धटपणे वागायला लावून दाखवलं अशा समाधाना पलीकडे त्यात काही नाही . पण प्रत्येक माणूस आस्तिक काय नास्तिक काय स्वतःला शहाणा समजत असतो .. नास्तिक जरा जास्त आक्रमक पणे मांडत असल्यामुळे ते खटकत असू शकतं .. स्वतःला शहाणा मानणं ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे त्याला काही इलाज नाही ..

मृत्युनंतर आत्मा असता तर शंतनुचा कळवळला असता.>>>>> शंतनू भाषेतील सौंदर्य अलंकार जाणणारा होता. ‘देवाने खुद्द त्याची जागा स्वर्गात राखून ठेवली आहे. देव स्वत: न्यायला आला होता नास्तिकाचे रुप घेउन. शंतनूने ओळखले पण देवाशी पण गप्पा मारल्या.’ या वाक्यातील देव या शब्दाची ऎलर्जी त्याला नव्हती. चित्राचा कॅनवास बदलला की चित्राचे आकलनही बदलते. शंतनू उवाच हा ब्लॉग जरुर वाचावा सर्वांनी.
शब्दच्छला बाबत मी जसे दाभोलकरांचे उदाहरण दिले त्या पार्श्वभूमीवर माझा या ज्योतिषाचे काय करायचे हा लेख पण वाचावा.

Pages