वाया जाण्याच्या आधीच्या गोष्टी

Submitted by पाचपाटील on 14 April, 2022 - 15:03

असं काय आहे की जे करण्यासारखं असतं, हा एक
प्रश्न त्याच्यापुढे आता असतो. आता असे प्रश्न
पडायला वाव आहे, म्हणजे त्याची परिस्थिती बरी
असणार, हे ओघाने आलेच समजा.
पण तेव्हा ती तशी नव्हती.

ती संध्याकाळची कातर वेळ होती. सूर्य अस्ताला
गेला होता. आकाश तांबूस लालसर छटांनी व्यापलं
होतं. पक्षी आपापल्या घरट्यांकडे निघाले होते.
अशा वेळी तो त्याच्या शैक्षणिक कारकीर्दीच्या एका
नव्या उंबरठ्यावर उभा होता. त्यामुळे त्याच्या मनात
एक प्रकारची हुरहूर दाटून आली होती.
कसं असेल हे नवीन गाव? कॉलेज कसं असेल?
तारूण्याच्या वाटेवरचा आपला प्रवास कसा होईल?
नवीन मित्र चांगले मिळतील का? त्यांच्याशी आपले
आयुष्यभराचे ऋणानुबंध जुळायला हवेत..
हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवता येतील, अशी नाती
इथे तयार व्हायला हवीत...!

साला हे असलं कायतरी फोकनाड लिहायलाच
पायजे का ??

कारण ते तसं काईच नव्हतं. बारावीचा निकाल
लागलेला. बरा होता.
तर वडील बोल्ले आता फुडं काय?
मी बोल्लो असा असा कराडला नंबर लागलाय.
जाऊन ॲडमिशन घेऊन येतो.
ते बोल्ले की मी यिऊ का बरोबर?
मी बोल्लो की तुमी तिथं येऊन काय करणार?
माझं मी बघतो. पैशे तेवढे द्या.
त्यांनी दिले. मी घेतले.
हे एवढंच झालं.

मी काही लगेच त्यांना वाकून नमस्कार वगैरे केला
नाही. कारण आमच्यात तशी काय पद्धतच नाय समजा..!
आणि शिवाय त्यावेळी समजा ते कमरेला टॉवेल
लावून तंबाखू मळत होते.. आणि तंबाखूचा बार
भरल्यावर माणूस जिकडे जातो, तिकडे जाण्याची
गडबड त्यांच्या हालचालींमध्ये स्पष्ट दिसत होती..!
मग कशाला उगीच??

शिवाय नंतर आई पण गालावर हात वगैरे फिरवून
बोलली नाही की, "जा बाळा, चांगला शिकून मोठा हो..
माझे सगळे पांग वगैरे फेड..!"

किंवा समजा "अरे राहू दे राहू दे.. माझ्या कशाला?
देवाच्या पाया पड..!" हे बोलण्याची संधीच मी तिला
दिली नाही..!
त्यामुळे बहुतेक ती बोलली की आता डबा वगैरे कशाला
उगाच? घरचंच किती काळ खाणारेस तू ? कंटाळा नाही
का आला?

किंवा नंतर समजा आमचं सगळं गाव वगैरे मला
निरोप बिरोप द्यायला वेशीपर्यंत लोटलं नाही..
कारण साला कुणाला काय पडलंय कामं-धामं
सोडून.‌.! त्यामुळे बस गावाबाहेर पडताना माझ्या
घशात आवंढे दाटून यायचे थोडक्यात हुकले..
आणि आता गेला तो चान्स कायमचाच..!

बस कराडात शिरायच्या आधी खिडकीतून दिसली
अस्ताव्यस्त पसरलेली पात्रात तुडुंब भरलेली
एक नदी..!
पार पुलाला पाणी टेकलंय.. त्यामुळंच गाड्या
हळूहळू सरकतायत..!
आता हा जुनाट पूल हिच्या दणक्यात गचकला
नाय म्हणजे झालं..!
पण साला एवढी भरगच्च नदी असते??
कृष्णाच असेल काय ही..? पण ही काय त्या
गाण्यातल्यासारखी संथ बिंथ वाहत नाय..!
उलट, फेसांडत फुफाटत हिच्या वाटेत जे येईल
त्याला आडवं करतच आली असणार ही..!
बाब्बौ..! एवढा वेळ बघायला नाय पायजे.! हे पाणी खेचतंय आपल्याला..!!
हे ड्रायव्हराss आता तू पळव बाबा गाडी लवकर..!
अजून माझं बरंच जगायचं राह्यलंय..!

बाकी मग कराडात बसमधून उतरून स्टॅण्डबाहेर
आलो तर सगळे रिक्षावाले "कॉलेsज कॉलेsज"
म्हणून मोठमोठ्यानं हाकारत होते...

मला कळेना की ही काय भानगड आहे..? एखाद्या
विशिष्ट कॉलेजचं नाव का घेत नाहीयेत कुणी..!

नंतर कळलं की कराडात 'सैदापूर' भागात सगळेच
नामांकित कॉलेजेस एकवटले आहेत..!
गव्हर्नमेंट इंजिनिअरींग, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक,
गव्हर्नमेंट फार्मसी, वेणुताई चव्हाण सायन्स
कॉलेज, एसजीएम वगैरे वगैरे सगळेच..!
यशवंतरावांची पुण्याई..! आणि काय?

तर रिक्षावाल्यानं मला "राष्ट्रोद्धाराय तंत्र शिक्षणम्"च्या
कमानीपुढं सोडलं आणि मग राष्ट्राचा
उद्धार बिद्धार करण्याच्या हेतूने मी दोन बॅगा
सांभाळत ॲडमिशनच्या लायनीत उभा राहिलो.
काहींच्या ॲडमिशनसाठी आई बाप काका मावश्या
मामा माम्या आज्जी आजोबा लहान भावंडं वगैरे
सगळा गोतावळाच नटून सजून आलेला दिसतोय..!
पहिल्यांदा वाटलं की बाबा लग्न वगैरे आहे की काय इथं
आसपास..?
पण तसं काईच नव्हतं ते..
पोराला एकटं कसं सोडायचं हा कळीचा प्रश्न
असणार..!
कारण ते तसं असतंच ना म्हणजे..!‌
म्हणजे समजा एखाद्या पर्यटन-स्थळी लहान
पोराला घोड्यावर बसवून त्या घोड्याच्या मागे पर्स
सावरत पळणारी चिंताग्रस्त आई बघितलेलीच
असेल ना..??
कारण त्या घोडेवाल्यानं समजा आपल्या पोराला
पळवून बिळवून नेलं तर काय घ्या.! म्हणून सोबत पळालेलं बरं..!
घोडेवाल्याचा तसा काही दुष्ट प्लॅन दिसला तर लगेच
शोले-स्टाईल झडप घालून पकडता येईल..!
ये हाथ नहींss फांसी का फंदा हैं वगैरे..!

बाकी मग तो पोरगा नंतर घोड्यावरनं उतरून
आता समजा स्वतःच भलामोठा घोडा झालेला
असला तरीही काळजी असतेच ना..!
आणि पुढेही समजा आपल्या घोड्याला नंतर
एखादी सुयोग्य सुस्वरूप किंवा समजा खानदानी
वगैरे घोडी मिळाली तरीही काळजी उरतेच ना..!
आणि मग त्या घोडा घोडीने मिळून नंतर समजा
स्वतःचे घोडा घोडी जन्माला घातले तरीही शेवटी
जीवाला काळजी असतेच ना..!
नाहीतर हे सगळे आज्जी आजोबा वगैरे सहकुटुंब
सहपरिवार एवढ्या अगत्याने कशाला आले असते..!

तर होस्टेल ब्लॉक सी..!
होस्टेलची संपूर्ण वर्षाची फी फक्त सहाशे रूपै..!
काळ्या दगडांतली दणकट जुनी बिल्डींग.
रूममध्ये तीन खाटा..! तीन्ही खाटा मधोमध
अर्धवर्तुळात बेंड झालेल्या..!
ह्या खाटांना बोलतं करायला पाहिजे..!
भयंकर अत्याचारांच्या दबलेल्या कहाण्या सांगण्यास
त्या इच्छुक असणार ..!
बाकी इथे राहून गेलेल्या पूर्वजांची भीषण सेक्शुअल
उपासमार झाल्याची स्पष्ट चिन्हंही सगळीकडे
दिसतायत..!
कारण भिंतींवर आणि कपाटांच्या दारांमागे
खजुराहोला फेफरं आणतील अशा पद्धतीच्या
लैंगिक हालचालींसंबंधी कलाकारी..!
ह्या पूर्वज रूममेट्स कलाकारांना नक्कीच दैवी प्रतिभेचा
स्पर्श झाला होता..!
परंतु योग्य नैसर्गिक आउटलेट न मिळाल्यामुळे ही
देणगी अशीच इथं सांडून गेलेली दिसते..! दुर्दैव..!

पण मग खिडकीतनं बाहेर बघितलं तर सगळीकडं
गारेगार हिरवं कोवळं लुसलुशीत गवत..!
आणि भरपूर झाडं..!
या भागात सगळीकडे हे असंच असणार..!
त्यामुळेच श्रीनिवास कुलकर्णींनी 'डोह' मध्ये एवढी
चांगली निसर्गवर्णंनं करून ठेवली आहेत..!
अशा वातावरणात राहिल्यावर माणसाच्या मनाची
टवटवी टिकून राहणारच ना..!

बाकी आमच्या नजरेला एवढ्या समृद्ध हिरवाईची
सवय नाय..!
कारण 'बदाबदा कोसळणारं प्रचंड ऊन' ही एवढीच
नैसर्गिक साधनसंपत्ती देवाने बहाल केलीय
माणदेशाला..!
'घ्या हे ऊन आणि ऐश करा' म्हणाला देव..!
त्यामुळे समजा आमच्या प्रिय माण नदीत
सदानकदा कोरड्या रखरखीत वाळूची डबरी..!

आणि मग त्या भांडवलावर आम्ही कुठल्या कवितांचे आणि किती मजले उभे करावेत ??
कुलकर्णींना पण ते कदाचित जमले नसते..!
मग आमचा विषय कुठून येतो?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
पण हे सगळं नंतर सुचलं ना?

मस्त! आठवणी जाग्या झाल्या .. माझ्यासोबतही वॉलचंदला आईवडील दोघे आलेले. कॅंटीनलाच सिगारेटचा धूर बघून आई विचारात पडलेली. पोराला मुंबईहून जेवणाचा डब्बा पाठवून द्यावा का.. मग वडील म्हणाले हे असेच चालते. आपण आपल्या पोराला संस्कार लावले की आपले काम संपले.

ज्जे बात पाचपाटील, मस्त लिहिलंय.
तुमच्यावरचा नेमाड्यांचा प्रभाव वगैरे तुमच्या लिखाणात दिसतोच. आणि नेमाडे आमचे लाडके आहेतच Happy

>> राष्ट्राचा उद्धार बिद्धार करण्याच्या हेतूने मी दोन बॅगा सांभाळत ॲडमिशनच्या लायनीत उभा राहिलो.

वाह! Lol Lol

बाकी होस्टेलच्या मागे खिडकीतून दिसणारी पडीक जागा आणि त्यात रानटी गवत झुडुपे उगवून आलेली, हे सगळ्याच हॉस्टेल्सना लागू पडत असावं असं वाटलं Biggrin बहुतेक आर्किटेक्टला जणू सांगत असावेत, बाकी काही कर पण हॉस्टेल्सच्या मागे पडीक जागा आणि झुडपं असायलाच हवीत Lol

आवर्जून दिलेल्या प्रतिसादांबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद Happy
तसेच सायलेंट वाचकांचेही आभार.

तुमच्यावरचा नेमाड्यांचा प्रभाव वगैरे तुमच्या लिखाणात दिसतोच.
>>
गुर्जींचा साठ वर्षांपासून असलेला प्रभाव भल्या भल्यांना टाळता येत नाही, मग आम्ही तर किस झाड की पत्ती..! Lol

पण हे सगळं नंतर सुचलं ना?
>>
होय..! Proud ते तसंच असतं ना म्हणजे..! समजा आत जुनं कायतरी असतं, त्याला आज बाहेर काढायचं म्हटलं तर आपण आज ज्या बिंदूवर असतो तिथूनच मागं बघावं लागत असेल बहुतेक.. !
बाकी जे त्यावेळी सुचायचं त्याची झलक 'फोकनाड'च्या वरच्या परिच्छेदात दिली आहे..! कारण आम्ही तेव्हा वपु, खांडेकर, आनंद यादव, विश्वास पाटील, देसाई, सावंत वगैरेंच्या कुरणात चरत होतो..! Wink

आणि शिवाय आपलं असं कुठे असतं, की जे एकडाव लिहिलं ते फुल ॲन्ड फायनल झालं..! एकंदरीत पॅटर्न बघता, आत्ता जे वाटतंय ते ही पुढं बदलणारच नाही, याची काही शाश्वती नाही.. Happy
प्रतिसादाबद्दल धन्यवाद _/\_

भारी..

- माणगाव आणि कराडची पियू Happy

Pages