पुन्हा एकदा ....रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन...

Submitted by अतुल ठाकुर on 12 June, 2019 - 19:01

hqdefault_5.jpg

पावसाळी गाणं म्हटलं की हटकून दरवेळी आठवतं ते लताचं "रिमझिम गिरे सावन". खरं तर आठवतं म्हणणं बरोबर नाही कारण या गाण्याचा कधी विसरच पडत नाही. इतकं ते मनाला व्यापून राहिलं आहे. अनेकदा वाटतं या गाण्याची आपल्याला इतकी ओढ का बरं वाटते? आपण जुन्यात रमणारे आहोत म्हणून? तसं असेलही कदाचित. मला या गाण्याबद्दल जी ओढ वाटते त्याची तुलना स्त्रियांना माहेरची जी ओढ वाटते तिच्याशी कराविशी वाटते. काहीतरी कायमचं दूर गेलं आहे. तेथे नातं आहे. पुन्हा जाताही येईल पण खरंच पुन्हा त्या दिवसात जाता येईल का? त्या जुन्या मैत्रिणी, ती शाळा, तो रस्ता, ते शिक्षक शिक्षिका तसेच भेटतील का? ते आई बाबा तरी इतक्या वर्षांनी तसेच असतील का? आणि खरं म्हणजे आपण तरी तसेच राहतो का? आपणही बदललेले असतोच की. त्यामुळेच ती एक अनामिक हुरहुर वाटत असते. सतत वाटत राहते. आणि म्हणूनच जुन्याची ओढ वाटते आणि "रिमझिम गिरे सावन" ची ही.

जुनी मुंबई ती उरलेली नाही. हे गाणं जेथे छायाचित्रित झालंय तो भाग आमच्या झेवियर्सच्या आसपासचाच. आता मेट्रोसाठी तो भाग खोदून ठेवलाय. फुटपाथवर पत्र्याच्या शेडस बांधल्या आहेत. काही वर्षांनी कदाचित आझाद मैदानच दिसणार नाही. मग तिथे पाण्याचं थारोळं साचणार कसं आणि त्यात अमिताभ आणि मौशमी पावसाची मजा लुटणार कसे? आता ते कुठलासा चमत्कार होऊन पुन्हा तरुण होऊन आले तरी तसे धाऊ शकणार नाही. मेट्रोसाठी खोदलेले खड्डे मध्ये येतील. आताचा अमिताभ आणि आताची मौशमी कदाचित मुंबईत पावसात मनमुराद भिजण्याऐवजी कुठल्यातरी वर्षासहलीला किंवा ट्रेकला जाऊन तेथे मोबाईलने फोटो काढतील आणि ते इन्स्टाग्रामवर टाकण्याची घाई करतील. त्यांच्या भिजण्याचाही इव्हेंट होईल. थोडक्यात काय तर मुंबईचे जुने रुप आता बदलत चालले आहे. आणि माणसांचेदेखिल. जाऊ देत. आपल्याला पावसाचाही आनंद लुटायचा आहे आणि गाण्याचाही.

लताच्या आवाजाने चिंब भिजल्याचा अनुभव येतो हे मी वारंवार लिहिले आहे. तसे त्या आवाजात एका नवथर तरुणीची कोवळीकही जाणवते. आवाजात अशी कोवळीक आणणे फक्त लताबाईच करु जाणे अशी माझी नम्र समजूत आहे. दरवेळी येणारा पावसाळा यावेळी वेगळा का वाटतो याचं त्या तरुणीला कोडं पडल्यासारखं वाटतं आणि त्याचं उत्तरही तिला माहीत आहे. कारण यावेळी ती प्रेमात आहे आणि "तो" तिच्या बरोबर आहे. त्यामुळे यावेळचा पावसाळा तिला "महकल्यासारखा" आणि "बहकल्यासारखा" वाटतो. प्रेमात पडल्यावर जाणारा प्रत्येक क्षण हा सुगंधी आणि धुंदी आणणारा असतो हे तो अनुभव घेतलेल्यांना वेगळ्याने सांगायची गरज नाही. येथे या गाण्यात या जोडप्याने ही एकमेकांच्या प्रेमात असल्याची भावना इतकी सहज आणि परिणामकारकरित्या दाखवली आहे की मुळात अमिताभ आणि मौशमी अभिनय करतात असे वाटतच नाही.

मौशमीचे त्याच्या लांबलांब ढांगा टाकत चालण्याशी जुळवून घेणेही किती सुरेख वाटते. तिचे ओला पदर तोंडाला लावणे, आपल्या प्रियकराचा हातात सहजपणे हात देणे, तितक्याच सहजपणे त्याचा हात हातात घेणे, त्याला बोटाने काहीतरी दाखवणे सारेच विलोभनीय. अमिताभ तर तिला जवळपास खेचतच पाण्यात खेळवत असतो. हा सामान्य परिस्थितीतला तरुण आहे. श्रीमंत मित्राचा सूट घालून तिला भेटायला आला आहे. त्याची प्रेयसी मात्र खरोखर श्रीमंत आहे. मौशमीने सारी श्रीमंती विसरून आपल्या प्रियकराबरोबर पावसात मनमुराद भिजायचे ठरवलेले दिसते. त्याला ते माहित आहे आणि त्यामुळे तो ही तिच्या सहवासाचा आनंद घेत चिंब होत आहे. काही जण काही गाण्यात इतके सुंदर का दिसतात हे कोडे मला कधीही उलगडले नाही. येथे पावसाळी गाणे. हिन्दी चित्रपटांच्या नियमाप्रमाणे नायिकेला ओलेती दाखवण्याची संधी. पण मौशमी चिंब भिजूनही "तशी" वाटत नाही. उलट गाण्यात ती अधिकाधिक देखणी आणि निरागस वाटत राहते.

बच्चनसाहेब ज्या सहजतेने या गाण्यात रस्त्यावर चालले आहेत, धावले आहेत तसे किती जणांना चालता, धावता येईल काय माहित. अमिताभच्या चालण्या धावण्यातही अभिनय असतो असे मला नेहेमी वाटते. म्हणूनच "डॉन" चित्रपटातील धावण्याचा अंदाज वेगळा आणि येथे प्रेयसीला हात धरून आपल्या वेगाने धावायला लावतानाचा अंदाज वेगळा. हे प्रेमात पडल्याने आणखिनच सुरेख दिसणारं जोडपं मध्येच एकमेकांशी काहीतरी बोलत असतं. ते पाहून अनेकदा वाटतं काय बोलत असतील ती दोघं? त्यातच मध्ये मौशमीचं ते लोभस हसणं. मरिन ड्राईव्हला ती धक्क्यावरून चालते आणि अमिताभ फुटपाथवरून, तिचा हात हातात घेऊन. त्यावेळी एक लाट धक्क्यावर फुटताना दाखवली आहे. असं वाटतं पावसाळ्यातल्या देखण्या मुंबईने या जोडप्याचं प्रेम पाहून त्यांच्याबद्दल ओढ वाटून त्यांना आणखिनच चिंब करायचं ठरवलं आहे. या गाण्यात पावसाचा आणि त्या देखण्या मुंबईचाही रोमान्स सुरु आहेच. त्यामुळे एका प्रेमात पडलेल्या प्रेयसीच्या मनाची अवस्था, प्रेमात पडलेल्या दुसरीलाच कळणार.

खरंच स्त्रीसाठी माहेरची ओढ म्हणजे काय असते याची काहीशी कल्पना मला या गाण्यामुळे येते. काहीतरी कायमचं निसटलं आहे. त्याचा पुन्हा पुन्हा अनुभव घ्यावासा वाटतो. तो आता "रिमझिम गिरे सावन" सारख्या गाण्यातच शक्य आहे.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<< छान आहे लेख.
पहिलं पाऊस जेव्हा पडतं, तेव्हा नकळत माझ्या मनात साधना वर चित्रीत झालेलं ओ सजना बरखा बहार आयी ....>>>
Submitted by Sanjeev.B on 13 June, 2019 - 11:17
हे तर अतिशय अप्रतीम गाणे... पाउस , सतार ...सुंदर

मस्त आहे लेख. पाऊस पडायला लागला की हे गाणं हटकून वाजवलं जातं.

नंतर आमच्या पिढीच्या ह्या दुसर्‍या गाण्याने त्या आवडीवर एकदमच मात >>>> पण हे गाणं बर्ग म्हणतो त्याप्रमाणे नंतर विशेष फेवरेट झालं Proud मस्त भन्नाट गाणं आहे हे ही. माझं खूप आवडतं आहे.

सुरेख लिहिले आहे. माझी दोन्ही गाणी आवडती आहेत. लताचे पाहायला व किशोरचे ऐकायला.

बहुतेक तेंव्हा अमिताभ मोठा हिरो नसावा, कारण सर्वसामान्य लोक खूप दिसतात आणि त्यांना कौतुक किंवा आश्चर्य वाटत नाहीय अमिताभ चे>>>>>

गाण्यातले सर्वसामान्य लोक सिनेमातले extra कलाकार आहेत, रस्त्यावरचे सामान्य लोक नाहीत. एक काळा चष्मा व पिवळा शर्टवाला बाबा दोन दृश्यात दिसतोय व शर्टमुळे लक्षात येतोय. पहिल्याच दृश्यातला छत्रीवालाही नंतर परत एकदा दिसतो. अजून शोधल्यास भरपूर सापडतील.

छान लिहिलंय. माझं ऑल टाइम फेवरेट गाणं. किशोर कुमार म्हणजे पहिले हेच गाणं डोक्यात येतं. मला भिजायला आवडत नाही पण हे गाणं मनाला मात्र कायम चिंब भिजवत असतं. लता दीदींच्या आवाजातलही छान.

हे गाणं खुपदा ऐकलय आणी पाहिलेय सुद्धा. दोघांच्या आवाजात. किशोर आणी लता.
प्रत्येक वेळेस मनात तेच भाव तीच तळमळ नी त्याच भावना दाटुन येतात.
हे गाणं नुकतच एका मैत्रीणीने सजेस्ट केल. पुन:प्रत्ययाचा आनंद घेतला भरभरुन. छान वाटलं

Pages