मिनिमलिस्ट जीवनशैली भाग १, भाग २

Submitted by स्मिता द on 1 March, 2017 - 03:20

मिनिमलिस्ट जीवनशैली

मिनिमलिस्ट जीवनशैली म्हणजे काय ? थबकायला होत ना शब्दाशी. मलाही असेच झाले . मिनिमलिस्ट म्हणजे काय असेल..जरा शोध घेतला..लोकमतला येणारे शर्मिला फडक्यांचे लेख वाचले जरा जरा उलगडत गेले.मिनीमलिस्ट म्हणजे कमीत कमी. कमीत कमी कशांत? तर सगळ्याच बाबतीत कमीत कमी. आपल्या गरजांच्या बाबतीत ही कमीत कमी. आता अन्न, वस्त्र , निवारा या आपल्या प्राथमिक गरजा आहे. हे तर आपण अगदी लहानपणा पासून शिकलो . कलायला लागले तसे अनुभवलेही. कमीत कमी वापरात गरजेपुरते जमवत जगणे म्हणजे मिनिमिलिस्ट . पण गंमत म्हणजे या गरजा आपण खुप वाढवलेल्या आहेत. त्यापाठी मानसिक स्वास्थ तर घालवलेच आहे आणि मानसिक स्वास्थ हा शारीरिक स्वास्थ्याचा पाया. हेच आपण विसरलो आहोत. जन्मभर धावत धावत आपल्याला अधिक काही मिळवायचा हव्यास असतो. आणि त्या हव्यासापायी आपण खरंच सुख आणि आनंद मिळवतो का. चार घटका थांबून यावर चिंतन केलं तर मला वाटत नव्व्दटक्के उत्तर नकारार्थी ये ईल. मला स्वतः: कितीसा आनंद मिळाला आणि किती त्रास झाला याचे उत्तर स्वतःला त्रास जास्ती झाला असेच ये ईल. इथे त्रास हा शब्द मी दोहो बाबत वापरते. प्रत्येक गोष्ट करताना फक्त एक प्रश्न मनाला विचारला “खरंच गरज आहे का? अगदी मनापासून दिलेले उत्तरे होकार्थी पेक्षा नकारार्थी जास्त येतील.

मिनिमिलझम ची व्याख्या ही काही एकमेव किंवा एकच असणार नाही फक्त मिनिमिझम चौकटीचे सूत्र मात्र एक असेल गरजेपुरते आणि कमीत कमीहेच सूत्र आपण आता आपल्या अन्न वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांवर लावून पाहू, अन्न हे किती साधेसे उदाहरण..अन्नासाठी दाही दिशा फिरवीशी जगदिशा म्हणतो आपण खरच. पण इतकी गरज आहे का दाही दिशा फिरायची. उत्तम अन्न ताजे सकस आणि आपल्या आरोग्यासाठी सभोतालासाठी कुठले अन्न हवे ? कुठले नको? त्याचे आरोग्यावर होणारे चांगले किंवा वाईट परिणाम याचा विचार आपण केलाय का ?

मिनेमिलिस्ट जीवनशैली- अन्न

आता मिनेमिलिस्ट जीवनशैलीमध्ये अन्न कमी खा , डाएट करा असा अर्थ होतच नाही.आपल्या शरीरारोग्याला आवश्यक अन्न कुठले . याचा विचार व्हायला हवा. जिभेचे चोचले म्हणून खाल्लेले अन्न वेगळे आणि जगण्यासाठी खाल्ल्लेले अन्न वेगळे . हा निश्चित फरक आहेच दोहोतही. आपली पारंपरिक जीवनशैली , अन्न विषयक अतिशय सुंदर आणि आरोग्यपुर्ण होती असेच म्हणावे लागेल.
आज एकविसाव्या शतकात आपण सगळेच खाद्य पदार्थ खातो इटालियन मेक्सिकन थाई ..खातो म्हणजे तो आपल्या प्रतिष्ठेचा भाग केलाय आपण. पण खरंच आपल्या हवामानाला , जीवनशैलीला ते पोषक आणि अवश्य आहे का याचा जरा थबकून विचार करायला हवा आपण राहतो महाराष्ट्रात. आपले हवामान कसे आहे. आपल्या इथे आपल्या हवामानाला योग्य अशीच पिके येतात. आणि तीच आपल्या आरोग्यासाठीही उपयुक्त असतात. हा साधा सरळ विचार जरी केला आणि अमलात आणला तर आरोग्याची चतु:सुत्री आपल्याला सापडेल
.काय पिकते आपल्या हवामानात तर तांदूळ, आंबेमोहर , इंद्रायणी, जिरे साळ काळभात वैगरे अनेक जाती महाराष्ट्रात आहेत.
ज्वारी, बाजरी, आणि अजून एक पीक आता काळाच्या पडद्याआड झाले मी वाचले होते त्या बद्दल मिलेट. ही धान्ये
पालेभाज्या आंबा, जांभूळ, बोरे, सीताफळ, चिक्कू, अंजीर, करवंदे, फणस इ नेक फळे जी आपल्या मातीत सहज येतात आपल्या हवामानात टिकतात.
या सगळ्या अन्नधान्याचा समावेश आपल्या आहारात केला तर ते उपयुक्तच ठरेल ना? बरेच रोग आपण आपल्या आहारा विहाराच्या चुकीच्या सवयीने मागे लागून घेतले आहेत. ते कमी होतील हे निश्चित .
शुद्ध गायीचे तूप, करडई, शेंगदाणा अशी तेल बियांपासुन मिळणारी तेले. जी आपल्या भूमीत पिकतात. त्याचा शोध घ्यायला हवा. तेल पण मशीन मध्ये न करता घाणीवर केले असेल तर उत्तमच.
धान्ये पण पॉलिश न करता, हातसडीची वापरायला हवीत.
डाळी, कडधान्ये जी महाराष्ट्रातून अता नामशेष होते चालली आहे, कडधान्याला बाजारपेठ नाही म्हणुन शेतकरीही कडधान्याचे उत्पादन घेत नाही.
असे रासायनिक प्रक्रिये विरहित. साधे आपल्या जवळपास पिकणारे अन्न्धान्य आपण खाल्ले तर कित्येक आरोग्याचा तक्रारी दूर होतील

हा भाग झाला अन्न्धान्ये निवडीबद्दल. दुसरा आपल्या मिलिमनिस्ट जीवनशैली बाबत करायचा झाला तर हे अन्न सेव किती करायचे तर आपल्या गरजेपुरते. अगदी मूठभर अन्नाची खरे तर आपल्याला गरज असते. आपण आवडीपोटी गरजेपेक्षा जास्त अन्न सेवन करतो हे निश्चित. ते ही केवळ आवड म्हणून फास्ट फूड, आणि हौस म्हणून रेडी टू इट अन्न पदार्थ. मोठेपणा मिरवायला म्हणुन परदेशी पदार्थ हे त्यात ओघाने आलेच. लोकसत्ता मध्ये आले होते तीन शुभ्र शत्रू मीठ, साखर आणि मैदा. ह्याचे अतिरिक्त सेवन हे आपल्या आरोग्यासाठी शत्रू सारखे ठरत असेल तर निश्चित आपण ते शक्य असेल तिथे टाळायला हवे. मीठ चवी साठी गरजेचे असतेच ते पण चवीपुरतेच असावे. मैदा तर पुर्णपणे वर्ज्य करू शकतोच आपण. साखरेला गूळ हा पर्याय होऊ शकतो. ह्या अगदी वर वर सहज दिसणाऱ्या गोष्टी. यातील जाणकार, तज्ज्ञ यात भर घालूच शकतील आणि त्यांचे ज्ञान आपल्याला निश्चितच फायदेशीर आणि मार्गदर्शक ठरेल.

ही झाली अन्न विषयक गरजेवर अगदी वरवर चर्चा. आपण अजून वस्त्र आणि निवार या बाबीबद्दल ही बघू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>ज्वारी, बाजरी, आणि अजून एक पीक आता काळाच्या पडद्याआड झाले मी वाचले होते त्या बद्दल मिलेट.

मिलेट नावाचं पीक काळाच्या पडद्याआड गेलं असं म्हणायचंय का तुम्हाला?
मिलेट हे कोणते एक पीक नसून ज्वारी, बाजरी, नाचणी आणि अशाच इतर धान्यांच्या समूहाला मिलेट म्हणतात

{आता मिनेमिलिस्ट जीवनशैलीमध्ये अन्न कमी खा , डाएट करा असा अर्थ होतच नाही.}

{ अन्न सेव किती करायचे तर आपल्या गरजेपुरते. अगदी मूठभर अन्नाची खरे तर आपल्याला गरज असते. आपण आवडीपोटी गरजेपेक्षा जास्त अन्न सेवन करतो हे निश्चित.}

बेसिक मे लोचा दिख रहा मेरेको. भोत काँट्रॅडिक्शन है रे बावा.

युरोप अमेरिकेत पर्यावरण संरक्षण अधिक सक्षम आहे , असे मी बोललो त्यात काय चूक आहे ?

“खरंच गरज आहे का? अगदी मनापासून दिलेले उत्तरे होकार्थी पेक्षा नकारार्थी जास्त येतील.>>>पण गरज ही व्यक्तीनुसार, काळानुसार नाही का बदलत?
माणूस गुहेत राहत होता तेव्हाही चांगले जगत होता, आता नाही राहत तरीही छानच जगतोय कि, म्हणजे आनंदाने.

जिभेचे चोचले म्हणून खाल्लेले अन्न वेगळे आणि जगण्यासाठी खाल्ल्लेले अन्न वेगळे >>>>>
आज मी जिभेचे चोचले पुरविण्यासाठी घरी स्वयंपाक न करता बाहेर दोन वडापाव खाल्ले.
पण त्या मजुराने दिवसभर मजुरी करून मिळालेल्या पैशात दोन वडापाव खाल्ले.

सगळ्यांनीच घाणीचं तेल आणि हातसडीचे तांदूळ वापरायचं ठरवलं, किंवा रसायनविरहित पद्धतीने पिकवलेली धान्ये तर लोकसंख्येला पुरेसं उत्पादन उपलब्ध असणार आहे का हो? त्याची किंमत ही यंत्रयुगाची साथ घेऊन तयार केलेल्या उत्पादनांपेक्षा नेहेमीच जास्त असणार आहे. सर्वसामान्य जनतेला ते परवडणार आहे का? साखर आणि गुळाबाबत तेच. काही मोजके ब्रॅण्ड्स सोडले तर रसायनविरहित गूळ मिळत नाही. साखर त्यापेक्षा स्वस्त असते आणि रसायनविरहित असते. साखर कारखान्यांवर एका मोठ्या समाजघटकाचे जगणे अवलंबून आहे हे आपण विसरणार का?
तुम्ही सध्या नुकतं नुकतं काय वाचलंय? गांधीजी का शूमाकर? का आपलं सध्या मिनिमॅलिस्ट जगा कसे हे सांगण्याचे नेटवर एक फॅड आले आहे त्यातले लेखन? गांधीजी आणि शूमाकर यांनी काही विशिष्ट आर्थिक सामाजिक संदर्भचौकटींमधे तत्वज्ञान मांडले आहे. ते तसेच्या तसे सगळ्या समाजातील समाज घटकांना लागू होईल असे मला वाटत नाही.
तुमच्या लेखनात गरज, आरोग्य, स्वदेशी जीवनशैली अशा अनेक संकल्पनांचा गोंधळगुंता झालेला आहे. त्यात अपुर्‍या माहितीची भर आहे (उदा: मिलेट्स म्हणजे काय हे तुम्हालाच माहित नाहीये पण तुम्ही अर्धवट माहितीवर विधान केलं आहे, डाळी कडधान्ये नामशेष होत चालली आहेत असे सरसकट विधान). शेतीच्या-पिकांच्या-उत्पादनाच्या अडचणी आणि सद्यस्थिती हा संपूर्णतया वेगळा आणि गुंतागुंतीच्या आवाक्याचा विषय आहे. तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते आधी शांतपणे विचार आणि वाचन करून ठरवा. आणि मग लिहा... म्हणजे तुम्हाला हवी आहे तशी अर्थपूर्ण चर्चा होईल

>>यायला हवा. तेल पण मशीन मध्ये न करता घाणीवर केले असेल तर उत्तमच.
धान्ये पण पॉलिश न करता, हातसडीची वापरायला हवीत.
डाळी, कडधान्ये जी महाराष्ट्रातून अता नामशेष होते चालली आहे, कडधान्याला बाजारपेठ नाही म्हणुन शेतकरीही कडधान्याचे उत्पादन घेत नाही.
असे रासायनिक प्रक्रिये विरहित.>> हे सगळं मिनिमलिस्टीक लाईफस्टाईल मध्ये कसं काय? ऑर्गॅनिकमध्ये आलं पाहिजे ना?

>> आज मी जिभेचे चोचले पुरविण्यासाठी घरी स्वयंपाक न करता बाहेर दोन वडापाव खाल्ले.
>> पण त्या मजुराने दिवसभर मजुरी करून मिळालेल्या पैशात दोन वडापाव खाल्ले

मिनिमलिस्टिकचा विठोबा हा अपॉर्च्युनिटीजचा पोटोबा भरल्यावरचा आहे.
(सौजन्य : साती आक्का)

स्मिताजी
अनेक अडचणी येतील, नाऊमेद केले जाईल , तर्कदृष्ट प्रश्न आडवे येतील, अनेकदा माहितीअभावी उत्तरे देणे जड जाईल पण आपण आपला निश्चयाचा महामेरू ढळू देणे नोहे.

धन्यवाद सगळ्याना..:)

वरदा धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल Happy

मिलेट या धान्याच्या प्रकारात कोदो, सावा, राळा, वरई, भादली, नाचणी, ज्वारी, बाजरी अशी अनेक पौष्टिक धान्यं येतात. अशी माझी माहिती अपुरीही असु शकते.
राहता राहिली गोष्ट काहीतरी लिहायची, आणि म्हणणे मांडायचा सोस हा भाग नसावा. समुद्रातून चार पाच रेती कण असे हे लिखाण. एक फॅड म्हणुन बोळवण करण्यापेक्षा जरा सगळ्यानीच विचार करावा असे वाटते. माझे मत पटेल कुणाकुणाला नाही तर सगळ्यानी आपले म्ह्णणे मांडावे. कुठेतरी मिस गाईड करणे किंवा मीच हुशार अशी प्रौढी मारणे हा हेतू लेखनाचा नाही.
अडचणे असतात हे मान्य, परंतू अडचणी वर सार्वमतानुसार मार्ग काढता येतो.
मी एकच विचार घेऊन चालत नाही त्यामुळे गोंधळ झाला असवा, परंतू तो गोंधळ गुंता नसावा असे वाटते.
कदाचित सखोल अभ्यास न करता हे विचार मी मांडलेल असावे असे असू शकते परंतू केवळ पुस्तकी अभ्यास न करता रोजच्या अनुभवातून आलेले हे विचार आहेत. कादाचित लेखन जमले नसावे,
डाळी,कडधान्ये सरसकट नमशेष होत चाललेत हे माझे म्हणणे सगळी कडधान्ये संपली असे नाही तर अशी कित्येक कडधान्ये आहे ती आता शेतकरीही पिकवत नाही, नगदी पिके घेण्याकडे शेकर्‍याचा कल असतो. मग जर वापर सुरु झाला त्या कडधान्याचा तर शेतक्री ही पिकवू लागतील ना.
अजून एक मिनिमलिसट अशी एक जीवनशैली आणि चौकट यातून मी विचार मांडले नाही. माझ्या साठी गरजेपुरते आणि ते ही आवश्यक , सकस असावे असा आअग्रहाचा विचार असावा ही भावना . कमीत कमी मह्णजे काटकसरीचे नाही तर सकस हवेच, अन्न फक्त विनाकारण गरजेपेक्षा जास्त नको...घरात न वापरल्या मुळे कडधान्याला किड लागली असे व्हायला नको. जे उपकारक आहे आपल्या आरोग्याला ते वापरणेच इष्ट. आणि ते ही गरजेपुरतेच अस साधा सरळ विचार माझा. मी काही त्या विषयातील तज्ज्ञ किंवा जाणकार नाही. एक सामान्य माणुस आपल्या कुवतीनुसार काय विचार करू शकतो ते हे विचार. आज आपण गरजा विनाकारण वाढवत आहोत असे कुठेतरी जाणवते म्हणून हे मार्गदर्शनाच्या अपेक्षेने लिहले.
आपण वैचारिक लोक, यावर आपले काय विचार आहेत ते मांडावे जे आमच्या सारख्या सामान्य लोकाना उपकारक ठरतील

विनायक परांजपे, सपना Happy धन्स
विनायक मी वाचते ते.
सपना, तुमच्या सदिच्छेबद्दल अनेक धन्यवाद...तुमच खरय ना उमेद व्हायचे नाहीच.मी मायबओलीवर लिखाण सुरु केले तेव्हा असे अनुभव आले मलाही खूप. माझी ' माधवी; ही कथा मी पोस्ट केली तर निम्म्याहुन अधिक लोकांचे प्रतिसाद कुणाचे लेखन आहे? हे कुणाचे कॉपी पेस्ट केले? कुठल्या पुस्तकातील आहे .. अशाच होत्या..प्रथम धक्का बसला की आपण लिहिले हे आणि असे का बोलतात लोक..पण मग सराव झाला..:)
माझ्या प्रत्येक लेखनावर मग लोक आणि प्रतिक्रिया ठरलेल्या होत्या..अर्थात तेव्हा ही नाउमेद झाले असते तर अधिक लेखन घडले नसते..असो..हा भाग पण मला जाणवले, वाटले म्हणुन केलेले लिखाण..:)

अजून एक मिनिमलिसट अशी एक जीवनशैली आणि चौकट यातून मी विचार मांडले नाही.>> मग कृपया तुमच्या लेखाचं नाव बदलणार का? माझाच नव्हे तर बहुतेक वाचकांचा गैरसमज झालाय की तुम्ही मिनिमलिस्ट जीवनशैली बद्दल लिहित आहात म्हणून कारण लेखाचा मथळा तो आहे....

तज्ज्ञ मी ही नाही. विचारवंतही नाही. तुम्ही लिहिलेला मजकूर आणि उपाय वाचून मला पडलेले प्रश्न तुम्हाला विचारलेत... मिलेट हे पीक काळाच्या पडद्याआड गेले/ डाळी कडधान्ये नामशेष होत आहेत हे तुम्हीच लिहिलं आहे.
बदलत्या काळानुसार अनेक वरकस धान्ये, पिके कमी कमी होत आहेत. पण फक्त आपण त्याचा आहारात वापर वाढवणे याने मागणी वाढून त्याचा पुरवठा वाढेल इतकं सोपं उत्तर त्याचे आहे असे मला वाटत नाहीये.. शेतीचे अर्थकारण आणि समाजशास्त्र हा फार गुंतागुंतीचा विषय आहे (माझ्या मते)

वरती सातीने लिहिले आहे ते बर्‍याच अंशी बरोबर आहे (भारतातल्या उच्चभ्रू मिनिमलिस्ट लोकांबाबत तर बहुतांशी आहेच आहे) की भरल्यापोटीचा विठोबा म्हणून. मुळात पाश्चात्य देशांत या तत्वज्ञानाचा उगम भौतिक सोयीसुविधांनी समृद्ध आणि कन्झ्यूमरिझम वेगाने वाढलेल्या समाजात झालेला आहे. तिथल्या काही अतिरेकांमुळे. म्हणूनच लिहिलं होतं की गांधीजी आणि शूमाकर यांचे तत्वज्ञान सर्व समाजातील सर्व समाजघटकांना प्रत्येक वेळा लागू पडणार नाही.

मी हे बर्‍यापैकी आचरणात आणते. म्हणजे वाहन नाही. कपडे मोजकेच आहेत. खाणे लिमिट मध्ये व थोडेसेच पदार्थ. हाय फंडा काही खात नाही व विकतही आणत नाही. हे माझ्यापुरते. मुलगी सुट्टीला आली की तिला हवे ते करून घालते व खरेदी करू देते. कुत्र्याला पण भरपूर ट्रीट्स घेउन येते. मंक हू सोल्ड हिस फेरारी सारखे तत्वज्ञान आहे. तुमचा मूळ उद्देश स्वताच्या गरजा कमी करणे व तसे राहणे हा असेल तर हे खूपच शक्य आहे. महाग गोश्टींन खूप साधे व स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत. ते शोधायचा प्रयत्न करते.

माझे हेड फोन्स हरवले म्हणून एका साध्या दुकानातून ३०० रु. चे महागातले घेतले. १५० रु चे पण होते. हे मला ऑनेस्टली माहीत नव्हते. अ‍ॅपल किंवा सेन हायझर चे किती महाग असतत. पण त्यांची ऑडिओ क्वालिटी पण तितकीच छान असते. पाच सात वर्शात रिटायरमेंट होईल त्या नंतर मला आतासारखे महाग वस्तू घेणे आजिबात परवडणार नाही. आताच सुरुवात करावी म्हणजे सवय होईल ह्या उद्देशाने मी हे डिक्लटर व मिनिमलिस्ट राहणे चालू केले आहे. आता नको असलेले कपडे सर्व बॅगेत भरून नीट ठेवले आहेत. म्हणजे पुढे वापरता येतील.
एकूणच महाग साड्या पर्सेस, चपला प्रकरण लाइफ मधून जात चालले आहे.
फर्निचर पण गरजे पुरतेच आहे. जास्तीचे फॅन्सी काही घेतलेले नाही. अगदी इमोशनली महत्वाची अशी काही पुस्तके सोडल्यास सर्व हार्ड कॉपी पुस्तके काढून टाकली आहेत. मध्यंतरी एकदा मला घराबाहेर किल्ली घरात व लॅच लागल्याने बाहेर अड्कायचा प्रसंग अनुभवायला लागला. पायात चपला नाहीत. जवळ पैसे नाहीत व किल्ली बनवणा रा यायचा आहे. असा मी एक तास घालवला तेव्हा जिन्यात बसून विचार केला की खरेच इथे महत्वाचे आत असे काय आहे तेव्हा आत झोपलेले दोन कुत्रे व आमचे जुने फोटो अस्लेले दोन अल्बम ह्याखेरीज काहीही आपल्याला नको आहे आत जाता नाही आले तर केवळ ह्या दोन साठी जीव कासावीस होईल असे लक्षात आले. तेव्हाच खर्‍या प्रायोरिटीज कळल्या.
तुम्हाला शुभेच्छा. नको असलेले सर्व इन्क्लुडिंग माणसे, विचार, वस्तू जीवनातून मनातून काढून टाका. म्हणजे एक नवा फ्रेश कॅनव्हास आपल्याला मिळतो.

नको असलेले सर्व इन्क्लुडिंग माणसे, विचार, वस्तू जीवनातून मनातून काढून टाका. म्हणजे एक नवा फ्रेश कॅनव्हास आपल्याला मिळतो.>>+१००

वरदा, अमा , sonalisl धन्यवाद ..:)
अमा, खूप छान मांडले तुम्ही..अगदी चपखल आणि थोडक्यात ..मला हेच जाणवले अनेकदा आणि मग मी ही हा मिनिमलिस्ट विचार करायला लागले. अर्थात अजून संपूर्णपणे ते जमले नाही..प्रयत्न करणे आपल्या हातात. Happy
तुम्ही थोडक्यात अगदी सुरेख विश्लेषण केलेत. त्यात ही >>> तुम्हाला शुभेच्छा. नको असलेले सर्व इन्क्लुडिंग माणसे, विचार, वस्तू जीवनातून मनातून काढून टाका. म्हणजे एक नवा फ्रेश कॅनव्हास आपल्याला मिळतो.>>> याला मनापासून अनुमोदन व हे मिनिमिलिस्ट जगण्याचे सूत्र ही ..:)
पुनश्च धन्यवाद सगळ्यांचे

मला वैयक्तिक रित्या हि जीवनशैली कितीही आवडली (आवडेल असे वाटले) तरी भारतात राहणाऱ्या, आपल्या करिअर च्या मध्यावर असणाऱ्या व्यक्तीला हि कितपत जमेल हा प्रश्न वाटतो.
एकटे राहणारे लोक, विद्यार्थी, निवृत्तीकडे झुकलेले लोक याना हि जीवन शैली पाळणे जास्त जमू शकेल,

नोकरी करणाऱ्या संसारी माणसासाठी तरी मिनीमलिस्टिक जीवनशैली म्हणजे समजून उमजून आवश्यकता असेल तितका केलेला खर्च इतकीच व्याख्या असेल.

चर्चा फायनली योग्य वळणावर आल्याने लिहावेसे वाटते -
गेल्या २-३वर्षापासून मी स्वतः मीनीमलीस्टीक लाईफ स्टाईलकडे प्रवास करतीये. हा ओव्हरनाईट होणारा बदल नाही, कारण हा जीवनशैलीतला फरक आहे, तो हळूहळू होतो, आणि मेथॉडीकली केला तर 'रीबाउंड' इफेक्ट होत नाही. सगळ्यात पहिली स्टेप 'स्वतःच्या गरजा काय? आपल्याला कसं जगायचं आहे?' यावर विचार करणं आणि ते लिहून काढणं ही आहे. अनेकदा पीयर प्रेशरमुळे आपण गोष्टी जमवत जातो, त्यावर विचार होणं आवश्यक आहे. ह्या सगळ्याला एक सीस्टीमॅटीक अ‍ॅप्रोच आहे. पण इट वर्क्स फॉर शुअर.

शिवाय यात कोणत्या देशात राहता, त्या देशाच्या पर्यावरणाच्या पॉलीसीज काय ह्याही पेक्षा 'तुम्हाला पर्सनल लेव्हलला तुमची लाईफस्टाईल कशी हवी आहे?' हा भाग जास्त आहे. शिवाय हे कोणालाही शक्य आहे, जर इच्छा असेल तर. त्यासाठी एकटे, निवृत्त, विद्यार्थी इ.इ. असायचीच गरज आहे असं नाही. आपण एकूणच गोष्टी वाढवतो, कळत- नकळत, फॉर व्हॉटेव्हर रीझन्स.
हे थोडं फिलॉसॉफीकल होईल, पण शेवटी हा सगळा 'स्वतःच्या शोधाचा प्रवास आहे' एकूणातच. आणि त्यात सॉलीड मजा देखील आहे.

rar पोस्ट आवडली.
>>>>सगळ्यात पहिली स्टेप 'स्वतःच्या गरजा काय? आपल्याला कसं जगायचं आहे?' यावर विचार करणं आणि ते लिहून काढणं ही आहे. 'स्वतःच्या शोधाचा प्रवास आहे' एकूणातच. आणि त्यात सॉलीड मजा देखील आहे.---- हे पटलेच.

रार, तू स्वतः गेल्या २-३ वर्षात तुझ्या लाइफस्टाइलमध्ये काय आणि कसे बदल केलेस ते जरा प्लीज उलगडून सांगशील का?
म्हणजे मला त्यामागचा विचार/फिलॉसॉफी नको आहे फक्त कोणकोणत्या गोष्टी अंमलात आणल्यास आणि कमी केल्यास/बंद केल्यास/सुरू केल्यास असं काहितरी हवय.

वयोमानानुसार नवरा गेला. मूल स्वतंत्र झाले , यात ' तुमची मिनिमलिस्टिक व्हायची ' इच्छा होती म्हणुन्हे घडले की त्या स्वतंत्र घटना होत्या ?
तरुण वयात नोकरी , घर , पैसा सगळे मिळवुन झाले आहे ना ? तसेही वयोमानानुसार चप्पलेचा शौक आता जमणार नाही , हे देखील स्वतःच्या मिनिमलिस्तिक निर्णयामुळे की परिस्थितीजन्य ?
मला शूज घालता येत नाहीत , चप्पल घातली तरी लंगड्या पायाने एक चप्पल दोन चार महिन्यात तुटतेच ... तुटली तरी चप्पल शिवणे / बदलणॅ शक्य नसते .... मी महागडे शुज वापरत नाही , हे परिस्थितीजन्य की माझा मिनिमलिस्टिक अ‍ॅप्रोच ?

नाच नाचुनी अती मी दमले , थकले रे नंदलाला , अशा अवस्थेला पोचल्यावर , आता मी फार हालचाली करत नाही , मी आता मिनिमस्लिस्तिक झाले , असे म्हणणे कितपत योग्य आहे ?

ह्या सगळ्या प्रोसेस मधे खूप 'होमवर्क, नोटस काढणे' पार्ट करते मी, कारण लिहून काढलं की विचार पक्के होतात माझे माझ्यासाठीच, आणि ओव्हरव्हेल्मींग न होता एक दिशा मिळते कृतीला.
१. माझ्या स्वतःच्या गरजा, डे टू डे लाईफ मधल्या आणि हॉबीज, अ‍ॅक्टीव्हीटी लेव्हलच्या नोट केल्या, चक्क लिहून काढल्या.
२. यातल्या कोणत्या गोष्टी 'अनअव्हॉयडेबल' आहेत त्यावर विचार केला आणि त्या मार्क केल्या.
३. 'अव्हॉयडेबल' गोष्टींपैकी अश्या कोणत्या गोष्टी ( फर्निचर पासून, भींतींवरच डेकॉर, पुस्तकं, भांडी, कपडे, अभ्यासाच्या नोट्स, सिनेमे-कॅसेट्स, खेळाचं साहित्य, कॉस्मेटीक्स, स्टेशनरी, बॅगस, आणि डीजीटल कचरा ... जस्ट नेम इट) असे रफ कप्पे केले, बॉक्स डायग्राम. आणि रीयलीस्टीकली यातल्या किती गोष्टी आपण वापरतो याची चक्क यादी करायला सुरुवात केली.
४. यासगळ्यात माझे अनेक वीक पॉइंट्स समोर आले - उदा. बॅगपॅक्स, स्टेशनरी आयटम्स, पुस्तकं, सिनेमे.
- गेल्या ५ वर्षात मी कितीही मोह झाला तरी नवीन स्टेशनरी आयटम घेतलेला नाही.
- सेम विथ बॅगपॅक्स. दुकानात गेलं तर कौतुकानं हात लावून पाहते, स्टाइल्स पाहते, पण विकत घेत नाही.
५. डोनेट, डोनेट , डोनेट - कपडे, भांडी, होमडेकॉर, कॅसेटस, इलेक्ट्रॉनीक्स (जे जे शक्य आहे ते)
६. अभ्यासाच्या जुन्या नोट्स - खोकी भरभरून असलेले पेपर्स, नोटस - महत्त्वाचे स्कॅन केले (डीजीटल कचरा वाढवला !), जे ऑनलाईन आहेत ते रीसायकल करून टाकले.
७. कमी खरेदी. आहेत त्या वस्तू पूर्णपणे मनसोक्त भरपूर वापरून त्यांचा आनंद घेणे.
८. फुडच्या बाबतीत मी ऑरगॅनीक इत्यादी काही अ‍ॅप्रोच कधीच ठेवला नाही. शिवाय आधी व्यायाम आणि हेल्दी लाईफस्टाईल आयुष्यात आल्याने, मिनीमलीस्टीक फूड हॅबीट्स आपोआपच आल्या.
९. २०१७ चं गोल - डीजीटल कचरा (फोटोज आणि मिडीया / गाणी) हे ठेवलंय, आणि चक्क नोट्स काढून त्यावर अ‍ॅक्शन घेणं चालू आहे.

हे बरंच ढोबळमानानं लिहिलं आहे. आजूबाजूला पाहिलं तर स्केअरी वाटेल इतक्या गोष्टी आपण जमा केलेल्या असतात. खूपदा बारीक सबडीव्हीजन , कंपार्टमेंट्स करणं शक्य होत नाही. त्यामुळे प्रोसेसचा ओव्हरऑल मतितार्थ समजून घेणे Happy

आधी आधी अर्थातच मानसिकरीत्या इतकं सोपं गेलं नाही. सवयीचा परीणाम. पण आता मी ह्या स्टेजला आहे, की आय जस्ट लूक फॉरवर्ड टू गेट सम डेडीकेटेड टाईम ऑन विकेंड टू क्लीन आणि रीड्यूस स्टफ. क्लटर कमी केल्याने मला हव्या त्या गोष्टी करायला मला टाईम, स्पेस (फीजीकल अ‍ॅज वेल अ‍ॅज मेंटल) मिळत असेल तर ईट्स टोटली वर्थ इट.

यांतील ४-८ मिही करते. यांत घरच्या इतरांच्या वस्तुही आल्या की जोरदार भांडणही होते कारण आमच्या घरात हे इतर कुणाला पटत नाही. आता ह्या धाग्याच्या प्रिंटआउट्स देणार आहे वाचायला.

रार
ब्रॉडर लेवल वर तुमचा प्रतिसाद पटला,
पण प्रत्येकाच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक गरज आणि आवाडीनिवाडीनुसार हि लिस्ट ठरत जाईल,
उदा,
मी सेल्स मध्ये आहे, 3 दिवसांची टूर करुन आल्यावर कपडे धुवायला गेले की पुढचे 2 -3 दिवस वापरायला पुरेसे कपडे असणे माझ्या व्यवसायाची गरज आहे.
जर मला कलायन्ट ला भेटायला आफ्टर अर्स /फॉर्मल मीटिंग मध्ये जायचे असेल तर त्याला साजेसे कपडे (कॅसुअल्स/सूट) माझ्या कडे (पुरेसे) असायलाच लागतात,
काळ्या पॅन्ट खाली काळे शूज, काळा पट्टा, आणि काळ्या पट्ट्याचे घड्याळ, ब्राऊन पॅन्ट खाली हाच सगळं ब्राऊन जामानिमा मला ठेवावा लागतो.
या गोष्टी मला कितीही आवश्यक वाटत नसल्या तरी सामाजिक बंधने/अटिकेट्स म्हणून मला कराव्या लागतात, कारण त्याचा थेट परिणाम माझ्या प्रतिमेवर आणि पर्यायाने माझ्या करिअर वर होणार असतो.

मला वाटले तर मी अगदी 4 जोड कपड्यात मॅनेज करू शकेन पण इसेंट्रिकपणाचा शिक्का बसून मी बाहेर फेकला जाण्याचे चान्सेस जास्त आहेत.
हाच प्रॉब्लेम फॅशन, सेल्स, मार्केटिंग, लोकाभिमुख काम असणारे लोक यांचा असेल,

आता वैयक्तिक आवडीनिवडी/गरजे बद्दल
समजा मला गाणी ऐकण्याची आवड आहे, आणि त्यातली जाणहि आहे, (वर अमांनी दिलेले उदाहरण देतो,)तर मी 150-200 चे एअरफोन घेणे हा माझ्यावरच मी केलेला अन्याय आहे.(मला चांगले एअरफोन परवडत आहेत असे गृहीत धरलय) आता मी 1500 चे घ्यावेत, 3000 चे कि 8000 चे घ्यावेत हे माझ्या आवडीची आणि आर्थिक पातळी पाहून ठरेल.
किंवा शर्ट/स्वेटर घेताना मी माझ्या सतत फिरण्याच्या शेड्युल ला सुट होईल असा हलका मात्र जास्त उबदार,लो मेंटेनन्स असा घेईन, भले तो जास्त महाग असेल.

भारतीय फॅमिली मध्ये एका लिमिट नंतर तुम्ही गोष्टी कमी करूच शकत नाही, 6 जणांच्या कुटुंबात अजून 4 जण पाहुणे आले तर??म्हणून तुम्हाला तयारी ठेवावीत लागते,
पण घरातली एक व्यक्ती मिनीमलिस्टिक जगू पाहतेय म्हणून आलेल्या पाहुण्यांसमोर आकवॉर्ड पोसिशन करून घ्यायला,घरातले लोक तयार असतीलच असे नाही.
त्यामुळे संसार, प्रोफेशन हे बंधने पडन्या आधी किंवा हि बंधने सैल झाल्यावर हे जीवनशैली स्वीकरणे सोपे जाईल
असा माझा दृष्टिकोन आहे.

शेवटचा प्रकार मी प्रत्यक्ष पाहतो आहे
माझ्या मित्राची बायको कमीच सामान बरं अशा मताची आहे
मुलांच्या वाढदिवस साठी कधी त्यांच्या कडे गेलो तर अक्षरश: प्लेट्स जमावाव्या लागतात (शेवटी या वर्षी त्यांनी पेपर प्लेट्स ठेवल्या) ऑर्डर केलेले पदार्थ काढण्यासाठी पातेली शोधून शोधून घावी लागतात,
घरात नवरा बायको आणि 2 मुले इतके मेम्बर आहेत.
दरवर्षी या प्रकारानंतर मित्र भडकतो, थोडी कुरबुर आमच्या समोरच होते,आमच्या मागे काय होत असेल माहित नाही,
कपड्यांच्या बाबतीत पण अश्याच कुरबुरी असतात,
या अनुभवांचा माझे मत बनण्यात मोठा हात आहे

रार, मस्त पोस्ट्स.

सिम्बा, अगदी बरोबर. पण मिनिमलिस्टिक म्हणजे गरज असतानाही उचलून गोष्टी फेकून देणे असा नाही असं मला वाटतं. तुम्ही सांगता त्याप्रमाणे जास्तीचे कपडे, बेडिंग याची तुम्हाला गरज आहे/हमखास पडू शकते. तर या वस्तू राहूदेत की! तुम्ही त्या पूर्णपणे वापरत आहात हे महत्त्वाचं. ज्या वस्तू गरज नसताना आणल्या गेल्या आहेत किंवा घरात पडून राहिल्या आहेत. ज्या वर्षानुवर्षं वापरात येण्याची अजिबात शक्यता नाही किंवा अगदी १-२ वेळाच वापरल्या जातील त्या वस्तू काढून टाकता येतात का याचा विचार करा.

Pages