नागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)

Submitted by रसप on 30 April, 2016 - 04:08

'फॅण्ड्री' च्या शेवटी जब्या आणि त्याचं पूर्ण कुटुंब डुक्कराच्या मागे लागलेले दाखवले आहेत. त्यांची आणि डुक्कराची ती धडपड, पळापळ बराच वेळ चालते. पळून पळून जब्याचा बाप इतका दमतो की त्याच्या अक्षरश: छातीचा भाता होतो. ही सगळी पळापळ हळूहळू करत जब्याच्या शाळेभोवतीच्या परिसरात येते. मग जब्या त्याचे सवंगडी आणि 'ती'च्यापासून स्वत:चं तोंड लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतो. त्या प्रयत्नात १-२ वेळा पकडता येऊ शकणारं डुक्कर निसटतं. बाप खूप शिव्या घालतो. अखेरीस जब्या परिस्थितीला शरण जातो आणि आपलं हे अस्तित्व स्वीकारतो. त्याची लव्ह स्टोरी त्याच्या कधीही न वाचल्या जाऊ शकणाऱ्या एका कागदोपत्री फुटकळ इतिहासात जमा होते आणि त्या लव्ह स्टोरीचा पूर्णविराम म्हणून तो एक दगड थेट आपल्याकडे - कॅमेऱ्याच्या दिशेने - फेकतो. कहाणी संपते. बराच वेळ चाललेला डुक्कर पकडण्याचा प्रसंग ठळकपणे लक्षात राहतो. लक्षात राहते जब्याची केविलवाणी धडपड आणि त्याच्याहीपेक्षा केविलवाणा त्याचा बाप. 'फॅण्ड्री' मधला हा शेवटचा प्रसंग चालतो बराच वेळ, पण तरी तो लांबलेला वाटत नाही. किंबहुना 'फॅण्ड्री' एकूणच ची लांबी हे त्याचं एक बलस्थानच होतं. जेमतेम शंभर मिनिटं - साधारण पावणे दोन तास फक्त - चालते ती कहाणी.
'फॅण्ड्री' चं अजून एक बलस्थान होतं 'नाविन्य'. ती एक अशी कहाणी होती, जी कुणी कधी ह्यापूर्वी सांगितली नव्हती. कुणाला ते कदाचित पेलणारंच नव्हतं. 'हे दाखवून काय मिळणार आहे', असाच विचार त्यामागे असावा, कारण ती कहाणी कुणाला माहित नव्हती किंवा कुणी पाहिलेली नव्हती, असं तर नक्कीच नव्हतं. नागराज मंजुळेंनी ते आव्हान पेललं. मी असं म्हणणार नाही की, 'त्यांनी तो धोका पत्करला.' त्यांना त्यात धोका वगैरे वाटायचा प्रश्नच नव्हता. कारण काही कमवण्यासाठी ती कलाकृती नव्हतीच, त्यामुळे काही गमवण्याचा किंवा न कमवण्याचा धोकाच उद्भवत नाही.
'फॅण्ड्री'मध्ये मला काय आवडलं असं मला कुणी विचारलं, तर उत्तर सोपं आहे. 'उत्कटता.' आणि ही जी उत्कटता 'फॅण्ड्री'त आहे, ती माझ्या मते तरी वरील दोन कारणांमुळे आहे.

Sairat.jpg

'सैराट' ह्याच दोन बाबतींत 'फॅण्ड्री'समोर खूपच कमी पडतो.
तब्बल तीन तासांची लांबी, 'सैराट'ला खऱ्या अर्थाने पसरट करते. सुरुवातीच्या कमीत कमी एक तासाच्या चित्रपटाला जर पूर्णपणे कापून टाकलं असतं, तर काय झालं असतं, असा एक विचार मनात येतो. हा एक तास - सव्वा तासाचा सिनेमा चक्क रवी जाधवांनी केलेला वाटतो. ह्या तास - सव्वा तासात मिसरूड फुटलेली पोरं टवाळक्या करतात. समवयस्क मुलींवर लाईन मारतात. ह्या तास - सव्वा तासात किती तरी वेळा नायक-नायिका एकमेकांशी फुल्ल फिल्मी नजरानजर करतात. म्हणजे बाजूनी जाता जाता नजरा भिडवणे वगैरे..! लव्ह लेटर्स दिली जातात आणि टाका भिडतो.
मग अजय-अतुलच्या ट्रेडमार्क स्टाईलच्या बुंगाट गाण्यावर पब्लिक झिंगाट नाचतं आणि त्यानंतर खरा सिनेमा सुरु होतो.

इथून पुढचा सिनेमा क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' आहे. QSQT मध्ये खानदानी दुष्मनी असते, इथे जातीय भेद. QSQT मध्ये नायिकेकडच्या एका कौटुंबिक सोहळ्याच्या वेळी प्रेम प्रकरण उघडकीला येतं, इथेही तसंच. QSQT मध्ये दोघे जण पळून जातात आणि एका तात्पुरत्या घरात आश्रय घेतात, तेव्हा समजतं, नायिकेला तर चहासुद्धा करता येत नाही, इथेही तसंच. मग जसं 'साथिया'मध्ये नायक-नायिकेत अहंकार आड येऊन दुरावा निर्माण होतो, तसा इथेही काही मिनिटांसाठी होतं. कहाणी अपेक्षित वळणांनी अपेक्षित शेवटापर्यंत जाते. ह्या सगळ्या प्रवासात छोटे-छोटे फिल्मी योगायोगही बरेच जुळून आलेले आहेत. पळून जाण्यासाठी किनाऱ्यावर एक unattended मोटारबोट तयारच असणं, (पहिल्या वेळेस) भरपूर चोप मिळालेला असतानाही कुठे जखमा नसणं, (दुसऱ्या वेळेस) गुरासारखा मार खाऊनही किरकोळ जखमांसह पळ काढू शकणं, ज्या रस्त्याने गाडी जाणार आहे, त्याच्या बाजूलाच पोरांना बदडणं की अगदी लगेच दिसून यावं, वगैरे.

'सैराट'च्या संगीताचीही एक हवा आहे. 'अजय-अतुल' ने धूम मचवली असली, तरी सगळ्याच गाण्यांवर त्यांच्याच कुठल्या न कुठल्या गाण्याची (नेहमीप्रमाणे) छाप दिसतेच. 'झिंगाट' गाण्यावर बेभान होऊन नाचणारं अख्खं सिनेमागृह मी पाहून आलो आहे. अनेक दिवसांनंतर अशी जादू कुणी केली आहे. ह्या 'X-factor' बद्दल तर वादच नाही. गाण्यांचं संयोजनही केवळ अफलातून झालं आहे. 'हॉलीवूड'मध्ये संगीत संयोजन केलं गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. भरमसाट वाद्यांचा मेळ कसा असतो, हे समजून घेण्यासाठी भन्साळीने इकडे शिकवणी लावावी म्हणतो ! कुठेही कर्णकर्कश्य न होताही सांगीतिक भव्यता कशी असते, हे 'सैराट'ची गाणी दाखवतात. खास करून 'सैराट झालं' आणि 'याड लागलं' मधला वाद्यमेळ तर ऐकावाच.

'ऑनर किलिंग' ही उत्तर भारताच्या बऱ्याच भागांतली एक भीषण समस्या आहे. गुन्हेगारी जगतातल्या सत्यघटनांवर आधारित एका कार्यक्रमात अशीच एक कहाणी मागे पाहिली होती. 'सैराट'चं कथानक त्या सत्यघटनेवर बेतलेलं आहे. कहाणीतली सगळी वळणं आधीच कळून येतात. शेवटही माहितच असतो, पण अचूक नेम साधून शेवटाचा दगड थेट भिरकावण्याचं नागराज मंजुळेंचं कौशल्य व्यावसायिकतेचा कीडा चावल्यावरही अबाधित आहे. हा शेवट पायाखालची जमीन, डोक्यावरचं छप्पर, बुडाखालची खुर्ची सगळं बाजूला करतो. पोटातली आतडी पिळवटतो आणि डोक्यातला मेंदू बधीर करतो. डोळे थिजतात, हात-पाय गारठतात आणि ओठांना कंप सुटतो. केवळ ह्या शेवटासाठी दिग्दर्शक मंजुळे हवे होते, बाकीच्या पसाऱ्यासाठी कुणीही, अगदी कुणीही चाललं असतं.
समजा, हा चित्रपट 'फॅण्ड्री' वाल्याचा नसता, दुसऱ्या कुणाचा असता तर ?
तर हा एक महान चित्रपट असता. कितीही काहीही म्हणा, कुणी केलंय ह्यावर त्याचं मूल्यमापन ठरतंच ठरतं. जो मुलगा अभ्यासूच आहे, तो जर पहिल्या ऐवजी दुसऱ्या क्रमांकावर आला तर ते जास्त धक्कादायक असतं आणि काठावर पास होणारं एखादं दिवटं टपकलं, तरी विशेष काही घडलेलं नसतंच ! मंजुळेंचा दुसरा क्रमांक आला आहे, हे धक्कादायक आहे.
तीन तासांपैकी फक्त पाच मिनिटं मंजुळे दिसतात, एरव्ही दिसत नाहीत ही चित्रपटाची दुसरी शोकांतिका आहे. 'नागराज कमर्शियल मंजुळे' मला तरी पाहायचा नव्हता, इथून पुढेही पाहायचा नाहीय. त्यासाठी त्यांना किशोरवयीन प्रेम ह्या आजच्या मराठी चित्रपटाच्या जिव्हाळ्याच्या विषयापासून जरा वेगळं व्हावं लागेल. कारण आत्तापर्यंतच्या त्यांच्या दोन्ही चित्रपटांत हा समान धागा आहे.

नवीन चेहरे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू आश्वासक आहेत. नायिकेच्या भूमिकेसाठी एखादा चिकना चेहरा न निवडता रफ अ‍ॅण्ड टफ रिंकू निवडणं हा मास्टरस्ट्रोक होता. आकाश ठोसरसुद्धा एकदम मातीतला वाटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची निरागसता आहे. दोघेही फ्रेश असल्यामुळे कुठेही ते व्यक्तिरेखेच्या पुढ्यात येत नाहीत. नायकाच्या मित्रांच्या भूमिकेतल्या दोघांची नावं नीट कळू शकली नाहीत. (क्षमस्व) सुरेश विश्वकर्मा, सुरज पवार आणि तानाजी गालगुंडे ह्यांपैकी दोघे असावेत आणि उरलेला नायिकेचा भाऊ ! दोघा मित्रांची कामंही जबरदस्त झाली आहेत. खासकरून लंगड्या प्रदीपचं काम खूपच मस्त !

'सैराट' एकदा पाहण्यासारखा आहे. पण नागराज मंजुळेंचा चित्रपट म्हणून पाहिल्यास अपेक्षाभंग हमखास आहे. काही वेळेस संवेदनशील मनाला व्यावसायिकतेचीही एक दुसरी बाजू असते, हे एक नव्याने शिकता येऊ शकेल.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/04/movie-review-sairat.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण इथल्या रिव्यू पेक्षाही त्यांच अब्ज़र्वेशन कडक...प्रत्येक सीन आणि त्यातल्या चुका एका पेक्षा एक सांगत होते ते...शेवटला आर्ची आणि पर्श्याच्या बाळाचे पाय तया लंगडया सारखे कसे काय ? हे त्यांच वन ऑफ बेस्ट अब्ज़र्वेशन ..लोल

पोरांच्या खांद्यावर बंदूक ठेउन गोळ्या मारणं चाललंय का? हे जे बोलत आहात ते इतकं चिप आहे कि केवळ सडक्या मेंदूतच असे काही येऊ शकेल.

भाऊ जे मी ऐकलं आहे तेच सांगतोय...चीप ? चित्रपटात काय भजन दाखवलय का ? हे चीप आहे तर

..

सूकूरा हे सैराट चे संस्कार आहेत...इथे केजरीवालीया झालय वाटत सगळ्यांना लोल्झ ... जातिव्यवस्था जातिव्यवस्था करता करता सैराटचे दुष्परिणाम तुम्ही मान्य करायला तयार नाही ...जातीव्यवस्थेवर भाष्य करताना तुमची संस्कारीक पातळी सांभाळावी ..असो इथल्या सर्व केजरींना माझंही तेच उत्तर आहे जसे सगळ्याच असते...दुर्लक्ष...

काय चिप दाखवलंय ज्यामुळे त्या तथाकथित मुलांना असे वाटावं. च्यायला ऐकतोय म्हणून काय पण फेकायचे का? नाही आवडला ना तुला विषय संपला. इथे येऊन तुझी सडकी मनोवृत्ती नको दाखवू.

ओके सर...जेव्हा तुमच्या घरात सैराट घडेल तेव्हा अशीच पुरोगामी विचारसरणी ठेवा...सॉरी सर सैराट मध्ये खूप संस्कार घडवनारे विचार मांडण्यात आलेत...सगळ्या मुला मुलींनी ते आचरणात आणायला पाहिजे

तुझ्या सुंदर शुभेच्छासाठी धन्यवाद. झाली का आता तरी मळमळ ओकून तर निघायचं घ्या आता.
का अजून काही सडके विचार मांडायचे आहेत?
मुलांनाच्या नावाखाली.

गेट वेल सून

जातिव्यवस्था जातिव्यवस्था करता करता सैराटचे दुष्परिणाम तुम्ही मान्य करायला तयार नाही ...जातीव्यवस्थेवर भाष्य करताना तुमची संस्कारीक पातळी सांभाळावी
>>>>

अगदी बरोबर.

अहो त्या मुलांच्या पालकांनी त्यांना एवढा वाईट सिनेमा का दाखवला?
ती मुल खुप संवेदनशिल मनाची असावित पटकन इफेक्ट्,संस्कार झाला मग तो इफेक्ट पुसण्यासाठी
लगेच श्यामची आई बाबा आमटे दाखऊन आधिचे संस्कार पुसायचे आणि नविन संस्कार चढवायचे किती सोप आहे.

सूकूरा वाईट सवयी लागायला वेळ लागत नाही....तसंच आहे वाईट विचारांचे...चांगले विचार आणि संस्कार व्हायला वेळ आणि मेहनत लागते....म्हणूनच बाबासाहेब,शिवाजी महराज, गांधीजी एकदाच निर्माण होतात...प्रत्येकजण तेवढी उंची गाठूशकत नाही

सैराट वाईट सवई शिवाजी महाराज.कशाचा काय ताळ-मेळ आहे का?
एका प्र्श्नाचे उत्तर द्या त्यांना सैराट कोणी दाखवला?

म्हणजे चांगला माणूस चांगल्या विचारांनी घडतो...आणि चांगले विचार हे आजुबाजुला असणाऱ्या व्यक्ती, परिस्थिती मुळे निर्माण होतात

जातिव्यवस्था जातिव्यवस्था करता करता सैराटचे दुष्परिणाम तुम्ही मान्य करायला तयार नाही ...जातीव्यवस्थेवर भाष्य करताना तुमची संस्कारीक पातळी सांभाळावी

>>>>

एकवेळ सैराटमुळे मुलामुलीने जातीबाहेर लग्न केले आणि पळून गेले असं म्हटलं तर मान्य करता येईल.
पण 'पर्श्याच्या बाळाचे पाय तया लंगडया सारखे कसे काय?' टाईप विचार मनात येईल असे संस्कार सैराटमधून कुठे (कुठल्या वाक्यातुन किंवा प्रसंगातून किंवा पात्ररचनेतून) केलेत कळेल का?

अजून एक अवांतरः सर्व नवीन चालायला लागलेली लहान मुले अशीच चालतात हे तुम्हाला किंवा तुमच्या चुलत भावाला माहित नाही का? इथले डॉक जास्त चांगलं सांगू शकतील. पण लहान मुलांच्या हाडांची पूर्ण वाढ होऊन त्यांना बळकटी आलेली नसते. त्यामुळे बहुतेक..

मी सैराट पाहिला आणि जितका हाईप केलाय तितका मलाही भावला नाही.
पण उगाच विरोधासाठी विरोध म्हणून काहीही बोलणे पटत नाही.

सर.. पोरं ती...थेटरात केलेल्या कॉमेंट्स आणि इकडेतिकडे ऐकून बोलत असतील...आता मोठे जे करतात जे बघतात त्याच अनुसरण करणार ते...तरीपण ज्यांना आपल्या मुलांना सैराट दाखवायचा आहे त्यानी दाखवावे...मी तर कॉलेज स्टूडेंट आहे मला अजून खूप वेळ आहे संस्कार वैगेरे घडवाय्ला...नमस्कार

अरे बास झालं आता... फार बिनकामाचा किस पाडून झालाय... उगाच फालतूपणा.. अगदीच वेळ जात नसेल तर दुसरं काही तरी करा. पण इथल्या गप्पा बास झाल्या आता....

या पेक्षा रोहित वेमुलावर चर्चा करा. ती कारणी लागेल.
असो. मी जरा काही तास बाहेर जातेय सॉरी जातोय. मग मी माझ्या कॉमेन्ट देईन. पण. जाऊ द्या नाहीच देत कॉमेन्ट्स...

रोहित वेमुला मागे पडला, त्याच्या जागी कनैय्या आला आणि तोही आता मागे पडला. कालचा हॉट टॉपिक केरळ विरुद्ध सोमालिया होता. तो अजूनही हॉट आहे कि थंड पडला माहीत नाहीय तोवर धागा काढून थोडा TP आय मिन चर्चा करा. वेळ मिळाला आणि मूड असेल मीही नवा धागा वाचून ज्ञानकण गोळा करेन.

Pages