'कोकणमय' (१) — वालावल, नेरूरपार आणि धामापूर

Submitted by जिप्सी on 21 February, 2012 - 23:40

'कोकणमय'

=======================================================================
=======================================================================
कोकणमय या मालिकेतील हा पहिला भाग Happy या भागाची सुरुवात करण्याआधी कोकण फिरण्यास/जाणुन घेण्यास मायबोलीकर नीलू, भाऊकाका नमसकर, अतुलनिय, विवेक देसाई, नीलवेद, यो रॉक्स, साधना यांनी मोलाची मदत केली. आभार परक्यांचे मानायचे असतात म्हणुन त्यांचे आभार मी मानणार नाही. खरंतर याचा उल्लेख प्रस्तावनेच्या धाग्यात यायला हवा होता, पण राहुन गेलं. Happy
=======================================================================
=======================================================================

"योग्या, हे माझ्या गावचे फोटो" नरेश त्याच्या गावचे फोटो दाखवत होता.
कुठंल रे गाव?
कुडाळ जवळील "सरंबळ""
नरेशच्या गावचे फोटो पाहत होतो. कोकण म्हटल्यावर जसं चित्र समोर येतं तसंच ते गाव फोटोत भासत होतं. (आधीच्या भागातील प्रचि ०२ Happy ) तीच ती लाल मातीतली वाट, काजुच्या बागा, विहिर, अंगणातले पक्षी (हॉर्नबिल आणि स्वर्गीय नर्तकाचे काही फोटो होते :-))
"चलो तर मग यंदाची कोकण भटकंती तुझ्या गावातुनच सुरू करू."
साधारण नोव्हेंबर मध्ये कोकण भटकंतीचा प्लान शिजला. पण तारीख ठरत नव्हती. डिसेंबर हरीश्चंद्रगड आणि इतर भटकंती, जानेवारीमध्ये दोघांच्याही प्रचिंचे प्रदर्शन, राजमाची आणि दिनेशदा गटग यामुळे प्लान पुढे जात होता. शेवटी कुठल्याही परीस्थिती फेब्रुवारीमध्ये जायचेच ठरले. ऑफिसमधील आम्ही सहा आणि नरेशचे दोन मित्र असे आठजण तयार झालो. प्लान तयार झाला आणि गुरूवारी ९ फेब्रु. ला रात्री निघुन मंगळवारी १४ ला पहाटे परत परतायचे ठरले. यात कुडाळ (सरंबळ), धामापूर, वालावल, निवती, वेंगुर्ला, अरवलीचा वेतोबा, रेडीचा गणपती, मोचेमाड समुद्रकिनारा, मालवण, आंगणेवाडी , सिंधुदूर्ग किल्ला, तारकर्ली, देवबाग, कुणकेश्वर आणि शेवटी विजयदुर्ग असा भरभक्कम बेत होता. Happy निघण्याच्या आदल्यादिवशी एक टांगारू निघाला. शेवटी आम्ही सातजण ठरल्याप्रमाणे (आरामात ;-)) गुरूवारी रात्री १०:३० - ११ च्या सुमारास विक्रोळीहुन क्वालिसने निघालो. सुरूवातीला गप्पाटप्पात रमलेल्या एकेकांची विकेट रात्री १-२ नंतर पडु लागली (अर्थात ड्रायव्हरच्या बाजुला बसलेला सोडुन Wink ). सकाळी साधारण ७-८ च्या सुमारास आम्ही कुडाळमार्गे सरंबळला पोहचलो. घर बंदच असल्याने सकाळी सगळ्यांनी मिळुन आधी घर स्वच्छ केले. बॅगा टाकल्या आणि चुल पेटवून आंघोळीसाठी पाणी ठेवले. चुलीवरच्या गरम पाण्यात एक वेगळाच गंध असतो तो मला स्वतःला खुप आवडत असल्याने आंघोळ झाल्यावर अधिकस फ्रेश वाटु लागले. Happy शुचिर्भुत होऊन मी आणि नरेश गावात एक फेरी मारण्यास निघालो. खरंच गाव खुप सुंदर होते. दुरंगी बाभुळ, रीठा, काजुच्या बागा पहात/ फोटो काढत फिरत असतानाच हॉर्नबील, कोतवाल, अजुन एका सुंदर पक्ष्याने दर्शन दिले (फोटो काढता आला नाही Sad ).

प्रचि ०१
(दुरंगी बाभूळ, रीठा आणि काजू)

गावात फिरून परत घरी येईपर्यंत इतरजणांची तयारी झाली होती. नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो, त्याआधी सरंबळ गावच्या श्री देवी सातेरीचे दर्शन घेतले. मंदिराचे काम चालु होते पण मंदिर आणि परीसर खुपच सुंदर होता. ("सातेरी" म्हणजे "वारूळ".)

प्रचि ०२
श्री देवी सातेरी मंदिर (सरंबळ, कुडाळ)

प्रचि ०३
श्री देवी सातेरी

सरंबळ गावातुन धामापुरला जाण्यासाठी एक रस्ता आहे तेथुनच आम्ही धामापुर, वालावल मार्गे निवतीला (मुक्काम) पोहचणार होतो. पण त्या रस्त्याचे काम चालु असल्याने आम्हाला पुन्हा गावाला वळसा घालुन कुडाळ-धामापूर रस्त्याने जावे लागले. इथे थोडीशी गफलत झाली. खरंतर पहिल्यांदा धामापूर करून नंतर वालावल आणि मग पाट मार्गे निवती असं केलं असत तर वेळ वाचला असता पण आम्ही पहिल्यांदा वालावल नंतर धामापूर आणि परत वालावलला येऊन पाट मार्गे निवतीला गेलो. अर्थात याचा एक फायदाच झाला. आम्हाला नेरूर या निसर्गरम्य गाव पाहता आले. Happy
सरंबळहुन थोड्याच वेळात आम्ही श्री लक्ष्मीनारायणाच्या दर्शनासाठी "वालावल" गावी पोहचलो. आजपर्यंत वालावल गावाबद्दल जे ऐकल होतं अगदी तसाच परीसर पाहत होतो. (यावेळी आमच्या कडे कॅनन 1000D आणि 1100D असे दोन कॅमेरा असल्याने एका कॅमेर्‍याला 75-300 लेन्स आणि दुसर्‍याला 18-55 लेन्स लावली होती, सारखी लेन्स बदलायला नको म्हणुन :-), अर्थात याचा फायदाच वालावल तलावाजवळ किंगफिशर, नीलपंख टिपण्यासाठी झाला.)
वालवल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर:
कुडाळ शहरापासुन १५ किमी अंतरावल असलेलं श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे हेमाडपंथी वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. गर्द वनराईने नटलेलं वालावल गाव आणि मंदिरालगतचा सुंदर व शांत तलाव मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर घालतो. हे मंदिर सुमारे आठशे वर्षापूर्वेचे असल्याचे जाणकार सांगतात. या मंदिराचं बांधकाम चौदाव्या शतकात सूर्यभान आणि चंद्रभान प्रभुदेसाई या महापराक्रमी बंधूंनी केले. त्यांची स्मारके श्री लक्ष्मीनारायण मंदिरासमोरील दीपमाळांजवळ कल्याण पुरूष म्हणुन उभी आहेत. हे मंदिर पूर्वाभिमुख असुन याची रचा त्रिस्तरीय आहे. मुख्य देवळी पुरातन असून या मंदिराच्या बांधकामामध्ये पूर्णतः सागवानाचा वापर केला आहे. सभामंडपातील त्याकाळी बसवलेली लादी कारागीरांचे कसब दाखविणारी आहे. या अतिप्राचीन मंदिरात असलेले कोरीवकामाचे स्तंभ देखणे असून मंदिरात अतिशय सुंदर आणि देखणी अशी श्री लक्ष्मीनाराययाची मूर्ती आहे. मंदिराचा सभागार प्रशस्त असुन येथील दगडी खांबावर व तुळईवरही कोरीवकाम केलेले आढळते. मुख्य दरवाजा उंचीला कमी असून, त्यावर अप्रतिम कमळांच्या फुलांचे कोरीवकाम केलेले आहे. मंदिराच्या समोरील द्वारपाल तसेच डोक्यावरील विष्णूची मूर्तीही प्रेक्षणीय आहे. रामनवमीला येथे नऊ दिवस यात्रा असते. वालावल गावची कोणतीही व्यक्ती पंढरपूरची वारी करत नाही, असा गावचा रिवाज आहे. मला स्वतःला सर्वात आवडलेलं ठिकाण म्हणजे वालावल.
मुंबई ते कुडाळ अंतर ~३९५किमी. कुडाळ ते वालावर अंतर ~१०-१२ किमी.

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

(प्रचि: नरेश)

प्रचि १९

(प्रचि: योगेश)

वालावल गावच्या निसर्गमय मोहपाशातुन स्वत:ला नाईलाजाने सोडवून घेत आम्ही धामापूरला निघालो. वाटेतच नेरूरपार हे अतिशय शांत व रमणीय गाव लागले. नेरूरपार नदीच्या पुलावरून नदीचे आणि गावचे अतिशय मनमोहक सौंदर्य दिसते. वाटेतच कलेश्वराचे मंदिर आणि त्याच्या जवळच असलेल्या आणि कमलपुष्पांनी भरलेल्या तलावाने मोहिनी घातली आणि गाडी कलेश्वर मंदिराकडे वळवली.

प्रचि २०

प्रचि २१
नेरूर कलेश्वर:
कुडाळ तालुक्यातील कलेश्वराचे मंदिर अतिशय सुंदर असुन कोरीव कलाकुसरेने नटलेले आहे. चौकोनी आकाराची शिवपिंडी हे येथील वैशिष्ट्य आहे (कलेश्वर मंदिरातील फोटो घेण्यास मनाई होत). मंदिरात सहा खांब अप्रतिम कोरीवकामाने सजवले आहेत. या मंदिरा शेजारीच असलेले दुसरे व स्वतंत्र मंदिर आहे ते श्री ब्रह्मदेवाचे. ब्रह्मदेवाची मंदिरे फारशी नाहीत त्यामुळे हे मंदिर अतिशय वेगळे आणि आवर्जुन पाहण्यासारखे आहे. भारतात ब्रह्मदेवाची तीन मंदिरे असुन त्यापैकी एक नेरूर येथे असुन ब्रह्मदेवाशेजारी विष्णू-लक्ष्मी, सावित्री व गायत्री देवता आहेत. ब्रह्मा, विष्णु व महेश या तीन देवतांची मंदिरे असणारे हे एकमेव प्रसिद्ध
देवस्थान.

प्रचि २२
कलेश्वर मंदिर

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६
ब्रह्मदेवाचे मंदिर आणि मूर्ती
प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

नेरूरपार गावच्या निसर्गसौंदर्याचा पुरेपुर आस्वाद घेत आमची गाडी निघाली धामापूरच्या भगवती मंदिराकडे.

कोकणातील धामापूर हे अजुन एक अत्यंत निसर्गसंपन्न गाव आहे. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सुप्रसिद्ध धामापूरचा तलाव. सुरूवातीला आपल्याला दिसते ते येथील श्री भगवती देवीचे मंदिर. मंदिराच्या थोड्या पायर्‍या चढुन गेल्यावर श्री भगवती देवीचे दर्शन घडते. हे हि मंदिर पुरातन असुन कोरीव कलाकुसर केलेले आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ व सुंदर असून भगवती देवीची मूर्तीही अतिशय आकर्षक व सुंदर आहे. मंदिराला लागुनच अंडाकृती रचनेचा अतिशय सुरेख तलाव आहे. पाण्यात उतरण्यासाठी पायर्‍यांची सोय केलेली आहे. या तलावाविषयी एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी - फार पूर्वी धामापूरमध्ये ज्यांच्या घरी लग्नसमारंभ असेल, ती व्यक्ती लग्नाच्या आदल्या रात्री फुलांनी बनविलेले दागिने एका परडीत घालून ते तळ्यात सोडत असे. दुसर्‍या दिवशी त्या परडीतील दागिने सोन्याचे झालेले असत. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर दुसर्‍या दिवशी ते दागिने पुन्हा तळ्यात सोडले जात असत. खूप वर्ष असं चाललं. मात्र, एका व्यक्तीला दागिन्याचा लोभ झाला आणि त्याने ते दागिने तळ्यात न सोडता स्वतःकडेच ठेवले. त्यावेळी भगवती देवीचा कोप होऊन हि प्रथा पुढे बंद झाली. स्थानिक संस्थेमार्फत या तलावामध्ये बोटिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे कितीही पऊस पडला तरीही या तळ्यातील पाणी वाहत नाही व कितीही दुष्काळ पडला तरीही येथील पाणी आटत नाही.
कोकणातील मंदिरे मला का आवडतात हे कुणी विचारल्यास माझे उत्तर असेल, शांत, निवांत आणि स्वच्छ मंदिर व परीसर आणि तेथील आख्यायिका. Happy

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

निसर्गसौंदयाने ओतप्रोत भरलेल्या या गावांची भेट आम्हाला पर्यटन आणि तिर्थाटन या दोन्हीचा अनुभव देऊन गेली. या तीनही गावांना भेट दिल्यावर कि मला वि.स.खांडेकरांच्या एका कवितेची प्रकर्षाने आठवण झाली.

रम्य अशा स्थानी
रहावे रात्रंदिन फुलुनि

मंजुळ घंटा सांजसकाळी
गोकुळ गीते गातिल सगळी
होउनि स्वप्नी गौळण भोळी
वहावे यमुनेचे पाणी

रंगवल्लिका उषा रेखिते
सिंदुर भांगी संध्या भरते
रात्र तारका दीप लावते
पहावे अनिमिष ते नयनि
रम्य अशा स्थानी
रहावे रात्रंदिन फुलुनि.......

वालावलच्या श्रीलक्ष्मीनारायणाचे, नेरूरच्या कलेश्वराचे आणि श्री भगवती देवीचे दर्शन घेतल्यावर आम्ही पाट मार्गे "निवतीला" मुक्कामासाठी निघालो.

(तटि: मंदिराची माहिती "कोकण पर्यटन" पुस्तकातुन साभार)

(क्रमशः)

गुलमोहर: 

..पोस्ट ऑफिसजवळचं मंदिर गौरीशंकराचं!
मुक्त धावणारा परश्या आणि थव्याने उडणारे पक्षी हे देवबाग-भोगव्याच्यामधे समुद्रात वाळूचा जो पॅच तयार होतो फेब-मार्च मधे तिथे.
हा समुद्रात जो वाळूचा पॅच तयार होतो त्याला या भागांत मोबार म्हणतात. देवबागला टोकाकडे मोबारेश्वराचं मंदिरही आहे. याला मोबारेश्वर नांव कसं पडलं, विचारल्यावर एकाने मला ही माहिती सांगितली होती.

पोस्ट ऑफिसजवळचं मंदिर गौरीशंकराचं! <<
बरोबर गोफनाच आणि दशावतारातली दृश्य तिथेच शूट झालीयेत.

जिप्सी , वालावल हे माझ्या आईच्या मावशीचे गाव. तिला तिच्या स्वतःच्या गावाची (मालवण) आठवण येत नाही, तितकी वालावलची येते. माझ्या लहानपणी (गेल्या सहस्त्रकातली गोष्ट) आम्ही वालावलीला गेलो होतो. तिथल्या देवळातले भव्य सभागार आणि लांबरुंद पायर्‍या असलेले तळे आणि त्याबद्दल आईने सांगितलेली (कुठल्यातरी उत्सवाच्या वेळी अंगात आलेलं कोणीतरी अनावर होऊन या तळ्यात बुडून गेल्याची) आठवण, (तेही त्या पायर्‍यांशी पाय धुताना! )एवढंच मला आज आठवतंय.
हे सगळे फोटो मी मुद्दाम आईला दाखवले. तिच्याकडून स्पेशल थँक्स Happy

रंगासेठ, भरत धन्यवाद Happy
हे सगळे फोटो मी मुद्दाम आईला दाखवले. तिच्याकडून स्पेशल थँक्स>>>>आईंना माझ्याकडुन नमस्कार आणि धन्यवाद सांगा. Happy

वॉव ! सही ! वालावल गाव तर अगदी स्वप्नात असावं तसं गाव ! नावासकट आवडलं Happy या सुट्टीत जावंच आता Happy

मी साधारण पहिली दुसरीत असताना आम्ही कट्ट्याला राहायचो!! तेव्हा माझे बाबा मला फिरायला धामापुरला घेऊन जायचे! आठवण आली त्याची!

अरे,हो. एक सांगायचंच राहून गेलं. धामापूरचं तळं इतकं मोहित करणारं आहे कीं मालवणीत एक म्हणच पडली आहे- " चुकलां ढोर, धामापूरच्या तळ्यार " ! [ अर्थ - गुरं जर संध्याकाळी घरीं आलीं नाही , तर तीं धामापूरच्या तळ्यावरच रंगलीं असणार, असं समजावं !]

जगातले सर्व चांगले ..अप्रतिम शब्द कमी आणि फिके पडावे ...इतके नितांत सुंदर प्रचि आणि वर्णन ...व्वा ..जिप्सीजी ..परत ...एक कोकण मालिका .....होऊ द्या ...तुम्हाला माहित नाही कि तुम्ही कोकण पर्यटनाला किती हातभार लावत aआहेत ते .......छान ......चालुक ठेवा ..हा उपक्रम .. Happy

Pages