मानवाधिकारांना वंचित झालेली बलुचिस्तानची जनता!
मूळ लेखक: श्री. मलिक सिराज अकबर, अनुवाद: सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)
"प्रत्येक हरवलेल्या माणूसाला मी माझा मुलगाच मानतो" असे अब्दुल कादिर बलूच नेहमी म्हणतात! त्यांचा मुलगा जलील रेकी हरवला आणि अडीच वर्षानंतर मृत अवस्थेत सापडला.
अब्दुल कादिर बलूच ६० वर्षाचे असून सेवानिवृत्त बँक कर्मचारी आहेत. प्रत्येक वर्षी या अतीशय महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय "मानवी हक्क दिवसा"च्या निमित्त्याने (१० डिसेंबर रोजी) क्वेट्टा या बलुचिस्तानच्या राजधानीत उपोषण शिबिरें, पत्रकार परिषदासारख्या यासारखे खास उपक्रम योजतात आणि ज्या कुटुंबातील सदस्य-राजकीय कार्यकर्ते, विद्यार्थी आणि व्यावसायिक-वगैरे हरवले आहेत त्यांचे आर्त आवाज जनतेला ऐकविण्याचा प्रयत्न करतात.
१३ फेब्रूवारी २००९ पर्यंत कादिरसाहेब अशा जहाल चळवळींपासून कटाक्षाने दूर राहिले होते. त्या दिवशी कांहीं साध्या वेषातील अधिकारी त्यांच्या ३५ वर्षें वयाच्या मुलाला-जलील अहमद रेकीला-घेऊन निघून गेले. कुटुंबातला एकच मिळवता मुलगा बेपत्ता झाल्याने कादीर यांचे आयुष्यच उद्ध्वस्त होऊन गेले. त्याची सुटका करून घेण्याच्या उद्देशाने ते "बेपत्ता बलुचींची प्रतिकारवाणी" (VBMP i.e. Voice for Baloch Missing Persons) या संस्थेचे सभासद झाले. ही संस्था ज्यांचे कुटुंबीय हरवले आहेत त्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करते. आणि या तथाकथित बेपत्ता झालेल्या लोकांच्या सुटकेसाठी प्रयत्नशील असते.
कादीर यांचा हरवलेला मुलगा जलील कादीर हा नियमितपणे राष्ट्रीय पातळीवरील "बलूच गणतांत्रिक पक्षा"च्या (Baloch Republican Party) प्रमुख्य प्रवक्त्याचे काम करीत होता. हा पक्ष नैसर्गिक संपत्तीचे वरदान असलेल्या बलुचिस्तान प्रांताच्या स्वायत्ततेसाठी प्रयत्नशील होता. जलील हा बोलण्यात वाकबगार, लोकांवर छाप पाडणारा आणि स्थानिक वृत्तसंस्थांशी जवळचे संबंध प्रस्थापित केलेला माणूस होता. कादीरसाहेबांनी आपल्या मुलाच्या सुटकेसाठी जंग जंग पछाडले पण त्याला अटकेत टाकणार्यांच्या तावडीतून त्याची सुटका करण्यात त्यांना अजीबात यश आले नाहीं. आता VBMP या संस्थेच्या कामात लक्ष घालायला सुरुवात केल्यावर त्यांच्या लक्षात आले कीं अशा "बेपत्ता झालेल्या कुटुंबियांचे" दु:ख सहन करावे लागणारी आणि या आपत्तीला तोंड देणारी त्यांच्यासारखी इतर कुटुंबेही होती.
"बेपत्ता झालेल्या प्रत्येक मुलाला मी माझाचामुलगा समजतो" असा दिलासा त्यांनी अशा कुटुंबांना दिला. नुकतीच त्यांची VBMP चे उपाध्यक्ष म्हणून पदोन्नतीही झाली होती. या नव्या जबाबदारीबरोबरच त्यांच्यावरचा कामाचा दबावही वाढला. ऑक्टोबरमध्ये दोन साध्या वेषातील गुप्तहेरांनी त्यांची क्वेट्ट्या शहरात भेट घेतली आणि बेपत्ता झालेल्या कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठीची त्यांची मागणी ताबडतोब आणि बिनाशर्त सोडून देण्याबाबत त्यांच्यावर दबाव आणण्यात आला. "आपल्या मुलाला जिवंत पहायचे असल्यास त्यांनी उपोषणें करून संप करण्याची कल्पना सोडून द्या" असेही त्यांना बजावण्यात आले. या ताकिदीनंतर आपल्याला वाटणार्या असुरक्षिततेच्या भावनेबद्दल त्यांनी वृत्तसंस्थांनाही माहिती दिली.
दोन वर्षांपूर्वी जर कुणी अशी ताकीद त्यांना दिली असती तर त्यांनी ती झिडकारून टाकली असती! पण गेल्या एक वर्षात बलुचिस्तानातील परिस्थिती झपाट्याने आणि नाट्यपूर्णपणे बदलली होती. गेल्या आठ महिन्यात बंदुकीच्या गोळ्यांनी चाळण झालेली अशा "बेपत्ता झालेल्या" २२० व्यक्तींची प्रेते प्रांताच्या वेगवेगळ्या भागात सापडली होती.
थोडक्यात कादीरसाहेबांना आणि त्यांच्या मित्रांना आपल्या प्रियजनांना पकडून घेऊन जाणार्या अटकेत ठेवणार्यांच्या ओंगळ कर्तृत्वाची (काली करतूतोंकी) चांगली जाणीव होती. त्यामुळे त्यांनी त्यांना देण्यात आलेल्या ताकिदीकडे गांभिर्याने पाहिले. पण त्यांना आता या संस्थेला वार्यावर सोडून देणेही व्यवहारिकदृष्टया अशक्य होते. करण या संस्थेने प्रियजनांच्या बेपत्ता होण्याने पीडित असलेल्या या कुटुंबांच्या जीवनात आशेची पालवी फुलविली होती.
"या संस्थेला अशी वार्यावर सोडण्याचा पर्याय आमच्याकडे उरलाच नव्हता." असे कादीरसाहेब म्हणाले. पण ज्यांनी कादीरसाहेबांना ताकीद दिली होती तेही आपल्या "वचना"ला जागले. २४ नोव्हेंबरला हाल-हाल केलेले आणि बंदुकीच्या गोळ्यांनी चाळण झालेले कादीरसाहबांच्या मुलाचे शव तुर्बात जिल्ह्यात सापडले.
या वर्षीचा (२०११चा) "मानवाधिकार दिन" कादीरसाहेबांच्यासाठी पूर्णपणे आगळा-वेगळा होता. कारण आपल्या प्रिय पुत्राचा मृत्यू झाला असला तरी त्यामुळे त्यांचा मनोनिग्रह कमी झाला नव्हताच, उलट त्यांना हरवलेल्या प्रियजनांच्या वाटेकडे डोळे लावून असलेल्या अशाच इतर व्यथित कुटुंबियाच्या बाजूने जोमाने उभे रहाण्यासाठी एक कारण मिळाले होते.
नैतिक आणीबाणी
बलुचिस्तानमध्ये चाललेल्या मानवाधिकारांच्या पायमल्लीबद्दलची आंतरराष्ट्रीय पातळीवरची चिंता वाढत चालली आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांना, मानवाधिकारांबद्दल चळवळ करणार्या वेगवेगळ्या संघांना, संशोधकांना बलुचिस्तानात जायला अधिकृतपणे घातलेल्या मज्जावामुळे बलुचिस्तानमधील आणीबाणीच्या परिस्थितीचे स्वतंत्र विश्लेषण करणे अवघड झालेले आहे.
१६ नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या परराष्ट्रखात्यातील उप-प्रवक्ते मार्क टोनर यांनी बलुचिस्तानमधील परिस्थितीबद्दल घोर चिंता व्यक्त केली. "अँनेस्टी इंटरनॅशनल"चे पाकिस्तानस्थित संशोधक मुस्ताफा काद्री बलुचिस्तानला "पाकिस्तानच्या अनेक गंभीर नैतिक संकटांपैकी सर्वात गंभीर संकट" समजतात. "हा प्रांत झपाट्याने मानवाधिकारांना वंचित झालेला विभाग झालेला असून लष्करी आणि निमलष्करी दले आणि इतर शस्त्रधारी टोळ्या अतीशय बेगुमानपणे जनतेला त्रास देत आहेत" असे मत त्यांनी व्यक्त केले
जागतिक पातळीवर मानवाधिकारांच्या रक्षणाकडे बारकाईने लक्ष देणार्या त्यांच्या संघटनेचे कार्यालय लंडनला असून तिथून काद्रीसाहेब बलुचिस्तानमधील मानवी हत्त्यांच्या आणि तिथली माणसे बेपत्ता होण्याच्या घटना बंद करण्याच्या दिशेने सक्रीयपणे कार्यरत आहेत. असले धोरण चालू ठेवण्याकरिता पाकिस्तानी सरकारकडे कुठलीही सबब नाहीं असे त्यांचे मत आहे.
बलुचिस्तानच्या नागरिकांच्या जगण्याच्या हक्काचे संरक्षण करण्यात सरकारला आलेल्या अशा अपयशामुळे आणि अपहरण, छळवणूक आणि हेरून-टिपून केलेल्या बलूचींच्या हत्त्या यामुळे विविध बलूची जमाती सातत्याने भीतीयुक्त वातावरणात जगत आहेत. पाकिस्तानी सरकार बलुची लोकांच्या राष्ट्रीयत्वाच्या राजकारणासाठी किंवा मुद्दाम बेपत्ता केल्या गेलेल्या बळींना न्याय मिळवून देण्यासाठी जरूर अलेल्या भाषणस्वातंत्र्यावर सातत्याने गदा आणत आहे असाही काद्रीसाहेबांचा दावा आहे.
वर्षानुवर्षे हाल सोसणार्या या प्रांतातल्या नागरिकांना आपले अधिकार मिळतील याची खात्री देण्याचा जोरदार प्रयत्न करायला इस्लामाबाद सरकारला उद्युक्त करण्याच्या उद्देशाने या वर्षीचा "आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन" बलुचिस्तानच्या नागरिकांना अर्पण करायचा पाकिस्तानी मानवाधिकार आयोगाने निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या श्रीमती जोहरा युसुफ यांनी सांगितले कीं २०११ साली जबरदस्तीने बेपत्ता झाल्याची कमीत कमी १०७ नवी उदाहरणे नजरेसमोर आलेली आहेत आणि अशा तर्हेन बेपत्ता झालेले लोक सापडण्याऐवजी त्यांची प्रेते मिळण्याचे प्रकारही वाढू लागले आहेत. जुलै २०१०पासून कमीत कमी २२५ बेपत्ता नागरिकांची प्रेते प्रांताच्या वेगवेगळ्या भागातून मिळाली आहेत. बेपत्ता किंवा मृत बळींबद्दल कुठल्याही व्यक्तीला अद्यापपर्यंत जबाबदार धरण्यात आलेले नाहीं हा लाजिरवाणा प्रकार आहे असेही त्या म्हणाल्या.
पडू लागलेल्या भीतीदायक प्रथा!
सध्या उघडपणे दिसणार्या उदाहरणांवरून बलुचिस्तानच्या मानवाधिकारांच्या भविष्यकाळाबद्दल एक अंध:कारमय चित्रच डोळ्यासमोर येणे सहाजीकच आहे. सर्वप्रथम सांगायचे तर लोकशाहीचे समर्थक, मानवाधिकाराचे कैवारी आणि वृत्तपत्रस्वातंत्र्याचे/लेखनस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते अशा सर्वांनाच या संघर्षात जबरदस्तीने फरफटण्यात आलेले आहे. एका वर्षाच्या कालावधीत दोन HRCP चे दोन सूत्रसंचालक, आठ पत्रकार आणि निर्वासितांच्या पुनर्वसनाचा एक खंदा पुरस्कर्ता अशा कमीत कमी ११ लोकांचे हालहाल करून वध करण्यात आलेले आहेत. याखेरीज तथाकथित "मारा-आणि-उकीरड्यावर-फेकून-द्या" पद्धतीच्या या मोहिमांकडे पहिल्यास बलुचिस्तानमधील अत्याधुनिक, सुविकसित, बेकायदेशीर आणि सध्या अस्तित्वात असलेल्या छळणुकीच्या जाळ्याचे ओझरते दर्शन होते. उदाहरणार्थ कादीरसाहेबांच्या मुलासारखा एकादा कार्यकर्ता क्वेट्ट्याहून बेपत्ता होतो आणि तिथून ८५० किमी अंतरावरील केच जिल्ह्यात मेलेला आढळतो तेंव्हा या सततच्या आणि माग लागू न शकणार्या अशा क्रौर्यकर्मात गुंतलेल्या या लोकांच्या कार्यक्षम कार्यवाहीतील आणि रसदशास्त्रातील (Logistics) अभूतपूर्व क्षमतेची स्पष्ट कल्पना येते.
दरम्यान "बलोच मसला दफाई तांझीम"[१] (Baloch Armed Defence Organisation) या नावाने वावरणार्या एका भूमिगत संघटनेने खुझदार जिल्ह्यातील चार पत्रकारांची नावे त्यांच्या "कत्तल-यादी"त असल्याचे जाहीर केले असून धमकी दिली आहे कीं बलुची राष्ट्रवाद्यांच्या भावी उपक्रमांबद्दल आणि कार्यक्रमांबद्दल जर माहिती दिली तर त्यांना जिवे मारण्यात येईल. "खुझदार जिल्हा पत्रकार संघा"च्या (Press Clubच्या) कमीत कमी चार माजी अध्यक्षांना आणि दोन सभासदांना आतापर्यंत कंठस्नान घालण्यात आलेले आहे. यावरून या जिल्ह्यातील पत्रकारांना मिळणार्या धमक्यांबद्दल स्पष्ट कल्पना येईल.
अशा संकटकाळात मानवाधिकारांच्या समर्थकांना मिळणार्या धमक्यांविरुद्ध, त्यांच्यावर होणार्या खुनी हल्ल्यांविरुद्ध आणि नागरिकांना बेपत्ता करणार्यांविरुद्ध लढायची पाकिस्तानच्या केंद्रीय सरकारची अथवा बलुचिस्तानच्या राज्य सरकारची नेमकी कुठली भूमिका आहे हे स्पष्ट दिसत नाहीं. लोकशाहीच्या मानवाधिकारांच्या समर्थकांवर असे धडधडीत आणि कायद्याला न जुमानणारे खुनी हल्ले चालूच आहेत, त्यावरून जबाबदारीची अजीबात जाणीव नसलेली पद्धती राबविली जात आहे हे उघड दिसत आहे आणि अधिकृत पातळीवर या मुद्द्याबाबत एक तर्हेचे औदासिन्य, अनास्थाच दिसून येत आहे.
अज्ञात आणि धड नीट नजरेला न येणार्या सशस्त्र गटांची संख्या दररोज वाढत आहे. सरकारकडून कुठलीच ठोस पावले उचलली जात नसल्याने, कुठलीही कारवाई गेली जात नसल्याने हे गट जास्त-जास्त धीट होऊ लागले आहेत आणि आता ते छुपे न रहाता उघड आणि आग्रही होऊ लागले असून आपली लक्ष्यें जास्त काळजीपूर्वकपणे निवडू लागले आहेत. या सर्व घडामोडींकडे केंद्रीय व राज्य सरकार पूर्ण दुर्लक्ष करत आहे, कार्यकारी शाखा आणि न्यायपालिका शाखा ही सरकारची दोन्ही अंगे मानवाधिकाराच्या मुद्द्याची जबाबदारी एक-दुसर्यावर ढकलण्यात मग्न आहेत. याखेरीज सरकारने या खुनांच्या बाबतीत कसलाही तपास पूर्ण केलेला नाहीं व कांहीं बाबतीत सुरूही केलेला नाहीं. याबद्दल सरकारवर ठपकाही ठेवण्यात आलेला आहे. यात बलुचिस्तान विश्वविद्यालयाच्या प्रा. साबा दश्तियार यांचा खूनही मोडतो. हे तपास करण्याचे सरकारने आश्वासन दिले होते. ते न पाळल्यामुळे अशा उघडपणे केलेल्या शिक्षकांवरील आणि स्वतंत्र विचाराच्या लोकांवरील हल्ल्यांचा स्वतंत्रपणे तपास करण्याबाबतची सरकारची बांधीलकीच नाहीं आहे हेच दिसून येत आहे. तसेच "अगाज-ए-हकूक-बलूचिस्तान" या पॅकेजद्वारा सर्व बेपत्ता बलुचींना मुक्त करण्याचे आश्वासनही सरकारने पाळलेले नाहीं.
ज्यांच्याबरोबर मतभेद आहेत अशा नागरिकांवर सातत्याने होणार्या हल्ल्यांमुळे आणि अत्याचारांमुळे बलुचिस्तानचे राजकीय चित्र इतके विकृत होऊन गेले आहे की राजकीय चर्चांसाठी लागणार्या पोषक वातावरणाचीच खच्ची झाली आहे!
टीपः
[१] हा संदर्भ मला कांहींसा संदिग्ध वाटला म्हणून मी मलिकसाहेबांना लिहिले होते. त्यांनी माझ्या प्रश्नाला तत्परतेने दिलेल्या उत्तरावरून बराच उलगडा झाला. त्यानुसार "बलोच मसला दफाई तांझीम" ही बलुची लोकांची सशस्त्र प्रतिकारात्मक संघटना नसून ती पाकिस्तानी लष्कराच्या आशिर्वादाने Inter Service Intelligence-Military Intelligence-Frontier Corps या त्रिकुटाने उभी केलेली बलुची लोकांच्या आणि त्यांच्या प्रतिकाराच्या विरुद्ध असलेली संघटना आहे आणि तिचा उद्देश बलुची राष्ट्रवादी नेत्यांना आणि त्यांचे समर्थक असलेल्या पत्रकारांना, वकीलांना आणि लेखकांना टिपून मारणे हा आहे. या संघटनेने कित्येक बलुची नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना टिपून मारल्याचा दावा केलेला आहे.
Original English article has been written by Mr Malik Siraj Akbar. He is a freelance journalist based in Washington DC & the editor of The Baloch Hal, Balochistan’s first online English language newspaper. He was a Hubert Humphrey Fellow and a visiting journalist at the International Consortium of Investigative Journalists (ICIJ), a project of Center for Public Integrity in 2011. He was a visiting journalist at the Poynter Institute, Florida in June 2011. In October 2011, the US government granted Malik political asylum considering threats of persecution based on his writings critical of Pakistani government’s policies in his native Balochistan. This translation is being published courtsey DAWN of Karachi who have granted me the permission to publish it. The article was first published in DAWN on 10th December 2011 and can be read by opening the link http://www.dawn.com/2011/12/10/balochistan-%e2%80%93-a-human-rights-free...
नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण
नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण लेख.
पण या लोकांचा असा द्वेष करण्यामागची काय कारणे आहेत, ते पण लिहा ना.
बलुचिस्तान हा एक नैसर्गिक
बलुचिस्तान हा एक नैसर्गिक संपत्तीच्या बाबतीत खूप समृद्ध भाग आहे व तो (कदाचित् त्यासाठीच) पाकिस्तानपासून वेगळा होऊ इच्छितो. माझ्या मतें त्यामुळेच पाकिस्तान तिथल्या जनतेवर अत्याचार करून त्या प्रांताला जबरदस्तीने पाकिस्तानात ठेवू पहात आहे. धन्यवाद.
माहितीपूर्ण लेख!
माहितीपूर्ण लेख!
सुधीर काळे, लेखात
सुधीर काळे,
लेखात वस्तुस्थिती चांगल्यापैकी विषद केली आहे.
बलोच मसला दफाई तांझीम ही संघटना प्रतिकार करणारी (रेझिस्टन्स ऑर्गनायझेशन) असेल तर ती कोणाच्या विरोधात आहे? ज्याअर्थी ती भूमिगत असून बलुच राष्ट्रवाद्यांच्या हालचाली गुप्त ठेवण्यास रस दाखवते, त्याअर्थी ती पाक सरकारच्या विरोधात असली पाहिजे. मात्र जलील रेकीसारखे अनेक बलुच राष्ट्रवादीदेखील बेपत्ता होऊन मृतावस्थेत सापडले. याचा अर्थ लोकांना बेपत्ता करून गुप्तरीत्या जिवंत ठेऊन गरजेप्रमाणे ठार मारणारी यंत्रणा दोन्ही बाजूंच्या गिर्हाईकांना 'सेवा' पुरवीत आहे.
मग प्रश्न असा पडतो की या यंत्रणेचा बोलविता धनी कोण? आपल्याला अधिक माहिती असल्यास कृपया सांगावी.
आ.न.,
-गा.पै.
गामा साहेब, आपल्याला पडलेला
गामा साहेब, आपल्याला पडलेला प्रश्न मलाही पडला होता म्हणून मी मूळ लेखकाला ई-मेलद्वारा त्याबद्दल विचारले होते. त्यांनीही मला तत्परतेने उत्तर दिले. त्यानुसार मी माझ्या लेखाखालील टीप आताच दुरुस्त केलेली आहे ती कृपया वाचावी म्हणजे सर्व उलगडा होईल.
हा लेख इतक्या बारकाईने वाचल्याबद्दल १०० पैकी १०० गुण आपल्याला! असे वाचक मिळणे हे माझे भाग्यच! एक चांगला प्रश्न विचारल्याबद्दल मलिकसाहेबांनी माझी प्रशंसा केली व हा कांहींसा संदिग्ध परिच्छेद लिहिल्याबद्दल खेदही व्यक्त केला.....!
सुधीरजी,बलुच प्रश्न काय आहे
सुधीरजी,बलुच प्रश्न काय आहे हे थोदक्यात दिले असते तर लेखाची पूर्वपिठीका समजण्यास मदत झाली असती.
बलुचिस्तानला नैसर्गिक
बलुचिस्तानला नैसर्गिक संपत्तीचे 'अनंत हस्तां'नी वरदान मिळालेले आहे. अलीकडेच तिथे तांब्याच्या आणि सोन्याच्या खाणींचा शोध लागला आहे.
सध्या मला इतकेच माहीत आहे कीं बलुचिस्तान स्वतंत्र (कमीत कमी स्वायत्त) होऊ इच्छितो पण कदाचित तिथल्या नैसर्गिक संपत्तीमुळे पाकिस्तानला त्याचे वेगळे होणे मान्य नाहीं. या विषयावर लिहायचा मानस आहे. व त्यावर सध्या सखोल वाचन करत आहे. लिहिण्याइतका आत्मविश्वास वाटला कीं नक्की लिहीन.
खरे खोटे देव जाणे, पण भारत बलुचींना 'भडकवतो' असा आपल्यावर नेहमीच आरोप होत असतो. त्याबद्दलही माहिती मिळवीत आहे.
धन्यवाद सुधीरसाहेब!
धन्यवाद सुधीरसाहेब! बलुचिस्तानातील लोकांना पाकिस्तानात अजिबात सामील व्हायचं नव्हतं. यामागची कारणं शोधावी लागतील असं दिसतंय. पाकमधील बलुची प्रश्न फाळणीपासून प्रलंबित आहे. म्हणजे हा प्रश्न पाकच्या निर्मितीइतका जुना आहे.
बलुची प्रश्नावर आपला अभ्यासपूर्ण लेख वाचायला आवडेल!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आ.न.,
-गा.पै.
बलुचिस्तान हा १९४८ पूर्वीच्या
बलुचिस्तान हा १९४८ पूर्वीच्या स्टेट ऑफ कलात चा एक भाग . हा भाग भूतान, सिक्किम इ. सारखा कधीच ब्रिटिश इंडियाचा भाग नव्हता. अतिशय लढवय्ये , कट्टर योद्धे म्हणून ही लोकं प्रसिद्ध आहेत. सिकंदराला दमवणारी हीच.
ब्रिटीशांनी १९ व्या शतकांत रशियाला ब्रिटीश इंडियापासून दूर ठेवण्यासाठी अफगाणिस्तान आणि पर्शिया ( इराण ) बरोबर बरेच करार्-मदार केले. त्यांत या कलात देशाचे काही भाग असेच परस्पर अफगाणिस्तान आणि पर्शियाला देउन टाकले. तरीही उरलेला कलात देश होता तो कधीच ब्रिटिश इंडियाच्या आधिपत्याखाली नव्हता. फाळणीच्या वेळी साधारण साडेपाचशे संस्थानं कॅटेगिरी ए मधे ( पोलिटिकल डिपार्ट्मेंट्च्या आखत्यारित ) आणि कलात सारखी कॅटेगिरी बी संस्थानं ( डायरेक्ट इंग्लंड्च्या व्हाइट हॉलच्या अखत्यारित, अखत्यारित म्हण्जे करार वगैरे. बाकी कारभार स्वायत्तच. ). १८७९ च्या करारनुसार कलात स्टेट स्वायत्त होतं. कलात च्या खानांनी कधीही दिल्लीच्या चेंबर ऑफ प्रिंसेस ची मेंबरशीप स्वीकारली नाही ( आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे आहोत असं म्हणत. ) . त्यामुळं जेंव्हा फाळणीच्या गोष्टी सुरू झाल्या तेंव्हा शेवटचा राजा मिर अहमद खान यांनी १९४६ मधेच ब्रिटिश कॅबिनेट्ला सांगितलं की फाळणीसाठी फक्त ब्रिटीश इंडियाच्या आधिपत्याखालील भागाचाच विचार करा , इतर नाही. ब्रिटीश निघून गेल्यावर १८७६ च्या आधीची जी कलात ची राजनैतिक स्थिती लागू होइल आणि स्वतंत्र राष्ट्राचे सर्व अधिकार , जबाबदार्या कलातला मिळतील. फाळणीचा आणि त्यांचा काहीएक संबंध नाही.
पण पाकिस्तान निर्मितीला या खानांचा पाठिंबा होता, त्यांनी जीनांना ( मुस्लीम लिग ) पैसे वगैरेही देउ केले होते. सर्वात भारी म्हणजे जीना जे मुस्लिम लिग चे खंदे नेते, पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल इ. इ. हे लिगल अॅडव्हायझर ऑफ कलात स्टेट म्हणून त्यांच्या पे-रोल वर होते....ब्रिटीशांच्या नंतर लिजवर दिलेला क्वेटा आणि आजूबाजूचा प्रदेश कलातला परत मिळावा. लास-बेला, खरन हे भाग कलातमधे येण्यास स्वायत्त असावेत इ. गोष्टींची कायदेशीर पूर्तता करण्यासाठी त्यांची नेमणूक होती. आणि त्यांनीच १ एप्रिल १९४८ ला पाकिस्तानी सैन्याला कलात मधे शिरून खानाला घेरण्याचे आदेश देले...
Wow,Ms Arpana . You made my
Wow,Ms Arpana
. You made my day!
My apologies for responding in English, but that is bcz I am responding from my cell phone.
I exhort you write a full-length article on Baluchistan. Also how do spell 'kalat' (or Qalat)?
On my part, I will write to Malik (author of original English article) to recommend some basic reading.
Regards, Sudhir
छान लेखानुवाद खुप काही
छान लेखानुवाद
खुप काही माहिती मिळाली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभ्यासू प्रतिक्रियाही बरेच काही शिकवुन जातात
>>>>ब्रिटीशांच्या नंतर लिजवर दिलेला क्वेटा आणि आजूबाजूचा प्रदेश कलातला परत मिळावा. लास-बेला, खरन हे भाग कलातमधे येण्यास स्वायत्त असावेत इ. गोष्टींची कायदेशीर पूर्तता करण्यासाठी त्यांची नेमणूक होती. आणि त्यांनीच १ एप्रिल १९४८ ला पाकिस्तानी सैन्याला कलात मधे शिरून खानाला घेरण्याचे आदेश देले... <<<<
हा मजकुर अफलातुन आहे. "कायम लक्षात ठेवण्यासाठी"!
अपर्णा वा : (अर्पणा की
अपर्णा वा : (अर्पणा की अपर्णा?)
अतिशयच महत्वाचा सन्दर्भ. माझ्या माहीतीनुसार हे बलुच लोक सध्याचा बलोचीस्तान, इराणचा पाकला लागून असलेला पूर्व भाग , अफगाणिस्तानचा दक्षिण भाग यात सलगपणे पसरलेले होते. कृत्रिम राजकीय सीमांनी त्यांचा वंश तीन देशांत विभागले गेला. त्यामुळे बृहद बलुचीस्तान बनवणे हे त्यांचे प्रथम उद्देष्ट असावे. (आसिंधु सिंधु तिथेही आहे तर :)) त्यातल्या त्यात इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातही फुटीरतेच्या (किंवा स्वतंत्रतेच्या) चळवळी चालूच आहेत. नकी बघायचेय पण इरानमध्ये लिमिटेड स्वयंनिर्णयाचे अधिकार दिलेत असे वाटते.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला मदत करणे हे भारताचे नैतिक कर्तव्य नव्हे काय?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
वांशिक गटांचे डिस्ट्रिब्युशन , राजकीय सीमा व त्यामुळे झालेल्या कृत्रिम विभागण्या खालील चित्रावरून स्पष्ट व्हावे . (सौ. विकिबाबा)
शिवाजीनगर , स्टेशन परिसरात
शिवाजीनगर , स्टेशन परिसरात गॉगल्स विकणारी दुर्दैवी मंडळी म्हणजे बलुच लोक.हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही पसरलेले आहेत. सिंधी लोकानी फाळणीनन्तर येऊन जशी प्रगती केली तशी यानी केली नाही त्याचे कारण बहुधा ही मंडळी व्यापारातले नव्हते. ब्रिटीश पूर्व काळात काही बलुची राजांनी सिंध प्रान्तात राज्य केले होते त्यांचे वंशज सिंधी लोकांबरोबर फालणी नन्तर इकडे मायग्रेट झाले असावेत .. सिंध्यांना तिकडेही व्यापार उदीम, मालमत्ता, व्यापारी परम्परा होत्या. यांच्यावर आपल्याकडे फारसे संशोधन लेखन झाल्लेले दिसत नाही. अवचटांना शोभेलसा विषय आहे.:)
बाजो, नकाशा देऊन चान्गले
बाजो, नकाशा देऊन चान्गले केलेस
नेमका संदर्भ लागतोय!
अर्पणाताईंचा प्रतिसाद
अर्पणाताईंचा प्रतिसाद वाचल्यावर मीही गुगळेसाहेबांना (Google) भेटलो आणि विकिभाऊंच्या (Wiki) घरून हाच नकाशा मिळविला व तो 'ई-सकाळ'च्या लेखात टाकला आहे.
जिनासाहेबांचे खानसाहेबांस
जिनासाहेबांचे खानसाहेबांस पत्र !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान लेख. प्रतिक्रियादेखील
छान लेख. प्रतिक्रियादेखील तितक्याच अभ्यासू.
सरदार पटेलान्नी केलेले
सरदार पटेलान्नी केलेले भारतातील संस्थानान्चे विलिनीकरण अन जीनान्नी केलेले वरील बलुचीस्तानचे विलिनीकरण यात काही साम्य असू शकते काय?
मला एकीकडे वरवर पहाता ते "सारखेच" वाटते, तर दुसरीकडे भौगोलिक/सामाजिक/धार्मिक सहजीवनाच्या तत्कालिक व ऐतिहासिक परिस्थिती बघता दोघान्च्याही कृतीत मूलभूत फरक जाणवतो पण नेमका शब्दात पकडता येत नाहीये.
काश्मिरबाबत आपण ढिल्ले राहिलो यामागे, "बघा तुम्ही/त्यान्नी बलुचीस्तान घातपाताने/अनैतिकतेने गिळन्कृत केले पण आम्ही तसे नाही करत" हे दाखविण्याची "समाजवादी" खुमखुमी तर नव्हती ना?
विषयान्तर होते आहे पण चेन्डू
विषयान्तर होते आहे पण चेन्डू हलके हलके कास्मीर -नेहरू-गांधी या गोलपोस्टकडे नेण्याची लिम्ब्याची खुबी लक्शात आलीच आहे ; तसेच या बीबीचे भविष्यही दिसू लागले आहे. कारण उर्वरित खेळाडू आपपल्या स्टिका परजीत उभेच आहेत.:फिदी:
प्रश्न वेगळा असला तरी मुळात काश्मीर प्रश्न निर्माण व्हायला राजा हरिसिंगांना जबाबदार धरायला काय हरकत आहे? १५ ऑगस्तला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतात सामील व्हायला हरिसिंगांनी ऑक्टोबर उजाडवला तेही टोळीवाल्यानी श्रीनगरचे विजेचे पॉवर हाऊस ताब्यात घेऊन बन्द पाडून श्रीनगरात अंधार केल्यावर, जेव्हा पायाखालची वाळू सरकल्यावर ! तोपर्यन्त परिस्थिती एवढी बिघडली होती की भारतीय सैन्य तरी काय करणार आणि पटेल तरी काय करणार. मात्र बलुचिस्तानच्या खानाचा पाकिस्तान निर्मितीला पाठिम्बा होता पण ब्रिटीश साम्राज्याचा भाग नसल्याने मी मात्र पाकिस्तानात येणार नाही अशी खानसाहेब ऑफ कलाट ची भूमिका होती. तशीच हरिसिन्गाची होती असे मात्र वाटते. पण जिन्नानी जसे खानाला आर्मी पाठवून जसे सामील करून घेतले तसे टोळीवाले घुसण्यापूर्वीच हरिसिंगाला 'सरळ ' करायला हवे होते का? याबाबत डॉ.करनसिंग (हरिसिगाचे नातू, याना नेहमीच भारताचे राष्ट्रपतीपद हे त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे वाटते) यांचे 'हेअर अॅपरंट ' नावाचे आत्मचरित्र वाचायचे राहूनच गेले . अर्थात त्यात हरिसिंगांचीच तरफदारी असणार. पर्शिओ- बलुच बॉर्डर फिक्स करताना इरानचा प्रतिनिधी , ब्रिटीशांचा प्रतिनिधी आणि बलुचिस्ताच्या खान्-ए-कलात प्रतिनिधी ,मक्रानचा गव्हर्नर यांच्या वाटाघाटी झाल्या त्यात ब्रिटीशानी खानाच्या प्रतिनिधीचा क्लेम डावलून बलुचिस्तानाचा काही पार्ट इराणला देऊन टाकला तो इराणला खूष करून त्याला रशियापासून अलग ठेवण्याच्या 'ग्रेट गेम' चा भाग म्हणूनच असे मानायला जागा आहे. बृहद बलुचिस्तानला तरी सीमा आता कुठे मान्य आहे?
छे छे , हे 'द ग्रेट गेम' या प्रकाराचा मूळातून अभ्यास केल्या शिवाय भारतीय उपखन्ड व पश्चिम आशियाच्या घटनांची संगती लागणार नाही . ते पाहिलेच पाहिजे![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
धन्यवाद भारतीय उपखंडाचा
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारतीय उपखंडाचा विचार केला तर राजनैतिक दृष्ट्या ४ भाग
काही भाग इंडिया ऑफिस लंडन च्या अधिकारात
काही भाग गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाच्या अधिकारात
संस्थानं-ज्यांनी ब्रिटिश राणीचं मांडलिकत्व पत्करलं पण संस्थानाचा कारभार वारसाच्या आधिकारात
स्वतंत्र भाग ( नेपाळ )
फ्रेंच/ ड्च / पोर्तुगिज यांच्या ताब्यातला भाग.
बलुच-अफगाण सीमा ( मॅकमाहोन लाइन , तिबेटची पण सीमा ह्यांनीच आखली ) १८९६ साली निश्चित केली, पण ती इंडो-अफगाण बोर्डर कमिशननं आखली. वर बाळू जोशी यांनी लिहिल्याप्रमाणं पर्शिओ- बलुच बॉर्डर कमिशननं सीमा आखली ती १८७१ ला पण १८९६ला मात्र या कमिशनचं नाव 'अँग्लो-पर्शियन बॉर्डर कमिशन' केलं गेलं आणि त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आलं.
सैस्तान आणि पश्चिम मारकन इराणला दिले
सैस्तानच्या आजूबाजूचा भाग आणि रेगिस्तान अफगाणिस्तानला दिले
आणि उरलेल्या कलातमधील महत्वाच्या बलुच भागाला (जाकोबाबाद, डेराजात, सिबि )ब्रिटिश इंडियात घेतलं. १९०५ पर्यंत हे चालू होतं. यातून उरलेला भाग खान ऑफ कलातच्या आखत्यारित .
काश्मिर आणि स्टेट ऑफ कलात मधला मुख्य फरक म्हणजे मुस्लीम लिग ( जीन ) ला स्टेट ऑफ कलात स्वतंत्र राष्ट्र आहे / होइल हे अगदी फाळणीपर्यंत मान्य होतं. ह्या सगळ्या चर्चा ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधी, खान ऑफ कलात आणि जीना यांच्यात झाल्या. या चर्चेतला मुख्य मुद्दा हा कलात चे जे भाग ब्रिटीशांनी लिज वर घेतलेत ( आणि जे नविन निर्माण होणार्या पाकिस्तानच्या हद्दीत येणार आहेत) ते कुठे रहातील, त्या करांराची कायदेशीर पोझिशन काय असेल हा होता. काश्मिरची सिचुएशन वेगळी आहे.
पण हा भूभाग १५० वर्षांपूर्वीही ग्रेट गेमचा भाग होता आणि सध्याही. फक्त पाकिस्तानचा प्रश्न नाही आहे. कुर्दिस्तान सारखाच हा प्रश्न ३ देशांत आहे. जरी पाकिस्तान बलुचिस्तानावरचा हक्क सोडायला तयार झालं तरी इराण आणि अफगाणिस्तानचं काय?
अर्पणा , गुड वन. सोवियत
अर्पणा , गुड वन. सोवियत रशियाचा पाडाव झाल्याने व दळण वळनाची इतर साधने आल्याने अरेबियन समुद्रातल्या गरम पाण्यातील (तुलनेने :))बन्दरात रशियन इन्टरेस्टला व पर्यायाने ग्रेट गेमला आता काही अर्थ दिसत नाही. मात्र गदर (गवदर) हे बलुचिस्तानातील बन्दर अत्यन्त स्ट्रॅटेजिक ठिकाणि असल्याने व चीनचा त्यावर डोळा असल्याने हे गवदर्/गदर भविष्यात फारच स्फोटक ठरेल असे दिसतेय. पाकीस्तान या गदरसाठी वाटेल ते करील. मुळात चीन पाकिस्तानची बहुतेक मैत्री या गदरसाठीच आहे. त्यासाठी गिलगिट बाल्टीस्तानातून चीनने केके एच (काराकोरम हाय्वे) आपल्याप्रान्तातून गिलगिट बाल्तीस्तानातून तो पाक प्रदेश आहे असे सान्गूनच इस्लामाबादेपर्यन्त आणून व त्यापुढे पाकीस्तान रोड लिंक्स वापरून चीन ते गदर हा मार्ग व्यापारासाठी जोडूनच घेतलाय ना? मग हे गदर आणि पर्यायाने बलुचिस्तान पाक कसा सोडेल सहजासहजी?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी गदर बन्दराचा हातोड्यासारखा आकार आनि त्याचे स्थान , फोटो हे फारच इंतरेस्टिंग आहे आनि गुगल अर्थवर स्पष्टपणे पाहताही येते
याबाबत अर्पणा आपले मत वाचायला आवडेल....
अर्पणाताई, शेकडो धन्यवाद!
अर्पणाताई,
शेकडो धन्यवाद! आपण दिलेली माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. वाचून आनंद झाला! भारतीय बुद्धीजीवी वर्गाने (जो बहुतांश इंग्रजीत लिहितोवाचतो) पाकिस्तानच्या अंतर्गत प्रवाहाचं कधीच गांभीर्याने विश्लेषण केलेलं नाही. आपल्यासारख्या व्यासंगी लोकांनाच (यात सुधीरभाऊही आलेच! :-)) हे काम पार पाडावे लागणार.
आ.न.,
-गा.पै.
सुधीर काळे साहेब, अर्पणा आणि
सुधीर काळे साहेब, अर्पणा आणि सर्व वाचकहो,
आजून एक गुंतागुंत ... अब्दुल समद खान अचकझाई याला बलुच गांधी असंही म्हणंत असंत. जसं गफारखानांना सरहद्द गांधी म्हणंत त्या धर्तीवर. मात्र वरील विकी लेखात बलुच गांधी हा आधुनिक पख्तूनखवाचा जनक मानला आहे. नक्की काय ओळख आहे त्याची बलुच की पठाण की मिश्र?
आ.न.,
-गा.पै.
मुळात काश्मीर मुद्द्याने
मुळात काश्मीर मुद्द्याने भारतातल्या प्रजेला एवढे ग्रासून टाकले आहे की काश्मीर सरहद्द वगळता आणि वाघा बॉर्डर वगळता इतर काही या देशात आहे . आणि तिथे काही घडत असते याची आपण कधी दखलच घेत नाही. या बलुच म्हणा , एम क्यू एम च्या चळवळी ४०-४५ वर्षांपासून चालू आहेत आणि भारताचे त्यात काही बरे वाईट हितसंबंध गुन्तले आहेत हे कधी कोणी लक्षात घेतलेच नाही. अर्थात हा अवेअरनेस तालिबान्यानी पाकिस्तानला त्रस्त केल्यावर झालेल्या आसुरी आनन्दापोटी सुरुवातीस होता पण त्यानन्तर पाकमधली अस्थिरता हा भविषात भारताच्या मुळावर येण्याची शक्यता ध्यानात आल्यावर त्या घडामोडींची भारतीय मध्यमवर्ग धास्तवलेल्या मनाने दखल घेत आहे. अर्थात तिथे काय चाल्ले आहे हे इन्टरनेटसारख्या माध्यमातून सार्वत्रिक होऊ लागल्यावर कळण्याची सोय झाली हीही बाब या अवेअरनेस मध्ये आहे हेही तितकेच खरे. तिथली वृत्तपत्रे थेट आन्तरजालावर दिसू लागल्यावर तिथले डोके ठिकाणावर असलेले लोक आणि भारतातले विचारवन्त यांची मते जुळत असल्याचेही दिसत आहे.
इतर देखील गॅस पाइपलाइन, तेल यांच्या पाइपवाहतूकीतून बाबीत भारताचे हितसंबंध असल्याने व भौगोलिक स्थितीमुळे आपण पाकला त्यात टाळू शकू असे दिसत नाही. त्यामुळे नुसते काश्मीर काश्मीर करून दोन्ही देशाच्या हाती काही लागेल असे दिसत नाही.
दुसरे असे की जुना व्यापारीमार्ग, सिल्क रूटचा , कॉन्स्टॅटिनोपल (इस्तंबूल) मार्गे जो होता. त्यावर रेल्वे मार्ग (जो पाकशी शत्रुत्व असल्याने नाहीच आहे) झाला तर युरोपिय देशांशी व्यापार वाढू शकतो का?
काळेजी, अर्पणा, बाजो - चांगली
काळेजी, अर्पणा, बाजो - चांगली अभ्यासपुर्ण चर्चा वाचायला मिळते आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अपर्णा, बाळू
अपर्णा, बाळू जोशी,
माहितीपूर्ण प्रतिसाद.
चांगला लेख. लेखातून आणि काही
चांगला लेख. लेखातून आणि काही पोस्ट्समधून बरीच नवीन माहिती कळली. काळेजी, तुमचा सखोल अभ्यास पूर्ण झाल्यावर जरूर लिहा.
>>खरे खोटे देव जाणे, पण भारत बलुचींना 'भडकवतो' असा आपल्यावर नेहमीच आरोप होत असतो. त्याबद्दलही >>माहिती मिळवीत आहे.
शत्रूपक्षातल्या असंतुष्टांना भडकवणे हा राजकारणाचा भागच आहे. उलट हे होत नसेल तरच आश्चर्य.
एम क्यू एम ह्या मुहाजिरांच्या
एम क्यू एम ह्या मुहाजिरांच्या संघटनेचा नेता अल्ताफ हुसेन तर एकदा म्हणालाही होता पाकिस्तान सरकार आमच्यावर एवढे अत्याचार करीत आहे तर भारत सरकार काय झोपलेय का? त्याला आमची काहीच चाड नाही का? अर्थात आपले सरकार त्याना मदत करीत नसेल असे म्हणवत नाही...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद . काळेकाकांचा राजकीय
धन्यवाद :).
काळेकाकांचा राजकीय घडामोडी आणि इतिहास या विषयांचा खूपच अभ्यास / वाचन आणि व्यासंग आहे. माझं इतकं वाचन नाही.
गदर बंदर बांधण्यात चीनची ८० % भागीदारी आहे. पण हे बंदर चालवण्याचं पुढच्या ४० वर्षांचं काँट्रॅक्ट सिंगापूर पोर्ट अॅथोरिटी या आंतरराष्ट्रीय कंपनीनं जिंकलय. या वर्षीच्या मे मधे पाकिस्तानच्या गिलानीसाहेबांनी चीनच्या दौर्यावर असताना पाकी-चीनी भाई भाई या अर्थाची जोरदार वक्तव्य केली.
Pakistan and China, he said, were “like one nation and two countries...
http://www.dawn.com/2011/05/29/many-degrees-of-separation.html ( मला ही लिंक नीट डकवता येत नाहीये )
.
४० वर्षांनंतर चीनला नेव्हीचा बेस चालवायला देउ असंही म्हटलेत
गदरचा प्रॉब्लेम म्हण्जे बंदरासाठी पूरक आणि व्यापाराला लागणारं इतर दळणवळणाचा पूर्णपणे अभाव. लाखाच्यावर सैनिक तैनात आहेत तिथे पण स्थानिक बलुच लोकांचा या विकासकामाला विरोध आहे. अधून मधून होणारे हल्ले यामुळे हा व्यापारमार्ग खात्रीशिर नाही. दुसरं म्हण्जे ह्या बंदरातून दक्षिण अफगाणिस्थान मार्गे व्यापार होणार पण दक्षिण अफगाणिस्तानपण रिलायबल नाही ( अफगाण सरकार कितीही म्हणत असलं तरी ). चीनजरी के२ हायवेनं डायरेक्ट जोडला गेला पाकिस्तानशी तरी ह्या मार्गाला संरक्षण देण्यासाठी येणार्या खर्चामुळे या बंदरातून निर्यात स्वस्त पडणार नाही. पाकिस्तान्-चीन जॉइंट आर्मीवर याची जबाबदारी येइल. असं झालं तरी अमेरिका कसली निघतेय इकडून, चीनला अमेरिकेशी उघड उघड भांडण करण्यात काय स्वारस्य? एकतर अमेरिका मोठी बाजारपेठ त्यांची आणि काहीही झालं तरी अजूनही अरबस्तानतलं तेल अजूनही अमेरिकेच्या खिशात आहे. मधल्यामधे इराण्-पाकिस्तान संबंध बिघडू शकतात. सिंगापूर पोर्ट अॅथोरिटीनं हे दुबैच्या विरोधात जिंकून घेतलेलं काँट्रॅक्ट आहे, दुबै इतक्या सहजासहजी कारभार यशस्वी करू देणार नाही ( बलुच प्रॉब्लेम मधे पैसा ओतणे वगैरे ).
गदरला आपलं उत्तर म्हणजे आपण इराण मधे बांधलेलं चबहार ( Chabahar ) बंदर. पर्शियन गल्फच्या बाजूला असलेलं हे बंदर इराणसाठी अतिशय स्ट्रॅटेजिक, व्यापारासाठी महत्वाचं ठिकाण. आपण फक्त बंदरच नाही बांधत तिथे तर बंदर आणि अफगाणिस्तानला जोडणारं हाय्-वेज चं जाळं, अफगाणिस्तानात आंत रेल्वेमार्ग अशी सगळी सिस्टीम ( पाकिस्तानला बायपास करायसाठी ) तयार करतोय. इराणच 'बंदर अब्बास' हे बंदर उत्तरेकडील रूट्स ( युरोप आणी रशिया ) ला इफिशिअंटली कनेक्टेड आहे. चबहार चा उपयोग अफगाणिस्तान आणि मध्य आशियातल्या व्यापारासाठी करण्याचा प्लॅन आहे. इराणचे त्याच्या शेजार्यांशी बरेच स्टेबल संबंध आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत चबहार बंदर गदरच्या तुलनेत काकणभर सरसच आहे ( जोपर्यंत अमेरिकेशी सरळसरळ इराणचं युद्ध सुरू होत नाही तोपर्यंततरी ).
I had written an article on
I had written an article on Chabahar on e-Sakal at its earlier web address. If I find it, I will re-post it. (I was not a member of Maayboli then.)
Sudhir Kale from my cell phone.
Pages