कोयलीया बोले अंबवा डालपर...
खरंच चैत्र लागला कि नव्या पालवीबरोबरच आपल्याला, आपल्या लाडक्या आंब्याचे वेध लागतात.
यावर्षी मोहर किती आलाय. कोकणातले हवामान कसे आहे. ढग तर आलेले नाहीत ना, उन्हाळा
जास्त कडक तर नाही ना, असे प्रश्न मनात उठत असतात.
ज्यांचे गावाला नातेवाईक असतात, त्यांच्याकडे आडून आडून चौकशी केली जाते, कधी कधी तर
गावाचे आमंत्रणच येते, यंदा मे महिन्यात आंबे खायला या.
मग मुंबईच्या बाजारात पहिली पेटी आली, कि तिची चक्क वर्तमानपत्रात बातमी येते. अशी
बातमी इतर कुठल्याही फळाबद्दल वाचलीय का तूम्ही कधी ?
आपल्या संस्कृतीमधे घट्ट रुजलाय आंबा. दाराला लावायचे तोरण असो, कि कुंकवाची कुयरी
असो, सगळीकडे आंबा आहेच. आणि का नसणार, तो आहे इथल्या मातीतलाच.
Mangifera indica असे नावच तर आहे त्याचे.
अर्थातच त्याचा उगम आपल्या भारतातलाच. या कूळातील इतर काही झाडे, आग्नेय आशियात आहेत.
(उदा. हॉर्स मॅंगो, याची पाने, फूले आणि फळेही मोठी असतात. पण त्यात आंब्याचा स्वाद नसतो.)
त्यामूळे आंबा असा उअल्लेख आला, कि आपला नेहमीचा आंबाच समजला जातो.
आंब्याचे झाड तसे आपल्या सर्वांच्या परिचयाचे. आपल्या लहानपणीच्या आठवणीत एकतरी आंब्याचे
झाड असतेच. गावोगावाप्रमाणे त्याला खास नावेही असतात, आणि त्याची चवही एकमेव अशीच असते.
मालाड पुर्वेला, आमच्या घराजवळ एक खास झाड होते. त्याचे नाव खोबरी आंबा. त्याचे आंबे आम्ही
पिकूच देत नसू. कैरीच इतकी मधूर लागायची, कि मीठ मिरचीची पण गरज नसायची.
दादरला जे मुख्य पोस्ट ऑफ़िस आहे, तिथेच गेटजवळ एक मोठे आंब्याचे झाड आहे. त्याची खासियत
म्हणजे त्याला वर्षभर आंबे लागत असतात. आणि ते अधूनमधून खाली पडतातही. तिथे एकदा मी पार्सल
पॅक करुन घेत असताना, असाच एक आंबा पडला. मला त्या पार्सलवाल्याने भेट दिला. आणि त्याची
खासियतही सांगितली.
असेच एक आठवणीतले झाड म्हणजे, माझ्या आजोळचे. त्याचे आंबे पिकले तरी हिरवेच रहायचे,
आकाराने तर मुठीपेक्षाही लहान, पण चव मात्र अप्रतिम. आम्ही त्या झाडाखाली सावधच असायचो.
झाडावरुन आंबा पडतो कधी आणि त्यावर झडप घालतो कधी. आणि त्याचे नाव होते, साखरगोटी.
परदेशातही अनेकवेळा मला आंबा चाखता आला. मी थायलंड मधे गेलो होतो, त्यावेळी तिथे मॅंगो फेस्टीव्हल सुरु होते. आंबे वापरुन केलेले वेगवेगळे पदार्थ तिथे विकायला होते. थाई कलाकुसर
असल्याने, ते पदार्थ दिसायला अप्रतिम होते, पण चवीला पपईपेक्षा फार वेगळे नव्हते.
मस्कतजवळच्या कुरियत गावी आंब्याची मोठमोठी झाडे आहेत. तिथले आंबे पिकायला लागले कि आम्ही मुद्दाम तिथे सहल काढत असू. त्या झाडाखालून एक निर्मळ पाण्याचा फ़लाज (पाट) वहात असे. झाडावरुन काढलेले आंबे, एका रियालला चाळीस पन्नास मिळत असत. त्या फलाजमधले पाणी घेऊन, त्याने ते धुवून खाण्यात वेगळीच मजा असे. एकावेळी प्रत्येकी आठ दहा आंबे फ़स्त करत असू आम्ही.
नायजेरियातल्या पोर्ट हारकोर्टमधे माझ्या घराजवळच आंब्याचे झाड होते. त्याला वर्षातून दोन वेळा भरपूर आंबे लागत. नायजेरियातले स्थानिक लोक चुकूनसुद्धा कच्चा आंबा तोडत नाहीत कि खात नाहीत. तसे केले तर हमखास मलेरिया होतो, असा त्यांचा ठाम विश्वास. त्यामूळे मला कुणी स्पर्धक नव्हता. रोजच्या रोज कैरीचे वेगवेगळे प्रकार मी करत असे. (माझी करेबियन शेजारीण, आवर्जून ते पदार्थ मागून नेत असे.) नायजेरियातल्याच बदागिरी गावाजवळ व्हिसपरिंग पाम्स म्हणून एक रिसॉर्ट आहे, तिथेही अशीच मोठी झाडे आहेत. त्या झाडाच्या कैऱ्या तर जमिनीपासून केवळ वीतभर उंचीवर लागलेल्या असतात. पण एक खरे, हे आंबे पिकल्यावर एवढे गोड लागत नसत, त्यामूळे मी तरी ते कच्चेच खात असे.
केनयामधेही भरपूर आंबे येतात. ठराविक दिवसात बाजारात तर ते असतातच, पण ठिकठिकाणी टेंपो मधे भरुन विकायला असतात. या आंब्यांचा आकार खूप मोठा असतो. एक आंबा म्हणजे माझे एका वेळचे जेवण होते. या आंब्यांच्या वरचा रंग लालसर असतो. पण चवीला मात्र, तितके गोड नसतात.
मी पाकिस्तानचे आंबेही खाल्ले आहेत. रंगाने पिवळे असले तरी बऱ्यापैकी गोड असतात.
गोव्यालाही माझ्या घराजवळच एक मोठे आंब्याचे झाड होते. त्याचे आंबे पिकल्यावर तितके गोड लागत नसत, पण आंब्याचा मोहोर, बाळ कैऱ्या, त्यावरची कोकीळ कावळ्याची झटापट, खारींची धावपळ हे सगळे मला घरबसल्या निरखायला मिळत असे. माझ्याघरी आलेल्या मायबोलीकरांनी, अगदी खिडकिशी लागलेले आंब्याचे घोस बघितले आहेत.
आंब्याचे झाड :-
हे झाड साधारण १०० फूटांपेक्षाही उंच वाढू शकते. जूनी झाडे तितकी उंच आहेतच. पण नव्याने
लावलेली कलमे मात्र, तेवढी वाढू दिली जात नाहीत. फळ काढणीसाठी ते सोयीचे ठरते.
हे झाड अनेक वर्षे, अगदी १०० वर्षांपेक्षाही जास्त जगू शकते.
याची पाने साधी व लांबट असतात. नवी पालवी चमकदार लाल रंगाची असते व ती पुढे हिरवी होत जाते. पण या झाडाची पूर्णपणे पानगळ क्वचितच होते. तशी पाने वर्षभर थोडी थोडी गळत असतात, पण झाड पूर्ण ओकेबोके कधीच होत नाही. कदचित याच कारणासाठी मंगल तोरणात आंब्याची पाने लावली जात असावीत किंवा शूभ कार्याच्या मांडवात त्याचे टाळे लावले जात असावेत. आंब्याची ओली पाने, सुकल्यावरही हिरवीच राहतात, हेही कारण असावे.
पुर्वी आमराया म्हणजे गर्द सावलीच्या जागा असत. झाडांमधे भरपूर मोकळी जागा असे आणि सावलीमूळे तिथे थंडगारही वाटत असे. तिथे सहलीचे किंवा वनभोजनाचे कार्यक्रम केले जात असत (रेखाच्या उमराव जान मधे, असा प्रसंग आहे.) ,मुंबईतदेखील काही आमराया होता. मालाड पूर्वेला जिथे आता पिरामल हॉस्पिटल आहे तिथे १९७२ पर्यंत आमराई होती.
सध्याची कलमी झाडे मात्र फार उंच वाढू दिली जात नाहीत. फ़ळतोडणी, औषध फवारणी
सोयीची व्हावी म्हणून त्यांची उंची मर्यादित ठेवावी लागते.
आंब्यांच्या नवीन झाडाची लागवड मात्र आता कलमानेच केली जाते. कोय लावून त्याच प्रतीचा आंबा मिळेल अशी खात्री नसते. आंब्याची बोटभर जाडीची फांदी, भेट कलमाने रुजवता येते. एकाच झाडावर एकापेक्षा जास्त प्रकारच्या आंब्याच्या कलमाचे प्रयोगदेखील यशस्वी झालेले आहेत.
(दमण जवळच्या एका गावात चालणारे आंब्याचे झाड आहे, असे मिलिंद गुणाजीच्या पुस्तकात लिहिले आहे. त्याचा फोटोही आहे. हे झाड धावत्या खोडाच्या वनस्पतीप्रमाणे पुढे पुढे जात असते. आणि त्याला फलधारणाही होते.)
आंब्याची फुले
आंब्याची फुले म्हणजेच मोहोर. हा आपल्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याचा फुलोरा
पांढरट हिरव्या रंगाचा असतो. त्याला एक खास सुंगध येतो. असाच वास येणाऱ्या तांदळाला
आपण आंबेमोहोर हे नाव दिलेय.
हा मोहोर आला कि त्यावर किटकांची गर्दी होतेच. पण मोहोर आल्यावर जर ढग आले तर
एक प्रकारच्या बुरशीची वाढ होते व मोहोर गळून जातो. तसेच जास्त थंडी वा जास्त उष्णता
असल्यासही मोहोर गळून जातो.
गुढीपाडव्याच्या तोरणात व गुढीवरही आंबेमोहोर लावायची प्रथा होती.
फलधारणा
या सर्वातून मोहोर बचावला तर त्यात फळधारणा होते. आधी फळे मूगाच्या दाण्याएवढी छोटी
असतात, ती वाढत वाढत मोठी होत जातात. फ़ळे झाडावरच पूर्ण पिकायला ३ ते ६ महिने लागू
शकतात.
आपल्याकडे आंबे अगदी सुपारी एवढे झाले कि ते विक्रीसाठी पाठवता येतात पण केवळ फळासाठी
लावलेल्या झाडांची फळे मात्र पूर्ण जून होईपर्यंत झाडावरुन काढत नाहीत.
कच्च्या कैर्यांचे विविध पदार्थ करतात (त्याचा उल्लेख मग करतोच आहे.) पण पक्व आंब्यापासूनही अनेक पदार्थ करता येतात.
आज आंबा उत्पादनात, भारत पहिल्या स्थानावर आहे. पण तरिही आंतरराष्ट्रीय व्यापारात आपला हिस्सा नगण्य आहे. आपले बहुतांशी उत्पादन, भारतातच खपते.
हापूस, खास करुन देवगड, रत्नागिरी भागात होणारा, जगभरात प्रसिद्ध आहे. पोर्तूगीजांनी इथे रुजवलेले हे वाण, कोकणच्या मातीत अजूनच चवदार झाले. रंग, स्वाद आणि चव या तिन्ही बाबतीत त्याला तोड नाही.
त्याला तोड नाही असे लिहिलेय खरे, पण त्याला तोडीस तोड म्हणून मी गोव्याच्या मानकुराय आंब्यांचा उल्लेख करीन. (या दोन आंब्याची तूलना अत्यंत गैरलागु आहे.) मानकुराय आंबा हा गोव्याबाहेर फारसा मिळत नाही. पण गोव्यात मात्र तो अमाप लोकप्रिय आहे. कितीही महाग असो, तो विकत घेतला जातोच. या आंब्याचे बाह्यरुप तितकेसे देखणे नसते. गराचा रंग किंचीत पिवळसर असतो. पण चव मात्र एकमेव असते. महाराष्ट्रात हा आंबा फ़ारसा माहित नाही.
पण महाराष्ट्रात असाही गैरसमज आहे, कि उत्तम आंबा हा फक्त कोकण भागातच होतो. ते मात्र तितकेसे खरे नाही. सर्व राज्यभरातच नव्हे तर सर्व भारतभरात तो होतो. मुंबईच्या बाजारात गुजराथ ते आंध्रा, तामिळनाडू पासूनचे आंबे येतात. (लंगडा, तोतापुरी, दशहरा असे अनेक) पण बाकिच्या राज्यातही त्यांचे उत्तम पिक येते.
आंब्याची वाहतूक हा एक मोठा प्रश्न आहे. झाडावर पिकलेला आंबा हा अप्रतिम चवीचा असतो. पण तो पिकेपर्यंत झाडावर ठेवता येत नाही, कारण तो पिकला कि वाहतुकीसाठी निरुपयोगी ठरतो. घरी खाण्यासाठी किंवा बाजारात नेण्यासाठीही तो जून झाल्यावर (म्हणजे देठाकडे किंचीत दबला गेल्यावर ) तो झाडावरुन उतरवला जातो. तो झाडावरुन खाली टाकता येत नाही, तर अलगद उतरवावा लागतो. यासाठी एक खास उपकरण वापरतात. त्यानंतर तो सुक्या गवताच्या आच्छादनाखाली ठेवला जातो. त्या उबेने काही दिवसात तो पुर्ण पिकतो. याला आंब्याची अढी लावणे असे म्हणतात. यात आंबे अगदी अलगद आणि लांब ठेवावे लागतात. तसेच ती अढी रोज उघडून बघावी लागते आणि पिकलेले आंबे बाजूला काढावे लागतात. हापूस आंब्याच्या बाबतीत, रंग आणि गंध याबरोबरच किंचीत सुरकुत्या असा एक निकष आहे. पण बाकिच्या आंब्यांच्या बाबतीत, रंग हा निकष फसवा ठरू शकतो. काही आंबे पिकले तरी हिरवेच राहतात तर काही पिवले झाले तरी चवीला आंबट लागतात.
बाजारात लवकर येणाऱ्या आंब्याला उत्तम भाव मिळतो. त्यामूळे आपलाच आंबा बाजारात
प्रथम यावा, यासाठी तो लवकर पिकवण्यासाठी काही रसायनांचा वापर केला जातो. अनुभवी
लोकांना असे कृत्रिम रित्या पिकवलेले आंबे, अजिबात आवडत नाहीत. आणि ते तसे चवदारही
नसतात.
महाराष्ट्रातील आंब्याचा व्यापार मात्र मर्यादीत काळासाठीच असतो. पावसाला सुरवात झाली कि
आंब्याचा गोडवा कमी होतो. त्यानंतर इतर राज्यातील आंबे महाराष्ट्रात येऊ लागतात.
आंब्यातली कोय हा फळातील मोठा भाग व्यापते. त्यामूळे तो कापताना मधोमध कापता येत नाही. हि कोय लहानात लहान करण्याचे प्रयोग चालू असतात. आणि अशी एक जात निर्माण झाल्याची बातमीही आली होती.
आंब्यांवर असे संशोधन होतच असते. आणि हवे ते गुणधर्म असणारे फळ मिळेल, असा प्रयत्न कायम चालू असतो. यातून नवनवीन जाती तयार होत असतात.
आंब्यापासून तयार केले जाणारे पदार्थ :-
आपल्या नववर्षाची सुरवात आंबाडाळ आणि पन्हे याशिवाय होतच नाही.
त्यानंतर मात्र
कच्च्या कैरीचा वापर करुन अनेक प्रकारची लोणची घालण्यात येतात. ती तात्पुरती खाण्याजोगी असतातच शिवाय टिकाऊ पद्धतीची देखील असतात. अशा प्रकारची लोणची भारतातल्या सर्व राज्यात आवडीने खाल्ली जातात. अख्खी मेथी आणि व्हीनीगर वापरून केलेले पंजाबी लोणचे, मेथीचा रवा घालून केलेले राजस्थानी लोणचे, लालभडक मिरची घालून केलेले गुजराथी लोणचे, सर्व मसाले वापरुन केलेले मराठी लोणचे, तिखटजाळ आंध्र पद्धतीचे लोणचे, मिठाच्या पाण्यातील कारवारी लोणचे, चण्याची डाळ वगैरे वाटून केलेले मॅंगलोरी लोणचे.. ते अगदी मोहरीने लपेटून काढलेले बिहारी लोणचे.
कच्चे किंवा पक्के आंबे पाकात शिजवून त्याचे मुरंबे, गुळांबे केले जातात. पण गोड आणि तिखट अश्या दोन्ही चवीचा गुजराथी छुंदा मात्र या दोघांमधला सुवर्णमध्य आहे.
कच्ची कैरी आपल्याकडे अनेक शाकाहारी आंणि मांसाहारी पदार्थात वापरतात. (बिरडे, मसूराची आमटी, जवळा, कैरीचे सार वगैरे ) पण महाराष्ट्रात कच्ची कैरी सुकवून (आंबोशी) वापरायचे प्रमाण फार कमी आहे. गोव्यात असे तूकडे, कोकमाप्रमाणेच वापरतात. बंगालमधे त्याचे लोणचे खूप लोकप्रिय आहे. उत्तर प्रदेशात, हळद आणि मीठ लावून कैरीच्या मोठ्या फ़ोडी सुकवून ठेवल्या जातात.
आपल्याकडे आमचूर पण पारंपारिकरित्या वापरला जात नाही. उत्तरेकडच्या राज्यात मात्र, अनेक पदार्थात आंबटपणासाठी तो वापरतात.
कच्ची कैरी अनेक चटण्यात, आंबटपणासाठी वापरता येते. पाशात्य पद्धतीत मात्र ती साखर आणि काही मसाले घालून शिजवून करतात.
कैरी शिजवून केलेले सरबत म्हणजेच पन्हे हि पण आपली खासियत. कच्ची कैरी किसूनही सरबत करता येते.
पिकलेला आंबा जास्त करुन नुसताच खाण्यासाठी वापरला जातो. त्यापैकी घट्ट गर असणारी फळे कापून खाल्ली जातात तर नरम गर असलेली फळे चोखून खाल्ली जातात.
आमरस हा पण आपल्या आवडीचा पदार्थ. तोही सर्व भारतभर खाल्ला जातो. त्यासोबत राज्या राज्यानुसार, पुऱ्या, गवसण्या, शेवया केल्या जातात. बिहारमधे त्यात पोहेही भिजवून खातात. आमरस घालून केलेले श्रीखंड, मोदक, शिरा, आईसक्रीम, मिल्कशेक हेही लोकप्रिय प्रकार आहेत. आंब्याचा रस बाटलीत वा टीनमधे भरुन टिकवता येतो, तसेच तो आटवून मावाही करता येतो. अतिरिक्त आंब्याचा रस ताटात सुकवून, त्यापासून आंबापोळी करायची पद्धत कोकणात पुर्वापार आहे. झाडावरुन पिकून गळून पडलेल्या आंब्यापासून जर असे टिकाऊ पदार्थ करता आले, तर ती फळे वाया जात नाहीत.
आंब्याच्या कोयीपासूनही उत्तम चवीची मुखशुद्धी गुजराथमधे करतात. या कोयी भाजून
वा उकडून, फ़ोडून त्याचा गर मीठ मसाला लावून वाळवून ठेवतात.
पिकलेल्या आंब्यापासून कोकणात सासव नावाचा एक प्रकार करतात. खोबरे, लाल
मिरची आणि मोहरी यांचे वाटण लावलेले पण नाममात्र शिजवलेले हे सासव, अगदी
चविष्ठ असते. गोव्यात अनसाफ़नसाची भाजी असा एक प्रकार करतात. त्यात आंबे,
फ़णसाचे गरे आणि अननस वापरलेला असतो.
आंब्यातील रेषा हे डायेटरी फ़ायबर्स आहेत. काही प्रमाणात ते असावेतच. पण अलिकडच्या
नवीन वाणात, ते अभावानेच असतात.
आंब्यातील पोषणमूल्ये :-
पिकलेला आंब्यामधली चरबी नगण्य असते तर त्यात कोलेष्ट्रॉल अजिबात नसते. आणि सोडीयमही नसते. जीवनसत्व ए, बी, सी, इ आणि के असतात. बी जीवनसत्व आपल्या शरिरात साठवून ठेवले जात असल्याने, सिझनमधे खालेल्या आंब्यापासून त्याची साठवण शरिरात केली जाते.
थायमिन, नायसिन, रिबोफ़्लेवीन, पायरीडॉक्सीन यांनी आंब्याचा गर युक्त असतो. खनिजांपैकी
कॅल्शियम, तांबे, लोह, मॅगनेशियम, मॅंगनीज आणि जस्त असतात.
(मी मुद्दाम यांची टक्केवारी देत नाही कारण वाणानुसार ती वेगवेगळी असू शकते.)
तसा आंबा आहार म्हणून योग्य असला तरी काही वेळा त्याचा अतिरेक होतोच. त्यामुळे तो प्रमाणात, शक्यतो चोखून आणि त्यातल्या रेषांसकट खावा. (अगदी वैयक्तीक आवड सांगायची तर मी बहुतेक आंबे सालासकट खातो.)
आंब्यापासून तसा धोका नाही पण काही जणांना त्याची खास करुन चीकाची ऎलर्जी असू शकते. आंबे खाल्ल्याने तोंड येते, याचा अनुभव आपल्यापैकी बहुतेकांनी घेतला असेलच. काही जणांना श्वसनाचा त्रास आणि उलट्या होऊ शकतात.
अलिकडे आंब्यावर फ़वारणी केलेली असते त्यामूळे तो स्वच्छ धूवून खावा हे ओघाने आलेच. आंबा खराब झाला असेल तर खूपदा आतील रंग मळकट झालेला असतो व सालीवर डाग पडलेले असतात. तोतापुरी सारखा एखादा आंबा, वरुन व्यवस्थित दिसत असला तरी त्यात एक प्रकारचा भुंगा असू शकतो.
इतर उपयोग :-
आंब्याचे लाकूड मजबूत असते व पेट्या करण्यासाठी उत्तम असते. जळण म्हणूनही त्याचा चांगला उपयोग होतो. होम हवन करताना अनेकवेळा आंब्याच्या काटक्या वापरतात. आंब्याची पाने पण जळणासाठी उत्तम.
जंगलामधे अनेक पक्षी या फळांवर तूटून पडत असले (आफ़्रिकेत पक्ष्यांनी चोच लावल्याशिवाय फळ तोडायचे नाही, असाही एक समज आहे.) तरी आंब्याच्या कोयी वाहून नेण्यासाठी त्यांचा उपयोग नसतो. हे काम थोड्याफार प्रमाणात माकडे करतात.
पण मानवाने त्याचा प्रसार करायचे मनावर घेतल्यामूळे झाडे मानवावर भार टाकून मोकळी झाली आहेत. हापूससारखे काही वाण, स्वत:चे प्रजोत्पादन करु शकत नाहीत. म्हणजे त्यांच्या कोयींपासून झाडे उगवत नाहीत असे नाही, पण त्या झाडांच्या फळात, ते गुणधर्म असत नाहीत. त्यासाठी कलमच करावे लागते.
साहित्यात आंबा :-
आंब्याचा मोहोर आणि वसंत ऋतू यांची सांगड घातली गेलीय. त्यामूळे वसंत कालीन रागात, चैती सारख्या उपशास्त्रीय रचनात आंब्याच्या झाडाचा, फळांचा उल्लेख असतोच. कोकिळ पक्षाला देखील हे झाड प्रिय, त्यामूळेही शास्त्रीय चीजांत या झाडाचा उल्लेख येतो.
रागांवर आधारीत जी चित्रे असतात, त्यातही अनेकवेळा हे झाड दिसते. आपल्या मेंदीमधे, रांगोळ्यात, कपड्यावरील भरतकामात, कुंकवाच्या करंड्यात कुयरी हा आकार अगदी लोकप्रिय आहे.
चित्रपटातही अनेकवेळा आंब्याचे झाड दिसते. नायिकेला डोहाळे लागले म्हणजे ती एकतर कैरी खाणार किंवा चिंचा. शोले मधे पण बसंतीचा, कैरी पाडण्याचा मजेशीर प्रसंग आहे.
लावण्यांमधे पण आपल्याला आंबा दिसतो. एकदोन आठवतात त्या लिहितो.
कलमी आंब्याला मोहर फ़ुटता,
गुलाबी सुटली हवा, अन राघूचा टपून बसलात थवा..
आला गं बाई आला गं, पाडाला पिकलाय आंबा
नीट बघ ( हि पूर्ण लावणी, आंब्याचेच रुपक घेत पुढे जाते.)
आणि आपले बालपण ज्या गाण्याशी निगडीत आहे ते गाणे..
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात..
खुपच छान माहिती. एकदा
खुपच छान माहिती. एकदा मुरुडजवळच्या गारंबीच्या जंगलात आम्हाला छोटे छोटे पिवळे धम्मक जंगली आंबे मिळाले होते. आम्ही जमतील तेवढे गोळा करुन घरी घेऊन आलो. घरी आणून चाखून पाहिले तर प्रचंड आंबट होते. जंगली आंबे पिकले तरी आंबटच राहतात का?
आहा. आंबा मस्तच. सुरुवात
आहा. आंबा मस्तच.
सुरुवात कोकणातल्या फळांनीच झालीए हं. नारळ आता आंबा.
हो अमि, काही आंबे तसेच
हो अमि, काही आंबे तसेच राहतात. आम्हाला तिलारी नदीच्या काठावर एक झाड दिसले होते. मोठे मोठे आंबे लागले होते, पण चव सुद्धा घेण्याच्या लायकीचे नव्हते.
स्वाती, आता फणस पण घ्यायलाच
स्वाती, आता फणस पण घ्यायलाच हवा. हल्लीच लिहिले होते फणसावर, तेच लिहावे लागेल.
हाही भाग मस्तच दिनेशदा एक
हाही भाग मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेशदा एक विनंती, जर शक्य असेल तर प्रत्येक लेखाच्या शेवटी पुढच्या फळांचे नाव सांगाल का?. म्हणजे आम्ही माहिती (जर असेल तर :-)) जमा करू शकतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रच्याकने, पहिल्यांदा नारळ आणि आता आंबा वाचुन/पाहुन नारळाच्या वड्या (आमरस टाकुन केलेल्या) आठवल्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे मी तूला लिहिणारच होतो.
अरे मी तूला लिहिणारच होतो. मला आंब्याच्या मोहोराचा नीट फोटो हवा आहे. कापलेल्या आंब्याचा / आमरसाचा मिळाला तरी हवाय.
पुढची फळे फणस, काजू, केळी, अननस, संत्री, मोसंबी.. तूम्ही सूचवाल ती.
मस्त ! आंबा आवडत नाही असे लोक
मस्त ! आंबा आवडत नाही असे लोक नसतीलच ना.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
कैरी खाल्ली की मलेरिया
कैरी ( तीही लपूनछपून झाडावरून पाडून खाल्लेली :फिदी:) ,हापूसचा रस, पुण्याच्या कावरे कोल्ड्रिंक्समध्ये मिळणारं "फ्रूट किंग"....स्स्स्स, आठवूनच तोंपासु.
हापूस, खास करुन देवगड,
हापूस, खास करुन देवगड, रत्नागिरी भागात होणारा, जगभरात प्रसिद्ध आहे. पोर्तूगीजांनी इथे रुजवलेले हे वाण, कोकणच्या मातीत अजूनच चवदार झाले.>>> दिनेशदा, हे माहिती नव्हते! मला वाटले, हापूस पूर्णपणे कोकणाच्या मातीतली कमाल आहे. आंब्याविषयी मस्त माहिती दिलीत.
रुणुझुणू,आंबा अगदी हापुस आंबा
रुणुझुणू,आंबा अगदी हापुस आंबा सुध्दा न आवड्णारे महाभाग आहेत.
दिनेशदा,हे तर अगदी लाडके फळ्.त्याच्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल.आमच्या इथे शेपूचा वास असलेल्या कैर्या मिळतात्.रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजुंनी ह्याचीच जास्ती झाडे आहेत. ह्याचा पिकलेला आंबा खायला नाही मिळाला.
आया मौसम हापूस का!!!
आया मौसम हापूस का!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आहा दिनेशदा अगदी खास फळाची
आहा दिनेशदा अगदी खास फळाची निवड.. पूजेच्या मांडणीत पाच फळांमध्ये या सिझनला नारळाच्या जोडीला आंबा हवाच..
आमच्या घराजवळ एक खास झाड होते. त्याचे नाव खोबरी आंबा>>> माझ्याही गावाला काही वर्षांपुर्वी खोबरी आंब्याची झाडे होती..एकेक फळ मोठ्या पपनसा एवढे.. आम्ही त्याचे फळ पिकलेले कधी खाल्ले नाही कारण आधीच ती काढुन घेतली जायची.
देवगड-वाड्याला मी एक ८५ वर्षाचे कलमी आंब्याचे झाड बघीतले आहे जे दर एक वर्षाआड प्रचंड प्रमाणात आंबे द्यायचे (जवळ जवळ १०० पेटी)...
असतात सगळे रायवळ जातीचेच पण गावाला स्थानाप्रमाणे आंब्याची नावे बदलतात जसे आमच्या गावाला डगरी आंबा (शेजारी छोटी टेकडी होती), एस्टी आंबा (एस्टी स्टॉपच्या शेजारचे झाड), खोतांबा (खोताच्या परसातले झाड) इ. आंब्याची नावे होती.
आम्हीपण नावाचा उगम न शोधता आंबे खाण्यात समाधान मानायचो
कलमी आंब्याची चव तर जगप्रसिद्धच पण माझ्यामते पायरी, बिटकी (जात माहीत नाही पण आम्ही असेच म्हणायचो) ह्याही जातींची चव अफलातुन पण मार्केटींग नसल्याने अप्रसिद्ध. गावाला काही रायवळ आंब्याची झाडे खास राखून ठेवली आहेत त्याच्या कैर्यांचे काप काढून मिठात मुरवून विकतात.
खंत अशी वाटते की कलमी आंब्याच्या (मी तर त्याला आता डॉलर आंबा म्हणतो) मोहापायी वा जळण किंवा लाकडच्या मोहापायी कोकणातील हजारोनी इतर जातीतील आंब्याच्या झाडांची तोड झाली. असो.
खुप मस्त मालिका... अजुन भर पडुदे.
दिनेश मस्त माहिती दिली आहे.
दिनेश मस्त माहिती दिली आहे. आवडली एकदम.
वा दिनेशदा, मालिकेतल्या
वा दिनेशदा, मालिकेतल्या दुसर्या फळाची निवडही उत्कृष्ट. माहितीही नेहमीसारखीच झकास.
कोकणातले रायवळ आंबे म्हणजे छोटे छोटे, चोखून खायचे. प्रत्येक झाडाच्या आंब्याची चव वेगळीच आणि अप्रतिम.
आंबे आले की आईच्या हातचा आंब्याचा गोड शिरा हे समीकरण होते. लहानपणी मी आमरस-भात आवडीने खायचे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्याचे आंबे पिकले तरी हिरवेच
त्याचे आंबे पिकले तरी हिरवेच रहायचे >>> आमच्या आमराईतल्या बहुतेक सर्व जाती अशाच आहेत. लंगडा पण पिकला तरी हिरवाच रहातो ना ? वनराज सुद्धा. तो साखरगोटी पण आहे आमच्याकडे.
सुक्या गवताच्या आच्छादनाखाली ठेवला जातो >>> त्याला 'आढी' म्हणतात. अढी लावताना आंबे नाक वर करुन उभे(च) ठेवायचे असतात. दबलेले, मार लागलेले आंबे सहसा अढीत लावत नाहीत.
केवळ फळासाठी लावलेल्या झाडांची फळे मात्र पूर्ण जून होईपर्यंत झाडावरुन काढत नाहीत >>>> पूर्ण जून म्हणजे काय ? माझ्या माहितीत शाख लागायला लागल्या की आंबा उतरवतात.
पुण्यात (बहुतेक) शेतीमहामंडळाचे प्रदर्शन की आंबा महोत्सव असतो दर वर्षी. तिथे भरपूर आंबे बघायला/विकत घ्यायला मिळतात.
आहाहा रायवळ.... आमचा उन्हाळी
आहाहा रायवळ....
आमचा उन्हाळी कार्यक्रम..दुपारी पायरी आंब्याचा रस काळ्या मिरीची पूड घालून खायचा. पायरी आंबा थंड (म्हणूनच मिरपूड घालयची), जास्त बाधत नाही. तो एकदा मनसोक्त खाऊन झाला की संध्याकाळी हापूस खायचा. रस पायरीचाच हवा, नि नुसता आंबा हापूसच हवा. मग दोन आंब्यात इण्टर्वल म्हणून २-३ पिटुकले रायवळ हाणायचे हवे तर.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
शिवाय मग आईबरोबर जाऊन लोणच्यासाठी खास कैर्या आणायच्या, मसाला आणायचा...
कॉलेजला असताना एका मित्राला सांगून कैर्या आणाल्या होत्या. ते झाड सरकारी संपत्ती असल्यामुळे कैरी तोडली तर दंड होता म्हणे! तरी त्याने आणल्या. मग मीठ, मिरची वगैरे आम्ही मुलींनी आणून मस्त कैरी-लोणचे पार्टी केली होती.
रच्याकने, हापूससुद्धा न आवडणार्या माझ्या एका मैत्रिणीला आम्ही "तू अगदी वाया आहेस गं!" म्हणायचो.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मनोज, हे मी लेखात अॅड करीनच,
मनोज,
हे मी लेखात अॅड करीनच, पण हापूस हा काही खाण्यास योग्य आंबा नाही. एकतर तो अतिगोड असतो, आणि त्यात डायेटरी फायबर्स नसतात. बेताचे गोड असलेले, भरपुर रेषा असलेले आंबे (रायवळ सारखे) खायला उत्तम.
लाकडाचे लाकूड उत्तम जळण असते. त्या लाकडावर केलेल्या जेवणाची चव जास्त चांगली असते असे म्हणतात. त्यामुळे अनेक झाडांची कत्तल होते हे खरेय.
सिंडरेला,
काही जाती हिरव्या राहतात. काहिंना पिवळसर झाक येते. केनयात तर त्यांना लाल रंग चढतो. अढीबाबत पण लिहितो. हि अढी रोज बघावी लागते. एक जरी खराब निघाल तर सगळे नासतात. पण शाख लागायला लागल्या, म्हणजे काय ? हा शब्द नविन आहे मला. तो वरचा फोटो असाच एका प्रदर्शनातला आहे. मुंबईत पण आंबा महोत्सव भरेल आता.
प्रज्ञा,
आंबा तोडल्यास ५० रुपये दंड अशा पाट्या कोकणात बर्याच दिसायला लागल्यात आता. पण गोव्यात अजूनही अशी गरज वाटत नाही. दुसर्याच्या झाडावरची फळे फूले तोडण्याची प्रवृत्ती अजिबात नाही तिथे.
शाख म्हणजे झाडावरच जरा
शाख म्हणजे झाडावरच जरा पिकलेला आंबा किंवा कैरीच.
आंबा..... कालच रस खाल्ला. पण
आंबा..... कालच रस खाल्ला. पण तो डबाबंद आंब्याचा. चव छान होती, काय करणार "जो मिले वही सही".
ईथले मेक्सिकन आंबे बिल्कूल आवडत नाहीत.
आमच्याकडे मराठ्वाड्यात मस्त गावरान आंबे मिळायचे. लहानपणी खुप आंबे खाल्ले, अगदी xxवण लागोस्तर.
. त्यावेळी हापुस बद्दल खुप ऐकू येई, तो किती छान, स्वादीष्ट आहे वगैरे. मला खुप इच्छा होई की कधी आपल्याला हापुस खायला मिळणार. कारण त्यावेळी आमच्या भागात हापुस काही सहज उप्लब्ध नसत.मग बर्याच वर्षाने पुण्यात आल्यावर ती इच्छा पुर्ण झाली. हापुस पण खुप आवडला.
तरी गावाकडच्या गावरान आंब्याची चव काही औरच असे.
मला तो गोटी आंबा विशेष आवडत असे, आख्खी कोय तोंडात टाकून चघळायचे, व्वा... आजुन चव आठवते.
माझा नावडता आंबा म्हणजे शेप्या आंबा, तो शेपुचा वास मला अगदी बाहेरुन्च चटकन लक्ष्यात येत असे.
रच्याकने, फिलिपाइन्स मधे जगातला सर्वात गोड आंबा मिळतो, असे वाचले होते. खरे आहे का?
अम्म्म्म... तोंडाला पाणी
अम्म्म्म... तोंडाला पाणी सुटलं! आता त्याचीपण सोय करा दिनेशदा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इथे (फ्रांसमधे) भारतीय आंबे प्रसिद्ध नाहीत. तसे इथे आंबे इतके प्रसिद्ध नाहीतच. क्वचित डेसर्ट म्हणून किंवा फ्रूट सालेड मधे असतो. पण फ्रेंच लोकं मुद्दाम खात नाहीत. जे मिळतात ते ब्रासीलचे मिळतात. भारतीय दुकानात पाकिस्तानी आंबे पण मिळतात. (पाकिस्तानी म्हणाल्यावर माझा एक मित्र उगाचच घाबरला... जसं काही कुठल्याही क्षणी त्याचा विस्फोट झाला असता!)
छान माहिती. आंबा म्हणजे
छान माहिती. आंबा म्हणजे जिव्हाळ्याचा विषय.
शाख लागणे म्हणजे पाड लागणे का? आमच्याकडे कैरीला पाड लागला असं म्हणतात.
पोर्तूगीजांनी इथे रुजवलेले हे वाण, कोकणच्या मातीत अजूनच चवदार झाले.>>> हे कळलं नाही. हापूस पोर्तुगीजांनी आणला का?
दिनेशदा मस्त माहीती...आवडली
दिनेशदा मस्त माहीती...आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेश, रायवळ, पायरी,
दिनेश,
रायवळ, पायरी, साखरांबा, बिटक्या वगैरे ह्या आंब्याचे फोटो मिळाले तर टाका ना.
हापूस बरोबरच हे आंबे पण खाण्यात मजा असायची.
पायरीचा रस खूप छान वाटतो हापूस पेक्षा(हे. मा. म.),खूप जड नाहि वाटत.
उत्तरेचे केशरी, लंगडा, दशहरा.. हे सुद्धा मस्त लागतात.
नंतर फणस, काजू, केळं घ्या जमले तर(तुम्हीच म्हणालात ना सुचवा म्हणून हे).
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आंबा पोर्तुगीज ह्याने आणला
आंबा पोर्तुगीज ह्याने आणला गोष्ट इथे मिळाली,
http://en.wikipedia.org/wiki/Alphonso_(mango)
.
.
रुणुझुणू,आंबा अगदी हापुस आंबा
रुणुझुणू,आंबा अगदी हापुस आंबा सुध्दा न आवड्णारे महाभाग आहेत.>>![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ऊफ्फ.....ये लोग जिये तो क्या जिये ??
दिनेशदा, आमच्या आंब्याचीं
दिनेशदा, आमच्या आंब्याचीं जगभर विखुरलेलीं भावंडं इथं 'फॅमिली गेट-टुगेदर'साठी घेऊन आलात ! धन्यवाद .![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
<< पायरीचा रस खूप छान वाटतो हापूस पेक्षा >> बर्याच कुटूंबात [ आमच्याही ] आंबरस = पायरी हे समीकरणच असतं ! आणि हे फॅड [!] जोरात पसरत असावं कारण पायरीचा भाव हल्ली हापूसच्या बरोबरीनं चालायला लागलाय !
कांही रायवळ आंबे हापूसपेक्षाही चविष्ट असतात. आमच्या घराच्या वरच्या कातळावर असाच एक आंबा होता व त्याला नांवच दिलं गेलं होतं 'अमृत' ! फक्त रायवळ आंबा झाडावरच पिकेपर्यंत वाट पहावी लागते
एव्हढंच.
रायवळ आंब्यांच्या बाबतीत 'वरलीया ढोंगा फसण्या'ची शक्यता अधिक; बाहेरून सुंदर तांबूस पिवळा दिसणारा आंबा चिंचेचा मोठा भाऊ असूं शकतो तर पिकल्यावरही हिरवा गार रहाणारा एखाद्या झाडाचा आंबा हापूसच्याही थोबाडीत मारणारा असतो ! [ पुणे परिसरात 'रायवळ'ला 'गावरान' आंबा म्हणत असावेत ]
आपण 'खोबरी' आंबा म्हटलंय तसा आमच्याकडेही मोठ्ठं फळ येणारा 'नारळी 'आंबा होता. फक्त मुरांबा घालण्यासाठीच तो खास 'रिझर्व्हड' असे !
रायवळ आंब्यांचा कोकणातला खास पदार्थ - 'आंब्याचं सासव'. पिकलेल्या आंबट-गोड चवीच्या आंब्यांच साल काढून टाकून रस व बाठे काढून घ्यायचे; मोहरी, हिंग व मेथीचे दाणे याची फोडणी द्यायची; खोबरं व धणे मिक्क्सरमधे वाटून त्यात मिसळायचे; मीठ व गुळ [ आंब्याचा आंबट-गोडपणा किंचित गोडाच्या बाजून झुकेल एवढाच] घालून उकळी यायच्या आंतच उतरून घ्यायचं. चपाती किंवा भात याबरोबर भुरके मारत हादडायचं !
याशिवाय, हंगामात कच्चा रायवळ आंबा जेवणात चिंचेऐवजी सर्रास वापरला जातोच. मासे आमटीत, विशेषतः कोळंबीच्या आमटीत, ताजी कैरी विशेष लज्जत आणते !
मस्तच दिनेशदा... कधी एकदा
मस्तच दिनेशदा... कधी एकदा गावी (रत्नागिरी) जातेय असं झालयं.... धन्यवाद.
स्स्स्स्स्स्स्स्स
स्स्स्स्स्स्स्स्स
मस्तच लेख.... अप्रतिम आणि
मस्तच लेख.... अप्रतिम आणि तोंपासु एकदम.
नमसकरभाऊ, सासवाच्या कृतीबद्दल धन्यवाद. मी खुप लहानपणी खाल्लेय सासव आणि अजुन चव लक्षात आहे.
मला कायम कोकणात मिळतात ते आंबे बेस्ट आणि बाकी सगळे वर्स्ट असेच वाटत राहिलेय. मी हापुस, पायरी आणि चोखुन खायचे रायवळ सोडून बाकी इतरांना जराही भाव देत नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यावर्षी मात्र आंबे नाहीत असा सुर लावलाय सगळ्यांनी.
आह्हाह्हा........... इतकं
आह्हाह्हा........... इतकं तोंपासु झालय कि काही लिहिताच येत नाहीये...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages