लेखन स्पर्धा-२ - फिटे अंधाराचे जाळे... -- ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 September, 2023 - 10:34

लेखन स्पर्धा-२ - फिटे अंधाराचे जाळे... -- ऋन्मेऽऽष

लाखो करोडोंच्या गर्दीत मी एकटा होतो. ना पुरेशी हवा होती ना धड प्रकाश होता, अश्या रस्त्यावरून वाट फुटेल तिथे धावत होतो. सोबत धावणारे माझे भाऊबंद नाहीत तर स्पर्धक आहेत हे समजायला एक काळ जावा लागला. ना मी त्या सर्वात वेगवान होतो, ना सर्वात सशक्त होतो. नशीबवान तर बिलकुल नव्हतो. पण तरीही एक गुण होता माझ्यात. तो म्हणजे चिकाटी. ती मी शेवटपर्यंत सोडली नाही, आणि अखेरीस फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश म्हणत मी या जगात जन्माला आलो Happy

sperm quote 1.jpg

...

पण आयुष्याचा संघर्ष ईथे संपला नव्हता तर सुरू झाला होता. माझाच नाही तर तुम्हा आम्हा सर्वांचाच ईथे सुरू होतो.
बालपणीचा काळ सुखाचा असे म्हणतात. माझ्या आयुष्यातील देखील तो सर्वात सुंदर काळ होता. पण त्यालाही संघर्षाची झालर होतीच.

दक्षिण मुंबईतील चाळीतले आयुष्य जगताना मी जी धमाल केली त्यावर शेकडो लेख लिहिले तरी त्याची शब्दांत मोजदाद होणार नाही. लिमिटेड रिसोर्सेस असूनही प्रोजेक्ट सक्सेसफुल केल्याचे समाधान वेगळेच असते. आयुष्याचेही असेच असते. हे सुख समाधान अनुभवायचे असेल तर तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येऊ नये. मी अगदी सोन्याचा नसला तरी चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेलो. एकुलता एक मुलगा. आईवडील दोघेही चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीत. चाळीतील शेजारच्या पाजारच्या लोकांपेक्षा सुखवस्तू म्हणावे असे घर.. पण फार काळ हे सुख टिकले नाही.

बालपणीचा जो काळ आपल्याला जेमतेम आठवतो तोपर्यंत आमची घरची आर्थिक परीस्थिती चांगली होती. पण वडिलांना नऊ ते पाच सरकारी नोकरीत रस नव्हता. व्यवसाय नेहमी खुणावत राहायचा. त्यासाठी जे गुणकौशल्य अंगी लागतात त्यातले काही त्यांच्याकडे होते. पण आयुष्य म्हटले की सगळेच कुठे मनासारखे घडते? बघता बघता डोक्यावर कर्जाचा डोंगर चढला. जो उत्पन्न आणि मालमत्तेपेक्षा वरचढ होता. त्यातून बाहेर पडायला कित्येक वर्षे जावी लागली. हा संघर्ष खरे तर माझ्या आईवडीलांचा. पण आता ते मायबोली सदस्य नसल्याने यावर लिहू शकत नाहीत आणि मी ते सविस्तर लिहिणे ऊचित होणार नाही. पण या सगळ्याची झळ माझ्या बालपणाला देखील बसली होती.

मारुती गाडीची तेव्हा मला फार क्रेझ होती. रस्त्याने मारुती जाताना दिसली की मी मोठ्याने मारुतीsss म्हणून ओरडायचो. घरची सुबत्ता पाहता लवकरच ती आपल्या घरात येईल अशी चिन्हे खुणावत होती. पण त्याच काळात परिस्थिती बदलू लागली आणि स्वतःचे खाजगी वाहन घेणे दूर, टॅक्सी परवडत नाही म्हणून तास दिड तास वेळ गेला तरी बसच्या रांगेत प्रतीक्षा करणे नशिबात आले. त्यातही अर्ध्या तासाचे अंतर असेल तर चालत जाऊन बसचे पैसे देखील वाचवावेत हे अंगवळणी पडले. कॅडबरी चॉकलेट आणि फ्रूटी वगैरे जंक फूड आहे, त्याचा हट्ट करू नये हे संस्काराचा भाग झाले. दिवाळी आणि वाढदिवस हे आयुष्यात नवीन कपडे मिळावेत म्हणूनच येतात ही आपली संस्कृती वाटू लागली. खेळणी हा प्रकार आयुष्यात मग कधी आलाच नाही. ज्याची बॅट त्याला एक्स्ट्रा बॅटींग दिली की आपल्याला फुकट खेळायला मिळते हा व्यावहारीकपणा समजला.

खरे तर भारतातील दारिद्र्य रेषेखालील जनता पाहिली तर त्या तुलनेत मी काही हलाखीचे जीवन जगत नव्हतो. पण तरी बालपणी जेव्हा समज येऊ लागली तेव्हा आर्थिक परिस्थिती डोळ्यासमोर बदलताना बघत होतो. तिच्यासोबत जुळवून घेत होतो. आणि त्याचमुळे वयाला न शोभणारा समजूतदारपणा अंगी येत होता.

केळा वेफर माझ्या फार आवडीचे. पण ते आईच्या पगाराच्या दिवशीच यायचे. ईतर दिवशी सुका खाऊ म्हणून परवडावे अशी एक सुकी भेळच उरली होती. जी मला फार आवडायची नाही. पण ओली भेळ जास्त किंमतीची असल्याने ती आवड मनातच ठेवायचो, आणि मला सुकी भेळच जास्त आवडते असे दाखवायचो, अन्यथा आपल्या एकुलत्या एक मुलाची आवड आपण पुर्ण करू शकत नाही याचे आईवडिलांना वाईट वाटले असते. माझ्यातील समजूतदारपणा दहा-बारा वर्षांचे असतानाच या लेव्हलला गेला होता Happy

खाऊ असो वा कपडे, खेळणी किंवा गोष्टींची पुस्तके, वा मित्रांसोबत पिकनिकला जाणे, पार्टी करणे.. जिथे जिथे पैसा लागतो ते मी स्वेच्छेने टाळू लागलो. पण यात कुठेही माझे मन मारले जात नव्हते. अश्या प्रकारे आपण आपल्या आईवडिलांना मदतच करत आहोत असे वाटून एक वेगळाच आनंद मिळत होता. त्याचवेळी मित्रांसोबत खेळताना, चाळीतले सण उत्सव साजरे करताना, जी मजा येते ती विनामूल्य असूनही अमूल्य असते हे देखील उमगले होते.

जेव्हा कर्जाचा आकडा उत्पन्नापेक्षा जास्त असतो तेव्हा ते फेडायला काहीतरी चाकोरीबाहेरचे अन वेगळे करावे लागते. कधी ते जमते तर कधी फसते. आमचे फसले. यात वडिलांनी नोकरी काही काळासाठी सोडली. आईच्या पगारावर घरखर्च आणि कर्ज दोन्हींचा भार आला. स्वस्थ कसे बसणार म्हणून तिने उत्पन्नाचा अतिरीक्त सोर्स म्हणून शिवणकाम सुरू केले. कुठलेही काम छोटे किंवा मोठे नसते ही शिकवण त्या दिवशी जरी मला आईकडून मिळाली असली तरी ती फार काळ टिकली नाही. कारण यावरून घरात खडाजंगी झाली. कारण माझ्या आजीचे म्हणने असे होते की आपल्या घरात आजवर कोणी असे काम केले नाही. हे आपल्या घराण्याच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. आधीच कर्जदार दारात आल्याने प्रतिष्ठा धुळीला मिळाली होतीच. त्यात अजून हे नको होते.

घराण्याची ती तथाकथित प्रतिष्ठा आईवर लादली गेली आणि ते काम सुरू होताच बंद झाले. वडिलांचे हातपाय झाडणे चालू होतेच. पण दर महिन्याचे ठराविक असे उत्पन्न नव्हते. कधी पैसे आले तर मेजवानी, आणि नसले तर उपवास. मोठे घर आणि पोकळ वासे म्हणावे तसे एकदा खरेच घरात खायला अन्नाचा दाणा नव्हता. विभागात दंगलींमुळे कर्फ्यू लागला होता. तरीही आई वडिलांना जीव धोक्यात घालून मामाकडे चालत जाऊन जेवण घेऊन यावे लागले होते.

हे सर्व घडत असताना माझ्या कैक मित्रांना वाटायचे की याचे आईवडील दोघे छापताहेत आणि हा एकुलता एक. याची तर ऐश आहे. माझे टापटीप राहणे आणि चेहर्‍यावर न दिसणारी गरीबी याला दुजोरा सुद्धा द्यायची. त्या मित्रांचे समज कायम ठेऊन आयुष्य जगायची सवय मला झाली होती.

हळूहळू वडिलांच्या प्रयत्नांना यश मिळू लागले तसे थोडेफार उत्पन्न वाढू लागले. पण ईतके नव्हते की आयुष्य स्थिरस्थावर होईल. दोन वेळच्या जेवणाची ददात मिटली असली तरी भौतिक सुखांपासून दूर होतो. डोक्यावरचे कर्ज अजूनही कायम होते. पण डोक्यावर हक्काचे छप्पर नव्हते. मुंबईत हक्काचा निवारा नव्हता. त्यासाठी जमवलेले पैसे केव्हाच खर्च झाले होते. जे एका घरात गुंतवलेले ते देखील कर्ज फेडायला काढून घ्यावे लागले. जे चाळीतले घर होते ते आजी-आजोबांचे होते. एकेक करत त्या दोघांनी या जगाचा निरोप घेतला. आणि त्याचसोबत आमच्यावर त्या घराचा निरोप घ्यायची वेळ आली. कारण आता त्या घराच्या आठ भावंडांमध्ये आठ वाटण्या होणार होत्या. पाच भावांच्या, तीन बहिणींच्या..

जानेवारी महिना संपत आला होता. माझी बारावीची बोर्डाची परीक्षा जवळ आली होती. मी डोंगरावर अभ्यासाला जायचो. एके दिवशी अभ्यास करून घरी आलो आणि घराला टाळे दिसले. घरचे सारे पोलिस स्टेशनला. रात्री कधीतरी ते टाळे उघडले आणि घरात प्रवेश मिळाला.

जोडून दोन रूम होत्या आमच्या. त्यापैकी एकीचे टाळे कायम ठेवले गेले आणि एका रुममध्येच प्रवेश मिळाला. तो देखील केवळ तीन महिन्यांपुरता. त्या मुदतीत घराच्या किंमतीईतके पैसे जमवायचे होते. ईतर सात भावंडांना त्यांच्या वाटण्या द्यायच्या होत्या. तरच घर ताब्यात येणार होते.

जे एवढे वर्षे दोन खोल्यांमध्ये राहत होतो तो संसार एका खोलीत आला होता. महिन्याभराने तो देखील रस्त्यावर येतो का अशी परिस्थिती होती. ज्या चाळीत आयुष्य गेले तिथून अशी सामानाची बांधाबांध करून जाणे सोपे नव्हते. वडिलांचे टेंशन त्यांनाच ठाऊक. त्यांनी काही टोकाचा निर्णय घेऊ नये हे आईचे टेंशन. माझ्या डोक्यावर बारावीचे टेंशन. आधीच मी एक वर्ष अभ्यास केला नव्हता म्हणून गॅप घेतली होती. दुसर्‍या वर्षातही मी अभ्यासाची टाळाटाळ केली होती. पोरगा चारचौघांपेक्षा हुशार म्हणून वडिलांच्या आशा माझ्यावर होत्या. त्या मी धुळीला मिळवणार होतो हे तेव्हा मला एकट्यालाच ठाऊक होते. माझे बारावीचे वर्ष म्हणून त्यांचे पैश्यांचे टेंशन ते कधी माझ्यापर्यंत येऊ द्यायचे नाहीत. दिवसभर तंगडतोड करून जेव्हा ते घरी यायचे, रात्री दबक्या आवाजात आईशी बोलायचे, तेव्हा एक वाक्य नेहमी माझ्या कानी पडायचे. ते म्हणजे विष खायलाही पैसे नाहीत.. आणि हे असे ऐकल्यावर माझ्या छातीवर येणारे दडपण मलाच ठाऊक.. त्या काळात कसले टेंशन नसलेच तर ते खोटी प्रतिष्ठा जपायचे नव्हते..

पुढचा महिना फार अवघड होता. रोज थोड्याफार फरकाने हेच चित्र होते. चाळीतली शेजारधर्माची संस्कृती म्हणून एक चांगले होते. शेजारचे लोकं चर्चेला यायचे, त्यांच्याशी बोलून मन मोकळे करता यायचे. हा आयुष्याचा शेवट नाही, यातूनही काही मार्ग निघेल असा ते धीर द्यायचे. वकिलाशीही बोलणे होत होते. बँकेच्या फेर्‍या होत होत्या. पण नुसते दिवस पळत होते. गरजेपुरते पैसे जमत नव्हते.

आणि मग अश्यावेळी बहिणी मदतीला धावून आल्या !

स्त्री असणे म्हणजे काय... हे पहिल्यांदा मला माझ्या आईने दाखवले. त्यानंतर आत्यांनी प्रचिती दिली. तीनही बहिणींनी मिळून आपला हिस्सा तेव्हा आम्हाला दिला. कुठलीही कागदपत्रे न करता, शक्य होईल तेव्हा फेडू या शब्दावर विश्वास ठेवून दिला. जे पैसे जमवायचे होते ते अचानक निम्मे झाले. आणि दडपण पुर्ण गेले. तेवढी तजवीज करणे देखील सोपे नव्हते, पण शक्य होते. जेव्हा जगण्याचे सारे दरवाजे बंद झाले होते आणि आयुष्य वेंटीलेटरवर गेले होते तेव्हा एका पाठोपाठ एक तीन खिडक्या उघडल्या होत्या.

आर्थिक परिस्थिती अचानक बदलली असे नाही, पण जगण्याची नवी उमेद मिळाली होती. मी मात्र आधीच माझ्या बारावीची वाट लाऊन बसलो होतो. याबद्दल सविस्तर गेल्या गणेशोत्सवात "कॉलेजचे ते मोरपिशी दिवस" या सदराखाली लिहून झाले आहे. पण तेव्हा विषय कॉलेज जीवनाचा असल्याने ते घडत असतानाची ही पार्श्वभूमी लिहिली नव्हती. घरची स्थिती अशी असताना वडिलांना माझ्याकडून शिक्षणाबाबत बरेच अपेक्षा होत्या. त्यांची मी शून्य पुर्तता करून देखील त्यांनी मला सांभाळून घेतले. कदाचित आयुष्यात जी अजून एक संधी त्यांना मिळाली तीच त्यांनी मला देखील दिली होती.

आज वेळ बदलली आहे पण पैश्याची खरी किंमत त्या त्या वेळेला असते. ज्या वेळी वडिलांना त्यांच्या बहिणींनी मदत केली त्याची परतफेड कितीही व्याज जोडले तरी पैश्यात होणार नाही. म्हणून वडील आजही कुठलाही हिशोब न ठेवता ते कर्ज फेडतच आहेत. आत्या नाही राहिल्या तरी त्यांच्या मुलांना गरजेनुसार मदत करतच आहेत.

आज त्या आठवणी उगाळून मन काही सुखावत नाही. पण आज आपण जिथे आहोत तिथे आधीपेक्षा सुखी आहोत हे जाणवते. इथून पुढे गेलो तरी पाय जमिनीवरच राहतील असा विश्वास राहतो, आणि इथून खाली घसरलो तरी तो निसर्गाचाच नियम म्हणून त्याला स्विकारण्याची हिंमत अंगी येते. आफ्टरऑल, वक्त बदलते देर नही लगती..

कुठेतरी वाचलेला, आवडलेला शेर शेअर करतो..

समय के एक तमाचे की देर है प्यारे...
फिर मेरी फकीरी क्या.. तेरी बादशाही क्या... !!

-----------------------------------------

आजच्या तारखेला देखील गेले चार महिने आयुष्यात एक टेंशन आहे. सध्या कोणाला काही सांगू शकत नाही. फक्त संबंधित व्यक्तींनाच ते ठाऊक आहे. पण टेंशन ईतके आहे की एकदा ते विचार मनात येऊ लागले की घश्याखाली घास उतरत नाही. छातीवर दडपण ईतके येते की आता फुटून जाईल असे वाटते. ईतका वाईट अनुभव आयुष्यात या आधी कधी घेतला नव्हता. टेंशन घेणे हा माझा पिंडच नव्हता. पण ही परीस्थिती वेगळीच आहे. जे मी नेहमी सहजपणे आनंदीच राहत होतो ते आता ओढून ताणून आनंदी राहायचा प्रयत्न करत आहे. स्वत:लाच फसवायचा प्रकार चालू आहे.

त्यामानाने गेले तीनचार आठवडे या दडपणाला झुगारून नॉर्मल लाईफ जगायचे प्रयत्न चालू आहेत. कधी ना कधी मी यातून बाहेर पडेन आणि सारे काही सुरळीत होईल हा विश्वास स्वतःला देत आहे. मायबोलीच्या या गणेशोत्सवाला एक स्ट्रेसबस्टर म्हणून घेत आहे, डोक्यातले विचार जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कागदावर कसे उतरवता येईल हे बघत आहे.

डायलॉग फिल्मी आहे, पण विश्वास ठेवलात तर त्यामागचा अर्थ अस्सल आहे. आणि तेच माझ्या मनाला पटवून देत आहे, की खरेच बॉलीवूडच्या एखाद्या पिक्चरसारखेच आपल्या आयुष्यात देखील शेवटी सगळे चांगलेच होते. बोले तो, हॅपी एंडींग्ज..!

आणि जर चांगले झाले नाही..,
तर समजावे तो शेवट नाही..
पिक्चर अजून बाकी आहे माझ्या मित्रांनो.. आयुष्य अजून बाकी आहे !!

सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा Happy

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>ते म्हणजे विष खायलाही पैसे नाहीत.. आणि हे असे ऐकल्यावर माझ्या छातीवर येणारे दडपण मलाच ठाऊक..
बाप रे!!! लहानपणी खूप भयावह वाटते असे.

आत्यांविषयी आदर दुणावलाच. त्यांचा स्टँड मला बरोबर वाटतो नव्हे तोच माझाही माझ्या भावाबाबत आहे. जर मी आईबाबांची काळजी भावावर सोडलेली आहे माझ्या वडिलोपार्जित धनात मला हक्क नाही/नको.

तुमची तेव्हाची परिस्थिती फार छान मांडलेली आहे. अजुन एक - जो काही प्रसंग आहे त्यातून तुम्ही नक्की तरुन जाल. गॉड ब्लेस.

वाचून अजिबात चांगलं वाटलं नाही. विशेषता>> आजच्या तारखेला देखील एक टेन्शन आहे>> विघ्नहर्ता जाताना तुमची सगळी विघ्नं घेऊन जाऊदे ही सदिच्छा!

ओह ! वाचताना भरुन आले .

या गणेशोत्सवात तुमची सारी विघ्ने दूर होवोत ही गणराया चरणी प्रार्थना

ओह.. माझे आताचे टेन्शन वाचून कोणी प्लीज वाईट वाटून घेऊ नका.

खरे तर फिटे अंधाराचे जाळे नुसार लेख तिथेच थांबवायला हवा होता. शेवटचा पॅराग्राफ टाळता आला असता. पण तो लिहायचा हेतू माझे आताचे टेन्शन शेअर करावे असा नव्हता. तर हा विषय आला तेव्हा विचार करताना आजवरच्या आयुष्यात आलेली संकटे आठवली. त्यातून आपण सुखरूप बाहेर पडलो आहोत असा विचार करता आताच्या टेन्शन मधून देखील आज ना उद्या नक्की बाहेर पडू असा विश्वास वाटू लागला. म्हणूनच हे इतके लवकर दुसऱ्या दिवशीच लिहून काढले.

बाकी ज्याने टेन्शन दिले आहे तोच आता यातून बाहेर काढेल असा विश्वास आता हे लिहून झाल्यावर खरेच वाटू लागला आहे Happy (इथे तोच म्हणजे देव अभिप्रेत नाही)

तुमच्या शुभेच्छाबद्दल धन्यवाद !

तूर्तास एक माबो ब्रेक घ्यायची वेळ झाली आहे..
भेटूया लवकरच .. Happy

छान लिहीले आहे. त्या लेखावर दिलेली प्रतिक्रिया इथेही चपखल आहे.

आई-वडिलांबद्दल टोटल रिस्पेक्ट!

बाकी सध्या ज्या काय कारणांनी टेंशन आहे त्यातून चांगल्या रीतीने बाहेर पडण्याकरता शुभेच्छा!

रुन्मेष, या आयडीने केलेल्या इतर कोणत्याही लिखाणापेक्षा हे प्रांजळ वाटलं, मनाला भिडलं.
सर्व अडचणी व्यवस्थित दूर होवो.मदत लागल्यास हाक अवश्य मारणे.

खूप सुंदर आणि प्रामाणिक लेख. तुझ्यावरचं दडपण लवकरात लवकर जावो ही सदिच्छा. समस्या जावोत असं आपल्याला वाटतं, पण पूर्णपणे समस्याहीन आयुष्य कुणाचंच नसतं हे आता उमगलंय. त्या समस्यांचं अस्तित्व अ‍ॅक्सेप्ट करायचं बळ मिळो ही सदिच्छा जास्त रिअ‍ॅलिस्टिक आहे. तुझ्या घरातच याचा उत्तम वस्तुपाठ देणारी माणसं आहेत, त्यामुळे तू लवकर त्यातून बाहेर पडशील याची खात्री आहे.

छान लिहिलंय मनमोकळेपणाने आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता.
बर्याच ठिकाणी relate झाला लेख.
मागे वळून पाहताना लक्षात येतं की काय काय परिस्थितीत आईबाबांनी संघर्ष केलाय आणि आदर आपोआप दुणावतो.

"समय का तमाचे " वाल्या ओळी प्रचंड आवडल्या.

हे खालचं लिहिलेलं मनावर घेच असे नव्हे पण ना राहवून लिहिलेलं आहे.
हे असं निखळ लिहीत जा की.
बाकी नको ते धागे काढत असतोस त्यापेक्षा हा अस्सल माणूस भावतो मला तरी.

छान मन मोकळं कुठलाही आव न आणता लिहिले आहेस.
खरे तर भारतातील दारिद्र्य रेषेखालील जनता पाहिली तर त्या तुलनेत मी काही हलाखीचे जीवन जगत नव्हतो. >>> ही जाणीव पण महत्वाची!
देयर आर ऑल्वेज बेटर & वर्स्ट पीपल इन वर्ल्ड अराऊंड यु. धिस शाल पास टू.

तुमच्या वरील जे काय संकट असेल ते विघ्न गणपती हरण करो ही प्रार्थना!

ऋ, खूप सुंदर लिहिलं आहेस, तू लिहितोस ते खर म्हणजे नेहमीच आवडत. कॉलेज चे मोरपंखी दिवस हे ही आवडल होत गेल्या वर्षी लिहिलेलं आणि ह्या वर्षी लिहिलेलं ही आवडलं.
हारपा ना अनुमोदन.

ऋ, खूप सुंदर, निखळ लिहिलं आहेस. तुझ्या या असल्या लेखनशैलीमुळेच मी तुझ्या फॅनक्लबमध्ये आहे :स्मितः
तुझे जे काही टेन्शन आहे ते लवकरच दूर होईल.

फार सुंदर लेख
कित्येक वेळा अगदी अगदी झालं, माझ्याच भावना शब्दात उतरल्या आहेत असंच वाटत होतं
मीही जवळपास सेम परिस्थिती अनुभवली आहे, घराचे हप्ते भरायला बाबांना स्कुटर विकावी लागली होती, ते सायकलवरून कामाला जात, आई मान मोडेपर्यंत साड्यांना फॉल पिको ची कामे करत असे.
घरच्या परिस्थितीने तुझ्यासारखाच लवकर शहाणा झालो, शाळेची सहल आहे वगैरे कधी घरी सांगत नसेच कारण मग आई बाबांना नाही म्हणता येणार नाही आणि ते कसाही करून जमवतील हे माहिती होते.
आज दिवार मधला अमिताभ म्हणतो तसं बंगला आहे, गाडी आहे सगळं आहे पण ते दिवस जे शिकवून गेलेत त्यामुळे आजही कधी हात सोडून पैसे खर्च करायला जीव धजावत नाही.

तुझं जे काही टेन्शन आहे ते लवकर दूर होवो ही गणरायाच्या चरणी प्रार्थना

निवडक दहात जपून ठेवत आहे.
All the Best. Happy days are round the corner!
धीर धरी धीर धरी जागृत गिरिधारी तारितसे भाविकांस तोच चक्रधारी...

ऋन्मेऽऽष , तुम्ही ह्या तणावातून लवकरात लवकर बाहेर पडावे आणि मुलांना ह्या ताणाचा काही लवलेश लागू नये ही सदिच्छा!

समय के एक तमाचे की देर है प्यारे...
फिर मेरी फकीरी क्या.. तेरी बादशाही क्या... !!- क्या बात!
तुमचा लेख आवडला तो त्यातील प्रांजळपणामुळे. तुमची सारी विघ्ने दूर व्हावी ही गणपतीकडे प्रार्थना.

ऋ , एक नं एक शब्द वाचला काल. तुझ्यामुळे क्रॉन्स डिसीजबद्दल कळलं होतं, तेव्हा खरोखरच काळजी वाटली होती. हेही भिडलं.. ! सगळी विघ्नं दूर होवोत ही प्रार्थना आणि सदिच्छा आहेतच. Happy

खरे तर फिटे अंधाराचे जाळे नुसार लेख तिथेच थांबवायला हवा होता. शेवटचा पॅराग्राफ टाळता आला असता. >> का रे बाबा ? एकंदर तू इतरांशी शेअर करून मोकळा होणारा माणूस वाटतोस तेंव्हा लिहून दडपण कमी होत असेल तर जरुर लिही.

तुझं जे काही टेन्शन आहे ते लवकर दूर होवो ही गणरायाच्या चरणी प्रार्थना >> +१

असंच जगताय ना...
असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी ईछा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढुन देताना
संकटासही ठणकावुन सांगावे आता ये बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट देताना
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
गुरू ठाकूर
>>>>आणि जर चांगले झाले नाही..,
तर समजावे तो शेवट नाही..>>>> किती सकारात्मक....

निधड्या छातीने आयुष्याला सामोरे जा...हे ही दिवस जातील.
शुभेच्छा...

दसा
कविता कॉपी पेस्ट करून ठेवली आहे.

Pages