"मराठी भाषा दिवस : सरस्वतीची चिरंजीव मुले - शांताबाई शेळके {सीमंतिनी}"

Submitted by Barcelona on 26 February, 2022 - 02:16

ShantaShelke.jpeg

लहानपणी रेडियोवर कामगार सभा इ मराठी गीतांचा कार्यक्रम ऐकता ऐकता गरम गरम पोळी खायची नि शाळेला पाळायचं इतका साधा दिनक्रम. तेव्हा कधीतरी शांताबाईंच्या काव्याची ओळख झाली. दूरदर्शनच्या एखाद दुसऱ्या कार्यक्रमात त्यांना पाहिलं-ऐकलं ही होत. “टप टप टप टाकित टापा” आवडायचं वय जाऊन पुढे “पुनवेचा चंद्रमा आला घरी” आवडायचं वय आलं नि ते सरून “कान्हू घेऊन जाय, रानी धेनू घेऊन जाय” ऐकायचं वय आलं. तेव्हाही रेडियोवरची शांताबाईंची गोड, लडिवाळ गाणी सोबतीला होती.

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात शांताबाईंची वेगवेगळी गीते आवडत गेली. पण श्रोता म्हणून त्यांच्या दोन गाण्यांचं मला नेहमी आश्चर्य वाटतं - कसं सुचलं असेल? शांताबाईंची ही ‘परकायाप्रवेशा’ची विद्या फार मोहून टाकते.

जेव्हा बायका फार नोकऱ्या करायच्या नाहीत, “त्या” काळात शांताबाई प्रोफेसर होत्या. त्यांची नऊवार साडी, डोक्यावर पदर, छान ठसठशीत कुंकू यात इतका अदबशीरपणा, दरारा होता की त्यांनी या गाण्यासाठी काय ‘थॉट प्रोसेस’ वापरली असेल याचं कुतूहल नेहमी वाटतं. आपलं वय, आपलं शरीर, आपला व्यवसाय या अनुभवाने सीमित आपलं मन मोकाट सोडणं तसं अवघड असते. मन मोकाट सोडायचं पण ते त्या त्या पात्राच्या मनात जाऊन नेमकेपणाने अलगदपणे बसेल असं… कसं जमत असेल?

पहिलं आवडतं गाणं - “मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश”. या गीताला सूरसिंगार पुरस्कारही मिळाला. महानंदा सिनेमात हे गाणे दोन वेळा आहे. सुरुवातीलाच आशाबाईंच्या आवाजात येते तेव्हा मंगेशाचे देऊळ दिसते. प्रसन्न परिसर, शांत गाभारा, नि श्री मंगेशचा सुरेख चंदेरी मुखवटा. नंतर सिनेमात मंगेशाच्या पालखीच्या वेळी पुन्हा हे गाणे येते. उषा मंगेशकर आणि इतर गायिकांनी म्हणले आहे. सिनेमाची नायिका महानंदा ही भाविणीची मुलगी. कल्याणी ही भाविण तिची आई. कल्याणी म्हणून शशिकला पोक्त आणि तरी राजस फार शोभून दिसते. (भाविण म्हणजे देवाच्या नावाने मंगळसूत्र घालणारी. सामान्यपणे एक किंवा अनेक यजमान सांभाळावे तेव्हा भाविणीचा चरितार्थ चालतो.)

शांताबाईंनी भाविणीसाठी शंकराचे गाणे लिहीले आणि “तांबडी माती” मध्ये गृहिणीसाठीही शंकराचे गाणे लिहीले. तांबडी मातीतले ‘अपर्णा तप करते काननी’ आणि ‘मागे उभा मंगेश’
दोन्ही मध्ये बायको/प्रेयसी या स्त्रीच्या नजरेतून शंकर दिसतो. शंकर पराक्रमी देव - सुधीर मोघ्यांच्या गाण्यात ‘करुणा करा, जग जागवा’ किंवा आरतीत ‘नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले’ असा त्रिनेत्री ज्वाळा असणारा दिसतो. मात्र शांताबाईंच्या गाण्यात ‘जटाजूट माथ्यावरी, चंद्रकला शिरीधरी, सर्प माळ रुळे उरी’ असा जसं जमेल तसं सजून आलेला प्रियकर/नवरा शंकर आहे.

गृहिणीसाठी गाणे लिहीताना शांताबाईंनी उमेने केलेले तप, वडीलांनी नियोजित केलेला वर विष्णू पण मनात भरलेला शंकर आणि सासर-माहेर इ अशा स्वरूपाचे गाणे लिहिले आहे. पण त्याच जातकुळीतले म्हणजे शंकराच्या आराधनेचे गाणे जेव्हा भाविणीच्या तोंडी येते तेव्हा स्वयंवर-माहेर असे उल्लेख नाहीत. उलट तिचे आत्मभान गाण्यात उमटलेलं दिसतं - "शैलसुता संगे गंगा मस्तकी वाहे". समाजाच्या उतरंडीत गृहिणी सारखा दर्जा नसला तरी आपल्या यजमानाच्या मनाची ती राणी आहे हे नकळत गाण्यात उमटून जाते. ज्या पात्रासाठी गाणे लिहीतो त्याच्याशी इतकी ‘फाईन-ट्यूनिंग’ होणे किंवा जवळीक होणं हे शांताबाईंचं वैशिष्ट्य!

शांताबाईंचे दुसरे आवडते गाणे - “मनाच्या धुंदीत लहरीत ये ना”. शांताबाईंनी अनेक संगीतकारांबरोबर काम केले. त्यातले काही त्यांच्या बरोबरीचे, काही ज्येष्ठ. अशा दिग्गजांबरोबर त्यांच्या लिहिण्याची पद्धत वेगळी धीर गंभीर. जसं सुधीर फडके यांनी गायलेलं “तोच चंद्रमा नभात” मध्ये विरहात भग्न झालेला प्रियकर. “जाईचा कुन्ज तोच” म्हणतो तरी त्याची होरपळच अधिक जाणवत राहते. पण तरुण संगीतकारांबरोबर काम करताना शांताबाईंचे शब्द ही जणू तरुण होत जातात.

मनाच्या धुंदीत या गाण्याला देवदत्त साबळे यांनी चाल लावली तेव्हा बहुधा ते विशीतच असावे. त्यांच्या उडत्या चालीच्या गाण्याला शांताबाईंनी शब्द ही फार साजेसे लिहीले. कदाचित उलटही असेल शांताबाईंनी आधी गाणे लिहीले असेल आणि नंतर चाल लागली असेल. पण तो क्रम इथे महत्त्वाचा नाही तर चाल आणि बोल अगदी एकमेकास शोभून दिसतात. आयुष्यभर लुगडे नि डोक्यावर पदर अशा वेषात वावरणाऱ्या शांताबाई विशीचा प्रियकरात परकाया प्रवेश करतात तेव्हा - ‘जराशी सोडून जनरित ये ना’ लिहून जातात नि असंख्य श्रोत्यांच्या तोंडून नकळत ‘क्या बात!’ उमटते. ‘आता कुठंवर धीर मी धरू, काळीज बघत बघ हुरहुरू’ मध्ये त्याची हुरहूर आपल्यालाही लागते नि ह्याची प्रेयसी ‘बसंती वाऱ्यात तोऱ्यात’ लवकर यावी म्हणून आपणच नकळत गुणगुणू लागतो.

असं परकायाप्रवेशाचे वरदान असलेली शांताबाईंसारखी कवयित्री शतकातून एखादीच होते. पण अनेक शतकांना पुरेल इतके पाथेय देऊन जाते.

(चित्र साभार: विकीपिडीया).

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिहिलंय..

मभादि उपक्रमात शांताबाई नांव वाचलं तेव्हा साधारणपणे हेच मनात आलं होतं.

आहाहा फार मार्मिक लिहीले आहे. हे मुद्दे कधीच लक्षात आलेले नव्हते. मस्त आहे लेख. छोटेखानी आहे पण माहीती व भेदकते (इन्साईट) मध्ये संपृक्त आहे.

सीमंतिनी, मुख्य चित्राबद्दल विचारतो आहेतच, पण मुख्य चित्र म्हणून नाही तरी आपण नेहमी देतो तसं लिखाणामध्ये चित्र देता येईल (जसं तुम्ही प्रतिसादामध्ये दिलं आहे), असं वाटतं.

छान लिहिलंय,
मागे उभा मंगेश आणि तप करते काननी ची तुलना विशेष आवडली.
हे बारकावे कधी लक्षात आले नव्हते

सुंदर लिहिलयं!
>>
मागे उभा मंगेश आणि तप करते काननी ची तुलना विशेष आवडली.>> +१

मला शांता शेळके यांच्याबद्धल काहीच माहिती नव्हती... लेख छान आहे आणि भरपूर गोष्टी आणि गाणी कळल्या त्यांच्या...

सुंदर लिहिले आहेस सी ,
मागे उभा मंगेश आणि तप करते काननी ची तुलना विशेष आवडली.>> +१
मी लिहीले असते तर शांताबाईंवरच लिहीले असते. त्या मलाही फार आवडतात. त्यांची गाणी, लेखन, 'चौघीजणीं' पुस्तकाचा भावानुवाद व 'रानजाई' या कधीकाळी दूरदर्शनवर लागणाऱ्या कार्यक्रमामुळे माझ्यावर कळतनकळत बराच परिणाम झालायं. थोर विदुषी _/\_

छान लिहिले आहे. आवडले.
शांताबाईंची मुलाखत, तसेच त्यांनी लता मंगेशकरांची घेतलेली मुलाखत युट्युब वर पाहिली तेव्हा त्यांचे बोलणे ऐकतच रहावेसे वाटले.

छान लिहिलं आहेस.
माझा पण शांताबाइं (दीर्घ ई वाचा... दीर्घ लिहिली की अनुस्वार जातोय आणि मग एकदम शांता बाय फील येतोय. :डोक्याला हात: ) वर लिहायचा विचार आहे म्हणून आधी वाचणार न्हवतो पण वाचलाच शेवटी.

सगळ्यांना धन्यवाद.
अमितव, शांताबाईंबद्दल लिहावे तितके थोडे आहे. नक्की लिहा Happy उपक्रमासाठी तीनच दिवस आहेत. (अर्थात नंतरही लिहून झालं तरी आवडेलच पण 'डेडलाईन' शिवाय लिहीत नाही असं ही कधी होतं म्हणून आठवण दिली).

वा सीमंतिनी!

कधीकाळी दूरदर्शनवर लागणाऱ्या कार्यक्रमामुळे माझ्यावर कळतनकळत बराच परिणाम झालायं ......... माझ्यावर झाला की नाही ते माहीत नाही.पण सरोजिनी बाबर आणि शांता बाईंना पाहणे ऐकणे हा आनंद होता.

छान!

लहानपणापासून पदोपदी, नकळतपणे, कसलाही गाजावाजा न करता, त्यांच्या कवितांचा शिडकावा इतक्या सहजतेने मनावर येत राहिला की तुमचा आणि अमितवचा लेख वाचून शांताबाईंच्या कवितांवर अजून अजून वाचायला मिळावे असे वाटले.

शान्ताबाईंचे शांत सोज्वळ अदबशीर व्यक्तिमत्व लेखातून उत्तम उतरले आहे.
महानंदातली सगळीच गाणी, त्यांच्या चाली, आवडीच्या. मागे उभा मंगेश तर विशेषच.
लिखाण आवडले.

महानंदा जयवंत दळवी लिखीत कथेवर आधारीत सिनेमा आहे का? उच्च आहे तो सिनेमा. त्यातील सर्व गाणी खास आहेत. 'मागे उभा मंगेश-पुढे उभा मंगेश' तर आहाहा!!

अरे, सिमंतिनी, तुही शांता शेळके यांच्यावर लेख लिहीला आहेस की! मला आधी अमितचा लेख दिसला. हाही लेख आवडला.

“ आयुष्यभर लुगडे नि डोक्यावर पदर अशा वेषात वावरणाऱ्या शांताबाई विशीचा प्रियकरात परकाया प्रवेश करतात तेव्हा - ‘जराशी सोडून जनरित ये ना’ लिहून जातात नि असंख्य श्रोत्यांच्या तोंडून नकळत ‘क्या बात!’ उमटते.” … अगदी बरोब्बर!

(थोडे अवांतरः मला तसे कौतुक,आश्चर्य आणी आदर स्व. लता मंगेशकर बाबतीतही वाटायचे/ वाटते. आयुष्यभर एकटे राहुनही शेकडो गाण्यातुन त्यांनी जे प्रेमाचे विविध रंग ज्या आत्मियतेने/ जेन्युइनली आपल्याला ऐकवले आहेत की त्याला तोड नाही! ( मग त्यात रसिक बलमा या दु:खी विरहाच्या गाण्यापसुन ते दिल तो पागल है असे प्रेमाच्या अल्लड आनंदी गाण्यापर्यंच्या असंख्य गाण्यातुन त्यांनी नायिकेचा मुड श्रोत्यांच्या पार ह्रुदयापर्यंत बरोब्बर पोचवला आहे!)

छान लिहीले आहे. गाणी ऐकली आहेत, आवडतातही पण त्यांची आहेत हे बर्‍याचदा माहीतही नसायचे.
साधे, नेमके, अचूक, लयबद्ध शब्द आणि भाव निसटू न देता लिहीणे.
कविता हा प्रकार फार आवडीचा नाही, त्यामुळे आवर्जून वाचल्या जात नाहीत,
मध्ये एका कवितांच्या पानावर त्यांच्या कविता एक-एक वाचत गेले. मावळतीला गर्द शेंदरी आवडली होती.

अतिशय सुरेख लिहिले आहे. शांताबाई डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.
मी अमितव यांच्या लेखावर प्रतिसाद दिला होता त्यातील काही माहिती इथेही डकवत आहे.

शांताबाईंचा कदाचित थोडा अपरिचित पैलू म्हणजे त्याने अनुवादही सुरेख केले आहेत.
Louisa May Alcott च्या Little Women चा त्यांनी 'चौघीजणी' हा सुरेख अनुवाद केला होता.
तसेच Anthony Hope च्या Prisoner of Zenda आणि Rupert of Hentzau चे त्यानी अस्सल मराठी/कोल्हापुरी साज चढवून सुरेख रूपांतर केले आहे. पैकी पहिल्याचे नाव आता पटकन आठवत नाही पण दुसर्‍याचे नाव 'गाठ पडली ठका ठका' असे आहे. आता ही पुस्तके कुठे उपलब्ध आहेत का ते माहिती नाही.

आता जरा अवांतरः आज मराठी भाषा गौरव दिवस आहे, मराठी भाषा दिवस नाही. तो १ मे रोजी साजरा केला जातो. मी संयोजक मंडळींना बदल करण्याविषयी सुचवले आहे जेणेकरून योग्य माहिती लोकांपुढे जावी. इथेही ही टीप टाकत आहे. धन्यवाद!

Pages