Submitted by रोहितकुलकर्णी on 7 July, 2020 - 13:51
केवढा आक्षेप घेतो तू कवितेवर
काय होते जर यमक जुळलेच नाहीतर
ज्यात आहे जीव माझा पोपटाला त्या
पिंजरा दाखव पुन्हा उडलाच नाही जर
गावचा सरपंच आहे देवमाणूस ना?
टाकतो वाळीत वस्ती कोण वेशीवर!
काल मेली जी तहानेने, तिच्या नावे
पाणपोई बांधलेली आज वाटेवर
वेगळे होते तुझ्या माझ्या मते नाते
राहिले होते तुझ्या माझ्यामध्ये अंतर
तू हवे तितके मला फटकार आयुष्या
जाड आहे चामडी संपूर्ण अंगावर
देवळाच्या पायरीवर भूक नतमस्तक
मी पुन्हा नास्तिक झालो हे बघितल्यावर
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा