डॉ. अनिल अवचटांचं मला आवडलेलं पुस्तक - मोर

Submitted by वावे on 25 February, 2020 - 04:49

एखादं सुंदर चित्र पहावं, ते आवडावं, पण थोडं जवळ जाऊन, निरखून पाहताना अवचित त्यातलं वेगळंच काहीतरी सामोरं यावं आणि मग त्यामुळे त्या संपूर्ण चित्राचा अर्थच आपल्यापुरता बदलून जावा असं होतं आयुष्यात कधीकधी.

’ मोर’ या पुस्तकातले जवळजवळ सगळेच ललितलेख या सूत्रात बांधलेले आहेत असं मला वाटतं. अनिल अवचटांची ख्याती आहे ती विषयाच्या खोलात जाऊन, तो समजून घेऊन मग त्याबद्दल लिहिण्याची. पण या लेखनाचं स्वरूप तसं नाही. यात व्यक्तींच्या, नात्यांच्या, स्थळकाळांच्या, अवचित, निर्हेतुकपणे समोर आलेल्या बाजू आहेत.

सुरुवात होते ती मोराबद्दलच्या लेखाने. चित्रकार अनिल अवचटांचा हा अत्यंत आवडता पक्षी. झपाटल्यासारखी मोराची चित्रं काढता काढता ते त्याच्या प्रेमातच पडलेले होते. पण प्रत्यक्षातला, पिंजर्‍याबाहेरचा मोर त्यांनी कधी पाहिला नव्हता. एकदा अचानकच एक पाळीव मोर त्यांच्यासमोर आला. आधी अप्रूप वाटलं, त्याच्या लखलखीत, कमनीय सौंदर्याने डोळे दिपले. पण मग एकदा भारावलेपणाचा हा पहिला बहर ओसरल्यावर मात्र त्याच्या आवाजामुळे, आक्रमकपणामुळे तो त्यांना डोळ्यांसमोरही नको वाटू लागला.

एक लेख आहे परांडा किल्ल्याबद्दलचा. तोफा, बुरुज, भुयारं यांनी सज्ज असलेला परांडा किल्ला बघून आल्यानंतर अवचटांना समजलं की या किल्ल्याला म्हणे ’ रंडका किल्ला’ असं म्हणतात. कारण इथे कधीच कुठली लढाई झाली नाही. या तोफा, ही भुयारं ज्यासाठी बांधली गेली, ती लढाई कधी लढली गेलीच नाही. म्हणूनच किल्ला बर्‍यापैकी सुस्थितीत आहे. हे ऐकल्यावर अवचटांना सिंहगड आठवला. त्याचे पडके तटबुरुज आठवले. इतके दिवस त्यांना ते दीनवाणे वाटायचे, पण आता मात्र ते कृतार्थतेने उभे आहेत असं वाटू लागलं. हीदेखील एक नवी दृष्टीच!

बालमनाला अनेक गोष्टींचं, ठिकाणांचं, व्यक्तींचं आकर्षण, अप्रूप असतं. चालत्या एस्टीत सराईतपणे उभं राहून तिकिटं फाडणारा कंडक्टर आवडतो, पत्रं आणणारा पोस्टमन आवडतो, एखाद्या पडक्या वाड्याबद्दल एकाच वेळी भीतीही वाटते आणि आकर्षणही वाटतं. आपल्या प्रत्येकाच्या मनात अशा काही खास आठवणी असतात. मोठं होत असताना, कधी आपली दृष्टी बदलली म्हणून, तर कधी ती ठिकाणं बदलली म्हणून ही आकर्षणं नाहीशी होतात. अवचटांचंही तसंच झालं. ओतूरचं पोस्ट ऑफिस, तिथली मांडवी नदी, पूर्वीच्या काळी असणार्या पेट्रोमॅक्सच्या बत्त्या, त्यांच्या लहानपणी ’अंदमान’ असणार्या ओतूरमधून पुण्यामुंबईला केलेले एस्टीचे प्रवास या सगळ्याबद्दल मनात जपून ठेवलेली एक रम्य, कधी गूढ अशी भावना काही ना कारणाने विरत गेली आणि या गोष्टींचं नवंच रूप डोळ्यासमोर आलं. या सगळ्याकडे तटस्थपणे पाहताना त्यांनी फार छान प्रकारे सविस्तर लिहिलं आहे.

ही अशी प्रतिमाभंजनं, ही disillusionment स्वतःबद्दलही होते. आपण स्वतःला भले प्रामाणिक, सचोटीने वागणारे, मानवतावादी वगैरे समजत असलो, तरी कधीतरी कुठल्यातरी प्रसंगात आरशावरचा पातळ पडदा दूर होतो आणि आपलंच, आपल्याला अनोळखी असलेलं रूप दिसतं. अनिल अवचटांच्या लेखनात सतत दिसणारा प्रांजळपणा आणि मनाचा खुलेपणा अशा अनुभवांच्या वर्णनात दिसतो. किंबहुना, मुळात मनाचा खुलेपणा असेल तरच आरशावरचा तो पातळ पडदा दूर होतो. कधी उलटंही होतं. आपल्याला वाटतं तितके काही आपण बिघडलेले, बेशिस्त, आळशी नाही, असा सुखद साक्षात्कारही कधीतरी होतो.

असे हे बदललेले दृष्टीकोन डॉ. अवचट संवेदनशील मनाने अनुभवून प्रांजळपणे आपल्यासमोर ठेवतात. ही वृत्ती कुठेही छिद्रान्वेषी, निराशावादी वाटत नाही. उलट त्यातल्या प्रामाणिकपणामुळे वाचताना मोकळं मोकळं वाटत राहतं.

अनिल अवचटांची इतरही अनेक पुस्तकं आवडती असली, तरी या पुस्तकाच्या वेगळ्या धाटणीमुळे या पुस्तकाबद्दल लिहावंसं वाटलं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवचटांचं आधी 'कार्यरत' वाचलं होतं. ते वाचून भारावून गेलो होतो. पुढे प्रश्न आणि प्रश्न वाचलं, ते ही आवडलं. मग मोर वाचलं. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्रतिमाभंजन आणि एक निराळाच दृष्टिकोन ते देऊन जातात. त्यांचं सगळ्यात अंतर्मुख करणारं (आवडलेलं - असं म्हणणार होतो, पण तसं म्हणू शकत नाही ह्या पुस्तकाबाबत. त्या पलीकडे आहे ते.) म्हणजे 'सुनंदाला आठवताना'. ते इतक्या सोप्या शब्दात आपले विचार मांडू शकतात हेच मला अफलातून वाटतं.

धन्यवाद सामो आणि ह. पा. सामो, मागच्या पानावर प्रतिसाद आहे तुमचा. Happy
ह. पा, कार्यरत आणि सुनंदाला आठवताना ही दोन्ही पुस्तकं मी वाचलेली नाहीत. वाचली पाहिजेत. प्रश्न आणि प्रश्न अलीकडेच वाचलं. खोलात जाऊन, अभ्यासपूर्ण लिहिणं ही अनिल अवचटांची खासियत त्या सगळ्या लेखांमध्ये पुरेपूर आहे! मीवापु धाग्यावर लिहिलं होतंच त्याबद्दल.
सोप्या शब्दांत विचार मांडतात आणि 'अलिप्त' शब्द कोरडा वाटतो, पण dispassionate म्हणता येईल, अशा प्रकारे लिहितात.

अचानकच एक पाळीव मोर त्यांच्यासमोर आला. आधी अप्रूप वाटलं, त्याच्या लखलखीत, कमनीय सौंदर्याने डोळे दिपले. पण मग एकदा भारावलेपणाचा हा पहिला बहर ओसरल्यावर मात्र त्याच्या आवाजामुळे, आक्रमकपणामुळे तो त्यांना डोळ्यांसमोरही नको वाटू लागला. >>>>>>>> हेच मानवी नात्यांमधेही होत असतय. मोर स्नोवेलवर ऐकल तेव्हा मनात हेच आल.

>>>>>हेच मानवी नात्यांमधेही होत असतय.
पण त्यामध्ये फक्त मोराचा म्हणजे समोरील व्यक्तीचा दोष नसून, आपला मनुष्यस्वभाव सुद्धा ५०% कारणीभूत असतो. एकदा समोरील माणसातील मिस्टरी ओसरली की मग तितकेसे ग्लॅमर रहात नाही. विच इज बट फेअर.

सामो आणि प्रकाश घाटपांडे, बरोबर आहे.
पण याच्या उलटही होतं की.
आपण वयाने, अनुभवाने मोठे होतो. समोरची व्यक्तीही मोठी होते. परिस्थिती बदलते. माणसंही बदलतात. कधीकधी असं होतं की आपण उगाचच एकमेकांबद्दल गैरसमज करून घेतलेत असं नंतर लक्षात येतं. मनाचा खुलेपणा असेल तर मन हे बदल टिपतं आणि नवीन परिस्थितीशी जुळवून घेतं.

Pages